Tuesday 31 December 2019

मागोवा सन २०१९चा

मागोवा सन २०१९चा
 २०१९ उजाडलं तेच मुळी माझ्या मागील एक-दोन वर्षांच्या अथक परिश्रमाच्या व शारीरिक व्याधींच्या येऊन गेलेल्या आणि नंतर शमलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवरच. ऑक्टोबर २०१७ पासून माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती.  माझ्याही नकळत मी एका दु:खाच्या खाईत कधी लोटलो गेलो होतो तेच मला कळले नव्हते. तरीही नियती इतकीही निष्ठुर नव्हती म्हणून; माझी बायको वंदनाच्या, मुलगी-जावई पूर्वा-मयुरेशच्या पुण्याईने व मानलेली बहिण स्मिताच्या सहकार्याने निभावून गेले.
कसाबसा सावरत २०१७ आणि २०१८ ही दोन वर्षे ढकलत काढत होतो. खूप साऱ्या मानसिक आणि शारीरिक तक्रारींवर मात करत करत परिस्थितीशी झगडत होतो. ह्याच पार्श्वभूमीवर २०१९ साल उजाडले आणि मनाशी एक संकल्प केला की; आता रडत अथवा कुढत नाही बसायचे.  आपले आयुष्य हे एका नव्या दिशेने न्यायचे व समृद्ध करायचे !  झाले मग काय; मनाशी पक्का निर्णय झाला आणि ठरवले की नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घ्यायची आणि उरलेले आयुष्य हे साहित्य क्षेत्रासाठी आणि तब्बेतीला आणि खिशाला झेपेल अशा समाज सेवेसाठी द्यायचे.  बायको वंदनाची तर माझ्या ह्या संकल्पनेला मोलाची साथ मिळाली आणि मला माझ्या ह्या निर्णयाची पूर्तता करता आली.  जानेवारी महिन्यातच मी VINSYS मधील नोकरीचा राजीनामा द्यायचा ठरवले व तसे VINSYSचे सर्वेसर्वा सौ. विनया पाटील आणि श्री. विक्रांत पाटील ह्यांना सांगितले.  अर्थातच माझा हा निर्णय सर्वप्रथम झिडकारण्यात आला आणि नंतर जवळ जवळ एक ते दीड महिन्यानंतर माझे म्हणणे ऐकून घेतल्यावर स्वीकारण्यात आला.  माझ्या ह्या निर्णयाचे नंतर माझ्या सर्वच सहकाऱ्यांनी स्वागत केले.  ३१ मार्च २०१९ रोजी मला VINYSYS तर्फे निवृत्ती निमित्त एक अविस्मरणीय असा सोहळा आयोजित करून मला अतिशय सन्मानाने निरोप देण्यात आला जो मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी विनया पाटील, विक्रांत पाटील, उमेश थरकुडे, सदानंद वझलवार, नितीन शेंडे, स्मिता तोंडे आणि सुधीर ढवळे सरांचा खूप ऋणी आहे.
निवृत्तीनंतर ठरल्याप्रमाणे मी काही दिवस आराम करून माझ्या साहित्य क्षेत्राच्या सेवेला सुरवात केली. अर्थात त्यासाठी ‘चपराक प्रकाशन’ चा सर्व समूह (घनश्याम सर, शुभांगीताई गिरमे, बेलसरेताई, अरुण कमळापुरकर, दिलीप कस्तुरे सर, विनोद पंचभाई, ब्रम्हे काका, माधव गिरसर, हर्षद क्षीरसागर, सागर सुरवसे, गणेश अटकुळे, प्रमोद येवले) माझी अत्यंत आतुरतेने वाटच पहात होता.  चपराकचे सर्वेसर्वा श्री. घनशाम पाटील सर माझ्या ह्या निर्णयामुळे खूपच खुश होते व मला सातत्याने नवनवे लिखाण करण्यास उद्युक्त करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले व माझ्याकडून “अनुभवाच्या शिदोरीतून” हे एक सदर चपराकच्या साप्ताहिकात चालवले गेले. हे सदर चपराकच्या सर्व वाचकांना इतके आवडले की ह्या सर्व लेखांचे एक पुस्तकच प्रकाशित करण्याचा अतिशय प्रेमळ आग्रह सगळ्यांकडून करण्यात आला आणि त्याची फलश्रुती म्हणजे १९ ऑक्टोंबर २०१९ ला चपराकच्या साहित्य महोत्सवात माझ्या “तारेवरची कसरत” ह्या अनुभवकथन पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द व्यवस्थापन तज्ञ आणि महाराष्ट साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांच्या हस्ते व सुप्रसिध्द संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ ह्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आले.

निवृत्ती नंतर काय करायचे हा प्रश्न मला तरी पडलाच नाही. कारण ‘चपराक प्रकाशन’ मध्ये माझ्या साठी जे काही आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे व मला आवडणाऱ्या सेवेसाठीचे वातावरण तयारच होते. ते म्हणतात ना; “आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे” असेच काहीसे झाले होते माझे.
माझ्या परीने मी चपराकला माझा हा सगळा मोकळा वेळ देऊ केला होता; तो ही कुठल्याही आर्थिक आणि व्यावसायिक फायद्या शिवाय ! माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की साहित्यक्षेत्राला काहीतरी योगदान द्यायचे व साहित्य क्षेत्रातील “चपराक प्रकाशन” ह्या अतिशय प्रामाणिक, प्रगल्भ, परखड आणि रास्त अशा संस्थेच्या यशस्वी वाटचालीस माझा खारीचा का होईना हातभार लावायचा. माझ्या मनाशी मी अगदी ठामपणे ठरवले आहे की, निवृत्ती नंतर मी पैशासाठी अजिबात काम करणार नाही. मला आता अजिबात अर्थार्जन करायचे नाही.  त्याचे कारण आयुष्यात आजवर पैश्याच्याच मागे लागून शरीराची जी काही हेळसांड केली आहे तेवढी खूप झाली !  आता जरा समाजासाठी काही तरी करावे असे वाटते. ते ही मला जमेल आणि तब्बेतीला व खिशाला झेपेल अशा पद्धतीने !  त्यामुळेच मी चपराक साठी माझा वेळ कुठल्याही आर्थिक अपेक्षा न ठेवता देण्याचे ठरवले आहे व मी त्यावर खूप समाधानी आहे. जून महिन्यापासून मी चपराकला मी माझ्या सोईने वेळ देऊ लागलो व मला एका अर्थाने सुख आणि समाधान लाभू लागले, तब्बेतीस ही आराम वाटू लागला.  ह्याची प्रचीती म्हणजे गेले काही दिवस सातत्याने चपराकच्या संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांबरोबर होत असलेले दौरे व त्यामुळे साहित्य क्षेत्रामधील विविध कार्यक्रमांना लागत असलेली हजेरी, दिग्गजांची होत असलेली ओळख हे होय.  मला कुठल्याही मान, सन्मान, पुरस्काराची अजिबात अपेक्षा नाही आणि तेवढे माझे ना कार्य आहे ना कर्तुत्व आहे. आपण मनापासून जे काही काम करतो त्यात जर का योग्य त्या व्यक्तीची, संस्थेची साथ सांगत लाभली तर त्यामुळे जे काही सुख, समाधान आणि समृद्धीची भावना प्राप्त होते ना, ती हजारो, लाखो रुपये मिळवले तरी मिळत नाही आणि नेमकी तीच भावना मला ‘चपराक’ समूहा मुळे लाभली आहे.

माझ्या सामाजिक कार्याच्या उपक्रमातील अजून एक उपक्रम म्हणजे छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यास संस्थापक सदस्य म्हणून हातभार लावून प्रतिष्ठानच्या वतीने नजीकच्या भविष्यात विविध सामाजिक कार्य करणे. ह्यासाठी मी श्री.विश्वजित भाऊ कामठे व समस्त कामठे परिवाराचा त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाठी आभारी आहे.

मी आजवर ‘प्रतिबिंब’, ‘तरंग मनाचे’, ‘ओंजळ’, ‘प्रांजळ’ हे चार काव्यसंग्रह आणि ‘तारेवरची कसरत’  अनुभवकथन पुस्तक प्रकाशित केले आहे.  त्यामुळेच ह्या निवृत्तीचा फायदा घेऊन अजून खूप सारे लिखाण करून साहित्य संपदेत भर घालण्याचा माझा मानस आहे व त्यासाठी मला चपराकची फार मोलाची आणि हक्काची साथ मिळते आहे हे माझे भाग्यच म्हणावे लागेल.
ह्या प्रास्तविकानंतर तुम्हांला माझे २०१९ हे सालं कसे गेले ह्याची प्रचीती आलीच असेल !  त्याच धर्तीवर मला माझे पुढील आयुष्यही समृद्ध करायचे आहे.  ह्या निमित्ताने २०१९ मधील काही क्षणचित्रे तुमच्या माहितीसाठी देतो आहे.
म्हणूनच फक्त २०१९ ह्या गेल्या वर्षालाच नव्हे तर माझ्या आजवरच्या ५६ वर्षांच्या आयुष्याला माझा विनम्र प्रणाम करतो आणि येणाऱ्या २०२०चे नव्या उमेदीने स्वागत करतो.
काय योगायोग आहे पहा; आजच ३१ डिसेंबर २०१९ ला मला ८-९ फेब्रुवारी २०२९ मध्ये अलिबागला होण्याऱ्या ६ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे सरांचे निमंत्रण मिळाले आहे.
चला तर नवीन वर्षाची म्हणजेच २०२०ची सुरुवात चांगलीच झाली आहे असे म्हणावयास हवे. आत न थकता नव्या उमेदीने व उभारीने कार्यास लागणे आहे.  एक सांगतो; असे आपल्या मनासारखे घडायला सुद्धा माणसाचे नशीब असावे लागते ! 
“मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतो”

रविंद्र कामठे.
**माझ्या "तारेवरची कसरत ह्या अनुभवकथन पुस्तकाचा पुस्तकाचे मानधन मी ममता अंध अनाथ कल्याण केंद्रास मदत म्हणून देणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रती विकत घेऊन माझ्या ह्या सामाजिक उपक्रमास तुमची मोलाची साथ द्यावी ही नम्र विनंती. आपण हे पुस्तक चपराक, बुकगंगा आणि Amazonच्या संकेतस्थळावरून मागवू शकता. त्यांची लिंक खाली देत आहे.
https://www.amazon.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A4-Ravindra-Kamthe/dp/9386421321/ref=mp_s_a_1_2?keywords=chaprak&qid=1576983592&sr=8-2&fbclid=IwAR0hWeIcyOIapYnSuRGnFTw7KYJolk0AexU6zj-sScu2R8_nkCmIE1AJx28

No comments:

Post a Comment