Tuesday, 31 December 2019

मागोवा सन २०१९चा

मागोवा सन २०१९चा
 २०१९ उजाडलं तेच मुळी माझ्या मागील एक-दोन वर्षांच्या अथक परिश्रमाच्या व शारीरिक व्याधींच्या येऊन गेलेल्या आणि नंतर शमलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवरच. ऑक्टोबर २०१७ पासून माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती.  माझ्याही नकळत मी एका दु:खाच्या खाईत कधी लोटलो गेलो होतो तेच मला कळले नव्हते. तरीही नियती इतकीही निष्ठुर नव्हती म्हणून; माझी बायको वंदनाच्या, मुलगी-जावई पूर्वा-मयुरेशच्या पुण्याईने व मानलेली बहिण स्मिताच्या सहकार्याने निभावून गेले.
कसाबसा सावरत २०१७ आणि २०१८ ही दोन वर्षे ढकलत काढत होतो. खूप साऱ्या मानसिक आणि शारीरिक तक्रारींवर मात करत करत परिस्थितीशी झगडत होतो. ह्याच पार्श्वभूमीवर २०१९ साल उजाडले आणि मनाशी एक संकल्प केला की; आता रडत अथवा कुढत नाही बसायचे.  आपले आयुष्य हे एका नव्या दिशेने न्यायचे व समृद्ध करायचे !  झाले मग काय; मनाशी पक्का निर्णय झाला आणि ठरवले की नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घ्यायची आणि उरलेले आयुष्य हे साहित्य क्षेत्रासाठी आणि तब्बेतीला आणि खिशाला झेपेल अशा समाज सेवेसाठी द्यायचे.  बायको वंदनाची तर माझ्या ह्या संकल्पनेला मोलाची साथ मिळाली आणि मला माझ्या ह्या निर्णयाची पूर्तता करता आली.  जानेवारी महिन्यातच मी VINSYS मधील नोकरीचा राजीनामा द्यायचा ठरवले व तसे VINSYSचे सर्वेसर्वा सौ. विनया पाटील आणि श्री. विक्रांत पाटील ह्यांना सांगितले.  अर्थातच माझा हा निर्णय सर्वप्रथम झिडकारण्यात आला आणि नंतर जवळ जवळ एक ते दीड महिन्यानंतर माझे म्हणणे ऐकून घेतल्यावर स्वीकारण्यात आला.  माझ्या ह्या निर्णयाचे नंतर माझ्या सर्वच सहकाऱ्यांनी स्वागत केले.  ३१ मार्च २०१९ रोजी मला VINYSYS तर्फे निवृत्ती निमित्त एक अविस्मरणीय असा सोहळा आयोजित करून मला अतिशय सन्मानाने निरोप देण्यात आला जो मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी विनया पाटील, विक्रांत पाटील, उमेश थरकुडे, सदानंद वझलवार, नितीन शेंडे, स्मिता तोंडे आणि सुधीर ढवळे सरांचा खूप ऋणी आहे.
निवृत्तीनंतर ठरल्याप्रमाणे मी काही दिवस आराम करून माझ्या साहित्य क्षेत्राच्या सेवेला सुरवात केली. अर्थात त्यासाठी ‘चपराक प्रकाशन’ चा सर्व समूह (घनश्याम सर, शुभांगीताई गिरमे, बेलसरेताई, अरुण कमळापुरकर, दिलीप कस्तुरे सर, विनोद पंचभाई, ब्रम्हे काका, माधव गिरसर, हर्षद क्षीरसागर, सागर सुरवसे, गणेश अटकुळे, प्रमोद येवले) माझी अत्यंत आतुरतेने वाटच पहात होता.  चपराकचे सर्वेसर्वा श्री. घनशाम पाटील सर माझ्या ह्या निर्णयामुळे खूपच खुश होते व मला सातत्याने नवनवे लिखाण करण्यास उद्युक्त करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले व माझ्याकडून “अनुभवाच्या शिदोरीतून” हे एक सदर चपराकच्या साप्ताहिकात चालवले गेले. हे सदर चपराकच्या सर्व वाचकांना इतके आवडले की ह्या सर्व लेखांचे एक पुस्तकच प्रकाशित करण्याचा अतिशय प्रेमळ आग्रह सगळ्यांकडून करण्यात आला आणि त्याची फलश्रुती म्हणजे १९ ऑक्टोंबर २०१९ ला चपराकच्या साहित्य महोत्सवात माझ्या “तारेवरची कसरत” ह्या अनुभवकथन पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द व्यवस्थापन तज्ञ आणि महाराष्ट साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांच्या हस्ते व सुप्रसिध्द संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ ह्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आले.

निवृत्ती नंतर काय करायचे हा प्रश्न मला तरी पडलाच नाही. कारण ‘चपराक प्रकाशन’ मध्ये माझ्या साठी जे काही आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे व मला आवडणाऱ्या सेवेसाठीचे वातावरण तयारच होते. ते म्हणतात ना; “आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे” असेच काहीसे झाले होते माझे.
माझ्या परीने मी चपराकला माझा हा सगळा मोकळा वेळ देऊ केला होता; तो ही कुठल्याही आर्थिक आणि व्यावसायिक फायद्या शिवाय ! माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की साहित्यक्षेत्राला काहीतरी योगदान द्यायचे व साहित्य क्षेत्रातील “चपराक प्रकाशन” ह्या अतिशय प्रामाणिक, प्रगल्भ, परखड आणि रास्त अशा संस्थेच्या यशस्वी वाटचालीस माझा खारीचा का होईना हातभार लावायचा. माझ्या मनाशी मी अगदी ठामपणे ठरवले आहे की, निवृत्ती नंतर मी पैशासाठी अजिबात काम करणार नाही. मला आता अजिबात अर्थार्जन करायचे नाही.  त्याचे कारण आयुष्यात आजवर पैश्याच्याच मागे लागून शरीराची जी काही हेळसांड केली आहे तेवढी खूप झाली !  आता जरा समाजासाठी काही तरी करावे असे वाटते. ते ही मला जमेल आणि तब्बेतीला व खिशाला झेपेल अशा पद्धतीने !  त्यामुळेच मी चपराक साठी माझा वेळ कुठल्याही आर्थिक अपेक्षा न ठेवता देण्याचे ठरवले आहे व मी त्यावर खूप समाधानी आहे. जून महिन्यापासून मी चपराकला मी माझ्या सोईने वेळ देऊ लागलो व मला एका अर्थाने सुख आणि समाधान लाभू लागले, तब्बेतीस ही आराम वाटू लागला.  ह्याची प्रचीती म्हणजे गेले काही दिवस सातत्याने चपराकच्या संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांबरोबर होत असलेले दौरे व त्यामुळे साहित्य क्षेत्रामधील विविध कार्यक्रमांना लागत असलेली हजेरी, दिग्गजांची होत असलेली ओळख हे होय.  मला कुठल्याही मान, सन्मान, पुरस्काराची अजिबात अपेक्षा नाही आणि तेवढे माझे ना कार्य आहे ना कर्तुत्व आहे. आपण मनापासून जे काही काम करतो त्यात जर का योग्य त्या व्यक्तीची, संस्थेची साथ सांगत लाभली तर त्यामुळे जे काही सुख, समाधान आणि समृद्धीची भावना प्राप्त होते ना, ती हजारो, लाखो रुपये मिळवले तरी मिळत नाही आणि नेमकी तीच भावना मला ‘चपराक’ समूहा मुळे लाभली आहे.

माझ्या सामाजिक कार्याच्या उपक्रमातील अजून एक उपक्रम म्हणजे छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यास संस्थापक सदस्य म्हणून हातभार लावून प्रतिष्ठानच्या वतीने नजीकच्या भविष्यात विविध सामाजिक कार्य करणे. ह्यासाठी मी श्री.विश्वजित भाऊ कामठे व समस्त कामठे परिवाराचा त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाठी आभारी आहे.

मी आजवर ‘प्रतिबिंब’, ‘तरंग मनाचे’, ‘ओंजळ’, ‘प्रांजळ’ हे चार काव्यसंग्रह आणि ‘तारेवरची कसरत’  अनुभवकथन पुस्तक प्रकाशित केले आहे.  त्यामुळेच ह्या निवृत्तीचा फायदा घेऊन अजून खूप सारे लिखाण करून साहित्य संपदेत भर घालण्याचा माझा मानस आहे व त्यासाठी मला चपराकची फार मोलाची आणि हक्काची साथ मिळते आहे हे माझे भाग्यच म्हणावे लागेल.
ह्या प्रास्तविकानंतर तुम्हांला माझे २०१९ हे सालं कसे गेले ह्याची प्रचीती आलीच असेल !  त्याच धर्तीवर मला माझे पुढील आयुष्यही समृद्ध करायचे आहे.  ह्या निमित्ताने २०१९ मधील काही क्षणचित्रे तुमच्या माहितीसाठी देतो आहे.
म्हणूनच फक्त २०१९ ह्या गेल्या वर्षालाच नव्हे तर माझ्या आजवरच्या ५६ वर्षांच्या आयुष्याला माझा विनम्र प्रणाम करतो आणि येणाऱ्या २०२०चे नव्या उमेदीने स्वागत करतो.
काय योगायोग आहे पहा; आजच ३१ डिसेंबर २०१९ ला मला ८-९ फेब्रुवारी २०२९ मध्ये अलिबागला होण्याऱ्या ६ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे सरांचे निमंत्रण मिळाले आहे.
चला तर नवीन वर्षाची म्हणजेच २०२०ची सुरुवात चांगलीच झाली आहे असे म्हणावयास हवे. आत न थकता नव्या उमेदीने व उभारीने कार्यास लागणे आहे.  एक सांगतो; असे आपल्या मनासारखे घडायला सुद्धा माणसाचे नशीब असावे लागते ! 
“मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतो”

रविंद्र कामठे.
**माझ्या "तारेवरची कसरत ह्या अनुभवकथन पुस्तकाचा पुस्तकाचे मानधन मी ममता अंध अनाथ कल्याण केंद्रास मदत म्हणून देणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रती विकत घेऊन माझ्या ह्या सामाजिक उपक्रमास तुमची मोलाची साथ द्यावी ही नम्र विनंती. आपण हे पुस्तक चपराक, बुकगंगा आणि Amazonच्या संकेतस्थळावरून मागवू शकता. त्यांची लिंक खाली देत आहे.
https://www.amazon.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A4-Ravindra-Kamthe/dp/9386421321/ref=mp_s_a_1_2?keywords=chaprak&qid=1576983592&sr=8-2&fbclid=IwAR0hWeIcyOIapYnSuRGnFTw7KYJolk0AexU6zj-sScu2R8_nkCmIE1AJx28

“शरद पवार” मला उलगडलेलं एक स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व


“शरद पवार” मला उलगडलेलं एक स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व

माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचे १२ डिसेंबर २०१९ला ८० व्या वर्षात पदार्पण होत आहे. मी सर्वप्रथम साहेबांचे अभिष्टचिंतन करतो.  त्यांना उदंड आयुष्य लाभो व उत्तम स्वास्थ्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
साहेबांचा भारतीय राजकारणातील ५०हुन अधिक वर्षांचा कार्यकाळ पाहता त्यांचे व्यक्तिमत्व हे अतिशय प्रगल्भ व स्फूर्तीदायक असेच आहे हे निर्विवाद आहे.  साहेबांच्या अगणित नेतृत्वगुणांपैकी काही नेमक्या आणि मोजक्या नेतृत्व गुणांचा ह्या निमित्त उहापोह करणे हा माझ्या ह्या लेखाचा उद्देश आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना सोडून इतर सर्व पक्षांचा झालेला दारूण पराभव व त्यांनतर विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान साहेबांनी केलेले अतिशय सूचक असे वक्तव्य म्हणजे “ महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालाच्या विरुद्ध निकाल विधानसभेचा लागतो” हे सत्ताधारी पक्षांनी नोंद घ्यावी.  हे विधान साहेबांच्या राजकीय दूरदृष्टीचे द्योतक होते असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपा ह्या सर्वात मोठ्या पक्षाने फक्त आणि फक्त शरद पवार ह्यांनाच हेरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडून त्यांच्या प्रचाराची दिशा ठरवून घेतली होती. अगदी दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील कार्यकर्त्यानी; त्यांची लायकीही नसतांना फक्त शरद पवार  व त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कशी भ्रष्ट आहे हेच मतदारांना सांगण्यात व पटवून देण्यात वेळ दवडत होते आणि मतदारांची दिशाभूल करण्यात मश्गुल होते. प्रचाराच्या दरम्यान काही काही नेत्यांनी तर अतिशय खालच्या थराला जाऊन साहेबांवर टीकेची झोड उठवली होती.  साहेब त्यामुळे बिथरले तर नाहीच नाही; पण त्यांनी ह्या उद्दाम नेत्यांना त्यांना समजेल अशा त्यांच्याच भाषेत व त्यांच्याच पातळीवर जावून उत्तरे दिली तेंव्हा त्यांचाही थोडा गोंधळ उडाला होता हे मात्र निश्चित!  त्याचं काय आहे “नागव्या समोर नागवे होऊन गेल्याशिवाय त्याला आपण नागवे आहोत हे कळत नाही” ह्या म्हणीचा अर्थ साहेबांनी त्यांच्या विरोधकांच्या तोंडात मारून त्यांना एक सणसणीत चपराक दिली हे मात्र नक्की. साहेबांच्या राजकीय दूरदृष्टीने एक मात्र नक्की हेरले होते की काही झाले तरी भाजपा आणि शिवसेना ह्यांना जरी बहुमत मिळवले तरी ते पुन्हा युतीचे सरकार स्थापन करू शकणार नाहीत त्याचे कारण शिवसेनेने केलेला सत्तेत ५०:५० चा दावा हे होय; ज्याचे प्रत्युतर निकालानंतरच्या झालेल्या पत्रकार परिषदेत आले.
भाजपा आणि शिवसेनेत विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात मेगा भरती चालू होती व काही जेष्ठ आणि निष्ठावंत नेते विरोधकांच्या गळाला लागल्याचे आपण सर्वांनीच पहिले. एखादा पक्ष प्रमुख अशा वेळेस बिथरून गेला असता.  परंतु साहेबांच्या बाबतीत तसे काही घडले नाही; त्यांनी ह्या कठीण परिस्थितीतही संधी शोधून काढली व पक्षात राहिलेल्या इतर नेत्यांना एकनिष्ठ राहण्याची व आता आपला पक्ष अजून चांगल्या पद्धतीने वाढीस लागेल व विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच आधीच्या पेक्षा चांगले यश मिळवेल अशी आशा नुसतीच व्यक्त नाही केली तर निकालात त्याचे प्रत्यंतर दाखवून दिले आहे हे विशेष!  प्रतिकूल परिस्थितीत हातपाय गाळून न बसता त्या परिस्थितीतून संधी कशी शोधायची ह्याचे उत्तम उदाहरण साहेबांनी सर्वाना दाखवून दिले आहे.  ह्याचे उत्तम म्हणजे २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत इतक्या प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षाला हरवून आपले ५४ आमदार निवडून तर आणलेच पण बंडखोरांना चारलेली धूळ हे होय!  साहेबांनी नुसतेच स्वत:च्या पक्षाला बळ दिले नाही तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वहीन सहयोगी राष्टीय कॉंग्रेस पक्षालाही एकप्रकारे बळ दिले व त्यांचेही संख्याबळ वाढवण्यास मदत केली.  प्रचाराच्या दरम्यान साहेबांनी एखाद्या तरुणालाही लाजवले असा राज्यभर केलेला झंजावती दौरा. राजकीय सुडबुद्धीने सत्ताधारी पक्षाने साहेबांच्या वर लावलेली ईडीची (अंमलबजावणी संचनालय) चौकशी व त्यावर साहेबांनी खेळलेली चाल आणि कळस म्हणजे भर पावसात साताऱ्यात घेतलेली लोकसभेच्या प्रचाराची सभा; ज्यामुळे निवडणुकांचे निकालच अपेक्षित पणे बदलले गले व ते राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या पथ्यावरच पडले हे सर्वज्ञात आहेच.
साहेबांची मुत्सदेगिरी तर त्यांच्या आजवरच्या राजकारणाचा सार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा त्यांना असलेला अचूक अंदाज आणि भाजपा विरुद्ध एकमताने सर्व विरोधी पक्षाने एकत्रितपणे करावयाचे राजकारण; त्यासाठी नेतृत्व करण्याची असलेली त्यांची क्षमता व सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्यांच्यावर असलेली भिस्त ही साहेबांच्या मुत्सदेगिरीचे बोलके उदाहरण आहे.  त्याचे अतिशय ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस- राष्ट्रीय कॉंग्रेस व इतर छोटे पक्ष ह्याची महाविकासआघाडी हे होय व त्यांचे नेतृत्व करणारे साहेब हे होय.
साहेबांची संयमी वृत्ती ही तर त्यांच्या राजकारणातील कारकीदीचा कळीचा मुद्दा आहे. प्रतिकूल परिस्थतीत कुठल्याही घटनेने त्यांचे चित्त कधीच विचलित होत नाही. प्रत्येक गोष्टीकडे ते अतिशय संयमित दृष्टीने पाहतात, त्या परिस्थितीचे त्यांच्यापरीने व विशिष्ट शैलीने आकलन करून त्याचे विश्लेषण करून निर्णय घेतात हे होय. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मोक्याच्या क्षणी दादांनी दिलेला राजीनामा व त्यांनतर घडलेलं राजकीय नाट्य. सर्वोच्च न्यायलयात पणाला लावलेली बाजी आणि प्रतिकूल परिस्थतीतही आपल्या बाजूने साहेबांनी खेचून आणलेला विजय!  अर्थात ह्यात त्यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी व स्थापनही न झालेल्या आघाडीतील सहकारी पक्षांनी टाकलेल्या विश्वासाला नक्कीच जाते.
साहेबांच्या विश्वासाहर्तेवर आजवर खूप प्रश्न उठवण्यात आले होते. त्या दृष्टीने त्यांच्यावर सातत्याने आरोप केले जातात.  परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी नंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थतीवरून त्यांनी घेतलेली जाहीर भूमिका. भाजपा-शिवसेना ह्यांच्या युतीला बहुमत असूनही त्यांच्यातील दुराव्यामुळे त्यांनी सरकार स्थापनेला दाखवलेली असमर्थतता व त्यानंतर साहेबांनी पुढकार घेवून स्थापन केलेली महाविकासआघाडी आणि शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठीचा दिलेल्या खरा करून दाखवलेल्या शब्दाने सर्व विरोधकांची तोंडे बंदच करून टाकली आहे असे म्हणलो तर अतिश्योकीती होणार नाही.
सर्वसमावेशक आणि युतीचे राजकारण करणे हा तर साहेबांचा हातखंडा आहे हे ह्या निमित्ताने आवर्जून सांगायला हवे. ह्याचे मूळ कारण म्हणजे साहेबांचे अप्रतिम संघटन कौशल्य, माणसे जोडण्याची त्यांची कला, प्रंचड स्मरणशक्ती आणि सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन राजकारण करणे ही आजकालच्या राजकीय व्यवस्थेची अपरिहार्यता ह्याची चुणूक ४० वर्षांपूर्वीच दाखवली होती हे सर्वाना माहिती आहेच.
महाराष्ट्राच्याच राजकरणात तर साहेबांना डावलून राजकारण करणे ते जिवंत असेपर्यंत तरी अशक्य आहे हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि इतर सर्व पक्षांना आता पुरते कळून चुकले आहे.  साहेब राजकारण करतांना भारतीय राज्यघटनेचा आणि कुठल्याही राजकीय, प्रशासकीय व्यवस्थेचा अनादर करत नाहीत हे आजवर अनेक वेळा सिद्ध झालेले आहे.  प्रशासकीय यंत्रणेबद्दलचे त्यांचे ज्ञान, राजकीय व्यवस्थेचा प्रगल्भ अभ्यास, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि संसदीय कार्यप्रणालीचा प्रदीर्घ अनुभव, न्यायालयीन प्रक्रियेचा गाढा अभ्यास व त्यामधील जाणकारांची व तज्ञांची उपलब्ध असलेली फळी आणि त्यांच्यावर विश्वास टाकलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास हेच त्यांच्या यशाचे गमक आहे असे मला तरी वाटते.
साहेब समजायला तसे खूपच अवघड आहे हे नक्की.  बुद्धीबळात जसे आपण डाव खेळतांना सावधगिरी बाळगत असतो अगदी तशीच सावधगिरी साहेब नेहमी त्यांच्या राजकारणातील वाटचालीत बाळगत आले आहेत. त्यांच्या सावधगिरीला त्यांचे विरोधक ‘अविश्वास’ असे संबोधतात त्याचे कारण त्यांना अशी अपेक्षा असते की साहेबानी त्यांची प्रत्यके चाल ही त्यांच्या विरोधकांना कळेल अशी खेळावी. असो.
ज्यांना राजकारणात रस आहे अथवा राजकारणात येण्याची इच्छा आहे त्यांनी साहेबांचा अभ्यास करण्याची खूप गरज आहे त्यांचे कारण त्यांनी नेहरूंपासून ते मोदींपर्यंत सर्वांचे राजकारण कोळून प्यायले आहे व ह्या वयातही अजूनही तितक्याच ताकदीने राजकारणात वावरत आहेत.
साहेबांसारखा प्रगल्भ आणि द्रष्टा राजकारणी पंतप्रधान म्हणून भारताला देता आला नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. असो. शेवटी राजकारणातील संख्याबळाचे गणित अव्हेरून चालणार नाही हे निश्चित. पण एक आहे की युद्धात आणि राजकारणात कधी काय होईल ने सांगता येत नाही. त्या त्या वेळेसची राजकीय परीस्थ्तीती आणि पक्षीय संख्याबळाचे गणितच सर्व काही ठरवत असते.  अर्थात ह्या खेळत निष्णात असलेले साहेबांसारखे मुरब्बी राजकारणी हातातून निसटलेल्या संधीचेही सोने करून बाजी पलटवतात हे आपण महाराष्टात नुकत्यात स्थापन झालेल्या महाविकासआघाडीच्या सरकारच्या निमित्ताने अनुभवतो आहोत.
“जीवेत शरद: शतम्”
** मी काही राजकारणी नाही अथवा राजकीय विश्लेषकही नाही.  मी फक्त साहेबांचा चाहता आहे व त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या वाढदिवसानिम्मित ह्या वयात त्यांनी महाराष्ट्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आहे.

रविंद्र कामठे
साहेबांचा चाहता.   

Tuesday, 22 October 2019

Ganesh Atkale's Blog: यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन - पुस्तक समीक्षण

Ganesh Atkale's Blog: यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन - पुस्तक समीक्षण: लेखक रवींद्र कामठे यांच्या ‘तारेवरची कसरत’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने मागच्या आठवड्यामध्ये जेष्ठ आंतरराष्ट्रीय व्यवस...



खूपच छान मनोगत मांडले आहे गणेश.



अभिनंदन

Thursday, 17 October 2019

"तारेवरची कसरत" ह्या माझ्या अनुभवकथन पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण


 
नमस्कार,
सर्वप्रथम आपणांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
३१ मार्च २०१९ रोजी वयाच्या ५६व्या वर्षी मी VINSYS IT SERVICES ह्या पुण्यामधील व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या नामवंत संस्थेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. माझ्या ह्या निवृत्तीचे एक कारण म्हणजे गेली ४० वर्षे सातत्याने कष्ट करून झिजवलेल्या शरीराची थोडी फार निगा राखण्याची गरज व दुसरे म्हणजे साहित्य क्षेत्रात मराठी साहित्यासाठी माझ्या कुवतीने थोडेफार योगदान देता देता समाजाचे ऋण फेडण्याचा माझा संकल्प, हे होय ! माझ्या संकल्पातील पहिला टप्पा मी आज पूर्ण केला आहे. माझ्या आधीच्या चार काव्यसंग्रहानंतर माझी अजून एक साहित्य संपदा “तारेवरची कसरत” ह्या माझ्या अनुभव कथन पुस्तकाद्वारे तुम्हां रसिक वाचकांना सदर करतो आहे. ‘चपराक’च्या २०१९च्या ‘साहित्य महोत्सवात’ हे पुस्तक सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ञ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. विशेष म्हणजे शेजवलकर सरांचीच माझ्या ह्या पुस्तकाला प्रस्तावना लाभणे म्हणजे माझ्यासाठी एक पुरस्कारच म्हणावा लागेल. माझ्या ह्या पुस्तकाच्या विक्रीतून प्रकाशकांकडून लेखकाला (मला) मानधन म्हणून मिळणारी सर्व रक्कम मी “ममता अंध अनाथ कल्याण केंद्र, पिंपळे गुरव”, या संस्थेस मदत म्हणून देण्याचे ठरविले आहे. माझ्या ह्या संकल्पास तुमचाही अप्रत्यक्ष सहभाग लाभावा अशी माझी तुम्हांला प्रार्थना आहे. त्यासाठी प्रकाशकांच्या सहकार्याने मी “तारेवरची कसरत” पुस्तकासाठीची सवलत तुमच्या माहितीसाठी खाली देत आहे:
“तारेवरची कसरत” नोंदणीसाठीची खास सवलत
पुस्तकाची मूळ किमंत - प्रत्येकी रु.१५०/-
५ प्रतीं – प्रत्येकी रु.१२०/-
१० प्रतीं – प्रत्येकी रु.१०५/-
१०+ प्रतीं – प्रत्येकी रु.१००/-
५०+ प्रती - प्रत्येकी रु.१००/- +
चपराकच्या एका मासिकात अर्धेपान कृष्णधवल जाहिरात मोफत करण्यात येईल.
** नियम व अटी
आपली मागणी आपण www.chaprak.com ह्या संकेतस्थळावर नोंदवू शकता अथवा चपराकच्या *खात्यावर पैसे भरून नोंदवू शकता. पैसे जमा झाल्यानंतरच ही योजना लागू होईल ह्याची कृपया नोंद घ्यावी.
*पैसे भरल्याचा निरोप संपादक श्री. घनश्याम पाटील यांच्या भ्रमणध्वनी नं ७०५७२ ९२०९२ वर करावा.
*कृपया आपल्या प्रती प्रकाशनाच्या दिवशी किंवा चपराकच्या कोथरूड मधील कार्यालयातून घेऊन जाव्यात ही नम्र विनंती, अन्यथा पुस्तके पाठवण्याचा लागेल तो खर्च आकरण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
*खात्याचे नाव - चपराक प्रकाशन (Chaprak Prakashan)
Axis Bank - अँक्सिस बँक, Current Account (चालू खाते) शाखा - सदाशिव पेठ, पुणे
खाते क्र. 914020041538308 IFSC Code - UTIB0001437.
माझी तुम्हांला नम्र विनंती आहे की, आपण जास्तीत जास्त प्रती विकत घेऊन “आपल्या” (तुमच्या आणि माझ्या) ह्या सामाजिक कार्याच्या संकल्पास अमुल्य साथ द्यावी.
रविंद्र कामठे

Saturday, 5 October 2019

सोशल मिडीयाचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम


माहिती आणि तंत्रज्ञान युगाने जगात क्रांती घडवून आणली.  मोबाईल आणि इंटरनेट नेट मुळे तर जग आपल्या मुठीत सामावले गेले.  इंटरनेट विस्ताराचा अतिप्रचंड वेग आपल्या संस्कृतीला नुसताच घातक नाही तर, सोशल मिडिया नावाच्या राक्षसामुळे तो अजून विघातक होऊ लागला आहे. काळाची पावले ओळखून आपण काळाबरोबर चालायला हवे हे जरी योग्य असले तरी, तंत्रज्ञानाचा अतिरेकी वेग आणि त्यावर आरूढ होऊन आलेला सोशल मिडीया नावाचा कर्दनकाळ रोखणे सध्यातरी आपल्या सगळ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. सोशल मिडिया नावाचे भूत वेताळासारखे आपल्या मानगुटीवर कधी येवून बसले आहे ते आपल्याला कळलेच नाही. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर, व्हाटसअप, इत्यादी सोशल मिडीयाच्या माध्यमांनी तुमच्या आमच्या जीवनात नको इतके जरुरीचे स्थान पटकावले आहे.  आपल्या वैयक्तिक आयुष्याची लक्तरे वेशीवर टांगून आपल्या सामाजिक अस्थिरतेची पाळेमुळे ह्या सोशल मिडीयाने इतकी घट्ट रोवली आहेत की त्यांचे दुष्परिणाम गेल्या चार पाच वर्षांत दिसायला लागले आहेत.
माणसांचा माणसांशी संवाद हरवत चालला आहे;
नको इतके, नको त्या ठिकाणी, नको त्या लोकांशी, नको तेंव्हा, व्यक्त होण्याचे व्यसन लागले आहे; जरुरी पेक्षा जास्तीचे ज्ञान मिळायला लागले आहे;
लहान वयात नको त्या गोष्टींची ओळख झाल्यामुळे चंगळवाद आणि भोगविलासी वृत्ती बळावली आहे; 
जाहिरातींच्या भडीमारामुळे वैचारिक पांगुळत्व आले आहे;
वैयक्तिक जीवनात सहजरीत्या घुसून कित्येकांचे संसारच उध्स्वस्त होऊ लागले आहेत;
सामाजिक सुरक्षा तर कधीच टांगणीला लागली आहे;
वैयक्तिक तसेच राष्ट्रीय विदा (डेटा) असुरक्षित झाली आहे;
वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक स्वास्थ्य लोप पावत आहे;
सुसंकृत समाजाकडून विकृत समाजाकडे वाटचाल होत आहे;
हे सगळे जर टाळायचे असेल तर सोशल मिडीयाच्या वापरावर आपणच बंधने घालून घेणे जरुरीचे आहे. तरच ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याला योग्य तो फायदा करून घेता येईल.
रविंद्र कामठे

Thursday, 3 October 2019

१९ ऑक्टोबर २०१९ "तारेवरची कसरत" ह्या माझ्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन आहे


"चपराक कडून लवकरच येत असलेल्या रवींद्र कामठे यांच्या 'तारेवरची कसरत' या चरित्रात्मक पुस्तकाला सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांची प्रस्तावना आहे.  व श्री. संतोष घोंगडे सरांनी अतिशय समर्पक असे मुखुपृष्ठ साकारले आहे. कामठे सर आणि युवा कवी गणेश आटकळे यांच्यासह आज सरांकडे गेलो. प्रस्तावना घेतली. शेजवलकर सरांचे माझ्यावर आणि अर्थातच 'चपराक'वर विलक्षण प्रेम आहे. थोरामोठ्यांचे असे आशीर्वादच तर नवनवे प्रयोग करायला बळ देतात"; 
असे घनश्याम पाटील म्हणतात.

शेजवलकर सरांनी आम्हांला त्यांच्या कार्यालयात बोलावून त्यांनी लिहिलेली प्रस्तावना चपराक प्रकाशन च्या उपस्थितीत माझ्या कडे सुपूर्द केली.  व्यवस्थापनातील शिस्तबद्धता व काटेकोरपणाचा प्रत्यय आला.



शेजवलकर सरांच्या पुस्तकांचा अभ्यास करून वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेला त्यांचा मी रविंद्र कामठे एक शिष्य किती भाग्यवान आहे हे तुम्हीं समजूच शकत नाही. आज सरांनी माझ्या चपराक प्रकाशन तर्फे प्रकाशित होत असलेल्या "तारेवरची कसरत" ह्या अनुभव कथन पुस्तकास त्यांची अतिशय बोलकी आणि समर्पक प्रसावना देऊन मला धन्य केले आहे. अर्थातच ह्याचे श्रेय चपराक प्रकाशनचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांचे आहे. त्यांच्या मुळेच माझ्या ह्या पुस्तकाला शेजवलकर सरांची प्रस्तावना मिळाली. हा माझ्या साठी फार मोलाचा असा पुरस्कार आहे. खऱ्या अर्थाने मी आता साहित्य क्षेत्रात माझे काही योगदान देऊ शकतो असे मला सरांनी दिलेल्या ह्या प्रस्तावाने मुळे वाटते. खूप खूप धन्यवाद शेजवलकर सरांचे. वयाच्या ९२ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवील इतका उत्स्हास आणि कामाचा ध्यास पाहून धक्क व्हायला होते. आज माझे कैलासवासी वडील असते तर त्यांनाही खूप अभिमान वाटला असता त्यांच्या ह्या मुलाचा हे नक्की.
सरांनी अतिशय उत्स्फुतपणे त्यांची ही प्रस्तावना आम्हांला ऐकवली व ती रेकॉर्ड करण्याची संधी दिली.  वयाच्या ९२ व्या वर्षीही सरांचा उत्स्हास आणि जोश पाहून आम्हीं तर अचंबितच झालो होतो.
ही ध्वनी चित्रफित तुम्हीं खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता 


चपराक प्रकाशन च्या घनश्याम सरांचे खूप खूप आभार. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय असा एक क्षण आहे जो माझ्या आयुष्याला नक्कीच कलाटणी देणारा ठरेल असे वाटते. आज मी खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रात माझे काही योगदान देऊ शकतो. माझ्यासाठी शेजवलकर सरांची ह्या प्रस्तावानेच्या निमित्ताने मिळालेली ही शाबासकीच आहे .  मला मिळालेल्या ह्या संधीचा मी नक्कीच योग्य तो उपयोग करून घेऊन साहित्य क्षेत्रात माझे योगदान देऊ शेकेल असे वाटते.

श्री. संतोष घोंगडे सरांचे खूप खूप आभार त्यांनी माझ्या ह्या पुस्तकासाठी अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ करून ह्या पुस्तकाच्या साहित्यमूल्यात मोलाची भर टाकली आहे.   

माझ्या ह्या पुस्तकाचे चपराकच्या साहित्य महोत्सवात समारंभपूर्वक प्रकाशन १९ ऑक्टोंबर २०१९ रोजी सायं ७ वाजता उद्यान प्रसाद मंगल कार्यलय, सदाशिव पेठ येथे होणार आहे.  त्यासाठी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. माझ्याकडून आपल्याला हे ह्या कार्यक्रमाचे निमित्रण समजावे.

रविंद्र कामठे.

Monday, 30 September 2019

कौतक तनिष्काचे

कौतक तनिष्काचे
  तनिष्का मयुरेश जोगळेकर ही माझी भाची. माझ्या शेजारी राहते. ती डी. इ. एस. शाळेच्या इंग्लिश माध्यमात इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकते आहे. शाळेच्या सांस्कृतिक स्पर्धेत तिने माझ्या "प्रांजळ" ह्या काव्यसंग्रहामधील 'बाप्पा स्वप्नात आले' ही कविता सादर केली. तिच्या उत्तम सादरीकरणाला, कवितेच्या निवडीला, कवितेतून दिलेल्या पर्यावरण रक्षणाच्या सामाजिक संदेशाला दुसरे पारितोषिक मिळाले. तनिष्काचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप कौतुक.
माझ्या कवितेची निवड करुन कवितेमधील सामाजिक संदेश सर्व विद्यार्थ्यांना देऊन माझा सन्मान केला व माझ्या संकल्पाचे सार्थक केले त्यासाठी धन्यवाद.

https://youtu.be/vXyQM4gJBdg

रविंद्र कामठे