Monday 26 September 2022

“मेट्रोचे पुणे” प्रत्यक्षात आलेले एक स्वप्न.

 मेट्रोचे पुणे प्रत्यक्षात आलेले एक स्वप्न.

मस्त थंडीचे दिवस होते.  रात्रीच्या वेळेस तर हवेतला गारठा वाढला होता.  दूरचित्रवाणीवर नुकतेच; पुण्याचे तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे’, अशी बातमी झळकली होती आणि रवीला एकदम अचानक ही बातमी पाहून हुडहुडी भरायला लागली होती.  त्याने लगोलग बायकोला सांगितले आणि त्याचा स्वेटर,  मफलर,  कानटोपी, हातमोजे,  पायमोजे, काढून त्याच्या खोलीत ठेवायला सांगितले.  तसेच झोपतांना एक रजई त्यावर एक सोलापुरी चादर जोडून त्याचे पाघारून तयार ठेवायला सांगितले.  खोलीच्या खिडक्या आणि पडदे बंद असुदेत कारण आजकाल मला थंडी अजिबात सहन होत नाही, असे तो म्हणत म्हणत दूरचित्रवाणीवरील बातम्या पहात सगळा जामानिमा करून स्वत:ला गुरफटून घेऊन बसलेला होता.

संध्याकाळच्या शिळ्या बातम्या म्हणजे त्याच त्या बातम्या बातमीदार चघळत बसला होता.  आजकाल पुण्यात पदपथांचे काम जोरात चालू आहे,  त्यावरचा राडा रोडा ठेकेदाराने अजूनही काढला नाही.  त्यात भरीला भर पादचारी मार्गावरील अतिक्रमणे अजूनही महानगरपालिकेने हटवलेली नाहीत.  पादचारी मार्गावरच महावितरण कंपनीने त्यांचे डीपी,  नोटीसा देवूनही योग्य जागी हलवलेले नाहीत.  बहुधा एखाद्या मोठ्या दुर्घटनेची ते वाट पाहत असावेत असे बातमीदार सांगत होता.  मधेच सातारा रस्त्यावरील सायकलसाठीच्या केलेल्या मार्गाचे उद्घाटन माननीय महापौरांच्या हस्ते पार पडलेल्याची चित्रफित दाखवली जाते आणि लगेचच त्याला लागुनच पुढची बातमी असते की ह्या सायकल मार्गाचा स्थानिक दुकानदारांनी त्यांच्या आणि येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या लावण्यासाठी केलेला बेकायदेशीर उपयोग दाखवण्यात येतो.  सातारारोडवर कात्रज ते स्वारगेट मार्गावर बीआरटीचे काम कासवछाप गतीने चाललेले काम आणि अजून पाच सहा महिने लागतील असे दिलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे.  सातारा रस्त्यावरील उड्डाणपूल बहुतेक पाडावा लागेल की काय अशी निर्माण केलेली शंका कारण, स्वारगेट ते कात्रज मेट्रोसाठी ह्या पुलाचा अडथळा होतो आहे असे काही तज्ञांचे मत आहे वगैरे वगैरे.  देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रिंगरोडची कामे सुरु करण्यात आली आहेत.  त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरु करण्यात आले आहे आणि तो राडारोडा सध्या रस्त्यावरच टाकण्यात येत आहे व त्यामुळे आंबेगाव कात्रज रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते आहे व ह्या रस्त्यावर मंगल कार्यालयांच्या बेकायदा आणि बेशिस्त पद्धतीने लावलेल्या वाहनांचा मोठा अडसर वाहतुकीस होत असतो.  अशातच ह्या रहदारीत एक रुग्णवाहिका अडकून पडली व त्यातील रुग्णाचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची दु:खद घटना घडली होती; ही ब्रेकिग न्यूज झळकत असते.  कात्रज कोंढवा रिंगरोडचे काम एका ठेकेदारास देण्यात आले आहे त्यांनी नुकताच आपल्या कामाचा नारळ फोडून श्रीगणेशा केला आहे असे त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले आहे.  काही सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांनी मिळून महानगरपालिकेवर शहरात चाललेल्या विकास कामांचा पाठपुरवठा करण्यासाठी मोर्चा नेला आहे, त्यात त्यांची काही अधिकारी वर्गाशी बाचाबाची झाली.  पोलिसांनी मध्यस्ती करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे, तरी त्याचे पर्यावसन एका छोट्या दंगलीत झाले आणि कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केली व रस्त्यावरील चार पाच बसेस फोडून त्यांचे नुकसान केले.  मनुष्यहानी झाली नाही परंतु महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे.  अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  पोलीस पुढील तपास करत आहेत.  मेट्रोचे काम व्ह्नाज पासून पुढे पौडरोड पर्यंत आले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच दुहेरी उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले आहे व पुढील कामास ताबडतोब सुरवात करण्यात आली आहे.  एसएनडीटी कॉलेज पासून चक्राकार रहदारीस सुरवात करण्यात आली आहे ह्याची नागरिकांनी दाखल घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.  ह्यामुळे व्हनाज-डेक्कन-शिवाजीनगर-रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाला गती येईल असे मेट्रोच्या प्रवक्त्याने सांगितले.  नदीपात्रील मेट्रोचे काम वेगात चालू आहे.  पिपरी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि ते २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा मानस मेट्रो अधिकाऱ्यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.  शिवाजीनगर-रामवाडी पर्यंतच्या मेट्रोच्या कामास लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.  त्यासाठीच्या आवश्यक सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत.  तसेच चांदणी चौकाच्या भू-संपादनाचे कामही लवकरच पुरे करून तेथील उड्डाण पुलाच्या कामास सुरवात करण्यात येणार आहे.  हिंजेवाडी-बालेवाडी-शिवाजीनगर मेट्रोला राज्यमंत्रीमंडळाचा हिरवा कंदील मिळाला आहे.  हाच प्रकल्प लवकरच चांदणी चौकापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे व स्वारगेटहून मेट्रो सिंहगडरोड मार्गे धायरी-खडकवासला येथपर्यंत नेण्याचे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरले आहे व त्यासंदर्भातील कायदेशीर पूर्तता झालेली आहे असे एका नगरसेवकाने सांगितले आहे.  मुंबई पुणे द्रुतगती मार्गाजवळील किवळे ह्या गावाजवळ ‘हायपरलूप’ ह्या वेगवान वाहतुकीसाठी प्रसिद्ध असेलेल्या नवीन प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहे आणि ह्या प्रकल्पाची चाचणी दोन वर्षात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.  हा प्रकल्प यशस्वी झाला तर पुणे ते मुंबई हे अंतर केवळ २० मिनिटांत गाठता येईल अशी खात्री प्रकल्पाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी ह्या वाहिनीच्या प्रतिनिधीस दिली आहे.  पुणे महानगरपालिकेने बीआरटीच्या मार्गाचा विस्तार करायचे ठरवले आहे.  नगररोड,  हडपसर,  आळंदीरोड,  सातारारोड ह्या ठिकाणी सुरु असलेली अर्धवट कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे आणि साधारण १०००-१५०० नवीन बसेस ह्या मार्गावरून सोडण्यात येणार आहेत व त्यांची खरेदीची व्यवस्था महानगर पालिकेने केलेली आहे.  बीआरटी आणि मेट्रो मार्गांची सांगड घालून पुणेकरांचा शहरांतर्गत प्रवास सुखकर करण्याचा हा एक महत्वाकांशी उपक्रम राबवण्यात येत आहे आणि त्याची पूर्तता साधारण २०२० पासून सुरु होऊन २०२२ पर्यंत संपणार आहे असा विश्वास ह्या अधिकाऱ्यांनी समस्त पुणेकरांना देवून त्यांच्या सहकाराची मागणी केली आहे.  कृषीमहाविद्यालयाच्या जागेत भूमिगत मेट्रो प्रकल्पाला सुरवात झाली आहे तसेच स्वारगेट येथेही त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या खड्ड्याच्या खोदाईचे काम सुरु करण्यात आले आहे.  लवकरच बुधवार पेठेतील जागेचे भू-संपादन पूर्ण करून तेथील भुयारी मेट्रोच्या कामास सुरवात करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट ते शिवाजीनगर ह्या भुयारी  मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  नुकत्यात हाती आलेल्या बातमीनुसार, पुण्यात ‘ड्रोन ट्याक्सी’ सुरु करण्याची योजना आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर बोलणी झाली असून हा महत्वाकांशी प्रकल्प २०२२ पर्यंत अमलांत आणण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.  पर्यावरण मंत्रालय आणि वाहतूक मंत्रालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पुण्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे तसेच पुण्यात मुठानदीवर तीन धरणे असून महानगरपालिकेच्या कृपेने सांडपाणीही मुठेच्या जलप्रवाहात सोडल्यामुळे मुठा नदी बारा महिने भरून वाहत असते त्यामुळे ह्या नदीवर खडकवासला धरणापासून ते येरवडा येथील बंडगार्डन पुलापर्यंत ‘जल वाहतूक’ करण्याचे योजिले आहे व ह्या प्रकल्पासाठी पर्यावरण खात्याची मान्यता प्राप्त झाली आहे हे विशेष नमूद करण्यात आले आहे व हा प्रकल्पही साधारण २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.  एकूण काय तर २०२०/२०२२ मध्ये पुण्याचा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे व मेट्रोचे पुणे म्हणून नक्कीच नावारूपास येईल असे वाटते.

अधून मधून, हा बातमीदार अजूनही काही किरकोळ बातम्या देत होता,  म्हणजे,  कुठे एखाद्या अल्पवयीन मुलीवर तर कुठे एखाद्या महिलेवर बलात्कार झालाय, कुठेतरी तरुण मुलीचा विनयभंग झालाय, कौटुंबिक कलहातून एखादा खून झालाय, दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे तोट्यात चाललेल्या शेतीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करताहेत, मराठा, धनगर आरक्षण मोर्चा शांततेत निघालाय, मुस्लीमही आरक्षण मागण्यासाठी मोर्च्याच्या तयारीत आहेत.  तुरळक ठिकाणी आग लागून काही जीवित आणि वित्तहानी झाली आहे.  अनधिकृत बांधकाम कोसळून काही लोकं मृत्युमुखी पडलेत तर दिल्लीत प्रदूषणाने कहर केला आहे.  उदबत्ती पेटवलीत तरी धोक्याची पातळी ओलांडली जातेय आणि कित्येक लोकांना श्वसनाच्या विकारांचा त्रास होतो आहे.  मुंबईत तर चार पाच ठिकाणी जुन्या इमारती पडून मोठी दुर्घटना घडल्या आहेत.  पावसाने लोकल सेवा ठप्प होऊन मुंबईतील चाकरमान्यांचे हाल झाले आहेत आणि तरीही कुठलीही तक्रार न करता हे मुंबईकर तितक्याच उत्साहाने आपले जीवन कंठीत आहेत.  पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात थैमान घातले आहे त्यामुळे उभी पिके वाहून गेली आहेत.  शेतकरी हवालदिल झाले आहेत.  सरकारने नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश जारी केले आहेत.  विजय मल्ल्या, निरव मोदी परदेशामध्ये त्यांचे आयुष्य अगदी छानछोकीत ऐशोआरामात जगत आहेत असे काही सूत्रांनी सांगितले आहे.  त्यांना भारतात परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार खात्यास बाजूला सारून स्वत: पंतप्रधान कार्यालयाने कामास लागावे का ह्याचा सध्या विचार चालू आहे.  लवकरच सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सध्या बऱ्याच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांमध्ये युतींचा ताळमेळ बांधण्याचे काम अगदी जोरात चालू आहे व त्यामुळे जनतेच्या कामास तसेच काही सामाजिक प्रकल्पांस थोडासा उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वाहिन्यांवर त्यांच्या दृष्टीने सोयीस्कर असलेल्या विषयांवर रोखठोक अथवा बेधडक अशा निष्फळ चर्चा चालू आहेत त्यावरून घरामध्ये नवरा आणि बायको मध्ये फक्त भांडणे होत आहेत कारण बायकोला तिच्या आवडीची ‘झी’ वरील मराठी मालिका पहायची आहे तर नवऱ्याला ह्या निष्फळ बातम्या आणि चर्चा पहायच्या आहेत.  ह्यात खरा जीव जातो तो त्या रिमोटचा हे मात्र नक्की..

बापरे किती बोलावे लागते नाही का ह्या बातमीदारांना.. बिचारे घरी गेल्यावर झोपेतही हेच बडबडत असावेत बहुधा.. असा विचार मनातल्या मनात करत रवीला कधी एकदम गाढ झोप लागली हेच कळले नाही.  बायकोनेही त्याला अजिबात उठवले नाही.

त्याच्या मनावर ह्या बातम्यामधील विविध प्रकल्पांचा एवढा प्रभाव झाला होता की तो स्वप्नातच २०२०/२०२२ साली पुणे कसे असेल ते पाहू लागला.  ते असे....

नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून रवी ४ किलोमीटर फिरून आला.  स्वत:चे आवरले, देवपूजा केली, चहा नाष्टा केला आणि सोफ्यावर बसून वृत्तपत्र वाचीत बसला होता.  कार्यालयास जायला अजून अर्धा तास होता.  आज त्याचा बेत जरा निराळाच होता.  त्याने बायकोला सांगितले की मी आज जरा १५ मिनिटे लवकरच निघतो.  गाडी काही नेत नाही आणि रिक्षाचाही कंटाळा आला आहे.  आज मी कार्यालयात सार्वजनिक वाह्तुकीनेच जातो आहे.  काय ! चालेल ना.  बायको म्हणाली चालेल की, त्यात काय एवढे !  फक्त तुमच्या तराजुतून ह्या सार्वजनिक उपक्रमांचे विश्लेषण करू नका.  म्हणजे प्रकल्पाच्या सुरवातीला तो डिसेंबर २०२० पर्यंत पुरा होणार आहे ह्याचा अर्थ तुम्हीं लगेचच म्हणजे आजच ते ही आज ३१ डिसेंबर २०२०ला तो अजमावण्याची गरज नाही.  काही कामे अपूर्ण असतील तर उगाचच स्वत:ची चीड चीड करून रक्तदाब वाढवून घेऊ नका आधीच आपल्याला हृदयविकाराने ग्रासले आहे हे लक्षात ठेवा.

बायकोचे बोलणे हवेत विरेपर्यंत रवी घरातून निघाला होता.  घरासमोरील टेलिफोन कार्यालयाजवळ असलेल्या सार्वजनिक सायकलचा वापर करायचे त्याने ठरवले.  भ्रमणध्वनीवरून कुठलेतरी माध्यम चालू करून त्या सायकलचे कुलूप काढून घेतले आणि सायकलला टांग मारून तो चक्क सातारा रोडला लागला.  बालाजी नगरला आल्यावर त्याने ती सायकल तेथील सार्वजनिक सायकल स्थानकावर सोडली.  भ्रमणध्वनीवरून मागण्यात आलेले पैसे ‘रूपे’च्या माध्यमातून दिले आणि चक्क ‘बीआरटी’ मार्गावरील बसस्थानकात प्रवेश केला.  काय आश्चर्य एका मिनिटात स्वारगेटला जाणारी बस आली.  अगदी वातानुकुलीत बस.  स्थानकावर आल्याबरोबर खाडकन दरवाजे उघडले, रवी आणि बाकीचे प्रवासी आत चढले आणि दार बंद झाले.  बसायला खिडकीजवळची जागा मिळाली.  वाहकाने स्वारगेटचे तिकीट रवीच्या हातावर टेकवले आणि एवढेच पैसे म्हणून तो आश्चर्यचकितच झाला.  त्याचे कार्यालय कोथरूडला आहे आणि त्याला धनकवडीहून कोथरूडला जायला स्वारगेट मार्गेच जावे लागते हे बायकोने सांगितले होते कारण ह्या पठ्ठ्याला स्वत:ची चारचाकी किंवा रिक्षा हीच दोन प्रवासाची साधने आहेत असे वाटत होते !  ‘बीआरटी’ मुळे मोजून वीस मिनिटात बस स्वारगेटला पोचली होती.  रस्त्यात त्याला स्वारगेट-कात्रज मेट्रोचे काम चालू असलेले दिसले होते.  त्याचा मार्केटयार्ड चौकात मेट्रोचा मार्ग थोडासा वळवून बिबवेवाडी मार्गे नेलेला जाणवला होता आणि पदाम्वती ते भारतीविद्यापीठ दरम्यान नुकताच बांधलेल्या उड्डाण पुलास जीवनदान दिलेले पाहून त्याला समाधान वाटले होते.  कामाच्या प्रगतीवरून बहुतेक २०२२ पर्यंत मेट्रोचा हा मार्ग नक्की पूर्ण होईल ह्याची रवीला खात्री पटली होती.  हे ही नसे थोडके असे म्हणून त्याने स्वत:च्या मनाचे समाधान करून घेतले.

रवी स्वारगेट स्थानकावर आल्यावर बसमधून उतरला आणि पादचारी मार्गावरून चालत जावून ‘मेट्रो’ स्थानकात प्रवेश केला.  हे भले मोठे स्थानक बघून त्याचे तर डोळेच दिपले होते. (तसे पाहायला गेले तर अजून बरीचशी कामे चालू होती. कदाचित ती पूर्ण व्हायला २०२२ तर नक्की उजाडणार होते. परंतु प्रगती खूपच चांगली झालेली होती हे निर्विवाद होते.)  आपण नक्की ‘स्वारगेट’लाच आलोय ना का कुठे परदेशात आलोय अशी त्याची मानसिक अवस्था झाली होती.  जिकडे पाहावे तिकडे माणसेच माणसे.  इतकी कामे चालू असली तरीही इतकी स्वच्छता, शिस्तबद्धता.  छे छे, हे काहीतरी वेगळेच आहे,  कदाचित आपण सिंगापूर, मलेशियाला आलोय की काय असेच त्याला वाटले.  सगळीकडे माहिती देणारे फलक होते, कुठेही चुकायला होणार नाही असे दिशा दर्शक होते आणि त्यातही जर वाटले तर मी आपणास मदत करू का” !  असे सौजन्याने विचारणारे काही कर्मचारीही होते.  भुयारी मेट्रोचे काम अजून अपूर्ण होते ते ही डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल असे तिथे प्रकल्पाची माहिती देणाऱ्या एका फलकावर लिहिलेले रवीला दिसले आणि तो पुन्हा एकदा मनोमन सुखावला.

रवीला कोथरूडला जायचे होते.  त्याने स्वारगेट स्थानकाला लागुनच असलेल्या ‘पीएमटी’कडे आपला मोर्चा वळवला आणि डेक्कनला जाणारी बस पकडली.  एक तर रवीने पीएमटीने फारसा प्रवास केलेलाच नाही त्यात त्याला ही नवी कोरी वातानुकुलीत ई बस फारच भावली.  त्याने डेक्कनचे तिकीट काढले कारण त्याला आता डेक्कन वरून मेट्रोने व्ह्नाजकडे जायचे होते कारण मेट्रोने नुकताच व्ह्नाज ते डेक्कन आणि पिंपरी ते कृषिविद्यापीठ-शिवाजीनगर हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला होता.  रवीला त्याचाच तर लाभ घ्यायचा होता.  साधारण २० मिनिटांत रवी स्वारगेटवरून डेक्कनला पोचला.  त्याच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय असा क्षण होता.  पुण्याच्या उज्वल भविष्याची ग्वाही देणारा हाच तो क्षण रवीला आजमावता आला हेच त्याचे भाग्य होते.

डेक्कन मेट्रो स्थानकात पोचल्यावर रवीची हाताची दहाही बोटे तोंडात गेली.  डेक्कन स्थित पुलाची वाडी ह्या त्याच्या जन्मस्थळा पासून जेमतेम हाकेच्या अंतरावर असेलेले हे ‘मेट्रो स्थानक’ पाहून आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यासारखे वाटत होते रवीला. तो पूर्ण भंजाळून गेला होता.  सगळेच इतके अजब होते की काही विचारूच नका.  ते सरकते जिने काय, लख्ख दिव्यांचा झगमगाट काय, प्रत्येक भितींवर पुण्यातील ऐतिहासिक घडामोडींचे अतिशय सुबक आणि सुंदर चित्रे रंगवून ह्या स्थानकाच्या वैभवात भर टाकत होती.  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्याच भिंतींवर अप्रतिम कलाकुसरीने रेखाटून वातावरण भारावून टाकत होता आणि अभिमानाने ३-४ इंच छाती फुगवत होता.  थोडेसे वर एक जिना चढून वर गेलात की मुख्य रस्त्यावर जाता येत होते, तेथून तुम्हीं रिक्षा, ट्याक्सीने पुणे शहरात जावू शकत होता.

रवी डेक्कनवरून-व्ह्नाजकडे जाणाऱ्या मेट्रोत बसला. नदीपात्रातून सुरु झालेला मेट्रोचा तो प्रवास, पहिले स्थानक ‘गरवारे कॉलेज’ आले.  मेट्रो काही सेकंद त्या स्थानकात थांबली आणि रवीच्या स्मृती पटलावर १९८०-८३ गरवारे महाविद्यालयातील तो सुवर्ण काळ हलकेच तरळून गेला.  एकएक करत साधारण दहा मिनिटांत मेट्रो ‘मयूर कॉलनी’ स्थानकात घुसली.  रवीला ह्याच स्थानकावर उतरायचे होते कारण त्याला कर्वे पुतळ्याकडे जायचे होते.  मेट्रो स्थानकाच्या बाहेर येऊन त्याने सार्वजनिक सायकल स्थानकावरील एक सायकल घेतली आणि टांग टाकून तिथून अगदी १ किलोमीटर लांब असलेल्या आपल्या कार्यलयाकडे मार्गस्थ झाला.  पाच मिनिटात गडी कार्यलयाच्या जवळ पोचला.  तेथील जवळच्या सार्वजनिक सायकल स्थानकावर त्याने सायकल सोडली. भ्रमणध्वनी द्वारे पैसे दिले आणि चालत म्हणजे फक्त ५०च पावले चालत कार्यालयात पोचला.  घरून निघाल्यापासून फक्त ४० मिनिटात रवी कुठलीही दगदग न करता चक्क रोजच्या पेक्षा अगदी निम्म्या खर्चात कार्यलयात पोचला होता आणि मनोमन आपल्या पुण्याच्या सार्वजनिक प्रवास व्यवस्थेला, महानगरपालिकेला, प्रशासकीय यंत्रणेला प्रकल्प अधिकाऱ्यांना आणि मुख्यमत्री, पंतप्रधान, पुण्याचे महापौर,  आमदार,  खासदार, व सर्व राजकारण्यांना धन्यवाद देत होता. 

एकंदरीत पुणे शहराचा संपूर्ण मेट्रो प्रकल्प साधारण २०२२ पर्यंत पूर्ण व्हावा असे रवीला सध्याच्या प्रगतीवरून वाटले व त्याच्या साथीला बीआरटी तसेच रिंगरोडचीही सुविधा पाहून पुणे शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अगदी निर्धोकपणे जाता येऊ शकते ह्याची खात्री त्याला पटली.  ह्या सर्व प्रकल्पांच्या कामांमुळे सध्या पुण्यात खूपच वाहतूक कोंडी होते आहे हे मान्य आहे.  परंतु पुढील ५० वर्षे जर का सुखकर प्रवासात काढायची असतील आणि आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर हा त्रास सहन करणे हे एक पुणेकर ह्या नात्याने आपले सामाजिक कर्तव्यच आहे असे रवीला अगदी मनापासून वाटले.  

रवीची खात्री पटली की २०२० साली नाही तरी २०२२ पर्यंत तरी हे सगळे प्रकल्प पूर्णत्वास जातील आणि त्याने त्याच्या स्वप्नातल्या पुण्याला रामराम केला.  मधेच अपरात्री त्याला जाग आली तेंव्हा त्याच्या समोर दूरचित्रवाणी संच चालूच होता आणि तोच बातमीदार पुन्हा पुन्हा त्याच त्या बातम्या परत परत आळवत होता.  तो तरी काय करणार बिचारा!  चोवीसतास कुठून पैदा करायच्या हो नवीन नवीन बातम्या.....

आणि इतक्यात त्या बिचाऱ्या बातमीदारावर एक अतिशय धक्कादायक बातमी देण्याची वेळ आली ती म्हणजे; कोरोना नावाचा एक विषाणू आला आहे. त्याने सर्व जगभर धुमाकूळ घातला आहे. त्याच्या प्रादुर्भावाने चीन, युरोप, अमेरिकेत लाखो लोकं मृत्युमुखी पडले आहेत व लवकरच हा विषाणू भारतातही आपला प्रादुर्भाव दाखवायला सुरवात करतो आहे. परदेशातून आलेल्या लोकांच्या मुळे हा संसर्गजन्य रोग भारतात आपले पाय पसरू लागला आहे. काळजीचे कारण म्हणजे ह्या विषाणूवर अजूनही लस सापडलेली नाही व त्यावर कोणताही औषध उपचार सापडलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने सर्व व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले आहेत.  संसर्गाने हा विषाणू लगेचच पसरतो आहे.  त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात ने येणे हाच काय तो मुख्य उपाय आहे. त्यामुळे पुढील काही काळासाठी सरकरने लॉकडाऊन जाहीर केले आहे. अक्षरश: ‘संचार बंदी’ लागू करण्यात आली आहे...

रवीला ही बातमी ऐकून थोडी चिंता वाटू लागली. त्याच्या मेट्रोच्या पुण्याचे काय होणार ? असा एक भोळा भाबडा प्रश्न त्याला पडला... तो सकारात्मक विचार करत करत स्वत:च्या मनाशी म्हणाला... हे तर काही काळा पुरते संकट आहे. थोडी काळजी घेतली व जनसंपर्क टाळला तर जाईल ते ही निघून.. जसा प्लेग, स्वाईन फ्ल्यू गेला तसाच.....

रवींद्र कामठे

टीप ;

मेट्रोचे पुणे” हा लेख काव्यानंद दिवाळी अंक २०२०मध्ये प्रकाशित झालेला आहे. मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे म्हणून न राहवून हा लेख पुन:प्रकाशित करत आहे. फोटो मात्र सध्याचे म्हणजे जून २०२२ मधील आहेत. 

Thursday 15 September 2022

भरूच, गुजरात मधून मंदार भुस्कुटे मित्राचा हा अनोख्या रेशीमगाठी कादंबरीवरील अभिप्राय

प्रसिद्ध लेखक आणि कवी श्री. रवींद्र कामठे सर लिखित "अनोख्या रेशीमगाठी" ही कादंबरी आज वाचून झाली. या कादंबरीमध्ये सरांनी "लिव्ह इन रिलेशनशिप" हा विषय इतका सुबकपणे हाताळला आहे की एका बैठकीत कादंबरी कधी वाचून झाली ते समजलंच नाही.
"पृथ्वीवरील स्वर्ग" असलेल्या आंजर्ले गावाचे यथार्थ चित्रण वाचून आपल्याला अगदी कोकणात गेल्यासारखं वाटते.
कोकणातल्या आजीची दूरदृष्टी आणि सकारात्मकता तर अगदी योग्य प्रकारे रेखाटली आहे. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, या मानसिकतेमधून बाहेर येण्यासाठी आपल्या सर्वांना या आजीसारखा विचार करण्याची गरज आहे.
"लिव्ह इन रिलेशनशिप" सारख्या विषयावर मार्मिक भाष्य केल्याबद्दल श्री. रवींद्र कामठे सरांचं खूप खूप
अभिनंदन
आणि हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
मंदार भुस्कुटे



Wednesday 14 September 2022

अनोख्या रेशीमगाठी कादंबरीवरील कोकणवासी शुभेच्छुकांचा अभिप्राय.

 "अनोख्या रेशीमगाठी" ही लेखक रवींद्र कामठे उर्फ रवी काकांची कादंबरी म्हणजे त्यांच्यातल्या लेखकाला पडलेले अतिशय, सुंदर, प्रेमळ, सात्विक आणि निरागस असे स्वप्न आहे. 

काकांनी ज्या उत्कटतेने ही कादंबरी लिहिली आहे त्याला तोड नाही. नात्यांची रेशमी धाग्यांनी घातलेली वीण, त्यांच्यातील संवाद, परंपरेला फारशी तडजोड न करता घातलेली मुरड, लग्नसंस्थेतील व कुटुंब व्यवस्थेतील विविध विषयांना हात घालून सोडवलेला तीढा, कोकणातील आंजर्ले गावातील निसर्गसौंदयाचे व तेथील माणसांचे त्यांच्यातील चांगुलपणाचे व त्यागवृत्तीचे दर्शन घडवून समाजाला सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारी आहे. दोन पीढ्यांचा तीढा सोडवतांना वापरलेली संवाद शैली तर इतकी वाखाणण्याजोगी आहे की वाचतांना पदोपदी भावूक व्हायला होते व डोळे पाणवतात. हे ह्या कादंबरीचे फार मोठे बलस्थान आहे व यशही आहे.

विधवा आणि विधूर यांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न लिव्ह ईन रिलेशनशीप सारख्या सध्याच्या काळातील कळीच्या उपायाने सोडवून काकांनी हा गंभीर मुद्दाही अगदी सहजपणे चर्चेत आणला आहे.

कादंबरी हातात घेतल्यापासून ती पूर्णपणे वाचून होईपर्यंत खाली ठेवावीशीच वाटत नाही. त्याचे कारण काकांनी वापरलेली अतिशय साधी व सोपी भाषाशैली आणि वाचकाशी साधलेला संवाद, कादंबरीची नेटकी मांडणी हे होय. 

चुका शोधण्यापेक्षा, गुणांकडे लक्ष दिल्यास वाचनाचा आनंद तर मिळतोच मिळतो, परंतू आपल्यातला एक संवेदनशील माणूसही जागृत होतो.

आम्ही तर ह्या कादंबरीच्या प्रेमात पडलो आहे. तीच्या विषयाशी समरस झालो आहोत. आम्ही मुळचे कोकणातलीच व संसारही कोकणातच केलेली माणसे. पण काकांनी एकंदरीतच आपल्या कुटुंबव्यवस्थेतील, परिवारातील वाद विवाद, भांडणे, द्वेष, मत्सर, इर्शा, राग, लोभ, राजकारण, समाजकारण व चुलीतली वादळे अक्षरक्षः चुलीत घालून, माणुसकीची नवी दिक्षाच दिली आहे असे आम्हाला तरी प्रामाणिकपणे वाटते.

काकांनी आपल्या रोजच्या आयुष्यातले इतके छोटे छोटे प्रसंग भावनेने ओथंबून वाचकांसमोर  अतिशय सहजतेणे मांडले आहेत की, काही वेळेस आपण निःशब्द होतो. भावूक तर होतोच होतो पण त्याचवेळेस संवेदनशीलही होतो.

कदाचित तुम्हाला आम्ही काकांच्या कादंबरीचे फार कौतुक करते आहे असे वाटेल, परंतू आमचा नाईलाज आहे. जे उत्तम आहे ते सांगायला का संकोच का करायचा. 

आम्हाला तर प्रत्येक प्रसंग भावला आहे. पात्रांची निवड, त्यांच्यातला संवाद, त्यांची आत्मियता, कळकळ, तळमळ, जिव्हाळा, माया, काय काय म्हणून सांगू. जे काही चांगलं आहे ते ओतप्रोत भरलेलं असल्यामुळे, आपण कधी कधी माणूस म्हणून किती वाईट वागतो हे जाणवले.  

इथे एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो, तो म्हणजे, आंजर्ल्याहून परतीच्या वाटेवर जीथे दीपाचा अपघाती मृत्यू झालेला असतो त्याठिकाणी पूजाने दीपकला गाडी थांबवायला लावून आजीने तीच्या भरलेल्या ओटीतल्या अर्ध्या ओटीने दीपाची ओटी भरुन तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठीची केलेली प्रार्थना होय व त्याला प्रभारकरनेही आश्चयचकीत होऊन तीला दिलेली साथ, लेखकाला वाचकाच्या मनात सर्वोत्तम स्थान मिळवून देण्यास भाग पाडतो. 

तसेच स्त्रीयांच्या आयुष्यातील रजोनिवृत्तीचा जो काळ असतो त्यावरही काकांनी अगदी थोडक्यात पण मार्मिक भाष्य करुन स्त्रीच्या नाजुक मनस्थितीचे दर्शन घडवून तीला लागणाऱ्या मानसिक आधाराची गरज सुस्पष्ट करुन एक प्रकारे समाज प्रबोधनच केल्याचे उमजते. 

दीपकच्या भाषणाने कादंबरीचे प्रयोजन व उद्दिष्ट सफल झाल्याचे समाधान लाभते.

आयुष्य इतकंही सोपं नाही

जितकं आपण समजत असतो..

आयुष्य इतकंही अवघड नाही

जितकं आपण ते करुन ठेवतो.... 

काकांनी आमच्या कोकणातल्या अनुभवी आजीच्या मनात घातलेल्या ह्या ओळी किती चपखल बसतात हे जाणवले.

आम्हाला आजवर रवी काकांचा लेखक हा गुण फारसा माहित नव्हता. अर्थात तो तेवढ्या गांभीर्याने घेतला नव्हता. त्यांचा प्रांजळ काव्यसंग्रह चाळला होता. तारेवरची कसरत अनुभवकथन येताजाता वाचले होते. त्यातले बरेचसे प्रसंग माहित असल्यामुळे त्यांच्यातल्या लेखकाकडे दुर्लक्ष झाले होते असे आता वाटते. त्यासाठी काका तुमची क्षमा मागतो.

काका तुमची ही कादंबरी आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. असो. 

अजून फार काही लिहित नाही कारण "अनोख्या रेशीमगाठी" कादांबरीचे कौतुक एक वाचक ह्या नात्याने करावे तेवढे थोडेच आहे. 

पुण्याच्या चपराक प्रकाशनचे एका पेक्षा एक उत्कृष्ट दिवाळी अंक काकांमुळेच वाचायला मिळाले आहेत. चपराक प्रकाशनने ह्या कादंबरीचे सर्वार्थाने सोने केले आहे असे म्हणावयास हवे. त्यासाठी घनश्याम पाटील यांचे आभार व्यक्त करायला हवेत.

आपले शुभेच्छुक.


Thursday 8 September 2022

भैरवनाथ दादांचा "अनोख्या रेशीमगाठी कादंबरीवरील अभिप्राय


२५ ऑगस्ट पासून मी रोज एक नव्या आनंददायी अनुभवातून जातो आहे, तो म्हणजे माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादांबरीचे वाचकांकडून होणारे कौतुक होय!

आपल्या देशाच्या सीमेवर निधड्या छातीने रक्षण करणाऱ्या भैरवनाथ दादांचे माझी कादंबरी वाचून झाल्यावर आलेले सोबत जोडलेले हे अतिशय भावस्पर्शी पत्र म्हणजे माझ्यासाठी एक फार मोठा पुरस्कारच नव्हे तर अविस्मरणीय असा सन्मान आहे. लेखक ह्या नात्याने माझ्या साहित्य संपदेचा अजून काय सन्मान व सत्कार व्हायला हवा!
भैरवनाथ दादांनी माझी कादंबरी दिल्लीला मागवून घेतली. ती वाचली आणि लगोलग मला फोन करुन त्यांनी लिहिलेला हा स्वर्गानुभव ऐकवला आणि मला भावविवश केले. 
२५ आॕगस्टच्या प्रकाशना आधीच त्यांनी पूर्वनोंदणी केली होती आणि मला फोनकरुन कादांबरी शक्यतो ३१च्या आत पाठवा अशी विनंती केली होती. कारण त्यानंतर त्यांचे बटालीयन दिल्लीहून सीमेवर रवाना होणार होते.
भैरवनाथ दादांची ही तळमळ माझ्यातल्या साहित्यिकाला घायाळ तर करुन गेलीच पण माझ्यातला माणसाला निःशब्द करुन गेली.
घरदार, संसार सर्वकाही सोडून दादांसारखे जवान आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतात म्हणून आपण सुखाने जगतो आहोत ही भावना उजागर झाली आणि मनोमन दादांना दंडवत देऊन गेली.
भैरवनाथ दादांची कादंबरी वाचून झाल्यावर लगोलग ती त्यांच्या साथीदाराने वाचण्यासाठी पळवली. बटालीयनमध्ये आता ती एका जवानाच्या हातून दुसऱ्याच्या हातात जाईल, वाचली जाईल. त्यामधील भावनांशी ते एकरूप होतील. काही क्षण का होईना त्यांना विरंगुळा लाभेल, त्यांना सीमेवर शत्रूशी लढण्याचे बळ देऊन जाईल हे उमजून माझे डोळे डबडबले होते.
वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे, ही एक भाकड कथा आहे असेच मला वाटले.  जर का चांगले साहित्य वाचायला मिळाले तर वाचकही त्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे असे मला वाटते.
भैरवनाथ दादांना माझी कादंबरी त्यांच्या गावाला घरी कुटुंबाला वाचण्यासाठी पाठवायची होती, पण आता ती परत कधी हाती लागेल याची काही खातरी नव्हती. तशी खंत ते बोलता बोलता व्यक्त करून गेले.  त्यांच्याकडून गावचा पत्ता मिळाल्याबरोबर चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांनी, आत्मियतेनी आजच ही कादंबरी त्यांच्या गावाला पोस्टाने पाठवून देऊन मला उपकृत केले हे नक्की.
अजून काय लिहू.  
भैरवनाथदादांचे सोडत जोडलेला अभिप्राय नक्की वाचा.
रवींद्र कामठे.

भैरवनाथ यांचा माझ्या कादंबरीवरील हा उत्स्फुतपणे लिहिलेला अभिप्राय नक्की वाचा. 
(दादांचेच शब्द मी फक्त वाचकांसाठी वाचता यावेत म्हणून टंकलेखन करून काह्ली दिले आहेत)

प्रसिद्ध लेखक आणि कवी श्री. रवींद्र कामठे सर यांची अनोख्या रेशीमगाठी ही कादंबरी, कथा आणि त्यातील वर्णन खूप सुंदर पद्धतीने लिहिण्यात आले आहे.   या कादंबरीमध्ये "लिव्ह इन रिलेशनशिप" हा विषय अतिशय सुबकपणे हाताळला आहे.  प्रभाकर आणि पूजा यांच्यासह दीपक आणि सई अशा दोन पिढ्यांच्या भावभावनांचे प्रगटीकरण या कादंबरीतून झाले आहे.  या  कादंबरीमध्ये एकाच इमारतीतील एक बाप आणि मुलगा आणि एक आणि तिची मुलगी सहवासातून एकत्र येतात आणि त्यांचे ऋणानुबंध निर्माण होतात. यामध्ये कोकणातील आंजर्ल्याचे आणि त्या परिसराचे आलेले मनोहरी वर्णन हे तर या कादंबरीचा आत्मा आहे.   यामध्ये  आंजर्ल्याहून परत येत असताना जिथे दीपाचा मृत्यू झाला होता तिथे पूजाने ओटी भरणे, यामध्ये स्वत:च्या साखरपुड्यातील दीपकचे भाषण प्रसंगात या कादंबरीने कमालीची उंची गाठली आहे.
सर, तुमच्या लेखनीची जादू आहे.  दोन पिढ्यांची ही प्रेमकथा असली तरी त्या प्रेमात कुठेही उथळपणा दिसून येत नाही.  आणि ही कादंबरी कधी वाचून झाले हे समजलेच नाही.  खूप छान विचार मांडले आहेत कामठे सरांनी.  कादंबरी वाचून झाली असे वाटले मी कोकणातच आहे. 
माझी ही पहिली कादंबरी आहे की ही कादंबरी वाचताना डोळ्यातून पाणी आलेले समजलेही नाही.  खरंच खूप छान कादंबरी आहे कामठे सर.
"लिव्ह इन रिलेशनशिप" सारख्या विषयावर मार्मिक भाष्य केल्याबद्दल रवींद्र कामठे सरांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
"जय हिंद सर"
भैरवनाथ  

Wednesday 7 September 2022

माझी पंढरीची वारी.

 माझी पंढरीची वारी.



ह्या जगात माझ्या एवढा भाग्यवान मीच. त्याचे कारणही तसेच आहे मंडळी. काय सांगू ! कसे सांगू ! मला तर काही सुचतच नाहीयं. माझे मन प्रचंड भावविवश झाले आहे व डोळेही पाणावले आहेत. कंठ दाटून आला आहे. परंतु माझा आजचा अनुभव तुम्हाला सांगायलाच हवा असाच आहे. ज्या क्षणाची प्रत्येक वारकरी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतो, तो म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन होय, पांडुरंगाच्या चरणी लीन होणे होय ! ‘भेटी लागी जीवा ! लागलीसी आस !’ हो मंडळी, मीच तो भाग्यवान ज्याच्या मनीध्यानी नसताना ५९ वर्षातल्या आयुष्यात चक्क पहिल्यांदा पंढरपूरला जाणे झाले व पांडुरंगाच्या पायाशी लीन होता आले. तेही अजिबात घाई गडबड न करता. गेले कित्येक वर्षे आपल्या सगळ्यांच्या व माझ्याही लाडक्या विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची आस मी धरून होतो पण योगच येत नव्हता. हा योग जुळून आला तो आमच्या कामठे परिवाराचे ज्येष्ठ सदस्य व वयाच्या ८०तही पंढरीची वारी करणारे श्री. नेताजी कामठे काका यांच्यामुळे. काकांचे हे ऋण मी ह्या जन्मातच काय पण कितीही मनुष्य जन्म मिळाले तरी फेडू शकणार नाही हे नक्की.

काल रात्री नेताजी काकांचा मला फोन आला आणि त्यांनी मला विचारले की उद्या पंढरपूरला येतोस का? त्यांचीच गाडी घेऊन जायचे होते. अर्थात त्यांचा चालक संतोष होताच गाडी चालवायला. मला फक्त मागे बसून जायचे होते. त्यांचे एक नातेवाईक शिंदे वकीलही बरोबर होते. मी एका क्षणाचाही विचार न करता काकांना होकार दिला. ही सुद्धा पांडुरंगाचीच मर्जी होती असे मला वाटले. एकतर माझी तब्बेत गेले आठवडाभर ठीक नव्हती. त्यात माझा उजव्या पायाचा तळवा जळवाताने फुटलेला होता. मला चालतानाही खूप वेदना होत होत्या. पाय टेकवत नव्हता. पण काय झाले कोणास ठाऊक मी त्यांना येतो म्हणालो. घरात आलो आणि वंदनाला (बायकोला) सांगितले की मी उद्या काकांबरोबर पंढरपूरला चाललो आहे. तीलाही मी हो म्हणाल्याचे आश्चर्य वाटले. ती पण जा म्हणाली. ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ असेच काहीसे होते हे.
सकाळी ८.३०ला निघून आम्ही पंढरपूरला १.१० मिनिटांनी पोहचलो. मंदिरा जवळच्या एका दुकानात चपला ठेवल्या. उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता. अनवाणी पायाने चालत निघालो. पाय भाजत होते. नेताजी काका मला म्हणाले, रवींद्र चल लवकर, काही होणार नाही तुझ्या पायाला. उलट जरा चटके बसले की तुझे दुखणे कुठच्या कुठे पळून जाईल. आणि खरंच तसेच झाले. मंदिराच्या आवारात थोडी गर्दी होती. मुख दर्शनबारी चालू होती असे कळले. आम्ही धावतच तिकडे गेलो. आत दर्शनबारीत घुसलो. आतील पोलीस काकांनी आवाज दिला. दहा मिनिटांत दर्शन बंद होणार आहे. पटपट चला. माझी तर धाकधूक वाढली. समजा आपला नंबर नाही लागला तर, कमीतकमी तासदोनतास तरी बारीत उभे राहावे लागणार होते ! विचार करत करत तसाच गर्दीतून वाट काढत पुढे पुढे चालत होतो आणि माझ्या एकदम लक्षात आले की आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे. मंडळी त्या, क्षणाला एवढ्या गर्दीतून मी पांडुरंगाच्या मुखाचे दर्शन घेतले आणि काय सांगू ! माझ्या सर्वांगात नवचैतन्य संचारले. अवघे विश्व आपल्या डोळ्यासमोर विटेवर उभे असल्याचे जाणवले. विठूरायाच्या भाळीवरील चंदनाच्या टिळ्याने डोळे दीपून गेले. का, ज्ञानेश्वर माऊली, आणि करोडो वारकरी पाडुरंगाच्या भेटीसाठी एवढे आतूर आसतात ते, कळले.
त्या गर्दीतून आपोआप पुढे पुढे ढकलला जात होतो, आणि कधी पांडुरंगाच्या, विठूरायाच्या चरणी लीन झालो तेच उमगले नाही. जवळ उभ्या असलेल्या महिला पोलीस चला लवकर म्हणून हाकलत होत्या. मी मात्र माझ्या धुंदीत होतो. पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श करून त्याच्या चरणी डोके ठेवण्याचा माझ्या आयुष्यातील भाग्याचा तो क्षण आला आणि मी एक आवंढा गिळला. डोळे पाणावले. सर्वांगाला कंप जाणवला. हातात “अनोख्या रेशीमगाठी” ह्या माझ्या नुकत्यात प्रकाशित झालेल्या कादंबरीची प्रत होती. ती पांडुरंगाच्या चरणी ठेवली आणि तशीच ती जवळ उभ्या असलेल्या गुरुजींच्या हातात देऊन विठूरायाला समर्पित करून पुन्हा एकदा त्याच्या चरणी नतमस्तक झालो. आश्चर्याचा दुसरा धक्का म्हणजे, नेताजी काकांनीही माझ्या कादंबरीची एक प्रत पांडुरंगाच्या चरणी ठेवण्यासाठी आणलेली होती. अजून काय हवं माझ्यासारख्या साहित्य सेवेच्या वाटेतील एका वारकऱ्याला / लेखकाला !
भावविवश होऊन तसाच गर्दीतून मार्ग काढीत म्हणजे ढकलला जात होतो. काका माझा हात धरून मला अगदी एखाद्या लहान मुलासारखे ओढत होते. गर्दीत चुकलो तर काय ? आम्ही असेच पुढे सरकत रुक्मिणी मंदिरात कधी पोहचलो तेच कळले नाही. इथेही तोच अनुभव आला. रुक्मिणी मातेची विलोभनीय व प्रसन्न मूर्ती पाहून तिच्या चरणी कधी लीन झालो तेच कळले नाही. कादंबरी मातेच्या चरणी ठेवली आणि तिथे उपस्थित गुरुजींच्या हातात दिली. त्यांनी मुखपृष्ठ पाहून व नाव वाचून लगेचच प्रतिक्रिया दिली, छान दिसतेय कादंबरी”. त्या क्षणाला मी एकदम भावूक झालो. महिला पोलीस आम्हाला पुढे चला म्हणून ढकलत होत्या. त्या गर्दीत मी गुरुजींना विनंती केली की जमले तर रुक्मिणीमातेच्या चरणी ही कादंबरी ठेवून एखादा फोटो काढून मला पाठवता आला तर पहा. माझा नंबर आहे कादंबरीत. ते ही मोठ्याने हो, हो पाठवतो म्हणाले. अर्थात माझ्या ह्या विनंतीला काहीच अर्थ नव्हता. कारण मंदिरात मोबाईल व कॅमेरा न्यायला परवानगी नव्हती. तसेच फोटो काढायला ही परवानगी नव्हती. पण माझी एक भोळी आशा होती. कोण जाणे, विठूराया माझा हा हट्टही पुरवू शकतो. अहो, ज्याने एवढ्या मायेने,आपुलकीने, मला स्वत:कडे भेटीला बोलवून घेतले, त्याच्या चरणी नतमस्तक होऊ दिले, तो पांडुरंग काहीही करू शकतो. मी मात्र ह्या सुखद अनुभवाने खूपच भावूक झालेला होतो.
२५ ऑगस्ट २०२२ ला आणि तिथीने ऋषीपंचमीला, गुरुवार १ सप्टेंबर ला वयाच्या साठीत प्रवेश केलेला मी इतका भाग्यवान असू शकतो ह्यावर माझाच विश्वास बसत नव्हता.
चक्क २० मिनिटात विठ्ठल रुक्मिणी दर्शन होऊन आम्ही मंदिराला एक प्रदक्षिणा घालत होतो. जत्रेत हरवलेल्या लहान मुलाला जेव्हा त्याची आई सापडते आणि ती त्याला मायाने जवळ घेऊन कुरवाळते त्यावेळेस जसे वाटत असेल ना, अगदी तसेच मला वाटत होते. विठ्ठल रुक्मिणीच्या रूपाने आज मला माझे दिवंगत आई-वडील भेटल्याची भावना मनात दाटून आली होती.
काकांच्या आदेशाने आम्ही लगेचच म्हणजे दुपारच्या दोन वाजता पुण्याकडे प्रस्थान ठेवले. वाटेत अकलूज येथे स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. पुढे मोरगावच्या बाप्पाच्या मंदिराच्या कळसाचे गाडीतूनच दर्शन घेतले. समोर मळभ दाटून आले होते. तिन्हीसांजेला सुरवात झालेली होती. बघता बघता गाडी जेजुरीला पोहोचली होती. मावळतीला रवीने जेजुरीचा गड सुवर्ण किरणांची उधळण करून संपूर्ण गाडला सोन्याची मखर केली होती. आभाळ हळू हळू फाटायला लागले होते. पुण्यात ढगफुटी सदृश पाऊस चालू असे असा फोनही काकांना येऊन गेला होता. ह्या गडबडीत सोपानदेवांचे सासवड कधी मागे राहिले तेच कळले नाही. बोपदेवषघाट रस्त्याला दूरवर उत्तरेकडील पर्वतावर रंगीबिरंगी दिव्यांनी रोषणाई केलेल्या कानिफनाथ गडाकडे आपसूकच लक्ष वेधले केले.
आजच्या एका दिवसात जीवनभराची पुण्याईने ओसंडून भरुन वाहणारी झोळी घेऊन, प्रचंड वाहतुकीतून मार्गक्रमण करीत घरी पोहचलो तेच कळले नाही.
रवींद्र कामठे
शनिवार, ३ सप्टेंबर २०२२
पांडुरंग हरी. जय हरी विठ्ठल.
विठ्ठल रखुमाई






प्रतिभा खैरनार, नांदगाव यांचा माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील समर्पक अभिप्राय

प्रतिभा खैरनार, नांदगाव यांचा माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील समर्पक अभिप्राय नक्की वाचा.

नमस्कार सर...
तुमची अनोख्या रेशीम गाठी ही कादंबरी कालच मिळाली आणि एकाच दिवसात ती वाचूनही झाली. "लिव्ह इन रिलेशनशिप हा विषय खरंतर इतका वेगळा आहे आणि यावर कादंबरी होवू शकते हा विचार सहसा कोणाच्या डोक्यात ही येणार नाही. माणसं कितीही सुशिक्षित असली तरी ह्या अश्या नात्याला प्रत्येकाचा विरोध च असतो. बुरसटलेल्या विचारातून आत्ता कुठे समाज प्रेम विवाहाला मान्यता द्यायला लागलाय तरी अजूनही खेडोपाडी आंतरजातीय विवाहाला बंदीच आहे. आणि जर कोणी केलाच तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला असह्य वेदनेतून तिरस्कारातून जावे लागते.
समाजाचा विचार करून समाजातच रहाणारे, एकाकी जीवन जगणारे किती तरी विधूर आणि विधवा आहेत. ज्या सगळ्या संकटानां सामोरे जात एकटेपणा ने आयुष्य रेटताय, अशा वेळी तुमची लिव्ह इन रिलेशन ही कादंबरी त्यांच्या साठी एक आशेचा किरण घेऊन आलीय.
कादंबरीची मांडणी मुद्देसूद अन् अगदी सोप्या साध्या भाषेत केलीय. वाचतांना कुठेही थांबावसं वाटत नाही किंवा कंटाळवाणे प्रसंग नाही. पूजा आणि प्रभाकर यांच्या एकाकीपणा मुळे मैत्रीतून प्रेमात रूपांतर हे सहजगत्या मांडलयं. प्रभाकर च्या मनात वासनेचा लवलेश दाखवला नाही हे खूप महत्त्वाचे. नितळ आणि निरागस नातं...त्याच प्रमाणे इतक्या कमी वयात ही दीपक आणि सईच्या समजूतदारपणा मुळे आज त्यांचे आईबाबा एक होवू शकले, प्रभाकर आणि पूजाला त्यांनी समजून घेतले ही खूप मोठी गोष्ट आहे.
पूर्ण कादंबरीतून तुम्ही कोकण दर्शन घडवलयं, गणपती दर्शन, खाद्यपदार्थ, लालमाती, समुद्राच्या लाटा किनारपट्टी, तिथली पायाला चिटकणारी रेती हे सगळं स्वतः अनुभवतोय असं वाटत. त्यातल्या त्यात काही गोष्टी ना घरच्यांचा तीव्र विरोध असतो पण इथे खेड्यात राहूनही आजी आणि दिवाकर अपर्णा हे तुम्ही किती उच्च विचारसरणी चे दाखवलेत. त्यांनी सहजपणे स्वीकारलेले नाते त्याबद्दल त्यांचा आदर छानच... आणि त्यापलिकडे ही समाजाचा विचार न करता एका विधवेला पुजेला बसवणे म्हणजे चांगल्या चांगल्या सुशिक्षितांच्या विचारांना तुम्ही चपराक दिलीय. दीपक आणि सईच्या साखरपुड्याच्या वेळी दीपकचे भाष्य आणि त्याने अनपेक्षित केलेला प्रभाकर आणि पूजाचा एकमेकांना माळा टाकून केलेला नात्यांचा स्वीकार हा समारोप सुंदरच...
त्यात कादंबरी ला घनश्याम सरांची प्रस्तावना मिळालीय म्हणजे "सोने पे सुहागा"....कादंबरी अतिशय वाचनीय झालीय . तुमच्या या कादंबरी साठी आणि पुढील प्रकाशित होणाऱ्या अनेक साहित्यासाठी , यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा...
प्रतिभा खैरनार....

Pratibha Pawar Khairnar प्रतिभाताई तुमचे मनःपूर्वक आभार आहेत. तुम्ही फार समर्पक शब्दांत माझ्या कादंबरीचे विलेक्षण केलेत त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहणे पसंत करेन. घनश्याम सरांनी तर माझ्या कादंबरीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रस्तावना आणि पाठराखण सदृश्य आहे, परंतू कादंबरीवरील त्यांचे संस्कार मी ह्या जन्मीतरी विसरू शकत नाही.
आपला इतका उत्स्फुर्तपणे दिलेला अभिप्राय इतरांनाही कादंबरी वाचण्यास नक्कीच प्रवृत्त करेल.
पुन्हा एकदा आपले आभार.🙏🙏

Tuesday 6 September 2022

लेखक सुनील पांडे यांचा "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील अभिप्राय

*अनोख्या* *रेशीम* *गाठी* :

*लिव्ह* *इन* *रिलेशनशिप* *काळाची* *गरज* *असलेली* *सामाजिक* *कादंबरी* .
आवडीच्या पाहुण्यांची निघायची वेळ आली की वाटणारी हुरहुर पुस्तक संपायला आलं की वाटू लागली की लेखक जिंकला असं समजावं . अशीच काहीशी अनुभूती सुप्रसिद्ध लेखक श्री रवींद्र कामठे यांचे *अनोख्या* *रेशीम* *गाठी* ही कादंबरी वाचताना आली .
साधी , सोपी , तरी ओघवती शैली आणि जसं घडलं तसं सांगण्याची हातोटी ही लेखक रवींद्र कामठे यांच्या लेखनाची विशेष खासियत .
एसटी , लोकल ट्रेन ही माझ्या वाचनप्रवासाची साधनं . गुरूवारी रात्री आॕफिसातून घरी आल्यानंतर अनोख्या रेशीम गाठी हे साहित्य चपराक प्रकाशनाने पाठविलेले पुस्तक हातात पडले . तब्बल १९१ पानांची ही कादंबरी वाचून होणार कधी ? याचे सुरूवातीला काहीसे दडपण आले परंतु कादंबरी वाचायला हातात घेतल्यानंतर ती वाचून कधी संपली हे कळलेही नाही .
लिव्ह इन रिलेशनशिप हा कादंबरीचा विषय . आपल्या भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला अतिशय महत्त्व दिले आहे . पाहून आणि ठरवून लग्न करणे ही लग्न करण्याची पारंपरिक पद्धत . दुसरीकडे प्रेमविवाहाला अजूनही अनेक ठिकाणी कुटुंबातून , नातेवाईकातून , समाजातून विरोध होताना दिसतो . प्रेमात दोन मनाचा विचार असतो तर लग्न करताना समाजाचा विचार ( का ? ) करायलाच लागतो हे तितकेच खरे आहे . त्यातही विवाह झाल्यानंतर पुढे जाऊन तो विवाह यशस्वी होईल कि नाही असे छातीठोकपणे सांगणे अशक्य . या सगळ्या पार्श्वभूमीवर लिव्ह इन रिलेशनशिप हा लग्नाशिवाय एकत्र राहण्याचा नवीन ट्रेंड पाश्चात्तय देशांप्रमाणे आपल्या भारतातही आला आहे .
मुंबई सारख्या महानगरात ही कथा घडते . प्रभाकर पूजा आणि सई आणि दीपक यांच्या प्रेमाची ही अनोखी कथा . रक्ताच्या नात्यांपेक्षाही मानलेली नाती किती महत्त्वाची असतात हे कादंबरी वाचून अधोरेखित होते .
कादंबरीत लेखक रवींद्र कामठे यांनी कोकणातील आंजर्ले गावाचे केलेले चित्रण वाचताना आपणही कोकणातच असल्याचा अनुभव आपणास येतो . ही लेखकाच्या लेखनीची जादू म्हटली पाहिजे .
कड्यावरचा गणपती , निसर्गरम्य अशा वाडीचे वर्णन , अथांग असा पसरलेला निळाशार समुद्र , तेथिल सुर्योदय , सुर्योदयाचे नयनमनोहर दर्शन , उकडीचे मोदक तसेच कोकणातील जेवणातील सुग्रास रूचकर अशा रसभरीत जेवणांचे वर्णन वाचून वाचक तृप्ततेने ढेकर देतो .
आंजर्ले सारख्या छोट्या गावात राहूनही प्रभाकरच्या आईची समज , तिचा दृष्टिकोन , तिचे प्रगत विचार , कालानुरूप नवीन गोष्टींचा स्विकार करणे आणि सुन म्हणून पूजाचा स्वीकार करणे हे पाहून आजीबद्दलचा आदर अधिकच वाढू लागतो तर दुसरीकडे मुंबई सारख्या शहरात राहूनही प्रभाकर आणि पूजाच्या नात्यांकडे कलुषित नजरेने पाहून त्यावर खोचकपणे टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांची किवही येऊ लागते .
लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याने मान्यता दिली असली तरी अजूनही समाज असे सबंध स्वीकारायला तयार नाही . ही सुद्धा कटू वस्तुस्थिती आहे . प्रभाकर आणि पुजा हे जेव्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतात . त्यासाठी वकिलांचा ते योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन आणि सामंजस्य करार करून . हा करार कशासाठी ? तर लेखक म्हणतात ,
*आपल्याकडे* *समाज* *नावाच्या* *टोपीखाली* *काही* *विकृत* *विचारसरणीचे* *लोक* *वावरत* *असतात* . *त्यांना* *एक* *सणसणीत* *चपराक* *द्यायला* *म्हणून* *हे* *अस्त्र* *असावे* .
प्रस्तुत कादंबरीतून रवींद्र कामठे यांनी दोन पिढ्यांची कथा सांगितली आहे . एकूण २० प्रकरणातून ही कादंबरी फुलत जाते . कादंबरी वाचताना वाचकांची उत्कंटा शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात लेखक रवींद्र कामठे यशस्वी झाले आहेत .
मुळचे पुण्यातील असलेले लेखक रवींद्र कामठे यांनी कादंबरीत कोकणातील आंजर्ले गावाचे केलेले चित्रण अतिशय उत्तम आणि फार बारकाईने केले आहे . कादंबरी वाचून लेखक रवींद्र कामठे मुळचे कोकणातील रहिवासी असावे असे वाटते .
फार वर्षापूर्वी लेखक गो.नी.दांडेकर यांनी *शितू* या कादंबरीत कोकणातील गावाचे चित्रण केले होते . कादंबरीतील विधवा असलेल्या शितूचे विसू या नायकावर प्रेम असूनही ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही . आपल्या सारख्या विधवा स्त्रीशी विसूने लग्न करून स्वतःचे वाटोळे करू नये असे ती त्याला सांगते आणि खाडीत जीव देऊन स्वतःचे आयुष्य संपवते . विसूच्या आयुष्यातून कायमची निघून जाते . अनोख्या रेशीम गाठी कादंबरी वाचताना त्या शितू कादंबरीची मला आठवण झाली . अर्थात शितू कादंबरीच्या त्याकाळची सामाजिक परिस्थिती आत्ता कितीतरी बदलली आहे . अर्थात आज शितू यदा कदाचित असती तर विसू बरोबर लग्न न करता लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये नक्कीच राहिली असती .
दोन पिढ्यांची ही प्रेमकथा असली तरी त्या प्रेमात कुठेही उथळपणा दिसून येत नाही . हे लेखकाच्या लेखनीचे मोठे कसब आहे . कादंबरीत आपल्याला प्रभाकर पूजा आणि सई दीपक अशी सयंमशिल , आदर्श आणि सुसंस्कृत पात्रे भेटतात . उतारवयात पुरूषालाच नव्हे तर स्त्रीलासुद्धा आधाराची किती गरज असते हे पटवून देण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे .
प्रभाकर मुंबईत नोकरी करत असला तरी गावाला आणि घराला तो विसरला नाही . अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा गावाला येऊन गावातील लोकांना भेटतो . त्यांच्या सुख दुःखात तो सहभागी होतो . एक मुलगा म्हणून आई विषयी आणि घराविषयी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतो . शेवटी एका कवीने म्हटल्याप्रमाणे
*माता* *आणि* *माती* *यात* *फक्त* *वेलांटीचाच* *फरक* *आहे*
*जो* *दोन्हीला* *विसरेल*
*त्याचे* *जीवन* *नरक* *आहे*
आदर्श भाऊ कसा असावा ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाकर आणि दिवाकर हे दोघे भाऊ होत . त्यांच्या बंधू प्रेमाने आपले मस्तक नतमस्तक होते .
दिवाकरची पत्नी अर्पणा ही प्रभाकरची फक्त वहिनी नाही तर लहान लाडकी अशी बहिणही आहे . प्रभाकर आणि अर्पणामध्ये जसे भाऊ बहिणीचे प्रेम पहायला मिळते तसेच प्रभाकरची भावी बायको म्हणून अर्पणा ही पूजाचा मोठ्या मनाने आणि आनंदाने स्वीकार करते . पूजा आणि अर्पणा यातील खेळीमेळीचे सबंध लेखकाने उत्तम पद्धतीने दाखवले आहे . आदर्श आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन कादंबरीत घडवले आहे .
ज्या ठिकाणी प्रभाकरच्या गाडीला अपघात होऊन त्याच्या पत्नीचा दीपाचा मृत्यू होतो त्याच जागेवर आंजर्लेहून मुंबईला गाडीने परत येताना पूजा प्रभाकरला त्या ठिकाणी गाडी थांबायला सांगून त्याजागी हळद कुंकू वाहून हात जोडून मृत दीपाला श्रद्धांजली वाहते ते पाहून कुणाही वाचकांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही . इतका तो प्रसंग लेखकाने हदयकारी लिहिला आहे .
कादंबरीत विजयकाका , अनंता , कुसुमवहिनी , मंदामावशी , इन्स्पेक्टर शेवाळेसाहेब , रानडेसाहेब , डाँक्टरकाका काकू , वकीलकाका अशी अनेक जीवाला जीव देणारी आणि माणूसकी असलेली पात्रे आपल्याला भेटतात .
कादंबरीच्या शेवटी दीपकने केलेले भाषण मुळातूनच वाचण्यासारखे असे झालेले आहे .
एक चांगला आणि महत्त्वाचा सामाजिक विषय कादंबरीच्या माध्यमातून मांडल्याबद्दल मी लेखक रवींद्र कामठे यांचे
अभिनंदन
करतो आणि त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा व्यक्त करतो .
*अनोख्या* *रेशीम* *गाठी*
( *कादंबरी* )
*लेखक* *श्री* *रवींद्र* *कामठे*
पाने : १९१
किंमत : ३००/ -
चपराक प्रकाशन पुणे .
आस्वादक : सुनील पांडे
मो . ९८१७८२९८९८ .