Tuesday 25 April 2017

‘हरितक्रांती’ कडून ‘भरीतक्रांती’ कडे........


हरितक्रांतीकडून भरीतक्रांतीकडे........

ह्या वर्षी एप्रिलमध्येच पाऱ्याने चाळीशी पार केली आणि दिवसेंदिवस तो पन्नाशीकडे वाटचाल करू लागला आहे हे अगदी स्पष्टपणे जाणवते आहे.  ‘झळा उन्हाच्या ह्या जाळिती जीवा असेच काहीसे चित्र आजकाल सर्वदूर पहायला मिळते आहे आणि सगळे जीवजंतू त्यात होरपळून निघत आहेत. उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढलेले आहे. जागतिक उष्मीकरणाचे (ग्लोबल वॉर्मिंग) हे सर्व दुष्परिणाम आज आपण सगळेच भोगतो आहोत.  ह्याला कारणीभूत आपल्याच कर्माची फळे, आपल्याला ह्याच जन्मी भोगावयास लागत आहेत.  विकासाच्या हव्यासापाई आपण केलेली वृक्ष तोड तर ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे असे जगभरातील सर्व पर्यावरणवादी संस्था व शास्त्रज्ञ बेंबीच्या देठापासून बोंब मारून, गेले चार ते पाच दशके सांगत आहेत पण त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे आणि त्याचेच परिणाम आपण सध्या पाहतो आहोत, हे तर एक जळजळीत सत्यच आहे.  तुम्हीं म्हणाल ह्यात नवीन ते काय आहे.  जे सगळ्यांचा माहिती आहे तेच पुन्हा सांगून तुम्हीं तुमच्या अकेलेचे तारे कशाला तोडता आहात !  अगदी बरोबर आहे तुमचे.  तुमच्या इतकाच मी ही ह्या समस्येत भर घालणार एक भागीदार आहे आणि ह्या समस्येने पिडला पण गेलेलो आहे.  म्हणूनच त्यावर माझ्या परीने माझ्या पुरती का होईना एखादी उपाय योजना धुंडाळण्याचा छोटासा प्रयास करतो आहे.  कदाचित असे केल्याने जनजागृती होऊन प्रत्येकजण त्यात सहभागी होऊन आपापल्या कुवतीने हातभार लावू शेकल, अथवा कमीत कमी ह्या उष्मीकरणाच्या समस्येत अजून भर घालून ती वाढविणार तरी नक्की नाही, अशी एक भोळी भाबडी आशा मनात ठेवून लिहितो आहे व सगळ्यांना आवाहन करतो आहे, की जर का आपण ठरवले की प्रत्येकाने एक तरी झाड लावायचे आणि ते चांगले मोठे होईपर्यंत जगवले, तर निसर्ग नंतर त्याची आपोआपच देखभाल करेल आणि त्याला जोपासेल.  असे एक एक करत आपण हजारो, लाखो, कोट्यावधी झाडे लावून जगवली तरच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढ्यांना सुखा समाधाने गारव्यात जगता येईल हो !  नाही तर ह्यावर्षी आपण फक्त होरपळलो आहोत, येथून पुढे चक्क करपत जावून एखाद्या वर्षी राख झालेलो असू !  अर्थात शेवटी आपली राखच व्हायची आहे म्हणा, पण ती मेल्यावर होणार आहे हे लक्षात घ्या, जिवंतपणी नाही.

हा सूर्य मी गेली पन्नास एक वर्षे तरी रोज पाहतो आहे, जो सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, जो आपल्यासाठी उर्जेचे एक प्रमुख स्त्रोत आहे, हे मात्र आपण विसरतो आहोत.  कुठल्याही सजीव प्राण्यास वायू, अग्नी आणि पाणी, हे अन्न, वस्त्र आणि निवारा इतक्याच गरजेचे आहे हे आपल्याला अगदी बालपणापासून शिकविले गेले आहे, अगदी मनावर बिंबविले गेले आहे. पण त्याचे काय आहे ना ! जस जसे आपण मोठे होत जातो, शहाणे व्हायला लागतो ना, तस तसे, आपल्यात जरा अतीच शहाणपण यायला लागते आणि मग काय आपण फक्त स्वत:पुरता विचार करू लागतो.  “अती तिथे मातीच होते ना” ! ह्या आपल्या स्वार्थी वृत्तीचा एकत्रित परिणाम काय होतो, हे जर पडताळून पाहायला गेले ना तर, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे पृथ्वीवरील वाढत चाललेले जागतिक तापमान हे होय !  जगभरातल्या शास्त्रज्ञांनी संशोधन करून ह्या जागतिक तापमान वाढीवर अनेक उपाय सुचविले आहेत.  परंतु त्याला प्रत्यके व्यक्तीने आपापल्यापरीने जर का साथ नाही दिली, तर काही वर्षांत ह्या हरितक्रांतीची, ‘भरीतक्रांतीव्हायला फारसा वेळ लागणार नाही.  पृथ्वीची भूजल पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे आणि त्याच्याच परिणाम हे उष्मीकरण वाढण्यास होतो आहे. निसर्गावर मात करण्याचा मानवाचा हा जो काही अट्टाहास चालू आहे तो पहिला थांबविला पाहिजे.  अगदी अलीकडचीच उदाहरणे द्यायची झाली तर उत्तराखंडअथवा माळीनची  देता येतील.  प्रगतीसाठी परिवर्तन जरूर करावे, पण त्यासाठी निसर्गाचे काही अलिखित नियम आहेत ते तरी पाळावेत, हे हा निसर्ग मानवाला गेले कायमच सांगतो आहे, पण त्याकडे काणाडोळा करून, ह्या प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा जो काही ह्र्रास चालू आहे, तो जर का लगेचच थांबविला नाही तर मात्र, निसर्गामध्ये जशी निर्माण करण्याची क्षमता आहे तशीच त्याच्यात नष्ट करण्याचीही ताकद आहे, हे त्याने पदोपदी दाखवून दिले आहे, हे मानवाने विसरून जावू नये असे मला वाटते. 

ह्या वर बऱ्याच उपायांपैकी एक उपाय मला तरी सुचतो आहे तो म्हणजे, ह्या सूर्याची उर्जा वापरून आपण आपली प्रगती करायची.  म्हणजे सोलर उर्जेतून वीज निर्माण करून आपण आपले, बरेचसे प्रश्नच धसास लावू शकतो.  हे मी जरी ह्या क्षेत्रामधील तज्ञ नसलो तरी स्वानुभवातून आणि सामान्यज्ञानाच्या बळावर नक्कीच सांगू शकतो.  ह्याचे मूळ कारण असे आहे की, आपल्याला वीज ही तर शरीरातल्या रक्ताइतकीच गरजेची आहे आणि ती निर्माण करण्यासाठी आपल्याकडील सर्वात महत्वाचे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे पाणी हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते आहे. इथूनच मूळ समस्या निर्माण व्हायला सुरवात होते व निसर्गाचे चक्र बिघडवले जाते.  सर्वसामान्य माणूस जरी वीज निर्मिती करू शकत नसला, तरी ती सुयोग्य पद्धतीने, जेवढी हवी आहे तेवढीच वापरून बचत तर नक्कीच करू शकतो.  एक लक्षात घ्या की, जर आपल्याला निर्माण करता येत नसेल तर ते जरुरी नसतांना वापरून अथवा अतिवापरामुळे नासवून संपविण्याचाही अधिकार नाही आहे !  प्रत्येकाने ह्या समस्येकडे थोडेसे सकारात्मक आणि संघटीत दृष्टीने पाहायला हवे.  ह्या निसर्गाप्रती आपली ही एक नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे असेच वागले पाहिजे.  सर्व काही सरकार करेल असा पवित्रा जर आपण मनात ठेवून आपली आचारसरणी ठरविणार असू तर, त्याचे विपरीत परिणाम हे आपल्यालाच काय पण येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगायला लागणार आहेत ह्याची जाणीव ठेवावी एवढेच माझे म्हणणे आहे.  कदाचित ही सृष्टी सुद्धा नष्ट होऊ शकते, असे भाकीत काही शास्त्रज्ञ करत आहेत, ते खोटे पाडणे आपले कर्तव्य आहे असे समजा हवे तर ! 

तुम्हीं म्हणाल आम्हांला तुम्हीं उपदेशाचे एवढे ढोस पाजता आहात, मग स्वत: काय करता ह्या बाबतीत ते तरी कळू देत सर्वांना, म्हणजे असे तर नाही ना लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण”.  वाचकहो, अगदी बरोबर प्रश्न आहे.  मी गेले १७-१८ वर्षे झाले गरम पाण्यासाठी सोलार संयंत्र वापरून विजेची बचत करतो आहे.  तसेच जवळ जवळ २००हून अधिक कुटुंबांना ते बसवण्यास मार्गदर्शनही केलेले आहे.  हे झाले फक्त गरम पाण्याचे संयंत्र, परंतु विज्ञानाच्या प्रगतीने आता अतिशय किफायतशीर किमतीत सोलार ऊर्जेपासून वीज निर्मितीची संयंत्र बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत.  अतिशय महत्वाचे सांगायचे म्हणजे, आपल्या वीज महावितरण मंडळ, तसेच काही खाजगी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनी आणि शासनाच्या ह्या विषयामधील कार्यक्रमाच्या मदतीने, हे सर्व उपक्रम सर्वसामन्य माणसांच्या सोयीनुसार आणि खिशाला परवडतील अशा किमतींमध्ये बाजारात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.  त्याचा ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांनी नक्कीच लाभ घ्यावा.  मी कुठल्याही संस्थेचा प्रतिनिधी म्हणून हे सांगत नाही अथवा ह्या मागे माझा काही आर्थिक फायदा आहे असेही नाही. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका.  वर सुचविलेल्या उपाय योजनेतील हा एक सोयीस्कर आणि सहज उपलब्ध असलेला पर्याय आहे, एवढेच.  आंतरजालावर ह्या संदर्भामधील भरपूर माहिती आपल्या सेवेस हजर आहे तिचा लाभ घ्यावा आणि शक्य असेल त्यांनी पर्यावरणाचा ह्र्रास थांबविण्याचा प्रयत्न करावा.  सामाजिक बांधिलकीच्या धेय्याने तुम्हांला मी हे एक आवाहन करतो आहे.  सक्तीचा विषय नाही. काही वर्षात सरकारच ह्याचा पाठव पुरावा करून हे उपक्रम सर्वसामन्यांसाठी सक्तीचे करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.  ही तर येणाऱ्या काळाची गरजच असेल असे मला तरी वैयक्तिक दृष्टीकोनातून वाटते आहे.

सर्वच प्रगत आणि प्रगतशील देशांमध्ये, सोलर उर्जा प्रकल्प अतिशय उल्लेखनीय पद्धतीने वापरण्यात येत आहेत.  भारतातही असे प्रयोग केले गेले आहेत जे काही वर्षांपूर्वी सर्वसामन्य माणसांना परवडत नव्हते.  परंतु सध्याच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात हे सहज शक्य झाले आहे.  गेली २०-२५ वर्षे ह्यावर संशोधन करून हे शास्त्र भारतामध्ये किफायतशीर किमतीला उपलब्ध करून दिले जात आहे तसेच त्यावर सरकारी अनुदानेही दिली जात आहेत.  व्यावसायिक संस्थाना तर त्याच्या वापरासंबंधीची कायदेशीर बंधनेही घातली गेली आहेत.  शेतकरी बांधवांनीही ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मला वाटते.  सरकार आपल्या परीने प्रयत्न करतीच आहे परंतु त्याला तुमच्या आमच्या सारख्या जाणकार आणि संवेदनशील माणसांनी त्याचा वापर करण्याची गरज आहे हे मात्र अगदी प्रकर्षाने जाणवते आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे, आपली जसे काही चुलीवर ठेवलेल्या भरताच्या वांग्यासारखीच अवस्था झाली आहे, ह्या माझ्या मताशी तुम्हीं नक्कीच सहमत व्हाल ह्याची मला खात्री आहे.  म्हणूनच मला वाटते की हरितक्रांतीकडून भरीतक्रांतीकडे आपली चाललेली ही जी काही वाटचाल आहे, ती पुन्हा एकदा हर्षउल्हासित हरितक्रांती कडे घेऊन जाण्याचा चला आपण सगळे मिळून एक संकल्प करूयात.

अगाध विज्ञान, प्रगत तंत्रज्ञान, पुरे झाले आता,
फेडण्याची उपकार धरणीचे, वेळ आली आहे आता, लावूनिया झाडे, जगवूनिया झाडे……    

रविंद्र कामठे,

Saturday 15 April 2017

माणुसकीने ओतप्रोत भरलेलं एक गावं

माणुसकीने ओतप्रोत भरलेलं एक गावं


मार्च मध्ये साखरपुड्यासाठी बीड जिल्ह्यातील एका गावास खाजगी बसमधून आम्ही समारंभासाठी चाललेलो होतो.  बाहेर उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त होता की, नगर सोडले आणि उन्हाच्या झळा जाणवू लागल्या.  गाडीच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली अन जिकडे पहावे तिकडे सगळीकडे दुष्काळामुळे करपलेली शिवारे दिसत होती.  ना एकही पक्षी आकाशात उडतांना दिसत होता ना शेतामध्ये गाय बैल दिसत होते ना माणसाची चाहूल होती.  सगळीकडे चिडीचूप स्मशान शांतता पसरलेली होती.  पुण्यासारख्या शहरातून ह्या गावा कडे निघालेले आम्ही पाहुणे मंडळी हे सगळे दृष्य पाहून मनातल्या मनात हादरलेलो होतो व वृत्तवाहिन्यांवरून केले जात असलेले दुष्काळाचे विदारक चित्र प्रत्यक्षपणे अनुभवत होतो. ह्या दुष्काळाच्या बातम्या पाहूनच आम्ही गाडीमध्ये जवळ जवळ प्रत्येकी ५ लिटर पिण्याचे पाणी घेऊनच ही मजलदरमजल करत होतो.  त्याचे कारण गावात गेल्यावर आम्हांला प्यायला पाणी मिळेल की नाही ही एक शंका तर होतीच आणि ते पाणी आमच्या सारख्या शहरी माणसांना बादेल की काय असे वाटत होते.  त्यामुळेच खाण्याच्या गोष्टींपेक्षाही आमच्याकडे पाणीच जरा जास्त होते.  जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळेच अगदी रुक्ष आणि उजाड माळरान पसरलेले होते.  नाही म्हणायला काही कडीलिंबाची झाडे मात्र रस्त्यच्या दुतर्फा थोडीफार विसाव्याची सावली ह्या रखरखत्या उन्हातही अगदी निस्वार्थीपणे देत होती.  आमची बस गावात पोचली आणि काय आश्चर्य, एवढ्या रणरणत्या उन्हातही काही पुरुष मंडळी व बायका आणि पोरं सोरं आमच्या स्वागतासाठी उभी होती.  मला तर फारच शरमल्या सारखे झाले हो हे पाहून.  कारण हेच पाहुणे जर आमच्या शहरात आले असते तर आम्ही केले असते का त्यांचे असे स्वागत ? ते ही अशा उन्हात ! प्रश्नच येत नाही असे करण्याचा.  पाहुणे असले म्हणून काय झाले.  घरात आल्यावर त्यांचे आम्ही आदरतिथ्य करणारच आहोत ना !  मग येउदेत त्यांना आत, उगाचच सनबर्नचा त्रास झेलून एवढे तडमडत स्वागताला जायची काही गरज नाही वगैरे.  असो.

हे गावं तसे लहानच होते म्हणजे अगदी १००-१५० उंबऱ्यांचे असावे.  प्रत्येकाची २-३ एकर जिरायती शेती असावी असा अंदाज होतो आणि तो नंतर बरोबरही निघाला.  तापलेल्या मातीचा तो एक बोळवजा रस्ता.  दुतर्फा एकमेकांच्या हातात हात घालून उभी असलेली दगडी घरांची रांग.  काही घरे पडकी होती तर काही अगदीच नीट नेटकी होती. १००-२०० मीटर आत गेल्यावर प्रचंड वाढलेला वडाचा एक वृक्ष व त्याला बांधलेला एक चावडीवजा पार आणि लागुनच असलेले एक छोटेखानी मंदिर असे अगदी चित्रामध्ये साकारलेले एखादे गावं असावे तसेच हे गावं होते.  हे दृष्य पाहूनच एवढ्या तळपत्या उन्हातही मन थोडेसे प्रसन्न झाले.  चारपाच घरे ओलांडून पुढे गेलो आणि पाहुणांचे घर आले.  आगत स्वागत झाले. यजमानांनी त्यांच्या दगडी घरातील एका ओसरीवर आमची बसण्याची व्यवस्था केलेली होती. बाहेर साधारण ४५ अंश तापमान असेल आणि ह्या दगडी घरात वातानुकुलीत खोलीलाही लाजवेल असा थंडावा होता हे जाणवल्यावर तर प्रवासातून थकलेले आणि होरपळलेले आमचे जीव एकदम सुखावले.  यजमानांनी पिण्यासाठी एकदम थंड पाणी प्यायला दिल्यावर आमचे हात आमच्याही नकळत जोडले गेले होते.  तरी आमच्याकडील प्रत्येकाच्या हातात पिण्याच्या पाण्याची एक प्लास्टिकची बाटली होती बर का ! पण ते पाणी प्रवासात उन्हामुळे गरम झालेले होते हे आम्हांला ह्या थंड पाणी मिळाल्यावर जाणवले आणि आम्ही अगदी ओशाळून गेलो.  त्याचे कारण ही तसेच आहे हो... आम्ही सगळे गाडीत विचार करत होतो की कसे होणार आपले ह्या गावात पोचल्यावर !  किती उन आहे तिथे, धड प्यायला पाणी (म्हणजे पुण्यासारखे क्लोरीन टाकून स्वच्छ केलेले) तरी मिळेल कां ? थंड पाणी मिळणे तर जरा अशक्यच आहेजेवणाचे काय हाल होणार आहेत ते देवच जाणे, कशाला आलो इकडे आपण, काहीतरी थातूर मातुर कारण सांगून टाळता आले असते, ह्या भागात एवढा दुष्काळ असेल असे वाटलेच नव्हते असे बऱ्याच जणांचे अकलेचे तारे तोडून झालेले होते आणि ते ह्या थंड पाण्यामुळे एका क्षणात ताड्कन निखळून पडले.

ह्या गावाकडील माणसांमधील माणुसकीची ही तर एक झलकच होती बर का. कारण साखरपुड्याच्या कार्यक्रमात ह्या यजमानांनी आमचे आगत्य आणि पाहुणचार करण्याची कुठलीच संधी वाया घालवलेली नव्हती.  अधून मधून यजमान त्यांच्या कडे आलेल्या गावातील स्थानिक मंडळीचीही विचारपूस करीत होते व अतिशय आदराने व प्रेमाने वागतांना दिसत होते.  खेडेगावाला साजेशी अशी साखरपुड्याची म्हणजेच सुपारीची व्यवस्था करण्यात आलेली होती व जवळच्या चुलीवर चाललेली चविष्ट मेजवानीची तयारीही पाहून तोंडालाही पाणी सुटल्याची भावना झाली.  छोटेखानी मांडव घातेलेला होता आणि वाजंत्रीही बहुगलबला करत होती. ह्या गावातील एकाही माणसाने चेहऱ्यावर दुष्काळाच्या झळांची झलकही आमच्या समोर दाखीवली नाही आणि दुष्काळाचे रडगाणेही गायले नाही.  त्यांच्यातील लहान थोर ह्या सुमंगल कार्यक्रमाचा आनंद लुटत होते आणि दुष्काळाच्या व्यथेतून थोडेसे मन हलके करत होते. त्यांच्या आयुष्याच्या दावणीला बांधलेल्या ह्या दुष्काळाच्या व्यथा कशाला ह्या शहरी माणसांना ऐकवायच्या, ज्या त्यांना रोज संध्याकाळी ७ ते ९ च्या वृत्त्वाहीन्यांवरून वातानुकुलीत खोलीत अथवा पंख्यां खाली बसून पाहायला मिळत असतीलच की ! इत्यादी..

माझ्या नकळत नकळत मला ह्या लोकांच्या मनातली एक संवेदना आठवली ....वेदना माझ्या, कोणा मी, अता सांगू कधी.  फाटक्या आभाळाला, ढिगळे लावू कधी. उसने अवसान, तरी मी आणू किती. उडालेल्या छपराला, सांग शोधू कधी.  हंबरडा वेदनेने, मी फोडला किती, ऐकण्यास कान कोणते, असे मागू कधी.  भेगाळलेल्या भुईला, आस पावसाची, ढगांवर बरसण्याची, सक्ती लादू कधी.  काळजाला पडलेली, घरे होती किती !, नभांगणातल्या तारकां, अशा मोजू कधी.  पडुनी खिंडारे, शकले झाली भावनांची, आस जुळण्याची अशी, आता सांधू कधी.
 
शेतकरी हा विषय तसाही माझ्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे मला जरा जास्तच कळकळ होती आणि मी आपसूकच जमलेल्या काही गावकऱ्यांशी गप्पा मारू लागलो.  दुष्काळाची काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्याचा हलकासा प्रयत्न करत होतो.  माझे थोडेसे मराठी शेतकरी संमेलना विषयीचे प्रास्ताविक करून झाले होते व दोन तीन शेतकरी माझ्याशी अतिशय प्रामाणिकपणे बोलते झालेही.  त्यांच्या व्यथा, दु:खे, समस्या, अडचणी, आर्थिक आणि सामजिक अडचणी ऐकल्यावर तर माझ्या काळजाला खूप वेदना होत होत्या आणि शहरी जीवन किती सुखदायक आहे त्याची जाणीव करून देत होत्या.  एक सत्य ह्या सगळ्या कथनातून जाणवले ते म्हणजे हे सगळे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि गेली ५-६ वर्षे दुष्काळाच्या झळा सोसत आहेत.  प्रत्येक घरातील एक किंवा दोन व्यक्ती शहरांमध्ये रोजंदारी किंवा नोकरीसाठी पाठवून ही मंडळी कसा बसा आपला उदरनिर्वाह चालवताहेत आणि अशा कठीण परिस्थितीही जमेल तेवढी शेतीची मशागतही करताहेत.  त्यांच्या ह्या आशावादापुढे मी तर नतमस्तक होऊन अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात नुकताच प्रकाशित झालेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह  कणसातली माणसेदेऊन त्यांच्या व्यथांची साहित्य क्षेत्राने घेतलेली दखलेची जाणीव करून देऊन त्यांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि काही ओळी सरकन आठवल्या....

बळीराजाच्या नजरेतही, अंगार आहे |       
व्यथेने दुष्काळाच्या तो, सध्या बेजार आहे,
करतो मशागत कष्टाने, काळ्या मातीची |   
दैवाच्या दरबारात तो, निराधार आहे ||
बळीराजाच्या नजरेतही, अंगार आहे |       
व्यथेने दुष्काळाच्या तो, सध्या बेजार आहे
करतो मशागत कष्टाने, काळ्या मातीची |   
दैवाच्या दरबारात तो, निराधार आहे ||
का बरे त्याला सारे, म्हणतात बळीराजा !    
तसा त्याला राजाचा, काय अधिकार आहे
एक एका ढेकळावर, लावतो जीव हा |      
पाण्याच्या थेंबाचाही, त्यालाच नकार आहे ||
पिकल रान तर, येई आयुष्यात शान |      
जळलं तर पाडती, दोरीवर भार आहे
फार झाले आता, परिस्थितीचे हे चोचले |   
व्यथेवर मात करण्याचा, निर्धार आहे ||
नाही सरकारात कुठल्याही, खरा जोर |      
येथे सगळा खुळ्यांचाच, कारभार आहे
बळ येऊ दे आता, बाहूत दहा हत्तींच |     
राजा तुझ्यावरच, देशाची मदार आहे ||
 
ह्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मला कठीण परिस्थितीतही नितीमत्ता न ढळू देता कसे जगायचे ह्याची फार मोठी शिकवणच दिली होती.  मी मोठ्या कष्टानेच पुन्हा पुण्याकडे येण्यासाठी बसमध्ये बसलो होतो पण माझे मन मात्र मी ह्या करपलेल्या शिवारातील माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या माणसांच्या पायाशी ठेवून परतीच्या प्रवासाला निघालो होतो...पुणे शहराकडे....

रविंद्र कामठे

Tuesday 4 April 2017

“कर्मचारी कपातीचा अवकाळी विळखा”


कर्मचारी कपातीचा अवकाळी विळखा

गेली तब्बल १८ वर्षे ती एका खाजगी कंपनीमध्ये अतिशय इमाने इतबारे नोकरी करत होती व आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावत होती.  तिने कामात कधीही कामचुकारपणा केला नाही.  तिला नेमून दिलेले काम ती मोठ्या हुशारीने आणि तितक्याच नेटाने, कंपनीला कुठल्याही प्रक्ररचा तोटा होऊ ने देता, अगदी सचोटीने करत होती.  तिचे काय चुकत होते, तर ती एक उत्तम संवादक होती, सर्व सहकाऱ्याशी मिळून मिसळून वागत होती.  अगदी कालपरवापर्यंत ती तर कंपनीच्या व्यवस्थापनाच्या प्रत्येक निर्णयाला साजेसे असेच काम अतिशय संयमाने आणि मोठ्या जिद्दीने, कधीही न चुकता पार पाडत होती.  जेंव्हा जेंव्हा तिला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जात, तेंव्हा तेंव्हा तिने स्वत:ला सिद्ध केले होते आणि एखाद्या जबाबदार व अतिशय प्रामाणिक अशा कर्मचारीवर्गात तिची कायमच गणना केली जात होती.  हे सगळे ती नेटाने करत होती, कारण तिला तिच्या एकुलत्या एक मुलीला उच्चशिक्षण देवून एक जबाबदार नागरिक बनवायचे, स्वप्न होते.  त्यासाठी ती आणि तिचा नवरा, ज्याचा स्वत:चा एक छोटासा व्यवसाय आहे, दोघेही हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काबाड कष्ट करून ह्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत होते.  त्यात ह्या पापभिरुंचे काय हो चुकले होते असचे म्हणावयास हवे !  आपण आपल्या आयुष्याचे किती दूरवरचे नियोजन करतो, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते हे कसे ह्या सध्या भोळ्या माणसांना कळणार हो !

तसे पाहायला गेले तर ही एक छोटी आणि आजकालच्या काळात सर्रास घडणारी घटना म्हणायला हवी.  परंतु तीच घटना आपल्या एखाद्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या बाबत घडते ना तेंव्हा आपल्या पायाखालची वाळूच सरकते हो !  त्याचे काय झाले, काल म्हणजे ३१ मार्च २०१७ ला तिला तिच्या साहेबांनी दुपारी चार वाजता त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले.  अजूनही काही कर्मचारी तेथे अगोदरच आलेले होते. ह्या सगळ्यांना एकदम अचानक असे सांगण्यात आले की, त्यांना सगळ्यांना आजपासून, आत्तापासून कामावरून काढून टाकण्यात आले आहे.  कंपनीतील तुमचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. साधारण दोन तासांत तुमचा सर्व हिशोब करून तुमचे सर्व पैसे धनादेशाद्वारे तुमच्या सुपूर्त करण्यात येतील, तरी सर्वांनी कंपनीशी सहकार्य करावे. कारण कंपनीची सध्याची परिस्थिती अतिशय हलाकीची आहे आणि ह्या पुढे तुमचा भार कंपनी वाहू शकत नाही. हे ऐकल्यावर साहेबांच्या कार्यालयातील खोलीत नि:शब्द शांतता पसरली होती आणि तिच्या डोळ्यातून तर गंगायमुनाच वहायला लागल्या होत्या.  तिला दोन मिनिटे काहीच सुचले नाही.  चक्कर आल्यासारखे झाले.  पोटात डचमळायला लागले.  मळमळते आहे असे वाटले आणि आता आपण बेशुद्ध पडतोय की काय असेच वाटायला लागे.  त्या दोन मिनिटांमध्ये तिच्या डोळ्यासमोरून तिने आणि तिच्या नवऱ्याने गेली १८ वर्षे खालेल्या खस्ता, पोटाला चिमटा घेऊन, कवडी कावडी करून मुलीच्या उच्च शिक्षणासाठी साठवलेले पैसे, तिला उच्चशिक्षणासाठी अमेरिकाला धाडण्यासाठीचे चाललेले प्रयत्न, पोरीची हुशारी आणि तिने जिद्दीने ७ ते ८ अमेरिकन विद्यापीठांमध्ये मिळवलेला प्रथम प्रवेश, येऊ घातलेला अमेरिकन व्हिसा, तिच्या शिक्षणासाठीच्या लागणाऱ्या पैशांची आणि तिकडे राहण्याखाण्यासाठीच्या खर्चाची केलेली तजवीज, हे सगळे आता स्वप्नच राहते आहे की काय असे तिला वाटले.  त्याही परिस्थितीत तिने बाहेर येऊन मला फोन करून ही बातमी सांगितली व फोनवरच रडायला लागली.  मी तिला समजावले आणि सांगितले की, हा व्यवस्थापनाचा निर्णय आहे त्यामुळे त्याच्या विरोधात वगैरे जाण्याचा विचार करू नकोस व उगाचच वेळ वाया घालवू नकोस.  त्यापेक्षा तू त्यांचा हा निर्णय मान्य करून तुझा राजीनामा त्यांच्या सुपूर्त कर आणि तुझ्या हिशोबाचे पैसे घेवून कंपनीतून शांतपणे घरी जा.  मी उद्या तुला घरी येऊन भेटतो आणि सद्यपरिस्थितीवर विचार विनिमय करून आपण योग्य तो मार्ग शोधून काढूयात.

ही वेळ म्हणजे माझ्यातील एका समुपदेशकाची परीक्षाच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  मी लगेचच स्त:ला त्या भूमिकेत ढकलून वेगवेगळ्या मार्गांचा विचार करायला लागलो ही.  तरीही ती रात्र माझ्यासाठी खूपच जीवघेणी होती असेच म्हणावयास हवे.  कोण कुठली ही मुलगी जी माझ्यावर सख्या भावापेक्षाही जास्त जीव लावते आणि तिचा नवरा आणि मुलगी मला तर आजवर त्यांचा एक हितचिंतक व उत्तम मार्गदर्शकच समजतात.  ह्या जाणीवेने मलाच कसंतरी व्हायला लागले व ह्या विषयावर आणि ह्या समस्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर वेगवेगळे विचार करायला भाग पाडले. एक मात्र नक्की की ही जी काही समस्या आहे ही मानव निर्मित आहे.  सध्याच्या जीवघेण्या व्यवसायिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी कंपन्यांना बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो व स्त:ची बाजारातील पत टिकवून ठेवण्यासाठी वाट्टेल ते मार्ग अवलंबावे लागतात.  खर्च कमी करणे हा तर ह्या समस्येवरील एकमेव जालीम उपाय सध्या ह्या कंपन्यांनी सोयीस्कररित्या वापरायचे ठरवले आहे आणि त्यामुळेच कर्मचारी कपात करणे हा त्यातल्यात्यात अतिशय सोपा मार्ग आजकाल सर्वच खाजगी कंपन्या अमलात आणू लागल्या आहेत असे वाटते.  त्याचे कारण कार्यालयात काम करणारे हे कर्मचारी कामगारवर्गात मोडत नसल्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करणे खूपच सोपे जाते.  तसेही हे कर्मचारी कुठल्याही कामगार संघटनेशी सलग्न नसल्यामुळे व त्यांना कायदेशीर कुठलेच संरक्षण लाभत नसल्यामुळे हे असे कामावरून काढून टाकणे सोपे असते.  त्यामुळे हे जेष्ठ कपाती कर्मचारी सुशिक्षित बेरोजगारांमध्ये भरच टाकत आहेत.  ह्या अशा कर्मचाऱ्यांना ना धड कुठे नोकरी मिळत ना त्यांच्यात कुठला व्यवसाय करण्याचे धाडस राहते.  अशी ही मंडळी ह्या अवकाळी आघातामुळे भरकटत जातात आणि त्यांच्यामुळे त्यांचे संसारही त्यांचामागे फरफटत जातात.  ह्या सगळ्यामुळे एक गंभीर स्वरुपाचा अवकाळी विळखा आज आपल्या सामजिक संस्थेवर आवळला जातो आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे.

दुसऱ्या दिवशी मी तिला तिच्या घरी जाऊन भेटून परिस्थितीचा आढावा घेतला व त्यांना त्योग्य ते मार्गदर्शन करून समस्येचे निराकरण माझ्या परीने व कुवतीने केले.  तरीही मला एक प्रश्न सारखा सतावत होता तो म्हणजे अशा तडकाफडकी नोकरी गेलेल्या ह्या ही पेक्षा वाईट परिस्थितीत असलेल्या लोकांचे काय हाल होत असतील ! आणि ते ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढत असतील सध्याच्या काळातील ही एक फार मोठी आणि गंभीर सामाजिक समस्या मूळ धरू लागली आहे व त्यांचे दूरगामी विपरीत परिणाम आपल्या समाजसंस्थेच्या पुढील जडणघडणीवर होत असून माझे मन त्यामुळे अस्वस्थ होत होते.

ह्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे आज रोजी उपलब्द असलेले तरुण मनुष्यबळ हे होय.  ही शिकली सवरलेली तरुण मंडळी अतिशय कमी पगारात व्यवस्थापना जर मिळत असतील, तर त्यांनी तरी ह्या जेष्ठ मनुष्यबळावर पैसे का खर्च करावेत !  अर्थात हा माझा विचार नाही, तर व्यवस्थापनाचा विचार आहे.  त्यामुळेच कर्मचारी कपात हा अगदी सरळ सोपा मार्ग बऱ्याचशा खाजगी कंपन्या निवडतांना दिसतात.  त्यांना फक्त त्यांच्या नफ्याशीच घेणे देणे असते त्याला कोण काय करणार.  परंतु त्यांच्या सारख्या ह्या निर्णयाचा एकंदरीतपणे आपल्या सामाजिकव्यवस्थेवर काय परिणाम होतो आहे ह्याचा विचार करण्याची काळाची गरज आहे.  ह्या असल्या कपातींमुळे ४५-५० नंतरचे माणसांचे आयुष्य किती अस्थिर झाले आहे आणि होते आहे हे जाणवते व त्यामुळेच ह्या विषयावर समाज प्रबोधन करणे नितांत गरजेचे आहे असे मला वाटते.

तसे पाहायला गेले तर सध्या ही समस्या खाजगी क्षेत्रापुरती मर्यादित आहे आणि अजूनतरी सरकारी कर्मचारी वर्गाला ह्याची फारशी तोशीस लागलेली नाही.  परंतु काही काळानंतर सरकारी क्षेत्रातही ही समस्या प्रवेश करू शकते हे एकंदरीत सरकारच्या नवीन धोरणांवरून स्पस्ट होते.  परिवर्तन हा तर निसर्गाचा नियम आहे आणि तो मानवाने सुध्दा आत्मसाद करायला हवा हे मात्र ह्या एका घटनेच्या अनुषंगाने मला सांगावयासे वाटते. माझा उद्देश खाजगी कंपन्यांना अथवा त्यामध्ये काम करणाऱ्यांना दोष देणे हा नसून ह्या सामाजिक समस्येवर दूरदृष्टीने विचार करून काहीतरी ठोस अशी उपयोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

माझे ह्या सर्व खाजगी कंपन्यांना एकच निवेदन आहे की, त्यांना जर व्यवसायाच्या दृष्टीकोनातून कर्मचारी कपात करायचीच असेल तर त्यांनी ती कायदेशीर मार्गाने जरूर करावी.  फक्त ती करतांना त्यांच्याकडील निष्ठेने वर्षानुवर्षे काम केलेल्या कुटुंबांचाही अवश्य विचार करावा.  त्यांच्या ह्या निर्णयामुळे ह्या कर्मचाऱ्यांचा संसाराची धूळधाण होणार नाही ह्याची जरूर ती काळजी घ्यावी.

तसाही हा विषय फारच गंभीर आहे आणि लवकरच तो त्याचे अक्राळ विक्राळ रूप धारण करायला लागला आहे, त्यामुळेच आत्तापासूनच जर ह्या समस्येवर सर्वांनीच एकत्रित विचार करून काही  उपाय योजना केल्यातर मला वाटते निश्चितच आपल्या समाजाचे स्वाथ्य निट ठेवण्यास मदत होईल असे वाटले म्हणून हा लेख प्रपंच.

रविंद्र कामठे,