Wednesday 25 April 2018

पक्षांसाठी दाणापात्र आणि पाणीपात्र- एक प्रयोग २०१८


 

 
 
सध्या उन्हाचा पारा अगदी चाळीशी ओलांडून गेलाय.  माणसांच्या अंगाची तर लाही लाही होते आहे.  उन्हाचा चटका अगदी सहन होत नाही.  त्यामुळे शक्यतो माणसे घरातून अथवा कार्यालयातून बाहेर पडतच नाहीत. हे झाले माणसांचे ! परंतु पक्षांचे काय ? ते तर बिचारे ह्या कडक उन्हात दाणा-पाण्यासाठी वणवण करत उडत असतात.  उडता उडता धाडकन जमिनीवर कोसळतात.  बिचारे काय करणार ! त्यांना तर धड बोलताही येत नाही आणि कोणाला सांगताही येत नाही.  त्यांच्यावर, आम्हां माणसांनी नष्ट करत आणलेले पर्यावरण जपण्याची, जगवण्याची फार मोठी जबाबदारी असते ना ! ती जबाबदारी हे पक्षी बिचारे एवढ्या उन्हातान्हात आपल्या जीवावर उदार होऊन पार पडण्याचे कष्ट घेत असतात.  त्यात काही शहीद होतात तर काही सफल होतात.  आपण माणसांनी ह्या अशा कडक उन्हात आपल्या ह्या पक्षांसाठी आपापल्या घराच्या खिडकीत, गच्चीवर, बागेत किंवा जिथे जागा असेल तिथे, फार काही नाही तर थोडेसे दाणा आणि पाणी ठेवले तरी खूप आहे.  मी नेहमी प्रमाणे ह्या वर्षीही असेच काही प्रयोग करून पक्षांसाठी दाणा आणि पाण्यासाठीची वेगवेगळी सोय केली आहे.  तसेच ह्या वर्षी पाच लिटर पाण्याच्या बाटलीतून ठिबक सिंचन पद्धतीने पक्षांसाठी माझ्या घराच्या गच्चीत पाण्याची सोय केली आहे.  अशा रीतीने साधारण २-३ दिवस हे पाणी पुरते व ते एका थाळीत सतत थेंब थेंब पडल्यामुळे एवढ्या उन्हातही गरम होत नाही हे त्याचे वैशिष्ट.  त्यामुळे पक्षांना प्यायला थंड पाणी तर मिळतेच परंतु आपल्यालाही त्यावर सतत लक्ष ठेवण्याची गरज पडत नाही.  सोबत काही छायाचित्रे देत आहे ज्यामुळे तुम्हांला माझ्या ह्या प्रयोगाची कल्पना येईल आणि तुम्हीं सुद्धा हा प्रयोग तुमच्या सवडीने घरी करू शकाल हे मात्र नक्की. माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रयोग लवकरात लवकर अमलात आणावा आणि पक्ष्यांना जीवनदान द्यावे.

 

माझा कालचाच अनुभव सांगतो.  दोन दिवसांपुर्वी मी पक्षांसाठी दाण्याची सोय एका कचकड्याच्या दाणापात्रात करून ठेवली होती.  त्यावर कावळा आणि कोकीळ ह्याची वादावादी झाली.  त्यांच्या भांडणात दाणा ठेवलेले कचकड्याचे भांडे तुटून पडलेले होते आणि सगळी ज्वारी गच्चीत सांडलेली होती.  संध्याकाळी घरी आल्यानंतर मी गच्चीत एक चक्कर मारून झाडांना पाणी देण्यासाठी गेलो होतो तेंव्हा हा प्रकार पहिला.  एका गोष्टीचे मला खूप बरे वाटले ते की, आपण केलेला हा प्रयोग पक्षांना आवडलेला दिसतोय तसेच त्यांना त्याची खरोखर गरज दिसते आहे.   मनोमन मला खूप आनंद झाला आणि मी लगेचच कामाला लागलो.  साधारण तासाभरात एक कचकड्याची बाटली आणि भांडे घेऊन पुन्हा एक दाणापात्र तयार करून त्याच जागी बसवून मोकळाही झालो.  त्याच उत्स्फूर्ततेने वाण्याच्या दुकानातून परत एक किलो ज्वारी घेऊन आलो.  बाटलीत अर्ध्यापेक्षा जास्त ज्वारी भरून ठेवली आणि एका वेगळ्याच खुशीत स्वत:ला लोटून मोकळा झालो.  कोणाच्या नाही तर पक्षांच्यातरी आपण उपयोगी आलो ह्या भावनेने मन भरून आले आणि ह्या पर्यावरण रक्षकाच्या कामी आलो ह्याचे अप्रूप वाटून हात धुवून जेवायला बसलो.  माझ्याच एका कवितेचे शब्द मला आठवले...

जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे,

कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे ||

 

रविंद्र कामठे.

Friday 20 April 2018

“काळीजकाटा” – संवेदनशील स्त्रीमनातील व्यथांचा फुफाटा


काळीजकाटा संवेदनशील स्त्रीमनातील व्यथांचा फुफाटा
सोलापूर मधील सांगोला तालुक्यातील चोपडी ह्या गावामधील जेष्ठ लेखक श्री. सुनील जवंजाळ ह्यांची काळीजकाटाही कादंबरी ३ फेब्रुवारी २०१८ रोजी पुण्यातील चपराकप्रकाशनने जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले ह्यांच्या हस्ते प्रकाशित करून, मराठी साहित्यात अजून एका मौल्यवान साहित्यकृतीची भर घातली आहे.  सध्या मराठी साहित्याला घरघर लागली आहे, तसेच नवनवीन साहित्य जन्माला येतच नाहीत, प्रतिभावंत लेखकही नाहीत, मराठीला वाचकच नाहीत, तसेच प्रकाशकही काळाच्या पडद्या आड जात चालले आहेत, असा कंठशोष केला जात असतांना, सोलापूर जिल्ह्यातील चोपडी सारख्या खेडेगावातून श्री. सुनील जवंजाळ सारख्या प्रतिभावंत लेखकाचा काळजाला घरे पाडणारी संवेदनशील कादंबरी प्रकाशित होणे म्हणजे निश्चितच कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे.
काळीजकाटानव्हे तर एका संवेदनशील स्त्रीमनातील व्यथांचा फुफाटा आहे असे मला ही कादंबरी वाचतांना जाणवले.  काळ्या मातीच्या पाटीवर जगण्याचे तत्वज्ञान गिरवत मोठे झालेले, ह्या कादंबरीच्या संवेदनशील नायिकेचे मायबाप हेच तिच्या साठी सर्वस्व असणे हेच आपल्या ग्रामीण संस्थेतील संस्कारांचे प्रतिक अतिशय नि:संकोच लेखकाने मांडले आहे.  सध्याच्या काळातील ह्या निष्ठुर आणि वासनांध जगात स्त्रीने तिच्या देहाची विटंबना जरी झाली तरी ते पाप न मानता, परिस्थितीपुढे खचून न जाता आपले उर्वरित आयुष्य सुखकर कसे होईल ह्याची शिकवण देणारी ही कादंबरी आहे हे जळजळीत सत्य वाचून मन व्यतिथ झाल्याशिवाय रहात नाही.  हेच ह्या कादंबरीचे यश म्हणावयास हवे. ह्यावरून कादंबरीचा विषय वाचकांच्या लक्षात आलाच असेल.  त्यामुळेच मी कथेवर जास्त भाष्य न करता तिच्या आशयावर भर माझ्या ह्या लेखातून देण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त वाचक ही कादंबरी वाचण्यास उद्युक्त होतील अशी आशा आहे.
समुद्रात मिसळणे आणि समुद्राचं होणे हे पावसाच्या थेंबांचं ऐश्वर्य असतंअसं आयुष्याच खूप मोठं तत्वज्ञान सांगणारा हा लेखक बाईनं सुंदर असावं, पण आतल्या आत”, असं आपल्या समाजामधील जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी दिसणाऱ्या वासनांध प्रवृत्तींचा काळा चेहराच, संयुक्तिक घटनांच्या शृंखलांच्या मदतीने अतिशय प्रभावीपणे मांडून कथेची कास शेवटपर्यंत जपतो हे फारच कौतुकास्पद आहे.  कुठेही अतिशयोक्ती नाही की कुठेही संकोच बाळगला नाही.  एका मागून एक घडत चाललेल्या घटना आणि त्यातून स्त्री मनाच्या जीवाची होत असलेली घालमेल, आपल्या मायबापांच्या भावनांचा तिने केलेला विचार आणि त्यातून त्यांच्यासाठी स्वत:च्या भावनांना दिलेली तिलांजली, मन अगदी विषण्ण करून जाते.
ह्या कादंबरीतील नायिका ही जरी ग्रामीण असली तरी ती सुशिक्षित तर आहेच पण एक लेखिका आहे.  तिच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला पुरस्काराबरोबर तिच्या अबला नारीत्वाचा गैरफायदा घेवून तिला विटंबित केले जाते व तिच्या शिरीरालाही पुरस्कृत केले जाते, हे अतिशय गंभीर पण वास्तववादी चित्र लेखकाने मांडून आपल्या समाज व्यवस्थेमधील विकृतींची फार संवेदनशीलतेने मांडणी करून वाचकांना अंतर्मुख केले आहे.  ही नायिका इतकी संवेदनशील आहे की तिच्या लेखणीतून पानावर उमटलेले शब्द रडत रडत आपल्याशी संवाद साधत आहेत असेच वाटते.  ही कादंबरी एकदा वाचायला घेतली की ती संपेपर्यंत खाली ठेववतच नाही इतका ह्या कादंबरीचा आकृतिबंध आपल्याला ह्या कथेशी एकरूप करून सोडतो.  आपल्या नकळत आपण ह्या कथेमधील नायिकेशी नाते जोडतो, तिच्या सुख दु:खात समरस होऊन जातो आणि वाचता वाचता पाणावलेल्या डोळ्यांनी तिला उर्वरित आयुष्यासाठी आशीर्वादही देवून जातो.
ही कादंबरी म्हणजे वयात येताच विटंबित झालेल्या प्रत्येक मुलीची आत्मकहाणीच आहे असे वाटू लागते.  लेखकाने ह्या कथेच्या माध्यमातून काही व्यक्तींची काळी कर्तुत्वे, समाजविघातक प्रवृत्ती, सर्वदूर पसरलेली पुरुषी वासनांध वृत्ती, तसेच ह्या आधुनिक आणि सुशिक्षित जगातही अजूनही नारीची विटंबना करण्याची बोकाळत चाललेली आपली संस्कृती अतिशय समर्थपणे मांडून वाचकांना संवेदनशील केले आहे.  एकविसाव्या शतकातही आपली नारी ही किती सोशिक आहे आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेचा बळी आहे हे प्रकर्षाने दर्शविणारी ही कादंबरी असली तरी त्याच विटंबित नारीला आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून कुठेही न डगमगता वाटचाल करण्यास उद्युक्त करणारीही वाटते हे वैशिष्ट्य.
वेदनेच्या पाउलखुणाह्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसिध्दी मिळवलेल्या ह्या कवी मनाच्या लेखकाने काही काही घटनांचा प्रभाव वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वगतांचा अतिशय प्रगल्भतेने वापर केला आहे.  तसेच बऱ्याच ठिकाणी काव्यात्मकतेने अलंकारिक भाषेचा सहज वापर करून ह्या कादंबरीच्या लेखनवैभवात फार मोलाची भर टाकली आहे.  ह्या कादंबरीवर चित्रपट अथवा नाटक एखादा जाणकार निर्माता-दिग्दर्शक नक्कीच करू शकेल अशी मला खात्री आहे आणि माझी ती सदिच्छा आहे.  मी तर म्हणेन की प्रत्यकाने एकदा का होईना ही कादंबरी वाचली तर आपल्या समाजातील बोथट झालेल्या संवेदना जागृत करण्यास नक्कीच मदत होईल असे मला तरी वाटते.  कदाचित लेखकाचा ह्या कांदबरी प्रकाशनामागे समाज प्रबोधानाचा हाच एक सकारात्मक दृष्टीकोन आणि उद्देश असावा.
सुप्रसिद्ध चित्रकार श्री. संतोष घोंगडे ह्यांनी अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ साकारून ह्या कादंबरीतील कथेस योग्य तो न्याय दिला आहे तसेच चपराक प्रकाशनचे श्री. घनश्याम पाटील ह्यांनी ही कादंबरी प्रकाशित करून साहित्य विश्वास खूप मोलाची भेट दिली आहे.  श्री. सुनील जवंजाळ ह्यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेछ्या.

रविंद्र कामठे
१० फेब्रुवारी २०१८

पक्ष्यांसाठी दाणा पाणी



"पक्ष्यांसाठी दाणा पाणी"
दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही मी पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था केली आहे. तसे पाहायला गेले तर आम्ही बागेच्या मागच्या बाजूला चिक्कूच्या झाडाखाली मातीचे एक भांडे बारमाही ठेवलेले आहेच.  ह्या पाण्यावर आपल्या वहिवाटीच्या हक्काने रोज बुलबुल, वटवट्या, कोकीळ, कोकिळा, भारद्वाज, खारुताई, कावळे, लहान लहान पक्षी, अगदी हक्काने येत असतात.  बुलबुल तर अगदी जोडीने तर कधी कधी आपल्या लेकरा बाळांसहीत मस्त पैकी डुंबूत असतात. त्यांच्या ह्या लीला पाहताना मन कसे प्रसन्न होऊन जाते. सोबत दोन छायाचित्रे देत आहे त्यावरून तुम्हांला कल्पना येईलच.
एकंदरीत कडक उन्हात पक्षांना सतत थंड पाणी प्यायला मिळावे म्हणून मी ह्या वर्षीही मी एक प्रयोग केला आहे.  दोन लिटर (पाच लिटरही घेऊ शकता) पाण्याच्या बाटलीला अगदी तळाला बॉलपेनची रिफील जाईल असे भोक पाडले, त्यात रिफील खोवली आणि फेविक्विक ने बुजवली. नंतर ह्या रिफील मध्ये खराट्याची एक काडी त्यात घुसवली.  बाटलीला वरील भागात हवा जायला एक छोटे भोक पाडले.  (दवाखान्यात सलाईनचे जे तंत्र आहे ना तेच मी इथे वापरले आहे). तसेच बाटलीच्या झाकणाला एक तार बांधली, जेणेकरून बाटली झाडाला टांगता येईल. बाटलीत २ लिटर पाणी भरले आणि ती बाटली एका झाडाला टांगली.  आता बाटलीतून थेंब थेंब पाणी पडायला लागले होते.  हो पण हे थेंब जर एक सेंकदाला एक असे हवे असल्यास त्यानुसार खराट्याच्या काडीची जाडी बदलावी.  बाटलीच्या खाली शक्यतो एक मातीचे भांडे ठेवावे ज्यात हे थेंब थेंब पाणी पडत राहील.  साधारण एक दिवसांत दोन लिटर पाणी भांड्यात पडते.  पाण्यावर उठणाऱ्या तरंगांमुळे पक्ष्यांना भांड्यात पाणी आहे ह्याची जाणीव होते तसेच सतत एक एक थेंब पाणी पडत असल्यामुळे पाणी गरमही होत नाही.  जरी ते वाहून गेले तरी खालील झाडालाही पाणी मिळते आणि पक्ष्यांना ह्या उन्हाळ्यात अगदी थंड पाणी मिळते. हे पक्षी ह्या पाण्यात अगदी मनसोक्त डुंबतात आणि त्यांच्या उन्हाचा ताव सहन करू शकतात.  आपल्यालाही त्यांना ह्या उन्हाच्या तडाख्यातून वाचविल्याचे समाधान मिळते.  मन प्रसन्न तर होतेच परंतु फार मोठे पुण्याचे काम केल्यासारखे भासते.  आत्मिक आणि सात्विक समाधान काय असते ते उमजते आणि हेच काय ते अक्षय दान आहे असे म्हणावेसे वाटते.  फारसे काही कष्ट न करता तुम्हीं हे अगदी सहज घर बसल्या करू शकता.  उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनाही हे करायला लावू शकता आणि त्यांच्या मध्ये आपल्या निसर्गाची तसेच आपली जैव विविधता जपण्याची आणि पर्यावरणाच्या रक्षणाची जाणीव करून देऊ शकता.
जर आपण कोणी जंगलांमध्ये किंवा इतरत्र कोठे भटकत असाल तर सोबत अशा काही बनवलेल्या बाटल्या आणि मातीची भांडी घेऊन जा व ती योग्य जागी बसवा.  त्या खाली एक टीप लिहायला विसरू नका.. की बाटलीतील पाणी संपले तर कृपया बाटलीत पाणी भरावे तसेच मातीच्या भांड्यात खूप घाण साठली असेल तर ते स्वच्छ करून परत आहे त्या जागी ठेवावे”.  पहा एकदा हा प्रयोग करून आणि मग मला सांगा किती समाधान मिळते ते.
अजून एक, माझ्या ह्या प्रयोगात जर कोणा जाणकाराला काही सूचना करायच्या असतील तर सांगा मला आनंद होईल.
रविंद्र कामठे