Thursday 6 December 2018

“जगावं की मरावं”, “जगावं की मरावं”...”To be or not to be”


जगावं की मरावं”, “जगावं की मरावं”...”To be or not to be”

सारखे सारखे हेच विचार डोक्यात घोळत होते अगदी शेक्स्क्पिअरच्या नाटकातील त्या वाक्यासारखे.. “To be or Not to be”.
ही अशी वाक्ये नाटकांमधल्या पात्रांच्या तोंडून ऐकायला छान वाटतात.  परंतु तीच वाक्ये जेंव्हा आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात डोकावू लागतात ना तेंव्हा काळजाचं पाणी पाणी होतं हो ! ह्या वाक्यांचे अर्थच डोक्यात घुसत नाहीत,  अर्थ तर त्याहून लागत नाहीत ! होय मी हा अनुभव नुकताच घेतला आहे.  अगदी मनापासून सांगतो की असं मला वाटणं हेच मुळी माझ्या स्वत:च्या पचनी पडलं नव्हतं.  माझा सुद्धा ह्यावर विश्वासच बसत नव्हता हे मात्र खरं !  असं काय झालं की ज्यामुळे मला जगावं की मरावंअसे वाटले असेल ! तसं फारस काही गंभीर प्रकरण नाही.  म्हणजे माझ्याच मनाचा वेडेपणा म्हणा हव तरं.  पण असं होतं कधी कधी आपल्या आयुष्यात.  हे मात्र मी अगदी निष्ठून सांगू शकतो.  म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण कधी तरी आलेला असतो की ज्यामुळे आपण थोडेसे व्यथित होतो आणि काही काळासाठी तो एक क्षण तुम्हांला मानसिकरीत्या ढासळूनही टाकतो अथवा आयुष्याला नवी उभारी देऊन जातो.  मनाच्या कोपऱ्यात कित्येक वर्ष जतन केलेला तो एक क्षण असा असतो जो आपल्या काळजात अगदी शांतपणे विसावलेला असतो.  आयुष्याच्या उतरणीला तो क्षण आपसूकच पुन्हा एकदा आपल्या जवळ येतो, आपल्याला स्पर्श करतो आणि अलगदपणे आला तसाच लगेचच दूर निघूनही जातो.  आपण त्या क्षणाकडे,  अगदी तो पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत पहात राहतो. त्यावेळेस आपल्याला काहीच म्हणजे काहीच सुचत नाही.  नंतर जेंव्हा तो क्षण आपल्यापासून दूर गेल्याची जाणीव होते ना,  तेंव्हा त्या क्षणाला वाटतं.. जगावं की मरावं... ”To be or not to be”.  प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादाच क्षण असतोच की ज्यामुळे आपल्या मनात तात्पुरती हा होईना ही भावना उत्पन्न होते आणि तीच खुण असते आपण माणूस संवेदनशील माणूस असल्याची.  स्वत:शी प्रामाणिक असल्याची. एक नक्की सांगतो की हा क्षण जपण्यात आपण कधीही कमी पडता कामा नये.  मनाच्या एका कोपऱ्यात अगदी अलगदपणे जतन करून ठेवलेला हा एकच क्षण असा असतो की जो आपल्याला हे आयुष्य जगण्यास मदत करत असतो.  बऱ्याचदा हाच तो एक क्षण आपले सारे आयुष्य व्यापून टाकतो . आयुष्याच्या ह्या बहुरंगी आणि बहुढंगी नाटकाचा हा एकच क्षण सूत्रधार असतो, जो आपल्याला एखाद्या कठपुतलीच्या बाहुली सारखे नाचवत असतो आणि आपणही त्याच्या तालावर बेलाशकपणे नाचत असतो.  त्यालाच तर आयुष्य म्हणतात !  म्हणजे आपण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जे काही जगतो त्याला आयुष्य न म्हणता ह्या एका क्षणाला आयुष्य म्हणायचे की काय ! तो एक क्षण कुठलाही असू शकतो.  अर्थात तो प्रत्येकाला थोडेसे आत्मपरीक्षण करून मनाच्या कप्यात खोल खोल जाऊन,  अगदी काळजाच्या तळाशी जावून शोधायचा असतो.  तो क्षण कसा असतो,  काय असतो,  आयुष्यात केव्हा आलेला असतो,  कुठे आलेला असतो,  कोणाबरोबरचा असतो,  कशामुळे अवतरलेला असतो,  त्याचे त्यावेळेस चांगले वाईट काय परिणाम झालेले असतात,  त्यात कोणी सुखी तर कोणी दु:खी झालेले असते का ?  असे आणि अंजून किती तरी प्रश्न आपल्याला पडतात.  अर्थात ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सापडतातच असेही नाही.  आणि हो जरी उत्तरे अथवा उत्तर सापडले तरी,  शेवटी एकच प्रश्न उरतो तो म्हणजे जगावं की मरावं”.. To be or not to be..

तरीही असं वाटतं की..

आयुष्य इतकंही सोपं नाही, जितकं आपण समजत असतो |
आयुष्य इतकंही अवघड नाही, जितकं आपण ते करून ठेवतो ||


रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment