Monday 3 July 2017

“क्षण”


क्षण

 काही क्षण हे असे असतात की जे काळजात खोलवर रुतून बसलेले असतात.  आपण जेंव्हा एकांतात असतो तेंव्हा हे क्षण असे काही छळतात ना की विचारू नका !  ह्या क्षणांचे गणित जरा वेगळेच असते.  ते काय व कसे आपल्या स्मृतीपटलावर अवचित उमटून जाते ना तेच तर कधी कधी कळतच नाही.  त्यात जर का हे क्षण प्रेमाचे असतील ना तर काही विचारूच नका.  मनाची जी काही हळवी आणि केविलवाणी अवस्था होऊन जाते ना की पाहायलाच नको !  हेच ते क्षण जेव्हा आपल्या आयुष्यात आधी कधी तरी येवून गेलेले असतात.  पण त्यावेळेस त्या क्षणांचे महत्व म्हणा अथवा त्यांची प्रगल्भता आपल्याला जाणवलेली नसते.  असे हे क्षण आपल्या उतरणीला लागेलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून जातात तेंव्हा मात्र मन कसे गलबलून येते.  ह्या क्षणांमध्ये पुन्हा पुन्हा हरवून जावेसे वाटू लागते.  परत एकदा आपण तरुण झालो आहोत असेच काहीसे वाटायला लागते.

 आपले हे हळवे मन विचलित होऊन जाते.  मग त्या क्षणांच्या गुंत्यात अजूनच गुरफटून गेल्या सारखे होते.  त्या हरवलेल्या क्षणांची महती कळायला लागते आणि काय आश्चर्य, काही काळासाठी का होईना आपण ह्या क्षणांच्या आठवणींमध्ये इतके रमून जातो की त्यातून बाहेर येवूच नये असे वाटते.  ह्या क्षणांच्या ऋणात राहणे आपल्यला सुखद वाटायला लागते.  माझ्या मनात जे काही चालले आहे ना अगदी तेच माझ्या सारख्या समवयस्क असलेल्यांच्या मनातही नक्की चालू असणार ह्याची मला खात्री वाटते.  अहो, मी फक्त कागदावर उतरवण्याचे धारिष्ट्य केले आहे एवढेच.  त्याचे काय आहे, की त्यामुळे आपले मन जरा हलकं होतं व अजून असेच काही सुखद क्षण राहिलेत की काय असे वाटायला लागते आणि आपले मन त्या क्षणांच्या शोधात भरकटायला लागते हो. 

माझा एक अनुभव आहे, जो मी तुम्हांला सांगतो.  ह्या क्षणांच्या ऋणात म्हणा किंवा त्यांच्या आठवणीत मन जे काही रमते ना, ते दुसऱ्या कशातही रमत नाही, बर का !  त्यामुळे माझे तुम्हांला एक सांगणे आहे, की तुम्हीं जरा तुमच्या स्मरणशक्तीला थोडासा ताण द्या आणि आठवा ते सुखद, हळवे, कोमल, मोकळे, रसिक, सुहासिक, प्रांजळ, अगतिक, वास्तविक, प्रामाणिक, प्रेमळ, मायाळू, असे काही क्षण आणि बघा ना, आपल्या मनाचे सोंदर्य कसे झळाळून निघते ते !  मला तर ना, ह्या क्षणांचा मोह आवरतच नाही.  जरा वेळ मिळाला की मी त्यांच्यात रममाण होऊन जातो.  अगदी भान हरवून बसतो.

तसे पाहायला गेले तर काही काही क्षण हे थोडेसे दुखरे ही असतात हो.  पण त्याच्याही आठवणी जर का ताज्या झाल्या ना की आपल्याला आपण आयुष्यात केलेल्या चुकांची आपसूकच आठवण येते.  आपल्या नकळत आपण त्यात भरडल्या गेलेल्यांची क्षमा मागून जातो.  आपल्याला माहिती असते की आता फार उशीर झालेला आहे.  तरी आपले मानसिक समाधान मिळविण्याचा आपला हा एक प्रामाणिक प्रयत्न मनाला थोडासा दिलासाही देवून जातो.  शेवटी काय आहे, ह्या जन्मी केलेल्या पाप-पुण्याचे मोजमाप आणि त्याचा हिशेब येथेच द्यावा लागतो.  सगळा ठोकताळा येथेच बांधावा लागतो.  हा नियतीचा नियम आहे.  स्वर्ग-नर्क काही नसते हो.  हे सुखद क्षणच आपले स्वर्ग असते तर दुखरे क्षण हे नर्क असावे असे वाटते.  क्षणाच्या ऋणात राहूनच कर्म करत राहायचे असते.  जीवन हे असेच असते, ते हसत हसत जगायचे असते.

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०  

No comments:

Post a Comment