Monday 18 September 2017

आश्वासंनाची बुलेट ट्रेन


आश्वासंनाची बुलेट ट्रेन


काय बोलावं, कसं बोलावं, तेच सुचत नाही हो आजकाल.  मती गुंग झाली आहे माझी.  वेडबिड लागतंय की काय अस वाटतंय.  सारखे कसले तरी भास होत आहेत.  चांगली का वाईट पण विचित्र स्वप्ने पडताहेत हो.  म्हणजे मला की नाही असं वाटयला लागलंय की, आपल्या देशातली आणि राज्यातली संसद, राज्यसभा आणि विधानसभा, विधानपरिषद, हे आपले दूरचित्रवाणीवर दाखवल्या जाणाऱ्या रोजच्या मालिका बनविणारे लेखक, दिग्दर्शक, निर्मातेच चालवत आहेत, असे वाटायला लागले आहे.  म्हणजे जसे की ह्या रोजच्या मालिकेतील, मागच्या भागाचा, चालू भागाशी आणि पुढच्या भागाशी जसा काहीही संबध नसतो ना, अगदी तसेच काहीसे झाले आहे, आपल्या ह्या सरकारचे.  आपल्या देशात रोज कुठेना कुठे तरी निवडणुकांचे आदेश निघतच असतात.  त्यामुळे आपल्या अतिशय कार्यक्षम अशा ह्या संत्र्यामंत्र्यांकडून रोजच काही ना काही आश्वासंनाची खिरापत वाटली जातेच जाते.  आज तर चक्क बुलेट ट्रेनची खिरापत मिळाली.  आणि काय सांगू माझे तर डोळे अश्रूनी डबडबले हो ! म्हणजे मला तर ना हे एक दिवसाढवळ्या पडलेले स्वप्नच आपण पाहतोय की काय असे वाटायला लागले.  माझ्या मनात एक आशा निर्माण झाली, ती म्हणजे, ‘आता माझ्या अहमदाबादेतील शेतकऱ्याचा ताजा माल रोज अगदी बुलेटच्या वेगाने मुंबईच्या बाजारात येईल आणि त्याच वेगाने भरभरून पैसा अह्मादाबादेला घेऊन जाईल’.  शेवटी काय हो देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याचे हीत हेच आमचे हीत आहे हो.  अर्थात हा शेतकरी म्हणजे साधा सुधा नाही हो. तो चक्क हिऱ्यांची शेती करणारा आहे आणि म्हणुनच त्याला की नाही सर्वसामन्य बळीराजा पेक्षा जरा जास्तच सुविधा द्याय्यला हव्यात हो.  त्याचं काय आहे, एक वेळेस जेवायला नसले ना तरी चालेले, पण हिऱ्यांकडे पाहून सुद्धा ज्या प्रमाणत पोट भरते आणि शरीराला उपयुक्त असे सर्वप्रकारचे जीवनसत्व त्यापासून मिळतात हे विसरून कसे चालेल हो !  आणि हो एक विसरतो आपण नेहमी, ते म्हणजे जर का श्रीमंतांची पोटे आणि तिजोरी भरलीत तरच गरीबाच्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळू शकते, हा जगप्रसिद्ध सिद्धांत आहे.  ह्यालाच तर म्हणतात दूरदृष्टीने विचार करणारे सरकार.  केवढे हीत आहे हो ह्या निर्णयात हे तुम्हांला कळण्याची तुमची कुवतच नाही आणि म्हणूनच तुम्हीं फक्त मतदारच राहिले आहात हे लक्षात घ्या.  आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी एकतर वेडा आहे आणि आत्म्हत्येच्या व्याधीने ग्रस्त आहे.  त्याला कशाला ह्या व्यापातून मुक्त करायचे.  झाली की कर्जमाफीची घोषणा करून.  म्हणजे एकदा का घोषणा केली की ह्यांचे काम झाले.  निर्णयाची अंमलबजावणी वगैरे करणे दूर राहिले.  उलटे त्यावरून राजकारण चालू करून एकप्रकारे बळीराजाची चेष्टाच चालू आहे ह्याचे फार वाईट वाटते हो.  तुम्हीं बुलेट ट्रेन आणा नाही तर विमान आणा, आधी वसई ते विरार आणि अंबरनाथ ते ठाणे हा लोकलचा प्रवास सुखकर करून दाखवा आणि मग बोला असेच सगळेच मुंबईकर दिवसा ढवळ्या बोलायला लागलेत. त्यांचे तरी काय चुकले हो ह्यात. गेले २ वर्षे झाली आम्ही पाहतोय की मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री कुठल्यातरी एका मोठ्या मैदानांत तुमच्याआमच्याच पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून, उभारलेल्या व्यासपीठावरून, कळ दाबून भूमिपूजन काय करताहेत.  त्याचे ताजे उदाहरण द्यायचे झाले तर ह्यांनी अगदी समुद्रात सुद्धा जाऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केलेले आम्ही अजूनही विसरलो नाही. त्यात तुम्हांला एक गमंत सागतो, म्हणजे आपले ह.भ.प (लवकरच होऊ घातलेले भारताचे अर्थमंत्री) त्यांनी तर सांगितले की बुलेट ट्रेन आहे ना, ते हे सगळे आपल्याला जपान सरकारने अगदी अगदी फुक्कट दिले आहे.  पंधरा वर्षांनंतर आपण की नाही ह्या कर्जाची फेड करायची तो पर्यंत ही बुलेट ट्रेन तुटेपर्यंत वापरायची.  खर सांगतो मंडळी तुम्हांला, गेल्या ५० वर्षात म्हणजे मला कळायला लागल्यापासून आजपर्यत अर्थशास्त्र ते काय समजलेच नव्हते, ते ह्या ह.भ.प सरांमुळे कळाले. त्यांची वाणी इतकी गोड आहे की वाटते ते प्रवचनकारच आहे की काय.  बहूतेक तो त्यांचा जोड धंदा असावा !  असो. असे जर का शिक्षक/प्राध्यापक आपल्या राज्याला / देशाला मिळाले ना तर आपले कल्याण झालेच म्हणून समजा !  मुख्यमंत्री तर काय हवेतच होते हो म्हणजे त्यांचे असे झाले होते की खिशात नाही आणा, मंडळी म्हणताहेत की, धनी अह्मादाबादेहून येतांना काहीबी करून बुलेट ट्रेन आणा”.  असो.  आपल्याला बुबा ह्यातले काहीच कळत नाही आणि असेही सर्वसामन्य माणसाला काही कळावे अशी अपेक्षाही नाही.  त्यांनी फक्त मतदानाच्या दिवशी त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार डोळे झाकून, बुद्धी गहाण ठेवून तर काही जणांनी मतांच्या ठरलेल्या किमतीनुसार मतदान करून आपला राज्यघटनेने दिलेला अधिकार बजावायचा आणि मोकळे व बाजूला व्हयाचे आणि आपल्याच हातून आपण करून घेतलेल्या आपल्याच राज्याचे अथवा देशाचे वाट्टोळे बघत बसायचे.  

 

मला जसे समजायला लागले म्हणजे साधारण ४५ वर्षे वगैरे झाली असतील तसे, एक जाणवते आहे की देशप्रेम, राष्ट्रप्रेम, राज्यप्रेम वगैरे हे जे काही आहे ना ते फक्त शिवाजी महाराजांच्या काळापुरतेच मर्यादित होते हो.  नंतर त्याचे काय झाले हे आता आपण पाहतोच आहे की.  हातच्या कंकणाला आरसा कशाला हवा आहे.  तसेही आपलेही थोडेसे चुकतेच आहे की !  म्हणजे सरकारने कितीही सोयी सुविधा करून दिल्या तरी आमची अजून ते वापरण्याची, त्यांची निगा राखण्याची ना आमची लायकी आहे ना आमच्यात सामजिक बांधिलकीची जाणीव आहे.  अहो ती तर, ते इंग्रज आले होते ना त्यांनी जातांना नेली नाही का त्यांच्या बरोबर !  असेही आम्ही गुलामच होतो की, आम्हांला कुठे काही अधिकार होते हो तेंव्हा.  अहो, असेच एक ताजे उदाहरण देतो ते म्हणजे ज्यांची स्वत:ची कवुत तर सोडा, पण ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक वाडवडिलांच्या पुण्याईवरही निवडून येण्याची लायकी नसतांना, आणि वयाची अजून तिशीही न ओलांडलेल्याचे धारिष्ट्य होते आणि ते आपल्या सर्वांचे आदरस्थान असलेल्या बाबासाहेब पुरंदरे सारख्या वय वर्षे ९६ पूर्ण केलेल्या, शिवाजी महाराजांचा इतिहास जगलेल्या, थोर व्यक्तिमत्वास, तुम्हीं आता एकटे फिरू नका अशी धमकी देतात हो, काय अपेक्षा करणार ह्या शंडाकडून हेच मला समजत नाही. 

 

रोज रोज दूरचित्रवाणी वर बातम्यांच्यात एक अर्धवट चर्चा सत्र घडवून आणले जाते आहे, हे तर म्हणजे राजरोसपणे आपल्या अस्मितेवरचा घालाच आहे असे वाटायला लागले आहे.  तुम्हीं म्हणाल की मग बातम्या पाहू नका.  अगदी योग्य सुचवलेत हो.  जर पत्रकारिताच विकली गेली आहे आणि तिचा बाजारच उठवायचं ठरवलं आहे तर सर्वसामन्य माणूस करणार तरी काय.  रोज कोणीतरी एक नवीन प्रवक्ता दूरदर्शन वाहिनी वर चर्चासत्रात पाठवून आपली किती छान करमणूक करत असतात हो ! मला तर ना कधी कधी आपले आदेश बांदेकर भाऊच्या पैठणीचे कार्यक्रम ह्या सगळ्या पेक्षा चांगले वाटतात.  कारण ते निदान पैठणी तरी देतात आणि वर प्रसिद्धीही नक्की देतात हो. 

 

सरकारने कसे, काय करायचे ते मात्र माझ्यासारख्या सर्वसामन्य माणसाच्या काही लक्षातच येत नाही.  आणि आले तर त्याची दिशाभूल करायला ही निवडक प्रवक्त्यांची टोळी प्रत्यके पक्षाने बहुतके पोसलेलीच असावी असे वाटले तर त्यात नवल काही नाही.  आणि हो त्यात, बरेचसे विचारवंत (म्हणजे ते थोर विचारवंत आहे हे त्यांनीच ठरवले असते) आजकाल ह्या सगळ्या वाहिन्यांच्या पाचवीलाच पुजलेले असल्यासारखे ह्या वाहिन्यांवरून वावरतांना दिसतात.

 

एकंदरीत काय तर ही सगळी शोकांतिका आपली समोर मांडण्याचे एक प्रयोजन नक्की आहे ते म्हणजे तुम्हीं आम्ही सर्वसामन्य माणसेच ह्या सगळ्या किड्यामुंग्यांसारखे भरडले जात आहोत.  वेळ जवळ आली आहे ती म्हणजे, समाज प्रबोधन करून आपल्यावर लादल्या जाणाऱ्या ह्या आश्वासंनाची बुलेट ट्रेन रोखण्याचे.  आजही आपल्या देशात जवळ जवळ ४०-४५% लोकांना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या  मुलभूत गरजा भागवता येत नाहीत त्या माझ्या देशाला खरी गरज काय आहे ते ओळखून योग्य त्या पायाभूत सुविधा जे कोणाचे सरकार असेल त्याने पुरवाव्यात ह्यातच आपल्या देशाचे आणि देशातील नागरिकांचे हीत आहे असे मला वाटते.  म्हणून हा लेख प्रपंच.

 

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०  

No comments:

Post a Comment