अतुल,
मित्रा आज तुझ्या सेवापूर्ती सोहळ्यात तुझ्या सहकारी व अधिकारी वर्गाकडून तुझे कौतुक ऐकताना मन भावविवश झाले होते. तू तुझ्या आई बाबांची, भावा बहिणींची व सर्व कुटुंबाची आम्हा मित्र मैत्रिणींची मान अभिमानाने उंचावलीस.
हेमा, ऐश्वर्या, अथर्व आणि अमेरिकेत स्थाईक झालेली अदिती आणि जावई ह्यांची सुध्दा अवस्था तीच असेल हे नक्की.
तू जमवलेला गोतावळा, मित्र परिवार आणि सहकारी पाहून मला तुझे फार कौतुक वाटले व मी तुझा मित्र असल्याचा गर्वही वाटला. ३५ वर्षांच्या आपल्या निखळ व निस्वार्थी मैत्रीचा प्रवास एखाद्या चित्रफितीसारखा माझ्या स्मृतीपटलावरुन हळूहळू सरकत होता व मन भावनेने ओथंबून वाहत होते.
मला तर तुझे कौतुक करण्यास शब्दही सुचत नव्हते. फक्त एवढेच वाटले की;
अतुल म्हणजे माणुसकीचे अधिष्ठान,
अतुल म्हणजे जिव्हाळ्याचे प्रतिष्ठान,
अतुल म्हणजे संस्कारांचे संविधान !
तुझ्यातला एक सच्चा मित्र व तू पदोपदी अडीअडचणीच्या काळात माझ्या आणि वंदनासाठी धावून आलेले क्षण आपसुकच स्मृतीपटलावर अश्रुरुपातून घरंगळत होते. आपण एकत्रीतपणे घालवलेले सर्व क्षण भाऊगर्दी करुन व्यक्त होण्यासाठी धडपडत होते. त्यांची ती रस्सीखेच पाहून मन गलबलून गेले होते वा त्या नादात मला व्यक्त होण्याचेही भान नाही राहिले.
ह्या सोहळ्यामुळे मला तुझ्या कामातील संघर्ष प्रकर्षाने जाणवला. तुझी जिद्द, प्रामाणिकता, नियोजनात्मक वागणूक, आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन, प्रगल्भ वैचारिक बैठक, शाखेचे व संघ परिवाराचे तुझ्यावर झालेले संस्कार, सचोटी, सुसंस्कारी विचार व तितकेच त्यांना आचरणात आणण्याची तुझी यशस्वी धडपड अगदी सहजपणे जाणवली. तुझी सामाजिक व सांसारिक जडणघडण तर वाखाणण्याजोगीच आहे.
अतुल,
तू एक आदर्श मुलगा आहेस. कुटुंबाचा व गोतावळ्याचा जीव की प्राण आहेस.
तू, हेवा वाटावा असा हेमाचा नवराही आहेस.
तू, तुझ्या लेकरांचा तर श्वास आहेसच, परंतु त्यांच्यासाठी तू सुसंस्कारांचे चालते बोलते विद्यापीठच आहेस.
तू, प्रगल्भ शिक्षक तर आहेसच, परंतू सेवाभावी वृत्तीने ज्ञानदान करणारा दाताही आहेस. तुझ्या विद्यार्थी व सहकार्यांचा तू फार मोठा आधारही आहेस.
तू, मित्रांसाठी तळमळणारा सच्चा दुवा आहेस, म्हणूनच मित्रांनाही हवाहवासा आहेस.
तू, एक उत्तम वक्ता आहेस, तितकाच अभ्यासूही आहेस. तुला इतिहासाची जाण आहे व तो सांगण्याची तहानही आहे.
तुझ्यासारख्या प्रगल्भ व्यक्तिमत्वांची समाजाला व संसाराला खरी गरज आहे.
तुझ्या सारख्या मित्रामुळे मी खूप समृध्द झालो आहे. मला आणि वंदनाला तर तुझा फार आधार आहे. म्हणूनच, सहज म्हणावेसे वाटते की;
जीवनात मित्र हा विचार आहे
तो नसणे हा तर आजार आहे ।।
सुख दुःखात ह्या जीवनाच्या
मित्र हाच एक आधार आहे ।।
लाभणे मित्र सुदाम्यासारखा
हा तर एक दैवी प्रकार आहे ।।
अतुल,
आयुष्याच्या ह्या सुखद वळणावर, पुढील सुखकारक प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा.
आजचा सेवापूर्ती सोहळा अप्रतिमच झाला. संतोष देशपांडेने जेवणही खूप स्वादिष्ट बनवले होते.
स्मृतींचा आणि भावनांचा हा सुरेख मेळ होता. जो तुझ्या कर्तृत्वाला शोभेसा असाच होता.
आता तू, मी, वंदना आणि हेमा मिळून निवृत्ती पश्चात आयुष्यात धमाल करु. आपली लेकरं तर असतीलच आपल्या बरोबर, त्यांच्या त्यांच्या सोयी सवडीने.
रवी आणि वंदना
सोमवार २८ मार्च २०२२.
जाता जाता माझी एक समर्पक कविता,
|| क्षण निवृत्तीचा ||
क्षण निवृत्तीचा, असतो दुभाषी,
एक मन म्हणते, निष्क्रिय झालासी,
दुजे मन सांगते, सक्रीय व्हावेसी ||
क्षण निवृत्तीचा, असतो विलक्षण,
एक मन करते, भूतकाळाचे परीक्षण,
दुजे मन सांगते, भविष्याची उजळण ||
क्षण निवृत्तीचा, असतो दुर्मिळ,
एक मन म्हणते, स्मृती तू उजळ,
दुजे मन सांगते, क्षण हे उधळ ||
क्षण निवृत्तीचा, असतो अभिलाषी,
एक मन म्हणते, उरलास सकळासी,
दुजे मन सांगते, जुळवून घे समाजासी ||
रविंद्र कामठे!
No comments:
Post a Comment