Friday 13 October 2017

चपराक दिवाळी महाविषेशांक प्रकाशन सोहळा १२ ऑक्टोंबर २०१७ निमित्त हार्दिक अभिनंदन






चपराक दिवाळी महाविषेशांक प्रकाशन सोहळा १२ ऑक्टोंबर २०१७ निमित्त हार्दिक अभिनंदन


 प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी, व्यवसायिकी, सामाजिक बांधिलकी, जिद्द, अपार कष्ट, जिज्ञासा, सकारात्मक दृष्टी, साहित्य संस्कृती जपण्याची धडपड, योग्य त्या कलागुणांना वाव अथवा संधी देण्याची तळमळ, प्रस्थापितांचा आदर व सन्मान तसेच नवोदितांना प्रेरणा देणारे उर्जा स्तोत्र आणि कार्यास दैवत मानून त्यात सातत्य ठेवण्याची मुलखावेगळी कला असलेले असे सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व म्हणजे चपराकचे संस्थापक, प्रकाशक, लेखक, समीक्षक, कवी, वक्ते, व्यवस्थापक श्री. घनश्याम पाटील सरांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्याचा हा माझा लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न समजावा.  निमित्त काय तर गुरुवार दिनांक १२ ऑक्टोंबर २०१७ रोजी पुण्यातील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात संपन्न झालेला चपराकचा दिवाळी महाविषेशांक २०१७ चा प्रकाशन सोहळा हे होय.

 

साधारण गेले पाच ते सहा महिने मी घनश्याम सरांची आणि त्यांच्या सहकारी मंडळींची ह्या दिवाळी अंका निमित्त चाललेली जीवाची धडपड अगदी ह्याची देही ह्याची डोळा पाहतो आहे.  त्यामुळेच मला ह्या सर्वांचे कौतुक करावेसे वाटते.  सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही सालाबादप्रमाणे एक अतिशय दर्जेदार साहित्य असलेल्या ५०० पानांचा दिवाळी अंकाच्या निर्मितीचा ध्यास, त्यांच्या ह्या संकल्पनेपासून ते प्रकाशना पर्यंतचा प्रवास आपल्याला वाटतो तेवढा सोपा तर निश्चितच नाही, परंतु अतिशय खडतर आणि जोखीम भरलेला असाच आहे.  तरीही कुठेही न डगमगता, सर्व व्यावसायिक गणितेही सहजपणे सोडवत, ही मंडळी आपले उद्दिष्ट साध्य करतांना पाहून माझी मान कशी अभिमानाने ताठ होते आणि मी ही ह्या समूहाचा एक चिमुकला सदस्य असल्याचा अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे !  तुम्हीं म्हणाल की, तुम्हीं चपराकचे आणि त्यात घनश्याम पाटील सरांचे हे एवढे कौतुक करताय त्याचे कारण तुमचे साहित्य साप्ताहिकात, मासिकात ते प्रकाशित करतात म्हणून आणि यंदाच्या दिवाळी अंकात तुमचा एक लेखही त्यांनी प्रकाशित केला आहे म्हणून तर नाही ना !  तुमचेही बरोबर आहे म्हणा !  असा विचार तुमच्याच काय पण सर्व सामान्य माणसाच्या मनात नक्कीच येणार, त्यात नवल ते काय !  अहो पण एक सांगतो.  घनश्याम पाटील हे एक असे संपादक आहेत की, त्यांना जर तुमचे साहित्य काही कारणांनी योग्य वाटले नाही अथवा जागेची मर्यादा असेल तर ते सदर लेखकास, भले तो प्रस्थापित असो अथवा नवोदित असो, अतिशय नम्रपणे नकार देण्याची क्षमता बाळगून आहेत.  त्यात त्यांना वाईटपणाही घ्यावा लागतो, टीकाही सहन करावी लागते हे मी प्रत्यक्षपणे चपराकच्या कार्यालयात नियमित जात असल्यामुळे अनुभवलेले आहे. आज अशी परिस्थिती आहे की चपराकमध्ये आपले साहित्य छापून यावे ह्यासाठी भल्या थोरल्या साहित्यिकांची इच्छा असते, हेच तर चपराकच्या यशाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्यामधील सच्च्या संपादकाचे श्रेय आहे.  आणि हो, मी काही फार मोठा लेखक अथवा साहित्यिक नाही.  उलट सतत प्रोत्चाहित करून, मलाच काय पण सर्व नवोदितांना लिहिण्यास उद्युक्त करून साहित्य सेवा घडवणारा ही अगली वेगळी आसामी आहे म्हणून हा कौतुकावर्षाव समजावा.

 

मला माझ्या स्वभावानुसार योग्य त्या गोष्टींचे, व्यक्तींचे, संस्थांचे, संघटनांचे, कृतींचे कौतुक करण्याची माझी जी सवय आहे त्यानुसारच, मी संस्थापक संपादक घनश्याम पाटीलसरांचे, सहसंपादक माधव गिरसरांचे, कार्यकारी संपादिका शुभांगीताई गिरमेंचे, उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे ताईंचे, मुद्रितशोधन साठी ब्रम्हे काकांचे व कमळापुरकर सरांचे, मांडणी व सजावट साठी निखील भोसलेचे, उत्कृष्ट आणि समर्पक मुखपृष्ठासाठी संतोष घोंगडेचे, कार्यालयीन व्यवस्थापक प्रमोद येवले, सल्लागार ज्ञानेश्वर तपकीर सरांचे, तसेच कार्यालयीन व्यवस्थापने साठी चिन्मय साखरेचे व ऑनलाईन व्यवस्थापने साठी वैभव कुलकर्णीचे आणि सर्वात शेवटी हा दिवाळी अंक योग्य वेळेत मुद्रित करून देण्यास बहुमोल सहकार्य केल्याबद्दल मामा शिवंगीकर सरांचे अगदी मनापासून कौतुक करून अभिनंदन करतो. 

 

एक सांगतो, माझे हे कौतुक तोंडदेखले नाही. हे तुम्हीं सुद्धा मान्य कराल.  त्याचे अगदी स्पष्ट उदाहरण म्हणजे कालचा उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात सायंकाळी सहा वाजता पार पडलेला दिवाळी महाविषेशांकाचा प्रकाशन सोहळाहे होय.  समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री श्रीमती आशाताई काळे, जेष्ठ उद्योजक श्री. कृष्णकुमार गोयल, मनसेचे शहर उपाध्यक्ष रणजीत शिरोळे आणि सोहळ्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, ह्या सर्व प्रथितयश मान्यवरांनीही काहीही हातचे न राखून ठेवता चपराक समुहाचे भरभरून केलेले कौतुक हे आहे.  त्याचा मी एक साक्षीदार आहे.  सर्व स्तरातील साहित्यिकांचा आणि बोलीबाषेतील साहित्याचाही समावेश करून अतिशय प्रगल्भ आणि दर्जेदार साहित्याची एक मेजवानीच ह्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने चपराकने यंदाही करून साहित्य विश्वात एक क्रांतीच घडवून आणली आहे असे म्हणाले तर वावगे होणार नाही. अगदी चांद्या पासून बांद्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या सीमापार असेलेल्या मराठी साहित्यिकांचा समावेश असलेला असा हा एकमेव दिवाळी अंक असावा असे मला वाटते.

 

ह्यासाठी स्वत: घनश्याम पाटील सरांनी सलग ५० तास काम करून हा दिवाळी अंक आपल्या समोर योग्य वेळेत सादर केला आहे हे इथे नमूद करण्याचे एकमेव कारण, आपल्या कामावर असलेली त्यांची निष्ठा आणि साहित्यसेवेची असलेली उर्मी त्यांच्या कामाच्या ह्या सचोटीतून दिसते आणि ती सृजन वाचकांच्या समोर आणण्याची जबाबदारी मला आपण होऊन घ्यावीशी वाटते.  नाहीतरी चपराककशाला जाईल आपला धिंडोरा पिटायला.  म्हणुनच मला ह्या निमित्ताने माझ्याच कवितेच्या काही ओळी इथे नमूद केल्यावाचून गत्यंतर वाटत नाही..

विणले तर कळतात - कष्ट घरट्याचे | 

पाहिले तर कळते - कारण घडल्याचे | 

लिहिले तर कळतात - अर्थ शब्दांचे |

वाचलेच तर कळते - मन लिहिणाऱ्याचे | 

स्पर्शानेच तर कळते - विश्व भावनांचे |

डोळ्यांनाच तर कळतात - भाव मनाचे |

कळते परंतु वळत नाही, हेच तर गमक आहे हृदयाचे |    

 
आर्थिक मंदीच्या ह्या काळात तसेच साहित्य क्षेत्रात उगाचच उठवले गेलेल्या (सध्याची पिढी वाचतच नाही, सध्या वाचकच नाहीत, मराठी साहित्य आता संपतच चालेले आहे, दर्जेदार लेखन आजकाल होतच नाही, साप्ताहिक, मासिक शेवटच्या घटका मोजत आहेत, वगैरे, वगैरे) वादळात, “चपराकने दहावा दिवाळी अंक, तो ही ५०० पानांचा दिवाळी महाविषेशांक, (सलग तिसऱ्या वर्षी) प्रकाशित साहित्यविश्वात स्वत:चा एक वेळच ठसा उमटवला आहे. 

 

तसेच चपराकने तरुण लेखक सागर कळसाईतच्याकॉलेज गेटह्या कादंबरीच्या पाचव्या आवृतीचेही प्रकाशन ह्या दिवाळी महाविषेशांका बरोबर करून साहित्य विश्वात खळबळ माजवून आपल्या टीकाकारांना नम्रपणे कृतीतून सणसणीत चपराक दिली आहे हे मात्र खरे.  चपराकनुसतेच निद्कांचेही घर असावे शेजारी असे म्हणत नाही तर निद्कांना हितचिंतक करण्याचे सामर्थ्य ठेवून आहे, हे मला अगदी प्रकर्षाने जाणवले.

 

साहित्याला महागाई वगैरे काही नसते.  तिथे फक्त आणि फक्त इच्छाशक्ती असावी लागते हे मात्र खरे आहे.  म्हणूनच तुरस्त्र, रखड, रास्त, र्तव्यदक्ष चे भविष्य उज्वल आहे आणि त्यामुळेच तुम्हां आम्हां वाचकांचे आयुष्य साहित्यापासून वंचित राहणार नाही ह्याची खात्री आहे.  आपला समाज साहित्यकुपोषित राहणार नाही ह्याची हमी चपराकदिली आहे हेच सिद्ध होते.

 

मी चपराकसमूहाचे पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेछ्या देतो.

 

आपला स्नेहांकित,

रविंद्र कामठे

९८२२४०४३३०