Saturday 25 May 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – बारगळलेला धंदा


अनुभवाच्या शिदोरीतून बारगळलेला धंदा 
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
२००० साली Y2K नावाचं एक खूप मोठ्ठ वादळ माहिती आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रावर एख्याद्या सुनामीसारखे आदळले होते.  भल्या भल्या स्थिरस्थावर झालेल्या कंपन्या ह्या वादळात नेस्तनाबूत झाल्या होत्या.  अमेरिकेतून आलेले हे वादळ भारतातील आयटी क्षेत्रावर आणि त्यावर अबलंबून असलेल्या सेवा आणि सुविधा क्षेत्रावर फार दूरगामी परिणाम करून गेले होते.  त्यात मी पुण्यातल्या ज्या कंपनीमधे होतो त्या कंपनीचीही अवस्था अतिशय गंभीर झालेली होती.  आमची ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला उपयुक्त असे कौशल्य शिकवणारी होती त्यामुळे ह्या जागतिक मंदीचे जे काही सावट संपूर्ण भारतावर होते त्यात आम्हीं ही चांगलेच होरपळून निघालो होतो.  कसं बसं काम मिळत होतं पण पैसे मात्र सहा सहा महिने मिळत नव्हते आणि मिळाले तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते.  ह्या सगळ्याचा परिणाम होवून आमच्या कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आलेली होती. 
संचालकांना कंपनी चालवणे मुश्कील झालेले होते.  सहा आठ महिने आमचा पगार होत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच जणांना कामावरून कमी करण्यात आले होते. रोज नवीन यादी तयार होत होती आणि त्यात आपला नंबर लागला नाही की थोडं हुश्श व्हायला होत होतं. 
सगळीकडेच मंदीचे वातावरण असल्यामुळे दुसरी नोकरी मिळणेही दुरापास्त होते आणि तसा प्रयत्न करणे म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे अशीच आम्हां सगळ्यांची मानसिक अवस्था झालेली होती.
जस जसे मंदीचे सावट गडद होत होते तस तसे आम्हां सगळ्यांचेच धाबे दणाणलेले होते.  एक तर सहा आठ महिन्यांत पगार झालेला नव्हता.  सगळे आर्थिक नियोजन विस्कटलेले होते. त्यामुळे माझ्या चिंता जरा वाढल्याच होत्या.  त्यात माझ्या उपद्व्यापी स्वभावामुळे इतरांपेक्षा जरा जास्तच होत्या म्हणा हवे तर !  त्यात आहे ती नोकरी टिकवणेही महत्वाचे होते.
११९९ला ही चांगल्या पगाराची नोकरी लागल्यामुळे आम्हीं राहत्या घराचे नूतनीकरण करून घेतले होते.  अर्थात कर्ज काढूनच हो !  त्यात आधीची फियाट विकून नवीन मारुती ८०० घेतली होती.  ती ही कर्जावरच हे काही वेगळे सांगायला नको !  तसेच टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, मुझिक सिस्टीम वगैरे असे किरकोळ कर्जांचे हप्ते चालूच होते हो.  माझ्या उथळ पाण्याला किती खळखळाटहोता ते ह्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल !  पण हा दोष काही आमचा नव्हता तर एकंदरीतच आपल्या सुधारलेल्या अर्थकारणाचा होता.  सहजासहजी ही सगळी कर्जे उपलब्ध होत होती आणि आमच्या घरच्या जमा खर्चाच्या ताळमेळात बसत होती (अर्थात हे सगळे बायकोच्या संमती शिवाय शक्य नव्हते ह्याची कबुली आत्ताच दिलेली बरी !).  त्यात मला कर्जाचा हप्ता नसेल तर झोप नाही लागायची हो ! माझी ही खुमखुमी मला चांगलीच नडलेली होती हे आत्ता सांगायला काहीच हरकत नाही.  एक सांगतो, केवळ माझी बायकोची सरकारी नोकरीत असल्यामुळे आमचे खायचे वांदे झाले नव्हते एवढाच काय तो फरक !  पण ह्या स्वत:च्या उन्नतीच्या नादात घेतलेली कर्जे मात्र ह्या काळात वटवाघाळा सारखी डोक्या भोवती घिरट्या घालत होती आणि माझी झोप उडवत होती हे ही तितकेच खरं आहे.  असो.
एक सांगतो, परिस्थिती काय रोजच बदलत असते. कधी कधी ह्या अशा म्हणजे जागतिक मंदी सारख्या गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात.  आपले कुठलेच नियंत्रण त्यावर असूच शकत नाही.  एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यावर आपण जसे परिस्थितीला सामोरे जातो तसेच अशा वेळेसही वागायचे असते हे लक्षात घ्या. 
कौटुंबिक एकीचे बळ अशा वेळेस नक्कीच खूप उपयोगी पडते हो ! अगदी सहजपणे तुम्हीं ह्या अशा वादळांतून बाहेर पडू शकता.  हे मी माझ्या अनुभवावरून सागंतो आहे आणि म्हणूनच अनुभवाच्या शिदोरीतून हा ही जरास हटके अनुभव तुमच्याबरोबर वाटतो आहे. 
आपले नियोजन जर का व्यवस्थित असेल तर वाईटातल्या वाईट परिस्थितीतून मार्ग काढता येतो.  हे ही आपल्याला हीच परिस्थिती शिकवत असते.  फक्त आपण हातपाय गाळून ह्या उदभवलेल्या परिस्थितीपुढे हात टेकायचे नसतात !  जिद्द, चिकाटी, सचोटी, धैर्य, सकारात्मक दृष्टीकोन, स्वाभिमान, कष्ट करण्याची तयारी, इमानदारी इत्यादी गुणवत्ता ह्या वेळेस खूप उपयोगी पडतात हे ही तितकेच खरं आहे. 
आपली काही चूक असो वा नसो, परिस्थितीपुढे हार ही कधीच मानायची नसते कारण आपण जर हार मानली तर आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचीही ससेहोलपट होण्याची शक्यताच जरा जास्त असते हे ही ध्यानात ठेवले पाहिजे.
हे एवढे तत्वज्ञान मी का पाजळले; तर त्याचे कारण म्हणजे, ह्या परिस्थितीवर मी धडपडत का होईना मात करू शकलो होतो व ह्या वादळातून सहीसलामत बाहेर पडलो होतो.  दोन तीन वर्षे लागली होती पण वेळ निभावली होती. 
सर्वात आधी मी कर्ज काढून घेतलेली मारुती ८०० विकली होती.  महत्वाचे म्हणजे माझी ही गाडी आमच्या कंपनीच्याच एका संचालकांनी मला मदत करण्याच्या हेतूनेच ती योग्य किमतीला विकत घेतली होती हे विशेष. जरी त्यांनी मला तसे प्रथमदर्शनी दर्शविले नव्हते तरी ती गोष्ट माझ्या लक्षात आल्यावाचून राहिली नव्हती.  हीच ती आपल्या माणसांची जाण ठेवणे की काय ते म्हणतात बरं !
मारुती ८०० विकून मी एक जुनी मारुती एस्टीम ही सेदान क्लास विकत घेतली.  ही गाडी घेण्याच्या मागचा माझा उद्देश अतिशय सरळ होता; तो म्हणजे ही गाडी मी माझ्या एका मित्राला भाडेतत्वावर पुणे-मुंबई प्रवासी वाहतूक करण्यासाठी दिली होती व त्यातून दर महिन्याला थोड्याफार प्रमाणात अर्थार्जन होईल अशी योजना होती.  कसे बसे वर्ष दोन वर्ष ह्या आर्थिक मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लागणार होते आणि त्यासाठी खूप विचारांती मी माझ्या ह्या मित्राच्या बरोबर हा धंदा करण्याचे ठरवले होते.  अर्थातच माझ्या ह्या मित्राला ह्या धंद्याचा दांडगा अनुभव होता; म्हणून मी त्याच्या मदतीने ही जोखीम घेण्याचा निर्णय घेतला होता.  (माझ्या ह्या मित्राच्या प्रारब्धाचा अतिशय वेगळा अनुभव आहे तो मी पुढच्या लेखात नक्की लिहिणार आहे). माणूस त्याच्या प्रारब्धापुढे किती शुद्र आहे हे स्वानुभवावरून मला तरी जाणवले होते.
काही महिने आमचा हा धंदा छान चालला होता.  त्यामुळे आम्ही एक चालक नोकरीला ठेवला होता. सगळे कसे अगदी व्यवस्थित चालले होते.  ढासळलेले आर्थिक नियोजन जरा रुळावर येऊ घातले होते. पण म्हणतात ना, ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न’.  माझ्या आयुष्यात सरळसोटपणे कुठलीही गोष्ट घडणे म्हणजे कपिलाशष्टीचाच योग म्हणावा.  माझ्या प्रारब्धात ह्या विधात्याने जे काही लिहून ठेवले असेल ते निमुटपणे सहन करण्याची शक्ती आणि त्यातून मार्गही तोच दाखवत होता म्हणून बरं ! 
आमचा चालक त्याच्या ह्या क्षेत्रातील कौशल्याचा वापर करून आम्हांला व्यवस्थितपणे आर्थिक गंडा घालू लागला होता; हे आमच्या वेळेतच लक्षात आल्यामुळे आम्हीं त्याला लगेचच निरोपाचा नारळ दिला होता.  पण त्यामुळे वर्दी आली की माझ्या मित्रावर गाडी चालवायची वेळ यायची. दोन तीन वेळेला तो आजारी होता म्हणून मी सुद्धा पुणे-मुंबई-पुणे प्रवासी वाहतूक करण्याचा अनुभव गाठीशी जोडला होता व त्यातूनही खूप काही शिकलो होतो.  परिस्थितीपुढे हार न मानण्याची माझी प्रवृत्ती माझ्या ह्या ही वेळेस खूप मदतीला आली होती.
वर्षभराने एक दिवस माझ्या ह्या मित्राला अचानकपणे काहीतरी वैयक्तिक अडचण आली म्हणून त्याने मला त्याची असहायता व्यक्त केली.  झालं आमचा धंदा त्याचवेळेस बारगळला होता. परत कधीही धंद्यात पडायचेच नाही; हा कानाला खडाच लावला होता.  ह्या अनुभवांतूनच मी खूप काही शिकत होतो. स्वत:ला घडवत होतो.  माझ्या आणि कुटुंबाच्या स्वाभिमानाला जपत होतो.

रविंद्र कामठे 

No comments:

Post a Comment