Wednesday 3 April 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – सहाच महिन्यांची नोकरी


अनुभवाच्या शिदोरीतून सहाच महिन्यांची नोकरी
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

मला आपल्या ह्या स्मरणशक्तीबद्दल एक कुतूहल वाटत आले आहे. निसर्गाने माणसाला जर स्मरणशक्तीचे वरदान दिले नसते तर ???? असा एक वेगळाच प्रश्न माझ्या डोक्यात घोळत बसतो, ज्याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात; नकळत मी अजून एका अनुभवाच्या भोवऱ्यात जावून अडकतो !  हा भोवरा इतका विलक्षण असतो की, त्यातून सुटका करता करता पार दमछाक होते हो ! तसं पहायला गेलं तर ह्या चांगल्या / वाईट स्मृतींवरच आपण आपले जीवन कंठत असतो हे ही तितकंच खर आहे.

१९८६च्या सुरवातीलाच मी नुकताच माझ्या पहिल्या नोकरीचा राजीनामा दिला होता; कारण शनिवार पेठेतील एका संगणक क्षेत्रातील कंपनीच्या मुलाखती मध्ये मला आधीच्या नोकरी पेक्षा चांगल्या पगाराची आणि फिरतीची नोकरी मिळाली होती.  वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरायला मिळणार व प्रवास भत्ता आणि त्यात पगारही चांगला म्हणजे महिना १२०० रुपये मिळणार होता.  तसेच माझ्या कायद्याच्या पदवीधर परीक्षेच्या अभ्यासासाठी व परीक्षेसाठी सुट्टीही मिळणार होती.  एका हातात नोकरी मिळाल्याचे पत्र होते आणि दुसऱ्या हातात विशाखापट्टणमचे रल्वेचे तिकीट होते.  म्हणजे १ तारखेला नोकरीवर रुजू झालो आणि लगेचच दुसऱ्याच दिवशी मी आणि माझ्या बरोबरचा एक सहकारी असे आम्हीं दोघेही आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमला रवानाही झालो होतो. 

ह्या सल्लागार कंपनीला महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमधील स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेच्या निवृत्तीवेतेन धारकांच्या खात्यांचे संगणकीकरण करण्यासाठीचे कंत्राट मिळाले होते.  आमच्या कामाचे स्वरूप म्हणजे ह्या बँकेच्या खात्यातील निवृत्तवेतन धारकांची सर्व माहिती एका विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या फॉर्म मध्ये बँकेच्या रजिस्टरमधून टिपून घ्यायची व नंतर ती एका विशिष्ट संगणक प्रणालीत मध्ये नोंद करून त्या त्या बँकेच्या मुख्य कार्यालयालातल्या संगणकावर सुरक्षितरीत्या जमा करायची.  ही म्हणजे आजच्या काळातील बँकांच्या संगणकीय विस्ताराची नांदी होती असे म्हणावयास हवे ! आम्हांला विशाखापट्टणम येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेचे व जवळच्या एका गावातील शाखेचेही काम देण्यात आले होते व हे सगळे काम महिनाभरात उरकायचे होते.

एकंदरीत कामाचे स्वरूप फारच गमतीशीर होते, प्रवास करायला मिळेल ह्या उद्देशाने खरं तर मी ही नोकरी स्वीकारली होती आणि पगारही चांगला होता, पण जेंव्हा हे असले बिनडोक्याचे (असे मला वाटले) काम करायला लागल्यावर एक दोन दिवसांतच त्या कामाचा मला कंटाळा आला होता आणि ही नोकरी स्वीकारल्याचा पश्चाताप वाटायला लागला होता. 

एक तर ह्या नवख्या शहरात आणि त्यात रोज तास दोन तासाचा प्रवास करून अजून एका कुठल्यातरी खेडेगावात जायला लागायचे.  तिथल्या लोकांना ना धड हिंदी कळायचे ना धड इंग्रजी !  प्रवासात तर अनंत अडचणींचा सामना करायला लागायचा.  त्यांच्याशी संवाद साधतांना आमची पुरी दमछाक व्हायची.  परंतु काम पूर्ण करण्याशिवाय आमच्या कडे दुसरा काही पर्यायही नव्हता.  दक्षिण भारतात भाषेची इतकी अडचण असेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते ! म्हणजे मला तर वाटले होते की हिंदी नाही तर कमीत कमी तोडकं मोडकं इंग्रजी तरी बोलत असतील हे लोकं. पण छे; काहीही झाले तरी ते त्यांच्या भाषेतच आपल्याशी संभाषण साधण्याचा प्रयास करायचे.

ह्या महिनाभरात आम्हांला ना धड जेवायला वेळेवर मिळत होते ना धड मनासारखे काही खायला मिळत होते.  सगळीकडे फक्त भात आणि भात रस्सम पाहून आमची तर जेवणावरची वासनाच उडाली होती.  आईच्या हातच्या आणि महाराष्ट्रीयन जेवणाची प्रकर्षाने आठवण होत होती.

आपल्याला ह्या शहरामध्ये मस्तपैकी फिरायला मिळेल, तिथल्या ऐतिहासिक ठिकाणांची ओळख होईल, मनसोक्त खादडायला मिळेल, काही ओळखी होतील, संस्कृतीची ओळख होईल.. वगैरे वगैरे...पण ह्या सगळ्या भ्रामक कल्पनाच होत्या.  त्यांचे कारण कामा ज्या कामानिमित्त आम्हीं गेलो होतो त्यातच आमचा दिवस कधी उगवत होता आणि कधी मावळत होता हेच कळत नव्हते आणि भरीला भर रोज तिथल्या बसने तास दोन तासांचा करावा लागणारा तो प्रवास तर अगदी जीवावरच यायचा. एखाद दिवस सुट्टीचा मिळायचा तो, कडपे धुणे, ते वाळले की इस्त्री करणे, खोली साफ करणे, आठवड्याची झोप पूर्ण करणे वगैरेतच जायचा. 

महिन्याभरात सुट्टीच्या एक दोन संध्याकाळी आम्हीं मनाचा हिय्या करून जवळील रामकृष्ण बीच वर थोडावेळ फिरून आलो होतो आणि विशाखापट्टणमला आल्याचे सार्थक केले होते.  त्यानंतर माझे परत तिकडे कधी जाणेच झाले नाही त्यामुळे आता फारसे काही आठवतही नाही.  म्हणजे स्मरणशक्तीला ताण दिला तरी फारसे काही स्मरत नाही.
 
विशाखापट्टणमवरून रात्री अपरात्री पुण्यात परत आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामावर हजर झालो.  नोकरी नवीन असल्यामुळे काही पर्यायही नव्हता.  रेल्वेचा प्रवास असल्यामुळे फारसा शीण नव्हता झाला, पण एकंदरीत हे काम मला मुळातच फारसे आवडले नसल्यामुळे कामावर जायचा खूप कंटाळा आला होता.  जावे तर लागणारच होते, कारण पैशांचा आणि कामाचा अहवाल साहेबाला देणे गरजेचे होते आणि ती माझी नैतिक जबाबदारीही होती.  ती टाळणे माझ्या तत्वात बसत नव्हते.  स्वत:चीच समजूत काढून मी त्यादिवशी ऑफिसला गेलो.

विशाखापट्टणमचा माझ्याकडे असेलेला सर्व अहवाल जमा केला; त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही काळ चर्चाही झाली.  ह्या चर्चेमुळे माझा ह्या कामाबद्दलचा गैरसमज थोड्या प्रमाणात कमी झाला.  मला त्यात काही तरी नाविन्य आहे हे जाणवले.  मी समजत होतो इतके काही ते काम टुकार नव्हते !  मी नवीन असल्यामुळे माझ्याबरोबरच्या सहकाऱ्याने मला माझे काम नीट समजून सांगितलेच नव्हते (जे सांगण्याची कंपनीने त्याला जबाबदारी दिली होती) आणि त्याने स्वत:चे काम टाळण्यासाठी माझ्याकडून काही बारीकसारीक कामेही करून घेतली होती, त्यामुळेच माझा कामाप्रती पूर्वगृह दुषित झाला होता, एवढेच ! 

एक शिकवण मला मिळाली की, कुठल्याही प्रकारचा कामाचा अनुभव हा आपली जिज्ञासा जागृत ठेवूनच घ्यायचा असतो.  नवीन काम असले म्हणून काय झाले, थोडेसे अवलोकन, कान आणि डोळे उघडे ठेवून केलेले निरीक्षण व कामाप्रतीचा आदर हे अतिशय महत्वाचे तत्व मला उलगडले, जे मला पुढे आयुष्यभर उपयोगी पडले हे मात्र शभर टक्के खरं आहे.

नंतर मला माझ्या कामासंदर्भातले संगणकीय प्रशिक्षण देण्यात आले.  संगणकावर काम करायला मिळते आहे पाहून माझा गैरसमज दूर झाला आणि हळू हळू माझा उत्साह वाढू लागला.  दोन तीन महिने मी अगदी मन लावून हे काम तडीस नेले.  मध्येच आठ आठ दिवसांच्या महाराष्ट्रातीलच दोन तिन शाखांची कामे करून आलो होतो.  त्यामुळे माझ्या कामावर वरिष्ठ एकदम खुश झाले आणि त्यांनी मला दादरच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेची जबाबदारी दिली.  आठवड्यातून चार दिवस मी रोज सिंहगडने पुणे-दादर-पुणे करत असे व महिन्याभरात हे ही काम जबाबदारीने पूर्ण करून वरिष्ठांची शाबासकी मिळवली होती.  पुन्हा एकदा अजून एका वेगळ्या शहराची जबाबदारी माझ्यावर सोपवण्याचा त्यांचा मानस होता व त्यांनी तो मला बोलवूनही दाखवला होता.  त्याचवेळेस मी त्यांना माझ्या कायद्याच्या परीक्षेची आठवण करून दिली होती.

सारख्या फिरतीमुळे मला माझ्या कायद्याच्या पदवी शिक्षणात मोठा अडसर होऊ लागला होता.  मुळात मला अभ्यासाला आणि परीक्षेसाठी महिनाभराची रजा देण्याचे माझ्या मुलाखतीतच मालकांनी मान्य केले होते.  परंतु कामाचा ताण वाढल्यामुळे त्यांनी मला रजा देण्यास नकार दिला आणि माझ्या समोर नोकरी सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नाही.  माझा राजीनामा नामंजूर करण्यात आला, पण माझा नाईलाज होता व जेमतेम सहमहीनेच मला ही नोकरी करण्याचा योग आला.  कारण मला कायद्याची पदवी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होते.  अशातच आमच्याच कर्तुत्वाने म्हणा अथवा नशिबाने म्हणा, चारीमुंड्या चीतपट होण्याचे गृह्मानही अगदी जोरावर होते... 

रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment