Saturday 15 September 2018

“आंजर्ले - पृथ्वीवरील एक स्वर्ग/नंदनवन"





आंजर्ले - पृथ्वीवरील एक स्वर्ग/नंदनवन

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील आंजर्लेहे एक अतिशय नयनरम्य असे गावं.  अगदी ह्या पृथ्वीवरील स्वर्ग अथवा नंदनवन म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही, ह्याची प्रचीती तुम्हांला माझ्या ह्या लेखातून येईलच ह्याची मला खात्री आहे.

तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं, नारळ आणि पोफळीच्या उंचच उंच वाड्यांनी गच्च भरलेले एक अतिशय सोज्वळ, सात्विक असे गावं म्हणजेच आंजर्ले”.  ह्याला वाकडं आंजर्लेही म्हणतात, जेंव्हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस दापोलीहून वाट वाकडी करून ह्या गावाला पोहचायची तेंव्हाची गोष्ट आहे ही.  आता हर्णे बंदरा जवळील (मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेलं हेच ते बंदर) खाडीवर पूल झाल्यापासून दापोलीहून बसने थेट गावात येता येते.  आंजर्ले गावं हे कड्यावरचा गणपतीमुळे सर्वदूर प्रसिद्ध आहे.  ह्या गणपतीच्या खूप आख्यायिका आहेत आणि आंजर्ले गावाचीच काय पण येथे येणाऱ्या प्रत्येकाची ह्या गणपतीवर श्रद्धा आहे.  खूप प्रसन्न भावमुद्रा असलेली ही मूर्ती खूप मनमोहक आहे.  माझ्या पाकिटात मी ह्या गणपतीचा एक फोटाच ठेवलेला आहे. कड्यावर म्हणजे आंजर्ले गावाच्या बाजूला जो डोंगर आहे त्यावर ह्या गणपतीचे खूप सुंदर पुरातनकालीन मंदिर आहे.  ह्या डोंगराची उंची साधारण पुण्यातल्या पर्वती एवढी असेल.  आता मात्र मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे व तिथे भक्तांसाठी एक निवासस्थानही बांधण्यात आले आहे.  कड्यावरून पहिले की तीनही दिशांना म्हणजे दक्षिण, पश्चिम, उत्तरेस नजर संपेपर्यंत निळाशार अथांग समुद्र आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो.  त्यात पूर्वेस डोंगराच्या हिरव्यागार कुशीत वसलेलं छोटसं आंजर्ले हे गावं म्हणजे ह्या पृथ्वीवरील स्वर्गच नव्हे तर नंदनवनच होय.

माझ्या बायकोचे हे आजोळ.  तिच्या मामाची वाडी ह्या पृथ्वीतलावरील स्वर्गात / नंदनवनात आहे.  मामा मामी (आता देवाघरी असतात), दोन मेव्हणे, वहिन्या आणि त्यांची प्रत्येकी दोन चिल्लीपिल्ली (अर्थात जी आता खूप मोठी झाली आहेत), एक मेव्हणी जिचे २५ वर्षांपूर्वीच लग्न झालेलं.  असे छोटेखाणी खाऊन पिऊन सुखी असलेलं कुटुंब.  त्यातील लहान मेव्हणा शहरामध्ये नोकरीला असतो आणि मोठा मात्र गावातच असतो.  मी ह्या नंदनवनात गेले २५ वर्षे अगदी नित्यनेमाने जवळ जवळ दर वर्षी ३-४ दिवसांसाठी का होईना जात असतो.  आम्हीं मेव्हणीच्या लग्नाचा सोहळा मामाच्याच अंगणात पाहिला आहे आणि त्याचा मनसोक्त आनंदही लुटला आहे हो.  आंजर्ल्याला पोचण्यासाठी मी सर्व प्रकारच्या पद्धतीने प्रवास केला आहे अगदी बस, बैलगाडी, तर(होडी) दुचाकी, व चारचाकी.  पृथ्वीवरील ह्या नंदनवनाचा मी मनमुराद लाभ घेतला आहे हे माझे नशीबच.

बसचा शेवटचा थांबा जिथे आहे तिथे पाठ करून उभे राहिले की समोरच्या पाखाडीत (ह्याला पाखाडी का म्हणतात हे मला अजून समजले नाही !) मामाची वाडी आहे.  नारळ पोफळीच्या बागेने गच्च भरलेली वाडी, एखाद दुसरे आंब्याचे झाडं, फणसाचं झाडं, मिरी, जायफळ आणि खूप सारी फुलझाडे असलेली, त्यात लाल जांभाच्या दगड मातीतून, लाकडाच्या मोठ मोठ्या पटया वापरून बांधलेले दुमजली घर नव्हे ही तर मामाची माडी.  पुढे मागे भरपूर मोठे आंगण.  आत पडवी, त्यावर प्रत्येकाला हवाहवासा आणि जिव्हाळ्याचा वाटणारा लाकडी पाट वापुरून, लोखंडी सळइने जोडलेला, तीनचार धष्ट्पुष्टांचे वजन पेलू शकणारा एक झोपाळा.  पडवीच्या उजव्याबाजूला गाईंचा गोठा (ज्यात दोन गाई, अजूनही असतात), त्याच्याच थोडेसे बाजूला, त्यांच्या वैरणींचा करून ठेवलेला मुबलक साठा.  पडवीच्या जरा वरच्या बाजूला एक भली मोठी ओसरी आणि त्यात मामीची लाकडी खाट (मामी आजारी असायची तेंव्हा).  आले गेलेल्याची उठबस ह्या पडवीत आणि ओसरीत.  ओसरीच्या मागच्या बाजूला भले मोठे स्वयंपाकघर आणि जेवणाची खोली.  अर्थात येथे सगळ्यांनी जमिनीवर मांडी घालूनच पंगतीला जेवायला बसण्याची पद्धत आहे.  गेले ४-५ वर्षे झाले दूरचित्रवाणी आली आहे.  तरीही जेवायला मात्र एकत्रच बसण्याचा एकदम कडक नियमच आहे.  स्वयंपाक घराला लागूनच थोडेसे बाजूला एक भली मोठी मोरी आहे, जिथे धुणीभांडी केली जातात तसेच गेले काही वर्ष झाली बंद न्हाणीघर तसेच संडासही बांधले आहेत.  थोडेसे बाहेर मागील अंगणात एक तुळशी वृंदावन, त्याच्या बाजूलाच एक पहारी सारखं जाडजूड लोखंडी धारदार नारळ सोलण्यासाठीचं पातं (जे नेहमी पोकळ बांबूने झाकलेलं असायचं).  दहा वर्षांपूर्वी मात्र घराच्या मागच्या बाजूला असलेल्या वाडीतच सगळ्यांना परसाकडे जावे लागायचे !  हो वाडीतच नारळाचे दोन ओंडके एका खड्ड्यावर दोन बाजूला उभे टाकलेले असायचे.  त्याला नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या झापांचा आडोसा केलेला असायचा.  मागच्या ओसरीत एक बादली ठेवलेली असायची.  ती जर जागेवर नसेल तर समजायचे की कोणीतरी परसाकडे गेलेलं आहे.  आमच्या सारख्या शहरातून आलेल्या माणसांना ह्या सगळ्या गोष्टींची गंमतच वाटायची आणि पोट बिघडलं असेल तर मात्र थोडाफार ओशाळल्या सारखंही वाटायचं.  बायामाणसांची जरा अवघडल्यासारखी अवस्था व्हायची पण पर्यायही नसायचा.  असो. 

घरातली सर्व जमीन ही मातीची आणि ती आठवड्यातून दोन ते तीन वेळा गाईच्या शेणाने सारवलेली.  मी मामीला आणि दोन्ही वहिनींना, आई आपल्या लेकराच्या डोक्यावरून कसा हात फिरवेल त्या मायेने ही मातीची जमीन शेणाने सारवतांना पाहिलं आहे.  त्यामुळे ह्या जमिनीवर बसतांना बस्कर, चटई, चादर, सतरंजी घेऊच नये असे वाटायचं, इतकी ऊब ह्या जमिनीतून मिळायची.

स्वयंपाक घराच्या मागच्या बाजूला अजून एक ओसरी आहे ज्या मध्ये मामाची स्वयंपाकाची वेगळी भट्टी आहे.  ह्या भट्टीत लाडू, चिवडे, खोबऱ्याच्या वड्या, पातळ पोह्याच्या चिवडा, तळलेले फणसाचे गरे, आलेपाक, बुंदीचे लाडू, रव्याचे, बेसनाचे लाडू इत्यादी पदार्थ बनवले जात.  हा मामाचा आणि माझ्या मेव्हण्याचा जोड धंदा होय.  कारण नारळ आणि सुपारीच्या उत्पन्नावर घरखर्च चालवणे तसेही मुश्कीलच होते.  त्यात मुलांचे शिक्षण त्यांची लग्ने वगैरे तर जरा अश्यकच होते !  माझा मोठा मेव्हणा आणि वाहिनी अक्षरशः दिवसरात्र त्यांच्या संसारासाठी कसे खपतात हे आम्हीं जेंव्हा जेंव्हा सुट्टीला जायचो तेंव्हा पाहायचो.  आम्हाला खूप संकोचल्यासारखे व्हायचे.  परंतु एक वर्ष जरी आम्हीं नाही गेलो तर आम्हांला दूरध्वनी करून येण्याची गळ घालायची ही मंडळी.  इतकं प्रेम आणि जिव्हाळा ह्या कुटुंबाचा आमच्यावर. त्यामुळे त्याचं मन मोडण्याचा मला तरी धीर व्हायचा नाही आणि त्यात आंजर्ल्याला जायचे म्हणाले की बायको आणि मुलगी तर एका पायावर तयारच असायचे. असो. 

मोठा मेव्हणा हे सगळे जिन्नस तयार झाले की ते पितळेच्या डब्यांमध्ये भरायचा, सायकलला पिशवी लावायचा आणि ठरलेल्या गिऱ्हाईकाकडे पोहचवण्याचे कामाला लागायचा.  तो अगदी दूर केळशी, दापोली आडे वगैरे गावांपर्यंत हे डबे पोहचवायचा.  मी सुद्धा एक दोनदा त्याच्या बरोबर माझ्या चारचाकीतून दापोलीला गेलो होतो.  त्याचे हे कष्ट पाहिल्यावर आपण किती सुखात आणि मजेत आहोत ह्याचीच प्रचीती मला आली होती.  एक मुलगा एक मुलगी असा माझ्या दोन्ही मेव्ह्ण्यांचा चौकोनी संसार.  मोठ्याचा मुलगा देवरूखला वेदशाळेत शिकायला (जो आता खूप प्रसिद्ध गुरुजी आहे) आणि मलगी उच्च माध्यमिक शाळेत शिकत होती (जी आता लग्न होऊन मुंबईत राहते आहे).  तर लहानाच्या मुलगा मुलगी दोघेही आंजर्ल्यातच शाळेत जात होते तेंव्हा.  आता मात्र मोठ्याची दोन्ही मुले मुंबईत आपापल्या संसारात छान रमलेली आहेत.  धाकट्याच्या मुलीचे नुकतेच लग्न होऊन ती रत्नागिरीस राहते आहे आणि मुलगा चक्क लेखा परीक्षकाचे शिक्षण रत्नागिरीत घेतो आहे.  धाकट्या मेव्हण्याचे मात्र अजूनही विंचवाचे बिर्हाड पाठीवरच आहे, तो आपला मुबई, पुणे, बडोदा, अहमदाबाद, असे कामानिमित्त फिरतच असतो, पण तक्रार कसली ती नाही. असो.

कोकणाची एक खासियत अशी की, गावात जेमतेम दोन किंवा तीन मुख्य रस्ते.  अगदी तसचं आमचं हे आंजर्ले.  एका बाजूला डोंगराच्या कुशीत समुद्र किनारी वसलेलं गावं.  गावात एक शाळा, एक पोस्ट कार्यालय, एक बँक, एक पार, चावडी, तीन चार मंदिरे, एक रामाचे, एक देवीचे, एक गावं देवीचे, ग्रामपंचायत कार्यालय, एखादा दवाखाना, छोटी छोटी टपरीवजा दुकाने, एक बस थांबा, लाल मातीचे रस्ते आणि रस्त्यांच्या दुतर्फा घरे.  पुढे मोठे आंगण, कौलारू दुमजली माडी आणि मागच्या बाजूला मोठी ओसरी, त्यामागे साधारण एकर दीड एकराची नारळ पोफळीची वाडी. शेजारी शेजारी वाड्या, पण कुठेही बांधावरून वाद नाही की तंटा नाही. (म्हणजे मला तरी जाणवला नाही).  साधारण दोन तिन वाड्यांमध्ये एक गोड्या पाण्याची विहीर मात्र नक्की असणार.  हो समुद्र किनारी घर असल्यामुळे गोड्यापाण्याची विहीर किती जरुरीची असते ते तिथे राहायला गेल्यावरच कळते.  आजकाल ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची सोय केलेली दिसते.  विहिरीवर एक पंप लावलेला त्या ठरलेल्या प्रमाणे दिवसाआड वाडीला आलटून पालटून पाणी सोडण्यात येते, सगळे कसे एकदम शिस्तबद्ध.  अगदी आखीव रेखीव कार्यक्रम.  जसे काही नांदा सौख्यभरे ! घरात सदैव माणसांचा राबता असायचा.  आलेगेलेल्या प्रत्येकाचे आदरतिथ्य चालू असते.  शेजारी पाजारी तर आमच्याबरोबर जसे काही त्यांचेच पाहुणे असल्यासारखे वागतात आणि प्रत्येक भेटीत एकदा तरी आळीतील एका शेजाऱ्याकडे जेवणाचे अथवा नाश्ताचे निमंत्रण आवर्जून असणारच.  शहरांमध्ये कुठे दिसतो असा जिव्हाळा !  जाऊदेत नको तो विषय.

मामाने पंप चालू केला की आमचा विहिरीवर आंघोळ करण्याचा कार्यक्रमच ठरलेला असायचा.  आंघोळ करून आवरून झालं की स्वयंपाक घरातून वहिनीची हाक यायचीच की, चला नाश्ता तयार आहे, गरम गरम मऊभात त्यात मेतकुट घातलेलं त्यावर गाईच्या साजूक तुपाची धारच धरलेली असायची, तोंडी लावायला मिरगुंड, कैरीच्या लोणचे काय विचारूच नका.  सगळा शाही थाट असायचा.  तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असणार हे वाचून ! इतका स्वादिष्ट नाश्ता असायचा की त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे हो.  कधी कधी हातसडीचे पोहे असायचे तर कधी मस्त शिरा, उपमा असायचा.  पोटभर नाश्ता झाला की थोड्यावेळाने वाटलेच तर आपल्या शहरी सवयीनुसार एक कप चहा प्यायचा.  थोडेसे झोपाळ्यावर बसून झुलायचे, पोट गच्च झालेलं असायचं, डोळ्यावर झापड यायला लागायची, कधी कधी एखादी डुलकी लागूनही जायची तेच कळायचे नाही.  मामाची, मेव्हण्याची, वाहिनीची त्यांची आपली रोजची कामाची गडबड चालूच असायची, त्यात भरीला भर आमच्या आदरातिथ्याची असायची.  पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी आठी पडलेली नसायची.  दोघांची दोन्ही पोरं सकाळी सकाळीच शाळेत गेलेली असायची.  आम्ही मात्र तंगड्या ताणून आळशी गंगारामासारखे झोपाळ्यावर किंवा पडवीत पसरलेलो असायचो.

थोडावेळ असेच पडून राहायचे आणि मग हळूच अंगणात सायकल आहे का बघायचे.  मेव्हण्याला एकदा विचारायचे त्याला सायकल लागते आहे का, तो नाही म्हणाला की लगेचच सायकलला टांग मारून उंडारायला बाहेर पडायचे हा माझा नित्य नियम.  चांगले ५-६ किलोमीटर सायकलवरून फेरफटका मारायचा.  म्हणजे मामाच्या वाडीतून निघायचे ते थेट बंदरावर जायचे,  बंदरावर थोडासा वेळ घालवायचा, हर्णे बंदरावरून आंजर्ले गावात यायला मध्ये एक खाडी पार करायला लागायची त्यासाठी तर (म्हणजे छोट्या होड्या) असतात, अजूनही आहेत.  आम्ही सुद्धा पूर्वी कितीतरी वेळा ह्याच तरीतून आंजर्ले गावात यायचो.  आता थेट चारचाकीने मामाच्या दारात जातो एवढाच काय तो फरक ! बंदरावरून निघायचे आणि खाडीच्या कडेकडेने अगदी मामाच्या वाडीच्या मागच्या बाजूने जवळील मुरडी गावात एक फेरी मारायची.  जातांना रस्त्यामध्ये जो दिसेल त्याला नमस्कार करायचा त्यांची विचारपूस करायची, म्हणजे सायकल चालवत चालवतच (आपली लई ओळख आहे असे दाखवयाचे).  त्यातले काही नेहमी येत असल्यामुळे मला चांगले ओळखायचे. कधी आले पुण्याहून पाव्हणेअसे पाच सहाजण तरी त्यांच्या कोकणी भाषेत हेल काढून हमखास विचारायचेच.  तेवढीच आमची नसलेली कॉलर ताठ व्हायची.  फिरत फिरत सायकल शेवटी बस थांब्याजवळ आली की जरा वेळ तिथल्या पारावर विसावा घ्यायचा.  तिथे रिकामटेकड्या असलेल्या एक दोघांशी जरा टवाळक्या करायच्या, तेवढीच गंमत म्हणून.  एकंदरीत गावातील माणसांची लगबग पाहायला मिळायची.  काही कोकणी लोकं, कोळी, कातकरी दिसायचे.  काहीं कोळणींच्या डोक्यावर वैरणीचे भले मोठे हारे असायचे.  ते ह्या गावात विकायला यायचे.  त्यांचा व्यवहार (वस्तू विनिमय खरेदी विक्री) म्हणजे एका हाऱ्याला ५ नारळ आणि नारळाच्या झावळी पासून बनवलेले झाप, खराटे इत्यादी.  मी मामाला आणि मेव्हण्याला हे झाप, खराटे बनवतांना पाहिले होते त्याचे गमक मला उमगले होते.  दुपारच्या वेळेस थोडीशी शांतता असते आणि विश्रांतीची वेळ असते तेंव्हा ही मंडळी हे असले झाप वगैरे बनवण्याचे उद्योग करायचे. तेवढाच संसाराला हातभार आणि टाकाऊतूनही चार पैसे कसे करता येतील ते पहाणारी ही साधी भोळी आणि पर्यावरणाची पुरेपूर जपणूक करणारी माणसे !

माझ्या ह्या फेर फटक्यास म्हणजे गावचे उकिरडे फुंकून होईपर्यंत दुपारचे १२ वाजलेले असायचे आणि रिकामटेकडेपणामुळे सायकल चालवण्याच्या उद्योगामुळे उगाचच पोटात खड्डा पडायला लागल्याची चाहूल व्हायची आणि सायकल आपसूकच घराकडे वळायची.  तुम्हीं म्हणाल तुमचा कुटुंबकबिला बरोबर असायचा की नाही, का आपले एकटेच बाजीराव दौडायचे की काय !  कुटुंब तर बरोबर असायचे पण त्यांचे माहेरपणाचे जे काही लाड असतील ना, ते आपल्या मामी आणि वाहिनीकडून येथेच्छ पुरवून घेत, झोपाळ्यावर झुलत बसलेले असायचे.  अगदी मामा मामी देवाघरी गेल्यानंतरही ह्यांचे लाड माझ्या दोन्ही मेव्हण्यांनी आणि वहिनींनी पुरवलेत हो.  फारच नशीबवान आहे आमचं कटुंब ह्या बाबतीत.  नाही म्हणायला संध्याकाळी कड्यावर मात्र आम्ही सगळे बरोबरच जात असू.  अधून मधून बंदरावरही जात असू आम्ही सगळेजण एकत्र.  एक मात्र आहे की आंजर्ल्याचा समुद्र पोहण्यासाठी अजिबात योग्य नाही (असंही कोणाला येत एवढं पोहायला !).  पाण्यास खूप ओढ असल्यामुळे गावातील लोकं समुद्रात अजिबात जावू देत नाहीत.  दरवर्षी काही अप्रिय घटना घडत असतात त्यामुळे कुणीही जोखीम घेऊन देत नाही.  आम्हीं आपले शहाण्यासारखे बंदरावरच गुडघाभरपाण्यात पाय बुडवून वाळूतून जमेल तेवढे शंक शिंपले गोळा करायचो (म्हणजे पुण्यात परत आल्यावर बाकीच्यांना दाखवायला की आम्हीं समुद्रात खेळून आलो आहोत ते ), वाळूत मस्त पैकी किल्ले करायचे, चिटुकल्या खेकड्यांची पळापळ पहायची.  आता तर कासव महोत्सवही होत असतो आंजर्ल्यात दरवर्षी.  घरूनच आणलेला खाऊ खायचा, येथेच्छ गप्पा मारायच्या आणि दमून भागून डुलत डुलत घरी परतायचे.  एक मात्र आहे की इतक्या वर्षात मामा कडे कधीही मासे मात्र काही खायला मिळाले नाही आणि तसे कधी खावेसेही वाटले नाही, अगदी आवडत असूनही.  का कोण जाणे, पण मामा कडे सगळे शाकाहारी असल्यामुळे आणि माझी बायकोही शाकाहारी असल्यामुळे मला फारसा फरक पडला नसावा बहुधा.  असो. 

फेर फटका मारून आलो की सायकल अंगणात लावायची, सगळ्यांशी थोड्याशा गप्पाटप्पा मारायच्या, मामाला त्याच्या कामात थोडीशी मदत करायची, म्हणजे त्यांचे काम न वाढवून ठेवता थोडीशी झाडलोट वगैरे, तर कधी कधी मेव्हण्याला त्याच्या भट्टीत (बुंदीचे/रव्याचे/बेसनाचे) लाडू वळण्यास मदत करायचो. खूप मजा यायची हे सगळे करतांना.  मला झेपतील एवढीच कामे मी करायचो.  थोडासा वेळ जातो ना जोतो तोच स्वयंपाक घरातून मामीची किंवा वाहिनीची जेवायला चला सगळ्यांनी अशी आवई यायचीच.  चुलीवरची गरम गरम चपाती / भाकरी, भाजी, लसणाची आमटी, लोणचं, मिरगुंड, चवदार भात, आणि नारळाची हवी तेवढी बर्फी असा बेत त्यावर येथेच्छ ताव मारायचा आणि हातावर पाणी पडले रे पडले की लगेचच माडीवर जावून तास दोन तास ताणून द्यायची, हा माझा आंजर्ल्यात गेल्यावरचा वेळापत्रकानुसार ठरलेला बेतच असायचा.  ह्याच्या सारखे दुसरे सुख ते काही नाही हो ह्या जगात असेच वाटायचे.  मी तर अगदी स्वत:ला पेशवाच समजून वागायचो. तसाही मी आंजर्ल्याचा जावई होतो ना !

दुपारची कुंभकर्णाची वामकुक्षी उरकली आणि थोडीशी उन्हं खाली आली की आम्हांला सगळ्यांना कधी एकदा कड्यावरच्या गणपतीला जातोय असे व्हायचे.  वाहिनीने गरम गरम चहा तयारच ठेवलेला असायचा.  तो झाला की आम्हीं सगळे, जमले तर लहान मेव्हणा (जेंव्हा केंव्हा तो गावाला आलेला असेल तेंव्हा), दोन्ही मेव्ह्ण्यांची मुले असा लवाजमा कड्यावर निघायचा.  अर्थात मोठा मेव्हणा, दोन्ही वाहिन्या मात्र घरातच थांबायच्या.  त्यांच्या हाताला दम असेल तर त्या येतील ना आमच्या बरोबर हुंदडायला ! आंजर्ल्यातील आमचा मुक्काम हा कमीत कमी तीन दिवस तरी असायचाच.  ह्या तीनही दिवसांत संध्याकाळी कड्यावरच्या गणपतीस जाण्याचे वेधच लागलेले असायचे आम्हां सगळ्यांना.  त्याचे कारण कड्यावरून दिसणारा आंजर्ल्याचा तो नयनरम्य निसर्गरम्य सोहळा अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.  आजवर कितीतरी संध्याकाळी मी ह्या कड्यावर घालवल्यात हे मी विसरूच शकत नाही.  गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे.
 
कड्यावरून आपली नजर जेथपर्यंत पोहोचेल तेथ पर्यंत पाहिले तर सर्वदूर अथांग सागराचे निळेशार पाणी आणि आकाश ह्यांचे अविस्मरणीय असे मिलन दिसून येते.  तिन्हीसांजेची वेळ, सूर्यास्त होऊ घातलेला असतो, वातावरणात संध्याकाळची निरव शांतता पसरलेली असते.  आपण ह्या गर्दीतून लांब जावून मंदिराच्या पाठीमागील कड्यावर जावून विसावायचे आणि निसर्गाची ही अदभूत किमया पहायची.  सूर्य महाराजांनी आकाशात नारंगी रंगाचा भंडारा उधळायला सुरवात केलेली असते.  आपल्या हातातील छायाचित्रक (कॅमेरा) सरसावून बसायचे.  मी तर शेकडो छायाचित्रे काढली असतील आजवर ह्या जागेवरून.  परंतु निसर्गाचा हा सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पाहण्यात जी काही मजा आहे ती छायाचित्रात नाही बरका !  थोडसं अंधारून यायला लागलेलं असतं.  आपल्या डोक्यावरून असंख्य पक्षांचे थवेच्या थवे घरट्याच्या ओढीने उडत असतात.  त्यांचा तो किलकिलाट आपल्या कानाला एखाद्या संगीतकाराने रचलेल्या नादमधुर रचने सारखा भासतो आणि मन कसे प्रसन्न करून जातो.  समुद्राकडे एक नजर टाकली की क्षितिजावर सूर्यास्ताच्या नारंगी छटेमध्ये दूरवर काळे काळे ठिपके दिसू लागतात.  हो हे म्हणजे दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर परतीच्या वाटेकडे चाललेले आपले कोळी बांधव, त्यांच्या शिडाच्या होड्या हाकून किनाऱ्याच्या ओढीने येतांना दिसतात.  सूर्य अस्ताला गेल्यावर काही क्षण अगदी उदासवाणे वाटते.  पण लगेचच त्याने उधळलेली नारंगी रंगाची छटा वातावरणात एक आल्हाददायक उत्साह आणते.  असे वाटते ह्या कड्यावरून उठूच नये.  इथेच बसून रहावे.  मंद वाऱ्याची एक थंड झुळूक मन कसे हलके करते आणि आपसूकच दोन्ही कर जुळतात ते ह्या निसर्ग निर्मात्याच्या कारीगीरीवर.

गेल्या काही वर्षात दापोलीहून हर्णे बंदरामार्गे आंजर्ल्यात येण्यासाठी मुरडीच्या खाडीवर एक पूल बाधण्यात आला आहे.  त्यामुळे आता दापोली पासून ते अगदी केळशी पर्यंत सर्व गावांचा संपर्क वाढला आहे आणि पर्यटकांचीही सोय झाली आहे.  ह्या वाटेने हर्णे बंदराच्या डोंगरावरून संपूर्ण आंजर्ल्याचे निसर्गरम्य कड्यावरून पाहिलेल्या दृष्यासारखेच जसे काही भल्यामोठ्या नैसर्गिक आरशातच पहिल्या सारखे मनाला वेडं लावणारे ह्या नंदनवनाचे दर्शन होते.  अगदी तीनही बाजूचा अथांग समुद्र आणि डोंगराच्या एका कुशीत वसलेले हे छोटसं आपुलकीचं, माणूसकीच तसेच माझ्यासाठी असलेलं पृथ्वीवरील स्वर्ग / नंदनवन.

कड्यावरून सभोवताली दिसणारे आंजर्ल्यातील नारळ पोफळीच्या वाड्यांचे विहंगम दृश्य इतके मनमोहक असते की वाटते ह्या कड्यावरच आपले एक घर असावे.  दिवेलागणीची वेळ गावात सगळीकडे चुली पेटल्याची जाणीव करून देतात.  हलकासा धूर आसमंतात पसरतांना दिसू लागतो.  वरून लाल मातीचे रस्ते एखाद्या अजगराने गावाला विळखा घातल्या सारखे भासतात.  एखाद दुसरी बैलगाडी लाल मातीचा धुराळा उडवत चाललेली असते आणि आता आपल्यालाही घरी परतावे लागणार ह्याची जाणीव होते. आम्हीं सगळे जण मनात नसतांनाही परतीच्या वाटेला लागतो.  हो पण आता आलो त्या रस्त्याने नाही तर मंदिराच्या मागील बाजूच्या वाटेने उतरायला लागतो.  कारण ह्या बाजूला व्यवस्थित पायऱ्या केलेल्या आहेत तसेच जाता जाता कड्यावरील गणपतीच्या पावलाचे ठसे जिथे उमटले आहेत त्याचे दर्शन घेऊन घ्यायचे असा आमचा परिपाठ आहे.  त्याच वेळेस मामीने सांगितलेली एक आख्यायिका आठवते, की, ‘गणपती बाप्पाने एक पाय समुद्रात आणि एक पाय कड्यावर ठेवला होता व त्याच्या पावलांच्या खुणा ह्या दगडात उमटल्यात म्हणे’.  परतीच्या वाटेवर, कोणी आपली आवडती गाणी गुणगुणत तर कोणी एकमेकांशी गप्पा मारत तर कोणी आपल्याच धुंदीत पायऱ्या उतरायला लागतो.  तसा अंधुकसा प्रकाश असतो अजून, पण शेवटी आपण कोकणात आहोत त्यामुळे खाली बघून पाय उचलत चाललेले बरं म्हणून जरा धास्तावलेलेच असतो.  मामाने तशी दिलेली ताकीदच आठवते.  गावाच्या वाटेला लागलो की रामाचे मंदिर, ग्रामपंचायत, बँक ऑफ बडोदा आणि प्राथमिक शाळा आली की समजायचे की आपण आता घराच्या जवळ पोहोचलो आहोत.

ह्या वाटेला लागले की घराचे वेध लागलेले असतात.  कड्यावरून उतरेपर्यंत संध्याकाळचे ७ वाजलेले असतात.  दोन्ही मेव्हणे-वहिन्या आमची वाट पाहत अंगणात भली मोठी सतरंजी अंथरून निवांत गप्पा मारत बसलेले दिसतात.  त्यांना असे निवांत पाहून माझ्या मनाला एक सुखद धक्काच बसतो, पण छान वाटतं.  त्यांनी आमच्या साठी मस्त पैकी सुक्या भेळीचा कार्यक्रम आखलेला असतो.  एखाद दिवस कधी बटाटेवडा तर कधी भजी तर कधी पावभाजी असाही बेत असतो.  काही विचारू नका.  आमची एवढी बडदास्त ही मंडळी ठेवतात की काही विचारू नका.  कुठून आणतात एवढी माया, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे वेळ, ही माणसे, हेच मला कळत नाही.  मला काही ह्या प्रश्नाचे उत्तर आजवर २५ वर्षात एकदाही मिळाले नाही आणि ते मी शोधण्याचा प्रयत्नही करू नये असेच मला वाटते.  आहोरात्र कष्ट करणारी ही माणसे, पण त्यांच्या चेहऱ्यावर एकही आठी मी कधी पहिली नाही, की त्यांना कधी चिडचिड अथवा रागराग करतांना पहिले नाही.  पहाटे चार साडेचार पासून ते रात्री नऊ साडेनऊ पर्यंत त्यांचे हातपाय अखंड चालूच असतात.  दुपारी तासभर जी काय ती विश्रांती घेत असतील तेव्हढीच, ते सुद्धा पाठ जमिनीवर टेकायची म्हणून, बाकी काम, काम आणि काम.  ह्याची प्रचीती मला अनेक वेळा आलेली आहे.  सहज एक गंमत सांगतो.  मामी असतांनाची गोष्ट आहे.  तीनचार दिवस राहून आम्ही उद्या सकाळी परत निघणार होतो.  मामीचे सारखे चालले होते अजून एक दिवस थांबा, गाय विणार आहे, छान ताजा ताजा खरवस खाऊनच जा.  मामीच्या आग्रहाखातर आम्ही एक दिवस मुक्काम वाढवला.  आम्ही सगळे ओसरीवर गाढ झोपेत होतो.  मामा मामी, दोन्ही मेव्हणे आणि वाहिन्यांची चाललेली लगबग आमच्या गावीपण नव्हती आणि अचानक रात्री अडीच तीन वाजता गोठ्यात धप्प असा आवाज झाला.  आम्हांला जाग आली तेंव्हा कळले की गाईने एका गोंडस वासराला जन्म दिला आहे.  मग काय दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्यासाठी ताजा ताजा खरवस तयार.  मामीची मला खरवस खायला घालायची इच्छा पूर्ण झाली आणि माझी तो खाण्याची हौस फिटली.  ह्या खरवसाची मामीच्या हाताची, तिच्या मायेची, चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे असे वाटते.  अजूनतरी मी असा खरवस माझ्या आजवरच्या आयष्यात खाल्ला असेल असे वाटत नाही.

आंजर्ल्याशी गेल्या २५ वर्षातील खूप आठवणी माझ्या स्मृती पटलावर अगदी ताज्या आहेत.  त्या जर लिहायचे झाले तर एक छान कादंबरीच तयार होईल असे वाटते.  बघुयात पुढे मागे हा योग जर जुळून आला तर नक्कीच तसा प्रयत्न करेन म्हणतो.  हे ही नसे थोडके असेच वाटेल मला. 

आंजर्ल्यातच एक मात्र आहे की उदरनिर्वाहनाचे फारसे साधन उपलब्ध नसल्यामुळे आणि उत्पन्नाच्या मर्यादेमुळे घरातील एका तरी व्यक्तीस अथवा कुटुंबास मुबई पुणे अशा शहरांमध्ये राहावे लागते.  तिथेही ही माणसे कष्ट करून आपला संसार अतिशय गुण्यागोविंदाने करतात ह्यातच सगळे आले. परंतु आयुष्याच्या सरते शेवटी त्यांना त्यांचे हे गावं मात्र परत खेचून आपल्या भूमीत घेऊन येते ही मात्र इथल्या मातीची, वाडीची किमयाच आहे.

अताशा मलाही असे वाटायला लागले आहे की निवृत्तीनंतर मेव्हण्याला सांगून आंजर्ल्यातच दोन खोल्या भाड्याने (विकत घेणे शक्य नाही) घेऊन राहावे म्हणजे उर्वरित आयुष्य तरी ह्या शहरी वातावरणाच्या धकाधकीपासून दूर, तणावरहित आणि शांत जाईल व सुखासुखी ह्या पृथ्वीवरील स्वर्गाचा/नंदनवनाचा म्हणावा तसा आनंद लुटता येईल.  भरपूर वाचायला वेळ मिळेल.  मनात आले की कड्यावर जायला मिळेल, खूप खूप लिहिता येईल आणि स्वास्थ्यही उत्तम राहील अशी एक आशा मनात उत्पन्न झाली ह्याचेच नवल वाटते आणि गेल्या २५-३० वर्षांची आंजर्ल्याशी जोडलेली माझी ही नाळच असावी असेही वाटते. 

समुद्राच्या पाण्यातील खारटपणा ह्या कोकणातील माणसांच्या स्वभावात काय पण वागण्यातही दुरान्वये दिसून येत नाही.  उलट भर समुद्रात गोड्या पाण्याचे तळे असावे असे ही माणसे !  ह्या सगळ्या पापभिरू माणसांच्या माणुसकीमुळेच त्यांनी ह्या मतलबी, स्वार्थी, पातळधुंडी, मत्सरी, पापी, माणसांच्या भाऊगर्दीतही ह्या पृथ्वीतलावर एक स्वर्ग / नंदनवन साकारले आहे असे वाटते.   ह्या माझ्या जिवाभावाच्या लोकांना तितक्याच प्रेमाने, मायेने, जिव्हाळ्याने, मला साष्टांग दंडवत करावासा वाटतो म्हणून हा लेख प्रपंच.

रविंद्र कामठे.
पुणे