Saturday 31 December 2022

नवीनवर्ष २०२३ च्या हार्दिक शुभेच्छा

नवीनवर्ष २०२३ च्या हार्दिक शुभेच्छा 

नमस्कार मंडळी,

२०२२ वर्ष आले तसे शांत शांतच गेले असेच म्हणावे लागेल.  ह्या शांततेच एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे २५ ऑगस्टला मी साठीत प्रवेश केला आणि त्याच दिवशी “चपराक प्रकाशन”ने माझी  अनोख्या रेशीमगाठी “ ही कादंबरी प्रकाशित करून मराठी साहित्य विश्वात अजून एका साहित्य संपदेची भर घातली आणि मी कृतकृत्य झालो.

माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा कायमच सकारात्मक राहिला आहे.  त्याचेच प्रतिबिंब माझ्या “अनोख्या रेशीमगाठी” ह्या कादंबरीत पडल्याचे माझ्या असंख्य वाचकांनी त्यांचा अभिप्राय देताना सांगितले.  माझ्यासाठी वाचकांचा हा असा अभिप्राय म्हणजे आयुष्यातील एक अमुल्य अशी भेटच आहे.  माझ्या ह्या कादंबरीत मी वयाच्या पन्नाशीत नियतीमुळे आलेल्या एकाकीपणाला सध्याच्या गाजत असलेल्या “लिव्ह इन रिलेशनशिप” चा पर्याय सुचवून त्यावर अतिशय सहजपणे विचार प्रदर्शन करून एक प्रकारे समाज प्रबोधन करण्याचा साधा आणि सोपा मार्ग निवडला आहे.  आपली डळमळीत होत चाललेली सध्याची विवाह संस्था आणि त्यामुळे संक्रमणातून जात असलेली आपली कुटुंब व्यवस्था यावर थोडा उहापोह करून नात्यातील वीण जर घट्ट असेल तर सगळेच कसे चांगले घडू शकते असा एक आनंददायी प्रयास मी माझ्या ह्या कादंबरीच्या माध्यमातून करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. 

मला कल्पना आहे की माझ्या ह्या कादंबरीत एखाद दुसरा अपवाद सोडला तर सगळेच कसे छान छान व मनासारखे घडलेले दाखवले आहे.  अर्थात आपण जर ठरवले तर सगळेच कसे आलबेल असू शकते हेच तर मी सांगण्याचा अट्टहास केला आहे.  तो ही जाणूनबुजूनच.  मला स्वत:ला राग, द्वेष, कटकट, भांडण तंटा, वाद विवाद, इत्यादी करायला फारसे आवडत नाही.  आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात इतक्या नकारात्मक गोष्टी घडत असतात त्यात भर कशाला घालायची अशी माझी मानसिकता आहे.  जे काही आयुष्य लाभले आहे ते सत्कारणी लावावे अशी माझी मानसिकता असते.  त्यात आपण जेवढे चांगले बोलू, चालू अथवा वाचू, पाहू, तेवढे आपण सकारात्मक होऊ असे मला जाणवले आणि माझी “अनोख्या रेशीमगाठी” ही कादंबरी माझ्या लेखणीतून प्रसवली.  ही तर सरस्वतीची आणि माझ्या दिवंगत मातोश्रीची कृपा होय.

माझ्या कादंबरीला रसिक वाचकांचा खूपच चांगला प्रतिसाद लाभला व त्यांच्या उत्सुफुर्त अभिप्रायाने तर मी खूपच भारावून गेलो.  माझी कादंबरी वाचून वाचक कादंबरीतील ‘आंजर्ले’ ह्या कोकणातल्या माझ्या बायोकोच्या आजोळी जाऊन प्रत्यक्ष भेट देत आहेत, पर्यटन करत आहेत व त्यात दोघा वाचकांनी तर कड्यावरील गणपतीचे दर्शन घेऊन मला तिथून तसे फोटोही पाठवले आहेत.  एका लेखकाला ह्यापेक्षा अजून काय हवे असते हो !  हेच माझ्या “अनोख्या रेशीमगाठी”चे यश आहे आणि हीच तर माझ्यासाठी २०२२ ह्या वर्षातील अविस्मरणीय अशी अनुभूती आहे असे अगदी अभिमानाने सांगू इच्छितो.

स्वेच्छा निवृत्ती घेऊन लिखाणाचा छंद जोपासण्याचा मी संकल्प सोडला आहे तो पूर्णत्वास नेण्याचा माझा आटोकाट प्रयत्न चालू आहे.  लवकरच ‘प्रेमाचं कोडं हा कथा संग्रह’, ‘शहाणपण देगा देवा हा बाल कथा संग्रह’ आणि ‘प्रवास कवितेचा’ अशी तीन पुस्तके प्रकाशित करण्याची योजना आहे. ह्या प्रलंबित योजेनेची २०२३ मध्ये पूर्तता करण्याचे मी योजले आहे.  तुमच्या सर्वांच्या सहकार्याने व शुभेछ्यांनी माझा हा संकल्पही पुरा होईल ह्याची मला खातरी आहे.  जे बरोबर आहे ते आणि जे बरोबर नाहीत त्या सर्वांचे मनापासून आभार. माझ्या रसिक वाचकांचा तर मी ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मला सकारात्मक उर्जा मिळते व लिहिण्याचे बळ मिळते.

लिहिते राहणे हाच काय तो मी माझ्यासाठी २०२३ सालासाठीचा संकल्प सोडला आहे.

२०२२ वर्ष खूप काही शिकवून गेले,

२०२३ साठी खूप काही देऊन गेले |

 मंडळी, सर्वाना २०२३ ह्या नववर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. 

रवींद्र कामठे

३१ डिसेम्बर २०२२

Wednesday 7 December 2022

“गोष्ट एका रिटायरमेंटची” एक भावस्पर्शी गोष्ट

गोष्ट एका रिटायरमेंटची” एक भावस्पर्शी गोष्ट 


पुणे जिल्ह्यातील नीरा ह्या गावचे रहिवासी असणारे सुप्रसिद्ध लेखक श्री. सुनील पांडे यांनी त्यांचीगोष्ट एका रिटायरमेंटची हीस्नेहवर्धन प्रकाशनने प्रकशित केलेलीएक दिवसीय कादंबरीमाझ्या वाचनात आली तिने मला माझा हा अभिप्राय लिहिण्यास भाग पाडले.  त्यात ही कादंबरी पुण्यातले जेष्ठ साहित्यिक श्री. नागेश शेवाळकर सरांना अर्पण केली आहे हे वाचल्यावर तर मला सुनील पांडे सरांबद्दल प्रंचड आदर वाटला.  माणूस इतका विनयशील असू शकतो ह्यावर माझा विश्वास दृढ झाला.

वाचकहो, “गोष्ट एका रिटायरमेंटचीही काही फक्त सुनील पांडे यांच्याच आयुष्यात घडणारी गोष्ट नव्हे तर ती तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात घडणारी, तसेच आपल्या आसपास घडणारी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग वाटणारी अशीच वाटते.  मी ही गोष्ट वाचायला घेतली आणि तिच्यात इतका हरवून गेलो की काही विचारू नका.  तीन वर्षांपूर्वी मी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती त्यावेळेस माझाही असाच निरोप समारंभ आयोजित केला होता त्याची आठवण ताजी झाली आणि माझ्याही कळतनकळत ही गोष्ट वाचताना पदोपदी माझे डोळे पाणावले हीच ह्या कादंबरीची फार मोठी जमेची बाजू आहे.

सुनील पांडे सरांनी ह्या गोष्टीतून ज्या काही व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभ्या केल्या आहेत त्या वाचताना आपण त्या व्यक्तिरेखांशी समरस होऊन जातो काळीज हेलावून जाते.  एका सरकारी कार्यालयातील शिपाई आणि त्याचे वरिष्ठ साहेब एकाच दिवशी निवृत्त होतात आणि त्यांच्या निरोप समारंभाच्या दिवशी ह्या कादंबरीचे नायक गजानन साठे आपल्या नोकरीतील आयुष्यातील ४० वर्षांचा जो काही भावस्पर्शी धांडोळा घेतात त्या संकल्पनेलाच मला नमन करावेसे वाटते. 

सुनील पांडे सरांनी ही, अतिशय छोटी म्हणजे, एक दिवसाच्या गोष्टीतून आपल्या वैयक्तिक आयुष्याचा तसेच नोकरीतील, प्रवासातील नात्यांचा ज्या सुबकतेने उलगडा केला आहे त्याला तोड नाही.  ह्या कादंबरीचा नायक एक शिपाई जरी असला तरी तो भावनेने, त्याच्या वागण्याने त्याच्या चांगुलपणाने वाचकांच्या मनात घर करतो हुद्दा अथवा पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर तो त्याच्या वर्तनाने चांगुलपणाने श्रीमंत ठरतो हेच सिद्ध करतो हे ह्या कादंबरीचे बलस्थान आहे.  

नात्यांमधील ताणतणाव, चढउतार, भावभावना, हेवेदावे, गरजा, द्वेष, एककल्लीपणा ह्या सर्व गोष्टींची गुंफण ज्या पद्धतीने लेखकाने केली आहे त्यात वाहवत जाण्यासाठी भरपूर वाव असूनही लेखकाने अतिशय मर्यादेत राहून ही वरवर अगदी छोटीशी वाटणारी गोष्ट कुठेही भरकटू दिलेली नाही हे वैशिष्ट्य आहे. काही काही प्रसंग त्यात घातलेली नात्यांची सांगड इतकी विलक्षण जमली आहे की, वाचताना कंटाळा तर येतच नाही परंतु उगाचच फार समाज प्रबोधन केल्याचा आवही वाटत नाही.  

सर्वात शेवटी त्यांच्याच बरोबर निवृत्त होणाऱ्या वाघमारे साहेबांनी त्यांचाशी विश्वासाने साधलेला संवाद तर ह्या गोष्टीचा कळस आहे.  कादंबरी वाचताना डोक्यात जाणारे खलनायक वाटणारे हेच ते वाघमारे साहेब कादंबरीच्या शेवटाला आपल्याला नायक वाटायला लागतात हे तर ह्या गोष्टीचे फार मोठे फलित आहे असे मला वाटते.  अगदी सहज सोपी वाटणारी परंतु तितकीच मोठी अवघड गोष्ट इतक्या सोप्या पद्धतीने मांडण्याची कला सुनील पांडे सरांना खूप आधीपासून अवगत असावी हे त्यांच्या ह्या २२ व्या साहित्य संपदेवरून सिद्ध होते.

ह्या कादंबरीत पांडे सरांनी सर्वसामान्य नोकरदार माणसाच्या आयुष्यात एकदा येणार निवृत्तीचा दिवस त्याच्या मनाची होणारी घालमेल त्यात गतकाळातील चांगल्या वाईट स्मृतींना दिलेला उजाळा ज्या सहजतेने मांडला आहे की, ज्याने तो क्षण अनुभवला आहे तोही भावविवश होतोच होतो,  पण ज्यांच्या भविष्यात तो क्षण येणार आहे त्यांनाही ही हुरहूर लावून जातो.  माझ्या सवयीप्रमाणे मी ह्या गोष्टीचा फारसा उलगडा करत नाही, उलट रसिक वाचकांना नम्र विनंती करतो की तुम्ही ही कादंबरी विकत घेऊन नक्की वाचा.  तुमच्या मनातील खूप साऱ्या भाव भावनांना मोकळी वाट करून द्या.  हीच तर खरी सुनील पांडे सरांसारख्या लेखकांच्या साहित्य संपदेची ताकद आहे.

संतोष घोंगडे सरांनी साकारलेले मुखपृष्ठ तर नेहमीप्रमाणे गोष्टीतील विषयाला अनुरूप असेच आहे त्यात काही वादच नाही. स्नेहवर्धन प्रकाशनच्या डॉ. स्नेहल तावरे यांनी अतिशय दर्जात्मक निर्मिती केली आहे असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.

लेखक श्री. सनिल पांडे सरांचेगोष्ट एका रिटायरमेंटचीत्यांच्या ह्या अप्रतिम हृदयस्पर्शी साहित्य संपदेसाठी मन:पूर्वक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा.

 पुस्तक - “गोष्ट एका रिटायरमेंटची

लेखकश्री. सुनील पांडे (नीरा)

प्रकाशकडॉ स्नेहल तावरे, स्नेहवर्धन प्रकाशन

पृष्ठे१००

मूल्य १५०/-

रवींद्र कामठे

ravindrakamthe@gmail.com