Wednesday 16 September 2020

कवितेचं गाणं होतांना.. एक अनुभव ! ‘आईचा मान कधी देवाला नाही’

!! श्री !!

कवितेचं गाणं होतांना.. एक अनुभव !

‘आईचा मान कधी देवाला नाही’

https://youtu.be/d0xX50vL0NI


नमस्कार मंडळी,

आज मला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ह्या कवितेचे गाणं झालंय म्हणून खूप खूप आनंद होत आहे. आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय ही आपली ‘आई’ असते आणि म्हणूनच जगभरातील मातृशक्तीला माझे हे गीत मी आज समर्पित करून ‘आई’प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.  तिचे उपकार तर ह्या जन्मीच काय; पण कधीच फेडता येणार नाहीत !  त्यामुळे तिच्या ऋणात राहणेच जास्त योग्य आहे असे मला वाटलं; म्हणून ‘मातृशक्ती’ला माझी ही ‘गीतांजली’ समर्पित करतो आहे.

माझ्या ह्या कवितेचे गाणे होणे म्हणजे एक फार मोठी कहाणी आहे. कोण कुठला महाडचा एक तरुण संगीतकार श्री. चेतन संजय सावंत, मला पंधरा दिवसांपूर्वी रात्री ११.३० वाजता फोन करतो आणि सांगतो की; ‘सर, मी तुमच्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील मलपृष्ठावरील कवितेला चाल लावली आहे. कृपया ती जरा ऐकाल का’ ?.  खरं तर मी झोपायच्या तयारीत होतो. त्यात हा अनोळखी फोन ! मी थोडीशी टाळाटाळ करायचा प्रयत्न करणार होतो, पण चेतनचा निग्रह मला माझ्याच कवितेची चाल ऐकण्यासाठी उद्युक्त करत होता. त्याने फार आढेवेढे न घेता सरळ माझी कविता हळूच गुणगुणायला सुरवातच केली आणि मी एकदम भारावून गेलो.

बरोबर दीड दोन वर्षापूर्वी, मी हीच चाल आमच्या सोसायटीत नवीन राहायला आलेल्या एका शेजाऱ्यांच्या कडून ऐकली होती. म्हणजे; ते एक पिक्चर काढणार होते व त्यात त्यांना माझी ही कविता खूप आवडली म्हणून तिचे ते गाणे करून चित्रपटात घेणार होते. त्यांनी माझ्याकडून “प्रांजळ” हा माझा काव्यसंग्रह त्यासाठी नेलाही होता व पंधराएक दिवसांत माझ्या कवितेला चाल लावून मला ऐकवलीही होती. ती ही दीड दोन वर्षापूर्वी अशीच मध्यरात्री.  त्यामुळे ती चाल माझ्या एकदम पक्की डोक्यात बसलेली होती.  नेमकी तीच चाल, आज पुन्हा एकदा चेतनने ऐकवली आणि मी एकदम भानावर आलो व त्याला विचारले की; “ही चाल मी या आधी ऐकलेली आहे.  हा आवाज मला आठवतो आहे.  कोणाचा आहे हा आवाज” ? माझ्या प्रश्नांची सरबत्ती चेतनवर सुरूच होती.  तो पुरता गांगरून गेला होता.  मला म्हणाला की; “सर, हा आवाज माझाच आहे, मी एक उभरता संगीतकार आहे.  महाडला असतो.  माझी आजवर पाच सहा गाणी रिलीज झाली आहेत !  केतकी माटेगावकर, आर्या आंबेकर, सावनी रविंद्र, शरयू दाते, स्वप्नील बांदोडकर आणि संदीप उबाळे यांनी माझी गाणी गायली आहेत. तुम्ही हवे तर माझा प्रोफाईल बघू शकता.  मागच्या वर्षी मला एका चित्रपट निर्मात्याने ह्या गाण्याविषयी विचारले होते. माझ्याकडून तातडीने चाल लावूनही घेतली होती.  पुढे नंतर काय झाले काय माहित, पण व्यवहारात न बसल्यामुळे ते प्रकरण फार पुढे गेले नाही.  मी ही त्यावेळेस नाद सोडून दिला होता.”

“परंतु, सर, तुमची ही जी कविता आहे ना ती ‘आई’वर असल्यामुळे मला ती स्वस्थ बसू देत नव्हती. त्यात मला तुम्हाला संपर्क कसा करावा हेच सुचत नव्हते. कारण मला जेव्हा कविता दिली होती, तेव्हा तुमच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील कवितेच्या फक्त शब्दांचा फोटो काढून पाठवण्यात आला होता.  त्यात तुमचे नाव कुठेही नव्हते.  त्यामुळे मला तुमचा शोध घ्यायला जरा वेळ लागला”. 

चेतन हे सांगत होता आणि मी त्याचे हे प्रामाणिक बोलणे डोळे बंद करून ऐकत होतो. शेवटी त्याने मला जे सांगतिले ते ऐकून तर मी उडालोच.  त्याने व त्याच्या मयूर कुंडेकर ह्या मित्राने (जे दोघे मिळून कविता आणि गाणी असा एक कार्यक्रम सादर करतात) गुगलवर जाऊन माझ्या कवितेच्या शब्दांवरून मला फेसबुकवर गाठले व त्यानंतर मला मेसेंजर द्वारे निरोप देऊन माझ्याशी प्रत्यक्ष बोलणे केले.  चेतनच्या ह्या जिद्दीला मला खरोखर सलाम करावासा वाटला.  त्याची माझ्या ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ह्या कवितेबद्दलची तळमळ, तिला चालबद्ध करण्याची धडपड मला खूपच भावली. आम्ही जवळजवळ तासभर ह्या विषयावर बोलत होतो.

बोलता बोलता मी माझ्याच एक दोन कविता त्याला ऐकवल्या.  त्यात ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ही कविताही होती. ती ऐकल्यावर तो एकदम खूशच झाला. मी माझ्या ह्या कवितेमधील प्रत्यके शब्दाचा अर्थ जेंव्हा त्याला समजावून सांगत होतो व मला अपेक्षित असलेला सामाजिक संदेश जो की “आई वडिलांची वृद्धापकाळात सेवा, सुश्रुषा करा, त्यांना अंतर देवू नका, त्यांच्याशी प्रेमाने वागा व त्यांना जपा, कारण मंदिरात देव नसून तो आपल्या आईच्या चरणी आहे हे लक्षात घ्या’.  असे सांगत असतांना चेतन खूप भावूक झालेला मला जाणवत होते आणि तो ही मला मध्ये मध्ये थांबवून माझ्या ह्या कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा गाऊन दाखवत होता व मला अपेक्षित असलेला अर्थ त्याच्या चालीतून कसा प्रतिध्वनित होतोय ते मला पटवून देत होता. अर्थात मलाही, त्याने लावलेली चाल प्रथमदर्शनीच पटलेली होती, ते ही एक वर्षापूर्वीच !

आमचे हे सगळे बोलणे रात्रीच्या १२.३० वाजता चाललेलं होतं.  सगळीकडे शांतता असल्यामुळे माझा आवाज जरा जास्तच येत होता. तरीच एकदा बायको (वंदना) वरच्या मजल्यावरून खाली येऊन सांगूनही गेली होती की; “जरा हळू बोल ! खूप रात्र झाली आहे” ! पण त्याचं काय आहे, आम्ही दोघेही म्हणजे मी आणि चेतन कवितेचे गाणं होतंय ह्या आनंदात सगळे काही विसरून गेलेलो होतो.

एक सांगतो चेतनने पायलट संगीत म्हणून गाण्याचा जो काही प्रयोग मला ऐकवला होता तोच मुळी खूप श्रवणीय होता.  न राहवून मी त्या चालीच्या प्रेमात पडलो व त्याला आपण हे गाणे रेकॉर्ड करूयात असे आश्वासन दिले.  हो पण चेतन पूर्ण तयारीनिशी माझ्याशी बोलत होता.  त्याने मला सांगून टाकले की; “मला हे गाणे कुठल्याही परिस्थितीत करायचेच आहे, त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. मला माहिती आहे की तुमच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून तुम्हीं ही कविता यूट्यूबवर ऐकवलीही आहे.  कृपया नाही म्हणू नका” ! एक सांगतो चेतनच्या ह्या आग्रहाला नकार देण्याची माझ्यात तरी हिंमत नव्हती.  त्यात ‘आई’ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी चक्क व्यवहाराच्या गोष्टींवरच आलो.

माझे चेतनला एकच सांगणे होते की, कवितेला चाल तर अप्रतिम लागली आहे, फक्त गायक मात्र त्या तोडीचा हवा. थोडासा खर्च झाला तरी चालेल.  माझे हे बोलणे ऐकून तर चेतन चाटच पडला.  त्याने लगेचच सध्याचे तरुण व सुप्रसिध्द गायक श्री. संदीप उबाळे, जे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ह्या मालिकेच्या शीर्षक गीताचे पार्श्वगायक आहेत, त्यांचेच नाव सुचवले व उद्या सकाळी तुम्हाला काय ते सांगतो म्हणाला.  मला दोन सेकंद काय बोलावे हेच सुचले नाही.  मी त्याला एकंदरीत ह्या सगळ्याला किती खर्च येईल ते सांग म्हणालो ! तर त्याचे गणित तयारच होते; “गायकाचे अमुक अमुक, रेकॉर्डिंग स्टुडिओचे तमुक तमुक व संगीत संयोजकांचे इतके होतील, आणि मला म्हणजे त्याला स्वत:ला काहीच नको, फक्त महाड ते पुणे व परतीचा प्रवास खर्च द्या, कारण हे गाणे व्हावे एवढेच माझे उद्दिष्ट आहे”.  “काका तुम्हीं जर का एवढा खर्च करून हे गाणे रेकॉर्ड करायला तयार असाल तर मला खरच काही नको. मला त्यातच सर्व काही मिळाले.”  मी त्याच्या ह्या बोलण्यावर तर एकदम भाळून गेलो.  त्याचे म्हणणे होते की सर, “हे गाणे जेंव्हा यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांवर रिलीज होईल तेंव्हा ते दंगा करेल, रसिकांना खूप भावेल ह्याची मला खात्री आहे. तेच माझ्यासाठी व माझ्या उर्वरित कारकिर्दीसाठी खूप आहे.  ‘आई’चा आशीर्वाद हवाय बस, बाकी काही नको”.  मी तर चेतनच्या ह्या बोलण्याने अवाकच झालो होतो. शेवटी माझ्या ह्या लाडक्या कवितेचे गाणे होणार होते हे माझ्यासाठी खूप होते.  माझ्या ‘आई’ला हीच काय ती श्रद्धांजली होती ह्या भावनेत मी त्या रात्री सुखाने झोपी गेलो.

दुसरा दिवस उजाडला तेच मुळी चेतनच्या फोनने.  त्याने संदीप उबाळे सरांची गाण्यासाठीची मान्यता मिळवली होती. त्यांना पायलट गाणे पाठवलेही होते व रेकॉर्डिंग साठीचा दिवस आणि वेळ दोन्ही घेतलेही होते. कर्वेनगर येथील पंचम स्टुडिओ संदीप सरांच्या ओळखीचा असल्यामुळे त्यांच्या सोयीची रेकॉर्डिंगची तारीखही ठरली होती.  हे सगळे इतके अनपेक्षित पण सुखदायक होते की माझे मलाच कळत नव्हते काय चालले आहे ते ! मनातल्या मनात मी म्हटले की; “हाच काय तो ‘आई’चा आशीर्वाद असेल म्हणूनच तर सगळे योगायोग कसे फटाफट जुळून आले होते”. 

माझी तब्बेत फारशी बरी नसल्यामुळे मी गेले काही दिवस थोडासा नरम होतो. पण माझ्या ह्या कवितेचे गाणे होते आहे हे ऐकून माझे दुखणे कुठच्या कुठे पळून गेले होते.

शुभकार्याला उशीर नको म्हुणुन, सगळे सोपस्कर पूर्ण करून झाले. मंगळावर ८ सप्टेंबरला पंचम स्टुडिओत हे गाणे रेकॉर्डही झाली.  संदीप उबाळे सरांचा त्यादिवशी टिपेला गेलेला तो सुमधुर व अत्यंत श्रवणीय असा आवाज अजूनही माझ्या कानात गुंजतो आहे.  जवळ जवळ ४ तास हे रेकॉर्डिंग चालू होते. त्यात स्टुडिओतील श्री. श्रेयस दांडेकर ह्या रेकॉर्डीग कलाकाराची कलाकुसर पाहून तर डोळ्याचं पारणं फिटलं होतं.  चेतन सारख्या तरुण संगीतकाराकडून त्याला हव्या असेलेल्या सर्व ताना, जागा, आलाप, हरकती, गाण्याची चाल इत्यादी आपल्या गळ्यातून उतरवून देतांना संदीपदादा कुठेही तसूभरही कमी पडू देत नव्हते.  “एकदा नव्हे शंभर वेळा गाईन पण तुला जे हवे आहे तेच आले पाहिजे व मला रुचले पाहिजे”; हा त्यांचा अट्टाहास त्यांची कलेप्रतीची श्रद्धा दाखवत होता. मी तर हे सगळे एका खुर्चीत बसून ऐकत होतो. निश:बद्ध झालो होतो.  माझ्या आयुष्यातील पहिलाच अनुभव होता हा ! एकप्रकारची समाधीच लागली होती माझी, स्टुडिओत.  तरीही एकदोन वेळा संदीपदादा मला म्हणाले की; “कामठेसर तुमच्या कवितेला व त्यामधील भावनांना योग्य तो न्याय देतोय ना ! तुम्हांला जर काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सुचवा” ! त्यांच्या ह्या सौजन्याने मी तर वेडाच झालो होतो.  त्यांना व चेतनला सांगितले की; “तुमचे अगदी बरोबर चालले आहे.  मला जे काही भाव अपेक्षित आहेत ते व जे काही समाज प्रबोधन करायचे आहे ते तुम्हीं तुमच्या गळ्यातून आणि चेतनने त्याच्या संगीतातून अतिशय योग्य पद्धतीने माडले आहे’.

मी एका गोष्टीमुळे अचंबित झालो होतो की, चेतन तसा नवोदित संगीतकार आहे व संदीपदादा तसे बरेच मुरलेले कलाकार आहेत. तरी ते एक संगीतकार ह्या नात्याने चेतनने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत होते. माझ्यासाठी हा एक नवा आणि फार मोठा व खूप काही घेण्यासारखा असा अनुभव होता.

रेकॉर्डिंग अप्रतिम झाले, होते. त्यानंतर मुंबईचे श्री. संतोष सहदेव मोहिते सरांनी ह्या पायलट गाण्यावर आणि संदीपदादांनी गायलेल्या गाण्यावर दोन तीन दिवसांत अतिशय उत्तम असे संस्कार करून त्यावर जो काही साज शृंगार चढवला आहे तो ऐकल्यावर तर कान तृप्त झाले होते.  शेवटी शेवटी तर माझे डोळे इतके डबडबले होते की मला समोरचे काहीच दिसत नव्हते.

हे सगळे झाल्यावर श्री. जयेश पंडित ह्या मित्राने हे सगळे रेकॉर्डिंग एका दृकश्राव्य ध्वनिचित्रफीतीत समावून घेण्यासाठी मला खूप मोलाची मदत केली.  त्यासाठी त्याच्या वडिलांनी व माझ्या राहुल गोडबोले ह्या मित्राने माझ्या कवितेतील भावनांवर आधारित अशी काही रेखाचित्रे चितारून आमच्या ह्या ध्वनिचित्रफीतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे हे मात्र नक्की.

माझ्या ह्या कवितेच्या प्रवासातून ते तिचे गाणे होईपर्यंतच्या प्रवासात मला चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री. घनश्याम पाटील सरांचीशुरयोद्ध वीर येसाजी कामठे प्रतिष्ठानची खूप मोलाची साथ लाभली आहे, त्यासाठी त्यांचे आभार. माझी बायको वंदना, मुलगी पूर्वा आणि जावई मयुरेशसृजय advertizingच्या जयेश पंडितची ओळख व भेट घडवून देण्यासाठी अमित बाचल ह्या मित्राची खूप मदत झाली आहे. गायक श्री. संदीप उबाळे, संगीत दिग्दर्शक श्री. चेतन संजय सावंत, संगीत संयोजक श्री. संतोष सहदेव मोहिते, रेकॉर्डिंग कलाकार श्री. श्रेयस दांडेकर, दृकश्राव्य कलाकर श्री.जयेश पंडीत यांचे मन:पूर्वक खूप आभार. जयेशचे वडील चित्रकार श्री. बाळकृष्ण पंडीत सरांचे आणि माझा चित्रकार मित्र श्री. राहुल गोडबोले यांचे त्यांनी माझ्या ह्या कवितेसाठी काढलेल्या तितक्याच बोलक्या व भावनात्मक चित्रकलेसाठी आभार नव्हे तर त्यांना साष्टांग दंडवत आहे. अजून एक घराचाच चित्रकार आहे तो म्हणजे आजीचा लाडका नातू व माझा पुतण्या कु. सुश्रुत किशोर कामठे ह्याने काढलेले आजीचे अप्रतिम असे चित्र. त्याच्या कलेचे कौतुक आजी तर नेहमीच करायची. त्याने आजीला चित्ररूपी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचे खूप कौतुक.

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या माझ्या ह्या प्रयोगाला खूप जणांनी बहुमूल्य योगदान दिले आहे त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त न करता त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो

मंडळी ही तर सुरवात आहे असे मला बरेचजण सांगत होते.  माझ्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमापोटी व माझ्याप्रती त्यांच्या असेलेल्या भावनेने मी मात्र पुरता हळवा झालो होतो. माझे मन मला सांगत होते की तू हे जे काही केलेस ते आजवरच्या तुझ्या आयुष्यात केलेली सर्वोत्तम कृती आहे.  बघा ना ! एखाद्या गोष्टीचा योग जुळून यावा लागतो. २०१७ साली प्रकाशित झालेला “प्रांजळ” हा माझा काव्यसंग्रह. त्यामधील ह्या एका कवितेचे गाणे व्हायला आज साडेतीन वर्षे लागलीत ! पण योग जुळून आल्यावर अक्षरश: साडेतीन दिवसांत ते शक्यही झाले, हे ही तितकेच आश्चर्यकारक आहे की नाही !

अतिशय नम्रपणे एक मात्र नक्की सांगतो की, ही जे काही घडते आहे, त्यात माझे काहीच श्रेय नाही. जे काही असेल ते नियतीचे किंवा कुठल्यातरी अदभूत शक्तीचे आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे.

स्वेच्छा निवृत्तीनंतरचा हा माझा पहिलाच प्रयोग आहे. अजून बरचं काही करायचं योजलं आहे ! बघू तब्बेतीच्या आणि नियतीच्या मनात काय काय आहे ते !

https://youtu.be/QRgZJfo5Lrc  

रविंद्र कामठे, पुणे

https://youtu.be/QRgZJfo5Lrc


https://youtu.be/d0xX50vL0NI





Saturday 29 August 2020

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र... हा माझ्यावरील घनश्याम पाटील सरांनी लिहिलेला लेख

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र... 

हा माझ्यावरील चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री. घनश्याम पाटील सरांनी लिहिलेला लेख एकदा तरी जरूर वाचा. माझ्या व्यक्तिमत्वाचा इतका सुंदर आणि प्रगल्भ धांडोळा मला स्वत:लाही घेता आला नसता. म्हणूनच तर तो पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग वरून सगळ्यांपर्यंत पोहचवण्यावाचून मला राहवले नाही...

https://chaprak.com/2020/08/sachchai-aani-achchai-japnare-mitr/ via @echaprak

रसिकहो, 

गेल्या चार वर्षात घनश्याम पाटील ह्या धुरंधर व्यक्तिमत्वाची माझी ओळख होते काय आणि माझा कायापालट होतो काय; हा सगळा नियतीचा खेळच म्हणायला हवा.  ह्या माणसाने माझ्यातल्या साहित्यिकाला ओळखून त्याला नुसतेच लिहायला नाही लावले तर माझे हे लिखाण प्रसिद्ध केले व मला ह्या क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख करून दिली आहे हे मात्र नक्की.  त्यामुळेच मी माझ्या शारीरिक व्याधींना विसरून २०१९ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली ती केवळ 'चपराक प्रकाशन' व अर्थात घनश्याम पाटील माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणूनच. मी आयुष्यात खूप काही गमावले आहे, पण आयुष्याच्या शेवटाच्या टप्प्यावर घनश्याम पाटील सरांसारखा मित्र लाभणे म्हणजे नियतीची माझ्यावर कृपाचा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काहीतरी पुण्य मी ह्याच जन्मी नक्कीच केले असेल म्हणून तर आज त्यांनी माझे हे असे केलेले कौतुक वाचतांना डोळे पाणावतात, मन भावनेने काठोकाठ भरून येते, भावना उचंबळून वाहतात आणि म्हणतात..

आभाळाची मैत्री जशी धरणीशी,
नाळ ही अशीच जुळते मैत्रीची ||







पुढती पुढती पुढती… सदैव होईजे प्रगती!

ही गोष्ट आहे ऑक्टोबर 2016 ची. ‘चपराक’ दिवाळी अंकाचं काम संपवून पुढच्या साहित्य महोत्सवाच्या तयारीत व्यग्र होतो. ‘चपराक’चं कार्यालय तेव्हा शुक्रवार पेठेतील छत्रपती शाहू चौकात होतं. महोत्सवात ज्यांची पुस्तकं प्रकाशित करणार असं जाहीर केलं होतं त्या लेखकांची तिथं दिवसरात्र गजबज असायची. आमच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची इतकी ये-जा असते की जणू हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख साहित्यिक, सांस्कृतिक केंद्रच असावं. एक पुस्तक छपाईला द्यायचं म्हणून त्यावर शेवटची नजर टाकत होतो आणि फोन वाजला.

समोरून त्यांनी सांगितलं, ‘‘मी रवींद्र कामठे बोलतोय. तुमचा नियमित वाचक आहे. तुम्हाला भेटायचंय…’’

माझ्या भेटीसाठी कुणी ताटकळत रहावं इतका काही मी मोठा नाही. मात्र त्यावेळी ‘चपराक साहित्य महोत्सवा’ची तयारी अंतिम टप्प्यात असल्यानं मी त्यांना भेटीचं प्रयोजन विचारलं. त्यांनी सांगितलं की ‘‘मला माझा कवितासंग्रह तुमच्याकडून प्रकाशित करायचाय!’’

मी त्यांना म्हणालो, ‘‘अहो, मुलगी अजून काळी की गोरी हेही मी बघितलं नाही आणि तुम्ही लग्न ठरवताय! प्रकाशक मी आहे. त्यामुळे तुम्ही कवितासंग्रह आमच्याकडून ‘प्रकाशित करायचाय’ असं माझ्या वतीनं जाहीर करू नका! आधी तुमच्या कविता घेऊन माझ्याकडं या! त्या मला आणि माझ्या सहकार्‍यांना वाचू द्या! आवडल्या तर पुढचं ठरवू!!’’

नेहमीच्या कामात व्यत्यय नको म्हणून मी त्यांना रविवारी भेटायला बोलावलं.

त्यांना जी वेळ दिली होती त्या वेळेच्या बरोब्बर पाच मिनिटं आधी ते कार्यालयात हजर झाले. ओळखपरेड झाल्यावर त्यांनी त्यांच्या कवितासंग्रहाची संहिता माझ्याकडं दिली आणि ती पाहताक्षणीच मी जाम भडकलो.

त्यांनी त्यांच्या सर्व कविता व्यवस्थित टंकलिखित करून, त्याचं एक व्यवस्थित पुस्तक करून आणलं होतं. त्यावर पहिल्याच पानावर ‘चपराक’चा लोगो होता. आत प्रकाशक म्हणून माझं नाव, पत्ता असं सारं काही सांग्रसंगीत होतं.

मी त्यांना विचारलं, ‘‘अजून मी कविता वाचल्या नाहीत, आपली ही पहिलीच भेट आहे. तुम्हाला मी कविता घेऊन बोलावलं होतं पण यावर माझं नाव, पत्ता, लोगो वापरण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?’’

ते थोडे गांगरले. त्यांनी सांगितलं, ‘‘सर मी ज्या कंपनीत काम करतो तिथं प्रेझेन्टेशनला महत्त्व असतं. त्यामुळं सवयीचा भाग म्हणून माझ्याकडून हे झालं.’’

दरमहा एक ते दीड कोटी रूपयांची उलाढाल करणारा हा माणूस इतका नम्र आहे हे पाहून माझा राग निवळला. मी त्यांना ‘‘कविता वाचून कळवतो,’’ असं सांगितलं.

त्यांचा ‘प्रांजळ’ हा कवितासंग्रह ‘चपराक’कडून प्रकाशित करायचं ठरलं आणि आमच्या भेटीगाठी वाढल्या. मनानं अतिशय निर्मळ, नितळ असलेली अशी माणसं आजकाल कमी आहेत. आमची दोघांची गट्टी जमली आणि लक्षात आलं की उद्योगक्षेत्रात कार्यरत असल्यानं आपल्या दृष्टिनं जे काही दुर्गुण आहेत ते सगळे या माणसात ठासून भरलेत. मद्यपान, धुम्रपान यामुळं हा माणूस पोखरला गेलाय. त्यांचे आधीचे प्रकाशक होते त्यांनी यांच्या लेखनाकडं कधी लक्षच दिलं नव्हतं. फोन केला की मद्यालयात बसायचं, रात्री जागवायच्या, यांनी प्रकाशकांचे सगळे लाड पुरवायचे आणि पुस्तकं प्रकाशित करायची असा सगळा मामला… बरं हा माणूस इतका प्रांजळ की अशा सगळ्या उचापल्या ते स्वतःच सांगायचे.

‘चपराक’मध्ये एकही सदस्य व्यसनी नाही याचं त्यांना अप्रूप वाटायचं. मग त्यांनी त्यांचं व्यसन आटोक्यात आणायचं ठरवलं. डोंबिवलीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात मी सहभागी होतो याचा माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त आनंद झालेला. त्यांनी आदेश सोडला, ‘‘माझ्या गाडीतून आपण डोंबिवलीला जायचं. आपण सगळ्यांनी एकत्र थांबायचं.’’

त्या संमेलनातील ग्रंथदालनात त्यांनी सगळ्या प्रकारची मदत केली. त्यांनी आणि त्यांची मुलगी पूर्वाताई, जावई मयूरेशदा या सगळ्यांनी आमच्यासह अक्षरशः पुस्तकांचे गठ्ठे उचलले. ‘चपराक’चा बॅनर लावण्या-काढण्यापासून ते ग्रंथ दालनातील विक्रीकेंद्रात बसण्यापर्यंत सगळ्या प्रकारची मदत त्यांनी केली. आपण कुणीतरी वेगळे आहोत, मोठ्या पदावर काम करतोय अशी हवा त्यांच्या डोक्यात सुरूवातीपासून कधीच नाही. किंबहुना त्यांच्या घरातील सर्वच सदस्य अतिशय प्रेमळ, सहकार्यशील आणि उत्साही आहेत. अल्पावधीतच त्यांचा ‘चपराक’च्या प्रत्येक उपक्रमातला, निर्णयातला सहभाग वाढला. इतका की, एकेकाळी न विचारता लोगो वापरला म्हणून त्यांच्यावर रागवणारा मी… मीच त्यांना ‘चपराक’च्या नव्या लोगोबाबतच्या सूचना विचारल्या. त्या अंमलातही आणल्या. त्यांचे पुस्तक करायचे की नाही म्हणून कधीकाळी संहिता ठेवून घेतल्या होत्या. आता ‘चपराक’कडे येणारी पुस्तके प्रकाशित करायची की नाही? याच्या निर्णयप्रक्रियेतही ते सहभागी असतात. हे सगळं घडलं ते त्यांच्या स्वभावतील सच्चाई आणि अच्छाईमुळं.

हा माणूस इतका प्रामाणिक आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यात मद्यपान आणि धुम्रपानावर तब्बल 43 लाख रूपये खर्च केलेत हे त्यांनी मला पुराव्यासह दाखवून दिलं. फक्त दाखवून थांबतील तर ते रवींद्र कामठे कसले? त्यांनी त्यावर ‘चपराक’मध्ये एक लेख लिहिला आणि या व्यसनामुळे आरोग्याची कशी हेळसांड झाली हे अनुभवही मोकळेपणाने लिहिले. मनाशी ठाम निर्धार करून इतक्या वर्षांचं व्यसन एका क्षणात सोडलं. 2017 पासून त्यांनी कधीही दारूला किंवा सिगारेटला हात लावला नाही. एकदम व्यसन सोडल्यानं त्यांना त्याचा त्रासही प्रचंड झाला पण मोठ्या निश्‍चयानं आणि धीरोदात्तपणे ते त्यांच्या निर्णयावर अढळ राहिले.

अपेक्षेप्रमाणं त्यांच्या तब्येतीवर याचा परिणाम झाला होता आणि त्यातच त्यांची अँजिओप्लास्टी झाली. मग मात्र त्यांनी त्यांच्या सगळ्या सवयी बदलल्या. योग्य व्यायाम, आहार याकडं जाणीवपूर्वक लक्ष दिलं. आवडीच्या क्षेत्रात मन रमवलं. वाचन वाढवलं. समाजमाध्यमावरचा सहभाग वाढवला. ‘चपराक’ परिवाराचे तर ते अविभाज्य घटक बनले. यातून त्यांना कसली प्राप्ती होत असेल तर ती फक्त आत्मानंदाची! तरीही त्यांनी धाडसानं आम्हाला साथ दिली. इतकंच कशाला! त्यांची गलेलठ्ठ पगाराची नोकरी असताना केवळ साहित्यसेवा करता यावी म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. कुणालाही आश्‍चर्य वाटावं असंच त्यांचं हे वर्तन होतं.

‘चपराक’च्या निमित्तानं आमचे भारतभर दौरे सुरू असतात. या प्रत्येक दौर्‍यातील त्यांचा सहभाग अटळ ठरला. अनेकदा तर ते त्यांचीच गाडी घेऊन यायचे. ती सोबत घ्यायचा आग्रह धरायचे. मी चारचाकी गाडी घेतल्यावर त्यांनी मला ती कशी चालवायची याचं बारीकसारीक गोष्टीसह प्रशिक्षण दिलं. त्यात मी तरबेज झाल्यावर मात्र त्यांनी सांगितलं, ‘‘आता मी असताना तुम्हाला कोणतीही गाडी चालवायला मिळणार नाही. माझ्याकडं ड्रायव्हिंगचं कौशल्य आहे. त्यामुळं तुम्ही शेजारी बसून तुमची कामं करा. फोनवर संपर्क साधा. विचार करा किंवा आराम करा. तुम्हाला निवांतपणा मिळावा यासाठी तुमचं सारथ्य मीच करणार. तो माझा अधिकार आहे…’’ मग त्यांनी अक्षरशः हजार-हजार किलोमिटरचा प्रवास मला सोबत घेऊन केला.

त्यांनी आजवर एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा आंतरराष्ट्रीय कंपन्यात महत्त्वाच्या पदावर काम केलंय. या सगळ्या कंपन्या सावरताना त्यांचं अनुभवाचं कौशल्य पणाला लागायचं. वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी अनेक टक्केटोणपे खाल्लेत. या सगळ्या गोष्टी ते इत्यंभूतपणे आणि अतिशय मोकळेपणाने सांगतात. त्यांच्या अनुभवाची शिदोरी इतकी भक्कम आहे की ते ऐकून कुणालाही प्रेरणा मिळावी. त्यामुळं मी त्यांना सांगितलं की ‘‘दर आठवड्याला तुम्ही यावर एक लेख लिहा. अनुभवाच्या शिदोरीतून याच नावानं आपण ते आपल्या साप्ताहिकातून प्रकाशित करू.’’ त्या सदराला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि आम्ही ‘तारेवरची कसरत’ याच नावानं त्याचं पुस्तकही प्रकाशित केलं. व्यवस्थापन क्षेत्रातील आंरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची त्या पुस्तकाला प्रस्तावना घेतली. या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपत आली आहे.

‘चपराक’ने एक चरित्रात्मक पुस्तकांची मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. अगदी थोडक्यात पण त्या-त्या महापुरूषांविषयी आजच्या पिढीत जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांची माहिती मिळावी असं त्याचं स्वरूप आम्ही ठरवलं. महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात स्वराज्याचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे यांचा एक उल्लेख आहे. तेवढ्याच संदर्भाच्या आधारे आम्ही त्यांचं एक छोटेखानी चरित्र प्रकाशित करायचं ठरवलं. ‘‘ते तुमचे पूर्वज आहेत तर तुम्हाला ही जबाबदारी पार पाडावीच लागेल’’ म्हणून रवींद्र कामठे सरांच्या गळ्यात ही जबाबदारी मारली.

अत्यंत अभ्यासूपणे त्यांनी ही कामगिरी पार पाडली आणि हे लघुचरित्र वाचकांच्या भेटीस आले. पंधरा दिवसात आठ हजार प्रतींच्या विक्रमी विक्रीचा टप्पा या पुस्तकानं गाठला.

आता तर त्यांची भट्टी जोरात पेटलीय. कादंबरी, कथा, बालकथा, समीक्षा अशा सगळ्या साहित्यप्रांतात त्यांनी यशस्वी मुसाफिरी केलीय. त्यांची पाच-सहा पुस्तकं नजिकच्या काळात ‘चपराक’तर्फे प्रकाशित होत आहेत.

रवींद्र कामठे हे एक वेगळंच रसायन आहे. कोणतीही गोष्ट मनात ठेवायची नाही, जे आहे ते कसलीही पर्वा न करता बोलून मोकळे व्हायचे, इतरांना कौतुकाची मनमोकळी दाद देताना हातचं काही राखून ठेवायचं नाही, कसलेही पूर्वग्रह न ठेवता प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण करायचे, अर्थात ते करताना त्याच्या भल्याच्या दृष्टिने चार गोष्टीही स्पष्टपणे सुनावताना अजिबात मागेपुढे पहायचे नाही, देश-विदेशात प्रवास करून, तिकडे काम करताना आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवूनही प्रत्येक लहान-थोरांसोबत तितक्याच आदबीने वागायचे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.

आज त्यांचा जन्मदिन. तब्येतीच्या काही किरकोळ कुरबुरी सुरू असल्या तरी त्यांची उमेद दांडगी आहे. मनानं ते खंबीर आहेत. ‘चपराक’च्या माध्यमातून भविष्यात आणखी काही मोठे प्रकल्प सुरू होणार आहेत. त्यातील त्यांचा वाटा सिंहाचा असेल हे वेगळे सांगायला नकोच.

मित्र, ज्येष्ठ सहकारी, मार्गदर्शक, साहित्यिक अशा सर्व अंगांनी त्यांचा सहवास मला नेहमी आनंददायी वाटतो. त्यांना उत्तम दीर्घायुरारोग्य लाभावे याच जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देतो.

– घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

https://chaprak.com/2020/08/sachchai-aani-achchai-japnare-mitr/ via @echaprak

Friday 22 May 2020

“अन मी पोरका झालो होतो”

“अन मी पोरका झालो होतो”

 २२ मार्च २०२०, रात्रीचे दहा वाजले होते, नुकतीच आमची जेवणे उरकली होती. मी आणि बायको वंदना दूरदर्शनवरील बातम्या बघत बसलो होतो. कोरोना विषाणूचा जगभर जोमाने पसरत चाललेला प्रादुर्भाव व त्या संदर्भातील बातम्या ऐकून थोडेसे धास्तावल्या सारखे झाले होते. कालच जनता कर्फ्यू होऊन गेलेला होता. त्यामुळे सगळीकडे जरासे चिंतेचेच वातावरण पसरलेले होते.

नाही नाही ते विचार मनात येत होते.  मध्येच एक ब्रेकिंग न्यूज आली आणि त्या बातमीने तर अंगावर काटाच उभा राहिला.  ती बातमी होती चीन मधील वूहान ह्या शहरात हजारोंच्या संख्येने कोरोनाने बाधित झालेले रुग्ण मरण पावले आहेत अशी !

आता हा विषाणू जगभर पसरतो आहे व त्याने इटली, इंग्लड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी ह्या देशांमध्ये हाहा:कार माजवायला सुरवात केली आहे, अशी बातमी मराठी बातमी वृत्तवाहिनीवरून मोठमोठ्याने दिली जात होती.

माझा जीव हे ऐकून हळहळत होता आणि मनातल्या मनात देवाचा धावा करून त्याला साकडे घालत होता की; “देवा कृपा कर आणि भारताला ह्या सगळ्यापासून बाजूला ठेव रे बाबा”. जर ह्या सुधारित देशांची व पृथ्वीतलावरील सर्वोत्तम वैद्यकीय व्यवस्था असलेल्या देशांची ही अवस्था आहे तर; आपल्या देशाची काय अवस्था होईल ह्याचा विचारच करायला नको ! १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जर का ह्या कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तर परिस्थिती फारच अवघड होऊन बसेल !

बातम्यांमधून सतत सांगत होते की वयस्कर लोकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच ज्यांची अन्जिओप्लस्ति अथवा बायपास सर्जरी झालेली आहे त्यांनाही कोरोनाचा संसर्ग सहज होऊ शकतो. त्यामुळे त्यांनीही जास्त काळाजी घ्यावी. शक्यतो घरातून बाहेर पडू नये, वगैरे वगैरे. माझी तर पाचावर धारणच बसली होती. कारण दोनच वर्षांपूर्वी माझी अन्जिओप्लस्ति झालेली होती. मनातल्या मनात मी आपल्याला काही होणार नाही असे म्हणतच स्वत:ची समजूत काढत होतो व अजिबात घरातून बाहेर पडायचेच नाही असे ठरवून बसलो होतो.

असे मी ठरवले आणि इतक्यात माझ्या धाकट्या भावाचा मला फोन आला;
हेल्लो, दादा, मी किशोर बोलतोय !
मी : “हा बोल ना रे किशोर.  काय रे इतक्या उशिरा कसा काय फोन केलास. सगळे काही ठीक आहे ना! असे एका मागून एक प्रश्न मी त्याला विचारले”.
किशोर : “आरे दादा जरा महत्वाचे होते म्हणूनच तुला जरा उशिरा फोन केला आहे. तसं फार सिरीयस काही नाही, पण आईला मी आत्ताच रत्ना मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे”.
त्याचे हे बोलणे ऐकून माझे मन एकदम सुन्न झाले. मी स्वत:ला कसेबसे सावरून त्याला मध्येच थांबवून विचारले की;
मी : “एकदम काय झाले ममीला. तुला मला जरा आधी फोन नाही का करता आला” !
किशोर : “दादा ऐक, एवढे काही सिरीयस नव्हते. पण संध्याकाळ पासून तिला खूपच त्रास व्हायला लागला होता. तिने एकदमच अंग टाकून दिले होते. मग काय करणार, शेजारच्या संजूला बरोबर घेतले आणि गाडीत घालून आत्ताच दवाखान्यात दाखल केले आहे.”
“तिला युरीन इन्फेक्शन झाले आहे असे डॉक्टर म्हणालेत”. 
“आत्ता तिला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे”. “थोडे बरं आहे.”
“तू लगेच यायची घाई करू नकोस”. कारण इथे अतिदक्षता विभागात कोणाला आत सोडत नाहीत”.
मी : “ते ठीक आहे रे. पण डॉक्टर जर भेटले तर त्यांना सगळे सविस्तर विचारून घे. मी उद्या सकाळी येतोच आहे”.
किशोर : “ दादा तू उद्या सकाळी ११ वाजता ये. त्यावेळेस डॉक्टर येणार आहेत. तू आलास की आपण त्यांच्याशी चर्चा करून काय करायचे ते ठरवू”.
मी : ‘ठीक आहे”. मी फोन ठेवतो, पण समजा कधीही काहीही लागले तर मला आधी फोन कर”. “चल ठेवतो मी फोन”.
आमचे हे संभाषण वंदनाने ऐकले होते. तिने मला लगेच विचारले की; “आपण जायचे का आत्ता हॉस्पिटलमध्ये” !
मी तिला समजून सांगितले की एवढी काही तातडीची परिस्थती नाहीय. उद्या सकाळी ११ वाजता आपण जाऊ आणि डॉक्टर काय म्हणताहेत ते बघू. असेही आपण काय करणार आहोत तिथे जाऊन !

कशीबशी ती रात्र काढली. आधीच ह्या कोरोनाच्या भीतीने मनात घर केलेले होते. त्यात मला तर हॉस्पिटलमध्ये जावेच लागणार होते. दुसरा काही पर्यायच नव्हता माझ्या समोर. दुसऱ्या दिवशी सकाळी तोंडाला मास्क लावून १० वाजताच हॉस्पिटलमध्ये जायला निघालो. वाटेत खूप ठिकाणी पोलिसांनी अडथळे घालून रहदारीवर नियंत्रण आणले होते. सहकारनगर आणि लॉ कॉलेज रोडवर मला थांबवले होते.  आई सिरीयस आहे म्हणून सांगितल्यावर त्यांनी फारसे काही न विचारता सोडले होते.

शेवटी ही सगळी अडथळ्यांची शर्यत पार करत १०.४५ला हॉस्पिटल मध्ये पोचलो होतो.  आई अतिदक्षता विभागात असल्यामुळे तिच्याकडे फक्त एक नजर टाकून लगेचच परत आलो. असेही खूप विनवण्या केल्यावर सुरक्षा रक्षकाने आमच्यावर उपकार म्हणून आम्हांला एक एक करून आत सोडले होते.

बरोबर ११ वाजता डॉक्टरीन बाई आईला तपासून बाहेर आल्या. आम्हीं त्यांना भेटलो. त्या म्हणाल्या की; “तुमच्या आईची एक किडनी काम करत नाहीय, युरीन इन्फेक्शन मुळे रक्तातले हिमोग्लोबिन, सोडियम खूप कमी झाले आहे”. “उद्या आपण एक छोटीशी प्रोसिजर करून किडनी स्वच्छ करून काही उपयोग होतो आहे का ते पाहू”. “ कारण त्यांच्या वयानुसार दुसरा कुठलाच उपाय करता येणार नाही”. “डायलिसीसचा एक उपाय करता आला असता पण त्यांच्या वयाला ते झेपणार नाही”. “डॉक्टर अगदी स्पष्टच बोलत होत्या.”

आईचे वय ८० असल्यामुळे त्यांना उपचार करतांना खूप मर्यादा येत होत्या. त्यात दुसरीकडे ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता.  हॉस्पिटलमध्ये कोणालाही कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात होती.  

डॉक्टरांनी आम्हांला सांगितले की; “आपण ही प्रोसिजर करून पाहू”. “आपल्या नशिबाने त्यांच्या तब्बेतीला काही फरक पडलाच तर चांगलेच आहे”.  “नाही तर त्यांना नुसत्या औषधांवरच ठेवावे लागेल”. त्यांचे ऐकण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. मी त्यांना होकार दिला व पुढील तयारी करण्याची विनंती केली.  डॉक्टरांनी लगेचच त्यांच्या सहकारी डॉक्टरांना उद्याची तारीख प्रोसिजरसाठी ठरवून घ्यायला सांगितली व दुसऱ्या तज्ञ डॉक्टरांची तशी वेळ घेण्यास सुचवून त्या आल्या तशा निघून गेल्या.

एका पेक्षा जास्त नातेवाईकास पेशंट जवळ थांबून देत नव्हते. त्यामुळे मी आणि वंदना घरी निघून आलो.  संध्याकाळी बातम्या लावल्या आणि उडालोच.. कारण उद्यापासून म्हणजे २४ मार्च पासून दोन आठवड्याचा “संचारबंदीचा” आदेश संपूर्ण भारतात लागू करण्यात आला होता. आपल्या देशातला पहिला “लॉकडाऊन” जाहीर करण्यात आला होता. सर्व व्यवहार ठप्प होणार होते. अगदीच अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या होत्या.

माझ्यासमोर डोळ्या समोर उद्याचा दिवस उभा राहिला होता. आईची प्रोसिजर करायचे ठरले होते. त्यात मला हॉस्पिटलला जाता येईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. एकतर हॉस्पिटल सेनापती बापट रोडवर होते जे माझ्या घरापासून म्हणजे धनकवडी पासून १२ किलोमीटर दूर होते.  त्यात किमान पाच ते सहा ठिकाणी तरी अडथळे लावून रस्ता बंद करण्यात आलेला असणार ह्याची मला खात्री होती. कारण तसे बातम्यांमध्ये दाखवण्यात आलेलं होते.

थोडासा विचार करून मी किशोरला फोन केला आणि त्याला ह्या सर्व परिस्थितीची कल्पना दिली. त्यातून मी काहीही झाले तरी उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये येतो आहे सांगून त्याला जरा दिलासा दिला.
त्या बिचाऱ्याची एकट्याची ह्या सगळ्यात इतकी धावपळ होत होती की काही विचारू नका. आई त्याच्याकडेच पंचवटी पाषाणला राहायला असल्यामुळे तो आणि संध्या (माझी भावजय) तिचा अतिशय प्रेमाने संभाळ करत होते. नाही म्हणायला मी आणि धाकटी बहिण साधना काही लागले तर येऊन जाऊन होतोच त्यांच्या आधाराला. पण ह्या दोघांवरच आईची सगळी जबाबदारी होती. ते ही ती अगदी मायेने व आनंदाने निभावत होते हे मात्र नक्की.

मी सर्वात प्रथम माझ्या मोबाईलवरून पोलीस पास साठीचा अर्ज दाखल केला. २४ मार्चला सकाळी पोलिसांच्या चौकशीतून वाट काढत मी कसाबसा हॉस्पिटलमध्ये पोचलो. आईचे छोटेखानी ऑपरेशन झाले. तिला भेटलो तिच्याशी छान गप्पा मारल्या. ही प्रोसिजर झाल्यामुळे तिला जरा बरं वाटतं होते. किडनीतून खराब रक्त काढून टाकल्यामुळे तिला जरा तरतरी आल्यासारखे झाले होते. तिला ऑपरेशन थेटरच्या बाहेरच्या खोलीत ठेवले होते तिथे डॉक्टरांनी मला भेटायला सांगितले तेंव्हा मला म्हणाली; “आता मला एकदम बरं वाटतंय”. “डॉक्टरांना सांग मला घरी सोडायला”.

मी तिची कशी बशी समजूत काढली आणि सांगितले की; “अजून दोन दिवसांनी तुला घरी सोडणार आहेत”!  तिने विचारले किशोर कुठे आहे. तिचा भारी जीव त्याच्यावर आणि का असू नये !
किशोर खाली डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणायला गेला होता.  तो आल्यावर मी त्याला आईला भेटायला सांगितले. तो तिला भेटून आला. आईला वरच्या रूम मध्ये न्यायला दोन तास तरी लागणार होते.
किशोर म्हणाला “दादा तू जा आता घरी”. “कारण तुला पोलीस आडवतील”. “माझ्याकडे हॉस्पिटलचा पास आहे त्यामुळे मला काही कोणी आडवणार नाही”. “आणि तू उद्या यायची काही घाई करू नकोस”. “जरूर पडली तर मी तुला फोन करतो”.

मी दुपारच्या वेळेस हॉस्पिटल मधून बाहेर पडलो. चारचाकी गाडी होती म्हणून बरं. बालभारतीच्या चौकात माझी चौकशी झालीच. तरी बरं मी रत्ना मेमोरील हॉस्पिटलची वाहनतळाची पावती जपून ठेवली होती. अगदीच गरज पडली तर पुरावा म्हणून दाखवायला. पोलिसांनी माझी गाडी थांबवलीच. मला विचारले कुठे निघालात. मी त्यांना सांगितले की; आत्ताच आईचे ऑपरेशन झाले आहे. हॉस्पिटल मधून घरी चाललो आहे”. त्यांनी मला पास आहे का विचारले ! मी त्यांना पास साठी रिक्वेस्ट पाठवली आहे पण अजून स्वीकारल्याचा मेसेज आला नाही. माझे येणे अत्यंत गरजेचे होते म्हणून आलो होतो.” त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, “तुमचं सगळं बरोबर आहे, तुमची गाडी ह्या सहा कॅमेऱ्यात दिसत आहे. तुमच्यावर खटला दाखल होऊ शकतो.”
मी साहेबांना म्हणालो; “साहेब तुम्हांला जे योग्य वाटते ते करा, पण माझ्या आईचे ऑपरेशन तर मी काही थांबवू शकत नव्हतो हो”.
साहेबांना काय वाटले ! त्यांनी माझी गाडी सोडली आणि जातांना म्हणाले की, ह्यापुढे पास असेल तरच बाहेर पडा. उगाच तुम्हांला त्रास नको आणि आम्हांलाही.
त्यांना मी नमस्कार केला आणि निघालो.

आज सुटलो होतो. माझा पोलीस पास काही आला नव्हता. दोन दिवस असेच गेले. नाईलाज म्हणून किशोर बरोबर रोज फोनवरूनच बोलणे होत होते. त्यात जरा चांगली गोष्ट म्हणजे आईची तब्बेत हळू हळू सुधारत होती. तिसऱ्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले होते. किशोर तिला घरी घेऊन आला होता.

आईची तब्बेत बरी आहे असे समजल्यावर माझा जीव भाड्यात पडला. त्याच दिवशी संध्याकाळी तिने किशोरला माझ्याशी बोलण्यासाठी व्हिडीओ कॉल करायला लावला. मी तिच्याशी पाच मिनिटे बोललो. पण तिचा तो थोडासा सुजलेला चेहरा आणि हाता पायावर असलेली सूज पाहून माझ्या काळजात एकदम धस्स झालं. असंही तिला गेले एक वर्षभर दिसायचे आणि ऐकायला यायचे कमी झाले होते. तरी ती बिचारी सगळ्यांशी तिच्या नेहमीच्या मिश्कील शैलीत संवाद साधून आमचे एक प्रकारे सांत्वनच करत होती.

का कोण जाणे, मला तिचा मृत्यू जवळ येत असल्याची चाहूल लागली आणि मन विषण्ण होऊन गेले. कसबसे मी तिच्याशी बोलत होतो. ती मात्र हॉस्पिटलमधून घरी आल्याच्या आनंदात होती. मला म्हणाली मी आज सगळ्यांशीच बोलले आहे. ताईलापण म्हणजे माझ्या बहिणीलाही तिने असाच फोन केला होता. वरती मला सांगत होती की, कोण जाणे परत मला तुमच्याशी बोलता येईल की नाही म्हणून आत्ताच बोलून घेते. तिचा नेहमीचा चेष्टा मस्करीचा सूर होता. पण त्यात ही बहुतके तिलाही तिचे दिवस भरत आल्याची चाहूल लागली असावी हे जाणवत होते.  म्हणूनच तर ती सगळ्यांशी फोनवरून व्हिडीओ कॉल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा उठवत होती.

एकतर ह्या कोरोनाच्या मुळे सगळीकडे “लॉकडाऊन” घोषित करण्यात आला होता आणि घराच्या बाहेरही पडणे मुश्कील होऊन बसले होते. अगदी जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी सकाळी दोन तासांसाठी काही दुकाने उघडी ठेवलेली होती. सगळीकडचे वातावरणच एकदम बदलून गलेले होते. त्यात आमच्या म्हणजे सहकारनगर-धनकवडी भागात काही रुग्ण आढळल्यामुळे आमचा संपूर्ण परिसर सील केला गेला होता. माझा जीव आईला भेटण्यासाठी तळमळत होता. ती तिकडे भावाकडे पुण्याच्या उत्तरेला पाषाणला होती आणि मी दक्षिणेला धनकवडीला. पुण्याची दोन टोके होती ही.

त्यातल्या त्यात किशोरशी फोनवरून बोलणे चालूच होते. आईची तब्बेत सुधारते आहे हे ऐकून मला जरा बरं वाटले होते. चार पाच दिवस असेच मजेत गेले. पुण्यातल्या पुण्यात असूनही आईच्या तब्बेतीची विचारपूस फोनवरून करण्याची वेळ ह्या कोरोनाने आणलेली होती. हातपाय झाडून सुद्धा काही उपयोग नव्हता.

असाच आठवडा गेला आणि एकदिवस सकाळीच किशोरचा फोन आला. त्याचा ह्या वेळेस फोन आला म्हटल्यावर माझ्या छातीचे ठोके थोडेसे वाढले होते. मनातल्या मनात मी देवाचा धावा करत होतो की, कुठलीही वाईट बातमी नसू दे !
किशोर : “दादा काल मध्यरात्रीच ममीला परत रत्नात आणले आहे”. “तिला हृदयविकाराचा हलकासा झटका येवून गेला आहे असे डॉक्टर म्हणाले”. “आत्ता ती अतिदक्षता विभागातच आहे”.
“तू लगेच यायची घाई करू नकोस कारण दवाखान्यात कोरोनामुळे कोणालाही आत सोडत नाहीत”.
आईला हृद्यविकाराचा झटका येवून गेला आहे म्हटल्यावर माझी बोबडीच वळाली होती. मी कसे बसे स्वत:ला सावरले आणि किशोरला म्हणालो;
मी : “ठीक आहे, पण तू मला फोनवर कळवत रहा”. मी त्याला खोट्या का होईना धीराने म्हणालो.
काय करणार, ह्या कोरोना मुळे माझ्या आईला सुद्धा भेटायला जायची सोय राहिली नव्हती. मनातल्या मनात मला खूप राग आला होता, चीड चीड झालेली होती.
त्याच तंद्रीत मी मोबईलवरून पोलीस पाससाठी तीन दिवसांची रिक्वेस्ट टाकली.

संध्याकाळी ८ वाजता माझी रिक्वेस्ट स्वीकारल्याचा मेसेज आला आणि तीन दिवसांची आईला भेटण्याची निश्चिती झाली. मी वंदनाला सांगून तिला आईसाठी उद्या काय हवे नको ते किशोरला आणि संध्याला (भावजयीला) विचारायला सांगितले. तिला डॉक्टरांनी भाताची पेज किंवा सूप द्यायला सांगितले होते. मग काय मी आणि वंदना दुसऱ्यादिवशी सकाळी ११ वाजताच डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. ह्यावेळेस माझ्याकडे पोलीस पास होता त्यामुळे काळजी नव्हती.

हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांनी आम्हांला आतच सोडले नाही. रीस्पेशनमध्ये अर्धा तास बसवून ठेवले. शेवटी मी किशोरला फोन करून बोलवून घेतले.  त्याचा पास घेऊन आम्ही दोघे एक एक करून आईला भेटून आलो. ह्या कोरोनामुळे आम्हांला माझ्या आईशी जवळून बोलताही आले नाही. सिस्टरने आम्ही नेलेला डबा ठेवून घेतला आणि म्हणाली की त्यांना जेवायला आम्हीं देऊ. तुम्हीं आता गेलात तरी चालेल. असेही आई बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतीच. तिला ऑक्सिजन लावल्यामुळे हालचालही करता येत नव्हती. मी हळूच तिच्या पायांना हात लावला व हलकेसे दाबून पहिले. पण फार काही संवेदना मला जाणवल्या नाही. तिची ही अवस्था पाहून मला तर अजूनच कसतरी व्हायला लागलं.

नवसाने झालेला तिचा जेष्ठ पुत्र मी. तिची ही अशी अवस्था पाहून बेचैन झालो होतो. परिस्थितीपुढे लाचार झालेलो होतो. ह्या परिस्थितीवर मी मात करू शकत नव्हतो त्यामुळे पुरता हतबल झालो होतो.

थोडावेळ थाबुन शेवटी वैतागून मी आणि बायको हॉस्पिटलमधून घरी यायला निघालो. बालभारतीच्या चौकात पुन्हा एकदा माझी गाडी अडवली गेली. मी त्यांना माझा पास दाखवला. पण साहेब म्हणाले अहो, तुम्हांला साधा नियम कळत नाही का ! गाडीत दोघांनी शेजारी शेजारी बसायचे नाही ते ! अनवधानाने माझी झालेली चूक माझ्या लक्षात आली. मी वंदनाला मागच्या सीटवर बसायला सांगितले. साहेबांना माफ करा म्हणालो आणि तिथून सुटका करून घेतली. त्या बिचाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर आणि हवालदारांची काय चूक होती हो ! ते स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांचे कर्तव्य निभावत होते ! त्यानंतर मात्र मी पुन्हा अशी चूक कधी केलीच नाही. म्हणजे मी प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून आईला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटत होतो.

असेच दोन आठवडे गेले आईच्या तब्बेतीत चढ उतार होत होता पण अतिदक्षता विभागातून काही तिची सुटका होत नव्हती. एक दोन वेळेस मला तिला भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळेस ऑक्सिजनचा मास्क नव्हता तेंव्हा माझ्याशी बोलली. मला ओळखले तिने. म्हणाली, “मला ही सिस्टर जेवायलाच देत नाही”. मला त्याही परिस्थितीत हसायला आले. तिला नळीने भरवल्यामुळे खाल्याचे जाणवत नव्हते. ती असेच काहीसे असंबद्ध बोलत होती.
मला म्हणत होती; “बाहेर पाऊस पडतोय खूप, तू रेनकोट आणलाय का” ! मी तिला म्हणालो; “पाऊस थांबलाय आता. मी मोठी गाडी घेऊन आलोय”. असे सांगितल्यावर ती थोडी शांत झाली. बाहेर टक्क उन पडलेले होते. एकतर मे महीन्याचा उन्हाळा अंगाची लाही लाही करत होता. पण हे तिला सांगण्यात काहीच हशील नव्हता. ह्या अशा अवस्थेतही ती माझी काळजी करत होती हे पाहून माझे मन मात्र अजूनच घायाळ झाले होते.
आई ती आईच शेवटी”.

कुठे ती ममी जी कधीही भेटली की थोडीफार तरी चेष्टा मस्करी केल्याशिवाय राहायची नाही आणि आज तिची ही अवस्था पाहून मला खूप गलबलून आले. परिस्थिती गंभीर होती. मला तिची ही अवस्था अजिबात सहन होत नव्हती. मी तसाच बाहेर निघून आलो व बाकड्यावर सुन्न होऊन बसून राहिलो. किशोर वेटिंग रूममध्ये त्याच्यासाठी मी घरून आणलेला डबा खात होता. त्याचे जेवण झाल्यावर मी डबे घेतले व तडक घरी निघून आलो. गेले दोन आठवडे जेंव्हा पोलिसांचा पास मिळेल तेंव्हा आईसाठी आणि किशोरसाठी मी डबा घेऊन जात होतो. तेवढाच संध्यावरचा ताण कमी करणे व आईची थोडीफार सेवा करणे हाच काय तो उद्देश मला त्यातल्या त्यात मनाला थोडेसे समाधान देत होता.

अधून मधून माझी मुलगी पूर्वा आणि जावई मयुरेश, जे लॉकडाऊन मुळे आमच्याकडे राहायला आले होते, ते पोलीस पास मिळवून आजीला भेटून येत होते. आजीने तर पुर्वाशी चागल्या गप्पा मारल्या होत्या म्हणे ! साधना ताई आणि तिचा धाकटा जावई स्वप्नील, काजलचा नवरा सुद्धा तिला एक दोनदा भेटून गेले होते. ताईच्या मोठ्या मुलीला स्वप्नालीला आणि जावई अलोकला मात्र पोलिसांची परवानगी न मिळाल्यामुळे आजीला भेटता येत नव्हते त्याचे त्यांना खूप वाईट वाटत होते. पण ह्या परिस्थिती पुढे कोणाचे काहीच चालत नव्हते. सगळेच ह्या परिस्थितीमुळे नाराज झाले होते. आमच्या डोळ्यासमोर दोन महिन्यांपूर्वीच माझ्या आणि वंदनाच्या निवृत्ती निम्मित आयोजित केलेल्या पार्टीत, आम्हीं सगळ्यांनी एकत्रितपणे डीपी रोडवरील हॉटेलातले जेवण आठवले होते. त्यावेळेस आईने आमची सगळ्यांची खूप करमणूक केली होती. तिचा स्वभावाच फार विनोदी होता. ती होती पण खूप हजर जबाबी. आम्ही जेंव्हा केंव्हा एकत्र भेटत असू तेंव्हा तिचे आपले सारखे एकच पालुपद असायचे ते म्हणजे, स्वप्नाली, पूर्वा आणि काजल ह्याच्याकडे पाहून ती म्हणायची; “मी आता झाली म्हातारी, पिकलं पान कधी गळून पडेल ह्याची खात्री नाही. त्यामुळे पोरींनो लवकरच मला नातवंडांचे तोंड पाहूदेत. म्हणजे मी मरायला मोकळी”. तिच्या ह्या तीनही नाती आजीला कडकडून मिठी मारायच्या आणि विषय टाळायच्या. पण एक आहे ह्या सगळ्यात काजल आणि स्वप्नीलने मात्र आजीची ही शेवटची इच्छा पूर्ण केली होती. पंधरा दिवसांपूर्वीच आजीला भेटून तिला ही गोड बातमी त्यांनी दिली होती. हे विशेष. त्याच वेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून आईचे “सहस्त्रचंद्रदर्शन” लवकरच करण्याचे योजिले होते. आमचे हे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. तिला मात्र हे असले सोहळे नकोच होते म्हणूनच तर ती लवकर निघून गेली असावी.

मरण कोणाला चुकले आहे हो ! पण ह्या कोरोनामुळे मला माझ्या आईची ह्या दिवसांत थोडीफार का होईना सेवा करायला मिळेल असे काही वाटत नव्हते.  शेवटी नको तो दिवस आलाच. २५ एप्रिलला डॉक्टरांनी किशोरला बोलावून सांगितले की, आईची तब्बेत जरा जास्त आहे. जरूर पडली तर आपण त्यांना व्हेन्तिलेटरवर ठेवू आणि मग बघू. अर्थात व्हेन्तिलेटरवर ठेवून फार फायदा होईल असे वाटत नाही, असेही सांगायला त्या कचरल्या नाहीत. तरी तुम्हीं म्हणत असाल तर .....

किशोरने लगेचच मला फोन करून सांगितले आणि विचारले की; “दादा तुझे काय म्हणणे आहे, त्याने माझ्या आधी ताईला फोन करून विचारले होते, तिनेही दादाला विचार म्हणून सांगितले होते”.
माझ्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली होती. मी माझ्या सद्विवेक बुद्धीला विचारले आणि त्याला सांगितले की डॉक्टरांना सांग तिला व्हेन्तिलेटरवर नको ठेवायला. जे काही असेल ते सध्या ऑक्सिजन मशीननेच उपचार करा. शक्यतो तिला वेदना कमी होतील असे बघा.

हे सगळे मी माझ्या काळजावर दगड ठेवून बोलत होतो. पण कल्पना होती की मी जे काही बोलतो आहे त्याने माझ्या आईचा मृत्यू लवकरात लवकर होणार आहे. पण माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. कारण हळू हळू आईचा एक एक अवयव निकामी होत होता. तिचा शेवट जवळ येत चालला होता. डॉक्टरांचे सर्व उपचार संपलेले होते. म्हणूनच डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जा म्हणून सांगितले होते. आमच्या काही नातेवाईकांना आई हॉस्पिटलमध्ये आहे हे कळल्यावर मला त्यांचे फोन वर फोन येत होते. ते बिचारे तिला भेटण्यासाठी तळमळत होते पण ह्या कोरोनामुळे त्यांनाही काही करता येत नव्हते.

किशोरही म्हणत होता की, मी तिला घरी घेऊन जातो. तिला मृत्यू यायचाच असेल तर तो घरी येउदेत. त्याचेही म्हणणे बरोबर होते. मला एकदम आठवले की, ३० वर्षांपूर्वी माझ्या सासऱ्यांच्या बाबतीत असेच झाले होते. १३ दिवस ते दवाखान्यात होते आणि कंटाळून शेवटी त्यांना आम्ही घरी आणले तर दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांनी प्राण सोडले होते. माझ्या ह्या अनुभवावरून मी त्याला होकार दिला होता.

त्याने तात्पुरते भाडेतत्वावर ऑक्सिजनचे यंत्र, ऑक्सिजन सिलेंडर आणि हवेची गादी वगैरे सामानाची कशीबशी जुळवाजुळव केली. एकतर ह्या लॉकडाऊनमुळे सगळीच दुकाने बंद होती. हॉस्पिटलच्या ओळखीने हे सामान त्याला मिळाले आणि त्याने आईला घरी नेण्याची परवानगी मागितली.  

२७ एप्रिलला डॉक्टरांनी आईला घरी नेण्याची परवानगी दिली. त्याने आईला घरी नेले. घरी किशोरच्या आणि संध्याच्या मदतीला मुले ज्ञानदा, सुश्रुत आणि भाची आजीच्या सेवेला हजरच होतीच. तसेच आईची मोठी बहिण माझी मावशी जिचे वय ९० आहे ती आईच्या मागच्याच गल्लीत रहात असल्यामुळे तिला भेटण्यासाठी तळमळत होती.  नियतीने ह्या दोघी बहिणींची शेवटची भेट घडवून आणली होती हे मात्र खरं.   

पण माझी मात्र पंचाईत झाली कारण मला पोलिसांचा पास काही मिळणार नव्हता. इतके दिवस मी हॉस्पिटलचे कारण सांगून पास घेत होतो. त्यामुळे मी जरा जास्तच हळहळलो. पण नशिबापुढे कोणाचे काहीच चालत नाही असे म्हणून गप्प बसलो.

शेवटी २९ मेला सकाळी ८.३० किशोरचा फोन आला.
किशोर : “दादा ममीला खूप ताप भरलाय आणि तापात ती असंबद्ध बोलत आहे”.  “ताप काही केल्या उतरत नाहीय. मी डॉक्टरांना फोन केला होता. त्या म्हणाल्या काही उपयोग नाही. काही करू नका. हा ताप आता उतरणार नाही”
मी : “किशोर डॉक्टरांनी सांगितले आहे म्हणजे तिचा काळ जवळ आला आहे”. “मन घट्ट कर”.
किशोर : “दादा तिचे ते ऑक्सिजनचे यंत्र काढू का आता”
मी : “आरे ते आहेच का लावलेलं अजून. लगेच काढून टाक. म्हणजे तिला जरा कमी त्रास होईल”
मी एखादा डॉक्टर असल्यासारखा सल्ला किशोरला देत होतो. मला माहिती होते की ऑक्सिजन काढला की काही वेळातच तिचा शेवटचा स्वास ती घेईल व ह्या यातनेतून तिची सुटका होईल. खरं सांगू का ! मला इतक्या दुरूनही तिला होण्याऱ्या यातना जाणवत होत्या ! म्हणूनच मी मोठ्या हिमतीने त्याला ऑक्सिजनचे मशीन काढायला सांगितले होते.
किशोरने माझे ऐकून ऑक्सिजन काढून टाकला व मला म्हणाला तू लवकरात लवकर इकडे पाषाणला ये. मी ताबडतोब पोलिसांच्या पाससाठी रिक्वेस्ट टाकली.  पूर्वा आणि मयुरेशला शेजारच्या मयूरच्या गाडीचा नंबर घेऊन पोलीस रिक्वेस्ट टाकायला सांगितली. पोलिसांच्या नवीन नियमानुसार एका गाडीत दोनच जण जाऊ शकत होते. म्हणून माझी आणि मयूरची गाडी अशी व्यवस्था मी आधीच करून ठेवली होती. असेही ही वेळ तर सांगूनच आलेली होती आमच्यावर !

असेही २८ एप्रिलची रात्र मी झोपलेलो नव्हतो. मला झोपच येत नव्हती. एकसारखे आईचं डोळ्यापुढे येत होती. त्यात मी विरंगुळा म्हणून १४ एप्रिल पासून “अनोख्या रेशीमगाठी” ही कादंबरी लिहायला घेतलेली होती. मला ती लवकरात लवकर पूर्ण करून आईला द्यायची होती. तिला माझ्या कवितांचे आणि लेखांचे खूप कौतुक होते. अभिमानाने सर्वाना ती माझा मोठा मुलगा कवी आणि लेखक आहे सांगत असे. त्यांना आवर्जून माझे काव्यसंग्रह देत असे. ह्या नादातच २९ एप्रिलला पहाटे ५.३० वाजताच मी कादंबरीचा शेवट केलेला होता. त्या नंतर झोप येत नाही म्हणून कादंबरी वरून एक नजर टाकत बसलेलो असतांनाच ८.३०ला किशोरचा फोन आला होता.

त्याच्या फोन नंतर मी आणि वंदनाने लगेचच आवराआवर सुरु करून जाण्याची तयारी करून ठेवली होती व पोलीस पास येण्याची वाट पाहत होतो.  परंतु इतक्यात पुन्हा एकदा सकाळी १०.३० किशोरचा फोन आलाच. की आई गेली म्हुणुन. काय नशीब आहे बघा माझं ! तिच्याशी शेवटचं बोलायचंही राहून गेलं. त्यात ह्या कोरोनामुळे अजूनच आफत झालेली होती.

आता मात्र “पोलीस पास वगैरे सगळे गेले चुलीत” ! असे म्हणून मी आणि मयुरेश दोन गाड्या घेऊन पाषाणला पोचलो. नशिबाने पोलिसांनी आम्हांला अडवले नाही. किशोरने तोवर जवळच्या डॉक्टरांकडून मृत्यूचा दाखला आणलेला होता. सोसायटीतील सुनील आणि संजूने अम्बुलंस बोलवली होती.
कोरोनाचे सगळे निर्बंध पाळून सोसायटीतील सर्व जण त्यांच्या लाडक्या आजीचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संखेने जमलेले होते. विशेष म्हणजे त्यांचे आमच्याशी कुठलेही नाते नव्हते. होते ते फक्त माणुसकीचे आणि ते ही आमच्या आईने कमावलेले.

मी वर घरात जाऊन आईचे शेवटचे दर्शन घेतले आणि एक अध्याय संपला असे मनातल्या मनात म्हणत मी जिन्यातून खाली येत पुढील सर्व सूत्रे हातात घेतली. कोरोनामुळे अम्बुलंस मध्ये फक्त चौघांनाच परवानगी होती आणि वैकुठातही अंत्यसंस्कारासाठी फार फार तर ८ ते दहा जणांनाच परवानगी होती.

शेवटी नाईलाजाने मी, किशोर, माझा मावस भाऊ सतीश आणि सुनील असे चौघेजण अम्बुलंस मधून वैकुठात गेलो. पूर्वा आणि मयुरेश त्यांच्या गाडीतून आले. साधना ताई आणि तिचा जावई स्वप्नील त्यांच्या म्हात्रे पुलावरील घरून परस्पर वैकुठात आले. त्याला आधीच फोन करून सांगून ठेवले होते की त्यांनी परस्पर वैकुठातच यावे. असेच अजून दोन तीनजण वैकुठात आले होते.

वैकुठात विद्युत दाहिनीतच अंत्यसंस्कार करायचे होते. कोरोनामुळे गुरुजी हजर नव्हते. शेवटी अनिलने एक मडके कुठूनतरी पैदा केले. मी किशोरला सांगितले की, जरी तो लहान असला तरी त्याने आईचे अत्यसंस्कार करावेत.  आयुष्यभर त्याने तिची सेवा केली आहे त्यामुळे हा अधिकार त्याचाच आहे ! असो, पण माझे हे म्हणणे खोडून काढण्यात आले व मलाच मोठा मुलगा म्हणून तिचे अंत्यसंस्कार करावयास सांगण्यात आहे. त्या घडीला माझाही नाईलाज झाला.  गपुचूप मी ते मडके पाण्याने भरून तिन वेळा आईच्या मृतदेहाला प्रदक्षिणा घालून तिचा अत्यसंस्कार केला.

अतिशय जड अत:कारणाने तिचे पार्थिव विद्युत दाहिनीच्या कर्मचाऱ्यांच्या सुपूर्द केले. त्यांनी भट्टीचे दार उघडून आईचे पार्थिव आत ढकलले. आईचे कलेवर बघता क्षणी अनंतात विलीन झाले.
उपस्थित सगळ्यांनी ह्या सगळ्या गडबडीत, वैकुठ स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आवर्जून आभार मानले. त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच होते. आईला शेवटचा नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडलो.

आमचे हे सोपस्कार चालू असतांना अजून तीन चार पार्थिव तिथे आले होते. हे सगळे कोरोना नसलेलं होते. कोरोनाने मृत्यू झाला असेल तर त्याची सोय बाजूच्या ग्यास वाहिनीत केली होती आणि तिथे तर घरच्यांना एकालाच यायची परवानगी होती. प्ल्यस्तिक मध्ये गुंडाळून आणलेला मृतदेह सरळ ग्यास वाहिनीत टाकला जात होता. कुठल्याही प्रकारचे विधी करण्याची सोय ठेवलेली नव्हती. हे सगळे चित्र इतकं विदारक होतं की विचारू नका. मला तर मनोमन वाटत होते की ह्या काळात कोणीही आजारी पडू नये आणि मृत्यू तर येऊच नये !

आईचे अंत्यसंस्कार उरकल्यावर तिथल्या कर्मचार्यांनी उद्या सकाळी ८ वाजता अस्थी घेऊन जा म्हणून सांगितले. त्याच बरोबर एक सूचना केली की, येतांना फक्त दोनचजण या अस्थी न्यायला. त्यांच्या ह्या सौजन्याचेही मला एवढ्या दु:खातही कौतुक वाटले. कोरोनाचे संकट किती भीषण आहे ते वैकुठात आल्यावर आम्हांला सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवत होते.

दुसऱ्या दिवशी किशोर आणि सुनील दोघेच वैकुठात जाऊन अस्थी घेवून त्या संगम पुलावर नेऊन तिथे विधिवत विसर्जन करून आले. अर्थात ह्या कोरोनामुळे आळंदीला अस्थी विसर्जनासाठी जाण्यास बंदी करण्यात आली होती. संगमावर अस्थी विसर्जन करून दिल्या हे ही आमच्यासाठी खूप होते. कोरोनामुळे आम्हांला कोणालाही आमच्या आईच्या अस्थींचेही दर्शन घेता नाही आले हे दु:ख मात्र मनाला खूप बोचत होते.

आईच्या दशक्रिया विधीवरही कोरोनाचे सावट होतेच. वैकुठातच अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पहाटे ६.३० वाजता दशक्रिया विधी उरकण्यात आला. पिंड ठेवल्या बरोबर कावळा शिवला होता हे विशेष. आईचा जीव खरचं कशातही अडकलेला नव्हता हे मात्र नक्की. ती तिचं जीवन अगदी व्यवस्थित जगली होती. भरपूर माणुसकी कमावली होती तिने. ह्या कोरोनाचे संकट जर नसते ना, तर कमीत कमी हजार दोन हजार माणसे तिच्या अंत्यविधीला आणि दशक्रियेला हजर राहिली असती.

दशक्रिया विधी करणाऱ्या गुरुजींनी तर तोंडाला मास्क आणि काचेची तबकडी लावलेली होती. नाव्ही सुद्धा जय्यत तयारीतच होता. सगळे कसे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत होते. स्वच्छता कर्मचार्यांनी सगळीकडे निर्जंतुकीकरण करण्यासाठीची फवारणी केलेली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासन आणि सरकार त्यांच्या परीने खूप मेहनत घेत होते. अत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी पार पडण्यास ह्याही काळात मदत करत होते. मला तर गेल्यापासून नातेवाईकांचे नुसते फोनवर फोन येत होते. जो तो त्यांना येता येत नाही म्हणून हळहळत होता. आईचा तेरावा दिवस आम्ही ह्याच मुळे घरच्या घरी केला व त्याचा नैवद्य मात्र वैकुठात आणून गाईला खायला घातला.  तेराव्याला माझी मावशी माझ्या गळ्यात पडून जी काही रडली होती त्याने माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले होते.

३ एप्रिल २००३ माझे पितृछत्र हरवले होते आणि आता बरोबर १७ वर्षांनी म्हणजे २९ एप्रिल २०२०ला माझे मातृछत्र हरवले होते, अन मी पोरका झालो होतो.....

माझ्या आईला माझ्याच एका कवितेने काव्यात्मक श्रद्धांजली अर्पण करतो.
|| आई ||
आयुष्याचा एक एक क्षण उधार होता,
जन्मास घातलेस मज हा उपकार होता ||
बालपण गेले माझे तुझ्या अंगाखांद्यावरी
चिमुकल्या पावलांना तुझाच आधार होता ||
घडविलेस तू मला जागून कित्येक रात्री
लोचनी तुझ्या निद्रेला ही नकार होता ||
तरुणाईत विसरलो तुझ्या साऱ्या कष्टांना
तुझ्या डोळ्यात मात्र ममतेचा सागर होता ||
उमेदीत विस्मरला मज त्याग तुझा
तुझ्या त्यागातच तुझा संस्कार होता ||
वार्ध्यक्यात तुझ्या मज बालपण दिसले
मुखी तेंव्हाही माझ्याच नावाचा उच्चार होता ||
आई कसे फेडू मी तुझे हे उपकार,
जन्म हा माझा तुझाच उपहार होता ||
दाखवीन तुला मी आता दिवस सोनियाचे
श्वासात तुझ्या तेंव्हा संथ नकार होता ||
फेडण्याचा पांग तुझे मी निश्चय केला
रथ तेंव्हा तुझ्या शरीराचा थंडगार होता ||
स्मरली मज तुझी माया तुझी अंगाई
आई हाच माझा अखेरीस परमेश्वर होता ||

हा लेख लिहिण्याच्या मागचे कारण की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन जीवतोडून मेहनत घेत आहे. त्यात हे असे प्रसंग आल्यावर काय करावे तेच सुचत नाही.

ह्या कोरोनामुळे मला माझ्या आईची शेवटच्या दिवसांत सेवा करण्याचे भाग्य लाभले नाही त्याच्या मनाला खूप यातना होत होत्या आणि अजूनही होत आहेत. हे शल्य आयुष्यभर बोचत राहणार हे नक्की.

दोष तरी कोणाला द्यायचा. उलट ह्या कठीण परिस्थितीत आपले सरकार, प्रशासन, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी त्यांचा जीव धोक्यात घालून देशाची सेवा करत आहेत. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

आमच्या सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रमंडळींचे आभार. ह्या सगळ्यांची आईच्या अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधीला येण्याची खूप इच्छा होती. परंतु आमच्या विनंतीला मान देवून त्यांनी वैकुठात येण्याचे टाळले त्यासाठी त्यांचा मी ऋणी आहे.

“आईच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो”.

रविंद्र कामठे