अनुभवाच्या शिदोरीतून – प्रकाशन
माझ्या पहिल्या काव्यसंग्रह “प्रतिबिंब”चे
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०१३ हा दिवस माझ्या आयुष्यातील एक
अविस्मरणीय असा दिवस ! त्या दिवशी माझ्या प्रांजळ भावनांचे प्रतिबिंब मनाच्या
ओंजळीतून ओसंडून वाहत होते. वयाची पन्नाशी गाठलेला मी; आयुष्याच्या एका वेगळ्याच
वळणावर येवून पोचलो होतो. मला वाटायला लागले की; वर्षे पन्नास आयुष्याची माझ्या सरली, चाहूल मजला
हलकेच सरणाची लागली! मन अगदी भारावलेल्या अवस्थेत
होते. माझे कुटुंब तर माझी ही पन्नाशी एकदम जोमात
साजरी करण्याच्या तयारीत होते. सकाळीच घरच्यांनी माझी
पन्नास दिव्यांनी ओवाळणी करता करता माझ्यावर फुलांचा वर्षाव करून मला अजून भावूक
करून टाकले होते. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मला
मात्र कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होते. माझ्या
साहित्यक्षेत्राच्या वाटचालीचा हा शुभारंभच होता हे आज ५ वर्षानंतर नमूद करतांना
मला खूप अभिमान वाटतो आहे.
त्या क्षणाला मला माझ्या कैलासवासी वडिलांची आठवण मनाला सारखी
डिवचत होती. आज ते जर असते तर, त्यांना किती कौतुक वाटले असते
माझे ! माझ्या कर्तृत्वाचा त्यांना खूप अभिमान होता,
हे मी त्यांच्या नकळत कित्येक वेळेस त्यांच्याच तोंडून, त्यांच्याच मित्रमंडळीकडे माझे कौतुक करतांना ऐकलेले होते. आजही मला ते आठवले तरी माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी “प्रतिबिंब”
हा माझा पहिला काव्यसंग्रह त्यांना अर्पण करण्याचे योजले होते.
मला जसे सुचले तसे मी हे अनुभव शब्दबद्ध करत गेलो. ह्या आठवणींचा पगडा
माझ्यावर इतका भारी होता की, हे अनुभव कागदावर टिपता टिपता
माझ्याही नकळत ह्या भावनांना काव्यात्मक रूप कधी येवू लागले हेच मला उमजले नाही.
हाच तो माझा पहिला वहिला ८७ कविता असलेला “शब्दसंग्रह”
ज्याची पहिली आवृत्ती मी २३ मे २०१३ रोजी माझ्या बायकोला आमच्या
लग्नाच्या २६व्या वाढदिवसानिम्मित, माझ्या आईच्या हस्ते भेट
दिली होती. अगदी घरातल्या घरात एक लहानसा
प्रकाशन सोहळा करून आम्हीं तो क्षण आमच्या स्मृतीत जतन करून ठेवला आहे.
त्यावेळेस माझ्या “आमचे गुरु सदन” ह्या कवितेच्या पोस्टरचे मातोश्रींच्या हस्ते अनावरण करून आम्हीं आमचा
आनंद द्विगुणीत केला होता. ह्या धांदलीत, कळत नकळत मी मात्र स्वत:ला कवी समजू लागलो होतो हे आत्ता ह्या क्षणी
लिहितांना अतिशय प्रामाणिकपणे कबूल करतो.
माझ्या ह्या प्रतीभाशक्तीवर माझ्या घरातल्या कोणाचा खरोखर
विश्वासच बसत नव्हता. पण एक आहे की माझ्या ह्या प्रांजळ प्रयत्नास सर्वांनी मनापासून दाद देवून
मला उत्तेजनच दिले व त्याचे रुपांतर शेवटी १३३ कवितांचा “प्रतिबिंब”
माझा शब्दसंग्रह ह्या दुसऱ्या आवृत्तीत झाले. मीच काय पण घरातले सगळे आणि जवळचे काही मित्र माझ्या ह्या पहिल्या
काव्यसंग्रहाच्या प्रकाशनच्या कामाला लागले होते व त्यात आंम्हाला निश्चितच
अपेक्षित यशही आले होते.
ऑगस्ट मध्येच, म्हणजे माझ्या पन्नाशीला हे प्रकाशन करायचे पक्के करून एका दगडात दोन
पक्षी मारले होते. अर्थात हा प्रकाशन सोहळा नसून एक
कौटुंबिक सोहळाच होता हे ही तितकेच खरं होते. २५ ऑगस्ट
२०१३, तारीख निश्चित असल्यामुळे सर्वात आधी कोथरूड मधील
ईशदान सोसायटीचे सभागृह ठरवण्यात आले. पन्नाशी व
प्रकाशन कार्यक्रम संध्याकाळी करण्याचे योजल्यामुळे चक्क १७५-२०० लोकांसाठी
जेवणाचा बेतही ठरवला गेला. संपूर्ण कार्यक्रमाची अतिशय
काटेकोरपणे रूपरेषा आखण्यात आली होती. एकाच आठवड्यात एका
मित्राने शब्दांजली प्रकाशन बरोबर प्रकाशनाचा करार करून दिला व मंडळी जोमाने
कामाला लागली होती.
त्या दिवशी ठीक ७ वाजता माझ्या पन्नाशीनिम्मित, मुलीने खास बनवून घेतेलेला,
भलाथोरला तीनमजली केक कापण्यात आला व त्यानंतर लगेचच तासाभराचा
प्रकाशन सोहळा सुरु करण्यात आला. सभागृहात उपस्थित
असलेल्या माझ्या नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन आहे, हा मात्र एक अतिशय सुखद असा धक्का होता. कारण
माझ्या घरच्यांनी त्यांना फक्त माझ्या पन्नाशीनिम्मितच बोलावणे केले होते व
काव्यसंग्रहाचे प्रकाशन गुलदस्त्यातच ठेवले होते हे विशेष. प्रास्ताविक झाल्यानंतर, माझ्या दोन मित्रांनी, ज्यांची माझ्या ह्या पुस्तकास प्रस्तावना लाभली होती, त्यांनी समारंभाला साजेशी भाषणे करून ह्या कौटुंबिक सोहळ्यास एकदम
साहित्यिक रंगत आणली होती. माझ्या आईच्या हस्तेच
ह्या ही आवृतीचे प्रकाशन करण्यात आले. आश्चर्याची
गोष्ट म्हणजे माझ्या आईने वयाच्या ७५व्या वर्षी स्वत:च्या हस्ताक्षरात भाषण लिहून
आणलेले होते. प्रकाशन झाल्यावर ह्या माउलीने इतक्यावेळ
आपल्या पदराआड दडवलेले ते भाषण काढले व ती ते वाचण्याची इच्छा व्यक्त केली.
तिला वयोमानाने ते जमले नाही म्हणून माझ्या धाकट्या बहिणीने ते
वाचून दाखवल्यावर उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रियेने माझ्यातर भावनांनी
कधीच बांध ओलांडले होते.
इतके सगळे झाल्यानंतर मला बोलावयास सांगितल्यावर मी जेंव्हा समोर
बसलेल्या माझ्या गोतावळ्याकडे एक नजर टाकली,
तेंव्हा कौतुकाने भरून आलेले त्यांचे डोळे पाहून; मला लिहून आणलेले भाषण सुद्धा दिसेनासे झाले होते. आजही आत्ता हे लिहितांनाही तो प्रसंग डोळ्यासमोर आला तरी अजूनही डोळे
पाणावतात हो ! एक नजर मी छताकडे पहिले आणि माझ्या
वडिलांच्या स्मृतीस अभिवादन करून कसे बसे माझे ते औपचारिक भाषण संपवले व खिशातल्या
रुमालाला न लाजता न डगमगता हात घालून हलकेच अनावर झालेल्या भावनांनी पाझरलेले डोळे
पुसले. आजही ह्या सोहळ्याची चित्रफित पाहतांना मला गहिवरून येते, हेच काय ते ह्या सोहळ्याचे फलित म्हणावयास हवे !
ह्या प्रकाशन सोहळ्यासाठी माझ्या कुटुंबाने आणि काही जवळच्या
मित्रांनी खूप खस्ता खाल्ल्या होत्या.
त्यासाठी अक्षरश: महिनाभर आधी दिवस रात्र खपून त्याचे व्यवस्थित
नियोजन केले होते. नारायण पेठेतील मुद्रकांनी
प्रकाशकाच्या हातात २३ तारखेला सर्व १००० प्रती ठेवून त्यांचा शब्द पाळला होता.
सगळ्यात मोठ्ठी गमंत म्हणजे सातारा आकाशवाणीवर निवेदक म्हणून
कार्यरत असलेल्या मित्राने, त्याच्या धीरगंभीर आवाजात ह्या
काव्यसंग्रहातील दहा कविता रेकॉर्ड करून आणल्या होत्या व त्यावर पुण्यातल्या
मित्राने एक उत्कृष्ट कलाकुसर करून अप्रतिम ध्वनीचित्रफित तयार केली होती.
ती २० मिनिटांची ध्वनीचित्रफित ह्या प्रकाशन सोहळ्यात दाखवल्यावर तर
उपस्थित अवाकच झालेले होते. समारंभाचे सूत्रसंचलन निवेदक
मित्राने त्याच्या प्रतिभेला साजेसे करून ह्या घरगुती कार्यक्रमाला साहित्यिक
दर्जाची उंची गाठून दिली होती. त्यावर कळस म्हणजे
बायकोने तिच्या वक्तृत्वशैलीने आभार प्रदर्शन करून सगळ्यांची मने जिंकली होती.
दीडतास रंगलेल्या ह्या प्रकाशन सोहळ्यानंतर; आलेल्या प्रत्येकाने मला
भेटून दिलेल्या स्नेहपूर्वक अभिप्रायाने मला माझ्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे
भासत होते. त्यात माझ्या पन्नाशी निम्मित आयोजित
केलेल्या भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत घेत, माझे हे सर्व
आप्तेष्ट माझ्याच कवितेतच इतके रंगून गेले होते की शेवटी सभागृहाच्या व्यस्थापनाला
आम्हांला आवरते घेण्याची विनंती करावी लागली होती.
आलेल्या प्रत्येकाच्या हातात माझ्या “प्रतिबिंब”ची स्नेहपूर्वक भेट म्हणून दिलेली ती प्रत पाहून, ‘मी
पण” एक “साहित्यिक” झाल्याचा तो अनुभव मला मात्र मनोमन सुखावून जात होता व पुढेही लिहिते
राहण्याच्या जबाबदारीची जाणीवही करून देत होता.
ह्या सोहळ्याचे श्रेय कोणा कोणाला देवू.......
नियतीला देवू की,
माझ्या नशिबाला देवू !
माझ्या जन्मदात्यांना देवू की, त्यांनी केलेल्या संस्कारांना देवू !
माझ्या काव्यप्रतिभेला देवू की, माझ्याकडून हे करवून घेणाऱ्या सरस्वतीला देवू !
माझ्या कुटुंबाला देवू की,
त्यांच्या माझ्यावरील विश्वासला देवू !
माझ्या प्रकाशकाला देवू की,
माझ्यातल्या कवीला देवू !
ही श्रेयनामावली मारुतीच्या शेपटी सारखी आहे जी कधीही न संपणारी
आहे. ज्या
कुठल्या शक्तीने हे सगळे घडवून आणले तिला ह्याचे श्रेय देऊन; ज्यांनी कोणी माझ्या ह्या काव्यप्रतिभेस साकार होण्यास प्रत्यक्ष अथवा
अप्रत्यक्ष साथ दिली असेल; त्यांच्या ऋणात राहणेच मला जास्त
योग्य वाटते..
रविंद्र कामठे
No comments:
Post a Comment