Monday 13 December 2021

‘झोपाळ्यावाचून झुलायचे... शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर”

‘झोपाळ्यावाचून झुलायचे... शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर”


गेले दोन तीन दिवस झालेत मी माझ्या आयुष्याच्या साधारण ४०-४२ वर्षे मागे गेलो होतो. मला माझे ते तरुणपण अगदी व्यवस्थितपणे आठवू लागले होते. १९७८-८०चा तो तारुण्याचा काळ माझ्या स्मृतीपटलावरून अतिशय अलगदपणे तरळून गेला व मला त्या सुखद क्षणांची प्रकर्षाने आठवण करून देऊन माझे मन त्या गतकाळात गुरफटवून जीवाला हुरहूर लावून गेला.

रसिकहो, मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीय.  खूप दिवस चर्चेत असलेले, ‘चपराक प्रकाशन’ने १२ जानेवारी २०२१ ला पुण्यात प्रकाशित केलेले ज्येष्ठ कवी, लेखक, पत्रकार, सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक श्री. सुनील शिनखेडे सरांचे “शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर” हे पुस्तक माझ्या वाचनात आले आणि मी भारावून गेलो होतो.

ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे माझ्या पिढीतील (साधारण ५०-७० वयोगटातील) त्या काळातील कवी-गीतकारांच्या कविता आणि गीतांचे मन मोहवून टाकणारे केलेले रसग्रहण हे होय ! शिनखेडे सरांनी रसिक वाचकाला त्या काळातील कवितांचे आणि गीतांचे अर्थ इतक्या सहजतेने व्यक्त केले आहेत की; ‘आपल्यालाही अगदी असेच वाटले होते रे’, असेच वाटते.  तुमच्या आमच्या मनातले त्या कविते/गाण्यातील भाव ज्या आत्मीयतेने त्यांनी शब्दरूपात व्यक्त केले आहेत त्याला तोड नाही.  १९३०-१९९० हा त्यांच्या रसग्रहणाचा अतिशय सुवर्णकाळ आहे.  त्याकाळी आपल्या सगळ्यांच्या मनावर भावगीतांनी केलेले गारुड आपण विसरूच शकत नाही.  अहो एवढे कशाला, आजही म्हणजे तब्बल ९० वर्षे झाली तरी तीच ती गीते आणि कविता वेगवेगळ्या माध्यामतून आपल्या कानावर सुखद संस्कार करतच असतात.  शिनखेडे सरांनी, रसिकांची तीच धगधगती नस पकडून आपल्याला पुन्हा एकदा त्या काळात नेऊन सोडले आहे.  आणि हो नुसतेच सोडले नाही तर त्यांच्या शब्दसामर्थ्याने समृद्ध असलेल्या व भावनांच्या अलंकारांनी सजवलेल्या नौकेत बसवून आपल्याच मनाच्या अथांग सागरात मनसोक्तपणे फिरवून आणले आहे.  मी तर माझ्या तारुण्यात इतका रमलो होतो ना की; वाचताना  मला ‘सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का’, केंव्हा तरी पहाटे..’ ह्या जन्मावर, ज्या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, शुक्रतारा मंदवारा, ‘दयाघना’, ‘भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी’, ‘गीत रामायण’, ‘प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते’, ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘मोगरा फुलला’, इत्यादी असंख्य रचना पुन्हा पुन्हा मनात रुंजी घालत होत्या.

शिनखेडे सरांच्या ह्या शब्दसुरांच्या रसग्रहणाने मन थोडे हळवे झाले.  हे पुस्तक वाचताना संवेदनशील वाचकाला आपला गतकाळ नुसता आठवतच नाही तर पुन्हा एकदा त्या काळात आपण जाऊन रममाण व्हावे असे प्रकर्षाने वाटते.  सध्याच्या नकारात्मक वातावरणात ह्या ‘शब्द आणि सुरांच्या’ अतिशय सुरेल हिंदोळ्यावर मन झोपाळ्यावाचूनही असे काही डोलत बसते की काही वेळ आपण आपल्या सध्याच्या जगात नाहीच आहोत असे वाटते.  हे पुस्तक वाचताना एक प्रकारची सकारात्मक उर्जा आपल्या मनात आपसूकच निर्माण व्हायला लागेत व तीच ह्या पुस्तकाच्या यशाचे प्रतिक आहे.  एक सांगतो, मी हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवले वगैरे अजिबात नाही.  अहो, ह्या पुस्तकामधील सर्व २५ लेखांचा आस्वाद घेत, एक एक लेख परत परत वाचत वाचत त्यात रमून गेलो होतो.  कित्येकदा, मलाही एखाद्या कविते बद्दल अथवा गीताबद्दल अगदी ह्याच शब्दांत व्यक्त व्हयाचे होते ते शिनखेडे सरांनी केले असे झाले होते !

रसिकहो, ह्या रसग्रहणात विहरताना मनाला जो काही दिलासा, आल्हाददायक व सुखदायक अनुभव येतो ना तो प्रत्येकाने एकदा तरी हे पुस्तक वाचून घ्यायलाच हवा असे मला वाटते.  संतोष घोंगडे सरांनी चितारलेले सुंदर मुखपृष्ठ आणि चपराक टीमने पुस्तकाची अतिशय सुरेख मांडणी व उत्तम दर्जाची छपाई ह्या मुळे हे पुस्तक अतिशय दर्जेदार झाले आहे ह्यात वादच नाही.  ना. धों. महानोरांसारख्या शब्दप्रभूची प्रस्तावना लाभलेल्या पुस्तकाबद्दल मी फारसे बोलणे उचित नाही. ‘चपराक प्रकाशन’चे सर्वेसर्वा श्री. घनश्याम पाटील सरांचे व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन.

पुस्तकाचे नाव : “शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर”

लेखक – श्री. सुनील शिनखेडे. प्रकाशक – घनश्याम पाटील ‘चपराक प्रकाशन’, पुणे. मूल्य – रु. १२०/-

हे पुस्तक www.chaprak.com  ह्या संकेतस्थळावर उपलब्द आहे.

“महाराष्ट्राचे विचारदुर्ग, हेच संस्कारदुर्ग”

 महाराष्ट्राचे विचारदुर्ग, हेच संस्कारदुर्ग”

माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला लाभलेलं वैचारिक आणि सांस्कृतिक वैभव हे जगात वाखाणले गेले आहे.  आपल्या बाल मनावरही ह्या संस्कृतीचा पगडा नक्कीच जाणवतो व त्याचा अभिमानही वाटतो. 
नुकतेच माझ्या हातात ‘चपराक प्रकाशन’ पुणे यांनी १२ जानेवारी २०२१ ला पुण्यात प्रकाशित केलेले नाशिकचे लेखक श्री. रमेश वाघ यांचे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे ‘संत चरित्रावर’ आधारित पुस्तक पडले आणि मी ते एखाद्या शाळकरी मुलासारखे उत्साहाने वाचले. एकदा नव्हे तर दोन तीन वेळा ते वाचल्यावरच माझे समाधान झाले.  रमेश वाघ सर, हे स्वत: उत्तम कीर्तनकार तर आहेतच परंतु ते एक नामवंत शिक्षक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत ह्याचे प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येत होते.
ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबाकाका, नरहरी सोनार, सेना न्हावी, चोखामेळा, एकनाथ, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्या दहा संताचे अतिशय थोडक्यात व सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेतले चरित्र मनाचा ठाव घेऊन जाते.
आपल्या लहानपणापासून आपल्यावर ह्या संताचे चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने कानावर पडलेले आहेच. परंतु सध्याच्या धावपळीच्या जगात आणि आपल्या कार्यबाहुल्याच्या नादात आपल्या ह्या संताचे सुविचार, त्यांनी मांडलेले तत्वज्ञान, जीवनाशी जोडलेला सकारात्मक दृष्टीकोन याचा विसर पडलेला आहे हे आपसूकच जाणवले.  मुळात आपल्या ह्या महान संताचे चरित्र व त्यांच्या संदर्भातील काही घडामोडी व गोष्टी आपल्याला ह्या आधुनिक काळातही किती संयुक्तिक वाटतात आणि एक वेगळीच उर्जा व प्रेरणा देऊन जातात हे ही तितकेच खरे आहे.
लेखक रमेश वाघ सर यांनी गेल्या वर्षभरात कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे झालेल्या घरकोंडीचा इतका उत्तम फायदा उठवून आपल्याला पुन्हा एकदा ह्या संताच्या प्रेमातच पाडले आहे असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.  सध्याच्या तरुण पिढीला तर ह्या संत चरित्रांचा आयुष्यातल्या सध्याच्या कठीण समयी अडचणींवर मात करायला फायदेशीरच ठरणार आहे.   दहाही संतांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सहन केलेल्या सामाजिक व आर्थिक विवंचनेतून साकारलेले त्यांचे उज्वल जीवन व त्यांचा त्याग, त्यांची साधना व तपस्या, त्यांचा संयम, त्यांची  सचोटी मनावर कोरले जातात.  शालेय जीवनात आपण ह्यातील काही संतांचे साहित्य अभ्यासक्रमात अतिशय थोडक्यात वाचलेले आहे; परंतु त्याचा आपल्या मनावर एवढा परिणाम होत नाही जेवढा आपल्या कळत्या वयात जर आपण हे असे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ सारखी साहित्य संपदा वाचलीत तर होईल, असे मला वाटते !  मला खातरी आहे आणि विश्वास आहे की रमेश वाघ संराचे हे संत चरित्र आपल्याला आयुष्यात कुठल्याही वयात एक वैचारिक बैठक देण्यात नक्कीच यशस्वी होईल.
हे संत चरित्र वाचातान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवले की, लेखकाने कुठेही स्वत:च्या विचारांचा व मतांचा पगडा आपल्या लेखनावर होऊन दिलेला नाही. काही काही आख्यायिका, तसेच चमत्कारांचा उल्लेख त्या त्या संताच्या चरित्रात आवर्जून केलेला आहे.  मला एका गोष्टीचे फारच कौतुक वाटले ते ही आत्ताच्या ह्या आधुनिक विचारसरणीच्या जगात आपल्या ह्या थोर संतांची महती पुन्हा एकदा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजासमोर ठेवून एक प्रकारे  समाज प्रबोधनाचेच कार्य लेखकाने व प्रकाशकाने केले आहे असे म्हणावेसे वाटते.
मुळात संपादक व प्रकाशक श्री. घनश्याम पाटील हे स्वत: संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून हे शिवधनुष्य  अतिशय जबाबदारीने उचलले गेले आहे हे नक्की.  घनश्याम पाटील सरांची एक खासियत आहे, ती म्हणजे ते नवनवीन लेखकास लिहिण्यास उद्युक्त करतात व नुसते तसे करून थांबत नाहीत, तर त्यांचे साहित्य प्रकाशित करण्याचे धाडसही करतात. आणि हो, साहित्य नुसते प्रकाशित करत नाहीत तर ते ‘चपराक’ च्या माध्यमातून समाजातील सर्व थरातील वाचक वर्गापर्यंत पोहोचवतात.
‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे पुस्तक आपल्या संग्रही असावे असेच आहे. तसेच ते नुसते संग्रही ने ठेवता ते घरातील प्रत्येकाने एकदा का होईना जरूर वाचायला हवे असेच आहे.  तुम्हाला तुमच्या जीवनाला आकार देऊन सकारात्मक दृष्टीकोन द्यायचा असेल ते हे पुस्तक एकदा वाचाच !
घनश्याम पाटील सर आणि रमेश वाघ सरांचे मन:पूर्वक अभिनंदन. तसेच विषयाला साजेसे असे मुखपृष्ठ साकारल्याबद्द्ल संतोष घोंगडे सरांचे विशेष कौतुक व आभार.
पुस्तकाचे नाव : ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’
प्रकाशक – घनश्याम पाटील, ‘चपराक प्रकाशन’, पुणे.
लेखक – श्री. रमेश वाघ, नाशिक.
मूल्य – रु. १२५/-
हे पुस्तक www.chaprak.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
रवींद्र कामठे.
पुणे  

 

Tuesday 30 March 2021

"उसणीने क्षणात घालवलेले उसने अवसान"

 

Thursday 18 March 2021

अग्निकर्म

अग्निकर्म 

आज कोंढव्याला आमच्या कामठे परिवारातील प्रसिद्ध डॉक्टर कुणाल कामठे यांच्याकडे मी लिहिलेल्या 'चपराक प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या 'शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे' ह्या पुस्तिकेच्या १०० प्रती द्यायला गेलो होतो. 

त्यावेळेस डॉक्टरांनी माझ्या नुकतेच झालेल्या मणक्याच्या दुखण्याची चौकशी केली. बोलता बोलता माझ्या नकळत माझ्याकडून काय काय होतेय ते विचारत मला आयुर्वेदातील उपचारांची माहिती दिली. माझ्या तळहातांना व तळपायांना जळवाताचा होत असलेला त्रास पाहून त्यावर जालीम उपाय सांगितला आणि औषधही लिहून दिले. 

माझ्यासाठी बाजूच्या गुऱ्हाळातून उसाचा रस मागवला. इतपर्यंत ठिक होते. त्यांनी त्यांच्या मदतनीसाला सांगून आतमध्ये कसलीतरी तयारी करायला सांगितली. आणि मला सहज म्हणाले, ‘की काका आता आलाच आहात ना तर आपण तुमच्या ह्या सांधेदुखीवर अग्निकर्मचे उपचार करुन घेऊ, म्हणजे तुम्हाला लवकर आराम पडेल.’ मी थोडा संकोचलो. कारण मी पुस्तकं द्यायला आलो होतो, उपचार घ्यायला नाही! पण डॉक्टरांनी प्रेमाने आदेशच सोडले आणि आत जाऊन झोपा सांगितले.

गेले वर्षभर त्यांचे चाललेच होते की, ‘काका तुम्हाला मी माझ्या आयुर्वेद्यकिय उपचारांनी नक्कीच बरा करेन.’ पण योगच येत नव्हता आणि त्यांच्या क्लिनिकला जायची वेळच येत नव्हती. आज नेमकी चपराकमुळे मला ही संधी मिळाली होती, तीचा अतिशय प्रेमाने व हक्काने, माझ्याच भल्यासाठी डॉक्टरांनी लाभ घेतला.  डॉक्टर कुणाल ही मुळव्याध, भगंदर, फिशर, सांधेदुखी ह्यावरील आयुर्वैद्यकिय उपचारांसाठी खूप प्रसिद्ध आहेत.  त्यांचे नावही खूप आदराने घेतले जाते. अतिशय कमी वयात त्यांनी ह्या क्षेत्रात त्यांचे नाव कमावलेले आहे.  ह्याचा आम्हा कामठे परिवाराला सार्थ अभिमान आहे.

माझ्या आधी ७४वर्ष वयाचे येवलेवाडीचे निंबाळकर आजोंबा उपचारासाठी आलेले होते. गेले चार पाच वर्षे त्यांनी खूप उपचार घेतले होते पण त्यांना काही गुण येत नव्हता. म्हणून डॉक्टरांचे नाव ऐकून ते त्यांच्याकडे पहिल्यांदाच आले होते. डॉक्टरांनी त्यांना चालायला सांगितले व त्याचा एक व्हिडीओ काढला.  त्यानंतर त्यांची फाईल तपासली. थोडावेळ विचार करून त्यांनी त्यांच्यावर अग्निकार्माचे उपचार केले.  थोड्या वेळाने पुन्हा एकदा त्यांना चालायला लावले व त्याचा पुन्हा एकदा व्हिडीओ काढला.  आधीच्या आणि नंतरच्या चालण्यात खूप फरक जाणवला. मला त्यांनी अग्निकर्माचा फायदा व योग्यता सांगितली व पटवून दिली.

हे पाहिल्यावर न राहवून, गेले १४ वर्षे माझ्या दोन्ही पायांचे घोटे झिजल्यामुळे प्रचंड दुखतात व  रात्रीतर लवकर झोपच लागत नाही, त्यामुळे झोपेची गोळी घ्यावी लागते. हे सगळे मी डॉक्टरांना सांगितले. मग तर ते म्हणाले जा आत जाऊन पडा. मी आलोच.

गपचूप आतल्या खोलीत जाऊन पडलो. मदतनीसाने पॅन्ट वर करायला सांगितले.  पण ती काही केल्या गुडघ्याच्या वर जाईना. शेवटी मी ती उतरवून ठेवली व त्याच्याकडून एक चादर पायावर ओढून पडून राहिलो. डॉक्टर कुणाल आले. ‘काका तुमचे पायाचे सांधे कुठे कुठे दुखतात, असह्य वेदना नक्की कुठे होतात’, त्या सांध्याच्या आसपास दाबत विचारले.  डाव्या पायाला त्यांना तीन ठिकाणे व घोट्याची जागा सापडली. उजव्याला घोट्याला एकच जागी ठणकत होते. त्यांनी पेनाने गोल खुणा केल्या. नंतर आतल्या बाजूला जाऊन काहीतरी आणले व चक्क ह्या खुणा केलेल्या ठिकाणांवर गरम डाग दिले. त्यांच्या हातात काय होते ते झोपलेलो

असल्यामुळे कळलेच नाही. थोडेसे चटका बसल्या सारखे झाले, पण सहन होईल इतपतच दुखले. नंतर त्यावर त्यांनी कसलातरी मलम लावला. त्याने एकदम गार वाटले. डॉक्टर म्हणाले,  'काका आता असेच पडून रहा पंधरामिनिटे'. मग काय करणार बिचारे काका. आलीया भोगासी, गपगुमान पडून राहिले. पडल्या पडल्या विचार करत होतो की, आपल्यावर किती माणसे प्रेम करताता! अगदी हक्काने व अधिकाराने सर्वकाही

करायला तयार असतात. हेच काय ते माझे संचित आहे ! मी किती समृध्द व श्रीमंत आहे. माणुसकीचे असे अजून किती अनुभव माझ्या वाट्याला येणार आहेत ! मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो ह्या बाबतीत!

डॉक्टर कुणाल यांना तरी यश दे रे बाबा. माझे काय! मला आता वेदना सहन करण्याची सवयच झाली आहे. शरीराचा कुठलाच अवयव राहिला नाही, की ज्याने त्याचे माझ्यावरील अतोनात प्रेम दाखवले ना ही! चालायचंच. मी आहेच प्रेमाच्या अथवा स्नेहाच्या लायकीचा! असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.

उपचार झाल्यावर डॉक्टरांनी मला काही सुचना केल्या आणि शनिवारी पुन्हा एकदा या हेच अग्निकर्म परत करु म्हणजे लवकर बरे व्हाल म्हणाले.

निघतांना डॉक्टरांना मी गमतीने म्हणालो, ‘मी की नाही, देहदान करणार आहे’.  तेवढेच वैद्यकीय शास्त्राला मदत होईल.  आजवर केलेल्या उपचारांच्या सर्व फाईली जपून ठेवल्या आहेत.  त्या ही देईन पाहिजेतर बरोबर. म्हणजे डॉक्टरांना नीट संशोधन करता येईल.

हे सर्व ठिक आहे. पण ह्या सगळ्याच्या मागचे मूळ कारण काय आहे माहिती आहे का ?  मी ते नेहमीच सांगत असतो, ते म्हणजे तुम्ही कितीही व्यायाम करा व स्वत:ला फिट ठेवा, पण जर का तुम्ही कुठलेही व्यसन करत असाल तर, तुम्हांला शारीरिक व्याध्यींपासून अजिबात सुटका मिळणार नाही.  इथे केलेल्या पापांची, मस्तीची फळे इथेच फेडून जावे लागेत हे मात्र नक्की. 

मी काही उगाच मुक्ताफळे उधळत नाहीय... स्वानुभव सांगतो आहे.  जे काही घ्यायचे ते घ्या... बाकी तुम्ही आणि तुमचे नशीब...

ता.क.

आयुष्यात जर का केले असेल दुष्कर्म,

तर काही केल्या चुकत नाही अग्निकर्म.......

रवींद्र कामठे

गुरुवार, १८ मार्च २०२१