Friday 1 September 2017

डॉल्बीचा किस्सा



काल ३१ ऑगस्ट २०१७, सात दिवसांच्या गणपतींचे म्हणजेच गौरी-गणपतीचे विसर्जन होते. अगदी नेहमीप्रमाणे सर्व गणेशभक्त घरचे आणि मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी महानगरपालिकेने बांधलेल्या विसर्जन हौदात मोठ्या मनोभावाने विसर्जन करत होते. संध्याकाळी आठ पर्यंत हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने चालेलेले होते हो. मी धनकवडीला टेलिफोन कार्यालयासमोर राहतो आणि माझ्या घरापासून साधारण २०० मीटर वर मुख्य चौकात महानगरपालिकेने विसर्जन हौद बांधला आहे. तिथे नेहमीच विसर्जनासाठी गर्दी होते. परंतु वाहतुकीस कुठेही अडथळा न येता सगळे कसे आपले पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी झटून काम करून जबाबदारीने हे विसर्जन पार पाडत असतात. त्या बिचाऱ्यांची ह्या गणेशभक्तांच्या भावना वगैरे दुखवल्या जाण्याची एक अदृश भीती मला त्यांच्या चेहऱ्यावर कायम भासत असते.


अहो पण नमनाला घडाभर तेल का घातले ते सांगतो. साधारण रात्री ८ नंतर आमच्या भागातील मोठ्या मंडळांच्या मिरवणुका येण्यास सुरवात झाली. साधारणपणे काही मंडळांच्या गणपती पुढे एक ढोलताशा पथक, वाद्यवृंद पथक, तसेच ह्या मंडळांची सर्वात आवडती डॉल्बी तर होतीच. एक वेळ अशी आली की एका वेळेस साधारण तीन ते चार मंडळे रस्त्यावर एकाच वेळेस आल्यावर त्यांच्या आवाजाची जी काही पातळी गाठली होती ना ती की विचारूच नका. ढोलताशा पथक एक कुठला तरी ताल वाजवत होते, कोणी त्यांचा झेंडा नाचवत होते, तर वाद्यवृंद आरे दिवानो मुझे पहचानो हे गाणे वाजवत होते तर डॉल्बीबर शांताबाई, बाबुराव, आतामाझी सटकली, झिंग झिंगाट, अशी सगळी गाणी वेगवेगळ्या डॉल्बीवर एकत्रितपणे वाजत असल्यामुळे जो काही गोंधळ चालेला होता ना तो तर म्हणजे आपल्या समाजाला ठरवून बहिरे आणि ठार वेडे करण्याचा एक सामाजिक उपक्रमाच वाटला मला. त्यात आपल्या सरकारने त्यांच्या ह्या लाडक्या गणेश भक्तांसाठी मिरवणुकीतील वाद्ये वाजवण्याची मुदत रार्त्री दहाच्या ऐवजी बारा केली होती ना ! 

आमच्या सारखे वेडे साधारण ९ ते ९.३० दरम्यान जेवण करून थोडेसे वाचन करत झोपावे असे ठरवले तर, ह्या मंडळांच्या मिरवणुकीने गाठलेली आवाजाची अतिउच्च पातळीने कहरच केला. आमच्या परिसरातील सगळ्यांच्या घराच्या दारे आणि खिडक्यांची तावदाने इतकी हादरत होती की कुठल्याही क्षणी निखळून पडतील असेच वाटत होते. एक वेळ अशी आली की ही चारही मंडळे एकाच ठिकाणी आली आणि त्यांनी तर आवाजाचा इतका कहर करून आसमंत दणाणून सोडला इतका की आमच्या तर छातीत धडधडायला लागले. शेवटी आम्ही सगळी दारे खिडक्या लावून घेतले आणि झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. ह्या गडबडीत रात्रीचे बारा वाजले आणि आमची ह्या आवाजी बलात्कारातून सुटका झाली. पण खरी गमंत पुढेच आहे.

सकाळी उठलो आणि कामावर जायला निघालो तर, घराचे दार उघडायलाच तयार नाही. म्हणजे माझ्या बैठ्या घराला पढे आणि मागे दार आहे. त्यात पुढच्या दाराला दोन दारे आहेत. बाहेरील सुरक्षेसाठी एक दार ते आम्ही आधी आतून बंद करतो त्याला ल्याच आहे आणि त्यानंतर आतले लाकडी दार बंद करतो. नेहमीप्रमाणे ह्या दोन्ही दारांना आतून कडी लावून काल रात्री आम्ही झोपलो होतो. परंतु आवाजाची पातळी एका क्षणी इतकी वाढली होती की आमच्या आतल्या दाराची बाहेरील कडी एकंदरीत हादर्यांमुळे आपोआप लागलेली होती. मी सकाळी प्रयत्न केला, बायकोने पण प्रयत्न केला पण आम्ही हार मानली. काही केल्या दार उघडेनाच. तरी एक बरे आमचे बैठे घर असल्यामुळे आम्ही आमचा आजच्या दिवसापुरता सगळा व्यवहार मागील दराने केला. संध्याकाळी घरी आलो. सुताराला बुलावा धाडला. एक शेवटचा प्रयत्न म्हणून एक पातळ काठीने बाहेरील दाराच्या फटीतून हात घालून आतील दाराची बाहेरून लागलेली कडी काढण्याचा प्रयास साधारण एक तास भर केला. शेवटी एका लहान मुलीला बोलावले. तिच्या हातात ती पातळ काठी देवून ती कडी काढण्याच्या आमच्या प्रयत्नांना शेवटी यश आले आणि आमची आमच्याच घरातून सुटका झाली.

हा विषय इथे मांडण्याचा माझा आग्रह एवढ्याच साठी आहे की ह्या डॉल्बीच्या आवाजाच्या पातळी मुळे अजून काय काय होत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अहो घरात नुकतीच जन्माला आलेली तान्ही बाळे असतात. म्हातारी कोतारी माणसे असतात. त्यांना ह्या सगळ्याचा किती त्रास होत असेल ह्याची कल्पनाच करवत नाही हो. हे कुठेतरी थांबविले पाहिजे असे मला वाटते. समाजप्रबोधन करून हे सगळे मंडळांच्या पुढाकारानेच बंद केले पाहिजे असे मला वाटते. सगळेच जर का आपले सर्वोच्च न्यायालय ठरवायला लागले तर आपण नागरिक म्हणून आपले काहीच कर्तव्य राहणार नाही असे मला वाटते. बुद्धीच्या देवतेची आराधना करतांना आपण आपली बुद्धीच कशी हो गहाण ठेवू शकतो ! म्हणून माझे सर्व गणेशभक्तांना, मंडळांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, राजकीय, सामाजिक कार्य करण्याऱ्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपली संस्कृती जपा. तसेच आवाजाचे आणि पाण्याचे प्रदूषण करून आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांच्या समस्या वाढवू नका.

गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या आणि आम्हां गणेश भक्तांना सुबुद्धी द्या.

रविंद्र कामठे

1 comment:

  1. परिस्थिती आवाक्या बाहेर आहे !

    ReplyDelete