Wednesday, 17 March 2021

 एक उत्स्फूर्त व मनापासून मिळालेली दाद,



 मंडळी,

मला काल मिळालेला हा अभिप्राय पहा....

 तुम रहो सदा हसते खेलते..... खिलखिलाते 

यू ही तुम मिलते रहना....

ताकी हमारी खुशी बनी रहे....

आप जैसे लोग मिलते है नसीब से..

शुक्रगुजार है हम अपने भगवान के....

😊😊😊😊😊😊😊

keep smiling

मनिष पुराणिक

ISO Lead Auditor

International Certification Services, (ICS) Pune.

मला सांगा मंडळी अशी उत्स्फुर्त व मनापासून आलेली दाद मिळाली तर...

आज फिर जीने की तम्मना है,

आज फिर मरने का इरादा है...   असं नाही वाटलं तरंच नवल आहे की नाही!

अहो ही दाद मला मिळाली आहे मनिष पुराणिक सरांकडून.

ह्या सगळ्यामुळे मी अचानक माझ्या त्या अविस्मरणीय गतस्मृतींत गेलो...

मी जेव्हा विंसिस VINSYS ह्या माझ्या कंपनीत ISO 9001:2015 Surveilance Audit च्या दरम्यान सर्वांना सहज भेटायला गेलो होतो तेंव्हा मिळाली ही दाद. 

अर्थात मनिष सरांनी आज मला खास फोन करून माझी आठवण काढली होती व मी ऑडीटला नाही याची उणीव व्यक्त केली होती.  मग काय ! काढली गाडी आणि गेलो त्यांना भेटायला. 

माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सर्व प्रथम पहिल्या मजल्यावरी Accounts मधील शंकर महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अमित, मनीषा, निलेश, सुवर्णा, उदय, आणि सहकाऱ्यांशी थोडेसे हितगुज करून दुसऱ्या मजल्यावर गेलो.  मनिष सरांच्या ऑडीटमध्ये कुठेही लुडबुड न करता, माझ्या बाकी सर्व सहकाऱ्याना भेटलो व थोड्या गप्पा ठोकल्या.  सर्वात पहिले विक्रांत पाटील सरांना भेटलो.  त्यांचे थोरले चिरंजीव कुणाल पाटील भेटले. तो आता सरांना व्यवसायात चांगलाच हातभार लावायला लागलाय हे पाहून छान वाटले. दुबईचा व्यवसाय आता हा पठ्ठा सांभाळतो आहे हे पाहून आनंद झाला. विनया मॅडम तब्बेत बरी नसल्यामुळे आल्या नव्हत्या. नितीनही बंगलोरला असल्यामुळे हजर नव्हता. तिथेच विशाल नलावडेही खूप दिवसांनी भेटला. त्यांची मिटिंग चालली होती त्यामुळे फार वेळ न घेता तिथून सटकून तिसऱ्या मजल्यावर सदानंद, इम्रान, गौतम, ज्योती, वृषाली, मानसी, प्रिया आणि माझ्या बाकी सर्व सहकाऱ्यांना भेटलो.  चक्क आज खूप दिवसांनी अवीनाशही भेटला.  ऑडीटच्या मिटिंगला मला खास निमंत्रित म्हणून हजेरी लावता आली हा माझ्या साठी सन्मानच होता.  मिटींगला, सदानंद, उमेश, सुशील, विशाल, प्रथमेश, स्मिता, आकांक्षा व राजश्री मॅडम एवढी मोजकीच मंडळी होती. नेमके सुरेंद्र पटवर्धन सर आज त्नायांची तब्च्याबेत बरी नसल्यामुळे हजर नव्हते. पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून सुरक्षिततेच्या चौकटीत राहून हे ऑडीट पार पाडले होते.  ऑफिसचे कर्मचारी, सावंत, जावेद, वीरेंद्र, साई, सुरक्षारक्षक राणे, ही मंडळी जातीने माझ्याकडे काही हवे नको ते पाहत होती.  त्यात मणक्याच्या दुखण्यामुळे हातात काठी पाहून तर बरेच जण हळहळले होते. 

मनिष सरांनी ऑडीट यशस्वी झाल्याची घोषणा केल्यावर तर माझे मन खूप भरून आले होते.  गेले १२ वर्षे मी ह्या क्षणाची दर वर्षी आतुरतेने, जीव मुठीत धरून वाट पाहिलेली आहे.  जेव्हा मनिष सर म्हणतात की; “ऑडीट यशस्वी झाले आहे व तुम्हांला आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले आहे अथवा पुढे चालू ठेवण्यात आले आहे”, तेंव्हा जीव जो काही भांड्यात पडतो ना ते काही विचारू नका.  एका फार मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्याची भावना त्या क्षणी मनात येते व आपल्या सहकाऱ्यांचा, व्यवस्थापनाचा आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ केल्याची भावना निर्माण होते व स्वत:चा अभिमानही वाटतो. स्मिताच्या मनात नेमकी हीच भावना असणार ह्याची मला खात्री होती.  कारण मनिष सरांनी ऑडीट यशस्वी झाले आहे हे शब्द उच्चारात तिने माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी कटाक्ष टाकला होता.  हे म्हणजे अगदी क्रिकेटचा सामना असतो ना तसे वाटते.  जिंकलो तर यश सर्वांचे असते आणि हरलो तर मात्र ते फक्त आपले स्वत:चे असते.  अर्थात आजवर ह्या सामन्यात हार काही पहायला मिळाली नाही कारण ही एक सांघिक कृती आहे हे ही तितकंच खरं आहे आणि ह्यात तुमचे नेतृत्वगुण, तुमचे स्वत:चे कर्तुत्व आणि तुमचे सांघिक व्यवस्थापन तावून सलाखून निघत असते.  दरवेळेस नवीन धार तुमच्या ह्या अवजारांना येत असते.  तुम्ही घडत जाता व हळू हळू लोणचे जसे मुरते तसे मुरत जाता.

मित्रहो मी ३१ मार्च २०१९ला Vinsys मधून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. तरीही अजूनही मला CEO विक्रांत पाटील आणि CFO विनया पाटील ह्या दांमप्त्यांकडून वैयक्तिक पातळीवर जो काही मान सन्मान आणि आदर मिळतो त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे पुराणिक सरांची ही दाद होय !

मला Vinsys च्या प्रत्येक सदस्याकडूनही अतिशय आदर व सन्मान मिळतो. अर्थात माझ्या ह्या सहकाऱ्यामुळेच मी हे यश संपादले आहे ही तितकेच खरे आहे. उलट ह्यात माझे काहीच कौतुक नाही.

Vinsys मध्ये २००८ला मी आलो आणि २००९ ते २०१९ सलग ११वर्ष MR होतो. त्या दरम्यान माझे पुराणिक सरांचे, सुरेंद्र पटवर्धन सरांचे, राजश्री मॅडम आणि आकांक्षाताईशी कळत नकळत व्यावसायिकतेच्याही पलिकडले जिव्हाळ्याचे स्नेहबंध जुळले गेले ते आजतागायत कायम आहेत व पुढेही असेच राहणार आहेत ह्यात काही शंकाच नाही.

स्वेच्छा निवृत्ती नंतर माझी MR ह्या मोठ्ठ्या जबाबदारीची माळ मी माझ्या बहिणीच्या स्मिताच्या गळ्यात घातली आणि तीनेही ही जबाबदारी व्यवास्थित पध्दतीने पेलून मला आदराने अंजून एका उंचीवर नेण्यास बहुमोल साथ देऊन धन्य केले आहे.  तिचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

मी १९८३ पासून VINSYS मध्ये येईपर्यंत १२ नोकऱ्या केल्या होत्या.  २००८ साली VINSYSला आलो तेंव्हाच ठरवले होते की आता ही शेवटची नोकरी.  ह्या नोकरीतूनच निवृत्त व्हायचे.  बरोबर ११ वर्षे काही महिने मी ही नोकरी नव्हे, तर मालकी हक्कानेच काम करत होतो, पण ऑक्टोबर २०१७ला अचानक अन्जिओप्लास्टी झाली व त्यांनंतर तब्बेतीच्या कारणामुळे मला मनाविरुद्ध स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली.  गेले ३६ वर्षे व त्याही आधीपासून अहोरात्र केलेल्या कष्टांचे फळ, शरीराची केलेली हेळसांड आणि झालेली झीज व त्यात भरीला भर दारू आणि सिगरेट सारख्या व्यसनांच्या मस्तीची जोड होती, मग काय जे व्हायचे ते होणारच होते.  २७ ऑक्टोबर २०१७ला एका झटक्यात मला जमिनींवर आणले.  हे सांगण्याचे कारण म्हणजे, कितीही कष्ट करा, शरीराची आबाळ करू नका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलेही व्यसन करू नका.  व्यसन सोडण्याचे उशिरा का होईना सुचलेले शहाणपण येऊन आता चार वर्षे झाली आहेत.  आता मी मात्र आनंदात माझे स्वेच्छा निवृत्त जीवन जगतो आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे माझी बायको वंदना ही ने ही मागील वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेऊन मला साथ दिली आहे.

माझे तर काय लिखाण, वाचन चालू आहे. ‘चपराक प्रकाशन’चे सर्वेसर्वा घनश्याम पाटील यांच्या बरोबर त्यांचा मित्र व सहकारी म्हणून माझा छंद जोपासतो आहे.  त्यामुळे विविध क्षेत्रामधील व साहित्यक्षेत्रातील दिग्गजांशी भेटी गाठी होत आहेत व मी अनुभवाने अजून समृद्ध होतो आहे. माझीही अजून काही पुस्तके लवकरच चपराक कडून प्रकाशित होणार आहेत. ह्याच बरोबर मी २०१९ पासून ‘शूरयोद्ध येसाजी कामठे प्रतिष्ठान’ चा उपाध्यक्ष म्हणून सामजिक कार्य करतो आहे.  आमचे पूर्वज ‘वीर येसाजी कामठे’ यांचे शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळातील योगदान व त्यांचा इतिहास सर्वदूर पोहचवून कामठे परिवार संघटीत करण्याचे व त्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम करण्याचे काम ट्रस्टच्या माध्यमातून करतो आहे.  अर्थात इथेही मला एक लेखक व साहित्यिक म्हणून कामठे परिवारात व ‘शिवजयंती सोहळा समिती’, पुणे यांच्या ‘शिवजजन्मोस्त्व स्वराज्य रथसोहळा’ समितीचे प्रवर्तक अध्यक श्री. अमितदादा गायकवाड यांच्याकडून व बाकींच्या सरदार घराण्यात जो काही मान सन्मान दिला जातो ते पाहून वाटते की, ही सर्व माझ्या आई-वडिलांचीच पुण्याई आहे, मी फक्त निमित्तमात्र आहे.

स्वेच्छा निवृत्ती पश्चात मी माझ्या आयुष्यात एकच धोरण ठरवले आहे की, काहीही झाले तरी आता पैसे कमवायचे नाहीत. म्हणजे पैशांसाठी अथवा कुठलाही मोबदला घेऊन काम करायचे नाही.  जे काही करायचे ते बिना मोबदला व समाजासाठी कार्यरत राहायचे. समाजाकडून आजवर जे काही मिळाले ते त्याला आपल्या परीने परत करायचे.  अर्थात ह्यात कोणी आपला गैरफायदा घेत नाही ना हे ही पहायचे आहे.  गेली दोन वर्षे मी माझ्या ह्या धोरणावर ठाम आहे व पुढेही राहणार आहे.  नियतीच्या मनात काय आहे ते माहित नाही.  तब्बेतीची साथ ‘उन्नीस बीस’ असते, पण जिद्द आणि सकारात्मकता ठाई ठाई भरलेली असल्यामुळे लढत आहे, ते ही केवळ आणि केवळ कुटुंबाच्या व तुमच्या सारख्या मित्रांच्या, आप्तेष्टांच्या, नातेवाईकांच्या, हितचिंतकांच्या, निंदकांच्या शुभेछ्या आणि आशीर्वादामुळेच.

‘देवाची करणी, नारळात पाणी’.

एक म्हणावेसे वाटते;

आयुष्य इतकंही सोप नाही

जितकं आपण समजत असतो !

आयुष्य इतकंही अवघड नाही

जितकं आपण ते करून ठेवतो !!

मनिष सरांची इतकी उत्स्फूर्त दाद मिळाल्यावर मला माझी एक हिंदीतील रचना आठवली....

!!दोस्ती!!

जिंदगीसे और कुछ नही चाहीये मुझे

वक्त से थोडीसी मोहलत चाहीये मुझे !

हर दर्द हर गम सह लुंगा मै जिंदगी

तुझपर मिटाने के लिये एक पल चाहीये मुझे !

यू ही सालों बितायें मैने दोस्तों के लियें

वक्त आनेपर जान देनेवाला दोस्त चाहीये मुझे !

मै खफा नही हूं अपने दोस्तोंके दोस्ताने पर

कुछ गलतीयां सुधारणे का मौका चाहीये मुझे !

जवानी से लेकर आज की इस तारीख तक

दुवां कर रहा हूं, दोस्तोंकी हसीं चाहीये मुझे !

मै आपके लिये इतना खास तो नही रहां दोस्तो

मुझ को समझने वाला एक दोस्त चाहीये मुझे !

१७ आँक्टोंबर २०२. सहज सुचलेली एक हिंदी रचना.

मित्रहो, तुम्ही म्हणाल की, एक एवढीशी ती घटना, एक इतुकासा तो अभिप्राय, दाद, त्यावर तुम्ही एवढे मोठे पुराण काय लिहिलेत आणि आमच्या डोळ्यांना उगाचच त्रास दिलात...

तर तसे काही नाही हो,

आपल्या आयुष्यात ह्या अशा छोट्याशा, लहानशा वाटणाऱ्या घटनांचेच महत्व खूप असते. अगदी ‘खारीच्या वाट्या’ सारखे.  ह्यातून भावनांचा हा सेतू बांधला जातो.  संबध वृद्धिंगत होतात.  नवे मित्र जोडले जातात. नवी नाती निर्माण होतात. जुनी नाती अजून घट्ट होतात.  काही नात्यांना जर का कुठे ठेच पोहचली असेल तर ती निट व्हायला अथवा त्यावर उपाय करायला ह्या अशा घटनांमुळे एक दिलासा मिळतो व प्रांजळपणे जगण्याची नवी उर्जा व शक्ती मिळते हे ही तितकेच खरं आहे.  आपले आयुष्य ही एक “तारेवरची कसरत” आहे. ती अतिशय प्रांजळपणे मनात कुठलीही अढी न ठेवता जीवन जगायचे असते. कचकच करून, तकतक करून, भांडण तंटा करून, वादविवाद करून, हाणामाऱ्या करून, दुफळी माजवून, हिंसाचार करून, विध्वंस करून, दुराचार करून, भ्रष्टाचार करून, द्वेष करून, दुराचार करून, काहीच साध्य होत नाही.  उलट आपले आयुष्य अजून क्लिष्ट व असमाधानी बनत जाते. आपण जसे जन्मत: मोकळ्या हातांनी येतो ना तसेच इथे जे काही कमावले आहे ते इथेच ठेवून जायचे असते.  जातांना जर का पुण्य अथवा चांगले काही केले असेल तर तुमच्या मृत्यू पश्चात तुमच्या आत्म्यास शांती नक्कीच लाभत असेल असे मला तरी वाटते. म्हणूनच म्हणतो;

आयुष्य खूप सुंदर आहे,

जगले तर खूप महान आहे...

 चला खूप झाले तत्वज्ञान....

रवींद कामठे

मंगळावर,१६ मार्च २०२१.

Monday, 8 March 2021

'आंजर्ले' - पृथ्वीवरील स्वर्गाची सफर ३ ते ७ मार्च २०२१

 'आंजर्ले' - पृथ्वीवरील स्वर्गाची सफर ३ ते ७ मार्च २०२१

१.

फारच छान योगायोग म्हणजे आज ३ मार्च २०२१ आंजर्ल्याचे "भैरी" हे ग्रामदैवत (खंडोबाचा अवतार) माघी पंचमीला घरोघरी येतात. आंम्हाला त्यांचे दर्शन घडले. ३४ वर्षांत हा योग आमच्या लग्नानंतरच्या आयुष्यात पहिल्यांदाच आलायं.

३ जून २०२०च्या निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीच्या खुणा अजून शाबूत आहेत. तरीही हळू हळू गाव आणि ग्रामस्थ त्यातून सावरताहेत. आमचे दादा वहिनीही (मामा, मामी) त्याला अपवाद नाहीत. नव्याने नारळ , पोफळीची (सुपारी), केळी, जायफळ, रामफळ, फणसाची रोपं, लावताहेत, पुढच्या पिढीची सोय म्हणून !

मध्येच मामाने वाडीला पाणी सोडले, तेंव्हा मला आपसूकंच गुणगुणावेसे वाटले.. मामाच्या मळ्या मंधी पंपाने पाणी जातं, नारळ, सुपारीssssच्या बागा फुलवीते...

कोकणच्या ह्या कणखर माणसांना, त्यांच्या ह्या सकारात्मकतेला, आशावादाला दडंवतच घालावासा वाटतो.

दुसरीकडे कोरोनाचं भयही गेले काही महिने त्यांच्याकडेही वास्तव्याला आहेच. तरी सर्वजण काळजी घेत आपले दैनदिन जीवन जगत आहेत. भुईसपाट झालेल्या बागा पुन्हा उभारताहेत.

दादा आणि वहिनीची (मामा मामीची) ख्याली खुशाली पहाण्यासाठीच हा धावता दौरा केला आहे. कारण नंतर उन्हाळा सहन होणार नव्हता. त्यांच्या मते चक्रीवादळामुळे ८०% झाडे भुईसपाट झाल्यामुळे यंदा प्रचंड उकाडा आहे, मे महिन्यात तर असह्य होणार आहे.

माझं आणि कोकणाचं एक नवीनच नातं निर्माण झालयं. म्हणजे मी जरा कुठे इकडे तिकडे फिरायला पाय उचलला की एखादा साप सुळकन् बाजूने सरपटत जातोचं. आंबेतला जेटीत गाडी घालायला भली मोठ्ठी रांग होती. कंटाळा आला म्हणून गाडीतून उतरून पाय मोकळे करायला गेलो तर एक महाशय माझ्या चाहुलीने सुळकन् बाजूच्या झाडीत गुडूप्प झाले. माझी क्षणभर फाटलीच...पण तो समजुतदार निघाला म्हणून... नाही तर....

 






२.

'आंजर्ले' दुसरा दिवस. गुरुवार, ४ मार्च २०२१ रोजी सर्वप्रथम मी आणि वंदना कड्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. अर्थात ह्या वेळेस चक्क नवी एर्टीगा गाडी घेऊन जावे लागले कारण मणक्याच्या दुखण्यामुळे मला कड्यावर चढून जाणे अशक्यच होते. दर्शन झाल्यावर नेहमीप्रमाणेच अभिषेकाची पावती केली. थोडावेळ शांत बसून चिंतन केले. नंतर गणपतीच्या पाऊलाचे दर्शन घेतले. वादळात उधवस्त झालेला वडाचा पार अजूनही तसाच आहे. आता बुंध्याला थोडी पालवी फुटली आहे एवढेच काय ते सुख. ज्या निसर्गाने उधव्स्त केले त्यानेच पुन्हा निर्माण करायला सुरवात केलीयं हे मात्र नक्की.

कोकणातली माणसे म्हणतात बरे झाले हे चक्रीवादळ आले, माणसाचा अहंकार मुळासकट उपटून टाकलायं.

बाप्पाचे दर्शन झाल्यावर मंदिरातील व्यवस्थापक गोखले काका यांना चपराकचा दिवाळी अंक भेट दिला. "हैदोस निसर्ग चक्रीवादळाचा" हा लेख दाखवला आणि काकांच्या डोळ्यासमोर ३ जून २०२० ची दुपार तरळली. जगासमोर हा प्रसंग इतक्या सविस्तरपणे आणल्याबद्दल काकांनी चपराकचे व माझे कौतुक केले. मंदिराच्या विश्वस्तांना हा अंक वाचायला देतो म्हणाले.

कड्यावरुन खाली आलो आणि तसाच गाडी घेऊन केतकी बीच रिसोर्टला नंदू नित्सुरे काकांना भेटलो. त्यांचा मुलगा विनायक रिसोर्टवर व्यवस्थापन पाहतो त्याला चपराकचा दिवाळी अंक भेट दिला. त्यानेही चक्रीवादळावरील लेख पाहून भावूक अभिप्राय दिला. रिसोर्ट आता पुन्हा चालू झाले आहे. काकांना भेटून त्यांच्याशी गप्पा झाल्या.

येता येता आंजर्ले येथील मराठी शाळा नंबर १ ला भेट दिली. मुख्याध्यापक श्री. मेहबुब पठाण आणि शिक्षिका सौ. शितल विटेकर - देशपांडे यांना चपराकचा दिवाळी अंक, प्रांजळ कवितासंग्रह, तारेवरची कसरत, शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे पुस्तिका आणि शिरीष देशमुख सरांचे बारीक सारीक गोष्टी ही पुस्तके ग्रथालयासाठी भेट दिली.

सरांच्या व बाईंच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. शाळा बंद होती पण आनलाईन शिक्षण चालू होते. बाई म्हणाल्या आजच बारीकसारीक मधील गोष्टीं आनलाईन शाळेत सांगायला सुरवात करते ! हे ऐकून तर मी भरुनच पावलो!

ह्या एका घटनेने मला स्वतःला फार समाधान वाटले व आंजर्ल्याच्या ह्या भेटीचे सार्थक झाल्याची भावना मनात आली. पठाण सरांनी चपराकच्या वाचन संस्कृती वृधिंगत करण्याच्या ह्या छोट्याशा प्रयत्नाला मनःपूर्वक दाद दिली व माझे खूप खूप आभार मानले. अजूनही काही पुस्तके असतील तर पुढच्या वेळेस जरुर आणून द्या असे हक्काने म्हणाल्यावर मला खूप छान वाटले

आता मस्तपैकी सुरणाची भाजी. चुलीवर शिजवलेला भात, चवळीची खोबरे घालून केलेली ऊसळ हाणलीय आणि झोपाळ्यावर ताणून देतो आहे...

 







३.

५ मार्च २०२१. आंजर्लेमधील ३रा दिवस. मी, वंदना आणि दादा-वहिनी दुपारी जेवल्यावर दापोलीला गेलो होता. दादाची मोठी बहिण उषाताईला भेटायला दापोलीला जालगाव रस्त्यावरील ब्राम्हणवाडीला भेट दिली.

तिथे इयत्ता दुसरीतल्या चिरंजीव वरद अमेय फाटकला शिरीष देशमुख सरांचे "बारीक सारीक गोष्टी" पुस्तक दिले. गडी एकदम खुश झाला. म्हणाला ताई आली की तिच्याकडून वाचून घेतो. त्याला मल्लखांबाच्या क्लासला जायचे होते. त्यामुळे तो पळाला. चला ह्या एका पुस्तकामुळे अजून दोन तीन वाचक मिळाल्याचे समाधान लाभले. उषाताईचे दापोलीचे हे ऐसपैस घर पाहून छान वाटले.

त्याच्या आधी प्रणव शिंत्रे यांच्याकडे दादासाठी सोलर दिवे पहायला गेलो होतो. दापोलीतील आतल्या रस्त्यांना कधी फिरणेच झाले नव्हते. हे भले मोठ्ठे बंगले बांधलेत लोकांनी, पण रस्ते मात्र एकच गाडी जाईल एवढेच. त्यात जालगावच्या रस्तात समोरुन लालपरी (एसटी) आली. मग काय आमची फुल लागली. एकतर नवीन एर्टीगा त्यामुळे ती कुठेही न घासता काढायची कसरतच करावी लागत होती. दादाला खाली उतरुन रस्ता सांगावा लागत होता. काही इलाजच नव्हता. पण त्याही परिस्थितीतून आम्ही मार्ग काढलाच. थोडा ट्रफिक जाम झाला पण एसटीला ठोकता बाहेर पडलो. एका म्यानात दोन तलवारी रहात नाहीत, तसचं काहीसं एका रस्त्यातून एकच गाडी जाणार हे ह्यांच ठरलेलचं.

उषाताईकडे भोपळ घारगे आणि लस्सीचा स्वाद घेतला आणि डोळ्यावर आलेली झापडं आवरत मनावर दगड ठेवून दापोली बाजारात जायला निघालो.

बाजारात पोचलो. नशिबाने पार्किंग होते. गाडी लावली. थोडासा बाजारहाट केला दादा वहिनीने आणि परत आलो. मला थांबा म्हणाले इथेच तेलाचा डबा आणायचाय आजून. मी थांबलो. तर पार्किंगमध्ये पाच सहा गाई आल्या. काही आजूबाजूच्या टेम्पोला अंग खाजवत होत्या. आता माझी तर तारांबळच उडाली. मी धावतच गाडी जवळ आलो आणि आत बसून गाडी चालू केली व थोडीशी जागेवरुन हलवली. त्यामुळे गाई निघून गेल्या. एकीने जरी तीचे अंग माझ्या गाडीला घासले असते ना,तर काही खरं नव्हतं. कल्पनेनेच मला घाम फुटला होता.

दादाची खरेदी उरकली आणि आम्ही निघालो. वाटेत पेट्रोल भरुन टाकी फुल केली. गाडीने चक्क १५ व्हरेज दिले होते त्यामुळे मुडात होतो.

दापोलीहून आंजर्ल्याला येतांना वाटेत आसुदला ४-५ किलोमीटर आत, वहिनीच्या मोठ्या बहिणीच्या घरी घुसलो. आधी ठरले होते पण अंधार पडल्यामुळे दादा थोडासा कचरत होता. माझ्यासाठी हा रस्ताही नवीन होता आणि गाडीही नवीन होती त्यामुळे तो थोडा संकोचला होता. थोडा कच्चा आणि जेमतेम एक गाडी जाईल एवढाच रस्ता होता. पण खरंच अंधार पडल्यामुळे रामराम म्हणतचं मी गाडी त्या रस्त्यावर घातली. एक दोन किलोमीटर गेल्यावर समोरुन एक जेसीबी आला. त्याला पाहून क्षणभर माझ्या पोटात गोळाच आला. पण त्याने शहाणपणा करुन जेसीबी शेजारच्या शेतात घातला आणि आम्हाला वाट करुन दिली. असाच पुढे अजून दोन किलोमीटर गेल्यावर मावशीचे घर आले. घर थोडे आत होते. पण समोरच्या बाजूला एक गाडी लावायला जागा होती. पण बाजूला काटेरी झुडपे असल्यामुळे भीतभीतच गाडी रिव्हर्स करायला लागलो. आधी उतरुन पहावे म्हणून गाडी बंद करुन हंड ब्रेक लावला. खाली उतरलो, तर वंदना ओरडली गाडी पुढे चाललीय. तसाच पळत पळत मागच्या दाराला मी आणि दादाने धरून ठेवले. गाडी थांबलीय म्हटल्यावर मी पुढचे दार उघडून आत घुसलो व ब्रेक दाबला. मग दादाने गाडी सोडली. मी रिव्हर्स टाकून गाडी मागे घेतली. रस्ता एका बाजूला उतरता असल्यामुळे एका छोट्या झुडूपावर अडकून गाडी थांबली अन आमच्या जीवात जीव आला. ह ब्रेक लावूनही गाडी घरंगळली होती कारण गाडी पार्किंग मोडवर नव्हती. म्हणजे चूक माझीच होती. ह्या टोमेटीक गाडीचे तंत्र असे हळूहळू समजू लागले होते. अंधारामुळे उताराचा अंदाजच नाही आला मला. असो. गाडी त्या चिंचोळ्या मोकळ्या जागेत कशीबशी घुसवली. दुसरा काही पर्यायच नव्हता. कारण दुसरी गाडी आली तर तिला जायला वाटच नसती राहिली! मावशीकडे गेलो. त्यांची ती एक गढीच होती. त्यात वाड्याच्या आत भले मोठ्ठे अंगण होते. मावशीचे ८० वर्ष वयाचे सासरे भरभरुन बोलत होते. त्यांनी आवर्जून भला मोठ्ठा देव्हारा दाखवला. बैलगाडी दाखवली, जिने ते अगदी प्रतापगड, महाडपर्यंत पूर्वी कामासाठी जात होते. आजोबा सांगत होते की त्यांच्या गावात डोंगरावर महाराष्ट्रातले सर्वात मोठे स्टेडियम होते आहे. त्याची वर्दळ असते दिवसभर. पण रात्री भुताखेतांच्या भितीने इकडे कोणी फिरकतच नाही. ते दादाला म्हणाले जाताना मी एक कांडी देतो. ती ठेवा जवळ म्हणजे तुम्हाला भुतांचा काही त्रास होणार नाही. रात्रीच्या ९ वाजताच भुतं जमतात म्हणजे काही खरं नाही. उगाच तो विषय नको म्हणून दादा गप्प बसला. असो. असतील शितं तर जमतील भुतं असं म्हणत गप्प बसून त्यांचे किस्से ऐकत होतो.

निसर्गचक्रीवादळात त्यांचीही ५-६एकरची संपूर्ण वाडी उध्वस्त झालीय. आंब्याची, नारळ, सुपारीची सगळी झाडे आडवी झालीत. हे ऐकल्यावर मी न राहवून त्यांना चपराकचा दिवाळी अंक भेट दिला व त्यातला वादळाचा लेख वाचायला सांगितले. मावशीचा धाकटा मुलगा व त्याचा छोटाही कुतुहलाने हे सगळे पहात होते.

मावशी जेवणाचा आग्रह करत होती. पण दडपे पोहे आणि चहावर तह झाला. बाहेर किर्र अंधार पडलेला, त्यात कच्चा व छोटा रस्ता असल्यामुळे गाडी कुठेही घासू नये ह्या बेताने मी ती चालवत होतो. एकदाचा हमरस्ता आला. डावी कडे अथांग सागर, उजवीकडे उंचच उंच डोंगर. घाट रस्ता कधी सुरु झाला तेही कळले नाही. मामा सांगत होता रात्री ८ नंतर इकडे सगळीकडे सामसूम असते! खरंच आम्हाला वाटेत एकही वाहन दिसले नाही. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे कुठे भूत वगैरे दिसते का ते पहात होतो. असेही मला रात्रीचा प्रवास करायला फार आवडते. त्यात अजूनतरी भूत वगैरे काही दिसले नव्हते. मनात म्हटलं खरंच एखादं भूत दिसलं तरं.. असो. बायको आणि वहिनी बरोबर होत्या त्यामुळे गपचुप टेप सुरू करुन किशोर कुमारची गाणी लावली. गाडी नवीन असल्यामुळे व थोडी मोठी असल्यामुळे व त्यात माझ्या दोन्ही पायांना इलस्टीकचे पट्टे बांधलेले असल्यामुळे मी जरा जपूनच गाडी चालवत होतो. मणक्याच्या दणक्याने माझी हालत बेक्कार केली होती. तरीही शांत पडून रहातील ते आरके कसले!

हर्णैर्चा घाट उतरून खाडीवरचा पूल ओलांडून मुर्डी गावात मी मोठ्या हिंमतीनेच गाडी घातली. इथेही तीच समस्या, रस्ता छोटा व त्यात तीव्र उतार. त्यात समोरुन एक टेंपो आला. पण तो गावचाच व समजदार होता. त्याने टेम्पो थोडा रस्त्याच्या खाली घालून मला वाट करुन दिली. मनोमन त्याचे आभार मानले आणि थोड्याच वेळात आंजर्ल्यात पोहचलो.

बाजूच्या प्रसादच्या अंगणात गाडी लावली आणि हुश्श झाले. अशा रीतीने नवीन एर्टीगाचा आजचा थरारक प्रवास सुखरुप झाला होता.



 ४.

आज ६ मार्च २०२१. आंजर्ल्यामधील ह्या दौर्याचा ४ था व शेवटचा दिवस. उद्या सकाळी लवकरच पुण्याला प्रस्थान ठेवणार आहोत.

आजचा दिवस तसा निवांतच होता. काल रात्री थोडी उशीराच झोप लागली. त्यामुळे सकाळी जरा उशीराच उठलो. असेही मला काही उद्योगच नव्हता त्यामुळे उगाचच पडून राहिलो होतो. उठल्यावर सगळे आवरून फोडणीच्या पोळीचा नाष्टा करुन चहा घेतला आणि बाजीरावासारखा पडवीतल्या झोपाळ्यावर झुलत पहुडलो होतो. वहिनी आणि वंदना मागे स्वयंपाक खोलीत काहीतरी करत होत्या. दादा बाहेर पुढच्या अंगणात खराटे (झाडू) करत बसला होता. नारळाला 'कल्पवृक्ष' म्हणतात ते उगाच नाही. झावळ्यांपासून झाप, शेंड्यांपासून काथ्या आणि झावळ्यांच्या हीर काढून त्यापासून खराटे बनवले जातात. उरलेलं गदळ जळणासाठी चुलीत उपयोगी पडते. कोकणातल्या माणसांना असेही हे एक उत्पन्नाचे साधन आहे. तेवढाच संसाराला हातभार लागतो. दादा आणि वहिनीचा संपूर्ण दिवस काही ना काही तरी काम करण्यात जातो. दोघांची सत्तरी जवळ आली तरीही मंडळी जीवतोडून कामं करत असतात. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यात आमच्यासारख्या आलेल्या पै पाहुण्यांचे आगत्य तर इतक्या आपुलकीने करतात की काही विचारु नका!

पंचक्रोशीतली कोळी आणि कातकरी मंडळी ही ह्यांची बांधलेले ग्राहक. ते ही विश्वासाने व हक्काने येतात आणि नारळ, झाप, खराटे, जायफळ, फणस, रामफळं, इत्यादी अगदी नियमीतपणे खरेदी करतात.

आज दुपारी अशीच एक कोळीण आली आणि रामफळं हवीत म्हणाली. दुपारचा १.३० वाजलेला. उन तापलेलं होतं. काल काढलेली रामफळं दादाने खास आमच्यासाठी ठेवली होती. कोळीणीला रामफळ पिकलेली नाहीत सांगितले. तर म्हणाली, ही काय झाडावर तर येवढी आहेत त्यातलीच द्या दोन तीन किलो. मुलीला मुंबईला पाठवायची आहेत. ती काही केल्या ऐकायलाच तयार नव्हती. आम्हाला जेवायला बसायचे होते म्हणून दादा तीला टाळत होता. पण ती काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी दादा पुढच्या अंगणातल्या झाडावर चढला आणि दहा पंधरा अर्धवट पिकलेली रामफळे काढली, ते ही कोळीणीला सांगितले की पिकली नाहीतर बोंब मारायची नाही. तुझ्या जबाबदारीवर ने. ती पण भारी होती. तीने अडीच किलो रामफळे ठरलेल्या किंमतीला घेतली आणि आली तशी निघून गेली.

दादा वास्तविक दमला होता. तो अंघोळ करुन आला नी मग आम्ही जेवायला बसलो. मस्त खोबरं घालून केलेली मटकीची उसळ. पोळी, भात पोटभर जेवलो आणि झोपाळ्यावर येऊन पडल्या पडल्या ताणून दिली. मस्त वामकुक्षी नव्हे कुंभकर्णकुक्षी झाली आज खूप दिवसांनी.

सध्याकाळी चहा घेतला आणि गाडी काढून मी, वंदना आणि वहिनी बंदरावर जाऊन आलो.

अथांग सागरात सुर्यास्ताचे मनमोहक दृश्य म्हणजे डोळ्यांना पर्वणीच होती. हा अनुभव मी गेले ३४ वर्षे न चुकता घेत आलोय. दरवेळेस मावळतीचा हा रवी आकाशात जी काही रंगसंगती करतो ते पाहणे म्हणजे मनावर प्रसन्नतेचे संस्कारच होतात असे वाटते. त्याने उधळलेली केशरी रंगाची छटा सागराच्या फेसाळणाऱ्या लाटांवर अशी काय छाप टाकतात की आपल्यातलं कवी मन जागं होतं. विशाल सागराच्या निळ्याश्यार पाण्यात मावळतीच्या सर्वोच्च क्षणी हळूहळू कुंकवासारखा लालबुंद झालेले रवीचे तेज पाहून, ह्या रवीला आपल्या संसारात सुखी समाधानी सुहासीनीच्या कपाळावरील सौभाग्याच्या लेण्याचीच उपमा मला द्यावीशी वाटली.

गेले चार दिवस आंजर्ल्यात कसे गेले तेच कळले नाही. निसर्ग चक्रीवादळातून सावरलेलं गाव आणि ग्रामस्थ कुठल्याही समस्येचा बाऊ न करता अतिशय गुण्यागोविंदाने आपला संसार करतांना पाहून एक सकारात्मक उर्जेचा स्त्रोत मिळाल्याची अनुभुती वाटते.

गावात अखंडीत वीज पुरवठा, इंटरनेट, पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. हळू हळू आपले गावपण जपत सुधारीत आयुष्य आता माणसे जगू लागलेली पाहून समाधान वाटले.

गावात आता कशाचीही कमी नाही. अगदी टायरमधली हवाही चेक करुन मिळते. पंक्चरही काढून मिळते. एवढं सगळं असलं तरी गावपणही अनुभवता येते हे मात्र नक्की.

संध्याकाळी बंदरावरुन परत आल्यावर भेळीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर समोरच्या परांजप्यांच्या संजयच्या साठी निमित्त जेवणाचा आस्वाद घेतला.

संजयला वाढदिवसाची भेट म्हणून चपराकचा दिवाळी अंक भेट दिल्यावर तो एकदम खूषच झाला. त्याला आधी अंक मिळाला होता, पण तो त्याने मूर्डीच्या रंगलर परांजप्यांच्या ग्रंथालयास भेट दिला होता.

एकंदरीत आंजर्ल्याचा हा ही दौरा अविस्मरणीय असाच झाला होता.

पुन्हा परत लवकरात लवाकर येण्याच्या बोलीवर दादा वहीनीकडून उद्या सकाळी निघण्याचे नक्की करुन झोपायची तयारी केली.

 




५.

आज रविवार, ७ मार्च २०२१. सकाळी ७ वाजता फक्त चहा घेऊन आंजर्ल्यातून पुण्याला प्रस्थान ठेवायचे ठरले होते. पण मीच उशीरा उठलो. मग काय वहिनीला तेवढेच कारण पुरे झाले. तिने संधीचा फायदा घेऊन कांदेपोहे बनवले आणि तयारच ठेवले. तिचं काल रात्रीपासूनच चाललं होतं की दुपारी जेवूनच निघा. पण शेवटी फक्त चहा घेऊन निघणारे आम्ही, चक्क दोन दोन डीश पोहे खाऊन, गरमा गरम चहा घेऊन सकाळी १० वाजता निघालो. त्यामुळे वहिनीला आणि दादाला बरं वाटले.

वास्तविक पाहता मी मुद्दामुनच उशीर केला होता. कारण मला तिचे बोलणे आमच्या कामठे परिवारातल्या निष्णात डाक्टरशी करुन द्यायचे होते बरेच दिवस ती अंगावर काढत असलेल्या व्याधीवर औषधं पथ्ये, असा सल्ला घ्यायचा होता. तीचे डाक्टरांशी बोलणे झाले तिला काही काळासाठी का होईना दिलासा मिळाला. आमच्यासाठी ती तयार होणे हेच महत्वाचे होते. साठी ओलांडाली तरी काबाडकष्ट करणारी व स्वावलंबी आणि स्वाभिमानी दादा-वहिनीची जोडी आमच्यासाठी आदर्शच आहेत. म्हणूनच तर त्यांच्याकडे कधीही जावेसे वाटते. माणसं जोडण्याची त्यांची ही कला फारच घेण्यासारखी आहेत. त्याबाबतीत मी स्वतःला फार नशिबवान समजतो.

आम्ही आंजर्ल्याहून निघालो खरे पण आंबेतला गाडी जेटीत घालून पुढे जावे का थोडेसे लांबून महाडमार्गे जावे ह्या द्विधा मनस्थितीत होतो. कारण बुधवारी पुण्याहून येतांना आमचा जेटीत नंबर लागायलाच दीडतास गेला होता. त्यात आज रविवार म्हटल्यावर तोबा गर्दी असणार ह्याची खात्री होती. त्यामुळे मंडणगड नंतर येणाऱ्या म्हाप्रळ फाट्याजवळ गेलो की ठरवू असे म्हणत निघालो.

वाटेतच वंदनाला एक फोन आला आणि तिला तातडीने एक मिनिटाचे अशी दोन, हिंदीतल्या निवेदनांचे व्हिडिओ करुन पाठवायचे होते. त्यामुळे वाटेत थांबत थांबत एक दोन शांत ठिकाणे शोधत होतो. शेवटी तसे एक ठिकाण सापडले. तिने एका झाडाखाली जाऊन त्या निवेदनांचे दोन व्हिडिओ केले. मंडणगडला मोबाईलला रेंज येणार होती. त्यामुळे तिने ते व्हिडिओ व्हाँट्सअप करुन ठेवले. पंधरा मिनिटातच साधारण ११.१५ला मंडणगडला पोहचलो. लगेचच व्हिडिओ समोरच्या व्यक्तिला मुंबईला मिळाल्याचा व काम झाल्याचे उत्तरही आले व जाता जाता अत्यंत महत्वपूर्ण कार्य पार पडले.

इंटरनेटच्या ह्या आधुनिक तंत्रज्ञानाला मला सलामच ठोकावासा वाटला. त्यात मोबाईलवरुनच हे सगळे आपसुकच घडल्याचेही कौतुकही होते. कोकणासारख्या दुर्गम भागातही इंटरनेट पोहचले आहे व बऱ्यापैकी शाळाही आनलाईनच भरत हेत हे मी स्वतः आंजर्ल्यात पाहिले आहे. आंजर्ल्या सारख्या खेड्यात जिथे एखाद दुसरी एसटी येते तिथेही इंटरनेटचे जाळे आता पोहचले आहे. थोडक्यात विकासाची गंगाही लवकरच पोहचणार हे नक्की. निसर्ग चक्रीवादामुळे विजेचे सर्व खांब उधवस्त झाले होते. महावितरण कंपनीने अहोरात्र कामकरून खेड्यापाड्यात दीड महिन्यात अखंडीत वीज पुरवठा सुरू करून एक सुखद धक्काच दिला आहे. त्यात इंटरनेटही व्यवस्थित असल्यामुळे दुधात साखरेची अनुभुती लाभली आहे.

तरीही, अजूनही आंजर्ल्यातून तरीने (होडीने) हर्णैला जाणारी खूप मंडळी आहेत. जरी खाडीवर पूल झाला असला तरीही गावातल्या ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही त्यांना हा जुनाच पर्याय योग्य वाटतो. पर्यटकांनाही ह्या अशा गोष्टींचा आनंद नक्कीच घेता येऊ शकतो. अगदी खास होडी करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या हर्णै बंदरातील 'सुवर्णदुर्गाला'ही जाता येतं. तसेच काही रिसोर्टवर एकांतात बीचचा आनंदही लुटता येतो. मार्चमध्ये "कासव महोत्सव"ही असतो त्याचाही आनंद लुटता येतो. फाल्गुनात म्हणजे मार्च-एप्रील मध्ये गावाची जत्राही अनुभवता येते. होळीला तर जल्लोषच असतो. गणपती आणि दिवाळी हे परमोच्च आनंदाचे सणही कुटुंबासह कोकणात साजरे करता येऊ शकतात. शहरातल्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात, पर्यावरणाला हानी न पोहचता आपण हे क्षण साजरे करु शकतो.

ह्यावरून एक जाणवले की शहरी पर्यटकांना ह्या अशा आधुनिक सुविधा मिळाल्या तर ते नक्कीच कोकणाकडे आकृष्ट होईल. त्यातच कोकणाचा विकास होईल असे मला वाटते. मुळातच कोकणाला निसर्गाने दोन्ही हातांनी भरभरून दिले आहे. तसेच कोकणी माणसांना कष्टाचेही वरदान जन्मतःच दिलेले आहे. त्यांच्या कष्टाला, ह्या आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली व राजकीय इच्छा शक्ती लाभली तर कोकणाचे कलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही. असो.

थोडेसे लांबून म्हणजे मडणगड-म्हाप्रळ-महाड मार्गे माणगांवला (गोवा महामार्गावरील) आलो. साधारण तीस किलोमीटरचा वळसा पडला पण तास दिडतास वेळ वाचला. गोवा महामार्गावरील एका स्वच्छ व सुव्यवस्थित हाटेलात शांतपणे जेवण केले आणि दोन वाजता ताम्हिणी मार्गे पुण्याला रवाना झालो.

पूर्वी वरंध घाटातून जाता येत होते. पण एप्रिल पर्यंत वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. म्हणून ताम्हिणीमार्गे जावे लागते. नाहीतर महाबळेश्वर मार्गे आंबेनळी घाटातून पोलादपूरला येऊन भरणा नाक्यावरुन खेड-दापोली मार्गेही आंजर्ल्याला जाता येते. परंतू हे फारच वेळखाऊ प्रकरण आहे. त्यात बऱ्याच जणांना वरंधा, खंबाटकी, पसरणी, आंबेनळी ह्या घाटांची भिती वाटते. मी मात्र दरवेळेस वेगवेगळे मार्ग शोधत असतो व थरारक प्रवास करत असतो.

एक दोन वर्षांपूर्वी तर रात्री ८ ला निघून महाबळेश्वर मार्गे रात्री २.३० ला आंजर्ल्याला पोहचलो होतो. त्यात जंगलातल्या विविध प्राण्यांच्या हालचालींचा अनुभव मयुरेशच्या सांगण्यावरून घेता आला. रस्त्यावर बरेचसे साप गाडीखाली चिरडून मेलेले दिसले. दोन तीन उदमांजरेही दिसली होती. अर्थात बरोबर मयुरेश आणि माधव होता सोबतीला.

एक आहे गाडी व्यवस्थित असेल आणि सोबतीला तीन चार जण असतील तर रात्रीचा प्रवास न घाबरता करावा. अन्यथा नाही. आमचा चपराक समूहाचा दौरा शक्यतो रात्रीचाच असतो, पण कमीतकमी दोघेजण तरी गाडी चालवणारे असतात. एकाला झोप आली तर दुसरा गाडी चालवायला तयार ! असो.

चला या ठिकाणी मजल दरमजल करत आरके व व्हीआरके दुपारी ४.३० घरी धनकवडीला सुखरुप पोहचले आहेत.

आपण सर्वांनी गेले चार दिवस माझ्या ह्या कंटाळवाण्या प्रवास वर्णनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपला ऋणी आहे. नवीन एर्टीगा दोन आठवड्यात चांगली ७०० किलोमीटर पिदडली आहे. तिला दोन तीन दिवसांत पहिल्या सर्व्हिसिंगला पाठवतो म्हणजे पुढील भटकंतीचे नियोजन करता येईल.


 

मनःपूर्वक धन्यवाद

रवींद्र कामठे.