Tuesday 31 December 2019

मागोवा सन २०१९चा

मागोवा सन २०१९चा
 २०१९ उजाडलं तेच मुळी माझ्या मागील एक-दोन वर्षांच्या अथक परिश्रमाच्या व शारीरिक व्याधींच्या येऊन गेलेल्या आणि नंतर शमलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवरच. ऑक्टोबर २०१७ पासून माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती.  माझ्याही नकळत मी एका दु:खाच्या खाईत कधी लोटलो गेलो होतो तेच मला कळले नव्हते. तरीही नियती इतकीही निष्ठुर नव्हती म्हणून; माझी बायको वंदनाच्या, मुलगी-जावई पूर्वा-मयुरेशच्या पुण्याईने व मानलेली बहिण स्मिताच्या सहकार्याने निभावून गेले.
कसाबसा सावरत २०१७ आणि २०१८ ही दोन वर्षे ढकलत काढत होतो. खूप साऱ्या मानसिक आणि शारीरिक तक्रारींवर मात करत करत परिस्थितीशी झगडत होतो. ह्याच पार्श्वभूमीवर २०१९ साल उजाडले आणि मनाशी एक संकल्प केला की; आता रडत अथवा कुढत नाही बसायचे.  आपले आयुष्य हे एका नव्या दिशेने न्यायचे व समृद्ध करायचे !  झाले मग काय; मनाशी पक्का निर्णय झाला आणि ठरवले की नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घ्यायची आणि उरलेले आयुष्य हे साहित्य क्षेत्रासाठी आणि तब्बेतीला आणि खिशाला झेपेल अशा समाज सेवेसाठी द्यायचे.  बायको वंदनाची तर माझ्या ह्या संकल्पनेला मोलाची साथ मिळाली आणि मला माझ्या ह्या निर्णयाची पूर्तता करता आली.  जानेवारी महिन्यातच मी VINSYS मधील नोकरीचा राजीनामा द्यायचा ठरवले व तसे VINSYSचे सर्वेसर्वा सौ. विनया पाटील आणि श्री. विक्रांत पाटील ह्यांना सांगितले.  अर्थातच माझा हा निर्णय सर्वप्रथम झिडकारण्यात आला आणि नंतर जवळ जवळ एक ते दीड महिन्यानंतर माझे म्हणणे ऐकून घेतल्यावर स्वीकारण्यात आला.  माझ्या ह्या निर्णयाचे नंतर माझ्या सर्वच सहकाऱ्यांनी स्वागत केले.  ३१ मार्च २०१९ रोजी मला VINYSYS तर्फे निवृत्ती निमित्त एक अविस्मरणीय असा सोहळा आयोजित करून मला अतिशय सन्मानाने निरोप देण्यात आला जो मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी विनया पाटील, विक्रांत पाटील, उमेश थरकुडे, सदानंद वझलवार, नितीन शेंडे, स्मिता तोंडे आणि सुधीर ढवळे सरांचा खूप ऋणी आहे.
निवृत्तीनंतर ठरल्याप्रमाणे मी काही दिवस आराम करून माझ्या साहित्य क्षेत्राच्या सेवेला सुरवात केली. अर्थात त्यासाठी ‘चपराक प्रकाशन’ चा सर्व समूह (घनश्याम सर, शुभांगीताई गिरमे, बेलसरेताई, अरुण कमळापुरकर, दिलीप कस्तुरे सर, विनोद पंचभाई, ब्रम्हे काका, माधव गिरसर, हर्षद क्षीरसागर, सागर सुरवसे, गणेश अटकुळे, प्रमोद येवले) माझी अत्यंत आतुरतेने वाटच पहात होता.  चपराकचे सर्वेसर्वा श्री. घनशाम पाटील सर माझ्या ह्या निर्णयामुळे खूपच खुश होते व मला सातत्याने नवनवे लिखाण करण्यास उद्युक्त करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले व माझ्याकडून “अनुभवाच्या शिदोरीतून” हे एक सदर चपराकच्या साप्ताहिकात चालवले गेले. हे सदर चपराकच्या सर्व वाचकांना इतके आवडले की ह्या सर्व लेखांचे एक पुस्तकच प्रकाशित करण्याचा अतिशय प्रेमळ आग्रह सगळ्यांकडून करण्यात आला आणि त्याची फलश्रुती म्हणजे १९ ऑक्टोंबर २०१९ ला चपराकच्या साहित्य महोत्सवात माझ्या “तारेवरची कसरत” ह्या अनुभवकथन पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द व्यवस्थापन तज्ञ आणि महाराष्ट साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांच्या हस्ते व सुप्रसिध्द संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ ह्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आले.

निवृत्ती नंतर काय करायचे हा प्रश्न मला तरी पडलाच नाही. कारण ‘चपराक प्रकाशन’ मध्ये माझ्या साठी जे काही आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे व मला आवडणाऱ्या सेवेसाठीचे वातावरण तयारच होते. ते म्हणतात ना; “आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे” असेच काहीसे झाले होते माझे.
माझ्या परीने मी चपराकला माझा हा सगळा मोकळा वेळ देऊ केला होता; तो ही कुठल्याही आर्थिक आणि व्यावसायिक फायद्या शिवाय ! माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की साहित्यक्षेत्राला काहीतरी योगदान द्यायचे व साहित्य क्षेत्रातील “चपराक प्रकाशन” ह्या अतिशय प्रामाणिक, प्रगल्भ, परखड आणि रास्त अशा संस्थेच्या यशस्वी वाटचालीस माझा खारीचा का होईना हातभार लावायचा. माझ्या मनाशी मी अगदी ठामपणे ठरवले आहे की, निवृत्ती नंतर मी पैशासाठी अजिबात काम करणार नाही. मला आता अजिबात अर्थार्जन करायचे नाही.  त्याचे कारण आयुष्यात आजवर पैश्याच्याच मागे लागून शरीराची जी काही हेळसांड केली आहे तेवढी खूप झाली !  आता जरा समाजासाठी काही तरी करावे असे वाटते. ते ही मला जमेल आणि तब्बेतीला व खिशाला झेपेल अशा पद्धतीने !  त्यामुळेच मी चपराक साठी माझा वेळ कुठल्याही आर्थिक अपेक्षा न ठेवता देण्याचे ठरवले आहे व मी त्यावर खूप समाधानी आहे. जून महिन्यापासून मी चपराकला मी माझ्या सोईने वेळ देऊ लागलो व मला एका अर्थाने सुख आणि समाधान लाभू लागले, तब्बेतीस ही आराम वाटू लागला.  ह्याची प्रचीती म्हणजे गेले काही दिवस सातत्याने चपराकच्या संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांबरोबर होत असलेले दौरे व त्यामुळे साहित्य क्षेत्रामधील विविध कार्यक्रमांना लागत असलेली हजेरी, दिग्गजांची होत असलेली ओळख हे होय.  मला कुठल्याही मान, सन्मान, पुरस्काराची अजिबात अपेक्षा नाही आणि तेवढे माझे ना कार्य आहे ना कर्तुत्व आहे. आपण मनापासून जे काही काम करतो त्यात जर का योग्य त्या व्यक्तीची, संस्थेची साथ सांगत लाभली तर त्यामुळे जे काही सुख, समाधान आणि समृद्धीची भावना प्राप्त होते ना, ती हजारो, लाखो रुपये मिळवले तरी मिळत नाही आणि नेमकी तीच भावना मला ‘चपराक’ समूहा मुळे लाभली आहे.

माझ्या सामाजिक कार्याच्या उपक्रमातील अजून एक उपक्रम म्हणजे छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यास संस्थापक सदस्य म्हणून हातभार लावून प्रतिष्ठानच्या वतीने नजीकच्या भविष्यात विविध सामाजिक कार्य करणे. ह्यासाठी मी श्री.विश्वजित भाऊ कामठे व समस्त कामठे परिवाराचा त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाठी आभारी आहे.

मी आजवर ‘प्रतिबिंब’, ‘तरंग मनाचे’, ‘ओंजळ’, ‘प्रांजळ’ हे चार काव्यसंग्रह आणि ‘तारेवरची कसरत’  अनुभवकथन पुस्तक प्रकाशित केले आहे.  त्यामुळेच ह्या निवृत्तीचा फायदा घेऊन अजून खूप सारे लिखाण करून साहित्य संपदेत भर घालण्याचा माझा मानस आहे व त्यासाठी मला चपराकची फार मोलाची आणि हक्काची साथ मिळते आहे हे माझे भाग्यच म्हणावे लागेल.
ह्या प्रास्तविकानंतर तुम्हांला माझे २०१९ हे सालं कसे गेले ह्याची प्रचीती आलीच असेल !  त्याच धर्तीवर मला माझे पुढील आयुष्यही समृद्ध करायचे आहे.  ह्या निमित्ताने २०१९ मधील काही क्षणचित्रे तुमच्या माहितीसाठी देतो आहे.
म्हणूनच फक्त २०१९ ह्या गेल्या वर्षालाच नव्हे तर माझ्या आजवरच्या ५६ वर्षांच्या आयुष्याला माझा विनम्र प्रणाम करतो आणि येणाऱ्या २०२०चे नव्या उमेदीने स्वागत करतो.
काय योगायोग आहे पहा; आजच ३१ डिसेंबर २०१९ ला मला ८-९ फेब्रुवारी २०२९ मध्ये अलिबागला होण्याऱ्या ६ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे सरांचे निमंत्रण मिळाले आहे.
चला तर नवीन वर्षाची म्हणजेच २०२०ची सुरुवात चांगलीच झाली आहे असे म्हणावयास हवे. आत न थकता नव्या उमेदीने व उभारीने कार्यास लागणे आहे.  एक सांगतो; असे आपल्या मनासारखे घडायला सुद्धा माणसाचे नशीब असावे लागते ! 
“मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतो”

रविंद्र कामठे.
**माझ्या "तारेवरची कसरत ह्या अनुभवकथन पुस्तकाचा पुस्तकाचे मानधन मी ममता अंध अनाथ कल्याण केंद्रास मदत म्हणून देणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रती विकत घेऊन माझ्या ह्या सामाजिक उपक्रमास तुमची मोलाची साथ द्यावी ही नम्र विनंती. आपण हे पुस्तक चपराक, बुकगंगा आणि Amazonच्या संकेतस्थळावरून मागवू शकता. त्यांची लिंक खाली देत आहे.
https://www.amazon.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A4-Ravindra-Kamthe/dp/9386421321/ref=mp_s_a_1_2?keywords=chaprak&qid=1576983592&sr=8-2&fbclid=IwAR0hWeIcyOIapYnSuRGnFTw7KYJolk0AexU6zj-sScu2R8_nkCmIE1AJx28

“शरद पवार” मला उलगडलेलं एक स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व


“शरद पवार” मला उलगडलेलं एक स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व

माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचे १२ डिसेंबर २०१९ला ८० व्या वर्षात पदार्पण होत आहे. मी सर्वप्रथम साहेबांचे अभिष्टचिंतन करतो.  त्यांना उदंड आयुष्य लाभो व उत्तम स्वास्थ्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
साहेबांचा भारतीय राजकारणातील ५०हुन अधिक वर्षांचा कार्यकाळ पाहता त्यांचे व्यक्तिमत्व हे अतिशय प्रगल्भ व स्फूर्तीदायक असेच आहे हे निर्विवाद आहे.  साहेबांच्या अगणित नेतृत्वगुणांपैकी काही नेमक्या आणि मोजक्या नेतृत्व गुणांचा ह्या निमित्त उहापोह करणे हा माझ्या ह्या लेखाचा उद्देश आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना सोडून इतर सर्व पक्षांचा झालेला दारूण पराभव व त्यांनतर विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान साहेबांनी केलेले अतिशय सूचक असे वक्तव्य म्हणजे “ महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालाच्या विरुद्ध निकाल विधानसभेचा लागतो” हे सत्ताधारी पक्षांनी नोंद घ्यावी.  हे विधान साहेबांच्या राजकीय दूरदृष्टीचे द्योतक होते असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपा ह्या सर्वात मोठ्या पक्षाने फक्त आणि फक्त शरद पवार ह्यांनाच हेरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडून त्यांच्या प्रचाराची दिशा ठरवून घेतली होती. अगदी दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील कार्यकर्त्यानी; त्यांची लायकीही नसतांना फक्त शरद पवार  व त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कशी भ्रष्ट आहे हेच मतदारांना सांगण्यात व पटवून देण्यात वेळ दवडत होते आणि मतदारांची दिशाभूल करण्यात मश्गुल होते. प्रचाराच्या दरम्यान काही काही नेत्यांनी तर अतिशय खालच्या थराला जाऊन साहेबांवर टीकेची झोड उठवली होती.  साहेब त्यामुळे बिथरले तर नाहीच नाही; पण त्यांनी ह्या उद्दाम नेत्यांना त्यांना समजेल अशा त्यांच्याच भाषेत व त्यांच्याच पातळीवर जावून उत्तरे दिली तेंव्हा त्यांचाही थोडा गोंधळ उडाला होता हे मात्र निश्चित!  त्याचं काय आहे “नागव्या समोर नागवे होऊन गेल्याशिवाय त्याला आपण नागवे आहोत हे कळत नाही” ह्या म्हणीचा अर्थ साहेबांनी त्यांच्या विरोधकांच्या तोंडात मारून त्यांना एक सणसणीत चपराक दिली हे मात्र नक्की. साहेबांच्या राजकीय दूरदृष्टीने एक मात्र नक्की हेरले होते की काही झाले तरी भाजपा आणि शिवसेना ह्यांना जरी बहुमत मिळवले तरी ते पुन्हा युतीचे सरकार स्थापन करू शकणार नाहीत त्याचे कारण शिवसेनेने केलेला सत्तेत ५०:५० चा दावा हे होय; ज्याचे प्रत्युतर निकालानंतरच्या झालेल्या पत्रकार परिषदेत आले.
भाजपा आणि शिवसेनेत विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात मेगा भरती चालू होती व काही जेष्ठ आणि निष्ठावंत नेते विरोधकांच्या गळाला लागल्याचे आपण सर्वांनीच पहिले. एखादा पक्ष प्रमुख अशा वेळेस बिथरून गेला असता.  परंतु साहेबांच्या बाबतीत तसे काही घडले नाही; त्यांनी ह्या कठीण परिस्थितीतही संधी शोधून काढली व पक्षात राहिलेल्या इतर नेत्यांना एकनिष्ठ राहण्याची व आता आपला पक्ष अजून चांगल्या पद्धतीने वाढीस लागेल व विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच आधीच्या पेक्षा चांगले यश मिळवेल अशी आशा नुसतीच व्यक्त नाही केली तर निकालात त्याचे प्रत्यंतर दाखवून दिले आहे हे विशेष!  प्रतिकूल परिस्थितीत हातपाय गाळून न बसता त्या परिस्थितीतून संधी कशी शोधायची ह्याचे उत्तम उदाहरण साहेबांनी सर्वाना दाखवून दिले आहे.  ह्याचे उत्तम म्हणजे २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत इतक्या प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षाला हरवून आपले ५४ आमदार निवडून तर आणलेच पण बंडखोरांना चारलेली धूळ हे होय!  साहेबांनी नुसतेच स्वत:च्या पक्षाला बळ दिले नाही तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वहीन सहयोगी राष्टीय कॉंग्रेस पक्षालाही एकप्रकारे बळ दिले व त्यांचेही संख्याबळ वाढवण्यास मदत केली.  प्रचाराच्या दरम्यान साहेबांनी एखाद्या तरुणालाही लाजवले असा राज्यभर केलेला झंजावती दौरा. राजकीय सुडबुद्धीने सत्ताधारी पक्षाने साहेबांच्या वर लावलेली ईडीची (अंमलबजावणी संचनालय) चौकशी व त्यावर साहेबांनी खेळलेली चाल आणि कळस म्हणजे भर पावसात साताऱ्यात घेतलेली लोकसभेच्या प्रचाराची सभा; ज्यामुळे निवडणुकांचे निकालच अपेक्षित पणे बदलले गले व ते राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या पथ्यावरच पडले हे सर्वज्ञात आहेच.
साहेबांची मुत्सदेगिरी तर त्यांच्या आजवरच्या राजकारणाचा सार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा त्यांना असलेला अचूक अंदाज आणि भाजपा विरुद्ध एकमताने सर्व विरोधी पक्षाने एकत्रितपणे करावयाचे राजकारण; त्यासाठी नेतृत्व करण्याची असलेली त्यांची क्षमता व सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्यांच्यावर असलेली भिस्त ही साहेबांच्या मुत्सदेगिरीचे बोलके उदाहरण आहे.  त्याचे अतिशय ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस- राष्ट्रीय कॉंग्रेस व इतर छोटे पक्ष ह्याची महाविकासआघाडी हे होय व त्यांचे नेतृत्व करणारे साहेब हे होय.
साहेबांची संयमी वृत्ती ही तर त्यांच्या राजकारणातील कारकीदीचा कळीचा मुद्दा आहे. प्रतिकूल परिस्थतीत कुठल्याही घटनेने त्यांचे चित्त कधीच विचलित होत नाही. प्रत्येक गोष्टीकडे ते अतिशय संयमित दृष्टीने पाहतात, त्या परिस्थितीचे त्यांच्यापरीने व विशिष्ट शैलीने आकलन करून त्याचे विश्लेषण करून निर्णय घेतात हे होय. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मोक्याच्या क्षणी दादांनी दिलेला राजीनामा व त्यांनतर घडलेलं राजकीय नाट्य. सर्वोच्च न्यायलयात पणाला लावलेली बाजी आणि प्रतिकूल परिस्थतीतही आपल्या बाजूने साहेबांनी खेचून आणलेला विजय!  अर्थात ह्यात त्यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी व स्थापनही न झालेल्या आघाडीतील सहकारी पक्षांनी टाकलेल्या विश्वासाला नक्कीच जाते.
साहेबांच्या विश्वासाहर्तेवर आजवर खूप प्रश्न उठवण्यात आले होते. त्या दृष्टीने त्यांच्यावर सातत्याने आरोप केले जातात.  परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी नंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थतीवरून त्यांनी घेतलेली जाहीर भूमिका. भाजपा-शिवसेना ह्यांच्या युतीला बहुमत असूनही त्यांच्यातील दुराव्यामुळे त्यांनी सरकार स्थापनेला दाखवलेली असमर्थतता व त्यानंतर साहेबांनी पुढकार घेवून स्थापन केलेली महाविकासआघाडी आणि शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठीचा दिलेल्या खरा करून दाखवलेल्या शब्दाने सर्व विरोधकांची तोंडे बंदच करून टाकली आहे असे म्हणलो तर अतिश्योकीती होणार नाही.
सर्वसमावेशक आणि युतीचे राजकारण करणे हा तर साहेबांचा हातखंडा आहे हे ह्या निमित्ताने आवर्जून सांगायला हवे. ह्याचे मूळ कारण म्हणजे साहेबांचे अप्रतिम संघटन कौशल्य, माणसे जोडण्याची त्यांची कला, प्रंचड स्मरणशक्ती आणि सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन राजकारण करणे ही आजकालच्या राजकीय व्यवस्थेची अपरिहार्यता ह्याची चुणूक ४० वर्षांपूर्वीच दाखवली होती हे सर्वाना माहिती आहेच.
महाराष्ट्राच्याच राजकरणात तर साहेबांना डावलून राजकारण करणे ते जिवंत असेपर्यंत तरी अशक्य आहे हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि इतर सर्व पक्षांना आता पुरते कळून चुकले आहे.  साहेब राजकारण करतांना भारतीय राज्यघटनेचा आणि कुठल्याही राजकीय, प्रशासकीय व्यवस्थेचा अनादर करत नाहीत हे आजवर अनेक वेळा सिद्ध झालेले आहे.  प्रशासकीय यंत्रणेबद्दलचे त्यांचे ज्ञान, राजकीय व्यवस्थेचा प्रगल्भ अभ्यास, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि संसदीय कार्यप्रणालीचा प्रदीर्घ अनुभव, न्यायालयीन प्रक्रियेचा गाढा अभ्यास व त्यामधील जाणकारांची व तज्ञांची उपलब्ध असलेली फळी आणि त्यांच्यावर विश्वास टाकलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास हेच त्यांच्या यशाचे गमक आहे असे मला तरी वाटते.
साहेब समजायला तसे खूपच अवघड आहे हे नक्की.  बुद्धीबळात जसे आपण डाव खेळतांना सावधगिरी बाळगत असतो अगदी तशीच सावधगिरी साहेब नेहमी त्यांच्या राजकारणातील वाटचालीत बाळगत आले आहेत. त्यांच्या सावधगिरीला त्यांचे विरोधक ‘अविश्वास’ असे संबोधतात त्याचे कारण त्यांना अशी अपेक्षा असते की साहेबानी त्यांची प्रत्यके चाल ही त्यांच्या विरोधकांना कळेल अशी खेळावी. असो.
ज्यांना राजकारणात रस आहे अथवा राजकारणात येण्याची इच्छा आहे त्यांनी साहेबांचा अभ्यास करण्याची खूप गरज आहे त्यांचे कारण त्यांनी नेहरूंपासून ते मोदींपर्यंत सर्वांचे राजकारण कोळून प्यायले आहे व ह्या वयातही अजूनही तितक्याच ताकदीने राजकारणात वावरत आहेत.
साहेबांसारखा प्रगल्भ आणि द्रष्टा राजकारणी पंतप्रधान म्हणून भारताला देता आला नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. असो. शेवटी राजकारणातील संख्याबळाचे गणित अव्हेरून चालणार नाही हे निश्चित. पण एक आहे की युद्धात आणि राजकारणात कधी काय होईल ने सांगता येत नाही. त्या त्या वेळेसची राजकीय परीस्थ्तीती आणि पक्षीय संख्याबळाचे गणितच सर्व काही ठरवत असते.  अर्थात ह्या खेळत निष्णात असलेले साहेबांसारखे मुरब्बी राजकारणी हातातून निसटलेल्या संधीचेही सोने करून बाजी पलटवतात हे आपण महाराष्टात नुकत्यात स्थापन झालेल्या महाविकासआघाडीच्या सरकारच्या निमित्ताने अनुभवतो आहोत.
“जीवेत शरद: शतम्”
** मी काही राजकारणी नाही अथवा राजकीय विश्लेषकही नाही.  मी फक्त साहेबांचा चाहता आहे व त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या वाढदिवसानिम्मित ह्या वयात त्यांनी महाराष्ट्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आहे.

रविंद्र कामठे
साहेबांचा चाहता.   

Tuesday 22 October 2019

Ganesh Atkale's Blog: यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन - पुस्तक समीक्षण

Ganesh Atkale's Blog: यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन - पुस्तक समीक्षण: लेखक रवींद्र कामठे यांच्या ‘तारेवरची कसरत’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने मागच्या आठवड्यामध्ये जेष्ठ आंतरराष्ट्रीय व्यवस...



खूपच छान मनोगत मांडले आहे गणेश.



अभिनंदन

Thursday 17 October 2019

"तारेवरची कसरत" ह्या माझ्या अनुभवकथन पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण


 
नमस्कार,
सर्वप्रथम आपणांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
३१ मार्च २०१९ रोजी वयाच्या ५६व्या वर्षी मी VINSYS IT SERVICES ह्या पुण्यामधील व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या नामवंत संस्थेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. माझ्या ह्या निवृत्तीचे एक कारण म्हणजे गेली ४० वर्षे सातत्याने कष्ट करून झिजवलेल्या शरीराची थोडी फार निगा राखण्याची गरज व दुसरे म्हणजे साहित्य क्षेत्रात मराठी साहित्यासाठी माझ्या कुवतीने थोडेफार योगदान देता देता समाजाचे ऋण फेडण्याचा माझा संकल्प, हे होय ! माझ्या संकल्पातील पहिला टप्पा मी आज पूर्ण केला आहे. माझ्या आधीच्या चार काव्यसंग्रहानंतर माझी अजून एक साहित्य संपदा “तारेवरची कसरत” ह्या माझ्या अनुभव कथन पुस्तकाद्वारे तुम्हां रसिक वाचकांना सदर करतो आहे. ‘चपराक’च्या २०१९च्या ‘साहित्य महोत्सवात’ हे पुस्तक सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ञ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. विशेष म्हणजे शेजवलकर सरांचीच माझ्या ह्या पुस्तकाला प्रस्तावना लाभणे म्हणजे माझ्यासाठी एक पुरस्कारच म्हणावा लागेल. माझ्या ह्या पुस्तकाच्या विक्रीतून प्रकाशकांकडून लेखकाला (मला) मानधन म्हणून मिळणारी सर्व रक्कम मी “ममता अंध अनाथ कल्याण केंद्र, पिंपळे गुरव”, या संस्थेस मदत म्हणून देण्याचे ठरविले आहे. माझ्या ह्या संकल्पास तुमचाही अप्रत्यक्ष सहभाग लाभावा अशी माझी तुम्हांला प्रार्थना आहे. त्यासाठी प्रकाशकांच्या सहकार्याने मी “तारेवरची कसरत” पुस्तकासाठीची सवलत तुमच्या माहितीसाठी खाली देत आहे:
“तारेवरची कसरत” नोंदणीसाठीची खास सवलत
पुस्तकाची मूळ किमंत - प्रत्येकी रु.१५०/-
५ प्रतीं – प्रत्येकी रु.१२०/-
१० प्रतीं – प्रत्येकी रु.१०५/-
१०+ प्रतीं – प्रत्येकी रु.१००/-
५०+ प्रती - प्रत्येकी रु.१००/- +
चपराकच्या एका मासिकात अर्धेपान कृष्णधवल जाहिरात मोफत करण्यात येईल.
** नियम व अटी
आपली मागणी आपण www.chaprak.com ह्या संकेतस्थळावर नोंदवू शकता अथवा चपराकच्या *खात्यावर पैसे भरून नोंदवू शकता. पैसे जमा झाल्यानंतरच ही योजना लागू होईल ह्याची कृपया नोंद घ्यावी.
*पैसे भरल्याचा निरोप संपादक श्री. घनश्याम पाटील यांच्या भ्रमणध्वनी नं ७०५७२ ९२०९२ वर करावा.
*कृपया आपल्या प्रती प्रकाशनाच्या दिवशी किंवा चपराकच्या कोथरूड मधील कार्यालयातून घेऊन जाव्यात ही नम्र विनंती, अन्यथा पुस्तके पाठवण्याचा लागेल तो खर्च आकरण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
*खात्याचे नाव - चपराक प्रकाशन (Chaprak Prakashan)
Axis Bank - अँक्सिस बँक, Current Account (चालू खाते) शाखा - सदाशिव पेठ, पुणे
खाते क्र. 914020041538308 IFSC Code - UTIB0001437.
माझी तुम्हांला नम्र विनंती आहे की, आपण जास्तीत जास्त प्रती विकत घेऊन “आपल्या” (तुमच्या आणि माझ्या) ह्या सामाजिक कार्याच्या संकल्पास अमुल्य साथ द्यावी.
रविंद्र कामठे

Saturday 5 October 2019

सोशल मिडीयाचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम


माहिती आणि तंत्रज्ञान युगाने जगात क्रांती घडवून आणली.  मोबाईल आणि इंटरनेट नेट मुळे तर जग आपल्या मुठीत सामावले गेले.  इंटरनेट विस्ताराचा अतिप्रचंड वेग आपल्या संस्कृतीला नुसताच घातक नाही तर, सोशल मिडिया नावाच्या राक्षसामुळे तो अजून विघातक होऊ लागला आहे. काळाची पावले ओळखून आपण काळाबरोबर चालायला हवे हे जरी योग्य असले तरी, तंत्रज्ञानाचा अतिरेकी वेग आणि त्यावर आरूढ होऊन आलेला सोशल मिडीया नावाचा कर्दनकाळ रोखणे सध्यातरी आपल्या सगळ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. सोशल मिडिया नावाचे भूत वेताळासारखे आपल्या मानगुटीवर कधी येवून बसले आहे ते आपल्याला कळलेच नाही. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर, व्हाटसअप, इत्यादी सोशल मिडीयाच्या माध्यमांनी तुमच्या आमच्या जीवनात नको इतके जरुरीचे स्थान पटकावले आहे.  आपल्या वैयक्तिक आयुष्याची लक्तरे वेशीवर टांगून आपल्या सामाजिक अस्थिरतेची पाळेमुळे ह्या सोशल मिडीयाने इतकी घट्ट रोवली आहेत की त्यांचे दुष्परिणाम गेल्या चार पाच वर्षांत दिसायला लागले आहेत.
माणसांचा माणसांशी संवाद हरवत चालला आहे;
नको इतके, नको त्या ठिकाणी, नको त्या लोकांशी, नको तेंव्हा, व्यक्त होण्याचे व्यसन लागले आहे; जरुरी पेक्षा जास्तीचे ज्ञान मिळायला लागले आहे;
लहान वयात नको त्या गोष्टींची ओळख झाल्यामुळे चंगळवाद आणि भोगविलासी वृत्ती बळावली आहे; 
जाहिरातींच्या भडीमारामुळे वैचारिक पांगुळत्व आले आहे;
वैयक्तिक जीवनात सहजरीत्या घुसून कित्येकांचे संसारच उध्स्वस्त होऊ लागले आहेत;
सामाजिक सुरक्षा तर कधीच टांगणीला लागली आहे;
वैयक्तिक तसेच राष्ट्रीय विदा (डेटा) असुरक्षित झाली आहे;
वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक स्वास्थ्य लोप पावत आहे;
सुसंकृत समाजाकडून विकृत समाजाकडे वाटचाल होत आहे;
हे सगळे जर टाळायचे असेल तर सोशल मिडीयाच्या वापरावर आपणच बंधने घालून घेणे जरुरीचे आहे. तरच ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याला योग्य तो फायदा करून घेता येईल.
रविंद्र कामठे

Thursday 3 October 2019

१९ ऑक्टोबर २०१९ "तारेवरची कसरत" ह्या माझ्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन आहे


"चपराक कडून लवकरच येत असलेल्या रवींद्र कामठे यांच्या 'तारेवरची कसरत' या चरित्रात्मक पुस्तकाला सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांची प्रस्तावना आहे.  व श्री. संतोष घोंगडे सरांनी अतिशय समर्पक असे मुखुपृष्ठ साकारले आहे. कामठे सर आणि युवा कवी गणेश आटकळे यांच्यासह आज सरांकडे गेलो. प्रस्तावना घेतली. शेजवलकर सरांचे माझ्यावर आणि अर्थातच 'चपराक'वर विलक्षण प्रेम आहे. थोरामोठ्यांचे असे आशीर्वादच तर नवनवे प्रयोग करायला बळ देतात"; 
असे घनश्याम पाटील म्हणतात.

शेजवलकर सरांनी आम्हांला त्यांच्या कार्यालयात बोलावून त्यांनी लिहिलेली प्रस्तावना चपराक प्रकाशन च्या उपस्थितीत माझ्या कडे सुपूर्द केली.  व्यवस्थापनातील शिस्तबद्धता व काटेकोरपणाचा प्रत्यय आला.



शेजवलकर सरांच्या पुस्तकांचा अभ्यास करून वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेला त्यांचा मी रविंद्र कामठे एक शिष्य किती भाग्यवान आहे हे तुम्हीं समजूच शकत नाही. आज सरांनी माझ्या चपराक प्रकाशन तर्फे प्रकाशित होत असलेल्या "तारेवरची कसरत" ह्या अनुभव कथन पुस्तकास त्यांची अतिशय बोलकी आणि समर्पक प्रसावना देऊन मला धन्य केले आहे. अर्थातच ह्याचे श्रेय चपराक प्रकाशनचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांचे आहे. त्यांच्या मुळेच माझ्या ह्या पुस्तकाला शेजवलकर सरांची प्रस्तावना मिळाली. हा माझ्या साठी फार मोलाचा असा पुरस्कार आहे. खऱ्या अर्थाने मी आता साहित्य क्षेत्रात माझे काही योगदान देऊ शकतो असे मला सरांनी दिलेल्या ह्या प्रस्तावाने मुळे वाटते. खूप खूप धन्यवाद शेजवलकर सरांचे. वयाच्या ९२ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवील इतका उत्स्हास आणि कामाचा ध्यास पाहून धक्क व्हायला होते. आज माझे कैलासवासी वडील असते तर त्यांनाही खूप अभिमान वाटला असता त्यांच्या ह्या मुलाचा हे नक्की.
सरांनी अतिशय उत्स्फुतपणे त्यांची ही प्रस्तावना आम्हांला ऐकवली व ती रेकॉर्ड करण्याची संधी दिली.  वयाच्या ९२ व्या वर्षीही सरांचा उत्स्हास आणि जोश पाहून आम्हीं तर अचंबितच झालो होतो.
ही ध्वनी चित्रफित तुम्हीं खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता 


चपराक प्रकाशन च्या घनश्याम सरांचे खूप खूप आभार. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय असा एक क्षण आहे जो माझ्या आयुष्याला नक्कीच कलाटणी देणारा ठरेल असे वाटते. आज मी खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रात माझे काही योगदान देऊ शकतो. माझ्यासाठी शेजवलकर सरांची ह्या प्रस्तावानेच्या निमित्ताने मिळालेली ही शाबासकीच आहे .  मला मिळालेल्या ह्या संधीचा मी नक्कीच योग्य तो उपयोग करून घेऊन साहित्य क्षेत्रात माझे योगदान देऊ शेकेल असे वाटते.

श्री. संतोष घोंगडे सरांचे खूप खूप आभार त्यांनी माझ्या ह्या पुस्तकासाठी अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ करून ह्या पुस्तकाच्या साहित्यमूल्यात मोलाची भर टाकली आहे.   

माझ्या ह्या पुस्तकाचे चपराकच्या साहित्य महोत्सवात समारंभपूर्वक प्रकाशन १९ ऑक्टोंबर २०१९ रोजी सायं ७ वाजता उद्यान प्रसाद मंगल कार्यलय, सदाशिव पेठ येथे होणार आहे.  त्यासाठी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. माझ्याकडून आपल्याला हे ह्या कार्यक्रमाचे निमित्रण समजावे.

रविंद्र कामठे.

Monday 30 September 2019

कौतक तनिष्काचे

कौतक तनिष्काचे
  तनिष्का मयुरेश जोगळेकर ही माझी भाची. माझ्या शेजारी राहते. ती डी. इ. एस. शाळेच्या इंग्लिश माध्यमात इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकते आहे. शाळेच्या सांस्कृतिक स्पर्धेत तिने माझ्या "प्रांजळ" ह्या काव्यसंग्रहामधील 'बाप्पा स्वप्नात आले' ही कविता सादर केली. तिच्या उत्तम सादरीकरणाला, कवितेच्या निवडीला, कवितेतून दिलेल्या पर्यावरण रक्षणाच्या सामाजिक संदेशाला दुसरे पारितोषिक मिळाले. तनिष्काचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप कौतुक.
माझ्या कवितेची निवड करुन कवितेमधील सामाजिक संदेश सर्व विद्यार्थ्यांना देऊन माझा सन्मान केला व माझ्या संकल्पाचे सार्थक केले त्यासाठी धन्यवाद.

https://youtu.be/vXyQM4gJBdg

रविंद्र कामठे



Sunday 29 September 2019

"तारेवरची कसरत" ह्या माझ्या चरित्रात्मक पुस्तका निमित्त




"चपराक कडून लवकरच येत असलेल्या रवींद्र कामठे यांच्या 'तारेवरची कसरत' या चरित्रात्मक पुस्तकाला सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांची प्रस्तावना आहे.  व श्री. संतोष घोंगडे सरांनी अतिशय समर्पक असे मुखुपृष्ठ साकारले आहे. कामठे सर आणि युवा कवी गणेश आटकळे यांच्यासह आज सरांकडे गेलो. प्रस्तावना घेतली. शेजवलकर सरांचे माझ्यावर आणि अर्थातच 'चपराक'वर विलक्षण प्रेम आहे. थोरामोठ्यांचे असे आशीर्वादच तर नवनवे प्रयोग करायला बळ देतात"; 
असे घनश्याम पाटील म्हणतात.

शेजवलकर सरांनी आम्हांला त्यांच्या कार्यालयात बोलावून त्यांनी लिहिलेली प्रस्तावना चपराक प्रकाशन च्या उपस्थितीत माझ्या कडे सुपूर्द केली.  व्यवस्थापनातील शिस्तबद्धता व काटेकोरपणाचा प्रत्यय आला.



शेजवलकर सरांच्या पुस्तकांचा अभ्यास करून वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेला त्यांचा मी रविंद्र कामठे एक शिष्य किती भाग्यवान आहे हे तुम्हीं समजूच शकत नाही. आज सरांनी माझ्या चपराक प्रकाशन तर्फे प्रकाशित होत असलेल्या "तारेवरची कसरत" ह्या अनुभव कथन पुस्तकास त्यांची अतिशय बोलकी आणि समर्पक प्रसावना देऊन मला धन्य केले आहे. अर्थातच ह्याचे श्रेय चपराक प्रकाशनचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांचे आहे. त्यांच्या मुळेच माझ्या ह्या पुस्तकाला शेजवलकर सरांची प्रस्तावना मिळाली. हा माझ्या साठी फार मोलाचा असा पुरस्कार आहे. खऱ्या अर्थाने मी आता साहित्य क्षेत्रात माझे काही योगदान देऊ शकतो असे मला सरांनी दिलेल्या ह्या प्रस्तावाने मुळे वाटते. खूप खूप धन्यवाद शेजवलकर सरांचे. वयाच्या ९२ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवील इतका उत्स्हास आणि कामाचा ध्यास पाहून धक्क व्हायला होते. आज माझे कैलासवासी वडील असते तर त्यांनाही खूप अभिमान वाटला असता त्यांच्या ह्या मुलाचा हे नक्की.
सरांनी अतिशय उत्स्फुतपणे त्यांची ही प्रस्तावना आम्हांला ऐकवली व ती रेकॉर्ड करण्याची संधी दिली.  वयाच्या ९२ व्या वर्षीही सरांचा उत्स्हास आणि जोश पाहून आम्हीं तर अचंबितच झालो होतो.
ही ध्वनी चित्रफित तुम्हीं खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता 


चपराक प्रकाशन च्या घनश्याम सरांचे खूप खूप आभार. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय असा एक क्षण आहे जो माझ्या आयुष्याला नक्कीच कलाटणी देणारा ठरेल असे वाटते. आज मी खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रात माझे काही योगदान देऊ शकतो. माझ्यासाठी शेजवलकर सरांची ह्या प्रस्तावानेच्या निमित्ताने मिळालेली ही शाबासकीच आहे .  मला मिळालेल्या ह्या संधीचा मी नक्कीच योग्य तो उपयोग करून घेऊन साहित्य क्षेत्रात माझे योगदान देऊ शेकेल असे वाटते.

श्री. संतोष घोंगडे सरांचे खूप खूप आभार त्यांनी माझ्या ह्या पुस्तकासाठी अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ करून ह्या पुस्तकाच्या साहित्यमूल्यात मोलाची भर टाकली आहे.   

माझ्या ह्या पुस्तकाचे चपराकच्या साहित्य महोत्सवात समारंभपूर्वक प्रकाशन १९ ऑक्टोंबर २०१९ रोजी सायं ७ वाजता उद्यान प्रसाद मंगल कार्यलय, सदाशिव पेठ येथे होणार आहे.  त्यासाठी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. माझ्याकडून आपल्याला हे ह्या कार्यक्रमाचे निमित्रण समजावे.

रविंद्र कामठे.

Wednesday 28 August 2019

गणपती बाप्पा २०१९

शिवरायांचा हा मावळा आजच तयार झालायं रंगवून. पर्यावरणाच्या चाललेल्या ह्रासाने व एकंदरीतच ध्वनी, वायू आणि पाण्याच्या प्रदूषणाने थोडासा त्रस्तही झालेला दिसत होता. डोळे वटारुन बघत होता. मला म्हणाला यंदाच्यावर्षीही तू माझे विसर्जन बादलीतच करशील आणि विरघळल्यावर माझी परत एखादी छान मुर्ती घडवशील! घे माझी शप्पथ! मी बाप्पाला म्हणालो, शप्पथ कशाला रे, पर्यावरणाचे रक्षण करणे हे तर माझे कर्तव्यच आहे रे. मला जशी बुध्दी दिलीस ना तशीच सगळ्यांनाच दे रे बाबा. नाहीतर लवकरच तुझे बाबा रागावून तिसरा डोळा उघडून सगळे भस्मच करतील ! हो ना रे. असेही तुझे बाबा तर ह्या आमच्या पृथ्वीवरील तुझ्या भक्तांचे हे वंगाळ, चिंबाळ नाच बघून त्यांचे तांडव नृत्यही विसलेत की काय असेच वाटायला लागले आहे मला. असो. तू मात्र येशील तर स्वतःची काळजी घे. येतांना रेनकोट, स्वेटर, मफलर, कानटोपी, पायमोजे, हातमोजे, घेवूनच ये. तसेच कानात घालायला चांगल्या दर्जाचा ध्वनीरोधक कापूस आणायला विसरु नकोस. पार्वती आईला सांगून तीच्याकडून त्रिफळा चुर्ण आणायला विसरू नकोस म्हणजे भेसळयुक्त प्रसादाचा त्रास होणार नाही. शंकरबाबा चिडतीलच; कशाला जातो पृथ्वीवर म्हणून! त्यांची आमच्या वतीने समजूत घालून एवढे ह्या वर्षीचा गणेशोत्सव दिमाखात साजरा करण्याची परवानगी घेवून ये! त्यांना सांग, ह्यावर्षी जर आंम्ही उतमात केला तर पुढच्यावेळेस आंम्हाला परवानगीच देवू नका. काय तुंम्हांला प्रलय, महाप्रलय वगैरे आणायचा असेल तो आणा म्हणावं. बरं चल तुला उशीर होईल. चांगला दहा दिवसाचा मुक्काम आहे आमच्याकडे त्यामुळे तयारीला वेळही लागेल ना! आरे, आंम्हालाही तयारी करायचीयं ना तुझ्या आगमनाची, प्रतिष्ठापनेची. चल भेटूच या सोमवारी २ तारखेला गणेश चतुर्थीला. तुझा परमभक्त रविंद्र कामठे.

Wednesday 14 August 2019

कै. संजय अर्जुनराव काळे ह्या माझ्या आत्येभावाला माझी भावपूर्ण “श्रद्धांजली”.

कै. संजय अर्जुनराव काळे ह्या माझ्या आत्येभावाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली”.

आज १३ ऑगस्ट २०१९ रोजी फुरसुंगीला संजूच्या दशक्रियाविधीला गेलो होतो तेंव्हा तिथे चाललेल्या संत वाड:मयाच्या प्रवचनाने ह्या सगळ्या दु:खातून माझे मन थोडे स्थिरस्थावर होता होता अचानक बालपणात गेले. संजू माझा आत्येभाऊ. घरची परिस्थिती अत्यंत गरीब ! त्यामुळे पोरगं वाया जाऊ नये म्हणून माझ्या चुलत्यांनी आणि वडिलांनी त्याला आमच्याबरोबर शिकायला पुण्यातल्या शाळेत घातला व शिकवला मोठा केला.  किती मोठा केला, त्याचा किती कीर्तिमान होता हे बघायला आज जर माझे वडील आणि अण्णा (चुलते) असते तर एवढ्या दु:खातही त्यांची मान अभिमानाने ताठ झाली असती.
संजूने कमावलेल्या माणुसकीमुळे व त्याच्या सामाजिक कार्यामुळे ४ ऑगस्ट २०१९ रोजी त्याच्या अंत्यविधीला पुरंदर तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे हजर होते व त्यांनी संजूला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्याच्या कार्याचा गौरव केला होता. भेकराईनगरगंगानगरफुरसुंगीसासवडसोनुरीलोणी काळभोरहडपसर इत्यादी परिसरातील व पंचक्रोशीतील उपस्थित नगरसेवकसरपंचउपसरपंचनातवाईकआप्तेष्टमित्रमंडळी, तसेच भारत संचार निगमचे त्याचे सहकारीअधिकारी व इतर जनसमुदाय ह्यावरून त्याच्या कार्याची प्रचीती येत होती.
संजूला श्रद्धांजली वाहतांना बऱ्याच वक्त्यांनी त्याने अगदी बालपणापासून ते वयाच्या ५७ वर्षापर्यंत केलेला संघर्ष अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केला हे विशेष.  ह्या वक्त्यांनी जेंव्हा अगदी गहिवरून येत आपापल्या भावना व्यक्त केल्या तेंव्हा एवढ्या माणसांच्या गर्दीत मी सुद्धा आमच्या बालपणातील संजू बरोबर व्यतीत केलेल्या त्या अविस्मरणीय स्मृतीमध्ये कधी गेलो ते माझे मलाच कळले नाही.
पुण्या जवळील सोनुरी गावतल्या अर्जुनराव (माझे काका-अप्पा) आणि काशीबाई (म्हणजे आत्या) ह्याचा हा एकुलता एक मुलगा.  त्याला तीन बहिणी. घरची गरिबी. सोनुरीतील कोरडवाहू जमिनीत उदरनिर्वाह होणे कठीण म्हणून अप्पांनी मांजरी स्टड फार्म मध्ये नोकरी पत्करली. एक खोली. चारच भांडी. तीन दगडांची चूल. असा माझ्या आत्याचा संसार मी माझ्या बालपणी ह्याची देही ह्याची डोळा खूप वर्षे पहिला आहे.  आम्ही दिवाळीत भाऊबिजेला आत्याकडे दरवर्षी जेवायला जायचोच जायचो.  बिचारी कर्ज काढून आमच्यासाठी मटणाचे जेवण करायची व तितक्याच अगत्यानेप्रेमाने जेवू घालायची.
आमच्या अण्णां-काकूने आणि माझ्या आई-वडिलांनी संजूच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली व त्याला आमच्या बरोबर पुण्यातल्या शाळेत प्रवेश घेतला होता.  त्यानेसुद्धा ह्या संधीचा खूप चांगला फायदा करून घेतला व दोन्ही मामांचे नाव काढले (त्याची प्रचीती आज आम्हांला सुद्धा आली आणि आपसूकच डोळे पाणावले).  संजू, शिकला, पदवीधर झाला.  परत सोनुरीला गेला. काही दिवस शेती सुद्धा केली व शेवटपर्यंत करतही होता.
आता त्याला वेध लागले होते ते आपल्या एक एका बहिणीच्या लग्नाचे आणि आपल्या माय-माऊली आई वडिलांना सुखी जीवन दाखवण्याचे.  एक सांगतो अप्पा आणि आत्या सारखी प्रेमळ, मायाळू, निष्पाप, माय-माऊली मी आजवर पहिली नाही !
संजूने दिवस रात्र मेहनत केली. त्याला सुकट-बोंबील विक्री करण्याचा एक चांगला व्यवसाय मिळाला.  त्याने तो अगदी नेटाने केला त्याच्या जीवावर फुरसुंगीमधील गंगानगर मध्ये आधी भाड्याने घर घेतले.  तसेच सरकारी नोकरीच्या परीक्षा देत देत चक्क भारत संचार निगम मध्ये टेक्निकल केडर मध्ये नोकरीला लागला व अभियंता पदापर्यंत पोचलो.  पठ्ठ्याने एवढी मानाची नोकरी मिळाली तरी आपला व्यवसाय सोडला नाहीकारण ह्या व्यवसायाने त्याला त्याच्या पडत्या काळात फार मोलाची साथ दिली होती.  त्याला व्यवसायाची कधी लाज नाही वाटली.  त्याला कल्पना सारख्या अतिशय कष्टाळू व सुशील बायकोची संसाराला साथ मिळाली. त्याच्या सासऱ्यांना आणि मेव्हण्याला सुद्धा संजूचा फार अभिमान होता. ह्या व्यवसायाच्या आणि नोकरीच्या जीवावर त्याने स्वत:चे दोन मजली घर बांधले आहे. दहा पंधरा वर्षांपूर्वी जेंव्हा केव्हा आम्ही त्यांच्या कडे जात असू तेंव्हा संजूला सायकलवर पिशव्या लावून घरोघरी सुकट-बोंबील विक्री करायला अगदी निर्भीडपणे जातांना पहिले आहे.  उदिष्ट गाठण्याच्या त्याच्या ह्या ध्यासामुळे माझ्यासाठी संजू एक आदर्श होता. त्याने आपल्या दोन्ही मुलांना सुमित आणि सौरभला उच्च शिक्षित केले.  नुकतेच सुमितचे लग्नही चौफुल्याच्या पाटलांच्या मुलीबरोबर लावून दिले व त्यांना चक्क जर्मनीत नोकरी करून तिकडे आपला संसार थाटण्याची संधी दिली.  सौरभला मामाच्या साथीला व्यवसायाला जोडून दिले. असे सगळ्यांचे सगळे म्हणजे भावा बहिणीचे, संसार बैजवार लावून दिल्यावर आता कुठे जरा आराम करून लवकरच येणारे ते सोन्याचे, आनंदाचे दिवस उपभोगायचे सोडून, ही स्वारी मनाला चटका लावून चक्क स्वर्गातच निघून गेली.
त्यामुळेच आज मलाच काय पण आम्हां सर्व भावंडांना लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या.  आमच्या पुलाच्या वाडीत आम्ही सर्व भावंडानी आणि सवंगड्यानी (मीसाधनाताईकै.अमोलसुलभा-माईराणीकिशोरसंदीपबगाडेंच्या रेखासंध्याशैला व संजू कामठ्यांचा नंदू आणि घनश्याम, इंगळ्याचा संजयराहुलकिरणसचिनभारती,रोहिणीशिवल्यांचा सुनीलअनिलबाळू, शेळके, पोखरकर, चव्हाण, शेवकरी, निगडे, इत्यादी सवंगडी) खूप धमाल मज्जा केली आहे. ते दिवस आजही माझ्या स्मृतीपाटलावर ताजे आहेत.  त्यात माझे आणि संजूचे खास जमायचे. आम्ही तसे समवयस्कच होतो. आमची नर्मदा आजी तर आम्हां दोघांना खूप जीव लावायची.  तिच्या शेळ्या आणि कोंबड्या साभाळायचो. आम्हांला थंडीत गरम पाण्याने अंघोळ करायची असायची. तेंव्हा चक्क एक एक पोतं पाठीवर टाकून आम्ही दोघं डेक्कनवरील दिघ्यांच्या गुऱ्हाळातून (आता तिथे म्याकडोनाल्ड झालयं) उसाची चिपाडे आणायचो.  आम्ही मुठेच्या काठचे पुलाच्या वाडीचे रहिवासी. त्यात सगळ्यांचीच अगदीच बेताचीच परिस्थिती असलेले पण अतिशय सुखीसमाधानी,स्वाभिमानी आणि अभिमानी कुटुंबे गुण्या गोविंदाने रहात होतो.  संजू सर्वात मोठा होता आणि आमचा म्होरक्या होता. श्रावणात आणि गणपतीत तर आमच्या एवढी धमाल कोणी कधी केलीच नसेल हे मी ठाम पणे सांगू शकतो. कधी कधी संजूच्या गमती जमती मुळे मारही खाल्लाय आम्ही. खूप खूप आठवणी आहेत आमच्या संजूच्या.
तुम्हीं म्हणाल ह्या संजुबद्द्ल तुम्हीं आज एवढे का लिहिताय ! त्याचे कारण आपल्याकडे एक म्हण आहे जगावे परी कीर्तीरूपे उरावे”, ह्या म्हणीचा सार्थ अर्क म्हणजे आमचासंजू होय.
आज जेंव्हा त्याला श्रद्धांजली वाहण्याची माझ्यावर वेळ आली तेंव्हा शब्द थिटे पडू लागले होते.  मोठ्या प्रयासाने व मनावर दगड ठेवून मी माझे हे मनोगत लिहित आहे.
हे मनोगत अथवा श्रद्धांजली लिहिण्याचा एकमेव उद्देश म्हणजे संजू सारखे आदर्श सध्याच्या काळात निर्माण व्हायला हवेत.  आपल्या काही नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमंडळीना संजूच्या दु:खद निधनाची बातमीही मिळू शकेल व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होता येईल व त्यांचे थोडे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करता येईल. तसेच आपल्यातच दडून बसलेल्या अजून काही संजुना शोधून काढून त्यांना योग्य वेळी योग्य ती साथ देता येईल. असे अनके संजू तयार होतील, अशी भोळी भाबडी आशा. ईश्वर संजूच्या आत्म्यास शांती लाभू देत व त्याच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती दे.
शेवटी;
काय म्हणायचं हो ह्या नियतीला ! २०१५ पासून ती एका मागून एक घावच करत सुटली आहे.  आधी थोरला चुलत भाऊ अमोल (वय ३०) निधन पावला. त्याला जावून जेमतेम सहाच महिने होत नाहीत तोवर शालन काकू (माझी चुलती- वय ७०) त्याच्या वियोगाने गेली. वर्षभराने चुलत बहिणीचा सुधाचा थोरला मुलगा निलेश (वय ४२)ला देवाज्ञा झाली. त्यानंतर वर्षभरात मामे बहिण शोभा (वय ५५) किरकोळ आजाराने जवळ जवळ एक महिनाभर मृत्यूशी झुंज देता देता नशिबापुढे हरली.  मधेच २०१७ला माझापण (वय ५५) नंबर लागला होतापरंतु काळ आला होता पण वेळ नव्हती आली”. शोभाला जावून एक वर्ष होत नाही तोवर मामे भाऊ प्रदीपचे (वय ५५) अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.  ही दु:ख कशी बशी झेलत झेलत थोडा स्वास घेतो ना घेतो तोच चुलत बहिण सुधाचाच धाकटा शैलेश (वय ३५) हृदयविकाराच्या झटक्याने देवाघरी गेला. मती गुंग करणारा हाच तो गेल्या चार वर्षांचा काळ त्यावर ४ ऑगस्ट २०१९ रोजी माझ्या आत्येभावाने म्हणजे संजय अर्जुनराव काळे (वय ५७) ह्याने कळसच चढवला आणि आम्हां सगळ्यांना दु:खाच्या खोल खोल दरीत ढकलून स्वत: निमुटपणे देवाघरी निघून गेला.

थकला हो जीव माझा माझ्याच आप्तेष्टांनाच अशी श्रद्धांजली वाहून वाहून !

नेला आहेस रे देवा तू आम्हां सर्वांच्या काळजाचा ठेवा,
चिरंतन शांती लाभू दे त्यांच्या आत्म्यास देवा ||

ओम शांती ~ ओम शांती ~ ओम शांती

रविंद्र कामठे 

Tuesday 6 August 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – आगीतून उठून फुफाट्यात

अनुभवाच्या शिदोरीतून – आगीतून उठून फुफाट्यात
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

आकुर्डीच्या कंपनीतील नोकरी मी सलग ५ वर्षे केली.  परंतु रोज ७०-८० किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास मला नंतर नंतर पाठदुखीने त्रस्त करू लागल्यामुळे मी पुण्यातल्या संगम पुलाजवळील एका प्याकेजिंग मशीन बनवणाऱ्या कंपनीत १९९४च्या सप्टेंबरला रुजू झालो.  चांगला दीड वर्ष म्हणजे १९९६ पर्यंत मस्त रुळलो होतो.  मस्त मजेत चालले होते सगळे. नुकताच कुठे माझा जम ह्या कंपनीत बसू लागला होता.  कलकत्ता, दिल्ली, चंडीगड, महाराष्टभर माझी फिरतीही चालू होती. 
१९९६ला मी एक जुनी फियाट गाडीही घेतली होती.  ही गाडी म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिली चार चाकी होती.  जुनी का होईना पण त्याकाळी चार चाकी गाडी असणारा आमच्या खानदानातील आणि मित्रमंडळीतील मी एकमेव होतो. खूप धमाल करत होतो आम्ही त्या काळी.  फियाट गाडी आल्यापासून तर आम्ही भिंगरी सारखे फिरत होतो.  जरा सुट्टी मिळाली की चालले फिरायला ! आख्खे कोकण त्याकाळी पिंजून काढले होते त्यावेळेस. 
ह्याच कंपनीत काम करणाऱ्या माझ्या दोन सहकारी मित्रांनी सोलर सेल बनवण्याची एक कंपनी, कंपनीच्या मालकांच्या मदतीने काढली होती व मला त्या कंपनी मध्ये येण्याची विनंती केली होती, जी मला टाळता आली नाही व मित्रांच्या सोलरच्या कंपनीत रुजू झालो.
अमेरिकेच्या अक्षय उर्जास्तोत्र साठीच्या औद्योगिक मदतीच्या धोरणा नुसार ह्या सोलर कंपनीच्या प्रकल्पाला काही अनुदान मिळाले होते.  प्रकल्प खरचं खूपच चांगला होता.  अमेरिकेत प्रायोगिक तत्वावर केलेल्या चाचणीनुसार प्रयोगशाळेत अतिशय उत्तम रित्या सोलर सेल बनवण्यात ही मंडळी यशस्वी झाली होती आणि म्हणुनच त्यांना भारतात ह्या सोलर सेलचे उत्पादन करण्यास सांगण्यात आले होते.  ह्या प्रकल्पासाठी लागणारी जागा पाच वर्षाच्या भाडेपट्टीवर सिंहगडरोडवर सध्याच्या राजाराम पुलाजवळ मिळाली होती.  बाकी मशीन आणि इतर सामुग्री एक एक करून बनवून घेण्यात येणार होते व त्यासाठी लागणारा पैसा हा काही प्रमाणात अमेरिकेच्या मदतीने मिळणार होता व काही कंपनीच्या संचालकांच्या गुंतवणुकीतून येणार होता. 
एकंदरीत हा प्रकल्प फारच आशावादी होता व यशस्वी झाला तर भारताचे नाव तर उज्वल करणारा होता तसेच आमचे सगळ्यांचेही भवितव्य घडवणारा होता.  पण त्याचे काय आहे ना, आपण जे समजतो, योजतो, ठरवतो, कल्पना करतो, प्रयोजन करतो आणि स्वप्नरंजन करतो अगदी तसेच घडले तर काय?
१९९६ ते ११९७ हे एक वर्ष सर्व योजना सूत्रबद्ध पद्धतीने आखून ती नीटपणे प्रत्यक्षात उतरवण्यात गेले. खरी कसोटी होती ती ह्या प्रकल्पास लागणाऱ्या यंत्र सामुग्रीची. योग्य ती साधनसामुग्री पुण्यातच बनवून घेण्यात आली.  सोलर सेल बनवण्यासाठीचा कच्चा माल म्हणजे (विशिष्ट) प्रकरच्या काचा, सोडियम सल्फाईड आणि कॅडमियम टेलूराईड, तसेच खासकरून बनवलेली ग्राफाईटची आणि चांदीची पेस्ट अमेरिकेहून मागवण्यात आल्या.  आता फक्त ह्या मशीनची चाचणी घेणे व लवकरात लवकर उत्पादन करणे एवढेच राहिले होते.
एक भले मोठे हवेची पोकळी असलेले मशीन बनवण्यात आले होते त्यात ह्या १०० X १०० मिलीमीटरची विशिष्ट पद्धतीने स्वच्छ केलेली एक एक काच एका मागून एक अशी एका पट्ट्याद्वारे सोडायची.  ही एक एक काच एका विशिष्ट ठिकाणी आली की साधारण ७०० डिग्री तापमानावर तापवलेल्या सोडियम सल्फाईडचा तिच्यावर एक नाजूक थर दिला जायचा व तीच काच पुढे तशीच पुढे जावून पुन्हा एकदा ७०० डिग्री तापमानावर तापवलेल्या कॅडमियम टेलूराईडच्या थराने भरायची व तशीच मशीन मधून पुढे जायची.  असे एका मागून एक १०० काचा गेल्या की हे मशीन बंद करायचे व ते थंड झाले की ह्या काचा काढून घेऊन पुढील प्रक्रिया करायला म्हणजे ग्राफाईटचा एक थर लावायला पाठ्वायाचा.  तो थर झाला की शेवटी चांदीचा थर लावायचा.  त्यांनतर लेझरने काही विशिष्ट खुणा केल्या जायच्या, ज्यामुळे हा सोलर सेल तयार व्हायचा.  तो तयार झाला की प्रयोगशाळेत त्याची तपासणी करायची व त्या नंतर तो विक्रीसाठी तयार केलेल्या वेष्टनात गुंडाळून ठेवायचा.  इतके साधे आणि सोपे गणित होते.
पण आमच्या अथक प्रयत्नांना ह्या सगळ्यात कधीच यश आले नाही.  कधी कधी काचा आतल्या आत फुटायच्या, तर कधी तापमान प्रचंड वाढून काचा मशीन मधेच वितळून जायच्या.  सुरवातीच्या वर्ष दीड वर्षे हे सगळे असेच चालू होते. 
माझ्या ह्या उत्पादन विभागात आधी फारच थोडा सहभाग असायचा. पण नंतर नंतर काही इंजिनियर मंडळी कंटाळून सोडून जायला लागली व प्रकल्पाच्या कामावर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागला. मग काय, “जिथे कमी, तिथे आम्ही”, ह्या संकल्पनेनुसार माझ्यावरही रात्रपाळीच्या उत्पादनाची जबाबदारी टाकण्यात आली. मी आणि माझे सहकारी मित्र, रात्रभर मान मोडेस्तोवर काम करायचो.
पण आमच्याही कामाला यश येत नव्हते.  माझ्या निरीक्षणात एक गोष्ट आली की हे जे मुख्य मशीन आहे त्यात काही ठराविक बदल करणे गरजेचे आहे.  ज्यासाठी आम्ही NCLमधे सुद्धा जाऊन काचा कशा गरम करतात व त्या कशा हाताळतात हे पाहून आलो होतो.  थोड्याफार बदलाने हे मशीन नंतर काम करायला लागले व थोडेफार उत्पादन करू लागले.  परंतु सोलर सेल तयार होण्यासाठी लागणाऱ्या सोडियम सल्फाईड आणि कॅडमियम टेलूराईडच्या थराचे गणित कुठेतरी चुकत होते.
एक दिवस मी चांदीचा थर देणाऱ्या मशीनवर काम करत असतांना, एक काच मशीन मधे अडकली.  ती काढायला मी एक पट्टी घातली तर ते मशीन जोरात खाली आले व माझा डावा हात त्या मशीन खाली सापडला.  जिवाच्या आकांताने मी ओरडत होतो.  मला भोवळ यायला लागली होती.  तेवढ्यात माझ्या एका सहकाऱ्याचे लक्ष गेले.  मी त्याला पहिले मशीन बंद करण्यास सांगितले.  मशीन बंद केल्यावर वीस मिनिटांनी अथक प्रयत्नांती माझा मशीन खाली अडकलेला हात काढण्यात आला व मला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आले.  नशिबाने माझा हात शाबूत होता, मोडतोड नव्हती. फक्त सूज होती.  पण त्यामुळे मला परत मशीनवर काम करण्याची मुभा नव्हती.
आम्ही सगळे मिळून ४-५ जणांची टीम ह्या प्रकल्पासाठी दिवसरात्र खपत होतो. नोकरी न समजता अगदी स्वत:चाच प्रकल्प असल्यासारखे आमचे वागणे होते. सगळे अगदी एकरूप होऊन काम करत होतो.
ह्या प्रकल्पाने आम्हांला खूप काही शिकवले.  कागदावर कितीही आयोजन केले, नियोजन केले तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य त्या तंत्रज्ञानाची, योग्य त्या कौशल्याची, आर्थिक नियोजनाची आणि योग्य त्या मनुष्यबळाची खूप गरज असते.  अन्यथा हे कागदावरचे नियोजन कागदावरच राहते किंवा केलेल्या कष्टांचे चीज होत नाही. 
त्यातच आम्हांला आर्थिकदृष्ट्या खूपच अडचणी येऊ लागल्या. शेवटी व्यवस्थापनाने हा प्रकल्प बंद करण्याचे ठरवले व १९९९ साली माझ्यावर पुन्हा एकदा नव्याने नोकरी शोधण्याची वेळ येवून ठेपली.
“आलीया भोगासी, असावे सादर”, असे म्हणून मी परत एकदा झाले गेले सगळे विसरून नवीन नोकरी शोधायला सुरवात केली.  अथक प्रयत्नांती ती मिळाली ही, पण ह्यावेळेस ती होती गुजरात मधील वापी मधे.  माझा नाईलाज होता.  काय करणार ! हसत मुखाने ही नोकरी मी स्वीकारली आणि वापीला रुजू झालो.   
रविवारी सुट्टी असायची म्हणून मी दर शनिवारी संध्याकाळी वापी वरून मुंबई मार्गे पुण्यात यायचो व रविवारी रात्री परत वरुणच्या बसने वापीला जायचो व सोमवारी सकाळी कामावर हजर राहायचो.  तीन महिने कसे बसे हे केले पण तिथे सुद्धा त्या कंपनीतील मधील काही स्थानिक लोकांच्या राजकारणामुळे, माझ्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे मला अडचणी येऊ लागल्या.  मला एकंदरीत सगळे कसे असुरक्षित वाटू लागले.  तिथल्या वातावरणाचा आणि लोकांचा त्रास होऊ लागला.  काही केल्या माझे मन ह्या नोकरीत रमेना.  मग काय नाईलाजाने वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या संमतीने ह्या कंपनीलाही राम राम ठोकून परत एकदा पुण्यात नशीब आजमावायला निघून आलो.  म्हणतात ना, “इच्छा तिथे मार्ग”.
माझे नशीब मला पुन्हा पुन्हा आगीतून उठून फुफाट्यात टाकत होते. मी परत तितक्याच उमेदीने परिस्थितीस सामोरे जात होतो.

रविंद्र कामठे