Thursday 6 December 2018

स्वार्थ-परमार्थ


स्वार्थ-परमार्थ

माणूस हा किती स्वार्थी असतो ह्याचा प्रत्यय साधारणपणे प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात नक्कीच येतच असणार नाही का ?  म्हणजेच एका माणसाला दुसऱ्या माणसाचा स्वार्थ नक्कीच कशात आहे हे तर कळतच असणार की !  तरीही माणूस अशाही परिस्थितीत जीवन जगतच असतो अगदी ह्याच स्वार्थी माणसांच्या सहवासात ह्याचे फारसे काही आश्चर्य वाटण्याचे कारणच नाही.  कारण शेवटी जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला हे जीवन, त्या विधात्याने जसे लिहून दिले आहे तसेच जगावे लागते हे मात्र निश्चित आहे.  माणसांनी उगीच टीव टीव करू नये !  म्हणजे मी हे केले, ते केले, असे केले, तसे केले, माझ्याच मुळे हे सगळे झाले, मी नसतो तर हे शक्यच नव्हते वगैरे वगैरे.  ह्या सगळ्या फुकटच्या वल्गना वाटतात. माणसाने फक्त न बोलता कर्म करीत राहावे.

स्वार्थ आणि परमार्थ म्हणजे काय?  हेच काय ते माहित नाही.  स्वार्थ कशाला म्हणायचे, तर जे जे माणसाला स्वत:च्या सोयीनुसार हवे आहे अथवा ते ते तो येनकेन प्रकारे मिळवतोच ह्यालाच स्वार्थ म्हणायचा, नाही तर काय !  आणि परमार्थ म्हणजे स्वार्थाने मिळविता मिळवता जर का जमलेच तर थोडेफार दान दुसऱ्याच्या पदरात टाकता आले अथवा तशी तजवीज करता आली म्हणजे परमार्थ होय असे मला तरी वाटते.  हे सुद्धा सगळ्यांनाच जमते असेही नाही ! चूक की बरोबर हे ज्याने त्याने ठरवावे.

स्वार्थ कधीही वाईट नसतो.  एखादे कर्म करतांना साधलेला स्वार्थ, तो कोण कोणासाठी,  कोणावरही अन्याय न करता अगदी सात्विक आणि समंजसपणे साधला असेल तर तो योग्य ठरतो.  नाहीतर त्याला अन्यायच म्हणावे लागेल.  जोरजबरदस्ती,  बळजबरी, मनाविरुद्ध एखादी गोष्ट करायला लावून स्वार्थ साधता येत नाही आणि तो लाभतही नाही.  परमार्थ दैवी कृपेनेच होतो असे मला तरी वाटते.  त्याचे कारण, परमार्थ करण्यासाठी माणसामध्ये माणुसकीचा एक दुर्मिळ असा गुण असावा लागतो आणि त्याच्यात स्वत:कडे जे आहे ते देण्याची दानत असावी लागते.  येथे दुसऱ्यांना लुबाडून केलेला दानधर्म अजिबात अपेक्षित नाही.  ज्या माणसाच्या नशिबात असेल तोच परमार्थ साधून पुण्य कमवू शकतो, हा माझातरी अनुभव आहे.  अहो अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला परमार्थ साधता येऊ शकतो.  वंचित आणि गरजवंत माणसाना सढळ हाताने, कुठेही कसलाही आडपडदा न ठेवता केलेली मदत (भिक नव्हे)  म्हणजेच परमार्थ होय.  परमार्थाने माणसाच्या मनाला खूप आनंद होतो आणि त्यामुळे माणसाचा जीव प्रसन्न होवून जातो.  आयुष्य समाधानी होते.

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपापले कर्म करीतच असतो.  काही कर्मे आपण फळांची अपेक्षा न करता करत असतो तर काही कर्मे ही मुळातच फळांचीच अपेक्षा ठेवून केलेली असतात आणि हीच कर्मे म्हणजे माणसाचा स्वार्थीपणा असतो.  ह्यात तसे पहायला गेले तर वाईट काहीच नाही.  जोपर्यंत ही कर्मे दुसऱ्या कोणाचे वाईट करत नाही तोपर्यंत ती स्वार्थी जरी असली तरी आयुष्यात जगण्यासाठी तितकीच गरजेची असतात.  अशाच आपल्या कर्मांमधून काही कर्मे अशी असतात की ज्यांची फळे आपल्या संचितात जमा होत असतात आणि जेंव्हा ही फळे परिपक्व होतात तेंव्हा ती माणसाचे प्रारब्ध म्हणून समजली जातात.  अर्थात वाईट किंवा दुष्कर्मे ही दु:खदच असतात तसेच त्यांची फळेही तेवढीच वाईट असतात.  म्हणूनच माणसांनी कर्म करतांना आपल्या संचितात जेवढा म्हणून चांगल्या कर्मांचा ठेवा करता येईल तेवढा करावा. म्हणजे हीच फळे जेंव्हा परिपक्व होऊन आपल्या प्रारब्धात येतील तेंव्हा ती आयुष्यात एक प्रकारचा गोडवा,  आनंद, सुख आणि समाधान देऊ शकतील.  जसे आपण आपल्या बँके मध्ये पैशाचा संचय करून आपल्या प्रारब्धाची सोय करत असतो ना, अगदी तसेच सत्कर्म करून परमार्थाचा संचय आपल्या आयुष्यात करावा आणि चांगल्या प्रारब्धाची सोय करून ठेवावी.

हे सगळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की स्वार्थातून परमार्थ जर साधता आला तर तो अगदी सहजपणे आणि साधेपणाने साधावा व संचितात त्याचा ठेवा करावा,  जेणेकरून प्रारब्धात उत्तरोत्तर चांगले फळ मिळून आपले आयुष्य सत्कारणी लागेल.  विधात्याने आपल्याला दिलेले माणसाचे हे जीवन सफल झाल्याचा एक आगळा वेगळा आनंद मिळेल.  शेवटी प्रत्येकाचे नशीब हे ज्याच्या त्याच्या कर्मावरच अवलंबून असते असे मला तरी वाटते आणि मला म्हणावेसे वाटते.....

आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे,
आशा निराशांचे वलय जसे, सांगावयास उरे काही नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

गेलेला क्षण परतुनी येत नसे, तडजोडीतच आयुष्य जात असे,
संघर्ष हेच आयुष्याचे गमक असे, कष्टा शिवाय आयुष्यास अर्थ नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

स्नेह हेच आयुष्याचे गमक भासे, तंट्यात आयुष्याचा पेचच दिसे,
त्यागातच सुख कमविण्याचे असे, सुख दु:ख हे तर प्रारब्ध जसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

जगण्याची कला हीच संचित असे, माणुसकीला आयुष्यात पर्याय नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे ||

रविंद्र कामठे


“जगावं की मरावं”, “जगावं की मरावं”...”To be or not to be”


जगावं की मरावं”, “जगावं की मरावं”...”To be or not to be”

सारखे सारखे हेच विचार डोक्यात घोळत होते अगदी शेक्स्क्पिअरच्या नाटकातील त्या वाक्यासारखे.. “To be or Not to be”.
ही अशी वाक्ये नाटकांमधल्या पात्रांच्या तोंडून ऐकायला छान वाटतात.  परंतु तीच वाक्ये जेंव्हा आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात डोकावू लागतात ना तेंव्हा काळजाचं पाणी पाणी होतं हो ! ह्या वाक्यांचे अर्थच डोक्यात घुसत नाहीत,  अर्थ तर त्याहून लागत नाहीत ! होय मी हा अनुभव नुकताच घेतला आहे.  अगदी मनापासून सांगतो की असं मला वाटणं हेच मुळी माझ्या स्वत:च्या पचनी पडलं नव्हतं.  माझा सुद्धा ह्यावर विश्वासच बसत नव्हता हे मात्र खरं !  असं काय झालं की ज्यामुळे मला जगावं की मरावंअसे वाटले असेल ! तसं फारस काही गंभीर प्रकरण नाही.  म्हणजे माझ्याच मनाचा वेडेपणा म्हणा हव तरं.  पण असं होतं कधी कधी आपल्या आयुष्यात.  हे मात्र मी अगदी निष्ठून सांगू शकतो.  म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण कधी तरी आलेला असतो की ज्यामुळे आपण थोडेसे व्यथित होतो आणि काही काळासाठी तो एक क्षण तुम्हांला मानसिकरीत्या ढासळूनही टाकतो अथवा आयुष्याला नवी उभारी देऊन जातो.  मनाच्या कोपऱ्यात कित्येक वर्ष जतन केलेला तो एक क्षण असा असतो जो आपल्या काळजात अगदी शांतपणे विसावलेला असतो.  आयुष्याच्या उतरणीला तो क्षण आपसूकच पुन्हा एकदा आपल्या जवळ येतो, आपल्याला स्पर्श करतो आणि अलगदपणे आला तसाच लगेचच दूर निघूनही जातो.  आपण त्या क्षणाकडे,  अगदी तो पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत पहात राहतो. त्यावेळेस आपल्याला काहीच म्हणजे काहीच सुचत नाही.  नंतर जेंव्हा तो क्षण आपल्यापासून दूर गेल्याची जाणीव होते ना,  तेंव्हा त्या क्षणाला वाटतं.. जगावं की मरावं... ”To be or not to be”.  प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादाच क्षण असतोच की ज्यामुळे आपल्या मनात तात्पुरती हा होईना ही भावना उत्पन्न होते आणि तीच खुण असते आपण माणूस संवेदनशील माणूस असल्याची.  स्वत:शी प्रामाणिक असल्याची. एक नक्की सांगतो की हा क्षण जपण्यात आपण कधीही कमी पडता कामा नये.  मनाच्या एका कोपऱ्यात अगदी अलगदपणे जतन करून ठेवलेला हा एकच क्षण असा असतो की जो आपल्याला हे आयुष्य जगण्यास मदत करत असतो.  बऱ्याचदा हाच तो एक क्षण आपले सारे आयुष्य व्यापून टाकतो . आयुष्याच्या ह्या बहुरंगी आणि बहुढंगी नाटकाचा हा एकच क्षण सूत्रधार असतो, जो आपल्याला एखाद्या कठपुतलीच्या बाहुली सारखे नाचवत असतो आणि आपणही त्याच्या तालावर बेलाशकपणे नाचत असतो.  त्यालाच तर आयुष्य म्हणतात !  म्हणजे आपण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जे काही जगतो त्याला आयुष्य न म्हणता ह्या एका क्षणाला आयुष्य म्हणायचे की काय ! तो एक क्षण कुठलाही असू शकतो.  अर्थात तो प्रत्येकाला थोडेसे आत्मपरीक्षण करून मनाच्या कप्यात खोल खोल जाऊन,  अगदी काळजाच्या तळाशी जावून शोधायचा असतो.  तो क्षण कसा असतो,  काय असतो,  आयुष्यात केव्हा आलेला असतो,  कुठे आलेला असतो,  कोणाबरोबरचा असतो,  कशामुळे अवतरलेला असतो,  त्याचे त्यावेळेस चांगले वाईट काय परिणाम झालेले असतात,  त्यात कोणी सुखी तर कोणी दु:खी झालेले असते का ?  असे आणि अंजून किती तरी प्रश्न आपल्याला पडतात.  अर्थात ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सापडतातच असेही नाही.  आणि हो जरी उत्तरे अथवा उत्तर सापडले तरी,  शेवटी एकच प्रश्न उरतो तो म्हणजे जगावं की मरावं”.. To be or not to be..

तरीही असं वाटतं की..

आयुष्य इतकंही सोपं नाही, जितकं आपण समजत असतो |
आयुष्य इतकंही अवघड नाही, जितकं आपण ते करून ठेवतो ||


रविंद्र कामठे

“सुखी माणसाचा सदरा”


सुखी माणसाचा सदरा

गेले कित्येक दिवस मी सुखी माणसाचा सदरा आणि त्या सदरयातील सुखी माणूस शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.  का कोण जाणे पण मला अजून तरी माझ्या ह्या प्रयत्नांस म्हणावे असे यश काही लाभलेले नाही ! त्यामुळे मला सर्वात आधी सुखाची व्याख्याच शोधावी की काय असे सारखे वाटू लागले तर नवल नको !  सुख म्हणजे काय असते ?  काय केलं की ते मिळतं ? सुख कसं असतं ? सुख कसं दिसतं ? सुख कसं लाभतं ? काय पुण्य केलं की ते मिळतं ? सुख कशाला म्हणायचं ? दु:ख नसणं म्हणजेच सुख का ? दु:खात सुख शोधायचं असतं का ? वगैरे वगैरे.  दु:ख म्हणजे तरी नक्की काय असतं ? सुख आणि दु:ख ह्याची विभाजनी कशी करायची ?  त्यांच्यातला फरक कसा ओळखायचा ? मन अगदी भंडावून गेलं आहे हो माझं ह्या आणि अशाच मारुतीच्या शेपटा सारख्या कधीही न संपणाऱ्या प्रश्नांनी !  जीव अगदी मेटाकुटीला आलायं.

त्यांच कारण की, मध्यंतरी मी आमच्या सोसायटीच्या मिटींगला गेलो होतो.  बऱ्याच दिवसांनी सर्व सभासदांची निवांत भेट होईल आणि त्यांची ख्याली खुशाली कळेल आणि त्यात एखादातरी सुखी माणूस भेटल अशी एक भाबडी आशा मनात घेऊनच मी ह्या मिटींगला गेलो होतो.  परंतु काय सांगू ह्या मिटिंग नंतर तर मी थोडासा अंतर्मुख झालो होतो.  माझ्या सुखी माणसाच्या सदऱ्याच्या शोधाला यश काही येत नव्हते.  मला खात्रीच वाटायला लागली की ह्या जगात सुख नावाचे असे काही नसतेच !  सुखाच्या आपल्या सगळ्या कल्पना ह्या भ्रामक वाटायला लागल्या होत्या.  जे काही आहे ते म्हणजे दु:ख, समस्या, अडचणी, अडथळे, दुरवस्था, नैराश्य, कटकट, शारीरिक व्याधी, मानसिक ताणतणाव, कष्ट, ओढाताण, असमाधान, दुर्दैव, अंधार  आणि अंध:कार इत्यादी इत्यादी.

मिटिंगला सोसायटीच्या अध्यक्षांनी सुरवात केली. त्यांचाकडे पहात असतांना माझी नजर सहज त्यांच्या पायवर टाकलेल्या पंच्याकडे गेली आणि काही क्षण मी सुन्न झालो होतो.  होय, त्यांचा उजवा पाय खोटा होता त्या पंच्यामधून पायाची गुलाबी बोटे दिसत होती पण त्यांची बराच वेळ हालचाल होत नव्हती म्हणून मी जाणीव पूर्वक पहिले आणि मला गुढघ्याच्या खालील तो पाय खोटा असल्याचे जाणवले.  मला अगदीच कसतरी झालं.  मी हलकेच नजर थोडीशी बाजूला केली तर मला बाजूला त्यांच्या खुर्ची जवळ एक पांगुळगाडा दिसला. काय बोलावे काही सुचतच नव्हते.  मी मनाचा धीर करून शेवटी त्यांना अगदी हळूच विचारले की, अण्णा (सगळे त्यांना अण्णा म्हणतात) हे कधी झाले.  त्यावर ते अगदी सहजपणे म्हणाले अरे ही तर माझ्या सखासोबती मधुमेहाची कृपा दुसरे काय !  झाले ५-६ महिने.  आता हा खोटा पाय आलाय ना त्यामुळे लागलोय परत जोमाने कामाला.  मला काय बोलावे हेच सुचेना.  ह्या माणसाचे वय आहे साधारण ७०-७२ त्यात मधुमेहाची आणि हृदयविकाराची व्याधी गेली १५-२० वर्षे सोबतीला.  तरीही त्यांच्या कामाची ही तडफ व त्यांच्या जिद्दीला मला सलाम करावासा वाटला आणि ह्या एवढ्या दु:खातही खचून न जाता पूर्वी इतक्याच सचोटीने काम करण्याच्या त्यांच्या ईर्षेला मी साष्टांग दंडवत केला आणि मनोमन विचार केला की त्यांच्या अंगावर जो आत्ता असेल तोच असले का, मी सोधत असलेला सुखी माणसाचा सदरा आणि त्यातला सुखी माणूस !

ह्या प्रकारामुळे माझे काही केल्या ह्या मिटिंग मध्ये लक्ष लागेना.  माझी नजर त्यात काहीतरी वेगळेच शोधत बसली होती.  एक एका सदस्याकडे मी एक नजर टाकली.  जवळ जवळ १५ सदस्य जमलेले असावेत.  सगळेच साधारण ५०-७५ वयोगटातील असतील, एखाद दुसरा ४०-४५ असावा. मी माझ्या बाजूला बसलेल्या अजून एका वयस्कर सदस्याकडे पहिले आणि त्यांच्या मनगटावर चिकटवलेल्या रक्त तपासणीच्या चिकटपट्टीकडे माझी नजर गेली.  काका नुकतेच मधुमेहाची तपासणी करून तसेच मिटींगला आले होते.  आता मला जरा जास्तच अस्वस्थ व्हायला झाले.  मी विचार करायला लागलो की इथे बसलेल्या एका तरी माणसाच्या अंगावर सुखी माणसाचा सदरा असायलाच हवा.  मलाच तो का दिसत नाही ?  माझी नजर पुन्हा एकदा तो सुखी माणसाचा सदरा शोधू लागली.  माझ्याही कळत नकळत मी मिटींगला जमलेल्या प्रत्येक सदस्यास न्याहाळू लागलो.  उपस्थित प्रत्येक सदस्याला काही ना काही तरी समस्या अथवा अडचण होतीच.  तरीही कोणाची तक्रार नव्हती. कोणाला नुकताच स्वादुपिंडाचा आजार जडला होता तर कोणाला हृदयविकाराचा, अगदी माझ्या सारखा.  मधुमेह तर जवळ ८० प्रतिशत लोकांचा साथीदार झाला होता.  माझ्याच वयाच्या एका सदस्याला तर कर्क रोग झाला होता आणि त्यातून तो सुधारून आज अतिशय उत्साहाने चक्क मिटींगला आला होता.  काही सदस्य उतार वयामुळे थोडेसे थकल्या सारखे वाटत होते एवढेच.  त्यात एका दोघांची मुले परदेशात असल्यामुळे एकटेपणामुळे थोडेसे उदास वाटत होते परंतु त्यांचाशी बोलतांना त्यांचा तसा काही फारसा तक्रारीचा सूर दिसून येत नव्हता.  उगाचच मलाच तसे वाटत असावे बहुधा !  नुकेतच एका काकांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते तरी त्यांचा मुलगा आणि त्याची आई ते दु:ख विसरून अगदी सर्वसामान्यपणे वागत होते. असो.  एका काकांना वयाच्या ७५ला आहे हे घर पाडून पुन्हा नव्याने बांधून त्यांच्या दोनही नातवांची सोय, ह्याची देही ह्याची डोळा करून पाहण्याची जिद्द होती.  कर्मधर्म संयोगाने अजूनतरी त्यांना फारशी शाररिक समस्या भेडसावत नव्हती.  नाही म्हणायला नुकतेच त्यांचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती तरीही काका अजूनही त्यांचा व्यवसाय करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यात यशस्वी झाले होते.  त्यांच्या ह्या महत्वाकांग्शेमुळेच की काय त्यांच्या अगावरील सदरा मला सुखी माणसाचा भासला होता.  तरी अजून मनाची खात्री होते नव्हती !

माझ्या डोक्यातले हे विचार चक्र असेच चालू होते.  त्याच नादात मिटिंग कधी संपली तेच मला कळले नाही.  मी नियमाप्रमाणे तिथे ठेवलेल्या वहीतील नोंद केलेल्या जागी माझी स्वाक्षरी करून बाहेर पडलो आणि माझ्याच नादात घरा कडे चालू लागलो.  सुखी माणसाचा सदरा शोधण्यासाठी.....

एकदम माझ्या मनात विचार आला की, जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती जी कोणी असेल तिच्या अंगावर तर नक्कीच सुखी माणसाचा सदरा असणार आणि त्यात तो सुखी माणूस दडलेला असणार !  अगदी माझ्या डोळ्यासमोर अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, गरवारे, ह्यांची नावे तरळून गेली.  तसेच एकदा वाटले की भारताच्या पंतप्रधानांच्या अंगावर तर नक्कीच असणार सुखी माणसाचा सदरा !  एकदा असेही वाटले की सध्याच्या काळातील साधू (बुवा-बाबा), संत-महात्मे (म्हणजे तशी बिरुदावली लावणारे), थोर राजकारणी, सत्ताधीश, शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, इत्यादी ह्याच्यापैकी कोण्याच्या तरी अंगावर सुखी माणसाचा सदरा तर नक्कीच असायला हवाच.  शेवटी मला वाटायला लागले की माझेच काही तरी चुकते आहे.  मला माझा ह्या सुखी माणसाच्या सदरयाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलायला हवा.  ज्यासाठी मी जीवाचा आटापिटा चालविला होता त्यासाठी शेवटी मला माझा दृष्टीकोन बदलण्याचा एक शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे, असा कौल माझ्या मनाने दिला.  मी आता वेगळ्याच चष्म्याने ह्या जगाकडे पाहायला लागलो आणि काय आश्चर्य मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता दिसू लागली.

इतका वेळ मी वेड्यासारखा सुखी माणसाचा सदरा आणि त्या सदरयातील सुखी माणूस शोधत बसलो होतो आणि तिथेच गफलत झाली होती माझी दुसरे काही नाही !  आता हळू हळू माझ्या एक गोष्ट लक्षात यायला लागली होती ती म्हणजे जन्माला आल्यापासून ते मरे पर्यंत माणसाला फक्त आणि फक्त समस्यांचाच गराडा पडलेला असतो, अर्थात समस्या कशाला म्हणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.  जन्म आणि मरण ह्यामधील जे काही अंतर असते तेच म्हणजे आयुष्य आहे हेच मी विसरलो होतो.  ह्या आयुष्यात अडी-अडचणी तर येणारच ना ! चांगले-वाईट प्रसंग तर खच्चून भरलेल असणारच ना ! कडू-गोड घटनांचा रांजण तर भरलेलाच असणार ना  !  दु:खाचा डोंगर समोर उभारलेला असतोच ना ! त्यावर मात करत हे जीवन हर्षौउल्हासाने जगणे म्हणजेच सुख असावे असे मला तरी वाटले.  उगाच रडतकढत हे आयुष्य काढणे म्हणजे दैवाने दिलेला सुखी माणसाचा सदरा स्व:ताच्या हाताने टराटरा फाडून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊन, मिळालेले हे आयुष्य कुढत काढणे होय, असे मला वाटायला लागले होते आणि हाच काय तो सकारात्मक बदल मला अगदी प्रकर्षाने जाणवत होता हो.

आपण आयुष्यभर जगण्यासाठी वणवण करतो, का तर मेल्यावर जळण्यासाठीचे सरपण साठवायचे असते म्हणून.  आपण जगतोच कशासाठी हेच उमगतच नाही, कारण ह्या सरपणाचे जगतांनाही आपल्या मनावर एकप्रकारचे दडपण असते.  अहो, जर जन्मताच मृत्यूही नशिबी लिहिलेला असेल, तर मरण्याच्या दडपणातही जगण्याचेही एक वेगळेपण आहे हे नको का कळायला.  शेवटी काय मातीतून जन्मून मिसळावे मातीतच लागते ना !  म्हणुनच वेगळेपणाने जगण्यात मृत्यूचेही एक अजाणतेपण आहे हे लक्षातच येत नाही आपल्या.  शेवटी काय हो, प्रतिभेने मिळवलेली आपली ही प्रतिष्ठा आणि ह्या अजाणतेपणातच आपल्या प्रतिष्ठेचे देवपण असते हेच मुळी आपल्याला उमगत नाही.  शेवटी काय सरपणासाठीचीच आपली ही एक धडपड मला वाटते आणि त्यातूनच ह्या धडपडीच्या देवपणातून शेवटी मृत्यू हे एक समर्पण आहे असे भासावे, हेच तर सुखी माणसाचे लक्षण नाही का ?

मानले तर आयुष्यात खूप सुख असते हे म्हणतात नाही तर दु:खच दु:ख असते हे अगदी खरं आहे हो.  ह्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनाला कंटाळून मी शेवटी उगाचच सुखी माणसाचा सदराविकत घ्यायला अनेक दुकानांतून फिरत होतो.  अगदी खूप नावाजलेल्या संस्थांच्याही दुकानात जावून आलो.  सगळी कडे एकच उत्तर मिळाले मला,  ‘आमच्याकडे अतिशय मौल्यवान अशा कापडाचा, उत्तम कारीगिरी आणि रेशमी धागा वापरून तुमच्याच मापाचा शिवलेला सदरा आहे.  त्याला एक खिसा ठेवला आहे त्यात ते जे काय सुखकी काय म्हणताय ना तुम्हीं तेवढे मात्र तुमचे तुम्हांलाच शोधून भरून ठेवावे लागेल.  त्यांची कुठलीही किमंत आम्ही तुम्हांला लावणार नाही.  फक्त सदऱ्याच्या पैसे द्यावे म्हणजे झाले’.  आता हे सुखम्हणजेच भावनिक, मानसिक, शारीरिक, आत्मिक, सात्विक, आर्थिक, बौद्धिक, शाब्दिक, तात्विक, तांत्रिक, अलौकिक, तारांकित, मानांकित, पारंपारिक, संसारिक, व्यावहारिक, प्रासंगिक, शृंगारिक, वैयक्तिक, सामाजिक, अध्यात्मिक, कौटुंबिक, प्रापंचिक, आधुनिक, वैज्ञानिक, असे समाधान वगैरे वगैरे जे काही आहे ते ज्याचे त्यानेच ज्याच्या त्याच्या प्रारब्धातील संचीतानुसार जमा करून ह्या खिशात भरायचे आणि हा सुखी माणसाचा सदराअंगावर घालून मिरवायचे.  हे उमजल्यावर, आपण इतके कसे काय वेडे होतो आणि इतके साधे गणित आपल्याला कसे कळले नाही ! असे म्हणत मी मनातल्या मनात स्वत:लाच कोसत होतो.

त्याच वेळेस मला एका नुकत्याच पाहिलेल्या चित्रफितीची आठवण झाली.. त्यामधील नवऱ्याला दोन्ही पाय नसतात आणि त्याच्या बायकोला एक हात नसतो आणि दुसरा हात अर्धा असतो.  घरातील कामे अथवा बाहेरील कामे करण्यासाठी त्यांनी ह्या समस्येवर उपाय शोधून काढलेला असतो.  तो म्हणजे, बायको आपल्या पाठीवर एक बकेट लावते व त्यात नवऱ्यास बसवते व ती नवऱ्याचे पाय होते तसेच नवरा तिच्या पाठीवरील बकेट मध्ये बसून तिचे हात होतो.  त्यांच्या शारीरिक व्याधीवर अथवा समस्येवर ह्या दोघांनी मिळून काढलेला हा भावनिक आणि मानसिक तोडगा मला खूप काही शिकवून गेला.  डोळ्यात नुसतेच पाणी नाही आले तर माझा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा एक दृष्टीकोनच मिळाला आणि इतका वेळ वेड्यासारखा सुखी माणसाचा सदराजो मी इकडे तिकडे सर्वदूर शोधत होतो तो मला माझ्याच अंगावर आपसूकच मिळाला.  म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा”, तशीच काहीशी माझी गत झाली होतो, नाहीतर काय !

माझ्याच अंगावरचा सुखी माणसाचा सदराआणि त्याच सदरयातील सुखी माणूस मलाच दिसत नव्हता हो आणि शब्द सुचले की...
जेंव्हा आयुष्य माझे ढळायला लागले,
तेंव्हा आयुष्य मला कळायला लागले ||

रविंद्र कामठे