Wednesday 1 November 2023

‘हसू’ आणि ‘आसू’

 ‘हसू’ आणि ‘आसू’






‘हसू’ आणि ‘आसू’ ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत.  तसेच त्या आपल्या सुखी आणि समाधानी जीवनाच्याही दोन मूलभूत गरजाही आहेत.  आईच्या उदरातून बाळ जेव्हा जन्माला येते तेच मुळी रडत रडतच.  अर्थात जर का बाळ रडले नाही तर डॉक्टर अथवा परिचारिका त्याला उलटे करून पाठीवर हलकेसे थोपटून किंवा तोंडात हवा भरून त्याला रडायला लावतात.  त्याचे कारण हेच की बाळ जर जन्मतःच रडले नाहीत तर श्वास कोंडून त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो.  हा निसर्गाचा नियम आहे व त्याचा उद्देश आईच्या उदरातून नऊ महिने नऊ दिवस जे काही ब्रम्हांड बाळाने पाहिलेले असते, अनुभवलेले असते त्याचा जल्लोष म्हणजे बाळाचे रडणे होय.  एवढे निरामय रडणे माणसाच्या आयुष्यात परत कधी येतच नाही.

आपल्या आईने आपल्यासाठी नऊ महिने ज्याकाही खस्ता खाल्लेल्या असतात त्यासाठी आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर तिच्या देहामासाच्या ह्या गोळ्यात निसर्गाने जीव भरला आहे ह्याची जाणीव करून आईचे उपकार मानण्याची नियतीची ही आगळीवेगळी पद्धत असावी.  त्यानंतर डॉक्टर बाळाला एका दुपट्यात गुंडाळून प्रसववेदनेने थकलेल्या परंतु बाळाला छातीशी कवटाळून घेण्यासाठी कासावीस झालेल्या त्याच्या आईच्या कुशीत जेव्हा देतात ना, तेव्हा नुकताच जन्मलेला जीवही, (ज्याची अजून नाळही तुटलेली नसते), आईच्या पहिल्या स्पर्शाने जो काही शांत होतो आणि गालातल्या गालात असा काही गोड हसतो ना (जे फक्त त्याला जन्म दिलेल्या आईलाच ऐकायला जाते)  ते हसणे म्हणजे बाळाने आईला दिलेला तिच्या आयुष्यातला सर्वोच्च सुखद क्षण!  मातृवाचे दान तिच्या पदरात टाकून तिला उपकृत केल्याची ही नांदी असते.

            आपले हे जे काही पहिले रडणे आहे ते मुळातच रडणे नसून आपल्या ह्या पृथ्वीतलावरील अस्तित्वाची जाणीव आहे असे मला वाटते.  त्यानंतर आपले जे काही आयुष्य सुरु होते त्यात आपले बालपण अगदी आनंदात पार पडते.  आई बाबांच्या, आप्तेष्टांच्या मायेच्या सावलीत, शाळेतल्या मास्तरांच्या मार्गदर्शनात आपण कधी लहानाचे मोठे होते तेच मुळी आपल्याला कळत नाही.  हळूहळू बाल्यावस्था संपून आपण कुमारवस्थेत जातो आणि तिथून पुढे आपल्या आवडी निवडी बदलत जातात.  आजूबाजूच्या परिस्थितीचा, वातावरणाचा आपल्या जडणघडणीवर चांगला वाईट परिणाम होत जातो. 

ह्या सगळ्यातून आपण बाळाचे कुमार कधी होतो तेच आपल्या लक्षात येत नाही.  आपण तारुण्यात प्रवेश करतो आणि तिथेच आपल्यातील निरागसता एकदम लुप्त व्हायला लागते.  आपल्याला नको नको तेही कळायला लागते. जे कळायला हवे ते कळत असते पण, आपल्यातील अहं भाव उफाळून यायला सुरवात होते आणि कळूनही आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत.  एकंदरीत काय तर कळत नकळत आपण एका तणावपूर्ण वातावरणात आपसूकच प्रवेश करतो.  काय चांगले, काय वाईट, आपल्या हिताचे काय, काय चूक, काय बरोबर, हे सुद्धा कळत नाही आणि कळले तरी वळत नाही.  आईबाबा व इतर थोरामोठ्यांचा राग यायला सुरवात होते. मित्र जास्त जवळचे वाटू लागतात.  सर्वसाधारणपणे आपण आपल्याही नकळत भरकट जातो.

            ह्या नादात आपण आपल्या आयुष्यातील काही मोलाचे क्षण घालवलेले असतात.  ते फार उशिरा कळतात.  वय वाढत जाते तसतसे आपल्या आयुष्यातील समस्या वाढत जातात.  आपल्या मनावर ह्या सगळ्याचे दूरगामी परिणाम होत असतात हे आपल्याला फार उशिरा उमगते.  पण जेव्हा उमगते तेव्हा उशीर झालेला असतो.  ह्या सगळ्यासाठी आपल्या शालेय जीवनात आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण मिळणे हे खूप गरजेचे असते.  वास्तविक पाहता बालपणातच आयुष्याचा पाया मजबूत होत असतो आणि नेमके त्याच वेळेस मन चंचलही झालेले असते, हेकेखोर होते व गर्विष्ठही होते. आयुष्यातली ही फार नाजूक अवस्था आहे.  कळत नकळत आपल्यातील अहंकार जागा होतो व तो आपला सर्वात मोठा वैरी आहे हे कळायला कधीकधी संपूर्ण आयुष्य जाते.  ह्या सगळ्यात जे कोणी आपल्यातील दुर्गुण ओळखून स्वत:वरील सदगुणांवर लक्ष देऊन त्यावर काम करून चांगल्या संस्कारांचा, विचारांचा उपयोग आचरणात आणतात ते पुढे आयुष्यभर सुखी समाधानी रहातात व इतरांनाही सुखी ठेवतात.

            हे एवढे प्रास्ताविक करण्याची मुळात गरज काय !  ह्या मागील एक अतिशय महत्वाचे कारण म्हणजे, आपला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन किती सूक्ष्म आहे हे पदोपदी जाणवत राहते.  मी गेली काही वर्षे पाहतो आहे की माणूस प्रगतीच्या आणि विकासाच्या नावाखाली स्वत:ची फारच ओढाताण करतो आहे.  त्यात भौतिक सुखाच्या हव्यासापोटी आपल्या आयुष्याची होळी करतो आहे.  अर्थात ह्यात त्याची एकट्याची फरफट होत नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील प्रत्येकाची फरफट होत असते हे त्याला कळतच नाही.  ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे काही कारण नसताना एक प्रकारचे तणावपूर्ण आयुष्य तो जगत राहतो.

            आपल्या जीवनात ‘हासू’ आणायचे असेल तर आपल्याला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मकच ठेवला पाहिजे. आता सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय तर, आयुष्यात जेवढे चांगले असेल तेवढेच स्वीकारावे अथवा अंगीकारावे आणि वाईट तेवढे सोडून द्यावे.  राग, लोभ, द्वेष, हव्यास, घृणा, तिटकारा इत्यादी दुर्गुणांपासून लांबच राहावे.  दुसऱ्याचे नेहमी चांगलेच चिंतावे.  त्याबरोबर आपलेही चांगलेच होते.  सतत चांगले विचार जर का मनात घोळत असतील तर तुमच्या चेहऱ्यावर कायम ‘हासू’च राहील.  तुमच्या चिंता कमी होतील.  ज्याचा परिणाम तुमच्या मनाला सतत सकारात्मक विचारांचीच रेलचेल लाभेल.  सतत पैसा पैसा करून जिवाचे, मनाचे आणि तनाचे हाल करू नयेत.  ‘जरुरी पेक्षा जास्त आणि आपल्या प्राक्तनात लिहिलेल्यापेक्षा कमी काहीच मिळत नाही.’  त्यामुळे उगाच जिवाची ओढाताण करून आयुष्य वाया घालवू नये.  आपल्या संत साहित्यात ह्या विषयात खूप काही लिहून ठेवले आहे, जे अगदी आपल्या कळत्या वयापासून जर का आपण अमलात आणले तर आपल्या आयुष्यातील ‘हसू’ कायम राहून ‘आसू’ ढाळायची वेळच यणार नाही. हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे. 

            स्वार्थातूनही परमार्थ साधण्याची कला अवगत करा.  जीवन खूप सुखकर होईल.  आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन जेवढा सकारात्मक असेल तेवढे तुमच्या आयुष्यातील ‘हसू’चे प्रमाण जास्त राहील आणि ‘आसू’चे प्रमाण नगण्य राहील.  अर्थात सगळेच ‘आसू’, काही नकारात्मक नसतात.  काही ‘आसू’ हे आनंदाश्रू म्हणून अपवाद आहेतच की !  आयुष्यातील ह्या आनंदाश्रूचे प्रमाण तुमच्या सकारात्मकतेवर अवलंबून आहे.

            मंडळी हसणारी व्यक्तीच सर्वांना प्रिय असते त्याचे कारणही अगदी नैसर्गिक आहे.  हसण्यात एक प्रकारची उर्जा भरलेली असते, जी आपल्याला नवचैतन्य देऊन जाते.  नवजात शिशु प्रमाणे निरागस ‘हसू’ हे सुद्धा आयुष्याच्या एका टप्प्यावर जर का तुम्हाला आणता आले तर तुमच्या एवढा सुखी आणि समाधानी कोणीही नाही.  मी जेव्हा बाळाचे निरागस ‘हसू’ आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करा असे म्हणतो, तेव्हा त्याचे कारणही तसेच आहे.  नवजात बाळा इतके निरागस व्हा असे मला म्हणायचे आहे. प्रयत्न तर करून पहा. जमेल ! तान्ह्या बाळाला तरी कुठे माहिती असतात, हेवे दावे, राग लोभ, द्वेष, अहंकार, गर्व, इत्यादी.  त्याची ही निरागसता जर का आपल्याला अनुभवायाची असेल तर त्या दृष्टीने वाटचाल करून चांगले तेवढेच स्वीकारा आणि वाईट अव्हेरा. “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेल ही गळे,”  ही अवस्था तुम्हाला ह्या निरागस ‘हसू’चा लाभ नक्की मिळवून देईल आणि त्यावेळेस तुमच्या डोळ्यात जे ‘आसू’ असतील ते तुमच्या आयुष्याचे सार्थक झाल्याची पावती असेल.

            आजच्या आपल्या ह्या धकाधकीच्या काळात, ताण तणावात आपण आपले ‘हसू’ विसरलोच आहोत असे वाटते.  ‘आसू’ मात्र आपल्या संगतीला कायमच असतात.  अर्थात हे चित्र बदलणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे.  अगदी शक्य असेल तिथे व शक्य असेल त्यांनी तर हास्य क्लब संस्थेत जाऊनही, आपली विसरलेली अथवा हरवलेली हास्यकला पुन्हा प्राप्त करून घेण्यास काहीच हरकत नाही. ह्या संस्थांनी खास करून ज्येष्ठांच्या आयुष्यात तर खूपच सकारात्मक बदल घडवून आणले आहेत हे नक्की.

आयुष्याच्या उतरणीला लागला असाल तर शक्य तेवढे आनंदी राहा.  हसण्यामुळे तुम्ही आनंदी आणि समाधानी राहू शकता हे त्रिकालाबाधित सत्य आहे.  आयुष्याची उजळणी करताना आयुष्यात मागे वळून पाहताना जे काही करायचे राहून गेले असेल असे वाटत असेल व आता जर ते करणे शक्य असेल तर तसा प्रयत्न जरूर करून पहा.  कुठे ना कुठे तरी हरवलेली, सुखी, समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली सापडून जाते आणि उर्वरित आयुष्य सुखात घालवते.  

“हसाल तर असाल”, असे म्हणलो तरी काहीच हरकत नाही. माझ्या कवितेच्या ओळी मला ह्या निमित्ताने फारच समर्पक वाटतात,

आयुष्य इतकंही सोपं नसतं, जितकं आपल्याला दिसत असतं,
आयुष्य इतकंही अवघड नसतं, जितकं आपण करून ठेवलेलं असतं...

            मंडळी मी नुकताच वयाच्या साठीत प्रवेश केला आहे.  गेले तीन वर्षे झाली मी स्वेच्छा निवृत्ती घेऊन उर्वरित आयुष्याचा सकारात्मकतेने आनंद घेतो आहे.  मला पन्नाशीत माझ्यातील कवी सापडला व पुढे ह्याच कवीने माझ्यातील लेखकाला जन्म दिला.  मला माझ्या सुखी, समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली जरा उशीराच पण पन्नाशीत मिळाली, पण कुलूप मात्र वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी सापडले.  उशिरा का होईना मला कुलूपही मिळाले आणि अजिबात वेळ न दवडता मला सापडलेल्या गुरुकिल्लीचा उपयोग करून माझा साहित्य क्षेत्रातील प्रवास सुरु करून मी नव्या उमेदीने आयुष्याची वाटचाल करायला सुरवात केली आहे.  ह्याचा परिणाम असा झाला की, नुकतीच माझी सातवी साहित्यसंपदा “अनोख्या रेशिमगाठी” ही कादंबरीही प्रकाशित झाली. मला माझेच हे उदाहरण द्यावेसे वाटले त्याचे कारण म्हणजे, वर नमूद केलेल्या सगळ्यात अनुभवातून मी गेलेलो आहे.  आयुष्याच्या भट्टीत तावून सुलाखून निघालो आहे.  माझे हे अनुभव जर का तुमच्यात थोडीफार सकारात्मकता जागृत करण्यासाठी उपयोगी पडली, तरी माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे वाटेल.

          कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले,
          इतकी आसवे ओघळीत की, आसवांनाही रडू आले....

            जगण्यासाठी ‘हसू’ आणि ‘आसू’ दोन्ही तितकेच जरुरी असतात.  पण त्याचे योग्य ते प्रमाण आणि उपयुक्तता ही आयुष्याला आकार देण्यासाठी गरजेची वाटतात. एक आहे की दुसऱ्याच्या हरण्यावर ‘हासू’ नका आणि स्वत:च्या दु:खावर ‘आसू’ गाळत बसू नका.  ह्या जगात आनंद आणि समाधान कुठल्याही बाजारपेठेत विकत मिळत नाही.  ते विकतही घेता येत नाही.  ते आपण आपल्या कर्तृत्वाने आणि सिद्धीने मिळवायचे असते हेच काय ते सत्य आहे.

‘हसू’ने अहंकार जागृत होऊ देऊ नका आणि ‘आसू’ ने नकारात्मकता.  जशा रक्तात लाल पेशींची गरज असते तशीच पांढऱ्या पेशींचीही गरज असते हे लक्षात असू द्या. दोन्ही पेशींचे प्रमाण ठरलेले आहे व त्याचे योग्य व अयोग्य प्रमाण आपल्या तब्बेतीवर परिणाम अथवा दुष्परिणाम करतात, तसेच ‘हसू’ आणि ‘आसू’ चे ही आहे.  त्यामुळे एका डोळ्यात ‘हसू’ असेल तर दुसऱ्या डोळ्यात ‘आसू’ ही ठेवा. ज्याला ह्या दोन्हीचा ताळमेळ साधता येतो तो आयुष्यात कधीच दु:खी कष्टी राहत नाही.

‘संवेदनशील ‘हसू’ आणि कृतीशील ‘आसू’ ही समृध्द जगण्याची रीत आहे.’  एक लक्षात ठेवा, अती ‘आसू’ तुमचे ‘हसू’ करते.  तसेच अती ‘हसू’चे शेवटी ‘आसू’त रुपांतर होते.  आपल्या आजूबाजूला सगळीकडे नकारात्मकता इतकी ठासून भरलेली आहे की तुमच्यातली सगळी शक्ती त्याच्याशी लढण्यातच वाया जाते.  त्यामुळेच नकारात्मकतेला सकारात्मकतेने सामोरे जा.  ‘तुमचे ‘हसू’ हीच तुमची शक्ती आहे आणि ‘आसू’त तुमची भक्ती आहे.’


रवींद्र कामठे.
(रवींद्र कामठे यांची 'तारेवरची कसरत', 'अनोख्या रेशीमगाठी', '' आदी पुस्तके 'चपराक'ने प्रकाशित केली आहेत.)
हा लेख साहित्य चपराक, दिवाळी अंक २०२३ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

Saturday 10 June 2023

विठ्ठला.


वैष्णवांच्या सोहळा देहू आळंदीयेथून पंढरीस पांडुरंगाच्या भेटीस निघालाय. त्या निमित्ताने विठ्ठल रखुमाई चरणी माझी ही एक रचना सादर करतो. जय हरी विठ्ठल.
https://youtu.be/x2_OXrBgbfY

Tuesday 7 March 2023

तळजाई वनातली ती सांजवेळ

तळजाई वनातली ती सांजवेळ










तळजाई वनातली ती सांजवेळ https://ravindrakamthe.blogspot.com/2023/03
अहाहा...
आजची (मंगळवार, ७ मार्च २०२३) तळजाई वनातली ती सांजवेळ केवळ अविस्मरणीय अशीच म्हणावी लागेल. कालच होळी झालेली. त्यामुळे वातावरण थोडेसे तप्तच होते. परंतू अवकाळी पावसाचे सावटही होते. ऐन होळीच्या वेळेस संध्याकाळी पुणे शहरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला होताच. अजून दोन तीन दिवस तो येईल असा हवामान खात्याचा अंदाजही होता. तसा तो काल आलाही. आजकाल हवामान खात्याचे अंदाज खरे ठरायला लागलेत बुवा !
आज सगळीकडे तरुणाईची धुलवडीच्या नावाखाली रंगपंचमीची खेळण्याची लगबग होती. हवेत थोडासा उकाडा होता. तीनसाडेतीनलाच वातावरण थोडेसे ढगाळ व्हायला लागले होते. मी, वाघबकरी’ चहाचे घुटके घेत विचार करत होतो की, आज संध्याकाळी पावसाने घोळ घालायच्या आत आपली तळजाईची रतीबाची पायपीट उरकून घ्यावी. म्हणजे उगाच खाडा नको. "आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास" असे व्हायला नको, मनातल्या मनात असे घोकत घोकत जायच्या तयारीला लागलो. त्याचं काय आहे, सकारात्मक विचार केला की सगळे कसे मनासारखे घडते !
बरोबर चारला म्हणजे रोजच्यापेक्षा पाऊण तास आधीच तळजाईला जायला निघालो. अर्थातच बायको घरी नसल्यामुळे गपगुमान चारचाकी काढली. एका दृष्टीने पाऊस आला तरी वांधे होणार नव्हते. जय्यत तयारीनीशी म्हणजे पावसात भिजू नये व चिखल उडू नये म्हणून अर्धी विजार (हाफपँट) घातली. खास चालण्यासाठीचे घेतलेले बूटही थोडेसे भीतभीतच घातले. पावासात भिजले तर काय ह्या काळजीपोटी हो ! पैशाचे पाकीट आणि भ्रमणध्वनी एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून विजारीच्या खिशात कोंबला. कानात कापसाचे बोळे कोंबले (हो मला थंड हवेचा त्रास होतो म्हणून काळजी घ्यावी लागते). डोक्यावर बफ अर्थात टोपडे चढवले (टक्कलही झाकले जाते आणि थंडीपासून संरक्षणही होते). रोजची २०० मिलीची खिशात मावणारी प्लास्टिकची पाण्याची बाटली (हो पाण्याचीच) घेतली, उगाच शंका नको. "ती" सोडून आता सहा वर्षे झालेत. न विसरता छोटी छत्री घेतली, जी माझे पावसापासून बचाव करणार होती. तोंडाला मास्कही न विसरता लावला.
तुम्हाला वाटेल मी काही युध्दाला वगैरे निघालो की काय ! पण त्याचं काय आहे मंडळी, ह्या जगात आपणच आपली काळजी घ्यायची असते. कारण सर्दी, पडसे, ताप, मनस्ताप वगैरे वगैरे जर काही झालेच तर आपले शरीरभोग आपल्याच भोगावे लागतात की नाही ! म्हणून हा सगळा जामानिमा करुन ‘कामठे’ सरदार तळजाईच्या वनात रोजची अडीच किलोमीटरची पायपीट करायला निघाले होते. होय मी गेले दोन महिने झाले अगदी नित्यनेमाने तळजाई वनात जातो आहे. तेवढाच चालण्याचा व्यायामही होतो व जरासे मोकळ्या हवेत फिरल्याचे समाधानही लाभते. त्याचं काय आहे, पूर्व तयारीनीशी केलेली कुठलीही गोष्ट कधीच वाया जात नाही.
वाटेत तळजाई वसाहतीमधून जावे लागते त्या रस्त्यावर तिथली पोरं-पोरी, कुठल्याशा पांढऱ्या शुभ्र पावडरीने धुलवड खेळत होते. पोत्याने ती पावडर आणलेली होती त्यात ही पोरे रस्त्याच्या मधोमध वाहनांना अडवून ती पावडर अंगावर टाकत होते. माझ्या तर काळजाचा ठोकाचं चुकला होता. मला धुळीची व रंगाची अॕलर्जी आहे. असो. नशिबाने मी गाडीत होतो व नेहमीप्रमाणे काचा बंद होत्या म्हणून वाचलो. तरी पोरांनी गाडीवर ती पावडर उधळीच. मी हाॕर्न वाजवून निषेध नोंदवला व बाजूला व्हायला सांगितल्यावर त्यांच्यातल्या एका सुज्ञ मुलाने माझ्या गाडीला वाट करुन दिली. फार काही गडबड न होता सुटलो एकदाचा. हुश्श झाले. पण पुढे अशीच भरपूर रंगलेली भुते-भुतीणी दुचाकीवरुन बागडत होते. काही टोळक्यांनी तर तळजाईच्या गेट बाहेरही धुळवडीचा खेळ मांडलेला होता. परंतू ते बाकी कोणाला त्रास देत नव्हते हे एक बरं होते.
ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, बिचकतं बिचकतंच बरोबर चार वाजून पाच मिनिटांनी मी तळजाई वनाच्या फाटकातून आत प्रवेश केला आणि सोसाट्याच्या वाऱ्याला सुरवात झाली. हवामान खात्याचा अंदाज बरोबर निघाला होता आणि पूर्वतयारीनिशी आल्यामुळे मी ही थोडा सुखावलो होतो.
वादळाने आधीच सुरु असलेल्या पानगळतीला उधाण आले होते. मळलेल्या वाटांवर पानांचा खच पडत होता. पन्नास मीटर पुढे गेलो असेल नसेल, तेवढ्यात ढगांचा प्रचंड गडगडाट सुरु झाला, विजांचाही कडकडाट सुरु झाला. विजा तर अशा चमकत होत्या की अंगावर पडते की काय अशी भीती वाटत होती. आज सणाची सुट्टी असल्यामुळे काही कुटुंबेही आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना घेऊन आलेली होती. त्यांची थोडी घाबरगुंडीच उडाली होती. अशा वातावरणात एकदम धुवांधार पावसाला सुरवात झाली.
सुरवातीला तळजाईच्या वनातल्या पानगळतीवर पडणाऱ्या पावसाने एक वेगळाच कुंद दर्प पसरला होता. त्यात अंधारुन आल्यामुळे व अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे एक फुटावरीलही काही दिसत नव्हते. अशातच मी छत्री काढली व तसाच पुढे चालू लागलो. थोडा पुढे गेल्यावर वनात नवखे असलेले एक कुटुंब घाबरुन आसरा शोधत होते व एका पडक्या घरात जायला निघाले होते. मी त्यांना हाका मारून तिथे जाऊ नका सुचवले. कारण अशा ठिकाणी विंचू काट्याचे भय असते. मागच्याच आठवड्यात मला दोन वेळा पडलेल्या पानांमध्ये व बांबूच्या झाडांवर साप दिसलेला. तसेच वनातल्या एका बागेच्या बाजूला जथ्थ्याने मोरही दिसतात. त्या कुटुंबाला माझ्या बरोबर चला सांगितले व जवळच असलेल्या ध्यानमंदिराच्या शेड मध्ये नेले व तिथेच थांबायला सांगितले. त्यांनी माझे आभार मानले.
आता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. मातीचे रस्ते असल्यामुळे चिखल झाला होता व त्यामुळे पायही घसरायला लागले होते. थोडा संयम ठेवून अजिबात शूरपणा न करता, मी ही गपगुमान पावसाचा जोर कमी होईपर्यंत तिथेच थांबायचे ठरवले. जवळपास २५-३० जणांनी त्या शेडचा आधार घेतला होता. सगळेजण ह्या अवकाळी आलेल्या पावसाने निर्माण झालेल्या धुंद करणाऱ्या वातावरणाचा आस्वाद घेण्यात व फोटो काढण्यात गुंग झाले होते.
तापलेल्या मातीवर पावसाच्या झालेल्या वर्षावाने थोड्याच वेळात वनात दरवळलेल्या मातीच्या सुगंधाने मंत्रमुग्ध व्हायला झाले होते. मी तर वर्षभराचा सुगंध फुफ्फुसात भरुन घेतला व पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर छत्रीला भिजवायचे ठरवून तसाच पुढे रोजच्या अर्ध्यातासाच्या पायापिटीला निघालो. न राहवून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला भ्रमणध्वनी बाहेर काढला व हे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात टिपले.
बराच वेळ मी एकटाच चालत निघालो होतो कारण फक्त माझ्याकडेच छत्री होती. थोडासा पुढे गेल्यावर वनकर्मचारीवर्गाची एक चेकपोस्ट लागते, तिच्यात नेहमी फिरायला येणारी बरीच मंडळी आसऱ्याला उभी होती. त्यातील एक काका माझ्याकडे पाहून हसले, व मला म्हणाले;
“तुम्हाला बरे माहित होते की आज पाऊस येणार आहे ते, छत्री घेऊन आलात म्हणून विचारले.”
मी ही त्यांना हसून उत्तर दिले की;
“आजकाल हवामान खात्याचा अंदाज अगदी अचूक असतो बरका, कालच बातम्यांमध्ये पुण्यात पुढील तीन चार दिवस पाऊस पडणार आहे असे सांगितले होते”.
काका माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसले, व म्हणाले;
“पुणेकर दिसताय.” “हजर जबाबी आहात.” (बहुतेक त्या काकांनी मला ध्यानकेंद्रात थांबलेलो असताना प्लास्टिकच्या पिशवीतून भ्रमणध्वनी काढताना पाहिलेले असणार !)
ह्या धुंद वातावरणातही थोडासा हशा पिकला आणि आमची स्वारी पुढे चालायला लागली.
परतीच्या वाटेवर निघालो तोवर पाऊस थांबला होता. जाता जाता पावसाने माझे एक फार मोठे काम केले होते, ते म्हणजे, माझ्या गाडीवर उधळलेली ती पांढरी पावडर स्वच्छ करून टाकली व माझे गाडी धुण्याचे कष्ट वाचवले होते. परत येताना मात्र मी वाट बदलली व दुसऱ्या वाटेने घरी आलो. उगाच त्या टवाळखोर पोरांच्या वाटेला नको जायला असे म्हणून......
एवढ्या पावसातही मी ठरल्याप्रमाणे रोजचा चालण्याचा कोटा पूर्ण करूनच तळजाई वनातून घरी परतलो. ते ही मनात एक सुखद गारवा आणि फुफ्फुसात मातीचा सुगंध घेऊनच. मानतल्या मनात किशोरदांचे, " रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन...." गुणगुणतच .
एकंदरीत काय तर, जर का आपण एखादा संकल्प केला असेल तर कितीही अडचणी आल्या तरी पूर्ण करायचा निश्चयच करायला हवा, जो मी केला आहे.
आश्चर्य म्हणजे आज एकही मोर दिसला नाही. तरीही माझ्या मनातील मोराचा पिसारा मात्र फुललेला होता. लतादीदींच्या "बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला" ह्या सुमधूर गाण्याची आठवण झाली.
सर्वाना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा.
रवींद्र कामठे.
मंगळवार, ७ मार्च २०२३.
आजचा हा सुखद आणि अविस्मरणीय अनुभव नक्की वाचा आणि ताजेतवाने व्हा.

Friday 24 February 2023

“शेजार धर्म, हा तर माणुसकीचा धर्म”

 “हा तर माणुसकीचा धर्म”

वाडा संस्कृती म्हणजे आपल्या पुण्याची एक वेगळी ओळख होती.  शेजारीपाजारी सगळे एकमेकांना इतके जीव लावत असत की जसे काही ह्या सगळ्यांचे जन्मोजन्मीचे रक्ताचे नातेच आहे.  एखादा बाका प्रसंग आला तर सगळे कसे अगदी सख्ख्यासारखे धावून जायचे व मदत करायचे.  सुखात आनंदही तितकाच मजेत लुटायचे.  

"थिंक पाॕझिटिव्ह" ह्या मासिकाचा विषय होता 'सगळ्यात जवळचं नातं शेजारी'.  त्यावर आधारित माझा हा तर माणुसकीचा धर्म हा लेख प्रकाशित झाला आहे.  तो जरूर वाचा व मला तुमचा अभिप्राय कळवा.  "थिंक पाॕझिटिव्ह" संपादक मंडळाचे मनापासून आभार.






माझे बालपण पुण्यातील डेक्कन जिमखान्या जवळील पुलाच्या वाडीत गेले. चाळीवजा घरात आमचे अतिशय सुखाचे, समाधानाचे आणि तितकेच स्वाभिमानी आयुष्य गेले.  मी, आई-वडील (आता हयात नाहीत), आम्ही तीन भावंडे आणि तीन चुलत काका काकू, चुलत भावंडे, तसेच आमचे सख्खे शेजारी आबा आणि ताई व त्यांची चार मुले (तीन मुली व एक मुलगा).  शेजारी, समोर आणि आजूबाजूला सगळी कष्टकरी माणसे रहात होती.   आम्हा सगळ्यांचेच जेमतेम दीड-दोन खोल्यांचेच घर, त्यात घरातच मोरी असलेले असे आगळे वेगळे विश्व होते, पण सुखी समाधानी होते.

आमच्या शेजारचे आबा आणि ताई (आता हयात नाहीत) अतिशय हुशार, कुशल व तत्वज्ञानी होते.  त्यांच्याकडून मला तर खूप बाळकडू मिळाले आहे.   सुसंस्कृतपणाचे सर्व संस्कार माझ्यावर त्यांच्यामुळेच झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही.  त्या काळी, म्हणजे माझ्या जन्मानंतर (१९६३) नंतरचा काळ म्हणजे सर्वच बाबतीत सुवर्णकाळ होता असेच आता म्हणावे लागले.  अगदी चित्रपट सृष्टीत त्याचे प्रतिबिंब जाणवत होते.

एक एक प्रसंग व घटना स्मृतीपटलावर क्षणार्धात अवतीर्ण होतात.  आमच्या घरांना दारे होती, खिडक्या होत्या, परंतु ते सर्व फक्त आणि फक्त उशीरा मध्यरात्रीनंतर लावण्यासाठी !  ते ही घर मुठा नदी किनारी असल्यामुळे थंडीवाऱ्या पासून संरक्षण म्हणून !  मला तरी घराला दिवसाढवळ्या कधी कुलूप लावलेले आठवत नाही.  शेजारीपाजारी सगळे एकमेकांना इतके जीव लावत असत की जसे काही ह्या सगळ्यांचे जन्मोजन्मीचे रक्ताचेच नाते आहे असे भासे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक वाड्यात अथवा चाळीत फक्त एकच शौचालय असायचे.  मंडळी, माझ्या अनुभवातून सांगतो, ज्यांनी ह्याचा अनुभव घेतला आहे ना, त्यांना आयुष्यात कधी अहंकाराने ग्रासले नसणार ह्याची मला खात्री आहे.  त्यामुळेच की काय, एकमेकांची सुख दु:खे समजून उमजून घेता येत असतील असे वाटते. असो.

शेजार असावा तर कसा असावा ह्याचे आबा आणि ताई उत्तम उदाहरण होते.  शाळेतून दुपारी घरी आलो आणि समजा घरात कोणी नाही असे झाले तर, ताई आवर्जून लक्ष देणार.  मुळातच आमच्या घरात कोणी नाही व भूक लागली आहे असे वाटले तर सरळ ताईंकडे जाऊन निसंकोचपणे खायला मागायचो.  त्याही तितक्याच आपुलकीने व मायने त्यांच्याकडे घरात जे काही केलेले असेल ते देण्यास कचरत नव्हत्या. कालांतराने आबा आणि ताईंशी आमचे कायमचेच नातेच जुळले. म्हणजे धाकट्या भावाने त्यांच्या धाकट्या मुलीशी लग्न करून सोयरिक साधली व एकमेकांचे शेजारी असलेले आमचे नाते अजून घट्ट होऊन रक्ताचे नाते झाले.

माणुसकीने व आपुलकीने समृद्ध असलेली अशी माणसे, मी जसजसा मोठा होत गेलो व काळ बदलत गेला तसतशी अदृश्यच व्हायला लागली होती.  एकंदरीत आमच्या वाडीतली सगळीच माणसे खूपच चांगली होती. थोडीफार जी काही अपवाद होती ती तशीही वाळीतच टाकल्यासारखीच होती.  

आसपासच्या घरातला घरोबा तर अगदी दृष्ट लागण्यासारखा होता.  एखाद्याच्या घरात काही कार्य असले अथवा काही अडचण आली किंवा एखादा बाका प्रसंग आला तर सगळे कसे अगदी सख्ख्यासारखे धावून जायचे व मदत करायचे व सुखात आनंदही तितकाच मजेत लुटायचे.  हीच काय ती वाडा संस्कृती म्हणजे आपल्या पुण्याची एक वेगळी ओळख होती.  

१९९० च्या नंतर म्हणजे जसजशी वाडा संस्कृती लयाला जाऊन अपार्टमेंट अथवा फ्लॅट संस्कृती आली तसतशी माणसे स्वत:ला आपापल्या चौकटीच्या आत खुराड्यात कोंडून घेऊ लागली.  माणुसकी, आपुलकी तर तोंडी लावायलाही उरली नाही.  

६०-७० दशकात चाळी आडव्या होत्या, त्यात माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, माया, ममता, स्नेह, सद्विचार, भक्ती, शक्ती, अगदी ठासून भरलेली होती आणि त्यामुळे माणसे मनाने समृध्द, शरीराने सुदृढ व पैशाने समाधानी होती.   पण, जस जसा काळ बदलत गेला आणि उत्कर्षाच्या नावाखाली, ह्याच आडव्या चाळी उभ्या होत गेल्या व गगनाला गवसणी घालायला लागल्या, तसतशी माणुसकी गळून पडली, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम इत्यादी भावभावनांच्या अपुऱ्या प्राणवायू पायी ही माणसे गुदमरून जाऊ लागली आणि त्यांची मनेही कोत्या वृत्तीची व संकुचित होत गेली.

सिमेंटच्या चार भिंतींच्या आत कोडून घेतलेले हे जीव, एक एका मजल्यावर चार-आठ शेजारी असूनही त्याचे महत्व न जाणणारे वाटतात.   मला माझी स्पेस हवी आहे असे म्हणून मनातल्या मनात कुढत बसणारे आणि आपणहून ओढवून घेतलेल्या ह्या परिस्थितीवर मात करण्यातच आपली हयात घालवून आयुष्याची फरफट करुवून घेणारे दुदैवी जीव आहेत असेच मला तरी वाटते.  अपवाद असतीलही, परंतु ते ही त्यांचे संचित अथवा प्रारब्ध असावे म्हणुनच !

शेजारधर्म काय असतो व तो कशाला म्हणतात, ते न जाणणारी एक गगनचुंबी संस्कृती उदयास आली व तीच आपली खरी संस्कृती असल्याची भ्रामक कल्पना जन्म घेऊन आकारास आली.  माझा गगनचुंबी इमारतींना अथवा प्रगतीला अजिबात विरोध नाही, परंतु त्यांच्यातल्या लोप पावत चाललेल्या शेजारधर्माला आहे.  नाही म्हणायला काही उदाहरणे असतीलही, परंतु अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच सकारात्मक उदाहरणे सापडतात व त्याचे मनोमन दु:ख होते. असो.

लग्नानंतर मी धनकवडीला राहायला आलो.  वाडा संस्कृतीत व एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला मी थोडा ओशाळलो होतो, कारण नाही म्हणायला ही तर स्वतंत्र घरांची (बंगल्यांची) सोसायटी होती.  इथे प्रत्येकाच्या घराला कुंपण होते. फारसे कोणी कोणाशी बोलताना दिसत नव्हते.  सदनिकेत आपल्या शेजारी कोणीतरी राहते आहे ह्याची तरी जाणीव होत असेल.  इथे तर प्रत्येकाच्या घरामध्ये चारही बाजूंनी कमीतकमी पाच ते दहा फुटांचे अंतर होते.

अर्थात हे दृश्य अंतर जरी असले तरी ते आपल्या स्वभावामुळे व माणुसकीने ते नक्कीच कमी करता येऊ शकते, हीच काय ती एक आशा मला होती आणि झाले ही तसेच!  इथे राहणारे सर्वच जण आमच्यासारख्या चाळ अथवा वाडा संस्कृतीमधूनच आलेले असल्याचे जाणवले.  आमच्या शेजारी बाई आणि काका व त्यांची दोन मुले असे एक कुटुंब राहायला आले आणि लवकरच आमची चांगली गट्टी जमली. तसेच आमच्या गल्लीतील सर्वच घरांशी आमच्या स्वभावामुळे स्नेह वाढला होता.

बाईंच्या घरात एक बालकमंदिर चालवायच्या व संसाराला हातभार म्हणून पाळणाघरही चालवायच्या. त्यामुळे बऱ्यापैकी वर्दळ होती व चांगली माणसे येत जात होती.  ज्यांच्याशी ओळख होत होती. हळू हळू बाईंच्या कुटुंबाशी आमची चांगली मैत्री झाली व एक चांगला शेजारी मिळाल्याची अनुभूती लाभली.   त्याचे कारण लग्नानंतर लगेचच आम्हाला कन्यारत्न झाले आणि तिची संपूर्ण जबाबदारी आमच्या ह्या सख्ख्या शेजारी बाईंनी घेतली.  त्या जरी पाळणाघर चालवत असल्या तरी आमच्या मुलीसाठी ते तिचेच घर होते.  तिचे सर्व लाड, कोड कौतुक, संगोपन, त्यांनी स्वत:ची नात असल्यासारखे अगदी आनंदाने केले.  त्यामुळे मला व बायकोला आपापली नोकरी सांभाळून सुखाचा संसार करता आला. ही तर नियतीचीच योजना होती असे वाटते.   कारण आमच्या मुलीच्या जन्मानंतर जेमतेम तीन वर्षातच तिचे आजी-आजोबा देवाघरी गेले व त्यांची कमी बाईंनी भरून काढली, असेच म्हणावयास हवे.  त्यांच्यासाठी हा नुसताच शेजारधर्म नव्हता तर माणुसकीने ओसंडून वाहणारा धबधबाच होता.

आमच्या सोसायटीमधील बाकीच्या लोकांना आमच्या ह्या नात्याचा खूप हेवा वाटतो इतका आमचा शेजार आम्हाला प्रिय आहे.  सुखदु:खात आम्ही कायमच एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलो व अजूनही असतो.  त्याचे एक कारण होते, की कधीही रात्री अपरात्री काही जरी समस्या आली तरी सर्वात प्रथम एकमेकांसाठी धाऊन जाणारे शेजारीच असतात.  बाकी नातेवाईक किंवा आप्तेष्ट मंडळी ही नंतर येतात ! पण जी काही तातडीची मदत एक शेजारधर्म म्हणून लागते, ती तर विनासायास कुठलाही संकोच मनात न ठेवता शेजारीच करतात. हे ही लक्षात घ्यायला हवे.  त्यामुळेच चांगला शेजार असणे व तो टिकवणे ही अपरिहार्यता आहे असे माझे ठाम मत आहे.

आता आमचा हा घरोबा म्हणा (शेजार) नाते म्हणा, इतका तावून सलाखून निघाला आहे की, एकमेकांच्याशिवाय आमचे पानही हालत नाही अशी परिस्थिती आहे.  गेल्या ३५ वर्षात आम्ही शेजारी न राहता एकमेकांच्या घरात व मनात राहायला लागलो आहोत हे दोन्ही कुटुंबाना जाणवते.  त्याला कारणही तसेच घडले.  ते म्हणजे बाईंची नातवंडे मोठी झालीत व घर लहान पडायला लागले म्हणून बाईंच्या मुलाने आणि सुनेने जवळच दुसरे एक मोठे घर भाड्याने घ्यायचे ठरवले.  ती त्यांची वैयक्तिक व स्वाभाविक अडचण होती.  पण आपला इतके वर्षांचा शेजार व सहवास आपल्यापासून दूर जाणार ह्या जाणीवेने आम्हाला दोन दिवस झोपच लागली नाही.

विचार करा शेजारी असले तरी किती जिव्हाळ्याचे नाते असेल आमचे !  शेजाऱ्यांशी असे नाते आजकालच्या काळात फार कमी लोकांमध्ये दिसते. कसेबसे एक वर्ष आम्ही त्यांच्या शेजाराविना काढले.  त्यांनी शेजारील घर भाड्याने दिले.  परंतु त्यांच्या भाडेकरूंशी आमचा अजून एवढा सलोखा नाही होऊ शकला.  त्यातल्या त्यात त्यांच्या चार वर्षांच्या मुलाशी मात्र आमची चांगलीच गट्टी जमली.

असेच एक वर्ष निघून गेले. एक वर्षभरात बाई आणि त्यांचे कुटुंब परत आपल्या शेजारी राहायला येतील व पुन्हा आपले जुने दिवस परत येतील ह्या आशेवर आम्ही बसलो होतो.  इतक्यात बाईंच्या मुलाने सहकारनगरला तीनबेडरूमची सदनिका विकत घेतल्याची आनंदाची वार्ता सांगितली.  शेजारचे घर ते विकणार नव्हते पण उत्पन्नाचे साधन म्हणून भाड्याने देत राहणार आहेत म्हणून सांगितले.

त्यादिवशी माझी व बायकोच्या मनाची द्विधा अवस्था झाली होती.  जीवाची घालमेल किती झाली होती काही विचारू नका.  एक मन त्यांच्या ह्या उत्कर्षाने खूपच आनंदित झाले होते, तर त्याचे वेळेस दुसरे मन त्यांचा कायमचा सहवास आपल्याला लाभणार नाही ह्या विरहाच्या भावनेने थोडेसे खट्टू झाले होते.

आपले सख्खे शेजारी आपल्याला कायमचे दुरावणार आहेत ह्या भावनेने आम्ही दोघे त्या रात्री झोपूच शकलो नाही.  उलट आपणही आपले हे घर विकून बाईंच्या शेजारी तीनबेडरूमची सदनिका विकत घेऊन राहू, पण इथे नको ! असे आमचे आपले मध्यरात्रीपर्यंत चालले होते.   आमचे आम्हालाच कळत नव्हते की हे असे काय होते आहे.  मी तर चक्क रात्री २ वाजता समाज माध्यमावर शोधून एका सदनिकेसाठीची चौकशीसाठी निरोपही देऊन टाकला. तसेच सकाळी सकाळी उठून एक दोन मित्रांना फोन करून आम्हाला सहकारनगर भागात तीनबेडरूमची सदनिका हवी आहे, असे सांगितले.

बाईंच्या मुलालाही फोन करून तुझ्या शेजारी अजून एक सदनिका आहे का त्याची चौकशी करायला सांगून मोकळे झालो.  अर्थात हा सगळा जो काही घोळ होता ना तो आमचे आमच्या सख्ख्या शेजारी असणाऱ्या बाईंवर व त्यांच्या कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी होता, हे जाणवत होते. विचार करा मंडळी, माणसांचा सहवास हा आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे ते !

आधुनिकतेच्या नावाखाली सध्याचा चाललेला उथळपणा व सद्विवेक बुद्धीलाही अचंबित करून सोडणारा अविवेकी विचार!  भौतिक सुखाच्या नावाखाली वाहवत जाणारी ही पिढी.  त्यावर अवलंबून असणाऱ्या पुढील पिढ्यांचे भविष्य जाणवून, त्याचा वर्तमानावर नक्कीच परिणाम होऊन, आपला भूतकाळ किती सुखकारक व अल्हाददायक होता याची जाणीव होते.

त्यामुळेच की काय कधी कधी आपण पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करून आपले व आपल्या संस्कृतीचे किती नुकसान करून घेत आहोत हेच कळत नाही. म्हणूनच;  मला वाटते की, “शेजारधर्म हाच काय तो खरा माणुसकीचा धर्म आहे”. जो फक्त माणसांनाच नव्हे तर देशांनाही लागू होतो.

रवींद्र कामठे.

Saturday 11 February 2023

“कधीही न हरणारे – खंदारे, ज्यांचे ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ आहे.’


सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी श्री. रविंद्र खंदारे सरांच्या, चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या "संघर्ष हेच सामर्थ्य" ह्या अप्रतिम आत्मचरित्रावरील माझे मनोगत आज दैनिक महाराष्ट्र न्यूज ने प्रकशित केले.  धन्यवाद महाराष्ट्र न्यूज आणि अभिनंदन खंदारे सर आणि घनश्याम पाटील सर. 
रसिकहो, तुम्ही हे आत्मचरित्र नक्की वाचा. तुम्हाला का व कशासाठी जगायचे व कसे जगायचे ह्याची प्रेरणा मिळेल. पुस्तकासाठी ७०५७२९२०९२ वर चपराक प्रकाशनला संपर्क करा.
“कधीही न हरणारे – खंदारे, ज्यांचे ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ आहे.’

 मी आंधळा आहे, परंतु देवाने मला दृष्टी दिली आहे.  मला हृदय नसून, माझ्याकडे काळीज आहे.  मला हात नसूनही, माझ्यात देण्याची क्षमता आहे.  मला पाय नाहीत, तरीही माझ्याकडे हिमालय सर करण्याची जिद्द आहे. माझ्या व्यथेत वेदना जरी असली तरी, माझ्या व्यथेला स्वाभिमानाची झालर आहे.  नकारात्मकतेवर सकारात्मकतेनेच विजय मिळवता येऊ शकतो व आपल्या संघर्षाला घाबरुन न जाता, त्याचे रुदन न करता, संघर्षाचाच तलवारीसम उपयोग करून त्याचे सामर्थ्यात रुपांतर करुन घेऊन स्वतःलाच नव्हे, तर संपूर्ण परिवाराला अभिमान वाटावा असे आयुष्य आजवर मी जगत आलो आहे व इथून पुढेही असेच जगत राहणार आहे. 

 


मंडळी हे माझे विचार नाहीत तर माझ्या एका साहित्यिक मित्राच्या आत्मचरित्रातून व्यक्त झालेल्या ह्या भावना आहेत.  मी फक्त त्या संक्षिप्त स्वरुपात तुमच्या समोर माझ्या मनोगतातून मांडत आहे.  सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (माध्य) रविंद्र खंदारे ह्यांचे “चपराक प्रकाशन”ने प्रकाशित केलेले “संघर्ष हेच सामर्थ्य” हे आत्मचरित्र माझ्या वाचनात आले आणि आपसूकच मला माझे मनोगत मांडावेसे वाटले.  “संघर्षाने आपल्या परिसीमा ओलांडल्या की, त्याचे सामर्थ्यात रुपांतर होत असावे,” असे हे आत्मचरित्र वाचताना उमगले. वास्तविक पाहता, ह्या साहित्य संपदेवर व्यक्त होण्यासाठी शब्द तर अपुरे पडतात, परंतु मनातल्या भाव-भावनाही तोकड्या पडतात.

 एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, परिवाराच्या नशिबात नियतीने इतका पराकोटीचा संघर्ष लिहिलेला असतो व त्या संघर्षालाच सामर्थ्य समजून, ही व्यक्ती आणि त्याचा परिवार आपले आयुष्य यशस्वी करुन समाजा समोर एक आदर्श निर्माण करतात, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रविंद्र खंदारे सर व त्यांचे “संघर्ष हेच सामर्थ्य” हे आत्मचरित्र होय.

२१ जानेवारी २०२३ला “चपराक प्रकाशन” ने त्यांच्या "संघर्ष हेच सामर्थ्य" ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशन करून साहित्य विश्वाला खूप मोलाचा ऐवज दिला आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.  सर्वात महत्वाचे म्हणजे, सध्याच्या काळात जिथे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी नकारघंटा काही मंडळी वाजवत असताना, चपराकच्या घनश्याम पाटील सरांनी ह्या साहित्य संपदेची एका आठवड्यात दुसरी आवृत्ती प्रकाशित करून साहित्य विश्वाला एक सुखद धक्काच दिला आहे.  खंदारे सरांचे हे आत्मचरित्र म्हणजे संघर्षाचा मानबिंदूच असून, वाचकांचा त्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कदाचित नवीन उच्चांक प्रस्थापित करेल असे मला वाटते.  

२८८ पृष्ठांमधील प्रत्येक शब्दात संघर्ष इतका ठासून भरला आहे की, मला तरी हे पुस्तक एका बैठकीत वाचणे शक्यच झाले नाही.  वादळी बालपणापासून सुरु झालेला संघर्षाचा प्रवास एक एक प्रकरण करत पुढे सरकत जातो तस तसे आपण लेखकाच्या आत्मकथनाशी इतके एकरूप होऊन जातो की, आपल्यालाही हा आपल्याच आयुष्याचा संघर्ष आहे व तो आपणच करतो आहोत असे वाटायला लागते.  मनावर भावनेचे कोंदण चढायला सुरवात होते. 

उदाहरण द्यायचे झालेच तर, लेखक सहा महिन्याचे असताना त्यांचे आई वडील, त्यांना एकट्यालाच झोपडीत ठेऊन जायचे.  बाळ आजूबाजूला कुठे जाऊ नये म्हणून चक्क त्याच्या पायाला दोरीने खांबाला बांधून ठेवत असत. बिचारे दिवसभर रडून रडून थकून जात.  दुपारी कधीतरी आई घरी येऊन त्याला दूध पाजून परत कामावर जात असे.  का तर त्याला सांभाळायला घरात कोणी नसायचे.  आहे की नाही विलक्षण संघर्ष ! 

तसेच शालेय जीवनात चक्क कचऱ्यातून भंगार गोळाकरून आपल्या कुटुंबाला हातभार लावून स्वत:चे शिक्षण करणारा हा विद्यार्थी, जिद्द, सचोटी, सातत्य, दृढ निश्चय, ध्येयाचा ध्यास, शिक्षणाची आस, कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा, मैत्रीची जाण व समाजाची शान असा आहे.  शाळेसाठी अनवाणी मैलोनमैल केलेली पायपीट, नदी नाल्यांतून पार केलेली अडथळ्यांची शर्यत हे सर्व वाचल्यावर खंदारे सरांना ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जणांशी आधारू’ असेच म्हणावेसे वाटते.   ह्या व अशा कित्येक प्रसंगावरून तुमच्याही लक्षात येईल की, केवढा हा संघर्ष आहे !  भंगाराचेही सोने करणारा हा कलंदर’, पुढे प्रशासनात उच्चतम पदास पोहचतो, हे तर त्यांच्या कष्टाचे चीजच म्हणावयास हवे. 

थोडीसी मानसिक विश्रांती घेऊन पुढील प्रकरणे वाचयला घेतल्यावर वाटते की,  हळूहळू लेखकाचा संघर्ष कमी झालेला असेल.  उलट लेखकाचा जन्मत: सुरु झालेला संघर्ष अजून तीव्र होत जातो.  त्यात त्याच्या भरीला भावंडांचीही भर पडते व लेखक जबाबदारीने अजूनच वाकला जातो.  गाव सोडून शहराकडे आणि कालांतराने पुन्हा गावाकडे रोजीरोटीसाठी धडपड करतो.  त्याचे बालपण, कुमारपण, तारुण्य हे एका लाकडाच्या खोपटातच जाते.  त्याला त्याचे अजिबात सोयर सुतक नसते.  कारण त्याचे ध्येय निश्चित असते.  ते म्हणजे, मी शिकून गुरुजी झालो तर माझ्या कुटुंबाची, परिवाराची गरिबी नष्ट होईल व सर्वांच्या वाट्याला चांगले आणि सन्मानाचे जगणे येईल.  

जगण्यासाठीची व संसारासाठीची तळमळ धडपड पाहून आपलाच जीव कासावीस होतो. एका मागून एक येणाऱ्या संघर्षाची अखंडित शृंखलाच आहे ही.  आपण वाचताना थकतो, मनात कोलाहल उठते. आपण भावुक होतो. आपल्याही नकळत आपले डोळे पाणावतात. आपली दु:खे, वेदना, संकटे, समस्या अगदी किरकोळ वाटायला लागतात आणि खंदारे सरांचे आत्मचरित्र आपलेसे होऊन जाते.

ह्या सगळ्यात लेखकाचे आई वडील, काका काकू, मामा मामी, त्यांचे शाळेतील शिक्षक त्यांना एकच सांगत असत, ते म्हणजे, “चड्डीची ठिगळं काढायची असतील तर, शिकावं लागल.” “दादा तू चांगलं शिक, मोठा हो, गुरुजी हो!”.  लेखकाने स्वत: तर शिकून नाव कमावलेच, परंतु इतक्या विलक्षण व प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या भावडांना तर शिकवलेच शिकवले परंतु आपल्या पत्नीसही लग्नानंतर शिकवून संघर्षाला सामर्थ्य बनवण्याचे बाळकडूही पाजले आहे, हे विशेष.

खंदारे सरांचे हे आत्मचरित्र म्हणजे माणसाच्या नशिबात किती प्रतिकूल परिस्थिती असावी ह्याला काही मर्यादा आहे की नाही असेच सतत वाटत राहते. जीवनात एवढा संघर्ष कोणाच्याही वाट्याला येऊ नये असेच वाटते.  त्यातही सरांची शिक्षणाप्रती असलेली ओढ, तळमळ व ते पूर्ण करून उच्चतम पदावर पोहचून नियतीवर केलेली मात ही आदर्शच म्हणावयास हवी.  बालपणात, कुमारवयात, तारुण्यात, घरात-दारात, गावात-शहरात, शिक्षणात, नोकरीत, स्पर्धा परीक्षेतही फक्त आणि फक्त संघर्षच प्रकर्षाने जाणवतो.  म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, “कधीही न हरणारे-खंदारे”

एखाद्यावर किती संकटे यावीत याची काही मोजमापे आहेत का ?, असेच हे आत्मचरित्र वाचताना वाटते.  खंदारे सरांनी त्यांच्या मनोगता मध्ये नमूद केलेले किशोर कुमारचे “जिंदगी के सफर मै गुजर जातें है जो मकाम, वो फिर नही आते...कुछ लोग, एक रोज जो बिछड जाते है, वो हजारों के आने से मिलते नही....” ह्या गाण्यातले भाव किती समर्पक आहे ह्याची प्रचीती वारंवार येते.  अशी वेळ तर आपल्या वैऱ्यावरही येऊ नये असे वाटले.

जेमतेम चारच दिवसांचे आयुष्य लाभेलेल्या मुलाचे जाणे तर मनाला चटका लावते.  त्यात नंतर पत्नीचे (सविताचे) सततचे आजारपण, त्यातही सरांची नोकरी निमित्त चाललेली भटकंती त्यात आलेल्या अनंत अडचणी, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, त्यातही त्यांचे अखंडितपणे चाललेले शिक्षण, स्पर्धा परीक्षा, मुलीचा (स्वप्नालीचा) जन्म, तिचे खडतर बालपण व त्यात तिला नकळत्या वयातच आलेले शहाणपण. त्यांच्या पत्नीने(सविताने) आजारपणात मानलेली हार आणि अर्ध्यावरच मोडलेला भातुकलीचा डाव.  सर्वात हृदयद्रावक म्हणजे त्याकाळात अगदी लहान असलेल्या चिमुरडीने आपल्या बापाला दिलेला मानसिक व भावनिक आधार व सावरलेले घर, हे सगळे भावनांचे तरंग काळजाला घर करून जातात.

सरांना दुसऱ्या लग्नासाठीची परिवाराने घातलेली गळ, त्याला लेकीने समजुतीने दिलेली साथ व त्यानंतर तिची आपल्या सावत्र आई (माधुरी) बरोबर जुळलेली नाळ व त्यानंतर एवढ्या हालअपेष्टा सहन करत करत, तारेवरची कसरत करत चाललेला संसार.  जरा कुठे संसाराचा गाडा मार्गी लागला असे वाटत असताना, चुलत भावाचे अकाली निधन आणि त्यानंतर त्यांच्या आईने घेतलेला जगाचा निरोप.  हा सगळा संघर्ष वाचताना, माझ्या कवितेच्या चार ओळी ह्या सगळ्यासाठी अगदी योग्य वाटल्या त्या: “कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले.... इतकी आसवे आज ओघळीत की, आसवांनाही रडू आले.”

ह्या आत्मचरित्राच्या सहाय्याने लेखक वंचित अथवा गरीब नव्हे तर दारिद्र्याने ग्रासलेल्या कष्टकरी समाजाचे, शेतकरी कुटुंबाचे, सावकारी विळख्याचे, समाजातील विघातक वृत्तीचे, प्रशासकीय यंत्रणेचे, एक विदारक चित्रच आपल्या समोर उभे करून आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.  त्यातून “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” हा संदेश वाचकांना देण्यात यशस्वी होतो.  हेच तर ह्या आत्मचरित्राचे साहित्य मूल्य आहे असे मला वाटते. 

आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष व वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र तज्ञ कै. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सर नेहमी सांगत असत, की आपले अनुभव आत्मकथन स्वरुपात लिहून ठेवा.  जसा इतिहास समजायला बखरींचा उपयोग झाला तसाच ह्या अनुभवांचा आपल्या भावी पिढ्यांना नक्कीच उपयोग होईल.  अगदी तेच सूत्र खंदारे सरांनी त्यांच्या ह्या आत्मचरित्राचा रूपाने सिद्ध केले आहे.  वास्तविक पाहता, मला तर खंदारे सरांचे हे आत्मचरित्र विद्यापीठाने अभ्यासक्रमात ठेवायला हवे असेच अतिशय प्रांजळपणे वाटले.  खूप काही घेण्यासारखे, शिकण्यासारखे आहे. नीतीमत्ता, निष्टा, सचोटी, स्वाभिमान, अभिमान, कुठल्याही कामाची नसलेली लाज, आपल्या कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा व शिक्षणाची आस आणि त्याचा ध्यास व अजूनही चाललेला संघर्ष.  सर्वकाही अचंबित करून टाकणारे तर आहेच, परंतु मनावर खोलवर सकारात्मक विचार रुजवणारे आहे.

रविंद्र खंदारे सरांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.  विषयाला साजेसे मुखपृष्ठ साकारल्याबद्द्ल राहुल पगारे यांचेही कौतुक.  चपराक प्रकाशनचे व घनश्याम पाटील सरांचेही खूप आभार.

“आयुष्य नेमके आहे कसे?, संघर्ष हेच आयुष्याचे गमक असे.”

 

पुस्तकाचे नाव – “संघर्ष हेच सामर्थ्य”

लेखक – रविंद्र खंदारे

प्रकाशक – घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन (७०५७२९२०९२)

पृष्ठ संख्या – २८८

मूल्य – र. ४००/-

 रवींद्र कामठे

Tuesday 7 February 2023

“बाभूळफुलं – सुख-दु:खाची फुलं”

 “बाभूळफुलं – सुख-दु:खाची फुलं”

माणसाचे आयुष्य तसे पाहायला गेले तर बाभळीच्या झाडासारखेच आहे.  जीवनाच्या फांद्यांवर वाईट प्रवृत्तींचे असंख्य काटे पसरलेले असतात आणि त्यातही माणसाच्या चांगल्या प्रवृतीने म्हणा अथवा चांगुलपणाने काही सुखद फुलेही उमलत असतात.  सुख दु:खाच्या ह्या आपल्या आयुष्यात बरेच काही घडत असते त्याचे चित्रण काही जाणकार मंडळी करून हे अनुभव शब्दांकित करून त्याची गाथा अथवा कथा वाचकांसमोर आणून समाज प्रबोधन करतात.  नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सौ. प्रतिभाताई सुरेश खैरनार यांचा “परीस पब्लिकेशन”ने प्रकशित केलेला “बाभूळफुलं” हा कथासंग्रह माझ्या वाचनात आला आणि मला त्यावर माझे मनोगत मांडण्याची संधी लाभली.

हा कथासंग्रह वाचकाला शेती, माती, नाती, गोती, शेतकरी, गावकरी, कष्टकरी समाजाच्या अस्सल ग्रामीण संस्कृतीची अतिशय प्रांजळपणे ओळख करून देतो असे वाटले.  ग्रामीण जीवन पद्धती, त्यांच्या चालीरीती, रूढी परंपरा व गावकी आणि भावकीही सहजतेने काही कथेतून जाणवते. ग्रामीण संस्कृतीचा आरसाच जणू !  शेतकरी कुटुंबाच्या व्यथा, कथा, समस्या, अस्मानी व सुलतानी संकटाने शेतीमध्ये सातत्याने येणाऱ्या त्रुटीने बेजार झालेला आणि त्यात कर्जाने सावकारी विळख्यात अडकत जाणारा बळीराजा, खजील होऊन जगण्यासाठी तळमळणारा, तडफडणारा, कळवळणारा, तरीही आपल्या काळ्या मातीवर आईगत निष्ठा व माया लावणारा शेतकरी वर्ग ह्या कथांमधून गंभीरतेने प्रतिबिंबित झाला आहे.

परिस्थितीपुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यांच्या कुटुंबाची झालेली अवहेलना, त्यांच्या हाल अपेष्टा, मनुष्यहानीने निर्माण झालेल्या असंख्य समस्या,  आत्मघाताचे कधीही न उकलणारे कोडे, हे विषय अतिशय भावविविशतेने काही कथांमधून मांडून एकप्रकारे बळीराजाच्या विषयाकडे समाजाने गांभीर्याने पाहायला हवे, हेच लेखिकेने ह्या कथा संग्रहाद्वारे सुचविले आहे असे वाटते.

परंपरेचा आपल्यावरील पगडा किती जोरकस आहे हे सुद्धा अगदी सहजपणे प्रतिभाताईच्या काही कथेतून प्रतिध्वनित झाले आहे. तसेच व्यसनांमुळे होणारे कुटुंबाचे व परिवाराचे अपरिमित नुकसानही वाचकांच्या डोळ्यात अंजन घालते.  सावकारी पाश, इनामदारांनी केलेली पिळवणूक, लैगिक अत्याचार आणि शारीरिक शोषण अतिशय मार्मिकपणे काही कथांमधून मांडून वाचकांचे त्याकडे लक्ष वेधण्यास लेखिका यशस्वी झाली आहे.  निर्ढावलेल्या व सरावलेल्या गुन्हेगारांनाही आपण केलेल्या गुन्ह्याची जाण होऊन शरमेने मान खाली घालायला लावणारी संवादशैली वापरून प्रतीभाताईने तिची प्रगल्भ प्रतिभा दाखवली आहे.  उदा., “बलात्काराने स्त्री जेवढी नागडी होत नसेल, तेवढी ती जगाच्या नजरेने होते.”  असे जळजळीत सत्य शब्दांतून व्यक्त करून ही कवयित्री / लेखिका, वाचकाला नि:शब्द करते.

उपकाराची परतफेड, प्रसवकळा, मातृत्व व स्त्रीभ्रूण हत्त्या हा विषयही प्रतीभाताईने अतिशय प्रगल्भतेने हाताळला आहे. प्राणीमात्रांबद्दलची सहानुभूती व तितकीच भीषण परिस्थिती एका कथेतून खूप सूचकतेने व्यक्त झाली आहे.  काही कथांमध्ये प्रेम आणि विरहही वाचकाला हळवा करून जातो.  शेतीला पूरक व्यवसाय व जोडधंदे ह्यावरही प्रतिभाताईने तिच्या अनुभवातून व निरीक्षणातून आलेले विचार ह्या कथानकांतून वाचकांसमोर आणले आहेत.  तसेच तिच्यातील काव्य प्रतिभेचा अतिशय सहजपणे उपयोग करून सर्वच कथानकांमध्ये एकप्रकारची सजीवता आणली आहे हे ह्या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणावयास हवे. ह्या कथा संग्रहामधील विविध विषयांना वाचा फोडणाऱ्या ह्या एकूण १५ लघुकथा असून त्यामधील संवेदनशील विषयाचे आणि आशयाचे गांभीर्य प्रदीर्घ परिणाम करणारे आहेत.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक ऐश्वर्य पाटेकर यांची ह्या कथा संग्रहाला अतिशय बोलकी प्रस्तावना व पाठराखण लाभली आहे, ह्यातच ह्या कथासंग्रहाचे यश आहे.  श्री. अरविंद शेलार यांनी शीर्षकाला समर्पक मुखपृष्ठ साकारून कथासंग्रहाची उत्कंठा वाढवली आहे.  ‘परीस पब्लिकेशन’चे तसेच प्रतिभाताईचे मनापासून अभिनंदन व पुढील साहित्यिक वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.

पुस्तक - बाभूळफुलं कथासंग्रह

लेखिका - प्रतिभा खैरनार 

प्रकाशक – परीस पब्लिकेशन

पृष्ठे -१२७ मूल्य – २६०/-

रवींद्र कामठे

 

Friday 6 January 2023

विणले तर कळतात, कष्ट घरट्याचे

 विणले तर कळतात, कष्ट घरट्याचे

हा माझा लेख थिंक पॉझिटिव्ह ह्या मासिकात प्रकाशित करण्यात आला आहे.

हा लेख आपल्याला वाचता यावा यासाठी खाली देत आहे. 

 

 




 

 गेले आठ दिवस झालेत मी दिवसभर माझ्या शयनगृहाच्या खिडकीत ठाण मांडून बसलेलो आहे.  त्याचे कारण ही तसे विशेष आहे. आजवर म्हणजे ५९ वर्षात एवढा निवांतपणा कधी मिळालाच नव्हता.  जशी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे तसा मात्र थोडा निवांत झालो.  नाही म्हणायला लिखाण आणि वाचन चालू आहेच.  मनसोक्त गाणी ऐकणेही चालू आहे.  त्यात माझा आवडत्या किशोर कुमारची गाणी म्हणजे जीव की प्राण.  तसेच ‘चपराक प्रकाशन’च्या कार्यालयात आठवड्यातून दोन तीनदा तरी जाणे ही होतेच आहे.

तुम्ही म्हणाल तुमची ही दिनचर्या आता आम्हालाही पाठ झाली आहे.  उगाच वेळ दवडू नका आणि शयनगृहाच्या खिडकीत बसून कुठले नवे ’पाखरू’ (म्हणजे ???) ते ही ह्या वयात न्याहाळत बसला आहात ते सांगा.  असेही लोकसंगीतात उगाचच म्हणत नाही, “पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा!”

माफ करा तुमच्या कल्पनाशक्तीला जरा जास्तच ताण बसलेला दिसतोय !  ते म्हणतात ना, “चोराच्या मनात चांदणे.”  असो.  तुमच्या मनातले ‘पाखरू’ नव्हे तर खरे खुरे एक पाखरू म्हणजे ‘सनबर्ड’ नावाच्या पिटुकल्या पक्षाच्या मादीची आमच्या बागेतल्या लिंबाच्या झाडाच्या एका फांदीवर घरटे बांधण्याची धडपड न्याहाळत बसलोय.  माझ्या हाताच्या अंगठ्या एवढास तिचा तो जीव. पण जगण्यासाठी आणि त्यात निसर्गाचा नियम पाळण्यासाठीची म्हणजे प्रजननासाठीची ही तळमळ पाहून मन थक्क झाले होते.  माणूस सोडला तर सगळेच प्राणी, पक्षी सृष्टीचा नियम अगदी निगुतीने पाळत असतात.  म्हणूनच आपण अजून तरी जिवंत आहोत हे जाणवले.  तेच आपण, विकासाच्या नावाखाली करत असलेली वृक्ष तोड व करत असलेला पर्यावरणाचा ह्रास, कधी एके काळी नंदनवन असलेल्या पुण्याचे वाळवंटात रुपांतर करायला हातभरच लावतो आहोत असे आता मला प्रकर्षाने जाणवायला लागले आहे.  असो.  विषय थोडासा भरकटला...

माझ्या मागे राहणाऱ्या सरांच्या बागेतल्या लिंबाच्या एका फांदीवर जी आमच्या बागेच्या बाजूला वाढली आहे त्या फांदीवर ह्या सनबर्डच्या मादीने घरटे बांधायला एक आठवड्या पासून सुरवात केली आहे.  मला तिच्या दूरदृष्टीची, सचोटीचे, सातत्याचे व कल्पकतेचे फारच कौतुक वाटले.  तिने त्यातल्या त्यात एक चांगली मजबूत फांदी घरट्यासाठी निवडली होती.  त्या फांदीला छोट्या छोट्या दोन उपफांद्या फुटलेल्या होत्या.  तिने मोठ्या फांदीचा आधार घेऊन वरच्या बाजूने घरटे विणायला सुरवात केली होती हे पाहून मला अचंबितच व्हायला झाले.   आठ दिवसांपूर्वी माझे खिडकीतून सहज मागच्या बागेत, मीच ठेवलेल्या पाण्याच्या मातीच्या भांड्याकडे लक्ष गेले व त्याच वेळेस ही सनबर्डची करड्या रंगाची मादीची लिंबाच्या त्या फांदीवर लगबग चालू असलेली दिसली.  मी खिडकीतून बघत असल्यामुळे तिला माझी चाहूल लागली नसावी.  ती तिच्याच नादात घरट्यासाठी दूर कुठून तरी नारळाच्या झाडाच्या झावळीच्या तुसा सारखे अगदी नाजूक व लवचिक काहीतरी घेऊन येत होती. तिला तिच्या त्या इवलुश्या चोचीत एका वेळेस जेवढे आणता येईल तेवढे ती बिचारी ते आणत होती आणि मोठ्या फांदीच्या वरच्या भागावर बसून चक्क गोलाकार पद्धतीने विणत होती.  तिच्या विणण्यातही एक नाजुकशी लकब होती.  जशी एखादी नर्तकी गायकाच्या तानेवर कशी कमरेत लचकत गिरकी घेते ना, अगदी तशी.   एका तुसाला एक दोन आढे घालून ती पुन्हा एकदा उडून जात होती.  पुन्हा एक दोन मिनिटांनी परत तेच.  चोचीत अलगद धरून आणलेले तूस, ती आता फांदीच्या दुसऱ्या बाजूने घेऊन विणायला सुरवात करत होती.  दिवसभर चाललेली तिची ही गडबड न थकता संध्याकाळी ६.३० पर्यंत अर्थात अंधार पडे पर्यंत चालू होती.  तिने आजच्या दिवसभरात मोठ्या फांदीला धरून बाजूच्या दोन लहान फांद्यानाही त्या तुसाने विणत विणत जवळ जवळ दोन ते तीन इंचांचा भाग विणून पूर्ण केला होता.  मी तहान भूक हरपून तिची घरटे विणण्याची ती कला व नजाकत पाहून थक्क झालो होतो.  मला त्याच वेळेस आमच्या लग्नानंतरच्या आयुष्यातील संघर्षाची आठवण झाली.  मी आणि बायकोने असेच एक एक करून दिवसरात्र कष्ट करून आधीचे घर दुरुस्त करून आत्ताचे घर उभे केले होते ते ही एका टप्प्यात शक्य नव्हते म्हणून तीन टप्प्यात पूर्ण केले होते.  आज ह्या पक्षामुळे मला आयुष्यातील ते अविस्मरणीय क्षण आपसूकच आठवले व मन भरून आले.

आजचा दुसरा दिवस. मी सकाळी नेहमीप्रमाणे माझे आवरून झाल्यावर बागेत पक्ष्यांसाठी ठेवलेल्या मातीच्या भांड्यात पाणी भरलेले आहे का ते पाहत होतो.  त्यात जर काही झाडाचा पाला पाचोळा पडला असेल तर ते भांडे स्वच्छ करून त्यात पुन्हा पाणी भरून ठेवायचे, हा माझा नित्यनियम आहे, जो मी गेली २५ वर्षे पाळतो आहे.  उन्हाळ्यात तर जरा जास्तच लक्ष द्यावे लागते.  घरात पंख्याखाली बसूनही आपल्या अंगाची लाहीलाही होत असते, तर ह्या बिचाऱ्या पक्ष्यांची काय हालत होत असेल.  हा नुसता विचार जरी मनात आला तरी अस्वस्थ व्हायला होते. 

आता मी ह्या सनबर्डच्या मादीचे चक्क नामकरण करून टाकले आणि तिला मी हिरोईन म्हणायला सुरवात केली.  अहो तिचे वागणेच मुळी तसेच होते. एक तर ती दरवेळेस आली की चिवचिवाट करतच यायची.  तिची झाडाच्या फांदीवर बसण्याची लकब तर इतकी भारी होती की काही विचारू नका.  तिची घरटे विणण्याची एक वेगळीच अदाकारी मला पाहायला मिळत होती.  आपल्याच नादात ती इतकी गुंग होऊन चिव चिव असे गुणगुणत घरटे विणण्यात गढून गेलेली पाहून मलाच खूप मानसिक आनंद मिळत होता. आपल्यालाही असेच काहीसे करता आले पाहिजे असे वाटत होते. तिच्या सारखे उडता आले पाहिजे, आकाशात मनसोक्त बागडता आले पाहिजे असे वाटत होते.  मला तिचा खूप हेवा वाटत होता.

आपल्या इवल्याश्या चोचीत तिच्या शरीरापेक्षा मोठे तूस अथवा तत्सम काहीतरी असायचे.  त्यात ती आधी आमच्या चिक्कूच्या झाडावर बसून इकडे तिकडे निरीक्षण करायची.  सगळे आलबेल आहे ना ते तपासायची.  तिला काही धोका नाही ना हे पाहायची.  पंख फडकावत ती लिंबाच्या फांदीवर घरट्याच्या जवळ यायची.  त्या फांदीवर बसायची आणि चोचीत आणलेले ते तूस थोडासा विचार करत जिथपर्यंत ते घरटे विणून झाले आहे त्याच्या खालच्या भागात आधी घुसवायची.  त्यानंतर ते पुन्हा एकदा व्यवस्थितपणे दुसऱ्याबाजूने थोडेसे बाहेर काढून आली तशी उडून जायची.  असे तिचे चक्र आता दिवसभर चालू राहणार होते. 

कदाचित माझ्या आयुष्यातील हा निसर्गानुभव पहिलाच असेल. म्हणूनच की काय मला त्याचे जरा जास्तच अप्रूप वाटत होते.  दूरदर्शनवर अथवा डिस्कव्हरीवरील चित्रफित पाहणे वेगळे आणि प्रत्यक्षात तो अनुभव घेणे हे खूपच वेगळे असते.  खरं सांगू का, मला हे सगळे शब्दांत व्यक्त करणे फार मुश्कील वाटते आहे.  म्हणजे शब्दांच्याही पलीकडले काहीतरी आपल्या डोळ्यासमोर घडते आहे हे पाहून मन अतिशय प्रसन्न झाले होते.   

ह्या हिरोईनने आजच्या दिवसभरात अजून दोन इंच घरटे विणले होते.  आज ह्या घरट्याला तिने बाजूच्या दोन छोट्या फांद्यानाही त्यात सामावून आपल्या घरट्याची रूपरेषाच तयार करून घेतली होती.  तरीही मला अजूनही ती हे घरटे कसे पूर्ण करणार ह्याचा काही केल्या अंदाजच येत नव्हता.  निसर्गाची ही तर फार मोठी कमाल होती.  तिला कोणी शिकवले असेल असे घरटे विणायला ?  चिमटीएवढा तिचा तो जीव.  तिच्या डोक्यात घराचा कुठला आराखडा तयार असेल ?  त्यासाठी लागणारे सामान कुठे, कसे, मिळेल? ते कसे आणायचे ? कोणाकोणाची मदत घ्यायची ? घरात कोणा कोणासाठी कोणती खोली असायला हवी वगैरे अनंत प्रश्न तिला नसतील का भेडसावत ? 

मला तर तिच्या आसपास कोणी शिक्षक, आई बाबा, काका, काकू, मामा, मामी, वास्तुविशारद, कंत्राटदार वगैरे कोणी कोणीच दिसले नाही.  एवढेच कशाला मला तिचा हिरो म्हणजे सनबर्डही अजून तरी दिसला नाही.  तिची एकटीचीच ती धडपड पाहून माझेच मन कासावीस होत होते.  त्यात आमच्याकडे दोन तीन बोके व मांजरी असल्यामुळे थोडी धास्ती होती. पण एक सांगतो.  मला ह्या हिरोईनचे फारच कौतुक करावेसे वाटते.  तिने लिंबाच्या झाडाची अशी काही फांदी निवडली होती की त्या फांदीवर मांजरीही उड्या मारू शकणार नाहीत.  सापांचा तर आमच्या इथे प्रश्नच नाही.  कारण मुंगुस खूपच आहेत. गेलेच तर इतर पक्षी जाऊ शकतील.  परंतु त्याच्यातही थोडी समजदारी असावी, काही नियम असावेत, काही संकेत असावेत.  ज्याने त्याने आपले घरटे आपणच विणायचे असावे.  उगाच दुसऱ्याच्यात लुडबुड करायची नाही.  आपले कर्तृत्व सिद्ध करावे. बहुतेक ते ही त्यांची त्यांची घरटी विणण्याच्या कामात गुंग असावेत. असो. निसर्गाचे नियम हे फक्त प्राणी आणि पक्षी यांनाच लागू आहेत, माणसांना नाहीत हे ह्यावरून सिद्ध होते.

असाच एक एक दिवस पुढे चालला होता.  हिरोईन एकदम तल्लीन होऊन घरटे विणत होती.  आजचा बहुतेक चौथा दिवस असावा.  मध्ये एक दोन दिवस मी फारसे लक्ष दिले नव्हते.  पण आज एकदम अचानक, तुकतुकीत जांभळ्या रंगाच्या सनबर्डला म्हणजे हिरोईनच्या हिरोला त्या घरट्याच्या जवळ पहिले आणि थक्क झालो.  हिरोईनने त्याला आपले घरटे बघायला बोलावले होते.  बहुतेक ती त्याला आकृष्ट करण्यासाठी हे करत असावी.  विणीचा हंगाम चालू होता.  त्याला जर का तीचे हे घरटे पसंत पडले तर तो तिच्याशी नाते जुळवून आपली वंशावळ पुढे वाढवणार होता.  अगाध ही निसर्गाची किमया आणि अगाध हे त्याचे नियम.  अर्थात हे ज्ञान मला माझी मुलगी पृवाकडून मिळाले होते हे सांगायला नकोच.  तिचा ह्या विषयात अभ्यास आहे. असो.

हिरोने घरटे पहिले.  चिवचिवाट केला आणि उडून गेला. असेही ही जोडी आमच्याच घराच्या पुढील बाजूला असलेल्या लवंगीमीरची जास्वंदावर पडीक असते.  म्हणजे ह्या जास्वंदाच्या फुलांमधील मध हे त्यांचे अन्न आहे व ते त्यावरच गुजराण करतात हे मला नंतर कळले.  त्यामुळे ह्या घरट्याचे आपल्याच बागेत असणे किती योग्य आहे हे ही कळले.  म्हणूनच की काय मी आता मागच्या अंगणात दोन बाजूला ही लवंगीमिरची जास्वंदाची रोपे लावून घेतली आहेत.

नाही तर आपण सकाळ झाली की आवरतो आणि दूर कुठे तरी म्हणजे ५०-५० किमी वर ऑफिसला जातो, दिवसभर राब राबतो, संध्याकाळी मरत मरत त्या गाड्यांच्या गर्दीतून आणि प्रदूषणापासून कसा बस जीव वाचवत घरी येतो.  आल्यावर बाहेरचा राग घरच्यांवर आणि हक्काच्या बायकोवर काढतो आणि कुढत कुढत झोपी जातो.  दुसऱ्यादिवशी परत तेच.  असेच आयुष्य कधी उतरणीला लागते तेच कळत नाही.  त्यात घरटे विणायला घेतलेलं असते.  त्यावर कर्जाचा डोंगर असतो.  त्याच्या व्याजापोटी आपण आपली ओढाताण करून घेत असतो.  हप्ते भरता भरता जीव नकोसा होतो.  शेवटी २०-२५ वर्षे हप्ते भरून झाल्यावर आपल्याला कळते की आपण हे जे काही घरटे विणले आहे त्यात रहायला पिल्ले कुठे आहेत.  ती तर मोठी झाल्यावर उडूनच जाणार आहेत, त्यांच्या त्यांच्या अवकाशात.  आणि हो, समजा यदाकदाचित आपली पिल्ले अथवा पिल्लू आपल्या ह्या घरट्यात राहिलेच तर ते आपला सांभाळ करेल की नाही, ह्याची खात्री कुठे आहे ? 

निसर्गाचा नियम काही जरी असला तरी, ह्या माणसांनी बनवलेले त्याच्या त्याच्या सोयीनुसारचे नियम हे अजूनही निसर्गाला सुद्धा कुठे कळले आहेत.  मग शेवटी तो ही एकदिवस आपला सगळा राग काढतो व क्षणार्धात होत्याचे नव्हते करून मोकळा होतो.  तरी माणूस त्यातून काही शिकेल अथवा बोध घेईल असे काही वाटत नाही.  विकासाच्या नावाखाली तो पुन्हा तितक्याच जोमाने उभा राहतो, पुन्हा पडतो.  हे दुष्टचक्र अनादी काळापासून असेच चालू आहे.  थकला भागला जीव शेवटी घरट्यात विसावतो.  तोवर आयुष्यभर खाल्लेल्या खस्तांमुळे त्याला आता विविध व्याधींनी त्रस्त केलेले असते.  नुसता निवारा असून काहीच उपयोग नसतो हे त्याच्या जरा उशीरच लक्षात आलेले असते.  पण तोवर वेळ निघून गेलेली असते. आपले पक्षी किंवा प्राण्यांसारखे नसते हे कळायला थोडा उशीरच झालेला असतो. मग आपण नियतीला किंवा नशिबाला दोष देत बसतो.  त्याचे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे, निसर्गाने माणसाला दिलेले मन व विचार करायला दिलेला मेंदू आणि त्या मेंदूत घातलेले विकासाचे अथवा भौतिक सुखाचे किडे हे होय.  असो.  थोडे विषयांतर झाले त्याबद्दल क्षमत्स्व.

आता हिरोईनच्या घरट्याला चांगलेच रंगरूप आले होते.  शंखासारखा आकार आलेला होता. तिचे काम अतिशय तन्मयतेने व अविरतपणे चालूच होते.  आता मी थोडे जवळ जाऊन निरखून पहिले तर तिने घरट्याला बाहेरच्या बाजून थोडेसे प्लास्टीक व फोमचे तुकडे लावलेले दिसले.  हे पाहून मला तर काहीच कळेना की हिने हे असे का केले असेल.  तिला आमच्या बाजूच्या घराचे काम चालू आहे तिथून हे सामान मिळाले असणार असे वाटले.  पण तिने प्लास्टिक का वापरावे हेच काही कळले नाही.  अर्थात ते काही फार प्रमाणात नव्हते तरीही तिने ते आतून न वापरता घरट्याला बाहेरून वापरले होते त्याचे जास्त आश्चर्य वाटत होते.  कदाचित, पावसापाण्यापासून संरक्षण करण्याची तिला निसर्गानेच बुद्धी दिली असावी.  त्यानंतर मलाच राहवले नाही म्हणून मी, नारळाच्या झावळीचा एका भाग आमच्या घराच्या बागेत आणून ठेवला.  मला आपले उगाचच वाटले की, तिला कदाचित त्याचा उपयोग होईल.  घराला मजबुती देण्यासाठी.  उगाचच माझे मन तिला मदत करायला पुढे धावले.  आपण नाही का आपल्या पोरांना मदत करत तशी.  पण हा निसर्ग आहे.  त्याचे नियम फारच वेगळे आहेत.  इथे “दे रे हरी खाटल्यावरी” असे काही नसते हे मला कधी कळले, जेंव्हा तिने मी ठेवलेल्या झावळी कडे ढुंकूनही पहिले नाही, तेव्हा.  मग मला माझी चूक कळली, की आपल्या आगंतुक भावनेला इथे अजिबात थारा नाही.  त्यात हिरोईनचे काहीच चुकलेले नव्हते.  माझेच चुकले होते !

आता हिरोईनचे घर चांगलेच आकाराला आले होते.  तिने आता घराला एक छान प्रवेशद्वार बनवले होते.  त्यात आत जाऊन ती ढूसक्या मारून मारून ते बाहेरच्या बाजूला फुगवत होती.  त्याचे कारणही तसेच होते.  तिचे घरटे थोडेसे निमुळते झाले होते.  म्हणजे मला, जरा शंका आली की, आतमध्ये ती कशी काय बसू शकेल.  त्यात जर तिला अंडी घालून ती उबवायची असतील तर?  तिचे कसे होणार.  मला की नाही जरा जास्तच घाई झालेली होती हे सगळे समजून घ्यायला.  हिरोईन तिच्या पद्धतीने घरट्याचे काम अगदी सराईतपणे करत होती.  पुन्हा एकदा मला खूप प्रश्न पडले होते.  पण मी ते मनातच ठेवले.  हिरोईनने आजच्या दिवसांत तिच्या घरट्यात तिला स्वत:ला अगदी व्यवस्थितपणे जाता येईल व पुन्हा परत बाहेर येता येईल एवढी जागा करून घेतली होती.  आणि हो, तिच्या ह्या ढूसक्या मारण्याच्या प्रयत्नात तिचे घरटे अजिबात हलले नव्हते की फांदीवरून निसटलेही नव्हते.  थोडक्यात काय, तर हिरोईन तिच्या घरट्यातील जागा करतांना त्याची मजबुती तपासून पाहत होती.  अचंबित करणारे होते हे सगळे माझ्यासाठी. मला राहवले नाही त्यामुळे सूर्यास्तानंतर हिरोईन निघून गेल्यावर त्या घरट्याच्या अगदी जवळ जाऊन तपासून पाहिल्यावर तर मी आश्चर्यचकितच झालो.  हिरोईनने अतिशय सुबकपणे तिच्या घरट्यातील जागा बनवली होती.  त्याची खोली, उंची, दाराची उंची, दारातून आत येणारी हवा, घरट्यात आगंतुक पाहुणे येऊ नये याची घेतली गेलेली काळजी.  तसेच तिच्या अंड्यांची व नंतर होणाऱ्या पिल्लाची सुरक्षेच्या दुर्ष्टीने केलेला विचार पाहून माझी हाताची दहाही बोटे तोंडात गेली होती.  आपल्याकडे वास्तुविशारद जेवढा विचार करतो ना त्याही पुढील विचार तिने एकटीने करून तिच्या मनातील घरटे स्वत:च्या चोचीने विणले होते.

बहुतेक सहा दिवस झाले असतील तिने घरटे विणायला घेऊन.  आज सकाळी पाहिले तर, हिरोईनने तिच्या घरट्याच्या प्रवेशद्वारावर चक्क सज्जा विणायला घेतला होता.  ५० प्रतिशत काम सकाळी सकाळी पूर्णही झालेले होते.  मला तिच्या ह्या सुपीक डोक्याचे फारच कौतुक वाटले.  आपण नाही का, पावसाचे पाणी खिडकीतून अथवा दारातून आत येऊ नये म्हणून सज्जा तयार करतो, अगदी तसाच हुबेहूब सज्जा तिने विणला होता.  मी तर हिरोईनच्या प्रेमातच पडलो होतो.   तिचे कौतुक करताना माझे मन फारच हळवे होत होते, हे मला आणि बायकोलाही जाणवत होते.  त्यात गेले दोन दिवस पावसाळी हवा होती.  प्रंचंड उकाडा होता.  तापमान ३९ अंशावर गलेले होते.  मला आता जर का पाउस पडला तर हिरोईनचे कष्ट वाया जाणार की काय ह्या विचारानेच कसेतरी होत होते.  मी बायकोला म्हणालोही की, मी तिचे घरटे ज्या फांदीवर आहे ती फांदी थोडीशी आपल्या पत्र्याच्या खाली घेऊ का, म्हणजे जरी पाउस आला तरी तिचे घरटे पावसात भिजणार नाही.  बायको म्हणाली, असला काही उद्योग करू नकोस. तिला जर का ते समजले आणि असुरक्षित वाटले तर ती पुन्हा येणार नाही.  जे व्हायचे असेल ते होईदेत.  निसर्ग तिला बरोबर योग्य वेळी योग्य ती दीक्षा देईल.   उगाच भावनेच्या भरात तिच्या कामात अडथळा आणू नकोस.  तिचे ही बरोबर होते.  हिरोईनने जर माझ्यामुळे घरटे विणायचे काम अर्धवट टाकले तर मला जास्त त्रास झाला असता.  शेवटी निसर्ग आहे, तो घेईल तिची काळजी असे म्हणून मी स्वत:ची समजूत काढून थोडा आडवा पडलो होतो.  तेवढ्यात, हिरोईनचा हिरो सनबर्ड आज पुन्हा एकदा हे जवळजवळ पूर्ण झालेले घरटे पाहायला आला होता.  त्या दोघांचा तो चिवचिवाट माझ्या कानावर आला. मी तटकन उठून खिडकीतून पाहिले आणि वेडाच झालो.

हिरोईनचा हिरो चक्क तिच्या घरट्यात आत घुसून तिचे घरटे पाहत होता.  ती बाजूच्याच फांदीवर बसून त्याच्याकडे एकटक पाहत होती.  मला काय बोलावे हेच कळत नव्हते.  ह्या मुक्या प्राण्यांच्या/पक्षांच्या एकमेकांवरील विश्वासाला, आपुलकीला, कौतुकाला, स्नेहाला, प्रेमाला, जिव्हाळ्याला, त्यांच्यातील त्या बंधनाला काय म्हणावे हेच तर सुचत नव्हते.  हिरोला, तिचे घरटे आवडेल असेल का?  त्याने तिला होकार दिला असेल का? तो तिच्याशी संसार करेल का? त्यांना पिल्ले होतील का? एक नाही शंभर प्रश्नांनी माझ्या डोक्यात नुसता गोंधळ घातला होता.  मी मनातल्या मनात विचार करून करून थकलो होतो.  माणूस म्हणून मी स्वत:ला खूप भारी, विचारवंत, बुद्धिवंत भाग्यवंत समजत होतो.  पण गेले आठ दिवस ह्या हिरोईनने माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला होता.  इतकी सकारात्मकता तिने माझ्या मनात भरली होती की काही विचारू नका.

दोन तीन तास झाले तरी हिरोईन काही घरट्याकडे आली नाही.  मला आता काळजी वाटू लागली होती.  बहुतेक हिरोने घरटे नाकारले असावे.  मला उगाचच उदास वाटायला लागले होते.  आणि काय आश्चर्य, लांबून मला तिचा तो नेहमीचा चिवचिवाट ऐकायला आला आणि माझाच जीव भांड्यात पडला.  हिरोईन आज खूपच खुशीत दिसत होती.  तिच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता.  ती मस्त गुणगुणत होती.  तिच्या हिरोने तिला होकार दिल्यामुळे तिच्यातला उत्साहाला उधाण  आले होते.  ती ह्या झाडावरून त्या झाडावर मनसोक्तपणे बागडत होती.  तिच्या सवंगड्यांना चिवचिवाट  करून सांगत होती हे अगदी स्पष्टपणे जाणवत होते.  तिची स्वत:शीच चाललेल्या संभाषणाची भाषा मला आताशा कळायला लागलेली होती.  आपल्यालाही असा स्वत:शी संवाद साधता आला पाहिजे असे राहून राहून वाटत होते.   

आता तर हिरोईनने घरट्यातल्या आतल्या बाजूच्यासाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळांसाठी थोडेसे ओले गवत आणून नीटपणे ठेवायला सुरवात केली होती.  तिला माहित असणार की हे ओले गवत काही फार काळ ओले राहणार नाही.  तरीही ते घरट्यात वाळेल तेंव्हा ते तिच्या अंड्यांसाठी व नंतर त्यातून बाहेर येणाऱ्या लेकरांसाठी उपयुक्त असणार.  मला तर हिरोईनचे खूपच कौतुक वाटत होते.  तिची दूरदृष्टी तर वाखाणण्याजोगीच होती.  तिला तिचा भविष्यकाळ नीट व सुखाचा जावा असे वाटत असेल तर आत्ता वर्तमानात कष्ट करायला हवेत हे समजत होते.  निसर्गनियमाने तिला दिलेला आयुष्याचा जो काही काळ असेल तो ती कुठलाही ताण न येऊ देता अतिशय सुखासमाधानाने, कष्टाने, आत्मविश्वासाने, निगुतीने, सचोटीने, सातत्याने, प्रामाणिकतेने, जोडीदारावरील विश्वासाने, आदराने, मायेने व्यतीत करण्यास कटिबद्ध दिसत होती.  त्यात मला तरी कुठेही, हेवेदावे, कुचेष्टा, द्वेष, अपमान, भय, कचकच, तकतक, भांडण, तंटा, मत्सर, घृणा दिसली नाही. कदाचित हे काय ते निसर्गाचे वरदान असावे जे माणसाला त्या मानाने फार कमी वेळा लाभते. अर्थात हे ज्याच्या त्याच्या संचिताचा किंवा प्रारब्धाचा भाग असावा. असो.  पुन्हा एकदा भरकटलो बघा.  काय करणार, विषयच असा आहे की, अधूनमधून भरकटत जायला होतेच.

 हिरोने हिरोईनला होकार तर दिला होताच, पण बहुतेक तिला अपेक्षित असलेला तो हवाहवासा वाटणारा सहवास ही दिला होता, जो तिला तिच्या पिल्लांना जन्माला घालण्यासाठी उपयोगी पडणार होता.  मला आता हिरोईनचा हा संसार फुलताना पहायचा होता.  त्यासाठी मी मागच्या बाजूच्या बागेतही मिरचीजास्वंदाची रोपे लावून घेतली होती.  पुढील वर्षी मला अशा एक नव्हे तर दोन चार हिरोईन त्यावर बागडताना पहायच्या होत्या.

आपणही ह्या सृष्टीचा एक भाग आहोत, जसे हे हिरो-हिरोईन आहेत.  त्यांना जगण्याची रीत भात कळली व त्यांनी त्यांचे ते छोटेसे आयुष्य आनंदी व समाधानी केले.  आपण तर समजूतदार माणसे आहोत.  चला आपणही आपले हे आयुष्य आनंदी व समाधानी करू.  फार काही करायला नाही लागत त्यासाठी.  फक्त थोडासा समजूतदारपणा, खिलाडूवृत्ती, एकेमेकांवरील विश्वास, स्नेह, प्रेम, जिव्हाळा, तडजोड करण्याची वृत्ती, वेळ पडली तर त्याग करायची प्रवृत्ती, इमानदारी, परिस्थितीची जाणीव आणि उणीवांवर मात करण्याची इच्छाशक्ती, सकारात्मकता आणि आयुष्याकडे नैसर्गिकरीत्या पाहण्याची प्रगल्भता.

“देवाची करणी आणि नारळात पाणी” ह्या म्हणीचा खरा अर्थ मला उमगला होता आणि आपसूकच म्हणावेसे वाटले की, 

“विणले तर कळतात, कष्ट घरट्याचे,

कळते परंतु वळत नाही,

हेच तर गमक आहे हृदयाचे”


रवींद्र कामठे