Friday 24 February 2023

“शेजार धर्म, हा तर माणुसकीचा धर्म”

 “हा तर माणुसकीचा धर्म”

वाडा संस्कृती म्हणजे आपल्या पुण्याची एक वेगळी ओळख होती.  शेजारीपाजारी सगळे एकमेकांना इतके जीव लावत असत की जसे काही ह्या सगळ्यांचे जन्मोजन्मीचे रक्ताचे नातेच आहे.  एखादा बाका प्रसंग आला तर सगळे कसे अगदी सख्ख्यासारखे धावून जायचे व मदत करायचे.  सुखात आनंदही तितकाच मजेत लुटायचे.  

"थिंक पाॕझिटिव्ह" ह्या मासिकाचा विषय होता 'सगळ्यात जवळचं नातं शेजारी'.  त्यावर आधारित माझा हा तर माणुसकीचा धर्म हा लेख प्रकाशित झाला आहे.  तो जरूर वाचा व मला तुमचा अभिप्राय कळवा.  "थिंक पाॕझिटिव्ह" संपादक मंडळाचे मनापासून आभार.






माझे बालपण पुण्यातील डेक्कन जिमखान्या जवळील पुलाच्या वाडीत गेले. चाळीवजा घरात आमचे अतिशय सुखाचे, समाधानाचे आणि तितकेच स्वाभिमानी आयुष्य गेले.  मी, आई-वडील (आता हयात नाहीत), आम्ही तीन भावंडे आणि तीन चुलत काका काकू, चुलत भावंडे, तसेच आमचे सख्खे शेजारी आबा आणि ताई व त्यांची चार मुले (तीन मुली व एक मुलगा).  शेजारी, समोर आणि आजूबाजूला सगळी कष्टकरी माणसे रहात होती.   आम्हा सगळ्यांचेच जेमतेम दीड-दोन खोल्यांचेच घर, त्यात घरातच मोरी असलेले असे आगळे वेगळे विश्व होते, पण सुखी समाधानी होते.

आमच्या शेजारचे आबा आणि ताई (आता हयात नाहीत) अतिशय हुशार, कुशल व तत्वज्ञानी होते.  त्यांच्याकडून मला तर खूप बाळकडू मिळाले आहे.   सुसंस्कृतपणाचे सर्व संस्कार माझ्यावर त्यांच्यामुळेच झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही.  त्या काळी, म्हणजे माझ्या जन्मानंतर (१९६३) नंतरचा काळ म्हणजे सर्वच बाबतीत सुवर्णकाळ होता असेच आता म्हणावे लागले.  अगदी चित्रपट सृष्टीत त्याचे प्रतिबिंब जाणवत होते.

एक एक प्रसंग व घटना स्मृतीपटलावर क्षणार्धात अवतीर्ण होतात.  आमच्या घरांना दारे होती, खिडक्या होत्या, परंतु ते सर्व फक्त आणि फक्त उशीरा मध्यरात्रीनंतर लावण्यासाठी !  ते ही घर मुठा नदी किनारी असल्यामुळे थंडीवाऱ्या पासून संरक्षण म्हणून !  मला तरी घराला दिवसाढवळ्या कधी कुलूप लावलेले आठवत नाही.  शेजारीपाजारी सगळे एकमेकांना इतके जीव लावत असत की जसे काही ह्या सगळ्यांचे जन्मोजन्मीचे रक्ताचेच नाते आहे असे भासे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक वाड्यात अथवा चाळीत फक्त एकच शौचालय असायचे.  मंडळी, माझ्या अनुभवातून सांगतो, ज्यांनी ह्याचा अनुभव घेतला आहे ना, त्यांना आयुष्यात कधी अहंकाराने ग्रासले नसणार ह्याची मला खात्री आहे.  त्यामुळेच की काय, एकमेकांची सुख दु:खे समजून उमजून घेता येत असतील असे वाटते. असो.

शेजार असावा तर कसा असावा ह्याचे आबा आणि ताई उत्तम उदाहरण होते.  शाळेतून दुपारी घरी आलो आणि समजा घरात कोणी नाही असे झाले तर, ताई आवर्जून लक्ष देणार.  मुळातच आमच्या घरात कोणी नाही व भूक लागली आहे असे वाटले तर सरळ ताईंकडे जाऊन निसंकोचपणे खायला मागायचो.  त्याही तितक्याच आपुलकीने व मायने त्यांच्याकडे घरात जे काही केलेले असेल ते देण्यास कचरत नव्हत्या. कालांतराने आबा आणि ताईंशी आमचे कायमचेच नातेच जुळले. म्हणजे धाकट्या भावाने त्यांच्या धाकट्या मुलीशी लग्न करून सोयरिक साधली व एकमेकांचे शेजारी असलेले आमचे नाते अजून घट्ट होऊन रक्ताचे नाते झाले.

माणुसकीने व आपुलकीने समृद्ध असलेली अशी माणसे, मी जसजसा मोठा होत गेलो व काळ बदलत गेला तसतशी अदृश्यच व्हायला लागली होती.  एकंदरीत आमच्या वाडीतली सगळीच माणसे खूपच चांगली होती. थोडीफार जी काही अपवाद होती ती तशीही वाळीतच टाकल्यासारखीच होती.  

आसपासच्या घरातला घरोबा तर अगदी दृष्ट लागण्यासारखा होता.  एखाद्याच्या घरात काही कार्य असले अथवा काही अडचण आली किंवा एखादा बाका प्रसंग आला तर सगळे कसे अगदी सख्ख्यासारखे धावून जायचे व मदत करायचे व सुखात आनंदही तितकाच मजेत लुटायचे.  हीच काय ती वाडा संस्कृती म्हणजे आपल्या पुण्याची एक वेगळी ओळख होती.  

१९९० च्या नंतर म्हणजे जसजशी वाडा संस्कृती लयाला जाऊन अपार्टमेंट अथवा फ्लॅट संस्कृती आली तसतशी माणसे स्वत:ला आपापल्या चौकटीच्या आत खुराड्यात कोंडून घेऊ लागली.  माणुसकी, आपुलकी तर तोंडी लावायलाही उरली नाही.  

६०-७० दशकात चाळी आडव्या होत्या, त्यात माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, माया, ममता, स्नेह, सद्विचार, भक्ती, शक्ती, अगदी ठासून भरलेली होती आणि त्यामुळे माणसे मनाने समृध्द, शरीराने सुदृढ व पैशाने समाधानी होती.   पण, जस जसा काळ बदलत गेला आणि उत्कर्षाच्या नावाखाली, ह्याच आडव्या चाळी उभ्या होत गेल्या व गगनाला गवसणी घालायला लागल्या, तसतशी माणुसकी गळून पडली, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम इत्यादी भावभावनांच्या अपुऱ्या प्राणवायू पायी ही माणसे गुदमरून जाऊ लागली आणि त्यांची मनेही कोत्या वृत्तीची व संकुचित होत गेली.

सिमेंटच्या चार भिंतींच्या आत कोडून घेतलेले हे जीव, एक एका मजल्यावर चार-आठ शेजारी असूनही त्याचे महत्व न जाणणारे वाटतात.   मला माझी स्पेस हवी आहे असे म्हणून मनातल्या मनात कुढत बसणारे आणि आपणहून ओढवून घेतलेल्या ह्या परिस्थितीवर मात करण्यातच आपली हयात घालवून आयुष्याची फरफट करुवून घेणारे दुदैवी जीव आहेत असेच मला तरी वाटते.  अपवाद असतीलही, परंतु ते ही त्यांचे संचित अथवा प्रारब्ध असावे म्हणुनच !

शेजारधर्म काय असतो व तो कशाला म्हणतात, ते न जाणणारी एक गगनचुंबी संस्कृती उदयास आली व तीच आपली खरी संस्कृती असल्याची भ्रामक कल्पना जन्म घेऊन आकारास आली.  माझा गगनचुंबी इमारतींना अथवा प्रगतीला अजिबात विरोध नाही, परंतु त्यांच्यातल्या लोप पावत चाललेल्या शेजारधर्माला आहे.  नाही म्हणायला काही उदाहरणे असतीलही, परंतु अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच सकारात्मक उदाहरणे सापडतात व त्याचे मनोमन दु:ख होते. असो.

लग्नानंतर मी धनकवडीला राहायला आलो.  वाडा संस्कृतीत व एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला मी थोडा ओशाळलो होतो, कारण नाही म्हणायला ही तर स्वतंत्र घरांची (बंगल्यांची) सोसायटी होती.  इथे प्रत्येकाच्या घराला कुंपण होते. फारसे कोणी कोणाशी बोलताना दिसत नव्हते.  सदनिकेत आपल्या शेजारी कोणीतरी राहते आहे ह्याची तरी जाणीव होत असेल.  इथे तर प्रत्येकाच्या घरामध्ये चारही बाजूंनी कमीतकमी पाच ते दहा फुटांचे अंतर होते.

अर्थात हे दृश्य अंतर जरी असले तरी ते आपल्या स्वभावामुळे व माणुसकीने ते नक्कीच कमी करता येऊ शकते, हीच काय ती एक आशा मला होती आणि झाले ही तसेच!  इथे राहणारे सर्वच जण आमच्यासारख्या चाळ अथवा वाडा संस्कृतीमधूनच आलेले असल्याचे जाणवले.  आमच्या शेजारी बाई आणि काका व त्यांची दोन मुले असे एक कुटुंब राहायला आले आणि लवकरच आमची चांगली गट्टी जमली. तसेच आमच्या गल्लीतील सर्वच घरांशी आमच्या स्वभावामुळे स्नेह वाढला होता.

बाईंच्या घरात एक बालकमंदिर चालवायच्या व संसाराला हातभार म्हणून पाळणाघरही चालवायच्या. त्यामुळे बऱ्यापैकी वर्दळ होती व चांगली माणसे येत जात होती.  ज्यांच्याशी ओळख होत होती. हळू हळू बाईंच्या कुटुंबाशी आमची चांगली मैत्री झाली व एक चांगला शेजारी मिळाल्याची अनुभूती लाभली.   त्याचे कारण लग्नानंतर लगेचच आम्हाला कन्यारत्न झाले आणि तिची संपूर्ण जबाबदारी आमच्या ह्या सख्ख्या शेजारी बाईंनी घेतली.  त्या जरी पाळणाघर चालवत असल्या तरी आमच्या मुलीसाठी ते तिचेच घर होते.  तिचे सर्व लाड, कोड कौतुक, संगोपन, त्यांनी स्वत:ची नात असल्यासारखे अगदी आनंदाने केले.  त्यामुळे मला व बायकोला आपापली नोकरी सांभाळून सुखाचा संसार करता आला. ही तर नियतीचीच योजना होती असे वाटते.   कारण आमच्या मुलीच्या जन्मानंतर जेमतेम तीन वर्षातच तिचे आजी-आजोबा देवाघरी गेले व त्यांची कमी बाईंनी भरून काढली, असेच म्हणावयास हवे.  त्यांच्यासाठी हा नुसताच शेजारधर्म नव्हता तर माणुसकीने ओसंडून वाहणारा धबधबाच होता.

आमच्या सोसायटीमधील बाकीच्या लोकांना आमच्या ह्या नात्याचा खूप हेवा वाटतो इतका आमचा शेजार आम्हाला प्रिय आहे.  सुखदु:खात आम्ही कायमच एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलो व अजूनही असतो.  त्याचे एक कारण होते, की कधीही रात्री अपरात्री काही जरी समस्या आली तरी सर्वात प्रथम एकमेकांसाठी धाऊन जाणारे शेजारीच असतात.  बाकी नातेवाईक किंवा आप्तेष्ट मंडळी ही नंतर येतात ! पण जी काही तातडीची मदत एक शेजारधर्म म्हणून लागते, ती तर विनासायास कुठलाही संकोच मनात न ठेवता शेजारीच करतात. हे ही लक्षात घ्यायला हवे.  त्यामुळेच चांगला शेजार असणे व तो टिकवणे ही अपरिहार्यता आहे असे माझे ठाम मत आहे.

आता आमचा हा घरोबा म्हणा (शेजार) नाते म्हणा, इतका तावून सलाखून निघाला आहे की, एकमेकांच्याशिवाय आमचे पानही हालत नाही अशी परिस्थिती आहे.  गेल्या ३५ वर्षात आम्ही शेजारी न राहता एकमेकांच्या घरात व मनात राहायला लागलो आहोत हे दोन्ही कुटुंबाना जाणवते.  त्याला कारणही तसेच घडले.  ते म्हणजे बाईंची नातवंडे मोठी झालीत व घर लहान पडायला लागले म्हणून बाईंच्या मुलाने आणि सुनेने जवळच दुसरे एक मोठे घर भाड्याने घ्यायचे ठरवले.  ती त्यांची वैयक्तिक व स्वाभाविक अडचण होती.  पण आपला इतके वर्षांचा शेजार व सहवास आपल्यापासून दूर जाणार ह्या जाणीवेने आम्हाला दोन दिवस झोपच लागली नाही.

विचार करा शेजारी असले तरी किती जिव्हाळ्याचे नाते असेल आमचे !  शेजाऱ्यांशी असे नाते आजकालच्या काळात फार कमी लोकांमध्ये दिसते. कसेबसे एक वर्ष आम्ही त्यांच्या शेजाराविना काढले.  त्यांनी शेजारील घर भाड्याने दिले.  परंतु त्यांच्या भाडेकरूंशी आमचा अजून एवढा सलोखा नाही होऊ शकला.  त्यातल्या त्यात त्यांच्या चार वर्षांच्या मुलाशी मात्र आमची चांगलीच गट्टी जमली.

असेच एक वर्ष निघून गेले. एक वर्षभरात बाई आणि त्यांचे कुटुंब परत आपल्या शेजारी राहायला येतील व पुन्हा आपले जुने दिवस परत येतील ह्या आशेवर आम्ही बसलो होतो.  इतक्यात बाईंच्या मुलाने सहकारनगरला तीनबेडरूमची सदनिका विकत घेतल्याची आनंदाची वार्ता सांगितली.  शेजारचे घर ते विकणार नव्हते पण उत्पन्नाचे साधन म्हणून भाड्याने देत राहणार आहेत म्हणून सांगितले.

त्यादिवशी माझी व बायकोच्या मनाची द्विधा अवस्था झाली होती.  जीवाची घालमेल किती झाली होती काही विचारू नका.  एक मन त्यांच्या ह्या उत्कर्षाने खूपच आनंदित झाले होते, तर त्याचे वेळेस दुसरे मन त्यांचा कायमचा सहवास आपल्याला लाभणार नाही ह्या विरहाच्या भावनेने थोडेसे खट्टू झाले होते.

आपले सख्खे शेजारी आपल्याला कायमचे दुरावणार आहेत ह्या भावनेने आम्ही दोघे त्या रात्री झोपूच शकलो नाही.  उलट आपणही आपले हे घर विकून बाईंच्या शेजारी तीनबेडरूमची सदनिका विकत घेऊन राहू, पण इथे नको ! असे आमचे आपले मध्यरात्रीपर्यंत चालले होते.   आमचे आम्हालाच कळत नव्हते की हे असे काय होते आहे.  मी तर चक्क रात्री २ वाजता समाज माध्यमावर शोधून एका सदनिकेसाठीची चौकशीसाठी निरोपही देऊन टाकला. तसेच सकाळी सकाळी उठून एक दोन मित्रांना फोन करून आम्हाला सहकारनगर भागात तीनबेडरूमची सदनिका हवी आहे, असे सांगितले.

बाईंच्या मुलालाही फोन करून तुझ्या शेजारी अजून एक सदनिका आहे का त्याची चौकशी करायला सांगून मोकळे झालो.  अर्थात हा सगळा जो काही घोळ होता ना तो आमचे आमच्या सख्ख्या शेजारी असणाऱ्या बाईंवर व त्यांच्या कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी होता, हे जाणवत होते. विचार करा मंडळी, माणसांचा सहवास हा आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे ते !

आधुनिकतेच्या नावाखाली सध्याचा चाललेला उथळपणा व सद्विवेक बुद्धीलाही अचंबित करून सोडणारा अविवेकी विचार!  भौतिक सुखाच्या नावाखाली वाहवत जाणारी ही पिढी.  त्यावर अवलंबून असणाऱ्या पुढील पिढ्यांचे भविष्य जाणवून, त्याचा वर्तमानावर नक्कीच परिणाम होऊन, आपला भूतकाळ किती सुखकारक व अल्हाददायक होता याची जाणीव होते.

त्यामुळेच की काय कधी कधी आपण पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करून आपले व आपल्या संस्कृतीचे किती नुकसान करून घेत आहोत हेच कळत नाही. म्हणूनच;  मला वाटते की, “शेजारधर्म हाच काय तो खरा माणुसकीचा धर्म आहे”. जो फक्त माणसांनाच नव्हे तर देशांनाही लागू होतो.

रवींद्र कामठे.

Saturday 11 February 2023

“कधीही न हरणारे – खंदारे, ज्यांचे ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ आहे.’


सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी श्री. रविंद्र खंदारे सरांच्या, चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या "संघर्ष हेच सामर्थ्य" ह्या अप्रतिम आत्मचरित्रावरील माझे मनोगत आज दैनिक महाराष्ट्र न्यूज ने प्रकशित केले.  धन्यवाद महाराष्ट्र न्यूज आणि अभिनंदन खंदारे सर आणि घनश्याम पाटील सर. 
रसिकहो, तुम्ही हे आत्मचरित्र नक्की वाचा. तुम्हाला का व कशासाठी जगायचे व कसे जगायचे ह्याची प्रेरणा मिळेल. पुस्तकासाठी ७०५७२९२०९२ वर चपराक प्रकाशनला संपर्क करा.
“कधीही न हरणारे – खंदारे, ज्यांचे ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ आहे.’

 मी आंधळा आहे, परंतु देवाने मला दृष्टी दिली आहे.  मला हृदय नसून, माझ्याकडे काळीज आहे.  मला हात नसूनही, माझ्यात देण्याची क्षमता आहे.  मला पाय नाहीत, तरीही माझ्याकडे हिमालय सर करण्याची जिद्द आहे. माझ्या व्यथेत वेदना जरी असली तरी, माझ्या व्यथेला स्वाभिमानाची झालर आहे.  नकारात्मकतेवर सकारात्मकतेनेच विजय मिळवता येऊ शकतो व आपल्या संघर्षाला घाबरुन न जाता, त्याचे रुदन न करता, संघर्षाचाच तलवारीसम उपयोग करून त्याचे सामर्थ्यात रुपांतर करुन घेऊन स्वतःलाच नव्हे, तर संपूर्ण परिवाराला अभिमान वाटावा असे आयुष्य आजवर मी जगत आलो आहे व इथून पुढेही असेच जगत राहणार आहे. 

 


मंडळी हे माझे विचार नाहीत तर माझ्या एका साहित्यिक मित्राच्या आत्मचरित्रातून व्यक्त झालेल्या ह्या भावना आहेत.  मी फक्त त्या संक्षिप्त स्वरुपात तुमच्या समोर माझ्या मनोगतातून मांडत आहे.  सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (माध्य) रविंद्र खंदारे ह्यांचे “चपराक प्रकाशन”ने प्रकाशित केलेले “संघर्ष हेच सामर्थ्य” हे आत्मचरित्र माझ्या वाचनात आले आणि आपसूकच मला माझे मनोगत मांडावेसे वाटले.  “संघर्षाने आपल्या परिसीमा ओलांडल्या की, त्याचे सामर्थ्यात रुपांतर होत असावे,” असे हे आत्मचरित्र वाचताना उमगले. वास्तविक पाहता, ह्या साहित्य संपदेवर व्यक्त होण्यासाठी शब्द तर अपुरे पडतात, परंतु मनातल्या भाव-भावनाही तोकड्या पडतात.

 एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, परिवाराच्या नशिबात नियतीने इतका पराकोटीचा संघर्ष लिहिलेला असतो व त्या संघर्षालाच सामर्थ्य समजून, ही व्यक्ती आणि त्याचा परिवार आपले आयुष्य यशस्वी करुन समाजा समोर एक आदर्श निर्माण करतात, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रविंद्र खंदारे सर व त्यांचे “संघर्ष हेच सामर्थ्य” हे आत्मचरित्र होय.

२१ जानेवारी २०२३ला “चपराक प्रकाशन” ने त्यांच्या "संघर्ष हेच सामर्थ्य" ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशन करून साहित्य विश्वाला खूप मोलाचा ऐवज दिला आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.  सर्वात महत्वाचे म्हणजे, सध्याच्या काळात जिथे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी नकारघंटा काही मंडळी वाजवत असताना, चपराकच्या घनश्याम पाटील सरांनी ह्या साहित्य संपदेची एका आठवड्यात दुसरी आवृत्ती प्रकाशित करून साहित्य विश्वाला एक सुखद धक्काच दिला आहे.  खंदारे सरांचे हे आत्मचरित्र म्हणजे संघर्षाचा मानबिंदूच असून, वाचकांचा त्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कदाचित नवीन उच्चांक प्रस्थापित करेल असे मला वाटते.  

२८८ पृष्ठांमधील प्रत्येक शब्दात संघर्ष इतका ठासून भरला आहे की, मला तरी हे पुस्तक एका बैठकीत वाचणे शक्यच झाले नाही.  वादळी बालपणापासून सुरु झालेला संघर्षाचा प्रवास एक एक प्रकरण करत पुढे सरकत जातो तस तसे आपण लेखकाच्या आत्मकथनाशी इतके एकरूप होऊन जातो की, आपल्यालाही हा आपल्याच आयुष्याचा संघर्ष आहे व तो आपणच करतो आहोत असे वाटायला लागते.  मनावर भावनेचे कोंदण चढायला सुरवात होते. 

उदाहरण द्यायचे झालेच तर, लेखक सहा महिन्याचे असताना त्यांचे आई वडील, त्यांना एकट्यालाच झोपडीत ठेऊन जायचे.  बाळ आजूबाजूला कुठे जाऊ नये म्हणून चक्क त्याच्या पायाला दोरीने खांबाला बांधून ठेवत असत. बिचारे दिवसभर रडून रडून थकून जात.  दुपारी कधीतरी आई घरी येऊन त्याला दूध पाजून परत कामावर जात असे.  का तर त्याला सांभाळायला घरात कोणी नसायचे.  आहे की नाही विलक्षण संघर्ष ! 

तसेच शालेय जीवनात चक्क कचऱ्यातून भंगार गोळाकरून आपल्या कुटुंबाला हातभार लावून स्वत:चे शिक्षण करणारा हा विद्यार्थी, जिद्द, सचोटी, सातत्य, दृढ निश्चय, ध्येयाचा ध्यास, शिक्षणाची आस, कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा, मैत्रीची जाण व समाजाची शान असा आहे.  शाळेसाठी अनवाणी मैलोनमैल केलेली पायपीट, नदी नाल्यांतून पार केलेली अडथळ्यांची शर्यत हे सर्व वाचल्यावर खंदारे सरांना ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जणांशी आधारू’ असेच म्हणावेसे वाटते.   ह्या व अशा कित्येक प्रसंगावरून तुमच्याही लक्षात येईल की, केवढा हा संघर्ष आहे !  भंगाराचेही सोने करणारा हा कलंदर’, पुढे प्रशासनात उच्चतम पदास पोहचतो, हे तर त्यांच्या कष्टाचे चीजच म्हणावयास हवे. 

थोडीसी मानसिक विश्रांती घेऊन पुढील प्रकरणे वाचयला घेतल्यावर वाटते की,  हळूहळू लेखकाचा संघर्ष कमी झालेला असेल.  उलट लेखकाचा जन्मत: सुरु झालेला संघर्ष अजून तीव्र होत जातो.  त्यात त्याच्या भरीला भावंडांचीही भर पडते व लेखक जबाबदारीने अजूनच वाकला जातो.  गाव सोडून शहराकडे आणि कालांतराने पुन्हा गावाकडे रोजीरोटीसाठी धडपड करतो.  त्याचे बालपण, कुमारपण, तारुण्य हे एका लाकडाच्या खोपटातच जाते.  त्याला त्याचे अजिबात सोयर सुतक नसते.  कारण त्याचे ध्येय निश्चित असते.  ते म्हणजे, मी शिकून गुरुजी झालो तर माझ्या कुटुंबाची, परिवाराची गरिबी नष्ट होईल व सर्वांच्या वाट्याला चांगले आणि सन्मानाचे जगणे येईल.  

जगण्यासाठीची व संसारासाठीची तळमळ धडपड पाहून आपलाच जीव कासावीस होतो. एका मागून एक येणाऱ्या संघर्षाची अखंडित शृंखलाच आहे ही.  आपण वाचताना थकतो, मनात कोलाहल उठते. आपण भावुक होतो. आपल्याही नकळत आपले डोळे पाणावतात. आपली दु:खे, वेदना, संकटे, समस्या अगदी किरकोळ वाटायला लागतात आणि खंदारे सरांचे आत्मचरित्र आपलेसे होऊन जाते.

ह्या सगळ्यात लेखकाचे आई वडील, काका काकू, मामा मामी, त्यांचे शाळेतील शिक्षक त्यांना एकच सांगत असत, ते म्हणजे, “चड्डीची ठिगळं काढायची असतील तर, शिकावं लागल.” “दादा तू चांगलं शिक, मोठा हो, गुरुजी हो!”.  लेखकाने स्वत: तर शिकून नाव कमावलेच, परंतु इतक्या विलक्षण व प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या भावडांना तर शिकवलेच शिकवले परंतु आपल्या पत्नीसही लग्नानंतर शिकवून संघर्षाला सामर्थ्य बनवण्याचे बाळकडूही पाजले आहे, हे विशेष.

खंदारे सरांचे हे आत्मचरित्र म्हणजे माणसाच्या नशिबात किती प्रतिकूल परिस्थिती असावी ह्याला काही मर्यादा आहे की नाही असेच सतत वाटत राहते. जीवनात एवढा संघर्ष कोणाच्याही वाट्याला येऊ नये असेच वाटते.  त्यातही सरांची शिक्षणाप्रती असलेली ओढ, तळमळ व ते पूर्ण करून उच्चतम पदावर पोहचून नियतीवर केलेली मात ही आदर्शच म्हणावयास हवी.  बालपणात, कुमारवयात, तारुण्यात, घरात-दारात, गावात-शहरात, शिक्षणात, नोकरीत, स्पर्धा परीक्षेतही फक्त आणि फक्त संघर्षच प्रकर्षाने जाणवतो.  म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, “कधीही न हरणारे-खंदारे”

एखाद्यावर किती संकटे यावीत याची काही मोजमापे आहेत का ?, असेच हे आत्मचरित्र वाचताना वाटते.  खंदारे सरांनी त्यांच्या मनोगता मध्ये नमूद केलेले किशोर कुमारचे “जिंदगी के सफर मै गुजर जातें है जो मकाम, वो फिर नही आते...कुछ लोग, एक रोज जो बिछड जाते है, वो हजारों के आने से मिलते नही....” ह्या गाण्यातले भाव किती समर्पक आहे ह्याची प्रचीती वारंवार येते.  अशी वेळ तर आपल्या वैऱ्यावरही येऊ नये असे वाटले.

जेमतेम चारच दिवसांचे आयुष्य लाभेलेल्या मुलाचे जाणे तर मनाला चटका लावते.  त्यात नंतर पत्नीचे (सविताचे) सततचे आजारपण, त्यातही सरांची नोकरी निमित्त चाललेली भटकंती त्यात आलेल्या अनंत अडचणी, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, त्यातही त्यांचे अखंडितपणे चाललेले शिक्षण, स्पर्धा परीक्षा, मुलीचा (स्वप्नालीचा) जन्म, तिचे खडतर बालपण व त्यात तिला नकळत्या वयातच आलेले शहाणपण. त्यांच्या पत्नीने(सविताने) आजारपणात मानलेली हार आणि अर्ध्यावरच मोडलेला भातुकलीचा डाव.  सर्वात हृदयद्रावक म्हणजे त्याकाळात अगदी लहान असलेल्या चिमुरडीने आपल्या बापाला दिलेला मानसिक व भावनिक आधार व सावरलेले घर, हे सगळे भावनांचे तरंग काळजाला घर करून जातात.

सरांना दुसऱ्या लग्नासाठीची परिवाराने घातलेली गळ, त्याला लेकीने समजुतीने दिलेली साथ व त्यानंतर तिची आपल्या सावत्र आई (माधुरी) बरोबर जुळलेली नाळ व त्यानंतर एवढ्या हालअपेष्टा सहन करत करत, तारेवरची कसरत करत चाललेला संसार.  जरा कुठे संसाराचा गाडा मार्गी लागला असे वाटत असताना, चुलत भावाचे अकाली निधन आणि त्यानंतर त्यांच्या आईने घेतलेला जगाचा निरोप.  हा सगळा संघर्ष वाचताना, माझ्या कवितेच्या चार ओळी ह्या सगळ्यासाठी अगदी योग्य वाटल्या त्या: “कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले.... इतकी आसवे आज ओघळीत की, आसवांनाही रडू आले.”

ह्या आत्मचरित्राच्या सहाय्याने लेखक वंचित अथवा गरीब नव्हे तर दारिद्र्याने ग्रासलेल्या कष्टकरी समाजाचे, शेतकरी कुटुंबाचे, सावकारी विळख्याचे, समाजातील विघातक वृत्तीचे, प्रशासकीय यंत्रणेचे, एक विदारक चित्रच आपल्या समोर उभे करून आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.  त्यातून “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” हा संदेश वाचकांना देण्यात यशस्वी होतो.  हेच तर ह्या आत्मचरित्राचे साहित्य मूल्य आहे असे मला वाटते. 

आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष व वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र तज्ञ कै. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सर नेहमी सांगत असत, की आपले अनुभव आत्मकथन स्वरुपात लिहून ठेवा.  जसा इतिहास समजायला बखरींचा उपयोग झाला तसाच ह्या अनुभवांचा आपल्या भावी पिढ्यांना नक्कीच उपयोग होईल.  अगदी तेच सूत्र खंदारे सरांनी त्यांच्या ह्या आत्मचरित्राचा रूपाने सिद्ध केले आहे.  वास्तविक पाहता, मला तर खंदारे सरांचे हे आत्मचरित्र विद्यापीठाने अभ्यासक्रमात ठेवायला हवे असेच अतिशय प्रांजळपणे वाटले.  खूप काही घेण्यासारखे, शिकण्यासारखे आहे. नीतीमत्ता, निष्टा, सचोटी, स्वाभिमान, अभिमान, कुठल्याही कामाची नसलेली लाज, आपल्या कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा व शिक्षणाची आस आणि त्याचा ध्यास व अजूनही चाललेला संघर्ष.  सर्वकाही अचंबित करून टाकणारे तर आहेच, परंतु मनावर खोलवर सकारात्मक विचार रुजवणारे आहे.

रविंद्र खंदारे सरांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.  विषयाला साजेसे मुखपृष्ठ साकारल्याबद्द्ल राहुल पगारे यांचेही कौतुक.  चपराक प्रकाशनचे व घनश्याम पाटील सरांचेही खूप आभार.

“आयुष्य नेमके आहे कसे?, संघर्ष हेच आयुष्याचे गमक असे.”

 

पुस्तकाचे नाव – “संघर्ष हेच सामर्थ्य”

लेखक – रविंद्र खंदारे

प्रकाशक – घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन (७०५७२९२०९२)

पृष्ठ संख्या – २८८

मूल्य – र. ४००/-

 रवींद्र कामठे

Tuesday 7 February 2023

“बाभूळफुलं – सुख-दु:खाची फुलं”

 “बाभूळफुलं – सुख-दु:खाची फुलं”

माणसाचे आयुष्य तसे पाहायला गेले तर बाभळीच्या झाडासारखेच आहे.  जीवनाच्या फांद्यांवर वाईट प्रवृत्तींचे असंख्य काटे पसरलेले असतात आणि त्यातही माणसाच्या चांगल्या प्रवृतीने म्हणा अथवा चांगुलपणाने काही सुखद फुलेही उमलत असतात.  सुख दु:खाच्या ह्या आपल्या आयुष्यात बरेच काही घडत असते त्याचे चित्रण काही जाणकार मंडळी करून हे अनुभव शब्दांकित करून त्याची गाथा अथवा कथा वाचकांसमोर आणून समाज प्रबोधन करतात.  नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सौ. प्रतिभाताई सुरेश खैरनार यांचा “परीस पब्लिकेशन”ने प्रकशित केलेला “बाभूळफुलं” हा कथासंग्रह माझ्या वाचनात आला आणि मला त्यावर माझे मनोगत मांडण्याची संधी लाभली.

हा कथासंग्रह वाचकाला शेती, माती, नाती, गोती, शेतकरी, गावकरी, कष्टकरी समाजाच्या अस्सल ग्रामीण संस्कृतीची अतिशय प्रांजळपणे ओळख करून देतो असे वाटले.  ग्रामीण जीवन पद्धती, त्यांच्या चालीरीती, रूढी परंपरा व गावकी आणि भावकीही सहजतेने काही कथेतून जाणवते. ग्रामीण संस्कृतीचा आरसाच जणू !  शेतकरी कुटुंबाच्या व्यथा, कथा, समस्या, अस्मानी व सुलतानी संकटाने शेतीमध्ये सातत्याने येणाऱ्या त्रुटीने बेजार झालेला आणि त्यात कर्जाने सावकारी विळख्यात अडकत जाणारा बळीराजा, खजील होऊन जगण्यासाठी तळमळणारा, तडफडणारा, कळवळणारा, तरीही आपल्या काळ्या मातीवर आईगत निष्ठा व माया लावणारा शेतकरी वर्ग ह्या कथांमधून गंभीरतेने प्रतिबिंबित झाला आहे.

परिस्थितीपुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यांच्या कुटुंबाची झालेली अवहेलना, त्यांच्या हाल अपेष्टा, मनुष्यहानीने निर्माण झालेल्या असंख्य समस्या,  आत्मघाताचे कधीही न उकलणारे कोडे, हे विषय अतिशय भावविविशतेने काही कथांमधून मांडून एकप्रकारे बळीराजाच्या विषयाकडे समाजाने गांभीर्याने पाहायला हवे, हेच लेखिकेने ह्या कथा संग्रहाद्वारे सुचविले आहे असे वाटते.

परंपरेचा आपल्यावरील पगडा किती जोरकस आहे हे सुद्धा अगदी सहजपणे प्रतिभाताईच्या काही कथेतून प्रतिध्वनित झाले आहे. तसेच व्यसनांमुळे होणारे कुटुंबाचे व परिवाराचे अपरिमित नुकसानही वाचकांच्या डोळ्यात अंजन घालते.  सावकारी पाश, इनामदारांनी केलेली पिळवणूक, लैगिक अत्याचार आणि शारीरिक शोषण अतिशय मार्मिकपणे काही कथांमधून मांडून वाचकांचे त्याकडे लक्ष वेधण्यास लेखिका यशस्वी झाली आहे.  निर्ढावलेल्या व सरावलेल्या गुन्हेगारांनाही आपण केलेल्या गुन्ह्याची जाण होऊन शरमेने मान खाली घालायला लावणारी संवादशैली वापरून प्रतीभाताईने तिची प्रगल्भ प्रतिभा दाखवली आहे.  उदा., “बलात्काराने स्त्री जेवढी नागडी होत नसेल, तेवढी ती जगाच्या नजरेने होते.”  असे जळजळीत सत्य शब्दांतून व्यक्त करून ही कवयित्री / लेखिका, वाचकाला नि:शब्द करते.

उपकाराची परतफेड, प्रसवकळा, मातृत्व व स्त्रीभ्रूण हत्त्या हा विषयही प्रतीभाताईने अतिशय प्रगल्भतेने हाताळला आहे. प्राणीमात्रांबद्दलची सहानुभूती व तितकीच भीषण परिस्थिती एका कथेतून खूप सूचकतेने व्यक्त झाली आहे.  काही कथांमध्ये प्रेम आणि विरहही वाचकाला हळवा करून जातो.  शेतीला पूरक व्यवसाय व जोडधंदे ह्यावरही प्रतिभाताईने तिच्या अनुभवातून व निरीक्षणातून आलेले विचार ह्या कथानकांतून वाचकांसमोर आणले आहेत.  तसेच तिच्यातील काव्य प्रतिभेचा अतिशय सहजपणे उपयोग करून सर्वच कथानकांमध्ये एकप्रकारची सजीवता आणली आहे हे ह्या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणावयास हवे. ह्या कथा संग्रहामधील विविध विषयांना वाचा फोडणाऱ्या ह्या एकूण १५ लघुकथा असून त्यामधील संवेदनशील विषयाचे आणि आशयाचे गांभीर्य प्रदीर्घ परिणाम करणारे आहेत.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक ऐश्वर्य पाटेकर यांची ह्या कथा संग्रहाला अतिशय बोलकी प्रस्तावना व पाठराखण लाभली आहे, ह्यातच ह्या कथासंग्रहाचे यश आहे.  श्री. अरविंद शेलार यांनी शीर्षकाला समर्पक मुखपृष्ठ साकारून कथासंग्रहाची उत्कंठा वाढवली आहे.  ‘परीस पब्लिकेशन’चे तसेच प्रतिभाताईचे मनापासून अभिनंदन व पुढील साहित्यिक वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.

पुस्तक - बाभूळफुलं कथासंग्रह

लेखिका - प्रतिभा खैरनार 

प्रकाशक – परीस पब्लिकेशन

पृष्ठे -१२७ मूल्य – २६०/-

रवींद्र कामठे