Saturday 30 December 2017

शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या समस्येवर कर्जमाफीचे कोंदण


शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या समस्येवर कर्जमाफीचे कोंदण

सध्या महाराष्ट्राच्या विधान सभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीचे जोरदार राजकारण चालू आहे.  सर्वच पक्ष ह्या दोन्ही प्रश्नांकडे अतिशय कळकळीने आणि तळमळीने हा विषय जेवढा शक्य होईल तेवढा तापवून त्यावर आपल्या पोळ्या भाजून घेण्याचा त्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय प्रांजळ प्रयत्न करतांना दिसत आहेत.  ह्या राजकीय पक्षांची धोरणे आणि त्यांचे त्यात असलेले छुपे कारस्थानाचे त्यांना लखलाभ असे म्हणायची वेळ आता सर्व सामान्य माणसावर आली आहे.  ह्या विषयांवर चर्चा चर्विचरण एकद्या नटसम्राटालाही लाजवले अशा पद्धतीने बेलामुपणे चालू आहे.  सगळ्याच पक्षांनी आपली सगळी शक्तीच ह्या विषयांवर केंद्रित करून त्यांना शक्य होईल तेवढे तेच कसे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत आणि त्याचा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून होणारा फायदा आपल्या पदरात पाडून घेण्याची एक प्रकारची रस्सीखेच चालली असून त्यात ते काही अंशी यशस्वीही होतील ह्यात शंकेला कुठेच जागाच उरली नाही. त्याचे कारण तुम्हीं मारल्या सारखे करा आम्ही रडल्यासारखे करतो आणि सामान्य जनतेची व शेतकऱ्यांची जेवढी करता येईल तेवढी दिशाभूल करू. ह्या सगळ्यामधून शेतकऱ्याच्या हातावर तुरी देण्याची ह्या राजकीय धुराणींची चाल मात्र नेहमीप्रमाणे यशस्वी होईल हे सांगावयाला कोण्या ज्योतिषाची मात्र नक्कीच गरज नाही.  असंघटीत शेतकरी वर्ग आणि कै. शरद जोशींसारख्या नेतृत्वाच्या अभावाचा फायदा ही सगळी राजकारणी मंडळी त्यांच्या स्वार्थापोटी उठवत असून मतांचे राजकारण साधू पहात आहेत ह्याचे फारच दु:ख होते. 

 

दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये जर आपला देश गेल्या दोन दशकांमध्ये उल्लेखनीय प्रगती करून सगळ्या जगाचे लक्ष वेधू शकतो तर शेतकऱ्यांच्या ह्या समस्यांवर तोडगा का काढू शकत नाही !  हे म्हणणे असे वाटणे किती स्वाभाविक आहे नाही. आपल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचा स्वार्थ आणि आपमतलबीपणाच ह्या सगळ्यास कारणीभूत आहे अथवा तेच ह्या सगळ्या समस्येचे मूळ आहे असे मला तरी वाटते. एखादी समस्या अथवा प्रश्न भिजत ठेवून त्यावर येनकेन प्रकाराने राजकारण करत करतच गेली ६० वर्षे आपण फक्त आणि फक्त ह्या आपल्या अन्न्दात्याचे आर्थिक, शारीरक आणि कौटुंबिक शोषण करून एकप्रकारे सरकारच्या हातातले खेळणेच करून टाकले आहे असे म्हणाल्यास अतिशयोक्ती होणार नाही.   

 

मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचची कर्जमाफी हे दोन वेगळे विषय आहेत त्यांची एकेमेकांशी सांगड घालून एकप्रकारची दिशाभूल करण्याचे एक राजकीय षड्यंत्र गेले कित्येक दशके रचले आहे त्याचेच परिणाम आजचा शेतकरी भोगतो आहे.  त्यात शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तींशी द्यावी लागत असलेली झुंज त्याचे कंबरडेच मोडत आहे हे तर हे सगळेच राजकीय पक्ष सोयीस्करपणे विसरून जात आहोत हे नक्की. मी काही शेतीमधील तज्ञ अथवा अभ्यासक नाही, एक सर्व सामान्य माणूस आहे ज्याला रोज खायला अन्न लागते आणि ते पिकविणारा आमचा बळीराजा गेले काही दशके त्याच्या हक्कासाठी लढतो आहे, पण त्याला योग्य तो न्याय ना सरकार दरबारी ना दैवाच्या दरबारी मिळतो आहे ह्याचे शल्य माझ्या संवेदनशील मनाला बोचते आहे.  त्यामुळेच एक सुज्ञ नागरिक म्हणून मला जे काही वाटते ते मी व्यक्तिस्वातंत्र्यामुळे ह्या लेखाच्या माध्यमातून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. 

 

मूळ मुद्दा शेतकरी आत्महत्या का करतो हा आहे. त्यावर ह्या विषयामधील तज्ञांनी, अभ्यासकांनी भरपूर संशोधन करून काही प्रमुख कारणे नक्कीच शोधली गेली आहेत. कुठलाही शेतकरी त्याला हौस म्हणून आत्महत्या नक्कीच करत नाही हे निश्चित.  जरी मी ह्या विषयामधील तज्ञ अथवा अभ्यासक नसलो तरी गेले काही वर्षे शेतकरी चळवळीशी जोडला असल्यामुळे व संमेलनाच्या वेळी शेतकऱ्यांशी आणि काही जाणकारांशी केलेल्या चर्चेमधून मला ह्या समस्येच्या मुळाशी काही प्रमाणात जाण्याचा व  त्यातूनच मला जेवढे समजले तेवढे मी माझ्या कुवतीने मांडण्याचा एक लहानसा प्रयत्न येथे केला आहे.

 

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेली काही ठोस कारणे जी बऱ्याचदा वेगवेगळ्या स्तरांमधील चर्चेतूनही समोर आलेली आहेत ती म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असलेला अल्पभूधारक शेतकरी, मोठ्या प्रमाणात असलेली कोरडवाहू शेती, पारंपारिक शेती पध्दत, आधुनिक शेतीविषयक ज्ञानाचा अभाव, बियाणांच्या आणि खतांची कमतरता आणि वाढलेल्या किमतीवाढलेली शेतमजुरी, सिंचनाच्या अभावी शेतीला न मिळणारे पाणी, दरसाली नियमित येणारी नसर्गिक आपत्ती, शेतमालाला न मिळणारा हमीभाव, कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, शेतमाल साठवण्यासाठी तालुका पातळीवर असलेला गोदामांचा अभाव, शेतमालासाठी विपणन व्यवस्थेचा अभाव, धनदांडग्या आडत्यांचा राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर असलेला प्रभाव, ह्या सगळ्या तणावामुळे निर्माण झालेली शेतकऱ्यांची वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या, तसेच शेती तंत्रज्ञानाचा आणि साधन सामुग्रीचा अल्पभूधारकांना न मिळणारा लाभ, सहकार क्षेत्राचा कमी झालेला प्रभाव, शेती विमा विषयक अज्ञानाचा अभाव, विविध सरकारी योजनांचे खरोखर गरजू शेतकऱ्यांपर्यंत न पोचलेले फायदे, इत्यादी आणि अशी अजून खूप कारणे आपल्याला शोधून काढता येतील.  परंतु ह्या सगळ्यांची कारणमीमांसा करून त्यावर ठोस अशी काही उपाय योजना अमलात आणण्यासाठीचे निस्वार्थी असे कुठलेच धोरण हे कुठल्याच राजकीय पक्षाला आणि त्यांच्या अंमलाखाली असलेल्या प्रशासनाला का राबवता आले नाही हा मला एक पडलेला साधा प्रश्न आहे आणि ज्याचे उत्तर शोधण्याचा मी एक निष्फळ प्रयत्न करतो आहे व ते मला तरी सापडले नाही.

 

कागदोपत्री शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे म्हणजे वरील सर्व समस्यांपासून राजकीय लाभापोटी काढलेली एक पळवाट आहे की काय असे वाटावे असेच वर्तन आजवरच्या सर्वच राजकारण्यांच्या कृतीतूनच पाहायला मिळते.  जसे काही हेच जणू आपल्या शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा अविर्भाव आणू पाहत आहते. पण त्यांना एक समजत नाही की समस्येच्या मुळाशी घाव घातल्याशिवाय त्या समस्येचा नायनाट होणार नाही.  हे समजते आहे पण ते प्रत्यक्षात आणून स्वत:च्या पायावर कोणी धोंडा पाडून घायचा असा प्रश्न तर ह्या राजकीय पक्षांना पडला नसेल ना !  सोन्याचे अंडे देणारी ही कोंबडी एकदम कशी कापून खायची बरे !  इतक्या वर्षांच्या प्रलंबित सरकारी धोरणांमुळेच हा विषय एक महाकाय रूप धारण करून आज महाराष्ट्रासामोरच नाही तर संपूर्ण देशा समोर आज राक्षसासारखा आ वासून उभा आहे आणि त्यावर आपण फक्त चर्चाच करतो आहोत.  युद्ध पातळीवर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे त्यामुळे कर्ज माफी हा म्हणजे तात्पुरता इलाज जरी असला तरी आता तो करण्यावाचून सरकार समोर दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध राहिला नाही हे नक्की.  आत्ता जरी कर्ज माफी केली तरी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही ह्याची सुध्दा खबरदारी घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर काही ठोस अशा उपाय योजना ठरवून त्यांची आत्यंतिक प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे हीच काळाची खरी गरज आहे.

 

कदाचित लेखणीची ताकदच आपल्या ह्या बळीराजाला त्याच्या ह्या धर्मसंकटातून बाहेर काढू शकेल असा मला विश्वास वाटतो आणि म्हणूनच आम्हीं लटिके ना बोलूह्या ब्रीद वाक्याने शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून गेले तीन वर्षे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि प्रश्न व त्यावरील उपाय योजना, कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय साधण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला जातोय व त्याची दखल सर्वच क्षेत्रामधील मान्यवरांनी, तज्ञांनी, समाजसुधारकांनी, अभ्यासकांनी, अर्थशास्त्रज्ञांनी, पत्रकारांनी, साहित्यिकांनी व सर्वसामन्य माणसांनी घेतल्यामुळे ह्या चळवळीला दिवसेंदिवस यशही येत आहे हाच एक आशेचा किरण म्हणावा लागेल. तरीही ह्या चळवळीला अजूनही खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे हे मात्र ह्या निमित्ताने नमूद करावेसे वाटते.

 

ह्या माझा वैयक्तिक दृष्टीकोन आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.  

  

रविंद्र कामठे, पुणे

Monday 18 December 2017

कायापालट





दवाखान्यातून घरी आल्यावर
पंधरा दिवसांनी
तीन आठवड्यानंतर

 
एक महिन्यानंतर कार्यालयात जातांना

कायापालट
आपल्या आयुष्यामध्ये एखादी अशी घटना घडून जाते, अन आपल्या विचारसरणीमध्ये एकदम कायापालट होतो.  माणसाचे मन हे खरोखरीच कधीही न उलगडणार एक कोडंच आहे.  हे एक विलक्षण असे रसायन आहे की जे भल्या भल्या शास्त्रज्ञांना अजूनही उमजले असेल असे मला तरी वाटत नाही. आयुष्यामधील प्रत्येक घटना अथवा प्रसंग हे म्हणजे नियतीचे एक प्रयोजनच असते हो !  काही काही प्रसंग असे असतात की जे अंगावर काटा आणतात.  तर काही प्रसंग अंगावर रोमांच उभे करतात.  ह्या सगळ्याला कारणीभूत आपले नियतीच असते असे मला कायमच वाटत आले आहे.  जे आपण कधीही चिंतलेले नसते तेच अचानक घडून जाते आणि आयुष्याला एकदम कलाटणी देवून जाते.  ह्या घटनांमधून खूप काही शिकण्यासारखे असते तसेच बरेच काही स्मुर्तीपटलावर साठवून ही ठेवायचे असते.  कळते परंतु वळत नाही अशी आपल्या मनाची अवस्था होऊन बसते हे मात्र नक्की.  सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण ह्या अचानक उदभवलेल्या प्रसंगाकडे पहायला शिकले पाहिजे तसेच कुठलाही पूर्वग्रहदूषित न करता आपले मतपरिवर्तन करायचा प्रयत्नही केला पाहिजे हे मी अनुभवातून सांगतो आहे.


तुम्हीं म्हणाल की काय प्रवचन लावले आहे हे.  पण एक सांगतो !  गेल्या एक महिन्यात मी जे काही अनुभवतो आहे ना ते खूपच विलक्षण आहे हो.  त्यातून वयाच्या पंचावन्नाव्यावर्षी हृदयविकार होऊन, जर आपण त्यामधून सहीसलामत बाहेर पडलो आहोत, म्हणजे एक प्रकारे पुनर्जीवितच झालो आहोत असे मला भासले असेल तर त्यात वावगे काय आहे !  मला खरोखरच पुनर्जन्म मिळाल्यासारखे भासते आहे (माझा हा अनुभव मी स्पंदने काळजाचीह्या लेखात शब्दांकित केला आहे) आणि त्यामुळेच माझ्या विचारांमध्ये एक प्रकारचा जो सकारात्मक दुर्ष्टीकोन जागा झाला आहे तो माझ्यावर येवून गेलेल्या ह्या प्रसंगामुळेच आला आहे अशी माझ्या मनाची खात्री झाली आहे.  म्हणूनच हा लेख प्रपंच.

अनुभवातून एक मात्र नक्कीच शिकलो ते म्हणजे आपल्यापेक्षा वाईट अवस्था असलेल्या माणसांकडे पाहिलं की आपण किती नशीबवान आहोत हे जाणवते.  वास्तविक पाहता हाच तर माणसाचा नैसर्गिक स्वभाव असावा.  असो.  मी काही तत्वज्ञानी नाही.  तरीही एक सांगतो की काही अनुभव आपल्या विचारसरणीवर प्रभाव टाकून आपल्या विचारांचा कायापालट करत असतात.  हा कायापालट फक्त सकारात्मक दृष्टीकोनातून घ्यावा हे मात्र प्रत्येकाने ठरवायला हवे.
एक सांगतो तरुणाईत मस्ती केलेली एकवेळ खपून जाते.  पण जस जसे आपले वय वाढत जाते तसं तसे आपल्या शरीराची क्षमता हे सगळं वाहून नेण्यास असमर्थ असते.  हे मात्र माझ्यासारखा एखादा झटका बसला तरच समजते हे दुर्दैव आहे हीच तर खरी गोम आहे.  अहो, आपल्या ह्या अविचारीपणामुळे आपण आपल्या कुटुंबाची, आप्तेष्टांची, मित्रमडळींची, सहकार्यांची किती फरफट करतो हे आपल्या लक्षातच येत नाही.  अर्थात त्यांची अशी ओढाताण करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही.  म्हणूनच माझे तुम्हांला कळकळीचे आवाहन आहे की वेळेतच जागे व्हा.  माझ्या अनुभवावरून बोध घ्या आणि सधृढ आयुष्य जगण्यासाठी आपल्या विचारांचा सकारात्मक कायापालट करून चांगले विचार आचरणात आणा.
आयुष्य खरं तर खूप छान आहे.  जे हसत खेळत मजेत जगण्यात जो काही आनंद आहे तो द्विगुणीत कसा करता येईल ह्याचाच विचार करावा.  माझ्या विचारसरणीत एक कायापालट झाला आहे तो म्हणजे माझी वाचनाची आणि लिखाणाची आवड एकदम दुप्पट झाली आहे हे नक्की.  असाच सकारात्मक कायापालट माझ्या सधृढ आयुष्यास उपयोगी पडेल अशी आशा वाटते.

 

रविंद्र कामठे


Sunday 26 November 2017

स्पंदने काळजाची


स्पंदने काळजाची थांबली होती तेंव्हा

 

स्पंदने हृदयाची छेडली एका तारेने,

तारले मज आज ह्याच एका तारेन ||

 

स्वानुभवातून..............

 

काळजात धस्स होणं म्हणजे काय ते मी नुकतेच म्हणजे अगदी नुकतेच २७ ऑक्टोंबरला अनुभवले आहे हो.  आणि एक मात्र नक्की सांगतो की असा अनुभव लिहिण्याची वेळ माझ्या वैऱ्यावरही येऊ नये हीच काय ती मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.  काळीजहा प्रकारच मला तरी एकंदरीत फारच विलक्षण वाटला हो !  म्हणजे तसं काहीच की हो झाले नव्हते मला !  अगदी खावून पिऊन धडधाकाटच होतो हो मी !  गेली कित्येक वर्षे रोज सकाळी नियमितपणे व्यायाम करणारा, तसेच गेले काही दशके नियमितपणे अपेयपान आणि धुम्रपान करणाराही होतो मी ! असतील त्याचेच हे दूरगामी परिणाम म्हणा हवे तर ! हे आता मान्य करायला काय हरकत आहे.  परंतु गेले पाच सहा महिने झालेत मी ही सगळी व्यसने सोडून दिली होती आणि शिस्तबद्ध आयुष्य जगायला सुरवात केली होती.  तरी आपल्याकडे एक म्हण आहे ना ह्या जगात पृथ्वीवर केलेल्या चुका इथेच निस्तराव्या लागतात”.  त्यामुळेच की काय मला एकदम माझा साक्षात्कारी हृदयरोगहे डॉक्टर अभय बंग ह्यांच्या पुस्तकाची आठवण झाले जे मी काही वर्षांपूर्वी वाचले होते आणि आज मला सुद्धा असेच काहीसे लिहावे लागेल हे मात्र फारच विलक्षण वाटते आहे हो.

 

त्या दिवशी म्हणजे बुधवार २५ ऑक्टोंबर २०१७ला संध्याकाळी ८ वाजता कार्यालयातून घरी आलो.  साधारण दहा पंधरा मिनिटांनी मला अचानक कसेतरी व्हायला लागले.  मी अगदी अस्वस्थ झालो होतो.  शरीराच्या डाव्या बाजूला बधीर झाल्यासारखे झाले होते आणि मला दरदरून घाम फुटायला लागला होता.  बायको स्वयंपाक घरात असल्यामुळे तिच्या एकदम लक्षात नाही आले.  तरी तिने विचारले की काही त्रास होतोय का !  तर तिला म्हणालो, थोडेसे अस्वस्थ झाल्यासारखे वाटते आहे. जरा वाऱ्यात जावून आलो की थोडे बरं वाटेल.  असे म्हणून मी लगेचच घराच्या आवारत एक दोन चकरा मारल्या.  थोडेसे बरं वाटलं.  असे म्हणून मी लगेचच जेवायला बसलो.  कसेबसे थोडेसे जेवलो.  पण अस्वस्थपणा काही केल्या जाईना. म्हणून मी जेवता जेवताच माझ्या बहिणीच्या स्नेही डॉक्टरांना फोन लावला.  डॉक्टरांनी फोन उचलला नाही म्हणून मी बहिणीला फोन लावला.  तिने ताबडतोब स्नेही डॉक्टरांना फोन केला.  त्यांनी आमच्या कौटुंबिक डॉक्टरांकडे मला लागोलग जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी इसीजी काढायला सांगितला. त्यांनी तो पहिला आणि मला अगदी व्यवस्थितपणे तपासले.  इसीजी अगदी उत्तम होता. त्यात हृदयविकाराच्या शंका नव्हत्या.  सगळे कसे सर्वसाधारण आहे अजिबात घाबरण्याचे काहीही कारण नाही असे मला डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सगळ्यांचा जीव आता भांड्यात पडला होता.  त्या रात्री सगळे शांतपणे झोपूनही गेलो.

 

गुरुवार २६ ऑक्टोंबर, सकाळी नेहमी प्रमाणे उठलो.  आवरले आणि ८.३० वाजता कार्यालयात जायला चारचाकीने निघालो.  बायकोने आग्रह धरला की मी ओला अथवा उबेर गाडी करावी किंवा रिक्षाने कार्यालयात जावे. उगाच जोखीम नको. पण तिला मी म्हणालो आता मला खूपच बरं वाटतंय.  मी गाडीच घेवून जोतो.  वाटेत कात्रजला आलो आणि पुढे रहदारीमुळे जाम झालेला रस्ता पाहून माझ्या छातीत धडकीच भरली.  माझ्या डोळ्यासमोर बायकोचा चेहराच आला.  तिचे ऐकले असते तर किती बरं झालं असतं असही वाटले.  पण आता काही उपयोग नव्हता.  कसबसं मनाचा हिय्या करून गाडी त्या गर्दीत घातली आणि देवाचे नाव घेत शांतपणे बसून राहिलो.  रस्त्यात मुंगीला सुद्धा जागा नव्हती एवढी रहदारी होती.  किती वेळ लागेल ह्याची काहीच कल्पना येत नव्हती.  माझ्या जीवाची नुसती घालमेल सुरु होती.  गाडीत एकटाच होतो त्यामुळे थोडासा ताणही आला होता.  रात्रीचा त्रास आठवला आणि अजूनच घाबरून जायला झाले.  असो.  रेडिओ लावला.  वातानुकुलीत यंत्रणा चालूच होती तरीही काही सुचत नव्हते.  मला अगदी भोवळ आल्यासारखे झाले होते.  बहिणीला फोन करून कल्पना दिली होती.  (कारण ती ही नुकतीच माझ्याच कार्यालयात रुजू झाल्यामुळे मी तिला रोज नवले पुलाच्या इथून गाडीत घेत होतो व तसाच पुढे कार्यालात जात होतो.)  आता मात्र माझी अवस्था गलितगात्र झाल्यासारखी व्हायला लागली होती.  इतक्यात माझ्या पुढील वाहनाची थोडी हालचाल झाली आणि ती काही फुट पुढे गेली.  त्यामुळे माझ्या जीवात जीव आला आणि लवकरच ह्या जीवघेण्या रहदारीतून आपण सुटू अशी आशा वाटली.  मनात वेगवेगळे वाईट विचार यायला लागली.  काल रात्रीचा प्रसंग आठवला आणि आत्ता जर मला हृदयविकाराचा झटका आला तर काय होईल ! अस काही क्षण वाटून गेले.  पुन्हा दरदरून घाम फुटला.  मी गाडीची काच खाली केली.  थोडेसे बाहेर डोकावलो आणि इकडे तिकडे पाहून मनात आलेले वाईट विचार झटकायचा प्रयत्न केला. नशिबाने तो सफलही झाला.  हळूहळू रहदारी कमी व्हायला लागली होती.  जाम सुटला होता.  पुढची वाहने मुंगीच्या पावलाने का होईना पुढे पुढे सरकत होती.  असे साधारण ३५-४० मिनिटे मी माझ्या वाहनात एकांतात आणि वाईट विचारांच्या सानिध्यात काढली.  कशी काढली ते माझे मलाच ठाऊक.  साधारण ५० मिनिटांनी एकदाचा नवले पुलापर्यंत पोचलो.  बहिण माझी वाटच पाहत होती.  साधारणता नेहमी ४० मिनिटात घरून कार्यालयात पोचणारा मी त्यादिवशी रहदारीमुळे दीड तासांनी पोचलो होतो.  त्यात कालच्या रात्रीच्या झालेल्या त्रासाचे मनावर खूप दडपण आले होते.  पण अतिशय महत्वाचे काम पूर्ण करायचे होते त्यामुळे कार्यालयात जाणेही गरजेचे होते.  ह्याच तणावाखालीच मी माझ्या कामाला सुरवात केली. दुपारी जेवल्यानंतर मला पुन्हा परत अस्वस्थ व्हायला लागेले म्हणून मी कार्यालयातून तडक घरी यायला निघालो.  बहिणीने पण सांगितले की गाडी घेऊन नको जाऊ.  रिक्षाने जा.  मी तिचेही ऐकले नाही.  मी घरी पोचेपर्यंत बायोकोही कार्यालयातून घरी आलेली होती.  तिचे आणि बहिणीचे फोनवर बोलणे झाले होते त्यानुसार त्यांनी स्नेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबडतोब हृदयरोगतज्ञ डॉक्टरांकडे जावून उर्वरित तपासण्या करण्याचे ठरवले होते.  तपासणी केली आणि डॉक्टरांच्या मते माझ्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनी मध्ये अडथळा असण्याची शक्यता आहे.  मला त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सह्याद्री इस्पितळात भरती होण्यास सांगितले होते.

  

शुक्रवार २७ ऑक्टोबर, सकाळी, ९ वाजता आम्हीं सह्यादी इस्पितळात पोचलो.  माझी रवानगी एका वार्डात करण्यात आली आणि माझ्या अंगावर पेशंटचा डगला चढवण्यात आला.  नावाजलेले हृदयरोगतज्ञ डॉक्टरांकडे माझी केस देण्यात आलेली होती.  त्यांनी मला सांगितले की रविंद्र काही काळजी करू नका.  सगळे कसे व्यवस्थित होईल.  मी ही त्यांच्यावर भरवसा दाखवला आणि गपगुमान पडून राहिलो.  साधारण ११ वाजता माझी अन्जिओग्राफि झाली.  मला सगळे व्यवस्थित समजत होते.  अर्धवट भूल दिल्यामुळे मला छोट्या पडद्यावर काय चालले आहे ते समजत होते.  हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या दोन रक्त वाहिन्यांमध्ये अडथळे सापडले होते.  त्यातला एक १०० आणि दुसरा ९५ प्रतिशत होता.  म्हणूनच मला दोन दिवस अचानक असवस्थ व्हायला होत होते असे डॉक्टरांनी सांगितले आणि तुम्हीं अगदी योग्य वेळेत माझ्या कडे दवाखान्यात आलात आणि उपचार करून घ्यायचे ठरवलेत हे फार चांगले केलेत.  तुम्हीं आता काही काळजी करू नका.  मी तुमच्या घरच्यांशी बोलतो आणि स्नेही डॉक्टरांशीही बोलतो आणि योग्य तो निर्णय लगेचच घेतो.  तुमची अन्जिओप्लस्ति लगेचच करायला लागले हे मात्र नक्की. 

 

झाले तास दोन तासात सगळे चित्रच पालटले होते.  मी आत ऑपरेशन थेटर मध्ये आणि बाहेर सगळी घरची मंडळी असा तो एक तणावपूर्ण प्रसंग होता.  एकदाचे सगळे सोपस्कार पूर्ण होऊन माझ्या प्लास्तीची तयारी पूर्ण झाली होती आणि मला मुख्य ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यात आले.  तसाही माझा उजवा पाय बधिरच होता त्यामुळे मला काहीच कळत नव्हते.  साधारण एक तास पंधरा मिनिटे डॉक्टरांची माझ्या उजव्या मांडीतून एक तार घालून हृदयाजवळच्या दोन रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांशी अक्षरश: झुंज चालू होती.  जी मी ह्याची देही ह्याची डोळा अनुभव होतो. मला बाजूच्या छोट्या पाड्यावर सगळे दिसत होते आणि लहानपणी आपण पतंग कसे उडवायचो, ढील कशी द्यायचो, पतंग परत कसा ओढायचो, आसारीतून मांजा कसा ढिला सोडायचो.. वगैरे सगळे जुने किस्से आठवले मला एकदम. तसेच काहीसे चालले होते डॉक्टरांचे.  डॉक्टरांना काही केल्या ते अडथळे ऐकत नव्हते.  आपण साबणाच्या पाण्यातून कसे बुडबुडे तयार करायचो आणि तोडांत हवा भरून ते फोडायचा प्रयत्न करयचो अगदी तसेच काहीसे डॉक्टरांचे आणि त्यांच्या पाच सहा सहकाऱ्यांचे चाललेले होते.  त्यांचे तणावपूर्ण संभाषण मी ऐकत होतो आणि मनातल्या मनात माझ्या आराध्य देवतेचा श्री गणेशाचा धावा करत होतो.  शेवटी अथक प्रयत्नांनी ४५ मिनिटांनी डॉक्टरांना एक अडथळा पार करता आला आणि त्यात त्यांना एक स्तेंट टाकण्यात यश आले.  अशीच दुसऱ्या अडथळ्याशी झुंज सुरु झाली. १५-२० मिनिटे त्यांची झुंज चालली होती.  त्यात मला खूप लघवीला लागली.  ती तसे डॉक्टरांना सांगितले.  त्यांनी एका नर्सला मला लघवी पात्र देण्यास सांगितले.  तरीही काही केल्या मला लघवीच होईना. त्याचा दाब मला माझ्या पोटावर जाणवायला लागला आणि माझी शुद्ध हरपत आहे असे वाटले.  मी डॉक्टरांना सांगितले.  त्यांची थोडी लगबग झाली कारण आता ऑपरेशन अगदी थोडक्यावर आले होते. पण मला अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांनी ताबडतोब अजून एका डॉक्टरांना बोलावून घेतले व कॅथेटर लावण्यास सांगितले.  त्यामुळे माझ्या पोटावर दाब देऊन त्यांनी लघवी काढून घेतली आणि मला थोडे हलके वाटले.  त्यामुळे माझा रक्तदाब पुन्हा परत जागेवर आला आणि त्यांना उर्वरित दुसऱ्या अडथळ्याशी झुंजता आले.  डॉक्टरांचा तणावही कमी झाला आणि दुसरा अडथळा व्यवस्थित पार करून त्यात एक स्तेंट टाकण्यात यश आले.  माझ्या हृदयातील डावीकडील आणि उजीविकडील प्रत्येकी एका रक्त वाहिनीमध्ये एक एक स्तेंट टाकून शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असे डॉक्टरांनी मला सांगितले आणि आता तुमच्या हृदयाचा रक्त पुरवठा पूर्ववत करण्यात आपल्याला यश मिळाले आहे त्यामुळे तुम्हीं आता निश्चिंत व्हा.  काळजी करू नका.  डॉक्टरांनी माझे अभिनंदन केले आणि तुमची आन्गिओप्लस्ति यशस्वीरित्या पार पडली आहे सांगतिले.  आता तुम्हांला कुठलाही धोका नाही.

 

मला थोडावेळ शेजारच्या खोलीत ठेवण्यात आले होते.  मला आता थोडेसे स्वस्थ वाटत होते.  नंतर मला एक एक जण येऊन भेटून चेहऱ्यावरचा आंनद दाखवून प्रसन्न करत होते आणि मी त्या समाधानाच्या ग्लानीत डोळे मिटून पडून राहिलो होतो.  मला नंतर अतिदक्षता विभागत हलवण्यात आले आणि पुढील सोपस्कार त्या विभागातील डॉक्टर आणि सिस्टरवर सोडण्यात आले.  डॉक्टरांच्या सहकारी डॉक्टरांनी मला भेटून सांगितले की तुम्हीं खूप योग्य वेळेत हा निर्णय घेतलात आणि त्यामुळे तुमचे उपचारही व्यवस्थित झाले आहेत.  कदाचित आम्ही तुम्हांला उद्याच घरी सोडू शकतो. हे ऐकून मला तर खूपच आनंद वाटला आणि आपल्याला काहीच झाले नाही असे वाटायला लागले.

 

शनिवारी २८ ऑक्टोबरला हृदयरोगतज्ञ डॉक्टरांनी ११ वाजता येऊन माझी तपासणी केली आणि मी एकदम ठणठणीत आहे आणि घरी जायला हरकत नाही सांगितले.  त्यांनी स्नेही डॉक्टरांना मला फोन लावून दिला.  स्नेही डॉक्टरांनी फोनवरून मला खूप शुभेछ्या दिल्या आणि सांगितले की तुमच्या आयुष्याची दोरी खूप बळकट होती म्हणूनच हे उपचार योग्य वेळेत झालेत आणि ते यशस्वीही झाले आहेत.  आता काही काळजी करू नका.  तुमचे अभिनंदन.  भेटू आपण लवकरच. 

 

माझे तर मन भावनेने काठोकाठ भरून वाहत होते.  कोणा कोणाचे आभार मानावेत असे झाले होते.  सर्वप्रथम त्या गणरायाचे ज्याचा मी निस्सीम भक्त आहे, का बायकोचे आणि मुलीचे, त्यांनी ज्या धीराने सगळे निभावून नेले त्यांचे, का माझ्या बहिणीचे आणि मेव्हण्याचे ज्यांच्या सल्ल्यामुळे मी स्नेही डॉक्टरांकडे योग्य वेळेत गेलो होतो आणि त्यांच्या सूचनेनुसार उपचार घेत होतो त्यांचे, का ज्या हृदयरोगतज्ञ डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझ्या रक्तवाहिन्या पूर्ववत करून मला जीवनदान दिले त्यांचे, का माझ्या मुलासारख्या जावयाचे, जो हळवा असूनही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अगदी धीराने उभा होता, का माझ्या मैत्रिणीचे जिची तळमळ मला दिसत होती तिचे, का माझ्या कार्यालयीन सहकाऱ्यांचे ज्यांनी धावपळ करून सर्व विम्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली होती त्यांचे, का माझ्या मित्रांचे जे माझ्यासाठी खूप धावपळ करत होते, का माझे सखे शेजार्यांचे, का माझ्या लहान भावाचे आणि लहान बहिणीचे आणि तिच्या जावयाचे जे वेळेला धावून आले होते आणि इतर सर्व आप्तेष्टांचे आणि मित्र परिवाराचे, ज्यांनी माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करून मला शुभेछ्या दिल्या होत्या त्यांचे, हेच मला काही समजत नव्हते आणि माझ्या मनातून त्याही परिस्थितीत एक चारोळी उमटली....

 

उंबरठ्यावर मृत्युच्या, जीवनाचे महत्व कळतं,

तेंव्हाच खर तर आपल्या, माणसांच महत्व कळतं ||

 

मला भेटायला आलेल्या आणि माझ्यावर शुभेछ्यांच्या वर्षाव करून मला जीवनदान देणाऱ्या सगळ्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तसेच आजच्या आधुनिक वैदकीय शास्त्राला मला सलाम केल्याशिवाय राहवत नाही.

 

आभार मानून तुमचे, मी कृतघ्न नाही होणार,

तुमच्या ऋणातच हा रवी, सदैव राहणार ||

 

आज दहा बारा दिवसांनी सुद्धा मला हा संपूर्ण प्रसंग आठवला आणि तो मी शब्दांकित करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय.  कारण असे क्षण आयुष्यात कोणाच्या वाट्याला येवूच नयेत असे वाटते.  एक मात्र नक्की सांगतो की आपल्या आयुष्यातला कुठलाही अनुभव हा आपल्याला खुप काही शिकवून जातो.  प्रत्येक अनुभव हा वेगळा असतो, प्रत्येकाचा वेगळा असतो पण ह्या अशा अनुभवातून काही धडे घ्यायचे असतात, ज्याने आपले आणि आपल्या कुटुंबियांचे आयुष्य सुखकर होण्यास मदत होते.  आणि हो हट्टीपणा कमी करून जर का आपण आपल्या माणसांचे ऐकले तर सगळ्यांचे कल्याण होते हे मात्र नक्की.  चांगलाच धडा मला नियतीने दिलाय.  तो मी आता विसरणार नाही.

 

मी ह्या सर्व घटनेतून एकच मतितार्थ काढला आहे की, माझा हा पुनर्जन्म आहे.  देवाने मला आज पुन्हा एकदा उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानी जगण्याची संधी दिली आहे.  मी आता ह्या संधीचे सोने करून माझ्या सर्व कुटुंबियांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना, मित्रमंडळीना, माझ्या सहकार्यांना, हितचिंतकांना सुखी आणि समाधानी ठेवणार आहे.

 

शेवटी एवढेच म्हणतो की...

 

जगण्यासाठी जगायचे नसते, कारण जगण्याचे गणितच निराळेच असते | 

गंमत खरी जीवनात असते, हसत हसत हे जीवन जगायचे असते |

हार जीत ही नेहमीच असते, हारता हारता जिंकायचे असते |    


रविंद्र कामठे

Saturday 25 November 2017

आभार मानून तुमचे कृतघ्न मी नाही होणार, तुमच्या ऋणातच रवी सदैव राहणार


नमस्कार मंडळी,
मी येत्या सोमवारी म्हणजे २७ नोव्हेंबरला २०१७ला, बरोबर एक महिन्यांनी माझ्या ऑफिसला VINSYSला जाणार आहे.  त्याचं असं झालं की एक महिन्यापूर्वी म्हणजे २७ ऑक्टोबरला माझ्या हृदयाला रक्तपुरवठा करण्याऱ्या दोन रक्त वाहिन्यांमध्ये प्रत्येकी एक अशा दोन पुंगळ्या (स्तेंट) टाकण्यात आल्या होत्या.  त्या आता व्यवस्थित काम करत आहेत असे पर्वाच डॉक्टरांनी सांगितले.  त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार, मी ठरवले की आता आपल्या ह्या पुंगळ्याना सुद्धा आपल्या कार्यालयाची आणि कामाची ओळख करून द्यावी.  कारण त्यांनाही ह्याची सवय व्हायला हवी ना !  ह्या पुंगळ्याना आणि मला आता उर्वरित आयुष्य एकत्रित नांदायचे आहे हो बाकी काही नाही.  होईल त्यांनाही ही ह्या सगळ्याची सवय हळू हळू.  तशाही त्या नवीन आहेत ना !  पण आता एक महिन्यात चांगल्याच रुळल्या आहेत म्हणे माझ्या हृदयात.  काय नशीब असते ना, एकेकाचे !  ह्यांनी तर एकदम आमच्या हृदयातच ठाण मांडले आहे, नव्हे एकदम कब्जाच केलाय हो !  आत काय तर म्हणे माझ्या काळजावर त्यांचीच हुकमत चालणार आहे आणि त्यासाठी मला रोज सकाळी उठून काही कि.मी. चालायचे आहे, नियमित व्यायाम करायचा आहे आणि खाण्या पिण्याचे (तुम्हांला वाटते तसले पिण्याचे नव्हे,जे आम्ही केव्हाच सोडले) त्याचे पथ्य पाळायचे आहे. असो.  पण आता माझा नाईलाज आहे हो !  होईल ह्या ही गोष्टींची सवय हळू हळू.  शेवटी काय तर सगळेच माझ्याच फायद्याचे आहे ना !

डॉक्टर म्हणत होते की तुमचा हा पुनर्जन्मच झालाय असं समजा.  असेल बुवा !  आपल्याला काय त्याचं.  त्यांचा सल्ल्याने वागणे आले.  जेवढे मिळाले आहे ते आयुष्य बोनस समजून वागायलाच हवे आणि मी ही तसे मनोमन ठरवून टाकले.  इथून पुढचे आयुष्य ही सदृढच जगायचे असा संकल्पच सोडलाय मी.  माझ्या विचारसरणीतही खूप अमुलाग्र असा सकारात्मक बदल मला जाणवतो आहे हे मात्र नक्की.  आपल्या मराठीत एक म्हण आहे ना, “जे काही होते ना ते आपल्या भल्यासाठीच असतेत्याचा मला अगदी पदोपदी प्रत्यय येतो आहे.

चला आता जास्त पाल्हाळ लावत नाही.  मुद्यावर येतो.....

ह्या निमित्ताने मी आज सगळ्यांचे अगदी मन:पूर्वक आभार मानतो, ज्यांनी ज्यांनी माझ्या आयुष्यातील ह्या एक महिन्याच्या खडतर प्रवासात मला फारच मोलाची साथ दिली आहे त्यांचे.  तुम्हीं सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, तसेच माझे मनोबल वाढवलेत, मला काही झाले आहे ह्याची जाणीव होऊ दिली नाही व मला सतत कोणी ना कोणीतरी भेटायला येऊन अथवा फोन करून, शुभेछ्या देवून, अजिबात एकटे पडून दिले नाही, त्या सगळ्यांचे.  मी जर सगळ्यांची नावे घेत बसलो तर खूप मोठी यादी होईल.  अगदी अनावधनानेही कोणाचे नाव घ्यायचे राहणार नाही. कारण मी कोणालाही विसरू शकत नाही आणि शकणारही नाही.  सर्वात शेवटी त्या कर्त्या करवित्या परमेश्वराचे आभार तर मानायलाच हवे.

माझ्यासाठी हा एक महिना म्हणजे आठवणींचा सागरच आहे.  ह्या स्मृतींच्या जीवावर मी माझे उर्वरित आयुष्य काढू शकतो, इतक्या ह्या स्मृती माझ्यासाठी बहुमोल असा ठेवा आहेत.

आभार तुमचे मानून, कृतघ्न मी नाही होणार,

तुमच्या ऋणातच, हा रवी सदैव की राहणार ||

 

मी आजच नटून थटून बसलोय आणि कधी एकदा सोमवारी ऑफिसला जातोय असे झाले आहे मला.  त्याचे कारण माझ्या सारख्या सारखी चुळबुळ करणाऱ्या व्यक्तीला आणि आपले काम हेच आपले खरे दैवत मानण्याऱ्या माणसाला दुसरा कसला आनंद असणार हो.  तुम्हीं माझ्या भावना समजू शकता.

 

आपला स्नेहांकित,

रविंद्र कामठे

२५ नोव्हेंबर २०१७

Monday 20 November 2017

काळीज चिमणा चिमणीच

काळीज चिमणा चिमणीच
एके दिवशी सकाळी अंगणात बसलो होतो.  अतिशय छान हवा होती, वातावरण अगदी प्रसन्न होते.  एकंदरीत चहूकडे खूपच शांतता होती. घराच्या आजूबाजूला बागेत सुंदर अशी फुले उमलली होती.  झाडावर पक्ष्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या छोट्या भांड्यावर अजूनही कोवळी किरणे पसरली होती. आज रविवार असल्यामुळे थोडा निवांतच होतो.  पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी स्वच्छ धुऊन पुन्हा भरून ठेवायची होती.  त्यांच्या साठी खाद्य ठेवायचे होते.
नेहमी प्रमाणेच चिमणा, चिमणी, वटवटे, बुलबुल,सनबर्ड, खारू ताई, इत्यांदींची लगबग सुरु झाली होती.  ती सारी त्यांच्या कामात मग्न होती. एकंदरीत रविवारची ही सकाळ फारच रमणीय होत चालली होती.

आमच्या घरात एका बाजूला भिंती मध्ये एक मोठे भोक ठेवले होते.  म्हणजे ते आम्ही मुद्दामच ठेवले होते.  ह्याच घरट्यात आज पर्यंत आम्हीं चिमणा चिमणीच्या जवळ जवळ ३ ते ४ पिढ्या पाहिल्या होत्या.  त्यामुळेच आमचे ही त्यांच्याशी कळत नकळत एक प्रकारचे नातेच जुळले होते.  त्यांची ती चिव चिव, लगबग, आपल्या पिल्लांसाठी दाणा पाण्यासाठीची धडपड, घरट्यासाठी लागणाऱ्या काटक्यांची जुळवा जुळव, पहिली कि मन कसे भरून यायचे आणि वाटायचे किती कष्ट करतात ना ही चिमणा चिमणी आपल्या पिल्लांसाठी.  किती माया,किती प्रेम आहे त्यांचे त्यांच्या पिल्लांवरती. जरी देवाने त्यांना हात नाही दिले तरी नुसत्या एका चोचीने किती किती माया करतात ते आपल्या पिल्लांवरती.
ह्या चिमणा चिमणीची, आपल्या पिल्लांसाठीची धडपड पहिली कि मला माझ्या आई बाबांची आठवण येते.  ते ही नाही का करत कष्ट आपल्या साठी.  अगदी मान मोडे पर्यंत काम करतात.  आपल्याला काही काही कमी पडू नये ह्या साठी दिवस रात्र मेहनत करतात.  आई तर बिचारी किती काळजी घेते, किती प्रेम करते नाही आपल्यावर.  शाळेची सर्व तयारी, खाऊचा डब्बा,जेवणाचा डब्बा, दुपारी जेवायला घरी घरी आल्यानंतर स्वतःच्या हाताने भरवणे, अगदी कंटाळा आला असला तरी किंवा भूक नसली तरीही खा खा करून मागे लागणे.  अभ्यास घेणे.  तिच्या एवढ्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आपल्याशी गप्पा मारणे, छान छान गोष्टी सांगणे.  सुट्टीच्या दिवशी बागेत फिरायला नेणे,इत्यादी इत्यादी . किती आकांषा असतात त्यांच्या, किती स्वप्ने पाहिलेली असतात त्यांनी आपल्या पिल्लांसाठी.  त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी.
त्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या बागेतील चिमणा चिमणीने आपल्या नुकतेच पंख फुटलेल्या दोन पिल्लांस आज थोडेसे उडविण्याचे शिक्षण देण्याचे ठरविले होते.  म्हणजे त्यांचा तसा बेत होता. चिमणा चिमणीने आधी थोडेसे इकडे इकडे उडून फिरून बघितले.  बाहेर काही धोका, वगैरे नाहीना ते पाहिले.  सर्व काही व्यवस्थित आहे असे त्यांना जाणवल्या नंतर त्यांनी आपल्या दोन्ही पिल्लांना घरट्यातून हलेकेच बाहेर काढले. पिल्ले थोडीशी बिथरलेली होती.  त्यांच्यासाठी हा प्रयोग जरा नवीनच होता.  त्यातून आज त्यांच्या आई बाबांनी त्यांना खाऊही दिला नव्हता.  पण करणार काय, एकदा का बाबांनी सांगितले कि आईचे ही काही चालायचे नाही.
आज त्यांना उडविण्यास शिकविण्याचा तास होता. त्यांच्या  बाबांनी दोघांनाही हळूच घरट्यातून ढकलत ढकलत बाहेर काढले.  पाठीमागून आतिशय प्रेमळपणे आई ही बाहेर आली.  तिला ही बिचारीला खूप काळजी वाटत होती.  काळजी कशाची तर...अजून माझ्या बाळांच्या पंखात एवढा जोर आला नाहीय.  तरी पिल्लांच्या बाबांची आपली उगाचच त्यांना उडवायला शिकवायची घाई कशाला ! परंतु पिल्लांच्या बाबांचे गणित अतिशय व्यवहारी होते.  अतिशय योग्य वेळेत त्यांना आपल्या पिल्लांना स्वावलंबी करायचे होते आणि त्यामुळेच त्यांची ही सारी खटपट चाललेली होती. हलकेच एक पिल्लू घरट्यातून बाहेर ढकलले गेले.  थोडेसे उडण्याचा प्रयत्न करून एक फांदीवर जाऊन बसले.  दुसऱ्या पिल्लास ही असेच ढकलून बाहेर काढले गेले.  ते जरा धीटच होते.  छान पैकी एक गिरकी घेऊन फिरून दुसऱ्या फांदीवर जाऊन बसे.  दोन्ही पिल्ले एकमेकांकडे भिरभिरत्या नजरेने पाहत होती.  त्या दोघानांही आज एक नवेच गुपित कळले होते कि त्यांच्या पंखात आता हळू हळू बळ येऊ लागले होते. आजचा खेळ येथेच संपला.  चिमणा चिमणीने दोन्ही पिल्लांना परतुनी घरट्यात यायला सांगितले आणि त्यांना मस्त पैकी छान छान खाऊ भरविला.  खूप खूप कौतुक केले आणि चिमणीने तर मायेने कवटाळून चोचीत चोच घालून एक एक दाणा अगदी प्रेमाने भरविला.
असेच काही दिवस गेले.  दर एक दिवसा आड चिमणा चिमणी आपल्या दोन्ही पिल्लांना घरट्यातून बाहेर काढत आणि थोडा वेळ उडवायला शिकवत असत.  त्यांना अजूनही थोडीशी धास्ती होती कि आपल्या पिल्लांच्या पंखात अजूनही पुरेसे बळ आलेले नाही ह्याची ! तरीही ते हा प्रयत्न थांबवणार नव्हते.  कारण त्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता त्यांच्याकडे.  निसर्ग नियमा प्रमाणे आता दोन्ही पिल्लांना स्वबळावर उडयला यायलाच हवे होते.  स्वतःचे दाणा पाणी स्वतः शोधणे गरजेचे होते. त्यांचे कारण ही तसेच होते.  जर त्यांच्या पंखात बळ नाही आले आणि आजूबाजूच्या परिस्थितीची त्यांना जाणीव नाही झाली तर, ते ह्या जगात जगतील कसे?  बाकीचे पक्षी अथवा प्राणी सदैव त्यांना मारायला टपलेलीच असतात हे त्यांना माहित होते.  त्यासाठीच तर त्यांची ही धडपड होती कि आपल्या बाळांनी आपल्या पंखात बळ आणावे आणि दूर दूर उडून जाऊन स्वतःचे विश्व बसवावे.
ह्यापुढे ही बाळे आता स्वःताच्या पायावर उभी राहिल्या शिवाय गत्यंतरच नव्हते.  आणि म्हणूनच हा सगळा त्यांचा खटाटोप चालला होता. चांगले ८-१० दिवस रोज एक ते दोन तास दररोज दोन्ही पिल्लांकडून तालीम करून घेतली जात होती.  चिमणा आणि चिमणी दोन्ही पिल्लांना अगदी नित्यनेमाने उडावयास शिकवत होती.  आजू बाजुला कोणी नाही ना हे ही पाहत होती.  एखादे मांजरही जरी आजूबाजूला दिसले तरी त्याला ही दोघे अगदी बेजार करून लांब लांब घालवत होती. एके दिवशी लहान पिल्लू उडण्याचा प्रयत्न कारण थोडेसे दमले होते आणि शांतपणे गेटच्या खालच्या दांडीवर विसावले होते.  तेवढ्यात मांजराचा दबक्या पावलांचा आवाज चिमणीला आलाच.  तिने ताबडतोब पिल्लास उडविले.  बिचारे थकले होते.  तरीही उडाले आणि जरा उंच जाऊन बसले.  चिमणीने चिव चिवाट करून त्या मांजरास  पिल्लापासून दूर घालवले आणि काही काळा नंतर पिल्लास घरटयाशी सुखरूप परत नेले.
तिने पिल्लास समजून सागितले कि बाळा, आज मी तुला ह्या मांजराच्या ताब्यातून सोडवले आहे, परंतु अशी खूप मांजरे, ह्या जगात आहेत आणि त्यांच्या पासून तुझे संरक्षण करणे मला एकटीला शक्य नाही.  त्यामुळे तू लवकरात लवकर तुझ्या स्वतःच्या पंखात बळ आणून उडण्यास शिकायला हवें आणि स्वतःचे रक्षण करावयास हवे.
पिल्लांस त्यांची चूक समजली आणि दुसऱ्या दिवसा पासून ते आणि त्याचे भावंड दोघे मिळून रोज खूप वेळ उडण्याचा सराव करू लागले. काही दिवसांतच ही दोन्ही पिल्ले आपापल्या बळावर आकाशात स्वछंद पणे भरारी घेऊ लागले आणि मनसोक्त  पणे विहरू लागले.  आता त्यांना कोणाचीही भीती नव्हती. ते सतत आपली आई बाबांचे आभार मानत होते, कि तुमच्या मुळे आम्हाला आमचे आयुष्य आज सुखाने जगता येते आहे. चिमणा चिमणीच्या ही डोळ्यात आज आनंदाश्रू होते.
ह्यावरच एक कविता ....
|| काळीज चिमणा चिमणीच ||
पिल्लास कुठे कळते, काळीज जन्मदात्यांच,
बागडत असते ते स्वतःच्या विश्वातच ||
शिकवितात चिमणा चिमणी, त्यास उडविण्यास,
हळू हळू उडू लागत पिल्लू जवळपास ||
आनंद असतो त्यांच्या एका डोळ्यात,
काळजी असते दुसऱ्या नयनात ||
बळ आलं असेल का पिल्लाच्या पंखात ?
शंकेची पाल उगीच चुकचुकते चिमणा चिमणीच्या मनात ||
टपलेली असतात,  मांजरेही आसपास,
निष्फळ असतो चिमणा चिमणीचा चिवचीवाट ||
पिल्लास नसते फिकीर कशाची,
प्रयत्न करते ते भरारी घेण्याची ||
असते वेडी आशा, चिमणा चिमणीच्या मनात,
विश्वास असतो त्यांचा त्यांच्या पिल्लात  ||
भुर्रकन पिल्लू घेत भरारी उंच,
भावूक होत वेड मन चिमणा चिमणीच ||  
*****
तात्पर्य:
आपले आई बाबा जे काही करतात ते आपल्या भल्या साठीच असते हे लक्षात घ्या.  त्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो.  आपली पिल्ले छान शिकावीत, मोठी व्हावीत, त्यांनी चांगले शिक्षण घ्यावे, खूप खूप नाव कमवावे, सन्मान मिळवावेत, खूप खूप कीर्तिमान लाभावेत त्याचं बरोबर आपल्या घराण्याचे तसेच देशाचेही नाव उज्वल करावे. एवढीच एक अपेक्षा त्यांची आपल्या पिल्लान्क्डून असते.  तीला कधी तोडू नका.  चिमणीच्या पिल्लांप्रमाने तुम्ही आयुष्यात यशवी व्हा.
रविंद्र कामठे

Friday 13 October 2017

चपराक दिवाळी महाविषेशांक प्रकाशन सोहळा १२ ऑक्टोंबर २०१७ निमित्त हार्दिक अभिनंदन






चपराक दिवाळी महाविषेशांक प्रकाशन सोहळा १२ ऑक्टोंबर २०१७ निमित्त हार्दिक अभिनंदन


 प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी, व्यवसायिकी, सामाजिक बांधिलकी, जिद्द, अपार कष्ट, जिज्ञासा, सकारात्मक दृष्टी, साहित्य संस्कृती जपण्याची धडपड, योग्य त्या कलागुणांना वाव अथवा संधी देण्याची तळमळ, प्रस्थापितांचा आदर व सन्मान तसेच नवोदितांना प्रेरणा देणारे उर्जा स्तोत्र आणि कार्यास दैवत मानून त्यात सातत्य ठेवण्याची मुलखावेगळी कला असलेले असे सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व म्हणजे चपराकचे संस्थापक, प्रकाशक, लेखक, समीक्षक, कवी, वक्ते, व्यवस्थापक श्री. घनश्याम पाटील सरांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्याचा हा माझा लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न समजावा.  निमित्त काय तर गुरुवार दिनांक १२ ऑक्टोंबर २०१७ रोजी पुण्यातील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात संपन्न झालेला चपराकचा दिवाळी महाविषेशांक २०१७ चा प्रकाशन सोहळा हे होय.

 

साधारण गेले पाच ते सहा महिने मी घनश्याम सरांची आणि त्यांच्या सहकारी मंडळींची ह्या दिवाळी अंका निमित्त चाललेली जीवाची धडपड अगदी ह्याची देही ह्याची डोळा पाहतो आहे.  त्यामुळेच मला ह्या सर्वांचे कौतुक करावेसे वाटते.  सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही सालाबादप्रमाणे एक अतिशय दर्जेदार साहित्य असलेल्या ५०० पानांचा दिवाळी अंकाच्या निर्मितीचा ध्यास, त्यांच्या ह्या संकल्पनेपासून ते प्रकाशना पर्यंतचा प्रवास आपल्याला वाटतो तेवढा सोपा तर निश्चितच नाही, परंतु अतिशय खडतर आणि जोखीम भरलेला असाच आहे.  तरीही कुठेही न डगमगता, सर्व व्यावसायिक गणितेही सहजपणे सोडवत, ही मंडळी आपले उद्दिष्ट साध्य करतांना पाहून माझी मान कशी अभिमानाने ताठ होते आणि मी ही ह्या समूहाचा एक चिमुकला सदस्य असल्याचा अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे !  तुम्हीं म्हणाल की, तुम्हीं चपराकचे आणि त्यात घनश्याम पाटील सरांचे हे एवढे कौतुक करताय त्याचे कारण तुमचे साहित्य साप्ताहिकात, मासिकात ते प्रकाशित करतात म्हणून आणि यंदाच्या दिवाळी अंकात तुमचा एक लेखही त्यांनी प्रकाशित केला आहे म्हणून तर नाही ना !  तुमचेही बरोबर आहे म्हणा !  असा विचार तुमच्याच काय पण सर्व सामान्य माणसाच्या मनात नक्कीच येणार, त्यात नवल ते काय !  अहो पण एक सांगतो.  घनश्याम पाटील हे एक असे संपादक आहेत की, त्यांना जर तुमचे साहित्य काही कारणांनी योग्य वाटले नाही अथवा जागेची मर्यादा असेल तर ते सदर लेखकास, भले तो प्रस्थापित असो अथवा नवोदित असो, अतिशय नम्रपणे नकार देण्याची क्षमता बाळगून आहेत.  त्यात त्यांना वाईटपणाही घ्यावा लागतो, टीकाही सहन करावी लागते हे मी प्रत्यक्षपणे चपराकच्या कार्यालयात नियमित जात असल्यामुळे अनुभवलेले आहे. आज अशी परिस्थिती आहे की चपराकमध्ये आपले साहित्य छापून यावे ह्यासाठी भल्या थोरल्या साहित्यिकांची इच्छा असते, हेच तर चपराकच्या यशाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्यामधील सच्च्या संपादकाचे श्रेय आहे.  आणि हो, मी काही फार मोठा लेखक अथवा साहित्यिक नाही.  उलट सतत प्रोत्चाहित करून, मलाच काय पण सर्व नवोदितांना लिहिण्यास उद्युक्त करून साहित्य सेवा घडवणारा ही अगली वेगळी आसामी आहे म्हणून हा कौतुकावर्षाव समजावा.

 

मला माझ्या स्वभावानुसार योग्य त्या गोष्टींचे, व्यक्तींचे, संस्थांचे, संघटनांचे, कृतींचे कौतुक करण्याची माझी जी सवय आहे त्यानुसारच, मी संस्थापक संपादक घनश्याम पाटीलसरांचे, सहसंपादक माधव गिरसरांचे, कार्यकारी संपादिका शुभांगीताई गिरमेंचे, उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे ताईंचे, मुद्रितशोधन साठी ब्रम्हे काकांचे व कमळापुरकर सरांचे, मांडणी व सजावट साठी निखील भोसलेचे, उत्कृष्ट आणि समर्पक मुखपृष्ठासाठी संतोष घोंगडेचे, कार्यालयीन व्यवस्थापक प्रमोद येवले, सल्लागार ज्ञानेश्वर तपकीर सरांचे, तसेच कार्यालयीन व्यवस्थापने साठी चिन्मय साखरेचे व ऑनलाईन व्यवस्थापने साठी वैभव कुलकर्णीचे आणि सर्वात शेवटी हा दिवाळी अंक योग्य वेळेत मुद्रित करून देण्यास बहुमोल सहकार्य केल्याबद्दल मामा शिवंगीकर सरांचे अगदी मनापासून कौतुक करून अभिनंदन करतो. 

 

एक सांगतो, माझे हे कौतुक तोंडदेखले नाही. हे तुम्हीं सुद्धा मान्य कराल.  त्याचे अगदी स्पष्ट उदाहरण म्हणजे कालचा उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात सायंकाळी सहा वाजता पार पडलेला दिवाळी महाविषेशांकाचा प्रकाशन सोहळाहे होय.  समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री श्रीमती आशाताई काळे, जेष्ठ उद्योजक श्री. कृष्णकुमार गोयल, मनसेचे शहर उपाध्यक्ष रणजीत शिरोळे आणि सोहळ्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, ह्या सर्व प्रथितयश मान्यवरांनीही काहीही हातचे न राखून ठेवता चपराक समुहाचे भरभरून केलेले कौतुक हे आहे.  त्याचा मी एक साक्षीदार आहे.  सर्व स्तरातील साहित्यिकांचा आणि बोलीबाषेतील साहित्याचाही समावेश करून अतिशय प्रगल्भ आणि दर्जेदार साहित्याची एक मेजवानीच ह्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने चपराकने यंदाही करून साहित्य विश्वात एक क्रांतीच घडवून आणली आहे असे म्हणाले तर वावगे होणार नाही. अगदी चांद्या पासून बांद्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या सीमापार असेलेल्या मराठी साहित्यिकांचा समावेश असलेला असा हा एकमेव दिवाळी अंक असावा असे मला वाटते.

 

ह्यासाठी स्वत: घनश्याम पाटील सरांनी सलग ५० तास काम करून हा दिवाळी अंक आपल्या समोर योग्य वेळेत सादर केला आहे हे इथे नमूद करण्याचे एकमेव कारण, आपल्या कामावर असलेली त्यांची निष्ठा आणि साहित्यसेवेची असलेली उर्मी त्यांच्या कामाच्या ह्या सचोटीतून दिसते आणि ती सृजन वाचकांच्या समोर आणण्याची जबाबदारी मला आपण होऊन घ्यावीशी वाटते.  नाहीतरी चपराककशाला जाईल आपला धिंडोरा पिटायला.  म्हणुनच मला ह्या निमित्ताने माझ्याच कवितेच्या काही ओळी इथे नमूद केल्यावाचून गत्यंतर वाटत नाही..

विणले तर कळतात - कष्ट घरट्याचे | 

पाहिले तर कळते - कारण घडल्याचे | 

लिहिले तर कळतात - अर्थ शब्दांचे |

वाचलेच तर कळते - मन लिहिणाऱ्याचे | 

स्पर्शानेच तर कळते - विश्व भावनांचे |

डोळ्यांनाच तर कळतात - भाव मनाचे |

कळते परंतु वळत नाही, हेच तर गमक आहे हृदयाचे |    

 
आर्थिक मंदीच्या ह्या काळात तसेच साहित्य क्षेत्रात उगाचच उठवले गेलेल्या (सध्याची पिढी वाचतच नाही, सध्या वाचकच नाहीत, मराठी साहित्य आता संपतच चालेले आहे, दर्जेदार लेखन आजकाल होतच नाही, साप्ताहिक, मासिक शेवटच्या घटका मोजत आहेत, वगैरे, वगैरे) वादळात, “चपराकने दहावा दिवाळी अंक, तो ही ५०० पानांचा दिवाळी महाविषेशांक, (सलग तिसऱ्या वर्षी) प्रकाशित साहित्यविश्वात स्वत:चा एक वेळच ठसा उमटवला आहे. 

 

तसेच चपराकने तरुण लेखक सागर कळसाईतच्याकॉलेज गेटह्या कादंबरीच्या पाचव्या आवृतीचेही प्रकाशन ह्या दिवाळी महाविषेशांका बरोबर करून साहित्य विश्वात खळबळ माजवून आपल्या टीकाकारांना नम्रपणे कृतीतून सणसणीत चपराक दिली आहे हे मात्र खरे.  चपराकनुसतेच निद्कांचेही घर असावे शेजारी असे म्हणत नाही तर निद्कांना हितचिंतक करण्याचे सामर्थ्य ठेवून आहे, हे मला अगदी प्रकर्षाने जाणवले.

 

साहित्याला महागाई वगैरे काही नसते.  तिथे फक्त आणि फक्त इच्छाशक्ती असावी लागते हे मात्र खरे आहे.  म्हणूनच तुरस्त्र, रखड, रास्त, र्तव्यदक्ष चे भविष्य उज्वल आहे आणि त्यामुळेच तुम्हां आम्हां वाचकांचे आयुष्य साहित्यापासून वंचित राहणार नाही ह्याची खात्री आहे.  आपला समाज साहित्यकुपोषित राहणार नाही ह्याची हमी चपराकदिली आहे हेच सिद्ध होते.

 

मी चपराकसमूहाचे पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेछ्या देतो.

 

आपला स्नेहांकित,

रविंद्र कामठे

९८२२४०४३३०