Wednesday 21 February 2018

‘जू’- जहरी वेदनांचा विलक्षण जोखड


ज्यानं फक्त आनंद मिळतो असंच आपण लिहू नये;
असं लिहिल्यानं काय फायदा
?
ज्या लिखाणामुळे आपल्याला खोल जखमा होतात
,
दु:ख होतं

आणि ज्यामुळे आपण खडबडून जागे होतो.

असंच लेखन आपण नेहमी करावं.

काफ्काचे हे विचार ज्ञानेश्वराच्या श्लोकासारखे

माझ्या हाती लागले होते.

तुकारामाच्या वास्तव अभंगासारखं त्यांनी मला

अंतर्बाह्य झिंजाडून सोडलं..

हे आठवायचं कारण श्री. रविंद्र कामठे सरांनी जूवाचून जो अभिप्राय मला दिला; त्यातच सारंकाही मिळाले..

ऐश्वर्य पाटेकर

||‘जू’- जहरी वेदनांचा विलक्षण जोखड- रविंद्र कामठे||

माझ्या सर्वांगाचा थरकाप उडाला होता, ओठ थरथरत होते, घशाला कोरड पडली होती, मती गुंग झालेली होती, मन अगदी सुन्न होऊन गेलं होतं, अतिशय विलक्षण असं द्वंद माझ्या मनात चाललेलं होतं, हाताच्या मुठी वळल्या होत्या, डोळ्यात अंगार दाटला होता आणि आता मी कुठल्याही क्षणी नामदेवह्या नराधमास आणि त्याला साथ देणाऱ्या प्रत्येकास अगदी हाल हाल करून यमसदनी पाठवून देतो की काय असे मला वाटू लागले होते. इतकी चीड आणि राग माझ्या मनात दाटून आला होता. त्याचे एकमेव कारण म्हणजे सुप्रसिध्द कवी श्री.ऐश्वर्य पाटेकर ह्यांची सकाळ प्रकाशनने प्रकाशित केलेली जूही कादंबरी मी वाचत होतो आणि त्यामधील प्रत्येक पान वाचतांना माझ्या मनात वरील विचार, माझ्याही कळत नकळत उमटत होते. माझ्या बोथट झालेल्या संवेदना आपसूकच जागृतावस्थेत येऊ लागल्या होत्या आणि मी अगदी उद्विग्न होऊन ह्या कादंबरीचे एक एक पान डोळ्यात प्राण आणून वाचण्याचा प्रयत्न करत होतो. कधी कधी डोळ्यात जमा झालेल्या आसवांनी पानांवरील अक्षरेही दिसेनाशी होत होती. काही काही अश्रू, विनापरवाना माझ्या हातातील पुस्तकाच्या पानावर पडून अगणित अत्याचार सहन करणाऱ्या त्या माऊलीच्या चरण कमलावर अगदी अलगद जाऊन विसावत होते. तिला, तिच्या एकुलत्या एक लेकराच्या मायेला, माई, आक्की, तावडी, पमी ह्या बहिणींच्या डोळ्यातील आसवांना दिलासा देण्याचा हलकासा प्रयत्न माझे मन करत होते. ही कादंबरी वाचतांना खरं तर माझ्याच मानेवर कोणीतरी असंख्य वेदनांचा, जखमांचा, अत्याचारांचा जूठेवला आहे की काय असेच मला सारखे भासत होते. आपल्या आसपास, गावागावांमध्ये, शहरांमध्ये रोज कितीतरी मायबहिणींवर समाजातील अघोरी पुरुषीवृत्ती, त्यांच्यातील वासना शमविण्यासाठी अगणित अत्याचार करतांना किती खालच्या थराला जाऊ शकतात, ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जूही कादंबरी होय. अशा राक्षसी प्रवृत्ती ह्या कादंबरीमुळे माहित झाल्या व त्यांच्याशी लढण्याची ताकद माझ्या मनात उजागर झाली हे मात्र नक्की.

आयुष्याची झालेली ही फरफट जेंव्हा केव्हा ह्या माउलीने लेखकास म्हणजे तिच्याच लेकरास भावड्यास सांगितली असेल किंवा त्याला ती त्याच्या बहिणींकडून कळली असेल तेंव्हा कवी मनाचे लेखक ऐश्वर्य पाटेकर म्हणजे ह्या कथेतील भावड्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल ह्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. त्यांच्या चारही भगिनींनी आणि अंबर मामा, मामी, आजोब, आजी, काही सखे शेजारी ह्यांनी ज्या जिद्दीने ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांच्या आईला साथ दिली आहे त्याला तर ह्या जगात तोड नाही. म्हणजे पहा ना एक स्त्री स्वत:च्या आणि आपल्या लेकरांच्या अस्तित्वाची लढाई स्वत:च्या नवऱ्याकडून त्याच्या दुसऱ्या बायकोशी आणि सासूशी, म्हणजे स्त्रीशीच लढते आहे आणि ह्या लढाईत तिला तिच्याच मुली, म्हणजे पुन्हा स्त्रीच ह्या जहरी वेदनांच्या जोखडातून सुटण्यासाठीची मदत करतात, किती विलक्षण आहे, नाही हे नियतीचे रूप! काळ्यापाण्याची शिक्षा सुद्धा कदाचित ह्या जुलमी अत्याचारांपुढे फिकी पडावी इतकं भीषण आणि भयानक सत्य आहे हे सगळं, ह्या वर विश्वासच बसत नाही. कसं सहन केलं असेल हे ह्या सगळ्यांनी हे त्याचं त्यांनाच ठाऊक ! त्यासाठी मनावर दगड ठेवून प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने एकदा का होईना ही कादंबरी वाचायला हवी असे माझे आवाहन आहे.

ही कादंबरी वाचतांना माझ्या तर अंगावर सरसरून काटा येत होता, मन गलबलून येत होतं. तरीही कादंबरी हातातून एका क्षणासाठी सुद्धा खाली ठेववत नव्हती. अहो आत्मकथन झालं म्हणून काय झालं! हे असलं आत्मकथन लिहायला मनाची केवढी मोठी जिगर असावी लागते! कोणालाही हे सहज शक्य नाही. किती वेदना झाल्या असतील लेखकाला, भावड्याला हे सगळं कागदावर मांडताना ह्याची कल्पनाच केलेली बरी! नेमकी तीच जिगर लेखक ऐश्वर्य पाटेकरांच्याकडे असल्यामुळेच त्यांनी हे शिवधनुष्य पेलून आपल्या साहित्यविश्वाला ह्या अनमोल अशा कादंबरीची भेट दिली आहे; असे म्हणलो तर अतिशयोक्ती होणार नाही. नाहीतर मला सांगा, आपल्याला कुठे कळल्या असत्या ह्या अघोरी आणि विकृत पुरुषांची काळी कृत्ते आणि त्यांना साथ देणारी निर्लज्ज व फालतू माणसे ? लेखकाच्या स्वानुभवातून आलेला हा दु:खद आणि वेदनांनी भरलेला जोखड / जू वाचकांच्या मानेवर इतका भारी भक्कम बसतो की तो उतरवतांना काळीज पिळवटून जातं, हात पाय लटलट कापतात, पोटात गोळा येतो तर कधी कधी मळमळतही. काही काळासाठी वाचक स्वत:ला विसरून जातो व मनोमन लेखकास त्याच्या सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी आशीर्वाद देतो व त्याच्या माऊलीवर आणि बहिणींवर झालेले अत्याचार विसरण्याचे बळ द्यावे अशी प्रार्थना ईश्वर चरणी करतो.

लेखकाने त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीतील हे जहाल विष जरी वाचकांच्या निदर्शनास आणून दिलं असलं तरी त्यामागे एक अतिशय चांगला असा समाज प्रबोधनाचा उदात्त उद्देशच असला पाहिजे असे मला तरी वाटते. नाहीतर कोण कशाला काळजाला झालेल्या ह्या विखारी जखमा परत परत उकलून काढेल हो आणि स्वहस्ते ह्या जखमांवर मीठ चोळून घेईल हो ! वाचतांना काळजाला जी काही भगदाडे पडतात ना, तेंव्हा असे वाटते की अशी वेळ तर आपल्या वैऱ्यावरही येऊ नये. मला तर ह्या माउलीचे आणि तिच्या लेकरांचे खूप खूप कौतुक वाटते आणि त्यांच्या जीवनाकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टीस साष्टांग दंडवत घालावास वाटतो. कादंबरीच्या शेवटी हा भावड्या एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही दहावीची परीक्षा पास होतो तेंव्हाच त्याच्या इंदूआईच्या आणि चारही बहिणींच्या आयुष्याचा संघर्ष संपून त्यांना आता चांगले दिवस येणार आहेत ह्याची चाहूल लागते आणि एक वाचक म्हणून आपणही एवढ्या दु:खात सुखावून जातो. हेच तर ह्या कादंबरीचे आणि लेखकाचे यश आहे.

रणांगणात पुरुषत्व दाखवयाचे सोडून हे असले पळपुटे जेंव्हा आपल्याच बायकामुलांवर अत्याचार करतात ना तेंव्हा,त्याची कीव तर येतच नाही, पण घृणा वाटते. ह्या उलट एवढे अत्याचार सहन करूनही आपली ही माऊली, हे सगळे तिच्या सहनशक्तीच्या मर्यादेपलीकडे गेल्यानंतर रणचंडिकेचे रूप जेंव्हा धारण करते ना तेव्हा भल्या भल्यांची पाचावर धारण बसते हे मात्र तितकेच खरे आहे. लेखकाने स्वत:च्या आयुष्यातील हा जळजळीत इतिहास अतिशय प्रभावीपणे कुठलाही आडपडदा न ठेवता, आपल्या समोर मांडून आपल्या समाजाचे विद्रूप रूपही दाखवले आहे. तसेच परिस्थितीपुढे हार न मानता सत्यासाठी लढण्याची आणि आपल्या लेकरांच्या अस्तित्वासाठी एक माय माऊली नियतीलाही तिच्या पायाशी लोळण घ्यायला लावू शकते हा संदेश सर्वसामान्य माणसात पोहोचवण्याचे फार मोठे उद्दात्त सामाजिक काम केले आहे.

जूह्या कादंबरीची कथा ही काल्पनिक नसून ही प्रत्यक्ष लेखकाच्या म्हणजेच भावड्याच्या आयुष्यामधील ३०-३५ वर्षापुर्वीं घडलेल्या घटनांचा लेखाजोखाच आहे, हे वास्तव पचवणे खरंच खूपच अवघड जाते. ह्या जगात आपलीच माणसे आपल्याच पोटच्या पोरांशी, लग्नाच्या बायकोशी इतक्या निष्ठुरपणे कशी वागू शकतात! हे तर न उकलेले कोडंच आहे. कवी मन असूनही ज्या निर्भीडपणे ह्या कहाणीचा एक एक पदर उलगडून त्याचा एक प्रकारे चित्रपटच वाचकांच्या नजरे समोर उभा करण्यात ऐश्वर्य पाटेकर निश्चितपणे यशस्वी झाले आहेत. ज्या ग्रामीण भागात ही कहाणी घडली आहे त्या भागातील बोलीभाषेचा आणि संवादांचा अतिशय उत्तमरीत्या वापर करून वाचकांच्या मनावर पकड धरण्यास आणि कथेचा लेखकाला असलेला अपेक्षित परिणाम साधण्यात ही कादंबरी यशस्वी होते. लेखकाची ही आगळी वेगळी शैली वाचकांना कथेशी एकरूप करते हा माझा तरी अनुभव आहे. प्रत्येकाने एकदा तरी ही कादंबरी वाचून आपल्या संवेदना पारखून घायला हव्यात असे मला अगदी प्रकर्षाने वाटते.

सकाळ प्रकाशनचेह्या उत्तम कादंबरीचे प्रकाशन करून आम्हां सृजन वाचकांना मोलाचा ठेवा दिलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो. तसेच श्री. अन्वर हुसेन ह्यांनी त्यांच्या कुंचल्यातून कथेचा गाभाच रेखाटून ह्या कादंबरीस एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे हे निश्चित. त्यांचेही अभिनंदन.

जेष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले सरांची प्रस्तावना लाभलेल्या आणि जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले सरांची कौतुकाची थाप ब्लर्बवर मिळालेल्या ह्या कांदबरीच्या, साहित्य अकादमीचा २०११ सालचा युवा साहित्यिक पुरस्कार विजेते कवी-लेखकाचे, श्री. ऐश्वर्य पाटेकर ह्यांचे माझ्या सारख्या नवोदिताने कौतक ते काय आणि किती करावे. माझी ती पात्रताही नाही आणि योग्यताही.

श्री. ऐश्वर्य पाटेकर ह्यांनी स्वत: ही कादंबरी मला पोस्टाने पाठवून माझा जो काही सन्मान केला आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. एक साहित्यप्रेमी, सृजन वाचक आणि संवेदनशील नागरिक म्हणून मला माझा ह्या कादंबरी विषयीचा अभिप्राय देण्याची मुभा मी ह्या निमित्ताने घेतो आहे. श्री. ऐश्वर्य पाटेकर ह्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस मन:पूर्वक शुभेछ्या देतो.

सर्वात शेवटी भावड्याच्या इंदूआईस माझा हा काव्यात्मक दंडवत घालतो आणि माझे मनोगत थांबवतो...

दगडास देव कधी मनाला नाही
मंदिरात देव कधी दिसला नाही |
कुठे कुठे शोधिले मी देवास असे
चरणी आईच्या कधी शोधला नाही ||

भावड्याला मात्र त्याचा देव त्याच्या इंदूआईतच सापडला आणि त्यांच्या आयुष्यावरचा जूउतरला....

रविंद्र कामठे, पुणे
महाशिवरात्र मंगळवार १३ फेब्रुवारी २०१८

Tuesday 6 February 2018

“आई हाच माझा परमेश्वर”




आई हाच माझा परमेश्वर
 
साधारण तीन महिन्यांनी मी पर्वा आईला भेटायला गेलो होतो.  माझी आई धाकट्या भावाकडे असते. तो राहायला पुण्यातच पण पंचवटी पाषाण म्हणजे पुण्याचे उत्तर टोकाला आणि मी राहायला धनकवडी म्हणजे पुण्याचे दक्षिणे कडील टोकाला.  पुण्यातल्या पुण्यात असूनही मला ह्या वेळेस आईला भेटायला जायला जमले नाही ह्याची खंत मनात बरेच दिवस होती.  त्याला तसेच सबळ कारणही होते हो.  त्यामुळे पर्वा मी अगदी ठरवून वेळ काढून तिला भेटून आलो. मध्यंतरी माझी अन्जिओप्लस्ति झाल्यापासून मी एक महिनाभर घरीच होतो आणि त्यानंतर कार्यालयास जायला लागलो होतो.  माझ्या हृदयविकाराबद्दल आईला काहीही कळू न देण्याची मी माझ्या भावंडाना आधीच ताकीद देऊन ठेवली होती.  त्याचे कारण आईचे ७८ हे वय आणि तिला जर हे समजले तर ती नक्कीच त्रास करून घेईल आणि तिच्या तब्बेतीवर त्याचा नक्कीच परिणाम होईल ह्याची मला भीती होती.  एक तर मी तिचा थोरला मुलगा आणि त्यातून नवसाने झालेला.  मला असे काही झाले आहे हे ऐकून तिचा जीव टांगणीला लागला असता.  आता माझी तब्बेत खूपच सुधारली होती त्यामुळे तिला भेटायला हरकत नव्हती असे मला वाटले.  तब्बेत बरी नसतांना भेटायला गेलो असतो तर तिच्या लक्षात आले असते आणि तिने नाही नाही ते प्रश्न विचारून मला भंडावून सोडले असते.  शेवटी ती माझी जन्मदाती आहे हो.  मला काय होतंय हे तिला सांगावयाला लागलेच नसते हे मात्र खरं.  आणि हो मलाही तिच्यापासून काही लपवता नसते आले हे ही तितकेच खरं आहे.  म्हणूनच मी व्यवस्थित बरा होई पर्यंत संयम पाळला होता बाकी काही नाही.  त्यामुळेच गेले तीन महिने मी आईला भेटण्यासाठी तडफडत होतो.  ते ही तिच्या तब्बेतीच्या काळजीनेच !
 
तसेही तिला आजकाल ऐकायला कमीच येते आणि दिसतेही थोडेसे अंधुकसे.  डोळ्यांवर औषधोपचार चालू आहेत, परंतु वयोपरत्वे त्यावर काही इलाज नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.  जेवढे अंधुक दिसते आहे त्याहीपेक्षा कमी दिसू नये म्हणून एक इंजेक्शन डोळ्यात घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे परंतु ती घाबरून नको म्हणत होती.  शेवटी तिची समजूत काढून भावाने तिला तयार केले होते आणि मी ही तिला समजून सांगितल्यामुळे तिने हे इंजेक्शन घेण्यासाठी तिची संमती दिल्यामुळे आम्हांला सगळ्यांनाच जरा दिलासा मिळाला होता पण हे सगळे फोनवरचे बोलणे झाले.
 
त्यात मी भेटायला गेल्यावर तिला जो काही आनंद झाला तो मला आठवला की मला माझे बालपण आठवते.  खरंच आईची माया ही किती अगाध आहे नाही !  आज वयाच्या ५५ वर्षाचा मी तिला अजूनही ५ वर्षांचाच भासतो आणि ही माय माझ्या एका छोट्याश्या भेटीने वेडीपिसी होते.  मी घरात पाऊल ठेवल्याबरोबर मला पाणी आणून देण्याचा आदेश सुटतो.  मला गरम चहा लागतो, चहाचे आधण लगेचच ठेवायला सांगितले जाते.  कारण का तर मला थांबायला फार वेळ नसतो.  तो येतो पंधरावीस मिनिटे अर्धा तासच बसतो,  भेटतो आणि लगेचच जातो.  फार धावपळीत असतो, त्याला खूप कामे असतात.  त्यात त्याला आता मुंबईला जायचे आहे का तर म्हणजे कुठल्यातरी संमेलनात त्याला एक पुरस्कार मिळणार आहे.  म्हणजे मला अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात माझ्या एका लेखाला पहिला पुरस्कार मिळाला आहे ह्याची बातमी तिच्या पर्यंत भावाकडून पोचली होती आणि तिला त्याचे कोण कौतुक होते म्हणून सांगू.  कामवाल्या मावशींना ती अगदी तोंडभरून कौतुकाने सगळा वृतांत माझ्या समोरच ऐकवत होती आणि त्यांना पटापटा आवरायला सांगत होती.  माझ्या साहित्यिक प्रवासा मधील माझा पहिला काव्यसंग्रह प्रतिबिंबमी माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण करून माझ्या आईच्या हस्तेच २०१४ साली प्रकाशित केला होता.  त्याचा तिला इतका अभिमान आहे की आल्या गेल्या प्रत्येकाला ती माझे काव्यसंग्रह वाचायला देत असते.  ह्या पेक्षा अजून काय हवे असते हो माझ्या सारख्या नशीबवान लेकराला ! कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा संस्कार मला जास्त उभारी देतो हे नक्की.
 
त्यादिवशी माझी भावजय काही कामा निमित्त बाहेर गेलेली होती आणि धाकटा भाऊही कामाला गेलेला होता.  मुलेही आपपल्या शाळा कॉलेजात गेलेली असल्यामुळे घरात जरा शांतताच होती.  नाही म्हणायला आईच्या सोबत भावजयीची आईही होती.  त्यांच्याशी बोलता बोलता मी आईच्या जवळच्या खुर्चीत बसलो, तिने मला अगदी जवळून न्याहाळले, मला म्हणाली अजून जवळ ये म्हणजे तुझा अंधुकसा का होईना चेहरा मला दिसेल रे !  माझ्या काळजात चर्र झाले.  तिच्या जीवाची ती तगमग माझा जीव कासावीस करून गेली.  मी तसाच तिच्या अजून जवळ सरकलो, तिच्या डोक्यावरून आणि मांडीवरून मायाने हात फिरवला आणि तिच्या मांडीवर डोके टेकवून पाच मिनिटे पडून राहिलो.  कोण जाणे पुन्हा परत हा योग माझ्या नशिबात असेल की नाही काय माहिती !  नियतीने तीन महिन्यांपूर्वी मला एकदा जीवनदान दिले होते.  परत कदाचित अशी संधी मिळेल की नाही ह्याची काही खात्री देता येत नव्हती.  त्यामुळे आपल्या माय माउलीच्या मायेच्या स्पर्शाची ऊब आत्ताच काळजात साठवून ठेवावी असे झाले होते आणि मी काही काळासाठी पुन्हा तिच्या गर्भातच प्रवेशलो होतो ते तिच्या पोटी पुनर्जन्म घेण्यासाठीच असेच मला भासत होते.
 
अतिशय कष्टाने आणि सचोटीने संसार करून माझ्या आई वडिलांना आम्हां तिघाही भावंडाना लहानाचे मोठे केले होते.  खूप खस्ता खाल्ल्यात होत्या त्यांनी आमच्या साठी.  इमानदारी, प्रामाणिकपणा, सच्चेपणा, मेहनत आणि माणुसकीचे आमच्यावर खूप प्रगल्भ असे संस्कार त्यांनी केले आहेत, की आयुष्यात आम्ही आज जे काही आहोत, ते आमच्या ह्या थोर आई वडिलांच्या पुण्याईमुळेच !  वडिलांना दिवंगत होऊन आज १४ वर्षे झालीत परंतु ते अजूनही त्यांच्या संस्कारातून आमच्यात असल्यासारखे वाटतात.  ह्याचे सगळे श्रेय हे मी माझ्या आईलाच देईन.  प्रत्येकाच्या आयुष्यात आई हेच खरे दैवत असावे असे मला तरी वाटते आणि का असू नये !  ह्या पृथ्वीतलावर आपण अवतरलो आहोत, आपले जे काही अस्तित्व आहे ते तिने आपल्याला ९ महिने ९ दिवस तिच्या उदरात वाढवून जन्म दिला आहे म्हणूनच ना !  तिचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही हे जरी सत्य असले तरी तिला जेवढे सुख आणि समाधान लाभेल एवढे जरी केले तरी तिच्या उपकाराचे पांग फेडल्याच्या नुसत्या जाणीवेने मन सद्गतीत होऊन बसते.
 
परिस्थितीच्या रेट्यापुढे आपले कधी कधी काहीच चालत नाही हे ही खरं आहे हो.  एकदा का लग्न झाले की आपण आपल्या आईपासून दूर जातो तिच्या मायेला दुरावतो.  त्यामागची कारणे काहीही असू देत.  पण आपण नियतीच्या ह्या रामरगाड्यात इतके गुरफटत जातो की आपल्याला आपल्या ह्या परमेश्वराचीआठवणच रहात नाही आणि आली तरी आपला हा परमेश्वर आपल्या जवळ असेलच असेही नाही.  म्हणजे माझ्या बाबतीत तरी हे असेच आहे हो.  तीन महिन्यांपूर्वी जेंव्हा मी मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत परत आलो ना तेंव्हा मला माझ्या ह्या परमेश्वराची अतिशय तीव्रतेने आठवण झाली होती.  तिच्याच पुण्याईने मी माझा जन्म ही पाहिला आणि आता माझा पुनर्जन्मही पाहिला असेच आज मला भासते आहे.  माझ्या ह्या परमेश्वरालासमर्पित माझी आईही कविता इथे माझ्या वाचकांसाठी देतो आहे जेणे करून तुम्हांलाही तुमच्या भावनांना वाट करून दिल्याचा भास होईल.
 
|| आई ||
आयुष्याचा एक एक क्षण उधार होता,
जन्मास घातलेस मज हा उपकार होता ||
बालपण गेले माझे तुझ्या अंगाखांद्यावरी
चिमुकल्या पावलांना तुझाच आधार होता ||
घडविलेस तू मला जागून कित्येक रात्री
लोचनी तुझ्या निद्रेला ही नकार होता ||
तरुणाईत विसरलो तुझ्या साऱ्या कष्टांना
तुझ्या डोळ्यात मात्र ममतेचा सागर होता ||
उमेदीत विस्मरला मज त्याग तुझा
तुझ्या त्यागातच तुझा संस्कार होता ||
वार्ध्यक्यात तुझ्या मज बालपण दिसले
मुखी तेंव्हाही माझ्याच नावाचा उच्चार होता ||
आई कसे फेडू मी तुझे हे उपकार,
जन्म हा माझा तुझाच उपहार होता ||
दाखवीन तुला मी आता दिवस सोनियाचे
श्वासात तुझ्या तेंव्हा संथ नकार होता ||
फेडण्याचा पांग तुझे मी निश्चय केला
रथ तेंव्हा तुझ्या शरीराचा थंडगार होता ||
स्मरली मज तुझी माया तुझी अंगाई
आईहाच माझा अखेरीस परमेश्वरहोता ||
रविंद्र कामठे

Thursday 1 February 2018

४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई - ३१ जानेवारी २०१८






४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई - ३१ जानेवारी २०१८

 

बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०१८ रोजी पु.ल. देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी मुंबई येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे सूप वाजले.  शेतकरी चळवळीच्या माध्यमातून वर्धा येथून सुरु झालेली ही शेतकरी सारस्वतांची दिंडी, नागपूर, गडचिरोली असा प्रवास करत चौथ्या वर्षी विदर्भाच्या सीमारेषा ओलांडून मायानगरी मुंबईत येऊन विसावली आणि महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे लक्ष ह्या घटनेने घेतले नसेल तरच नवल आहे.

 

सर्वप्रथम, ह्या सोहळ्यास निमंत्रित कवी म्हणून तसेच ‘विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७’ ‘वैचारिक लेख’ ह्या सदरामधील “शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या समस्येवर कर्जमाफीचे कोंदण” ह्या माझ्या लेखाचा प्रथम पारितोषिक विजेता म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि सन्मानाने मिळालेल्या मानपत्राचा लाभार्थी होण्याचे भाग्य मला लाभले त्यासाठी मी आयोजकांचे, प्रायोजकांचे आणि विशेष करून कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे सरांचे आभार मानतो.

 

गेली सलग चार वर्षे ‘अखिल भारतीय मराठी शेतकरी चळवळ’ शेतकरी साहित्यिकांचा हा मेळावा घडवते आहे. ह्या मागचे उद्दात उदिष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी नुसतेच शेतात राबून कष्ट न करता सर्व देशाला आणि समाजाला त्याच्या लेखणीने जागृत करावे हा आहे.  ह्या चळवळीचे ब्रीद वाक्यच आहे “आम्ही लटिके ना बोलू”, म्हणूनच बोधचिन्हात नांगराच्या फाळास लेखणीची ताकद दर्शवली आहे.  ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शेती विषयक विविध विषयांवर चर्चा तर होतेच व त्यानिमित्ताने बऱ्याच अंशी काही समस्यांचे निराकरण होण्यासही मदत होते. शासन दरबारी कै. शरद जोशींच्या प्रेरणेतून शेतकऱ्यांचा संघटीत आवाज पोहोचवण्याचे काम हे संमेलन नक्कीच पार पाडते.  त्याचप्रमाणे कवी संमेलन, गझल मुशायरा आणि नाटिके सारख्या मनोरंजनाच्या माध्यमातून सर्वसामन्य जनतेच्या आणि सरकार व प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे कामही अप्रत्यक्षरीत्या पार पाडले जाते.  कृषीजगताला भेडसावणाऱ्या समस्यांची मराठी साहित्य विश्वाबरोबर सांगड घालण्याचे काम हे शेतकरी साहित्य संमेलन गेली चार वर्षे सातत्याने करते आहे हे वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळेच ही चळवळ साहित्यिकांना आवाहन देते की....आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने | रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने |

 

यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी मा. डॉ. विठ्ठल वाघ ह्यांनी जातीपातीचे राजकारण करून शेतकऱ्यास राजकीय आणि शासकीय संस्था वेठीस धरत आहेत आणि शेतकऱ्यांची प्रगती रोखत आहेत असे परखड विचार मांडून एकप्रकारे शेतकऱ्यांना संघटीत होऊन ह्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविण्याचा एल्गारच केला.  त्यांनी संत साहित्याचा आधार घेत शाहू-फुल्यांची शेतीविषयक प्रश्नांची दूरदृष्टी निदर्शनास आणून दिली आणि शेतकऱ्यांना शेती विषयी मार्गदर्शनही केले.  मुळात ते स्वत: शेतकरी असल्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांची जाण त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडल्याचे प्रकर्षाने जाणवले.  उपस्थित सारास्वतांनाही त्यांनी आवाहन करून लेखणीतून शेतकऱ्यांच्या समस्यांचा आवाज योग्य ठिकणी पोहोचवण्याचे आवाहनही केले.

 

प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता श्री. मकरंद अनासपुरे ह्यांनी आपल्या अनुभवातून आणि शेतीविषयक अभ्यासातून अतिशय प्रगल्भ विचार मांडले.  गावाचा विकास हा गावानेच करायला हवा.  ग्रामस्थांनी एकत्र येऊन गाव पातळीवर ह्या समस्या सोडवायला हव्यात.  प्रत्यके गावाने स्वत:ची पिक पद्धती ठरवायला हवी, गावातल्या गावात रोजगार निर्मिती करायला हवी, गावाचे जलस्त्रोत वाढवून महुसूल वाढवायला हवा आणि शेती हा एक व्यवसाय समजून करायला हवी.  गावातील भांडण तंटे आणि भाविकीतून तुकडे तुकडे झालेली शेती संघटीत करून व्यावसायिक दृष्टीने शेती करायला हवी आणि गावाचा विकास साधायला हवा.  मार्ग कठीण आहे पण मनावर घेतले तर अवघड नक्कीच नाही असा विश्वास त्यांनी त्यांच्यामधील अभिनयातून पडद्यावर साकार केला आहे ते स्वप्न आता प्रत्यक्षात आणायचे आहे असे अतिशय भावनिक आवाहन केले.  नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ह्यांनी मिळून सुरु केलेल्या “नाम” ह्या संस्थेमार्फत करत असलेल्या कामाचा अगदी थोडक्यात आढावा देवून उपस्थितांना विकासाची दिशा दाखवण्याचे काम केले.

 

माझ्यासाठी शेतकरी साहित्य संमेलन म्हणजे एक अभ्यासाचा तसेच अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे.  दरवेळेस मी काहीतरी नवीन शिकून येतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो.  खूप साहित्यिक मंडळीशी चर्चा होते त्यांच्याशी छान स्नेह जोडला जातो हे मात्र निश्चित.  ह्या वेळेस तर माझ्या विदर्भातील काही कवी मित्रांनी मी त्यांना भेट दिलेल्या माझ्या चौथ्या काव्यसंग्रहाचे “प्रांजळ” चे रवींद्रनाथ टागोरांच्या पुतळ्यासमोर अतिशय स्नेहपूर्वक प्रकाशन करून मला एक अविस्मरणीय अशा क्षणांची भेटच दिली हे माझे भाग्यच म्हणावयास हवे.

 

ह्या वेळेस मुटे सरांनी मला प्रसार माध्यमांशी छोटीशी मुलाखत देण्याची खूप चांगली संधी दिली.  TV9 आणि जय महाराष्ट्र ह्या राष्ट्रीय वाहिन्यांनी ह्या संमेलनाची दखल घेतली.

 

एकंदरीत अविस्मरणीय असाच हा अनुभव होता माझ्या सारख्या नवोदितासाठी.

 

रविंद्र कामठे

पुणे

१ फेब्रुवारी २०१८.