Monday 5 June 2017

पुणे - आंबोली – वेंगुर्ला - आंबोली – पुणे – कुटुंब रंगले सहलीत...



पुणे - आंबोली – वेंगुर्ला - आंबोली – पुणे – कुटुंब रंगले सहलीत...
 
कधी नव्हे ते मी बसने घरच्यांबरोबर सहलीला जाण्याचे मान्य केले होते.  कारण, आजवर मी कधीच माझ्या गाडीशिवाय सहलीला गेल्याचे मला आठवतच नाही !  मला की नाही स्वत: वहान चालवत प्रवास करायला फार आवडते.  म्हणजे गाडी चालवणे हा माझा सगळ्यात आवडता छंद आहे.  त्यात जर का किशोर-मुकेश गाणी लावली ना तर मग काय बघायलाच नको.  गाडी आपोआप एका वेगळ्या लयीतच चालत राहते.  मी सगळ्यांमध्ये असूनही कोणात नसतो.  हीच तरी खरी मज्जा असते सहलीची.  
 
२७ मे २०१७, भल्या पहाटे ६ वाजता (माझ्या साठी ही भली पहाटच आहे) माझी स्वारी सगळे आवरून तीन दिवसांचे लागणारे सामान पिशवीत भरून तयार होऊन बसलो होती.  बरोबर ६ वाजता मिनी बस दारात येऊन थांबली होती.  पण आमचे बंधुराज व त्यांचे कुटुंब पाषाणहून रवाना व्हायचे होते.  झाले माझे पित्त खवळले होते.  कारण कोणी जर वेळ नाही पाळली ना की माझी चिडचिड होते !  असो तरी मी खूप प्रयत्नांती स्वत:ला शांत केले.  त्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता व मी चिडचिड कडून तो लवकर येऊही शकत नव्हता.  जवळ जवळ तास भर वाट पाहिल्यानंतर ही स्वारी उगवली.  शेवटी आम्ही सगळे एकदाचे ७ वाजता बस मध्ये बसून आंबोलीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
 
गाडी सतरा माणसांची आणि माणसे आठ होती.  एकंदरीत सगळीच धमाल होती.  ‘बबलू’ नामक उत्तरप्रदेशी चालक त्याच्याच धुंदीत गाडी चालवत होता.  थोडा वेळ मी त्याच्या बाजूच्या जागेवर बसलो, पण नंतर मला त्याच्या चालवण्याच्या पद्धतीच्या इतका कंटाळा आला की मी आपला सरळ त्याच्या मागच्या सीटवर जाऊन बसलो.  ह्यात त्याची काहीच चूक नव्हती.  कारण त्याने कितीही ताणले तरी ती बस ताशी ७० च्या पुढे जाऊच शकत नव्हती.  मग काय रमत गमत, मजल दरमजल करत सकाळी ७ वाजता घरातून निघालेले आम्ही साधारण दुपारी ४ वाजता आंबोलीला पोचलो.  ३५० किलोमीटर प्रवासाला साधारण ९ तास लागणे म्हणजे माझ्या साठी शिक्षाच होती म्हणा !  पण माझा नाईलाज होता.  साधारण ८-१० वर्षांपूर्वी आम्हीं स्वत:च्या गाडीने जेंव्हा आंबोलीला आलो होतो तेंव्हा जेमतेम ५ तासातच पोचलो होतो.  हाच तर फरक आहे ना कार आणि बस मधे, हे समजायला मला जरा वेळच लागला.  नाहीतर सगळ्यांनी एकत्र जाण्यात जी मजा आहे ती कशी अनुभवता आली असती म्हणा.  ते काहीही असो, गाडीत नुसते बसून राहणे आणि ती मला चालवायला न मिळणे ही एकप्रकारची शिक्षाच वाटते हो.
 
सगळे कसे भुकेने कडकडले होते.  तसाही साताऱ्यात ९ वाजता भरपेट नाश्ता झाला होता सगळ्यांचा.  तरीही ४ म्हणजे अंमळ उशीरच झाला होतो. त्यामुळे गाडीतून उतरल्याबरोबर आम्हीं सगळे जेवायला गेलो.  रुममध्ये जाऊन सामान वगैरे टाकण्याच्या भानगडीत न पडता ‘पूर्वा आणि ‘चैत्याच्या’ पडत्या फळाची आज्ञा समजून आधी पोटपूजा केली आणि नंतर आपापल्या रूम मध्ये जाऊन आवराआवरी केली.  ‘पूर्वा’ म्हणजे माझी मुलगी जी आमच्या सहलीची लीडर होती आणि तिच्या मदतीला तिचा एक मित्र ‘चैतन्य’ आला होता, ज्याला आंबोलीच्या जंगलाची खडान्खडा माहिती होती.  अर्थात ही जबाबदारी आमचे जावई ‘मयुरेश’ ह्यांची होती परंतु त्यांना  ताडोबाच्या जंगल सफारीला जावे लागल्यामुळे, त्यांची चैत्यावर ही जबाबदारी टाकून पूर्वाच्या मदतीला धाडले होते. तसेही हे दोघेही एकतर जंगलप्रेमी आणि प्राण्यांची, पक्षांची, झाडांची, फुलांची, सापांची, बेडूक, फुलपाखरू, बांडगुळ, तसेच अगदी तिथल्या निसर्ग चक्राची इतम्भूत माहिती असलेले असल्यामुळे आमच्या सहलीबरोबर ज्ञानातही भर पडत होती हे मात्र निश्चित.
 
आम्ही सहा वाजता आंबोलीतील सनसेट पोइंटला पोचलो. सूर्यास्त होण्यास थोडा वेळ होता.  जवळ जवळ ६.४५ला सूर्यास्त होणार असा अंदाज आला.  ह्या ठिकाणावरून आंबोलीचा संपूर्ण घाट रस्ता एखाद्या अजस्त्र अजगरासारखा पसरलेला दिसत होता.  त्यात सूर्याची सोनेरी किरणे डोंगरावर पडल्यामुळे हा रस्ता एखाद्या हिऱ्या सारखा चमकत होता. आंबोलीचे वैशिष्ट्य म्हणजे हा परिसर बाराही महिने हिरवागार असतो व एवढ्या उन्हाळ्यातही वातावरण आल्हाददायक करतो.  आमचा एक तास निसर्गाच्या ह्या विहंगम दृशाने कधी गेला ते कळलेच नाही.  सूर्यास्त होतांना आकाशाच्या सोनेरी छटा आणि त्यात ढगांची होणारे निरनिराळे आकृतिबंध पहिले की मन कसे प्रसन्न होऊन गेले होते.  ह्या ठिकाणावरून जावूच नये असे वाटते.  जस जसा अंधार पडू लागला तसे आमचे पाय आपसूकच बस कडे वळायला लागले.  कारण सूर्यास्तानंतर मनात एक प्रकारची धाकधूक वाढायला लागते.  कारण गर्द झाडी, एकदम झालेला अंधार, रातकिड्यांची सुरु असलेली किरकिर, घनदाट जंगल.  त्यात इथेतर माणसांची वर्दळच नव्हती.  आम्हीं परत बस कडे जायला निघालो तर, चैत्याला रस्त्यावर “हरणटोळ” नावाचा एक साप दिसला, पठ्याने त्याला धरला व उचलून एका झाडावर ठेवला.  नाहीतर तो गाडीखाली आला असता.  त्यादरम्यान आमची सगळ्यांची जी काही फाटली होती ना की विचारू नका.  अहो, साप म्हटले ना की माझी तर बोबडीच वळते हो.  एकतर हा प्राणी बिनडोक आणि थंड रक्ताचा त्यात विषारी आहे का विनविषारी आहे हे कळतच नाही.  अर्थात ह्या पोरांना चांगली माहिती आहे हो, तरी आमचा जीव वरखाली होत होता.  त्याचा जीव वाचवला ह्या आनंदात आणि एकदाचा ह्या जंगलात एकतरी साप दिसला ह्या खुशीत आम्हीं त्या ठिकाणाहून परत जायला निघालो.  जाता जाता वाटेत बराच अंधार झाला होता.  चैत्या म्हणाला की वाटेत एक भूतबंगला आहे तो पाहून मगच पुढे जाऊ.  झाले भूतबंगला म्हणाल्याबरोबर आमची फाटली होती.  पण अंधाराचा फायदा घेऊन सगळे कसे आपल्याला अजिबात भितीवागैरे वाटत नाही असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.  एकदाची बस त्या भूतबंगल्याच्या जवळ पोचली.  हा भूतबंगला म्हणजे पूर्वीच्या सावंताची गढी आहे.  तिचा शेकडो वर्षात वापर नसल्यामुळे आणि ती घनदाट जंगलात असल्यामुळे तिथे प्रांण्याच्याच अधिवासच जास्त असतो.  तसेही ह्या अंधारात साधारण ५० ते ६० मीटर चालत जाऊन तो भूतबंगला पाहणे म्हणजे आम्हीं एखाद्या लढाईला चालल्यासारखे सगळ्यांना भासत होते.  अर्थात पूर्वा आणि चैत्या आमच्या पुढे होते.  ते जय्यत तयारीने आलेले होते.  त्यांनी लगेच त्यांच्या पिशवीतील चार पाच विजेऱ्या (टोर्च) काढून आम्हांला दिल्या आणि चालू लागले.  कोण कोणाशी बोलत नव्हते.  गपचूप त्यांच्या पाठीमागे चालत होते.  एकदाचा तो भूतबंगला आला.  भले मोठे आवर होते.  अगदी फुटबॉल खेळता येईल एवढे मोठे.  बंगल्यात आत शिरलो , एका मोठ्या दरवाज्यातून थोडेसे आत डोकावले, तर थोडीशी फडफड झाली.  झालं आमची भीतीने गाळण उडाली.  परतू विजेरीच्या उजेडात एक मलबार...नावाचा दुर्मिळ अशा पक्षी दिसला.  अंधार आता आणखी गडद झाला होता.  आकाश ही भरून आले असल्यामुळे चंद्र चांदणेही दिसत नव्हते.  जवळपास कुठेही उजेडाचा मागमूसही नव्हता.  आणि एकदम अचानक आमचे लक्ष एका झाडा कडे गेले.  ते झाड काजव्यांनी लगडलेले होते आणि चमचम चमकत होते.  अतिशय विलोभनीय असे हे दृश्य त्या भयाण भूतबंगल्याच्या परिसरात पाहून त्यातल्या त्यात मनाला हलके करून गेले.  आम्हीं तसेच पुढे चालत चालत आमच्या बसच्या दिशेने निघालो होतो.  आता आम्ही रस्त्याच्या खूप जवळ येऊन पोचलो होतो आणि मनातली भीतीही थोडी कमी झाली होती.  आणि काय आश्चर्य ज्या रस्त्यावर आमची बस उभी होती ना तिथपासून ते दूर दूर साधारण ५०० ते १००० मीटर अंतरावरील सर्वच्या सर्व झाडे काजव्यांनी लगडलेली होती आणि चमकत होती.  डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृश्य होते की, जे आमच्या स्मृतीपटलावर कायमचे कोरले गेले होते.  हे पाहून न राहवून आम्हीं ‘बबलू’ चालकाला सांगितले की तू बस घेऊन पुढे जा, आम्ही चालतच येतो. अर्थात मी मात्र बसमध्ये बसून पुढे गेलो कारण माझे पाय आता चांगलेच दुखायला लागले होते. त्याच आनंदात सायली रिसोर्ट वर परत आलो.  थोडेसे आवरून जेवायला बाहेर पडलो आणि पाहतो तर संपूर्ण आंबोलीचा परिसर धुक्याच्या दुलईत गायब झालेला.  नार्वेकरच्या खाणावळीत मस्तपैकी सामिष्ट भोजनावर ताव मारण्याशिवाय गत्यंतरच नव्हते हो.  प्रवासाचा शीण तर कुठल्याकुठे गायब झाला होता.  जेवण झाल्यावर पूर्वा आणि चैत्याने चला जंगलात थोडेसे फिरून येऊ असा आवाज टाकला.  सगळे लगेच तयार झाले.  फक्त एकच अट होती की चालत जायचे आहे.  त्यामुळे मी आपोपाप कटाप झालो.  कारण आता माझे पाय चालणे अशक्य होते.  जरी माझी मानसिक इच्छा होती तरी शारीरिक तयारी नसल्यामुळे मी थोडासा खट्टू होतो.  अर्धा पाऊन तास सगळे भटकून परत आले आणि अशा रीतीने सहलीचा पहिलाच दिवस छान गेल्याच्या आनंदात खोलीवर आल्याबरोबर अंथरुणाला पाठ लागताच गुडुप्प झालेले होते.
 
२८ मे, दुसरा दिवस, जो उजाडला तो एक नवचैतन्य घेऊनच.  जसे काही त्याला महिती होते की अरे ही शहरातली माणसे दमतात, थकतात कष्ट करून, भौतिक सुखाच्या मागे लागून लागून त्याचा जीव अगदी मेटाकुटीला आलेला असतो.  त्यांना तुझ्या ह्या निसर्ग सौंदर्याने थोडसा दिलासा दे, मन हलक कर त्याचं. काय सांगू, रात्रीच्या धुक्याच्या दुलईतून आंबोली अजूनही बाहेर आलेली नव्हती हो.  कोकणातली ती लाल माती, पानाफुलांवर पडलेली दवबिंदुंची ती मखमली चादर.. नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत निसर्गाचा हा अनमोल नजरा मनात साठवता साठवता दमायला झालं होतं.  जस जसा सूर्य वर येऊ लागला तस तशी, आंबोली जागी होऊ लागली होती.  पक्षांच्या किलबिलाटाने सगळे वातावरण कसे मंत्रमुग्ध करून टाकले होते.  त्याच उत्स्च्हात आम्ही नाश्ता केला आणि बस मधून आंबोली घाटमार्गे वेंगुर्ल्याला जायला निघालो.  आंबोली घाट म्हणजे निसर्गाचे वरदान लाभलेला अतिशय विलोभनीय असा परिसर आहे.  साधारण ११ वाजता आम्हीं वेंगुर्ल्यातल्या समुद्र किनारी पोचलो.  तेथील ‘मर्मेड’ नावाच्या एका हॉटेल मध्ये नाश्ता केला.  समुद्रात त्याच वेळेस भरती चालू असल्याचे कळले व आम्हांला सांगण्यात आले हीच ती उत्तम वेळ आहे समुद्राच्या पाण्यात खेळण्याची.  अहो खेळ कसला, एक तर पावसाळी वातावरण त्यात भरती चालू होती आणि समुद्र खवळलेला होता.  मी बापडा मस्तपैकी वाळूत बसून राहिलो आणि सगळ्यांचे कपडे आणि मोबाईल सांभाळण्याचे तसेच फोटो काढण्याचे आवडते काम करत बसलो.  एकेकाची गमत पाहत होतो.  माणूस निसर्गापुढे किती शुद्र आहे ह्याचे प्रत्यंतर पहात होतो.  एक एक लाट किनारी येत होती आणि एखाद्या पुस्तकाची पाने उलटावी तशी माणसाना उचलून इकडून तिकडे फेकत होती.  आमची तर हसून हसून पुरेवाट लागली होती.  समुद्रात भिजायला काही वाटत नाही.  परंतु त्या नंतर अंघोळीची जर सोय नसेल ना तर खरी वाट लागते राव.  तसे आमची सोय ‘मर्मेड’ मध्ये झालेली होती त्यामुळे काळजी नव्हती.  दुपारच्या जेवणात मस्तपैकी मासे आणि माश्याचे कालवण भात असा बेत आखल्यामुळे सगळ्यांची तब्बेत खुश होती.  आज मी जवळ जवळ ७ वर्षांनी मासे खाणार होतो.  सगळे पथ्यपाणी बाजूला ठेवून मी आज मनसोक्त जेवलो.  सौद्ल आणि प्रोम्प्लेट हाणला.  मनोमन आचाऱ्याला आशीर्वाद दिले आणि आंबोलीच्या परतीच्या प्रवासाला सुरवात केली.  वाटेत सावंतवाडीस थांबलो.  काही लाकडी खेळणी घ्यायची होती.  तेथील तळ्याच्या काठी बस लावली आणि तळ्यातील मासे पहात बसलो होतो. बाकी सगळे खरेदीला गेले होते त्यामुळे मी जरा निवांत होतो.  समोर एक वडापावची गाडी होती, त्यांच्याकडून वडापाव आणि एक चहा असा बेत उरकून तळ्याकाठी बसलो होतो.  तेवढ्यात कोणीतरी जोरात ओरडले साप, साप.  झाले माझी फाटली.  बघतो तर काय तळ्यात ६ फुटी एक पाणसाप माश्याच्या शिकारीचा प्रयत्न करत होता.  अर्थातास त्याचा हा प्रयत्न आपलेच काही भाऊबंद वरून पावाचे तुकडे पाण्यात टाकून फसवत होते.  सगळे आले.  चहा घेतला आणि आम्हीं आंबोलीकडे जायला निघालो.  साधारण ५ वाजेले होते.  संध्याकाळ झाली होती.  सूर्य अस्ताला चालला होता आणि आम्हीं आंबोली घाट चढत होतो.  घाटमाथ्यावर पोहचेपर्यंत सूर्यास्त होत होता आणि पुन्हा एकदा निसर्गाचा तो अद्भुत नजरा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न सगळे करत होतो.  समुद्रसपाटीपासून साधारण १२०० मीटर वर आल्यानंतर हवेतील तो आल्हाददायी बदल अंगावर रोमांच उभे करीत होता.  असे वाटत होते की इथून जाऊच नये परत.  पण काय करणार ! खोलीत परत आल्याबरोबर सगळ्यांनी परत एकदा अंघोळ करण्याचा बेत ठरवला.  मी मात्र कोरडा होतो त्यामुळे आंघोळीचा प्रश्नच नव्हता.  संध्याकाळचे समधुर वातावरण न्याहाळता, न्याहाळता, आनंद ह्या चित्रपटातील, मुकेशे गायलेले अप्रतिम असे गाणे माझ्या ओठावर आले आणि माझी संध्याकाळ अजून भावूक करून गेले.   
कही दूर जब दिन ढल जाये, सांज की दुल्हन बदन चुराये, चुपकेसे आये
मेरे खयालोन्के आंगण मै, कोई सापनोके दीप जलाये...
 
जेवण झाल्यावर रात्री जंगलात फिरायला जायचे असा बेत पूर्वा आणि चैत्याने आखला होता.  जेवण उरकायला रात्रीचे दहा वाजले.  हॉटेल बाहेर आलो आणि अक्षरश: एका फुटावरचे सुद्धा दिसेनासे झाले.  इतके गडद धुके पसरले होते.  मन एकदम प्रसन्न झाले.  बबलू नामक चालकाला बस काढायला सांगितली तर पठ्ठ्या चक्क नाही म्हणाला.  म्हणतो कसा, साहब, ‘इस वातावरण मै गाडी चलाना मुश्कील है’.  त्याचेही बरोबर होते.  आम्हीं पण फार गळ नाही घातली त्याला.  चक्क चालत जंगलात निघालो.  चेकपोस्ट पर्यंत गेलो आणि आमच्या लक्षात आले की ह्या वातावरणात चालतही जाणे मुश्कील आहे.  गपुचूप परत हॉटेल वर आलो आणि बदाम सात खेळत बसलो.  मला २ -३ डाव झाल्यानंतर कंटाळा आला.  मी सगळ्यांना तीन पत्ते खेळा असे सुचविले आणि ज्ञानदा, शुश्रुतला डाव शिकवून खोटे पैसे लावून शेवटी खेळलो.  वंदना, संध्या, किशोर, पूर्वा आणि चैत्या खोटे का होईना खेळले मजा आली.  धमाल केली.  पोरं खुश झाली.
 
२९ मे, तिसरा आणि शेवटचा दिवस.  सकाळी ७ वाजताच नाश्ता करून आम्हीं आंबोलीतून प्रस्थान ठेवले कारण परतीच्या वाटेत कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते.  ठरल्याप्रमाणे दुपारी महालक्ष्मीचे दर्शन घेतले.  सोमवार असल्यामुळे तुरळक गर्दी होती.  तरीही १ तास दर्शनास रांगेत उभे राहायला लागले.  पण एक आत्मिक समाधान लाभले देवीचे दर्शन झाल्यावर.  पुढचा बेत तर आधीच ठरलेला होता.  कोल्हापुरात आल्यावर हॉटेल पदमा मध्ये तांबडा पांढरा रस्सा चिकन / मटन थाळी नाही खाल्ली तर मला तरी पाप लागते आणि मी ते पाप लागून घेत नाही.  मनसोक्त जेवलो अगदी चालक बबलू सुद्धा ताव मारून जेवला.  त्याला मी फक्त एकदा विचारले की गाडी चालवतांना झोपणार नाहीस ना !  म्हणजे मनाची खात्री करून घेतली.  पण पठ्ठ्याने एकदम सुरक्षित आणि नियोजित वेळेत आम्हांला अगदी सुखरूप आमच्या घरी पोहोचवले.
 
एक मात्र नक्की सांगतो की आपल्या सह्याद्रीच्या कुशीत अमुल्य असे जैववैविध्य आहे आणि ते जर तुम्हांला अनुभवायचे असेल ना तर, मयुरेश, पूर्वा, चैतन्य, मकरंद, शौरी असे त्याचे गाढे अभ्यासक व त्याचा ध्यास असलेल्या मंडळींबरोबर सहलीला जाणे जास्त संयुक्तिक वाटले.  एक तर आपल्याला निसर्गाचा आनंदही लुटता येतो आणि त्याची अगाध महिमाही ह्या पोरांमुळे अनुभवायला मिळते. माझा तरी असा अनुभव आहे.  तुम्हीं सुद्धा एकदा ह्याची अनुभूती घेऊन पहाच.   
 
एकंदरीत दोन रात्रींची का होईना पण एक छोटीशी कौटुंबिक सहल पार पडल्याचे आत्मिक समाधान मनाला मिळाले व पुन्हा एकदा रोजच्या रामरगाड्यासाठी वाहून घेण्याची उर्जा देवून गेले.  लय भारी वाटलं रावं !
  
रविंद्र कामठे, 

No comments:

Post a Comment