Saturday 25 November 2017

आभार मानून तुमचे कृतघ्न मी नाही होणार, तुमच्या ऋणातच रवी सदैव राहणार


नमस्कार मंडळी,
मी येत्या सोमवारी म्हणजे २७ नोव्हेंबरला २०१७ला, बरोबर एक महिन्यांनी माझ्या ऑफिसला VINSYSला जाणार आहे.  त्याचं असं झालं की एक महिन्यापूर्वी म्हणजे २७ ऑक्टोबरला माझ्या हृदयाला रक्तपुरवठा करण्याऱ्या दोन रक्त वाहिन्यांमध्ये प्रत्येकी एक अशा दोन पुंगळ्या (स्तेंट) टाकण्यात आल्या होत्या.  त्या आता व्यवस्थित काम करत आहेत असे पर्वाच डॉक्टरांनी सांगितले.  त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार, मी ठरवले की आता आपल्या ह्या पुंगळ्याना सुद्धा आपल्या कार्यालयाची आणि कामाची ओळख करून द्यावी.  कारण त्यांनाही ह्याची सवय व्हायला हवी ना !  ह्या पुंगळ्याना आणि मला आता उर्वरित आयुष्य एकत्रित नांदायचे आहे हो बाकी काही नाही.  होईल त्यांनाही ही ह्या सगळ्याची सवय हळू हळू.  तशाही त्या नवीन आहेत ना !  पण आता एक महिन्यात चांगल्याच रुळल्या आहेत म्हणे माझ्या हृदयात.  काय नशीब असते ना, एकेकाचे !  ह्यांनी तर एकदम आमच्या हृदयातच ठाण मांडले आहे, नव्हे एकदम कब्जाच केलाय हो !  आत काय तर म्हणे माझ्या काळजावर त्यांचीच हुकमत चालणार आहे आणि त्यासाठी मला रोज सकाळी उठून काही कि.मी. चालायचे आहे, नियमित व्यायाम करायचा आहे आणि खाण्या पिण्याचे (तुम्हांला वाटते तसले पिण्याचे नव्हे,जे आम्ही केव्हाच सोडले) त्याचे पथ्य पाळायचे आहे. असो.  पण आता माझा नाईलाज आहे हो !  होईल ह्या ही गोष्टींची सवय हळू हळू.  शेवटी काय तर सगळेच माझ्याच फायद्याचे आहे ना !

डॉक्टर म्हणत होते की तुमचा हा पुनर्जन्मच झालाय असं समजा.  असेल बुवा !  आपल्याला काय त्याचं.  त्यांचा सल्ल्याने वागणे आले.  जेवढे मिळाले आहे ते आयुष्य बोनस समजून वागायलाच हवे आणि मी ही तसे मनोमन ठरवून टाकले.  इथून पुढचे आयुष्य ही सदृढच जगायचे असा संकल्पच सोडलाय मी.  माझ्या विचारसरणीतही खूप अमुलाग्र असा सकारात्मक बदल मला जाणवतो आहे हे मात्र नक्की.  आपल्या मराठीत एक म्हण आहे ना, “जे काही होते ना ते आपल्या भल्यासाठीच असतेत्याचा मला अगदी पदोपदी प्रत्यय येतो आहे.

चला आता जास्त पाल्हाळ लावत नाही.  मुद्यावर येतो.....

ह्या निमित्ताने मी आज सगळ्यांचे अगदी मन:पूर्वक आभार मानतो, ज्यांनी ज्यांनी माझ्या आयुष्यातील ह्या एक महिन्याच्या खडतर प्रवासात मला फारच मोलाची साथ दिली आहे त्यांचे.  तुम्हीं सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, तसेच माझे मनोबल वाढवलेत, मला काही झाले आहे ह्याची जाणीव होऊ दिली नाही व मला सतत कोणी ना कोणीतरी भेटायला येऊन अथवा फोन करून, शुभेछ्या देवून, अजिबात एकटे पडून दिले नाही, त्या सगळ्यांचे.  मी जर सगळ्यांची नावे घेत बसलो तर खूप मोठी यादी होईल.  अगदी अनावधनानेही कोणाचे नाव घ्यायचे राहणार नाही. कारण मी कोणालाही विसरू शकत नाही आणि शकणारही नाही.  सर्वात शेवटी त्या कर्त्या करवित्या परमेश्वराचे आभार तर मानायलाच हवे.

माझ्यासाठी हा एक महिना म्हणजे आठवणींचा सागरच आहे.  ह्या स्मृतींच्या जीवावर मी माझे उर्वरित आयुष्य काढू शकतो, इतक्या ह्या स्मृती माझ्यासाठी बहुमोल असा ठेवा आहेत.

आभार तुमचे मानून, कृतघ्न मी नाही होणार,

तुमच्या ऋणातच, हा रवी सदैव की राहणार ||

 

मी आजच नटून थटून बसलोय आणि कधी एकदा सोमवारी ऑफिसला जातोय असे झाले आहे मला.  त्याचे कारण माझ्या सारख्या सारखी चुळबुळ करणाऱ्या व्यक्तीला आणि आपले काम हेच आपले खरे दैवत मानण्याऱ्या माणसाला दुसरा कसला आनंद असणार हो.  तुम्हीं माझ्या भावना समजू शकता.

 

आपला स्नेहांकित,

रविंद्र कामठे

२५ नोव्हेंबर २०१७

No comments:

Post a Comment