Tuesday 29 August 2017

डॉक्टर नव्हे, “देवदूत”

चपराक प्रकाशन च्या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला माझा हा लेख जरूर वाचा.  अंगावर काटा आणणारा माझ्या आयुष्यातला हा एक थरारक अनुभव आहे.  देव करो अन अशी वेळ कोणावर न येवो. त्या जेव्हा केंव्हा आठवतात ना तेंव्हा मला काय वाटते......

कधी स्वतःवर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले |
इतकी आसवे, आज ओघळीत की, आसवांनाही रडू आले ||
 
 

डॉक्टर नव्हे, “देवदूत

साधारण तीन वर्षांपूर्वीचा म्हणजे २०१४चा हा किस्सा आहे.  स्थळ पत्रकार भवन. वेळ सकाळी ११ वाजताची.  निमित्त माझ्या दुसऱ्या म्हणजेच तरंग मनाचेह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.  सर्व मान्यवर पाहुणे वेळेवर हजर होते.  प्रकाशकाने साधारण सहा सात पुस्तकांचे प्रकाशन एकत्रित करण्याचे योजिले होते.  त्यात माझ्या बरोबर ख्यातनाम लेखक, कवी, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते श्री. गंगाधर मुटे सरांच्या माझी गझल निराळीह्या गझल संग्रहाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशनही होते.  मान्यवरांमध्ये जेष्ठ गझल लेखिका आणि कवयत्री सौ. संगीता जोशी उपस्थित होत्या तसेच प्रथितयश डॉक्टर आणि लेखक श्री. अविनाश भोंडवे हे ही मान्यवरांमध्ये उपस्थित होते.  डॉक्टर भोंडवे सरांना पाहिले आणि अचानक माझे मन वीस वर्षांनी मागे गेले. गतकाळातील, अंगावर काटा आणणाऱ्या त्या स्मृती ताज्या झाल्या आणि एकदम डोळे भरून आले, हातपाय गारठले, घसा कोरडा पडला.  मला काहीच सुचत नव्हते.  मान्यवर तर मंचावर बसलेले होते आणि एकएका पुस्तकाचे प्रकाशन करत होते.  लेखक / लेखिका आपले मनोगत व्यक्त करत होते.  मान्यवरांचेही मनोगत व्यक्त होत होते.  मी पहिल्या रांगेत बसलेला होतो आणि माझा नंबर कधी लागतो आहे ह्याची वाट पहात होतो.  माझे ह्या सोहळ्याकडे फारसे लक्षच लागत नव्हते.  माझे चित्तच थाऱ्यावर नव्हते.  मनात गोंधळ उडालेला होता.  तेवढ्यात निवेदकाने माझे नाव पुकारले आणि मला मंचावर येण्याची विनंती केली, तेंव्हा माझी तर भंबेरीच उडालेली होती.  माझ्या बाजूला मुटे सर बसलेले होते, त्यांनी माझ्या हातात हात मिळवून मला शुभेछ्या दिल्या त्यामुळे मी थोडासा भानावर आलो.  डॉक्टर अविनाश भोंडवे सरांच्या हस्ते माझ्या तरंग मनाचेह्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.  मला माझे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली.  मी स्वत:ला कसे बसे सावरले.  कारण मनात इतक्या भावना दाटून आल्या होत्या की काय बोलावे हेच मला सुचत नव्हते.  तरी एक बरं झालं, की मी माझे मनोगत लिहून आणलेले होते.  ते मी मनाचे धाडस करून व्यवस्थितपणे वाचून ती वेळ मारून नेली.  अर्थात त्याही स्थितीत माझे मनोगत रसिकांना अतिशय आवडले.  माझ्या मनातल्या वादळांची तशी फारशी कल्पना रसिकांना तरी कुठे होती !  त्यावेळेस माझे काही नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते, परंतु ते सगळे मागे बसलेले असल्यामुळे माझ्या मनातले हे द्वंद त्यांच्याही नजरेस नाही आले.  माझी बायकोही ह्या कार्यक्रमास हजर होती.  परंतु ती ही माझ्या ह्या मानसिक अवस्थेपासून अनभिज्ञ होती.  अर्थात तसेही आम्हांला पत्रकार भवन मध्ये फारसे बोलायला वेळच मिळाला नव्हता.

प्रकाशन सोहळा पार पडला.  मुटे सरांच्या पुस्तकाचे सर्वात शेवटी प्रकाशन झाले.  सर्व मान्यवरांची भाषणे झाली, आभार प्रदर्शन झाले आणि आमच्या अवती भवती रसिक प्रेक्षकांचा गराडा पडला.  जो तो आमचे मन:पूर्वक अभिनंदन करत होता. मी हसून, हात जोडून, विनम्रपणे नमस्कार करून सगळ्यांचे आभार मानत होतो. तरीही माझे सर्व लक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सरांकडेच होते.  ते हा कार्यक्रम संपवून निघून तर नाही ना जाणार ह्याचीच मला काळजी होती.  कारण आज, मला त्यांना कुठल्याही परीस्थित भेटून वीस वर्षांपूर्वीचा तो प्रसंग सांगावयाचा होता.  ते कदाचित विसरले असण्याची शक्यता दाट होती.  कारण रोज एवढे रुग्ण तपासल्यावर आणि त्याच्या उपचार केल्यावर त्यांना थोडेच प्रत्येकाचे नाव आणि चेहरा आठवत असणार.  त्यात ह्या गोष्टीला आज तब्बल वीस वर्षे होऊन गेलेली होती.

आज पुन्हा एकदा वीस वर्षांनी डॉक्टर भोंडवे सरांच्या रूपाने अवतरलेला तो देवदूत माझ्या समोर उभा होता.  ज्याच्या पायावर डोके ठेवून त्याचे पुन्हा एकदा आभार मानायचे होते आणि ते ही सहकुटुंब. अगदी खराखुरा परमेश्वर आज आमच्या समोर उभा होता.  ज्याने बरोबर वीस वर्षांपूर्वी माझ्या बायकोचे मरता मरता प्राण वाचवले होते.  त्यावेळेस जर का तिच्यावर योग्य ते तातडीने उपचार झाले नसते, तर कदाचित आजचा हा प्रसंगही आम्हांला पहायला मिळाला नसता.  त्याचे असे झाले की, डिसेंबर १९९४ मध्ये मी भल्या पहाटे सहा वाजता बायकोला घेऊन, तिची गर्भ तपासणी करण्यासाठी धनकवडीहून सातारा रस्त्याने पुणे शहरात चाललो होतो .  शंकर महाराज मठासमोर आलो असतांना एका लहानशा खड्ड्यातून माझी गाडी गेली आणि त्याच्या हिसक्याने माझी बायको माझ्याच दुचाकीवरून रस्त्यावर पडली.  तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व ती रस्त्यातच बेशुद्ध पडली होती.  पहाटेची वेळ, रस्त्यावर चीट पाखरुही नव्हते.  मी गाडी तशीच सोडून पहिल्यांदा बायकोला रस्त्यामधून बाजूला घेण्याचा प्रयत्न करत होतो.  परंतु ती बेशुद्ध झाल्यामुळे मला एकट्याला तीला उचलता ही येत नव्हते.  काय करावे तेच सुचत नव्हते.  परंतु तेवढ्यात पहाटफेरीला निघालेले एका वयस्कर सद्ग्रहस्तांनी झाला प्रकार पहिला आणि ते लगेचच माझ्या मदतीला धावून आले.  त्यांनी पहिल्यांदा जवळच्या सोसायटीमधील पहारेकऱ्याला बोलावून पाणी मागवले.  आम्हीं तिच्या तोंडावर पाणी मारून पहिले, तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.  तिला कुठेच फारशी मोठी जखम झाली नव्हती.  अगदी थोडेसे नाकाला आणि गुढ्घ्याला खरचटले होते.  परंतु ती बेशुद्ध असल्यामुळे काहीच घडले नाही.  तिला गदा गदा हलवून शुद्धीत आणण्याचा मी निष्फळ प्रयत्न करून पहिला आणि त्यात साधारण पाच मिनिटे गेली.  माझा जीव वर खाली होत होता.  कारण बायकोची काहीच हालचाल होत नव्हती.  ती निपचित पडून होती.  माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती हो.  त्याही स्थितीत मला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि मी त्या काकांना आणि पहारेकऱ्यास माझ्या बायकोजवळ थांबण्याची विनंती केली आणि ताबडतोब माझी दुचाकी उचलून रिक्षा आणायला पळालो.  पहाटेची वेळ त्यातून निर्मनुष्य रस्ता.  एकही रिक्षा दिसेना.  माझे तर प्राण कंठाशी आले होते.  तसाच अर्धा किलोमीटर लांब बालाजीनगर पर्यंत पोहचलो.  एका रिक्षा थांब्यावर काही रिक्षा होत्या पण कोणीही यायला तयार होईना.  शेवटी हातापाया पडून एका रिक्षावाल्याला तयार केले.  माझी दुचाकी तिथेच ठेवली आणि मी त्या रिक्षाने जिथे माझी बायको पडली होती तिथे आलो.  सर्वप्रथम मी त्या काकांचे आणि पहारेकार्यांचे मनोमन आभार मानले आणि त्यांच्या मदतीने बायकोला रिक्षात घातले व तडक बालाजीनगर येथे असलेल्या भोंडवे रुग्णालयात दाखल झालो.  अपघात झाल्यापासून साधारण पंधराव्या मिनिटाला मी बायकोला रुग्णालयात दाखल करू शकलो होतो.  माझे नशीब बलवत्तर होते की काय ! त्यावेळेस डॉक्टर अविनाश भोंडवे स्वत: रुग्णालयातच होते.  त्यांना मी घडलेला सगळा प्रकार काही सेकंदात सांगितला.  त्यांना सांगितले की, मी आम्हीं दुसऱ्या गर्भ तपासणीसाठी पुण्यात चाललो होतो तेंव्हा हा सगळा प्रकार घडला.  तसेही डॉक्टर आम्हांला चांगले ओळखत होते.  कारण बायकोच्या आई-वडिलांचे उपचार त्यांच्या रुग्णालयात झालेले होते.  त्यांना आम्हांला पाच वर्षाची एक मुलगी आहे हे सुद्धा माहिती होते त्यामुळे त्यांनी पुढचा मागचा फारसा विचार न करता बायकोवर त्यांच्यापरीने जेवढे शक्य होतील तेवढे तत्पर उपचार करायला सुरवात केली.  त्यांनी मला एकच सांगितले की मी हे जे काही उपचार करतो आहे त्यामुळे तुमची बायको वाचेल, परंतु तिच्या पोटातील गर्भाची मी कुठलीही शास्वती देऊ शकत नाही.  एखादवेळेस तुम्हांला हा गर्भ पुढे जाऊन काढूनही टाकावा लागेल कारण ह्या औषधांचे दुष्परिणाम ह्या गर्भावर होण्याची खूप जास्त शक्यता आहे.  मी डॉक्टरांनी विनंती केली की काही झाले तरी चालेल पण माझ्या बायकोचे प्राण वाचवा.  भोंडवे सरांनी ताबडतोब डॉक्टर अतुल देशपांडे सरांना बोलावून घेतले व उपचार सुरु केले.  त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन शेवटी माझ्या बायकोचे प्राण वाचले व तिचा जीव धोक्यातून बाहेर आला.  तरीही पुढचे जवळ जवळ तीन दिवस मला बायकोने ओळखले नाही.  डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तिची स्मृती गेली होती.  माझी तर आता बोबडीच वळाली होती.  माझी तर आगीतून उठून फुफाट्यात पडल्या सारखी अवस्था झाली होती.  एकुलती एक लहान पोर घरी एकटी होती.  तिला शेजारी सांभाळत होते.  रुगणालयात बायको अशा अवस्थेमध्ये त्यात तिने मला ओळखले नाही म्हटल्यावर माझ्यावरच तर आकाशच कोसळले होते.  दुसरे काय होऊ शकते ह्याचा विचारच केलेला बरा.  शेवटी डॉक्टरांच्या तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश आले व आम्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला.  साधारण असेच एक आठवडा गेला व नंतर ती हळू हळू बोलू लागली.  तिच्या डोक्याला कुठेही जखम नव्हती, परंतु कवटीच्या आत मेंदुभोवती असलेल्या पाण्याच्या आवरणास धक्का पोचल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम झाला होता.  तिला भेटायला येणाऱ्याला वाटायचे की हिला तर काहीच झालेले नाही, उगाचच एवढी गडबड चालू आहे.  असो.  तिला धड उठून बसताही येत नव्हते की झोपताही येत नव्हते.  फारशी हालचाल केले तरी उलटी झाल्यासारखे व्हायचे, सारखे गरगरायचे.  ह्यावर उपाय म्हणजे जवळ जवळ पाच ते सहा महिने असेच झोपून राहणे आले व आराम करणे आणि वेळेवर औषधे घेणे होते.  ज्यामुळे मेंदुभोवती असलेले पाण्याचे आवरण पुन्हा जाग्यावर येऊन मेंदू नीट काम करायला लागतो.  ह्या सगळ्या दिव्यातून आम्हांला पार पडायचे होते.  पाच वर्षाचे माझे कोकरू, त्याची अवस्था तर विचारू नका.  माझ्या ह्या कोकराने  सुद्धा मला मोठी होऊन मानिसक आधार दिला होता.  तिच्या बोबड्या शब्दांमध्ये जबाबदारीची जाणीव दिसत होती.  तेंव्हा मला समजले की, वेळ आली अथवा पडली की माणसाच्या अंगात कुठून हो बळ येते हेच कळत नाही.  अगदी वयाचाही तिथे विसर पडतो हो.   शेजारी पाजारी आणि जवळच्या काही नातेवाईकांनी आम्हांला त्यांच्या परीने जेवढे शक्य होईल तेवढी मदत केली आणि ह्या अग्निदिव्यातून पार केले.  त्यांचे उपकार तर आम्हीं अजूनही फेडू शकलो नाही आणि शकणार नाही.  ह्या सगळ्यात माझी मुलगी तिच्या आईची नर्स झाली होती.  आईला वेळेवर औषधे देणे.  तिला काही हवे नको असेल तर शेजारच्या काकूंना बोलावून आणणे, इत्यादी सगळी कामे ही पोर एखाद्या पोक्त मुली सारखी करत होती.  अगदी तिचे केस विंचरून देणे इत्यादी कामे ती अगदी प्रेमाने आणि मायेने करत होती.  त्याला कारण ही तसेच होते हो, नियतीने घातलेला हा अजून एक घाव होता आमच्या कुटुंबावर.  नुकतेच सहा महिन्यांपूर्वी बायकोच्या आईचे निधन झालेले होते आणि त्या पाठोपाठ तीनच महिन्यात तिच्या वडिलांचे निधन झाले होते.  हे सगळे होऊन जेमतेम तीन चार महिनेच झाले होते.  एका मागून एक असे धक्के मी, माझी बायको आणि माझी मुलगी सहन करत होतो.  परंतु एकमेकांच्या प्रेमाने आणि मायेने एकजूट होऊन ह्या परिस्थितीस सामोरे जात होतो.  संसाराबद्दल विचार करायला आम्हांला थोडीशी उसंत मिळाली होती.  म्हणून मी आणि बायकोने दुसऱ्या अपत्याचा विचार केला होता.  दैवानेही आमचे म्हणणे ऐकलेही होते. परंतु नियतीच्या मनात आमचे हे सुख हिरावून घ्यायचे ठरलेले होते त्याला आम्हीं तरी काय करणार.  त्यामुळेच की काय नियतीने योजिल्या प्रमाणे आमच्यावर हा अजून एक ताजा घाव घातला होता.  एक मात्र नक्की होते की आम्हीं तिघेही ह्या सगळ्यातून शिकत होतो.  आयुष्य हे खूप कठीण आहे.  ते तुमची रोज परीक्षाच पहात असते.  धैर्याने ह्या सगळ्या प्रसंगांना तोंड द्यायचे असते.  कधीही कुठेही न डगमगता कठीण समयाला सामोरे जायचे असते.  पदोपदी ते आपल्याला खूप काही शिकवून जात असते. अडचणीतून मार्ग कसे काढायचे !  कोण आपले, कोण जवळचे, लांबचे.  कोणावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा वगैरे वगैरे.  असे खूप अनुभव गाठीशी घेऊन ह्या वाईटातूनही खूप काही चांगले घडते हे शिकायला मिळते हे मात्र नक्की.   

ह्या सगळ्या अग्निदिव्यातून आम्हांला सुखरूप बाहेर काढणारे आमचे देवदूत डॉक्टर अविनाश भोंडवे सर ह्या प्रकाशनाच्या निमित्ताने भेटल्यावर माझे आणि बायकोचे आकाशच ठेंगणे झाले.  आम्हीं त्या गर्दीत डॉक्टरांना भेटलो आणि त्यांना आमची ओळख करून दिली.  काही क्षण गेल्यावर त्यांनाही त्या प्रसंगाची आठवण झाली आणि त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.  मग बराच वेळ ते माझा हात हातात घेऊन अगदी भावूक होऊन पत्रकार भवन मधील खुर्चीत बसून होते.  आम्हीं त्यांचे उपकार विसरलो नाही हे ऐकून तर त्यांना खूपच आनंद झाला होता.

काव्यसंग्रहाचे प्रकाशन एकीकडे आणि भावनांचा हा न सावरणारा गोंधळ दुसरीकडे.  ह्या भावनांचे तरंग स्मृतीपटलावर उमटून त्याचे प्रतिबिंबच सारीपटलावर उमटत होते.  रसिक प्रेक्षकांना आणि आसपास जमलेल्यांना मी माझ्या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाने इतका भावूक झालो आहे असेच वाटत होते.  पण खरे तर आमचा देवदूत आज आम्हांला भेटल्याचे भाग्य आमच्या देहबोलीतून प्रतिध्वनित होत होते.  ह्या प्रसंगाला आता जवळ जवळ २३ वर्षे होऊन गेलीत आणि आमच्या सुखी, समाधानी आणि सदृढ संसाराला ३० वर्षे बघता बघता झालीत.  नियतीच्या ह्या रेट्यापुढे आमचा संसार चौकोनी होण्याच्या ऐवजी त्रीकोणीच राहिला एवढेच काय ते शल्य.  तरीही काही प्रसंग, चांगल्या-वाईट आठवणी आपल्या काळजावर कोरलेल्या जातात.  त्या जेव्हा केंव्हा आठवतात ना तेंव्हा मला काय वाटते......

कधी स्वतःवर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले |
इतकी आसवे, आज ओघळीत की, आसवांनाही रडू आले ||
 
रविंद्र कामठे

Saturday 26 August 2017

जेष्ठ अभिनेत्री आशाताई काळे आणि जेष्ठ संशोधक व लेखक सोनावणी सर भेट



 
जेष्ठ अभिनेत्री आशाताई काळे आणि जेष्ठ संशोधक व लेखक सोनावणी सर भेट
 
मराठी चित्रपट सृष्टीच्या जेष्ठ आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती आशाताई काळे ह्यांनी आज जेष्ठ संशोधक आणि लेखक श्री. संजय सोनावणी ह्यांच्या लिखणाने प्रभावीत होवून त्यांची भेट घेण्याचे योजिले होते.  त्यासाठी त्यांनी चपराक प्रकाशनचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील ह्यांना विनंती करून ही भेट घडवण्यास सांगितले होते.  योगायोगाने मी ही आज चपराकच्या कार्यालयात घनश्यामसरांना भेटावयास गेलो होतो तेंव्हा त्यांनी मलाही ह्या अविस्मरणीय भेटीसाठी येण्याची संधी दिली आणि मी खरोखरच कृतकृत्य झालो.  श्री. संजय सोनावणी, श्रीमती आशाताई काळे आणि श्री. घनश्याम पाटील तसेच डॉक्टर प्रकाश आणि सरिता जोगळेकर ह्यांच्या सारख्या दिग्गजांची भेट होऊन त्यांच्या बरोबर अखंड तीन तास गप्पा मारायला मिळणे म्हणजे माझ्यासारख्या नवोदितास, कलेची आणि साहित्याची मेजवानीच होती हो.  योगायोग म्हणजे काय तर कालच माझा तारखेनुसार ५४वा वाढदिवस होता आणि आज तिथीनेही होता.  त्यात मला मिळालेली ही सुवर्ण संधीच म्हणावयास हवी हो.  म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असेच काहीसे झाले होते माझे.
 
तीन तास मी सोनावणी सर आणि आशाताईना मन लावून ऐकत होतो.  आशाताईंचे प्रगल्भ वाचन आणि स्मरणशक्ती मला अचंबित करून टाकत होती.  तर त्यांच्या ह्या गप्पांमुळे मला सोनवणी सरांच्या अभूतपूर्व साहित्य प्रतिभेची ओळख झाली.  इतके प्रचंड म्हणजे जवळ जवळ ८०च्या वर कादंबऱ्या आणि तितकेच विविध विषयातील लिखाण करून प्रसिद्ध असलेला हा आसामी आणि तितक्याच ताकदीच्या अभिनेत्री,  कुठेही गर्वाचा आणि अहंकाराचा स्पर्श न होऊ देता मनमोकळ्या गप्पा मारत होते ते पाहून मी फक्त आणि फक्त श्रवण भक्तीच करून स्वत:ला भाग्यवान समजत होतो.  ह्या साठी मी घनश्याम पाटील सरांचा आयुष्यभर ऋणी राहणार आहे. अहो वयाच्या ५४व्या वर्षी, थोडेफार लिखाण करून स्वत:ला साहित्य क्षेत्रामध्ये काही योगदान देण्याच्या विचाराने प्रभावित झालेला मी त्याला अजून काय हवे आहे हो.  माझ्या एवढा नशीबवान ह्या जगात दुसरा कोणी असूच शकत नाही असे मला वाटणे स्वाभाविकच आहे.  खूप काही शिकायला मिळाले मला आज ह्या भेटीतून.  त्यात अजून एक संधी म्हणजे मला आशाताई आणि डॉक्टर श्री. व सौ. जोगळेकर ह्यांना माझा प्रांजळ हा काव्यसंग्रह भेट देता आला.  आशाताईंना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेता आले.  अगदी सद्गतीत व्हायला झाले होते, जसे काही माझ्या आईनेच मला माझ्या वाढदिवसाचा आशीर्वाद दिला आहे असेच वाटले.  थोडेसे भावूक व्हायला झाले होते. अशी ही प्रतिभावंत माणसे किती मोठ्या मनाची आणि साधी असतात हे ही जाणवले.  उगाच बढाया मारत नाहीत आणि गर्वाचा लवलेशही त्यांच्या गावी नसतो हे मला तरी अगदी प्रकर्षाने जाणवले.  मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मी चपराकचा सन्माननीय सदस्य आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे.
 
माझा आजचा हा दिवस खास करून आयुष्यभर लक्षात राहील असा केल्याबद्दल मी आशाताई, सोनावणी सर, घनश्याम सर, डॉक्टर श्री. व सौ. जोगळेकर ह्याचा आभारी आणि ऋणी आहे.

Thursday 24 August 2017

गणपती बाप्पा मोरया



नमस्कार मंडळी,

आज २५ ऑगस्ट २०१७, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी अगदी जल्लोषात आगमन झाले आणि वातावरण कसे प्रफुल्लीत झाले आहे.  माझे मन तर हर्षोल्हासीत झाले आहे हो.  त्याला कारणही तसेच आहे हो.  आज की नाही माझा वाढदिवस आहे.  आज मला ५४ पूर्ण होवून ५५वे वर्ष लागले आणि काय योगायोग आहे बघा ना,  माझ्या वाढदिवशी माझ्या आराध्य दैवतेचे म्हणजे, गणरायाचे आज आगमनही झाले आहे.  हा म्हणजे माझ्या आयुष्यातील दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. 

आम्ही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाची प्राणप्रतिस्थापना करतो.  १ १/२ दिवसांनी ह्या शाडूमातीच्या मूर्तीचे बादलीत विसर्जन करतो.  साधारण ८ एक दिवसांमध्ये ही मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळली की पुन्हा त्याची मूर्ती घडवतो.  गेले तीन वर्षे मी पर्यावरण पूरक शाडूमाती वापरून गणेशाची मूर्ती घडवतो व रंगवतो आहे आणि मला हा एक छंदच लागला आहे.   त्यामुळे एक तर मन खूप प्रसन्नही होते आणि पर्यावरण जपण्यास आपलाही खारीचा वाटा दिल्याचा आनंद मिळतो.

१४ विद्या आणि ६४ कलांचा हा अधिपती,  गणपती ज्याची मनोभावे सेवा करण्याची ही संधी म्हणजे एक पर्वणीच असते हो.  कलेच्या ह्या अधिपतीला आपल्याही अंगातील कलागुणांचा नैवेद्य दाखवण्याची मला एक सुप्त इच्छा झाली होती.  त्या संकल्पनेतून मला वाटले की ह्या वर्षी आपण बाप्पाला आपली कला समर्पित करायची आणि त्याचा आशीर्वाद घ्यायचा.  अहो असा नुसता विचार मनात यायला आणि एक एक करून काही कल्पना डोक्यात घोळायला लागल्या.  त्यातूनच मला असे वाटले की आजवर मी प्रकाशित केलेले चार काव्यसंग्रह उ.दा. प्रतिबिंब”, “तरंग मनाचे”, “ओंजळ”, “प्रांजळतसेच शेतकरी साहित्य संमेलनात प्रकाशित झालेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह कणसातली माणसेव गेले काही महिने मी सातत्याने लिखाण करत असलेले चपराक प्रकाशनचेसाप्ताहिक, मासिक आणि दिवाळी अंक, अशा साहित्याचीच आरासच आपण बाप्पासमोर करून बुद्धीच्या ह्या दैवताला एक साहित्यिक मेजवानी देवूयात की !  झाले तर मग काय विचारता,  अक्षरशः काही वेळातच माझी ही आरास पूर्ण झाली आणि मन कसे समाधानाने भरून पावले.  ही आरास करतांना मनात एक विचार आला की आपली आर्थिक आणि बौद्धिक संजीवनी म्हणजे अर्थातमी नोकरी करत असलेली माझी संस्था “VINSYS” आणि माझे प्रकाशित साहित्य ह्या दोन्ही गोष्टी गणपती बाप्पाला समर्पित करायचे, बास बाकी काही नाही.  कलेच्या ह्या अधिपती समोर गणेशोत्सवानिम्मित आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची ही एक सुयोग्य प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि माझ्यासारख्या नवोदित कलाकारासाठी तर ही एक नामी संधी आहे असे म्हणावे हवे तर.  ह्याच प्रथेमुळे माझ्या ह्या अशा आगळ्या वेगळ्या समर्पणातून मला आज माझ्या वाढदिवसा निमित्त अगदी कृतकृत्य झाल्याचा जो काही आनंद मिळतो आहे, त्यात मला तुम्हांलाही सहभागी करून घेण्याची अभिलाषा होती म्हणून हा संदेश आणि सोबत ह्या संकल्पनेचे छायाचित्र देत आहे.  गणपती घडवतांना मला एका म्हणीची आठवण झाली, ती म्हणजे “करायला गेलो गणपती पण झाला मारुती”.  पण माझ्या अनुभवावरून सांगतो की जर का तुम्हीं मनोभावे गणपतीची मूर्ती घडवायला घेतलीत ना तर, कितीही प्रयत्न केलात ना तरी आपल्या हातून गणपतीचा मारुती होत नाही.  तुम्हांला ह्याची प्रचीती सोबत जोडलेल्या छायाचीत्रामधील गणपतीच्या मूर्तीकडे पाहून येईल.  ही मूर्ती घडवतांना एकाग्र चित्ताने मी शाडू मातीला आकार देत होतो आणि माझ्याही नकळत ती माती गणपतीचा आकार घेत होती.  ही अगाध किमया आहे हो ह्या आपल्या आराध्यदैवतेची.  मी हा अनुभव घेतला आहे तुम्हीं ही घेऊन पहा.  मला खात्री आहे की तुम्हांला ही संकल्पना आवडेल. 

|| गजानना श्री गणराया ||
रूप तुझे पाहता, भरून येई लोचना
करतो मनोभावे तुझी प्रार्थना ||
चतुर्भूज तुझी मूर्ती लोभस,
सदैव भासे आम्हां ती सालस ||
तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता,
तूच विश्वाचा करता करविता ||
पोटात घालीशी पाप आमचे सारे,
आशिष देऊनी संकट तू निवारे ||
ओवाळीता तुज आरती मन होई प्रसन्न,
चित्त तुझ्या ठायी होऊन जाई तल्लीन ||
तुझ्या चरणी टेकता माथा,
निवारण करतोस सगळ्या व्यथा ||
प्रार्थना तुझी नाही जात कधी वाया,
मन मंदिरात आमच्या तुझीच असते छाया ||
गजानना श्री गणराया, गजानना श्री गणराया,
बाप्पा मोरया, बाप्पा मोरया ||
गणपती बाप्पा मोरया

 
रविंद्र कामठे,

९८२२४०४३३० 

 

Monday 14 August 2017

भावना उच्च शिक्षणाच्या प्रवासाची

भावना उच्च शिक्षणाच्या प्रवासाची

उच्च शिक्षणासाठी आपली एकुलती एक लेक जेंव्हा अमेरिकेला जाणार असते ना, तेंव्हा तिच्या आई बाबांच्या मनोवस्थेचे जर का वर्णन करायचे असेल तर, “ आपले कोकरू आपणहून वाघाच्या गुहते सोडले  आहे की कायअसेच काहीसे त्यांना वाटत असावे.  असे मला तरी आज माझ्या लाडक्या भाचीच्या ट्रंका भरतांना जाणवले.  मनाची द्विधा अवस्था काय असते ते अगदी जवळून पाहतांना माझ्याही मनाची स्थिती थोडीशी हळवी तर झालीच होती पण अशा वेळेस सगळ्यांनीच हळवे आणि भावून होऊन चालत नाही हो असे वाटले.  २२-२३ वर्षे डोळ्यात तेल घालून जपलेले आणि वाढवलेले आपलं हे बछड साता समुद्रापलीकडे दूर ज्या देशात जाणार आहे तिथे तिला काही दिवस का होईना घराच्या सारखे अन्न मिळावे म्हणून जीवाचा आटापिटा करून गेले एक महिनाभर धडपड करून तिच्या आवडीचे तयार केलेले आणि काही विकत आणलेले पदार्थ जेंव्हा आपण ह्या ट्रंका मध्ये भरतो आणि वजन करायला गेल्यावर कळते की, एक ट्रंक २३ किलो ऐवजी ती ३० किलो आणि दसरी २७ किलोची झाली आहे.  मग जो काही गोंधळ, चर्चा, वाद विवाद सुरु होतात ना तो विचारूच नका.  २३ किलोच्या दोन ट्रंका न्यायची परवानगी आहे.  त्यात वस्तीविक पाहता थोडे कपडे, तिकडे भारतीय पद्धतीने स्वयंपाक करून खाण्यासाठी लागणारी काही निवडक भांडी, मसाले, पीठं, कडधान्य , जरुरी कागदपत्रे आणि खाद्यपदार्थ  इत्यादी नेणे जरुरी असतांना, भावनेच्या पोटी आपण ह्या ट्रंकामध्ये जरुरी सामना ऐवजी अनावश्यक खाद्यपदार्थांचीच भरती केलेली असते आणि त्यामुळे वजन वाढले आहे व त्यातून काही सामान काढावे लागणार आहे हे कळल्यावर तर मुलीच्या आईचा जीव जो काही कावरा बावरा होता व डोळ्यातून गंगा जमुना वाहायला लागतात तेंव्हा मात्र आपलेही आतडे तुटते हो.  शेवटी आई ती आईच.  तिला कसे समजवायचे हो की ती काही जंगलात किंवा दुष्काळी भागात नाही चालली आहे.  न राहवून मी शेवटी भ्रमणध्वनीचा वापर करून माझ्या एअर इंडिया मध्ये काम करण्याऱ्या एका जवळच्या मित्राला फोन करून परदेशी शिक्षणासाठीच्या प्रवासाला योग्य आणि जरुरी असणारे सामान व त्याबद्दलची इतम्भूत माहिती घेतो आणि माझाही जीव थोडासा शांत होतो.

प्रवास तर आपण सगळे नेहमीच करत असतो.  वरचेवर ट्रंकाही भारत असतो.  परंतु दोन तीन वर्षांसाठी आपले एकुलते एक लेकरू आपल्यापासून सातासमुद्रापलीकडे शिक्षणासाठी जाणार आहे म्हटल्यावर आईबापाचा प्राण कंठाशी येणे काय असते ते मला जाणवत होते. वजनाचा काटा हातात धरलेला असतो.  त्यावर मनाची अवस्था इतकी दोलायमान झालेली असते की २५ किलो वजनाची ट्रंक अंगातल्या थरथरी मुळे कधी २८ तर कधी ३० किलो वजन दाखवते.  त्यामुळे बापाच्या मनाची झालेली केविलवाणी अवस्था, विमान कंपनीला मनापासून घातलेल्या शिव्यांची लोखोली तर काय विचारूच नका.  अनुभवातून कोणी काही सुचवले तरी त्यावर लगेचच विश्वास ठेवण्याची मनस्थितीच नसते हो, अशा वेळी हे मात्र खरे.

दोन दोन तीन तीन महिने तयारी करूनही, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काहीतरी राहिले की काय असेच वाटत राहते.  भेटायला येणारे नातेवाईक, मित्र मंडळी आणि आधीच पलीकडे गेलेले मित्र, असे सगळे मिळून आपल्या भावनांचा जो काही गोंधळ करतात ना तो म्हणजे एक खमंग चिवडाच म्हणावा लागेल.  म्हटले तर तो चवदार असतो आणि त्यात तो आसवांच्या भरीने थोडासा खारटही होतो.  सूचनांची यादीची शेपूट लंकेतल्या हनुमानाच्या शेपटी सारखी वाढतच जाते.  एकार्थाने हे चांगले पण असते आणि हवेहावेसेही वाटते.  पण कधी कधी ते मात्र गोंधळात अजूनच भर पाडते.  दोष कोणाचाच नसतो.  हा खेळ फक्त आणि फक्त भावनांचा असतो.  ऋणानुबंधांचा असतो.  अगदी ओक अकादमीच्या पुस्तकात जरी हे सगळे लिहिलेले असले तरी, भावनेपुढे ह्या पुस्तकाचे काही चालतच नाही.  अर्थात शेवटी त्याच प्रमाणे जावे लागते हे ही तितकेच खरे आहे.  व्यवस्थापनाचे आपण घेतलेले सगळे धडे ह्या प्रवासाच्या आधीच्या रात्री मात्र अजिबात उपयोगी पडत नाही ह्याचे प्रत्यंतर आल्याशिवाय रहात नाही.  कारण जसजशी संध्याकाळ होऊन रात्र जवळ येवू लागते तेंव्हा भूकही लागत नाही.  पोट रिकामे असले तरी ते भरल्यासारखेच वाटते.  नको म्हणायला एखाद दुसरा चहाचा डोस मात्र ह्या ट्रंका भरण्यासाठीचा जोर अंगात निर्माण करतो.  त्यामधील सामान एका ट्रंके मधून दुसऱ्या ट्रंकेट टाकणे आणि परत परत वजन करणे आणि ते २५ किलोच्या आत आणणे म्हणजे एक दिव्यच वाटायला लागते.  त्यात ट्रंकेचा आकार सुद्धा एवढा मोठा वाट्याला लागतो आणि त्यात भरलेले सामान म्हणजे वाटीत चमचा असेच भासायला लागते.  विमान कंपन्यांनी हे कसले वजनाचे नियम केलेत असे म्हणत म्हणत आपण दोन्ही ट्रंका २५ किलोच्या आत आणतो.  त्याचे कारणही तसेच असते हो, विमानतळावर जर का काही सामान वजन जास्त झाल्यामुळे काढायला लागले तर पोरीचा वेळही जाईल आणि आपल्या जीवाला उगाचच घोर लागून रहायचा.  ह्या आणि अशा अजून किती तरी विचारांचा शेवटी आपल्या ह्या सद्गतीत भावनानंवर विजय होतो.

मी हा सगळा अनुभव ह्याची देही ह्याची डोळा घेत होतो.  मी ही अगदी अंत:करणापासून माझा भाचीच्या परदेश वारीच्या उपक्रमात सहभागी झालो होतो.   माझ्या डोळ्यांच्या कडा अधून मधून पाणावत होत्या.  त्या मी सगळ्यांच्या नकळत हलकेच पुसून परत त्यांना हातभार लावत होतो.  मला तर दीड वर्षापूर्वी माझ्या एकुलत्याएक मुलीला लग्नानंतर सासरी पाठवण्याच्या त्या क्षणाची आठवण झाली आणि डोळे भरून आलेअगदी तेच भाव मला माझ्या बहिणीच्या आणि मेव्हण्याच्या मनात डोकावल्यावर जाणवत होते.  फक्त फरक एवढाच होता ही त्यांची पोर आज उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला निघाली होती आणि कमीत कमी दोन वर्षे तरी भेटणार नव्हती. 

सरते शेवटी आम्हीं २५ किल्याच्या दोन ट्रंका, १४-१५ किलोची एक छोटी ब्याग आणि तिची संगणकाची एक छोटी स्याक असे चार नाग तयार करून दिवाण खोलीतील एका कोपऱ्यात ठवतो ना तेंव्हा मात्र इतकी दमणूक झालेली असली तरी एका डोळ्यात आन्दाश्रू आणि दुसऱ्यात विरहाश्रू तरळून जातात.  कोणीही कोणाच्या नजरेला नजर भिडवण्याच्या फंदात पडत नाही.  उगाचच इकडचे तिकडचे विषय काढून अर्थहीन संभाषण चालू होते. लेकीच्या आयुष्याची घडी बसवायचे पाहिलेले हे स्वप्न प्रत्यक्षात आलेले पाहून एक समाधानाचे हास्य आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटते आणि आम्हीं सगळे एक ठराव करतो की उद्या घरातून निघतांना आणि विमानतळावर निरोप देतांना कोणीही डोळ्यात पाणी येऊ देणार नाही.

दुसऱ्या दिवशी आम्हीं सगळी जय्यत तयारी करून मुंबईला विमानतळावर जाण्यासाठी प्रयाण करतो.  वाटेत माझ्या बहिणीला तिच्या मामे बहिणीचा दूरध्वनी येतो आणि ती सांगते की ती आणि तिचा नवरा दोघेही विमानतळावर येत आहेत साधारण रात्रीच्या दहा पर्यंत ते पोहोचतील.  तरीही कृपया मुलीला विमानतळाच्या मुख्य प्रवेशदारातून आत पाठवण्याची घाई करू नकोस, कारण तिचा नवरा British Airways मध्ये असून तो तिला तिच्या सामानासहित अगदी सही सलामत विमानात बसवून देण्याची व्यवस्था करतो आहे.  मध्यरात्री १.४५ मिनिटांनी तिचे विमान उडणार आहे त्यामुळे आम्हीं ह्या एका दूरध्वनीमुळे निश्चिंत झालो होतो.  एकदाचे सगळे काही व्यवस्थित झाले आणि आमचा जीव भांड्यात पडला आणि पोरगी विमानात बसून पुढील प्रवासास निघून गेली.  मनोमन मी माझ्या बहिणीच्या मामे बहिणीला आणि तिच्या नवऱ्याचे जेवढे शक्य होतील तेवढे आभार मानले.  नकळत आपल्या पाठीमागे उभ्या असलेल्या त्या अदृश्य शक्तीला माझे मन एक साष्टांग नमस्कार करून गेले.  इतक्या धावपळीच्या आयुष्यातही आपल्या माणसासाठी वेळात वेळ काढून त्यांनी केलेली ही मदत खूपच मोलाची होती तसेच इतक्या वर्षांचे ते ऋणानुबंध घट्ट करणारी होती. 
 
मला अजून एका गोष्टीची खात्री झाली की आपली माणसं जेंव्हा जेंव्हा आपल्या पासून कुठल्याही कारणाने दूर जातात ना तेंव्हा तेंव्हा डोळे भरून हे येतातच.  मनाला आपले हे ठराव वगैरे काही कळत नसते आणि ते कोणाचे ऐकतही नसते हेच खरे.

रविंद्र कामठे,
९८२२४०४३३०  


Thursday 3 August 2017

महाराष्ट्राचे दार्जीलिंग “महाबळेश्वर”




 
 
महाराष्ट्राचे दार्जीलिंग “महाबळेश्वर”

आपल्या महाराष्ट्राचे दार्जीलिंग म्हणजे “महाबळेश्वर असे म्हंटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. त्यात तुम्हीं जर का ऐन पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलात ना, तर ह्याची अनुभूती तुम्हांला नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही.  स्वर्ग काय असतो, हे जर का अनुभवायचे असेल ना तर ह्या अशा रिमझिम पावसात महाबळेश्वरला एकदातरी जायलाच हवे हो !  मी आजवर वेगवेगळ्या ऋतुंमध्ये महाबळेश्वरला गेलेलो आहे,  पण महाबळेश्वरचे स्वर्गीय सुख व निसर्गाचा अदभूत आणि नयनरम्य अविष्कार जर का अनुभवायचा असेल ना तर, जुलै महिन्याच्या पावसाळ्यात एकदा तरी महाबळेश्वरला भेट द्यायलाच हवी.  इतर वेळेस माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहणारं हे गावं, ह्या सर्द हवेत एखाद्या दुलईत गुरफटून शांत पहुडलेले आहे असे वाटते.  अगदी तुरळक माणसांची गर्दी असते पाहायला मिळते.  त्यात माझ्यासारखे काही निसर्गप्रेमी फिरायला आलेले असतात.  श्रावणातला उनपावसाचा अद्द्वितीय असा खेळ चालू असतो.  वेण्णा लेक कसा ओथंबून वाहत असतो.  त्यावर ढगांची एक मखमली चादर ओढलेली असते,  जशी काही सखा / सखी एकमेकांच्या प्रेमात अगदी नखशीकांत बुडून गेले आहेत असे भासते.  त्यात जर का तुम्हीं ह्या रिमझिम पावसांच्या सरीत, जेथून आपण नेहमी नयनरम्य सूर्यास्त पाहतो, त्या ठिकाणी जर गेलात व तेथे तुम्हीं सोडून दुसरे कोणीही नाही आहे आणि ह्या अशा कुंद आणि धुंद वातावरणात जर का तुम्हांला थर्मास मधून आणलेला गरम गरम चहा पिण्याचा योग लाभला ना तर, तुमच्यासारखा नशीबवान माणूस ह्या पृथ्वीतलावर शोधून सापडणार नाही ह्याची मी तुम्हांला खात्री देतो.  कारण हा अनुभव मी नुकताच घेऊन आलो आहे म्हणून सांगतो.  वेड, वेडं लागतं हो.  आपण आपल्यालाच हरवून बसतो.  काही म्हणजे काहीच, अगदी कविता काय लेख काय, काही काही सुचत नाही.  फक्त डोळे मिटून शांतपणे अनुभवायचा असतो तो, तिथल्या पायरीवर बसून प्रतापगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून येणारा तो हवेतला अल्हाददायक गारवा.  शेवाळलेली झाडे, भिजून भिजून चिंब झालेली ती लाल माती, आणि एक अदभूत अशी निरव शांतंता.  हे सगळे इतके हवेहवेसे वाटते की आपण वातावरणातल्या ह्या सुमधुर नैसर्गिक संगीताचा आस्वाद घेत एक एक क्षण खोल खोल काळजात साठवून ठेवत जोतो.   येथून आपले पाय निघतच नाहीत आणि मला माझ्या “ओंजळ” ह्या काव्यसंग्रहामधील बरसती सरीवर सरी, ही कविता आठवते...


बरसती सरी वर सरी...
छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

उसळले चैतन्य भुवनी
थुई थुई नाचे मोर-मयुरी |
कुहू कुहू कोकिळा गाती
पाखरे गगनी विहारी |
सावळ्या नभी वाजती  
हरीची मंजुळ बासुरी ||

छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

उघडूनी कवाडे मनाची
मेघ वर्षाव करी |
उधळूनी सप्तरंग धनुचे
भास्करही रास करी |
टप टप बरसुनी धारांनी
फुलविले नंदनवन भूवरी |

छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

शमली तप्त ही धरिणी
अंकुरली बीजे ही उरी |
नटली जशी हिरवाईने
लेउनिया शालू भरजरी |
झुळू झुळू वाहती
झरे डोंगर दरी |

छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

मोहरली कळी अन कळी
बाग फुलांनी बहरी |
रुणुझुणु रुणुझुणु गाती
भ्रमर ही फुलांपरी |
सळ सळे आज
आनंदी आनंद चराचरी |
छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||
 
ह्या आठवणी साठवत मी Mapro कडे मोर्चा वळवतो.  तेथे ग्रील संद्वीचवर येथेच्छ ताव मारतो आणि स्त्राबेरी आईस्क्रीम खाऊन मन तृप्त करून वर्षभराची उर्जा साठवून घेतो.

जाता जाता माझा मोर्चा आता पुस्तकाचं गावं कडे माझ्याही नकळत वळतो आणि मी मग पाचगणी जवळील भिलारवाडी ह्या “पुस्तकाचं गावं” ला भेट देतो.  “चपराक” प्रकाशनने नुकताच प्रकाशित केलेला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहाच्या पाच प्रती श्री. बालाजी हळदे ह्याच्याकडे सुपूर्द करतांना मला कोण आनंद होतो म्हणून सांगू.  माझा आनंद गगनात मावत नाही. शेवटी वाईच्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतो आणि त्याला विनंती करतो की मला ह्या रोजच्या धकधकीच्या जीवनात झुंजण्याचे बळ दे रे ‘महाराजा’.

 
माझा आवडत्या किशोर कुमारचे,
रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन
भिगे आज इस मौसम मै
लगी कैसी ये अगन....हे गाणे गुणगुणतच मी तल्लीन होऊन गाडी चालवत रहातो आणि त्याच तंद्रीत कधी घरी पोचतो तेच कळत नाही.     

 

रविंद्र कामठे,
९८२२४०४३३०