“माझे मलाच न कळले, आयुष्य हे कसे ढळले”
चपराकच्या जुलै महिन्याच्या मासिकात छापून आलेला माझा हा लेख
जिंदगी का सफर है ये कैसा सफर...कोई समझा नही कोई जाना नाही...सफर ह्या हिंदी चित्रपटामधील स्वर्गीय किशोर कुमार ह्यांनी गायलेले हे एक अजरामर गाणे ऐकतांना त्यावर लिहावेसे वाटले. ह्या गाण्यास गीतकार इंदीवर ह्यांचे शब्द, त्यावर कल्याणजी आनंदजींनी चढवलेला सोनेरी सुरांचा साज, अप्रतिम छायाचित्रण तसेच राजेश खन्ना-शर्मिला टागोर ह्या द्वयीचा कथेला आणि प्रसंगाला साजेसा संवेदनशील असा अभिनय आणि त्यावर कळस म्हणजे आपल्या कर्णमधुर आवाजाने हे गाणे आज ४८ वर्षांनीही आपल्या ओठांवर गुणगुणायला लावणारा किशोरदांचा स्वर्गीय आवाज, म्हणजे निसर्ग निर्मित अशी एक अविस्मरणीय कलाकृतीच म्हणावयास हवी.
ह्या गाण्यात गीतकाराने आपल्या शब्द संपदेने कथेला साजेसे असे आयुष्याचे अतिशय क्लिष्ट असे गणित आदी सोप्या भाषेत आपल्या समोर मांडले आहे. हे जरी ‘सफर’ ह्या चित्रपटासाठी लिहिलेलं गीत असलं तरी, प्रत्यके माणसाला आपल्या आयुष्याबद्दल पडलेल्या प्रश्नाचं प्रतिनिधित्व करणारच आहे असेच वाटते आणि हीच तर प्रतिभावंत कलाकाराची ओळख असावी ह्यात काहीच वाद नाही. म्हणूनच मला हे गीत पुन्हा एकदा लिहून माझ्या प्रतिभा शक्तीस उजाळा द्यावायासा वाटला.
है ये कैसी डगर.. चलते है सब मगर..कोई समझा नही..कोई जाना नही...
जिंद्गी को बहुत प्यार हमने किया...मौतसे भी मोहोब्बत निभायेंगे हम...
रोते रोते जमाने मे आये मगर..हसते हसते जमानेसे जायेंगे हम..
जायेंगे पार किधर.. है किसे ये खबर..कोई समझा नही..कोई जाना नही...
ऐसे जीवन भी है,, जो जिये ही नही..जिनको जीनेसे पहले मौत आ गई..
फुल ऐसे भी है..जो खिले ही नही...जिनको खिलनेसे पहले फिजा खा गई.
है परेशान अगर थक गये चार अगर..कोई समझा नही.. कोई जाना नही..
एक मात्र आवर्जून नमूद करावेसे वाटते की, गीतकाराचे शब्द आणि संगीतकाराची सुरांची रचना रसिकांपर्यंत बेमालूमपणे पोचवण्याची खरी जबाबदारी असते ती गायक/गायिकेची. ह्यात जर का हा गायक/गायिका कमी पडला/पडली तर मात्र सोन्यासारख्या कलाकृतीचेही पितळ उघडे पडते हे मात्र निश्चित. स्वर्गीय किशोरदांनी हे गाणे आपल्या धीरगंभीर आवाजात ज्या कमालीने गायले आहे त्यास तोड नाही. कितीही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही. किशोरदांचा तो सुमधुर आवाज काळजात खोलवर रुतत जातो आणि आयुष्यतील एक एक उकल आपल्या नकळत उकलत जातो. हे गाणे तुम्हीं कधीही, कुठल्याही वेळी, कुठेही ऐकले तरी तुम्हांला हाच अनुभव परत परत आल्याशिवाय रहात नाही,ह्याचे संपूर्ण श्रेय हे किशोरदांच्या गायकीला द्यायला हवे.
किशोरदांच्या अनेक चाहत्यांपैकी मी ही एक त्यांचा निस्सीम भक्त आहे, चाहता आहे. त्यांनी गायलेली सर्वच गाणी उच्च तर आहेतच पण आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय रहात नाहीत. ह्या सर्व गाण्यांचे श्रेय नक्कीच, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माते, चित्रपटांमधील कलाकारांचे तर आहेच, परंतु ह्या उपर किशोरदांची एक वेगळीच छाप ह्या सर्व गाण्यांमधून दिसून येते हे नक्की. गायकीचे कुठल्याही प्रकारचे शास्त्रोक्त शिक्षण न घेतलेला हा अवलिया, आपल्या पर्यंत गीतकाराला अभिप्रेत असलेले त्याच्या शब्दांमधील एक न एक भाव सहजरीत्या उलगडत जोतो आणि मग ते गाणे त्या चित्रपटातले न राहता आपले गाणे होते व ते आपण तहहयात गुणगुणत राहतो. हीच तर खरी दाद किशोरदाला आहे.
किशोरदांच्या गाण्यांमधील प्रत्येक शब्द अन शब्द मला काहीतरी नवीन देऊन जाते. ह्या गाण्यामुळे मला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील ‘वणवण’ ह्या कवितेच्या दोन ओळी आठवल्या...
आयुष्यभर जगण्यासाठी केली, वणवण आहे,
मेल्यावर जळण्यासाठी साठवितो, सरपण आहे |
म्हणूनच म्हणावेसे वाटले की.......माझे मलाच न कळले, आयुष्य हे कसे ढळले...
रविंद्र कामठे
No comments:
Post a Comment