Saturday, 15 September 2018

“आंजर्ले - पृथ्वीवरील एक स्वर्ग/नंदनवन"





आंजर्ले - पृथ्वीवरील एक स्वर्ग/नंदनवन

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील आंजर्लेहे एक अतिशय नयनरम्य असे गावं.  अगदी ह्या पृथ्वीवरील स्वर्ग अथवा नंदनवन म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही, ह्याची प्रचीती तुम्हांला माझ्या ह्या लेखातून येईलच ह्याची मला खात्री आहे.

तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं, नारळ आणि पोफळीच्या उंचच उंच वाड्यांनी गच्च भरलेले एक अतिशय सोज्वळ, सात्विक असे गावं म्हणजेच आंजर्ले”.  ह्याला वाकडं आंजर्लेही म्हणतात, जेंव्हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस दापोलीहून वाट वाकडी करून ह्या गावाला पोहचायची तेंव्हाची गोष्ट आहे ही.  आता हर्णे बंदरा जवळील (मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेलं हेच ते बंदर) खाडीवर पूल झाल्यापासून दापोलीहून बसने थेट गावात येता येते.  आंजर्ले गावं हे कड्यावरचा गणपतीमुळे सर्वदूर प्रसिद्ध आहे.  ह्या गणपतीच्या खूप आख्यायिका आहेत आणि आंजर्ले गावाचीच काय पण येथे येणाऱ्या प्रत्येकाची ह्या गणपतीवर श्रद्धा आहे.  खूप प्रसन्न भावमुद्रा असलेली ही मूर्ती खूप मनमोहक आहे.  माझ्या पाकिटात मी ह्या गणपतीचा एक फोटाच ठेवलेला आहे. कड्यावर म्हणजे आंजर्ले गावाच्या बाजूला जो डोंगर आहे त्यावर ह्या गणपतीचे खूप सुंदर पुरातनकालीन मंदिर आहे.  ह्या डोंगराची उंची साधारण पुण्यातल्या पर्वती एवढी असेल.  आता मात्र मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे व तिथे भक्तांसाठी एक निवासस्थानही बांधण्यात आले आहे.  कड्यावरून पहिले की तीनही दिशांना म्हणजे दक्षिण, पश्चिम, उत्तरेस नजर संपेपर्यंत निळाशार अथांग समुद्र आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो.  त्यात पूर्वेस डोंगराच्या हिरव्यागार कुशीत वसलेलं छोटसं आंजर्ले हे गावं म्हणजे ह्या पृथ्वीवरील स्वर्गच नव्हे तर नंदनवनच होय.

माझ्या बायकोचे हे आजोळ.  तिच्या मामाची वाडी ह्या पृथ्वीतलावरील स्वर्गात / नंदनवनात आहे.  मामा मामी (आता देवाघरी असतात), दोन मेव्हणे, वहिन्या आणि त्यांची प्रत्येकी दोन चिल्लीपिल्ली (अर्थात जी आता खूप मोठी झाली आहेत), एक मेव्हणी जिचे २५ वर्षांपूर्वीच लग्न झालेलं.  असे छोटेखाणी खाऊन पिऊन सुखी असलेलं कुटुंब.  त्यातील लहान मेव्हणा शहरामध्ये नोकरीला असतो आणि मोठा मात्र गावातच असतो.  मी ह्या नंदनवनात गेले २५ वर्षे अगदी नित्यनेमाने जवळ जवळ दर वर्षी ३-४ दिवसांसाठी का होईना जात असतो.  आम्हीं मेव्हणीच्या लग्नाचा सोहळा मामाच्याच अंगणात पाहिला आहे आणि त्याचा मनसोक्त आनंदही लुटला आहे हो.  आंजर्ल्याला पोचण्यासाठी मी सर्व प्रकारच्या पद्धतीने प्रवास केला आहे अगदी बस, बैलगाडी, तर(होडी) दुचाकी, व चारचाकी.  पृथ्वीवरील ह्या नंदनवनाचा मी मनमुराद लाभ घेतला आहे हे माझे नशीबच.

बसचा शेवटचा थांबा जिथे आहे तिथे पाठ करून उभे राहिले की समोरच्या पाखाडीत (ह्याला पाखाडी का म्हणतात हे मला अजून समजले नाही !) मामाची वाडी आहे.  नारळ पोफळीच्या बागेने गच्च भरलेली वाडी, एखाद दुसरे आंब्याचे झाडं, फणसाचं झाडं, मिरी, जायफळ आणि खूप सारी फुलझाडे असलेली, त्यात लाल जांभाच्या दगड मातीतून, लाकडाच्या मोठ मोठ्या पटया वापरून बांधलेले दुमजली घर नव्हे ही तर मामाची माडी.  पुढे मागे भरपूर मोठे आंगण.  आत पडवी, त्यावर प्रत्येकाला हवाहवासा आणि जिव्हाळ्याचा वाटणारा लाकडी पाट वापुरून, लोखंडी सळइने जोडलेला, तीनचार धष्ट्पुष्टांचे वजन पेलू शकणारा एक झोपाळा.  पडवीच्या उजव्याबाजूला गाईंचा गोठा (ज्यात दोन गाई, अजूनही असतात), त्याच्याच थोडेसे बाजूला, त्यांच्या वैरणींचा करून ठेवलेला मुबलक साठा.  पडवीच्या जरा वरच्या बाजूला एक भली मोठी ओसरी आणि त्यात मामीची लाकडी खाट (मामी आजारी असायची तेंव्हा).  आले गेलेल्याची उठबस ह्या पडवीत आणि ओसरीत.  ओसरीच्या मागच्या बाजूला भले मोठे स्वयंपाकघर आणि जेवणाची खोली.  अर्थात येथे सगळ्यांनी जमिनीवर मांडी घालूनच पंगतीला जेवायला बसण्याची पद्धत आहे.  गेले ४-५ वर्षे झाले दूरचित्रवाणी आली आहे.  तरीही जेवायला मात्र एकत्रच बसण्याचा एकदम कडक नियमच आहे.  स्वयंपाक घराला लागूनच थोडेसे बाजूला एक भली मोठी मोरी आहे, जिथे धुणीभांडी केली जातात तसेच गेले काही वर्ष झाली बंद न्हाणीघर तसेच संडासही बांधले आहेत.  थोडेसे बाहेर मागील अंगणात एक तुळशी वृंदावन, त्याच्या बाजूलाच एक पहारी सारखं जाडजूड लोखंडी धारदार नारळ सोलण्यासाठीचं पातं (जे नेहमी पोकळ बांबूने झाकलेलं असायचं).  दहा वर्षांपूर्वी मात्र घराच्या मागच्या बाजूला असलेल्या वाडीतच सगळ्यांना परसाकडे जावे लागायचे !  हो वाडीतच नारळाचे दोन ओंडके एका खड्ड्यावर दोन बाजूला उभे टाकलेले असायचे.  त्याला नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या झापांचा आडोसा केलेला असायचा.  मागच्या ओसरीत एक बादली ठेवलेली असायची.  ती जर जागेवर नसेल तर समजायचे की कोणीतरी परसाकडे गेलेलं आहे.  आमच्या सारख्या शहरातून आलेल्या माणसांना ह्या सगळ्या गोष्टींची गंमतच वाटायची आणि पोट बिघडलं असेल तर मात्र थोडाफार ओशाळल्या सारखंही वाटायचं.  बायामाणसांची जरा अवघडल्यासारखी अवस्था व्हायची पण पर्यायही नसायचा.  असो. 

घरातली सर्व जमीन ही मातीची आणि ती आठवड्यातून दोन ते तीन वेळा गाईच्या शेणाने सारवलेली.  मी मामीला आणि दोन्ही वहिनींना, आई आपल्या लेकराच्या डोक्यावरून कसा हात फिरवेल त्या मायेने ही मातीची जमीन शेणाने सारवतांना पाहिलं आहे.  त्यामुळे ह्या जमिनीवर बसतांना बस्कर, चटई, चादर, सतरंजी घेऊच नये असे वाटायचं, इतकी ऊब ह्या जमिनीतून मिळायची.

स्वयंपाक घराच्या मागच्या बाजूला अजून एक ओसरी आहे ज्या मध्ये मामाची स्वयंपाकाची वेगळी भट्टी आहे.  ह्या भट्टीत लाडू, चिवडे, खोबऱ्याच्या वड्या, पातळ पोह्याच्या चिवडा, तळलेले फणसाचे गरे, आलेपाक, बुंदीचे लाडू, रव्याचे, बेसनाचे लाडू इत्यादी पदार्थ बनवले जात.  हा मामाचा आणि माझ्या मेव्हण्याचा जोड धंदा होय.  कारण नारळ आणि सुपारीच्या उत्पन्नावर घरखर्च चालवणे तसेही मुश्कीलच होते.  त्यात मुलांचे शिक्षण त्यांची लग्ने वगैरे तर जरा अश्यकच होते !  माझा मोठा मेव्हणा आणि वाहिनी अक्षरशः दिवसरात्र त्यांच्या संसारासाठी कसे खपतात हे आम्हीं जेंव्हा जेंव्हा सुट्टीला जायचो तेंव्हा पाहायचो.  आम्हाला खूप संकोचल्यासारखे व्हायचे.  परंतु एक वर्ष जरी आम्हीं नाही गेलो तर आम्हांला दूरध्वनी करून येण्याची गळ घालायची ही मंडळी.  इतकं प्रेम आणि जिव्हाळा ह्या कुटुंबाचा आमच्यावर. त्यामुळे त्याचं मन मोडण्याचा मला तरी धीर व्हायचा नाही आणि त्यात आंजर्ल्याला जायचे म्हणाले की बायको आणि मुलगी तर एका पायावर तयारच असायचे. असो. 

मोठा मेव्हणा हे सगळे जिन्नस तयार झाले की ते पितळेच्या डब्यांमध्ये भरायचा, सायकलला पिशवी लावायचा आणि ठरलेल्या गिऱ्हाईकाकडे पोहचवण्याचे कामाला लागायचा.  तो अगदी दूर केळशी, दापोली आडे वगैरे गावांपर्यंत हे डबे पोहचवायचा.  मी सुद्धा एक दोनदा त्याच्या बरोबर माझ्या चारचाकीतून दापोलीला गेलो होतो.  त्याचे हे कष्ट पाहिल्यावर आपण किती सुखात आणि मजेत आहोत ह्याचीच प्रचीती मला आली होती.  एक मुलगा एक मुलगी असा माझ्या दोन्ही मेव्ह्ण्यांचा चौकोनी संसार.  मोठ्याचा मुलगा देवरूखला वेदशाळेत शिकायला (जो आता खूप प्रसिद्ध गुरुजी आहे) आणि मलगी उच्च माध्यमिक शाळेत शिकत होती (जी आता लग्न होऊन मुंबईत राहते आहे).  तर लहानाच्या मुलगा मुलगी दोघेही आंजर्ल्यातच शाळेत जात होते तेंव्हा.  आता मात्र मोठ्याची दोन्ही मुले मुंबईत आपापल्या संसारात छान रमलेली आहेत.  धाकट्याच्या मुलीचे नुकतेच लग्न होऊन ती रत्नागिरीस राहते आहे आणि मुलगा चक्क लेखा परीक्षकाचे शिक्षण रत्नागिरीत घेतो आहे.  धाकट्या मेव्हण्याचे मात्र अजूनही विंचवाचे बिर्हाड पाठीवरच आहे, तो आपला मुबई, पुणे, बडोदा, अहमदाबाद, असे कामानिमित्त फिरतच असतो, पण तक्रार कसली ती नाही. असो.

कोकणाची एक खासियत अशी की, गावात जेमतेम दोन किंवा तीन मुख्य रस्ते.  अगदी तसचं आमचं हे आंजर्ले.  एका बाजूला डोंगराच्या कुशीत समुद्र किनारी वसलेलं गावं.  गावात एक शाळा, एक पोस्ट कार्यालय, एक बँक, एक पार, चावडी, तीन चार मंदिरे, एक रामाचे, एक देवीचे, एक गावं देवीचे, ग्रामपंचायत कार्यालय, एखादा दवाखाना, छोटी छोटी टपरीवजा दुकाने, एक बस थांबा, लाल मातीचे रस्ते आणि रस्त्यांच्या दुतर्फा घरे.  पुढे मोठे आंगण, कौलारू दुमजली माडी आणि मागच्या बाजूला मोठी ओसरी, त्यामागे साधारण एकर दीड एकराची नारळ पोफळीची वाडी. शेजारी शेजारी वाड्या, पण कुठेही बांधावरून वाद नाही की तंटा नाही. (म्हणजे मला तरी जाणवला नाही).  साधारण दोन तिन वाड्यांमध्ये एक गोड्या पाण्याची विहीर मात्र नक्की असणार.  हो समुद्र किनारी घर असल्यामुळे गोड्यापाण्याची विहीर किती जरुरीची असते ते तिथे राहायला गेल्यावरच कळते.  आजकाल ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची सोय केलेली दिसते.  विहिरीवर एक पंप लावलेला त्या ठरलेल्या प्रमाणे दिवसाआड वाडीला आलटून पालटून पाणी सोडण्यात येते, सगळे कसे एकदम शिस्तबद्ध.  अगदी आखीव रेखीव कार्यक्रम.  जसे काही नांदा सौख्यभरे ! घरात सदैव माणसांचा राबता असायचा.  आलेगेलेल्या प्रत्येकाचे आदरतिथ्य चालू असते.  शेजारी पाजारी तर आमच्याबरोबर जसे काही त्यांचेच पाहुणे असल्यासारखे वागतात आणि प्रत्येक भेटीत एकदा तरी आळीतील एका शेजाऱ्याकडे जेवणाचे अथवा नाश्ताचे निमंत्रण आवर्जून असणारच.  शहरांमध्ये कुठे दिसतो असा जिव्हाळा !  जाऊदेत नको तो विषय.

मामाने पंप चालू केला की आमचा विहिरीवर आंघोळ करण्याचा कार्यक्रमच ठरलेला असायचा.  आंघोळ करून आवरून झालं की स्वयंपाक घरातून वहिनीची हाक यायचीच की, चला नाश्ता तयार आहे, गरम गरम मऊभात त्यात मेतकुट घातलेलं त्यावर गाईच्या साजूक तुपाची धारच धरलेली असायची, तोंडी लावायला मिरगुंड, कैरीच्या लोणचे काय विचारूच नका.  सगळा शाही थाट असायचा.  तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असणार हे वाचून ! इतका स्वादिष्ट नाश्ता असायचा की त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे हो.  कधी कधी हातसडीचे पोहे असायचे तर कधी मस्त शिरा, उपमा असायचा.  पोटभर नाश्ता झाला की थोड्यावेळाने वाटलेच तर आपल्या शहरी सवयीनुसार एक कप चहा प्यायचा.  थोडेसे झोपाळ्यावर बसून झुलायचे, पोट गच्च झालेलं असायचं, डोळ्यावर झापड यायला लागायची, कधी कधी एखादी डुलकी लागूनही जायची तेच कळायचे नाही.  मामाची, मेव्हण्याची, वाहिनीची त्यांची आपली रोजची कामाची गडबड चालूच असायची, त्यात भरीला भर आमच्या आदरातिथ्याची असायची.  पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी आठी पडलेली नसायची.  दोघांची दोन्ही पोरं सकाळी सकाळीच शाळेत गेलेली असायची.  आम्ही मात्र तंगड्या ताणून आळशी गंगारामासारखे झोपाळ्यावर किंवा पडवीत पसरलेलो असायचो.

थोडावेळ असेच पडून राहायचे आणि मग हळूच अंगणात सायकल आहे का बघायचे.  मेव्हण्याला एकदा विचारायचे त्याला सायकल लागते आहे का, तो नाही म्हणाला की लगेचच सायकलला टांग मारून उंडारायला बाहेर पडायचे हा माझा नित्य नियम.  चांगले ५-६ किलोमीटर सायकलवरून फेरफटका मारायचा.  म्हणजे मामाच्या वाडीतून निघायचे ते थेट बंदरावर जायचे,  बंदरावर थोडासा वेळ घालवायचा, हर्णे बंदरावरून आंजर्ले गावात यायला मध्ये एक खाडी पार करायला लागायची त्यासाठी तर (म्हणजे छोट्या होड्या) असतात, अजूनही आहेत.  आम्ही सुद्धा पूर्वी कितीतरी वेळा ह्याच तरीतून आंजर्ले गावात यायचो.  आता थेट चारचाकीने मामाच्या दारात जातो एवढाच काय तो फरक ! बंदरावरून निघायचे आणि खाडीच्या कडेकडेने अगदी मामाच्या वाडीच्या मागच्या बाजूने जवळील मुरडी गावात एक फेरी मारायची.  जातांना रस्त्यामध्ये जो दिसेल त्याला नमस्कार करायचा त्यांची विचारपूस करायची, म्हणजे सायकल चालवत चालवतच (आपली लई ओळख आहे असे दाखवयाचे).  त्यातले काही नेहमी येत असल्यामुळे मला चांगले ओळखायचे. कधी आले पुण्याहून पाव्हणेअसे पाच सहाजण तरी त्यांच्या कोकणी भाषेत हेल काढून हमखास विचारायचेच.  तेवढीच आमची नसलेली कॉलर ताठ व्हायची.  फिरत फिरत सायकल शेवटी बस थांब्याजवळ आली की जरा वेळ तिथल्या पारावर विसावा घ्यायचा.  तिथे रिकामटेकड्या असलेल्या एक दोघांशी जरा टवाळक्या करायच्या, तेवढीच गंमत म्हणून.  एकंदरीत गावातील माणसांची लगबग पाहायला मिळायची.  काही कोकणी लोकं, कोळी, कातकरी दिसायचे.  काहीं कोळणींच्या डोक्यावर वैरणीचे भले मोठे हारे असायचे.  ते ह्या गावात विकायला यायचे.  त्यांचा व्यवहार (वस्तू विनिमय खरेदी विक्री) म्हणजे एका हाऱ्याला ५ नारळ आणि नारळाच्या झावळी पासून बनवलेले झाप, खराटे इत्यादी.  मी मामाला आणि मेव्हण्याला हे झाप, खराटे बनवतांना पाहिले होते त्याचे गमक मला उमगले होते.  दुपारच्या वेळेस थोडीशी शांतता असते आणि विश्रांतीची वेळ असते तेंव्हा ही मंडळी हे असले झाप वगैरे बनवण्याचे उद्योग करायचे. तेवढाच संसाराला हातभार आणि टाकाऊतूनही चार पैसे कसे करता येतील ते पहाणारी ही साधी भोळी आणि पर्यावरणाची पुरेपूर जपणूक करणारी माणसे !

माझ्या ह्या फेर फटक्यास म्हणजे गावचे उकिरडे फुंकून होईपर्यंत दुपारचे १२ वाजलेले असायचे आणि रिकामटेकडेपणामुळे सायकल चालवण्याच्या उद्योगामुळे उगाचच पोटात खड्डा पडायला लागल्याची चाहूल व्हायची आणि सायकल आपसूकच घराकडे वळायची.  तुम्हीं म्हणाल तुमचा कुटुंबकबिला बरोबर असायचा की नाही, का आपले एकटेच बाजीराव दौडायचे की काय !  कुटुंब तर बरोबर असायचे पण त्यांचे माहेरपणाचे जे काही लाड असतील ना, ते आपल्या मामी आणि वाहिनीकडून येथेच्छ पुरवून घेत, झोपाळ्यावर झुलत बसलेले असायचे.  अगदी मामा मामी देवाघरी गेल्यानंतरही ह्यांचे लाड माझ्या दोन्ही मेव्हण्यांनी आणि वहिनींनी पुरवलेत हो.  फारच नशीबवान आहे आमचं कटुंब ह्या बाबतीत.  नाही म्हणायला संध्याकाळी कड्यावर मात्र आम्ही सगळे बरोबरच जात असू.  अधून मधून बंदरावरही जात असू आम्ही सगळेजण एकत्र.  एक मात्र आहे की आंजर्ल्याचा समुद्र पोहण्यासाठी अजिबात योग्य नाही (असंही कोणाला येत एवढं पोहायला !).  पाण्यास खूप ओढ असल्यामुळे गावातील लोकं समुद्रात अजिबात जावू देत नाहीत.  दरवर्षी काही अप्रिय घटना घडत असतात त्यामुळे कुणीही जोखीम घेऊन देत नाही.  आम्हीं आपले शहाण्यासारखे बंदरावरच गुडघाभरपाण्यात पाय बुडवून वाळूतून जमेल तेवढे शंक शिंपले गोळा करायचो (म्हणजे पुण्यात परत आल्यावर बाकीच्यांना दाखवायला की आम्हीं समुद्रात खेळून आलो आहोत ते ), वाळूत मस्त पैकी किल्ले करायचे, चिटुकल्या खेकड्यांची पळापळ पहायची.  आता तर कासव महोत्सवही होत असतो आंजर्ल्यात दरवर्षी.  घरूनच आणलेला खाऊ खायचा, येथेच्छ गप्पा मारायच्या आणि दमून भागून डुलत डुलत घरी परतायचे.  एक मात्र आहे की इतक्या वर्षात मामा कडे कधीही मासे मात्र काही खायला मिळाले नाही आणि तसे कधी खावेसेही वाटले नाही, अगदी आवडत असूनही.  का कोण जाणे, पण मामा कडे सगळे शाकाहारी असल्यामुळे आणि माझी बायकोही शाकाहारी असल्यामुळे मला फारसा फरक पडला नसावा बहुधा.  असो. 

फेर फटका मारून आलो की सायकल अंगणात लावायची, सगळ्यांशी थोड्याशा गप्पाटप्पा मारायच्या, मामाला त्याच्या कामात थोडीशी मदत करायची, म्हणजे त्यांचे काम न वाढवून ठेवता थोडीशी झाडलोट वगैरे, तर कधी कधी मेव्हण्याला त्याच्या भट्टीत (बुंदीचे/रव्याचे/बेसनाचे) लाडू वळण्यास मदत करायचो. खूप मजा यायची हे सगळे करतांना.  मला झेपतील एवढीच कामे मी करायचो.  थोडासा वेळ जातो ना जोतो तोच स्वयंपाक घरातून मामीची किंवा वाहिनीची जेवायला चला सगळ्यांनी अशी आवई यायचीच.  चुलीवरची गरम गरम चपाती / भाकरी, भाजी, लसणाची आमटी, लोणचं, मिरगुंड, चवदार भात, आणि नारळाची हवी तेवढी बर्फी असा बेत त्यावर येथेच्छ ताव मारायचा आणि हातावर पाणी पडले रे पडले की लगेचच माडीवर जावून तास दोन तास ताणून द्यायची, हा माझा आंजर्ल्यात गेल्यावरचा वेळापत्रकानुसार ठरलेला बेतच असायचा.  ह्याच्या सारखे दुसरे सुख ते काही नाही हो ह्या जगात असेच वाटायचे.  मी तर अगदी स्वत:ला पेशवाच समजून वागायचो. तसाही मी आंजर्ल्याचा जावई होतो ना !

दुपारची कुंभकर्णाची वामकुक्षी उरकली आणि थोडीशी उन्हं खाली आली की आम्हांला सगळ्यांना कधी एकदा कड्यावरच्या गणपतीला जातोय असे व्हायचे.  वाहिनीने गरम गरम चहा तयारच ठेवलेला असायचा.  तो झाला की आम्हीं सगळे, जमले तर लहान मेव्हणा (जेंव्हा केंव्हा तो गावाला आलेला असेल तेंव्हा), दोन्ही मेव्ह्ण्यांची मुले असा लवाजमा कड्यावर निघायचा.  अर्थात मोठा मेव्हणा, दोन्ही वाहिन्या मात्र घरातच थांबायच्या.  त्यांच्या हाताला दम असेल तर त्या येतील ना आमच्या बरोबर हुंदडायला ! आंजर्ल्यातील आमचा मुक्काम हा कमीत कमी तीन दिवस तरी असायचाच.  ह्या तीनही दिवसांत संध्याकाळी कड्यावरच्या गणपतीस जाण्याचे वेधच लागलेले असायचे आम्हां सगळ्यांना.  त्याचे कारण कड्यावरून दिसणारा आंजर्ल्याचा तो नयनरम्य निसर्गरम्य सोहळा अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.  आजवर कितीतरी संध्याकाळी मी ह्या कड्यावर घालवल्यात हे मी विसरूच शकत नाही.  गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे.
 
कड्यावरून आपली नजर जेथपर्यंत पोहोचेल तेथ पर्यंत पाहिले तर सर्वदूर अथांग सागराचे निळेशार पाणी आणि आकाश ह्यांचे अविस्मरणीय असे मिलन दिसून येते.  तिन्हीसांजेची वेळ, सूर्यास्त होऊ घातलेला असतो, वातावरणात संध्याकाळची निरव शांतता पसरलेली असते.  आपण ह्या गर्दीतून लांब जावून मंदिराच्या पाठीमागील कड्यावर जावून विसावायचे आणि निसर्गाची ही अदभूत किमया पहायची.  सूर्य महाराजांनी आकाशात नारंगी रंगाचा भंडारा उधळायला सुरवात केलेली असते.  आपल्या हातातील छायाचित्रक (कॅमेरा) सरसावून बसायचे.  मी तर शेकडो छायाचित्रे काढली असतील आजवर ह्या जागेवरून.  परंतु निसर्गाचा हा सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पाहण्यात जी काही मजा आहे ती छायाचित्रात नाही बरका !  थोडसं अंधारून यायला लागलेलं असतं.  आपल्या डोक्यावरून असंख्य पक्षांचे थवेच्या थवे घरट्याच्या ओढीने उडत असतात.  त्यांचा तो किलकिलाट आपल्या कानाला एखाद्या संगीतकाराने रचलेल्या नादमधुर रचने सारखा भासतो आणि मन कसे प्रसन्न करून जातो.  समुद्राकडे एक नजर टाकली की क्षितिजावर सूर्यास्ताच्या नारंगी छटेमध्ये दूरवर काळे काळे ठिपके दिसू लागतात.  हो हे म्हणजे दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर परतीच्या वाटेकडे चाललेले आपले कोळी बांधव, त्यांच्या शिडाच्या होड्या हाकून किनाऱ्याच्या ओढीने येतांना दिसतात.  सूर्य अस्ताला गेल्यावर काही क्षण अगदी उदासवाणे वाटते.  पण लगेचच त्याने उधळलेली नारंगी रंगाची छटा वातावरणात एक आल्हाददायक उत्साह आणते.  असे वाटते ह्या कड्यावरून उठूच नये.  इथेच बसून रहावे.  मंद वाऱ्याची एक थंड झुळूक मन कसे हलके करते आणि आपसूकच दोन्ही कर जुळतात ते ह्या निसर्ग निर्मात्याच्या कारीगीरीवर.

गेल्या काही वर्षात दापोलीहून हर्णे बंदरामार्गे आंजर्ल्यात येण्यासाठी मुरडीच्या खाडीवर एक पूल बाधण्यात आला आहे.  त्यामुळे आता दापोली पासून ते अगदी केळशी पर्यंत सर्व गावांचा संपर्क वाढला आहे आणि पर्यटकांचीही सोय झाली आहे.  ह्या वाटेने हर्णे बंदराच्या डोंगरावरून संपूर्ण आंजर्ल्याचे निसर्गरम्य कड्यावरून पाहिलेल्या दृष्यासारखेच जसे काही भल्यामोठ्या नैसर्गिक आरशातच पहिल्या सारखे मनाला वेडं लावणारे ह्या नंदनवनाचे दर्शन होते.  अगदी तीनही बाजूचा अथांग समुद्र आणि डोंगराच्या एका कुशीत वसलेले हे छोटसं आपुलकीचं, माणूसकीच तसेच माझ्यासाठी असलेलं पृथ्वीवरील स्वर्ग / नंदनवन.

कड्यावरून सभोवताली दिसणारे आंजर्ल्यातील नारळ पोफळीच्या वाड्यांचे विहंगम दृश्य इतके मनमोहक असते की वाटते ह्या कड्यावरच आपले एक घर असावे.  दिवेलागणीची वेळ गावात सगळीकडे चुली पेटल्याची जाणीव करून देतात.  हलकासा धूर आसमंतात पसरतांना दिसू लागतो.  वरून लाल मातीचे रस्ते एखाद्या अजगराने गावाला विळखा घातल्या सारखे भासतात.  एखाद दुसरी बैलगाडी लाल मातीचा धुराळा उडवत चाललेली असते आणि आता आपल्यालाही घरी परतावे लागणार ह्याची जाणीव होते. आम्हीं सगळे जण मनात नसतांनाही परतीच्या वाटेला लागतो.  हो पण आता आलो त्या रस्त्याने नाही तर मंदिराच्या मागील बाजूच्या वाटेने उतरायला लागतो.  कारण ह्या बाजूला व्यवस्थित पायऱ्या केलेल्या आहेत तसेच जाता जाता कड्यावरील गणपतीच्या पावलाचे ठसे जिथे उमटले आहेत त्याचे दर्शन घेऊन घ्यायचे असा आमचा परिपाठ आहे.  त्याच वेळेस मामीने सांगितलेली एक आख्यायिका आठवते, की, ‘गणपती बाप्पाने एक पाय समुद्रात आणि एक पाय कड्यावर ठेवला होता व त्याच्या पावलांच्या खुणा ह्या दगडात उमटल्यात म्हणे’.  परतीच्या वाटेवर, कोणी आपली आवडती गाणी गुणगुणत तर कोणी एकमेकांशी गप्पा मारत तर कोणी आपल्याच धुंदीत पायऱ्या उतरायला लागतो.  तसा अंधुकसा प्रकाश असतो अजून, पण शेवटी आपण कोकणात आहोत त्यामुळे खाली बघून पाय उचलत चाललेले बरं म्हणून जरा धास्तावलेलेच असतो.  मामाने तशी दिलेली ताकीदच आठवते.  गावाच्या वाटेला लागलो की रामाचे मंदिर, ग्रामपंचायत, बँक ऑफ बडोदा आणि प्राथमिक शाळा आली की समजायचे की आपण आता घराच्या जवळ पोहोचलो आहोत.

ह्या वाटेला लागले की घराचे वेध लागलेले असतात.  कड्यावरून उतरेपर्यंत संध्याकाळचे ७ वाजलेले असतात.  दोन्ही मेव्हणे-वहिन्या आमची वाट पाहत अंगणात भली मोठी सतरंजी अंथरून निवांत गप्पा मारत बसलेले दिसतात.  त्यांना असे निवांत पाहून माझ्या मनाला एक सुखद धक्काच बसतो, पण छान वाटतं.  त्यांनी आमच्या साठी मस्त पैकी सुक्या भेळीचा कार्यक्रम आखलेला असतो.  एखाद दिवस कधी बटाटेवडा तर कधी भजी तर कधी पावभाजी असाही बेत असतो.  काही विचारू नका.  आमची एवढी बडदास्त ही मंडळी ठेवतात की काही विचारू नका.  कुठून आणतात एवढी माया, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे वेळ, ही माणसे, हेच मला कळत नाही.  मला काही ह्या प्रश्नाचे उत्तर आजवर २५ वर्षात एकदाही मिळाले नाही आणि ते मी शोधण्याचा प्रयत्नही करू नये असेच मला वाटते.  आहोरात्र कष्ट करणारी ही माणसे, पण त्यांच्या चेहऱ्यावर एकही आठी मी कधी पहिली नाही, की त्यांना कधी चिडचिड अथवा रागराग करतांना पहिले नाही.  पहाटे चार साडेचार पासून ते रात्री नऊ साडेनऊ पर्यंत त्यांचे हातपाय अखंड चालूच असतात.  दुपारी तासभर जी काय ती विश्रांती घेत असतील तेव्हढीच, ते सुद्धा पाठ जमिनीवर टेकायची म्हणून, बाकी काम, काम आणि काम.  ह्याची प्रचीती मला अनेक वेळा आलेली आहे.  सहज एक गंमत सांगतो.  मामी असतांनाची गोष्ट आहे.  तीनचार दिवस राहून आम्ही उद्या सकाळी परत निघणार होतो.  मामीचे सारखे चालले होते अजून एक दिवस थांबा, गाय विणार आहे, छान ताजा ताजा खरवस खाऊनच जा.  मामीच्या आग्रहाखातर आम्ही एक दिवस मुक्काम वाढवला.  आम्ही सगळे ओसरीवर गाढ झोपेत होतो.  मामा मामी, दोन्ही मेव्हणे आणि वाहिन्यांची चाललेली लगबग आमच्या गावीपण नव्हती आणि अचानक रात्री अडीच तीन वाजता गोठ्यात धप्प असा आवाज झाला.  आम्हांला जाग आली तेंव्हा कळले की गाईने एका गोंडस वासराला जन्म दिला आहे.  मग काय दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्यासाठी ताजा ताजा खरवस तयार.  मामीची मला खरवस खायला घालायची इच्छा पूर्ण झाली आणि माझी तो खाण्याची हौस फिटली.  ह्या खरवसाची मामीच्या हाताची, तिच्या मायेची, चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे असे वाटते.  अजूनतरी मी असा खरवस माझ्या आजवरच्या आयष्यात खाल्ला असेल असे वाटत नाही.

आंजर्ल्याशी गेल्या २५ वर्षातील खूप आठवणी माझ्या स्मृती पटलावर अगदी ताज्या आहेत.  त्या जर लिहायचे झाले तर एक छान कादंबरीच तयार होईल असे वाटते.  बघुयात पुढे मागे हा योग जर जुळून आला तर नक्कीच तसा प्रयत्न करेन म्हणतो.  हे ही नसे थोडके असेच वाटेल मला. 

आंजर्ल्यातच एक मात्र आहे की उदरनिर्वाहनाचे फारसे साधन उपलब्ध नसल्यामुळे आणि उत्पन्नाच्या मर्यादेमुळे घरातील एका तरी व्यक्तीस अथवा कुटुंबास मुबई पुणे अशा शहरांमध्ये राहावे लागते.  तिथेही ही माणसे कष्ट करून आपला संसार अतिशय गुण्यागोविंदाने करतात ह्यातच सगळे आले. परंतु आयुष्याच्या सरते शेवटी त्यांना त्यांचे हे गावं मात्र परत खेचून आपल्या भूमीत घेऊन येते ही मात्र इथल्या मातीची, वाडीची किमयाच आहे.

अताशा मलाही असे वाटायला लागले आहे की निवृत्तीनंतर मेव्हण्याला सांगून आंजर्ल्यातच दोन खोल्या भाड्याने (विकत घेणे शक्य नाही) घेऊन राहावे म्हणजे उर्वरित आयुष्य तरी ह्या शहरी वातावरणाच्या धकाधकीपासून दूर, तणावरहित आणि शांत जाईल व सुखासुखी ह्या पृथ्वीवरील स्वर्गाचा/नंदनवनाचा म्हणावा तसा आनंद लुटता येईल.  भरपूर वाचायला वेळ मिळेल.  मनात आले की कड्यावर जायला मिळेल, खूप खूप लिहिता येईल आणि स्वास्थ्यही उत्तम राहील अशी एक आशा मनात उत्पन्न झाली ह्याचेच नवल वाटते आणि गेल्या २५-३० वर्षांची आंजर्ल्याशी जोडलेली माझी ही नाळच असावी असेही वाटते. 

समुद्राच्या पाण्यातील खारटपणा ह्या कोकणातील माणसांच्या स्वभावात काय पण वागण्यातही दुरान्वये दिसून येत नाही.  उलट भर समुद्रात गोड्या पाण्याचे तळे असावे असे ही माणसे !  ह्या सगळ्या पापभिरू माणसांच्या माणुसकीमुळेच त्यांनी ह्या मतलबी, स्वार्थी, पातळधुंडी, मत्सरी, पापी, माणसांच्या भाऊगर्दीतही ह्या पृथ्वीतलावर एक स्वर्ग / नंदनवन साकारले आहे असे वाटते.   ह्या माझ्या जिवाभावाच्या लोकांना तितक्याच प्रेमाने, मायेने, जिव्हाळ्याने, मला साष्टांग दंडवत करावासा वाटतो म्हणून हा लेख प्रपंच.

रविंद्र कामठे.
पुणे

Wednesday, 29 August 2018

“विश्वास”


विश्वास

विश्वास ह्या शब्दावरच विश्वास कसा ठेवायचा हे खरं तर खूप शिकण्यासारखं आहे आणि ज्याला हे जमतं त्यालाच आयुष्याचा अर्थ समजला आहे असे म्हणाल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

माणूस विश्वास कोणावर, कशासाठी, का ठवतो हे त्याचे त्यालाच माहित !  विश्वास म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आवाज, जो आपल्या अंत:करणातून येतो आणि आपल्या काळजाला भिडतो व शब्दरूपी भावनांतून व्यक्त होतो.  तसं पहायला गेले तर जगातले सर्वच व्यवहार, सुविचार, आचार, प्रचार, प्रकार, स्वैराचार, अत्याचार, तक्रार, सरकार, पुरस्कार, तिरस्कार, नकार, बलात्कार, देकार, आकार, विकार, दुराचार, प्रतीकार, सोपस्कार, फेरफार इत्यादी, हे त्या त्या गोष्टींवरील सलग्न असलेल्या त्या त्या माणसांच्या विश्वासावरच तर अवलंबून असतात नाही का !  थोडासा मनाला ताण देऊन पहा म्हणजे तुम्हांला मी हे जे काही विधान केलेले आहे ते पटल्याशिवाय राहणार नाही, ह्याची मला खात्री आहे. 

वर नमूद केलेल्या ह्या गोष्टींवरील आपला त्या त्या गोष्टींच्या संदर्भातील विश्वास हा इतका दृढ असतो की समोरच्याने आपल्याला त्याविरुद्ध अथवा त्याच्या बाजूने कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला ना तरी ते पटत नाही.  त्याचे कारण आपल्या मनातील रासायनिक प्रक्रियाच इतकी खतरनाक आहे की आपले मन कळत नकळत ह्या विचारांच्या आधीन होवून बसते, त्यावर विश्वास ठेवते आणि त्यामुळेच की काय, जे घडायला नको असते नेमके तेच घडून जाते आणि शेवटी आपण नियतीकडे बोट दाखवून स्वत:ची सुटका करून घेतो.  अर्थात हे चांगले आणि वाईट ह्या दोन्ही घटनांच्या बाबतीत तितकेच लागू पडते हे मात्र निश्चित आहे.

आपल्याकडे एक म्हण आहे की विश्वास कमवायला आपले आयुष्य खर्ची घालायला लागते, पण विश्वास गमवायला एक क्षण, एक छोटीशी चूकही पुरेशी असते”.  असे का !  ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळतच नाही असेच वाटते.  उत्तर मिळाले तरी प्रश्न सुटतोच असेही नाही.

माणूस माणसावर अथवा व्यवस्थेवर आपल्या सोयीनुसार विश्वास टाकतो अथवा ठेवतो असे मला तरी वाटते.  म्हणजे ज्या गोष्टींमुळे माणसाची गैरसोय होते तिथे माणसाचा त्या व्यक्तीवरील अथवा व्यवस्थेवरील विश्वास उडायला सुरवात होते.  माणसाच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यामुळे एकमेकांवरील विश्वासाला तडा जातो आणि आपल्यातील नातेसंबंधात, मित्रत्वात, व्यावहारिक संबंधात, व्यवस्थेत एक प्रकारचा दुरावा निर्माण होऊन बसतो.  आयुष्यभर मोठ्या कष्टाने कमावलेला हा विश्वास काही क्षणात गैरसमजामुळे म्हणा अथवा असंवेदनशील अशा अहंकारातून निर्माण झालेल्या हट्टापायी म्हणा, किवा संदर्भित प्रसंगाकडे ह्या व्यक्तींच्या बघण्याच्या दृष्टिकोनामुळे, नाहीसा होतो आणि कधीही न भरून येणारी हानी करून जाते.  माणसांची नाती तर विश्वासावरच अवलंबून असतात !  एकदा का ह्या विश्वासाला तडा गेला तर परत ही नाती जुळून येणे जरा कठीणच होऊन बसते आणि समजा यदाकदाचित जुळून आलीच तर ती पुन्हा परत पहिल्यासारखी, पहिल्या इतक्याच विश्वासाने वृद्धिंगत होतील ह्याची शास्वती देणे अंमळ कठीणच !  अगदी काचेला गेलेल्या तड्या सारखी अवस्था होऊन बसते.  ह्यात ज्यांचा काही दोष नसतो अशी काही माणसे निष्कारण भरडली जातात.  त्यांच्या प्रामाणिकपणाची कसोटी लागते.  परंतु त्याला काही पर्यायही नसतो.  ज्याचे चुकत असते त्याला जर कळत असते तर शेवटी ते घडलेच नसते ना ! असो.  हा खेळ आपल्या भावनांचा असतो आणि ह्यात भरकटत जाण्याशिवाय काही गत्यंतर नसते हो.  शेवटी काय तर प्रामाणिक माणसांनाच आयुष्यात सत्व परीक्षा म्हणा अथवा अग्नी परीक्षा द्यावी लागते, अगदी सीते सारखी, हे ही सत्य नाकारून चालणार नाही !

म्हणूनच विश्वास कमवायचा असतो आणि तो आयुष्यभर कसा टिकेल ह्यासाठी कष्ट घ्यायचे असतात हे नक्की.  हीच तर आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्यामुळेच ती सर्व जगात श्रेष्ठ ठरली आहे आणि माझा ह्यावर ठाम विश्वास आहे.


रविंद्र कामठे

Saturday, 16 June 2018

सात्विक आनंद


चपराक साप्तहिक ११ जुन ते 18 जून मध्ये छापून आलेला माझा हा सात्विक आनंद हा लेख खास तुमच्या साठी...
सात्विक आनंद 
मी सकाळी ६.३०ला नेहमीप्रमाणे चालण्याच्या व्यायामास आमच्याच जवळील एका सोसायटीत जातो, तसा आजही गेलो होतो.  त्याचवेळेस आमच्या कडे घंटागाडी घेऊन कचरा गोळा करण्याऱ्या एक काकू आणि त्यांचा लहान मुलगा मला रोज सकळी त्यांची घंटागाडी घेऊन जातांना दिसतात.  अगदी नित्यनेमाने हे मायलेक मला रोज ओळखही दाखवतात, मी पण त्यांना हसून प्रतिउत्तर देत असतो.  पण आज काकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  त्याचे कारणही तसेच होते.  त्यांचा मोठा मुलगा चक्क ७८ टक्के मार्क मिळवून बारावी पास झाला होता आणि ही बातमी कधी एकदा मला सांगते असे त्यांना झाले होते.  त्यांची ही बातमी ऐकून मलाही खूप खूप आनंद झाला आणि टचकन माझे डोळे भरून आले.  त्याला कारण म्हणजे ह्या काकूंची आणि त्यांच्या मुलाची जिद्द, इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही ही माणसे कुठून एवढे धैर्य आणतात हेच कळत नाही. त्यांची आयुष्याशी लढण्याची ही जिद्द पहिली की आपल्या आयुष्यातील समस्या थिट्या वाटू लागतात.
त्याला कारणही तसेच आहे हो..
त्याचे असे झाले की मागील वर्षी ह्या काकूंच्या यजमानांना अर्धांगवायुने ग्रासले होते.  त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी जंग जंग पछाडून त्यांच्यावर उपचार करून त्यांना कसे बसे घरातल्या घरात उठते बसते केले होते.  ह्या अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एका मुलीचे लग्नही करून दिले आणि मोठ्या मुलास बारावीची परीक्षाही द्यायला लावली, तेही कोणापुढे हात न पसरता.  जेंव्हा त्या आमच्याकडे कचरा गोळा करायला येतात तेंव्हा आम्ही त्यांच्या यजमानांची अगदी आपुलकीने चौकशी करत असतो.  बाकी त्यांची कुठलीच अपेक्षा नव्हती आणि नाही.  परंतु त्यांना ह्याच आपुलकीची गरज होती आणि त्याचे त्यांना खूप अप्रूप होते.  म्हणनूच त्यांना मुलगा पास झाल्याची ही बातमी कधी एकदा आम्हांला सांगतोय असे झाले असेल कदाचित !
त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी तर झालोच आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून काकूंना त्यांच्या मुलाच्या बारावीच्या यशाचे पेढे वाटण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी बक्षीस दिली.  कदाचित हाच असेल का परमार्थ देव जाणे !
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी माझे आवरून कार्यालयास जायला निघालो होतो आणि रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभा होतो.  ह्या काकूंचा हाच तो यशस्वी मुलगा त्यांच्या बरोबर कचऱ्याची घंटागाडी घेऊन, एवढ्या मोठ्या यशानंतरही ती घंटागाडी ढकलत आपल्या आईस मदत करतांना पाहून माझे मन ह्या काकाकाकूंसाठी अभिमानाने भरून आले.  अशीही लेकरं जगात असतात की ज्यांना मिळालेले यशही साजरे करायला वेळ नसतो आणि हे यश मिळाल्यावर अशी मुलं हुरळून न जाता अजून मोठ्या जिद्दीने उभी राहतात आणि आपल्या आईवडिलांच्या उपकाराचे पांग फेडतात.  धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी अशी लेकरं जन्म घेतात.
मला आज तर स्वत: बारावीची परीक्षा पास झाल्यावर झाला नव्हता एवढा आनंद झाला होता हो ! मनातल्या मनात मी ह्या मुलास त्याच्या भविष्यासाठी मन:पूर्वशुभेछ्या दिल्या आणि ठरवले की भविष्यात जर कधी काकूंना त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी काही मदत लागली तर ती आवर्जून करायची.  अर्थात त्यांच्या स्वाभिमानास कुठलाही धक्का न लागू देता !





Monday, 4 June 2018

“व्ह्यालेनटाईन डे”


व्ह्यालेनटाईन डे


राजू आज मावस भावाकडून आणलेले त्याचे जुनेच पण जरा चांगले कपडे घालून तयार झाला होता.  आज १४ फेब्रुवारी म्हणजे व्ह्यालेनटाईन डे होता ना ! त्याला अशी कोणीच व्ह्यालेनटाईन म्हणजे मैत्रीण नव्हती, तरी सुद्धा सर्व मित्रांनी ठरवलेले असल्यामुळे, तो नेहमी पेक्षा वेगळे आणि चांगले दिसावे म्हणून त्यातल्यात्यात जरा बरे कपडे घालून कॉलेजला जायच्या तयारीत होता. 

राजूची घरची परिस्थिती तशी काही फारशी चांगली नव्हती.  आई बिचारी थोडेफार शिवण काम करून, तसेच चार पाच जेवणाचे डबे करून आपल्या संसाराचा गाडा ओढत राजूच्या वडलांना संसारात मदत करत होती.  राजूचे वडील एका खासगी कारखान्यात जेमतेम पगाराच्या नोकरीत होते.  कायम स्वरुपाची नोकरी नसल्यामुळे अंगावर पडेल तसे काम असायचे आणि त्यामुळे जसे काम असेल तसे त्यांना पैसे मिळायचे त्यामुळे त्यांची कमाई फार नसायची, पण दोन वेळेस पुरेल इतके ते आपल्या संसारासाठी करायचे.  खालच्या वाडीतल्या भाड्याच्या दोन खोल्यांच्या घरात त्याचा हा संसाराचा गाडा ही मंडळी कसलीही तक्रार न करता रेटत होती.  ह्या माय बापाचे एकच ध्येय होते की आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिकवून मोठे करायचे व त्यांच्या सुखी संसाराचे दिवस पहायचे.  छोटेसेच पण त्यांच्या ताकदीच्या पलीकडचे हे स्वप्न पुरे करण्यासाठी हे मायबाप अहोरात्र धडपडत होते.  राजूची लहान बहिण प्रिया आत्ता कुठे विमलाबाई गरवारे शाळेत बारावीत शिकत होती.  तसे पहायला गेले तर हे गरीब पण स्वाभिमानी आणि समाधानी असे चौकोनी कुटुंब होते. 
राजू कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात होता.  त्याच्या आईने मोठ्या जिद्दीने त्याच्या साठी पैसे साठवून त्याला गरवारे कॉलेज मध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश मिळवून दिला होता.  राजू कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून थोडासा बुजला होता.  त्याचे सगळेच मित्र अगदीच चांगल्या खात्यापित्या घरचे होते आणि तोच एकटा त्यांच्यात फारच गरीब घरचा होता ह्याचा त्याला एक प्रकारचा न्यूनगंड आला होता.  त्यामुळे तो आपल्या ह्या मित्रमंडळीत फारसा मिसळतही नव्हता.  त्याची ही मानसिक कोंडी समजून घेणारा त्याचाच एक  अगदी जिवलग मित्र प्रदीप कायम राजूला ह्या विषयावर बोलून त्याच्या मनातील ही कोंडी दूर प्रयत्न करायचा.  राजूला त्याचे बोलणे समजायचे परंतु त्याचा मुळात स्वभाव परिस्थितीच्या रेट्यामुळे बुजरा झालेला होता व आपल्या नशिबाला कायमच दोषी ठरवत होता.  प्रदीपला ही गोष्ट समजत होती पण त्याला त्याच्या मित्राच्या ह्या मानसिकतेवर उपाय सुचत नव्हता.
प्रदीपही काही फार श्रीमंत कुटुंबातला नव्हता.  राजुपेक्षा जरा बरी म्हणजे खाऊन पिऊनसुखी कुटुंबातील होता.  प्रदीपला दोन बहिणी, मोठी बहिण पद्मा जी त्यांच्याच कॉलेज मध्ये वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला शिकत होती आणि लहान पल्लवी बारावीला राजूच्या बहिणीच्याच शाळेत होती.  वडील सरकारी नोकरीत कारकून होते तर आई आपटे प्रशालेत प्राथमिक शिक्षिका होती.  त्यांचे मधल्या वाडीत दोन खोल्यांचे स्वत:चे घर होते त्यामुळे एकंदरीत चांगले चाललेले होते.  राजूच्याच वाडीत म्हणजे मधल्या वाडीत प्रदीप राहायला असल्यामुळे त्यांचे घरी येणे जाणे ही होते आणि घरातले सगळे एकमेकांना चांगले ओळखतही होते आणि मुलांचीतर खूपच चांगली मैत्री होती.  सर्वसाधारणपणे सणासुदीला तसेच काही सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमधून ह्या दोन्ही कुटुंबाच्या भेटीगाठी होतच असायच्या. एकमेकांबद्दल आस्था असलेली ही दोन्ही कुटुंबे म्हणजे समाजासाठी अगदी आदर्श होती.  राजूचे आई वडील जरी गरीब असले तरी प्रदीपचे आई वडील त्यांचा योग्य तो मान सन्मान ठेवत होते त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा स्वाभिमान आणि परिस्थितीपुढे हतबल न होता लढण्याची जिद्द.  गरिबीमुळे त्यांना शिकता नाही आले म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा एक संकल्पच केला होता आणि ज्यात त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्यच पणाला लावले होते ह्याचा कोण अभिमान प्रदीपच्या वडलांना होता.  सध्याच्या काळात अशी माणुसकी असलेली माणसे शोधूनही सापडत नाहीत असेच त्यांचे मत होते आणि ते आल्या गेलेल्यांना हे अगदी निक्षून सांगत असत.

पल्लवी आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती.  तिला ह्या व्ह्यालेनटाईन डेचे फारसे काही घेणे देणे नव्हते.  तिची बारावीची परीक्षा अगदीच तोंडावर आलेली होती.  त्यात आज राजूची बहिण प्रिया आणि ती दोघी मिळून अभ्यास करत होत्या.  बरेचसे पेपर तिने सोडवायला आणले होते.  जे ती आज प्रियाकडून सोडवून घेणार होती.  पल्लवीचे हे पेपर क्लास मधेच सोडवून झालेले होते.  पण प्रिया परिस्थितीमुळे क्लास लावू न शकल्यामुळे तिला मदत म्हणून पल्लवी तिच्याकडून हे सगळे पेपर सोडवून घेऊन तिला अभ्यासात मदत करणार होती आणि त्यामुळे तिच्याही अभ्यासाची चाचणी होणार होती.  पल्लवी आणि प्रिया अभ्यासात अगदी गढून गेलेल्या होत्या बाकी कशातच त्यांचे अजिबात लक्ष नव्हते.  फक्त अभ्यास अभ्यास एके अभ्यास.  चांगल्या मार्कांनी पास होणे एवढाच त्यांचा उद्देश होता. अधून मधून त्यांची ताई पद्मा त्यांच्यावर जाता येता लक्ष ठेवत होती आणि त्यांना काही अडले नडले तर सांगतही होती.  पल्लवी आणि प्रियाच्या मैत्रीची भट्टी एकदम छान जमलेली होती.

राजू, प्रदीप आणि पद्मा ह्यांना परीक्षेचा फारसा काही ताण नव्हता.  त्यात आज व्ह्यालेनटाईन डेअसल्यामुळे पद्मा जरा लवकरच आवरून नटून थटून घरातून बाहेर पडण्याच्या बेतात होती.  पल्लवीने तिची थोडीशी गंमत केलीच होती.  की ताई आज काय विचार आहे.  कोण आहे तुझा व्ह्यालेनटाईनम्हणजे सखा / मित्र, जरा आम्हांलाही कळू देत की !  आम्हीं नाही सांगणार आई बाबांना.  आणि हो तू जर नाही सांगितले आणि आम्हांला बाहेरून कळले तर मात्र आम्ही नक्कीच घरी येऊन काडी करण्रार बरका !  पल्लवी ताईची खेचत होती हे पाहून प्रिया तिला दटावून गप्प करण्याचा प्रयत्न करत होती.  प्रियाला उगाचच कसतरी होतं होते.  अगदी संकोचून गेली होती बिचारी.  पण पल्लवी आणि पद्मा ह्या दोघी बहिणी जरी असल्या तरी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.  त्यामुळे ही अशी चेष्टा मस्करी त्यांच्यात कायमच चालायची.  खूप खेळीमेळीचे वातवरण होते त्यांच्या घरात हे ही अगदी सहजपणे प्रियाला जाणवत होते आणि तिला त्याचे खूप अप्रूप वाटत होते.   आज पल्लवी ताईची जरा जास्तच खेचत होती कारण व्ह्यालेनटाईन डेहोता ना !  शेवटी पद्मा लटकेच रागे भरून पल्लवीला म्हणाली, की माझे आई जे काही असेल ना ते तुला सांगितल्याशिवाय मी राहणार नाही.  पण काहीतरी होऊ तर दे सांगायला... (मनातल्या मनात पद्मा म्हणाली की.. कसं सांगू ग माझ्या लाडक्या पल्ले तुला (पद्मा पल्लवीला लाडाने पल्ले म्हणते)... माझ्या स्वप्नातला राजकुमार हर्षद मला सापडला आहे, फक्त योग्य वेळ पाहून मी हा विषय आई बाबांशी बोलणार आहे, अर्थात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि एखादी नोकरी लागल्या नंतर.....) असे म्हणून ती तडक तिची पर्स काखोटीला मारून कॉलेजला निघून जाते.  आज पद्मा तिच्याच विश्वात गुंग होती.. हे मात्र प्रियाला आणि पल्लवीला जाणवले.  पल्लवीने मनोमन ताईच्या मनातली गोष्ट ओळखली होती.  ताईच्या डोळ्यातील भावनांनी गद्दारी केली होती जी पल्लवीच्या नजरेतून सुटली नव्हती.  काही तरी गडबड नक्की आहे आहे हे उमजल्यामुळे पल्लवी थोडीशी सुखावली होती.  तिने मिश्किलपणे प्रियाकडे पहिले आणि गालातल्या गालात हसत पुन्हा एकदा स्वत:ला अभ्यासात गुंतवून घेतले.

पद्मा घरातून बाहेर पडते. प्रदीपही त्याचे आवरून राजूची वाट पाहत पेपर वाचत बसलेला असतो.  इकडे राजू आज खूपच आनंदी मूड मध्ये असतो.  जुनेच पण त्याला शोभून दिसणारे कपडे घातल्यामुळे स्वारी थोडीशी खुशीतच होती आणि का असू नये.  बिचारा किती दिवसांनी इतका खुश होता.  त्याने त्याच्या स्वप्नातील परीची खूप सारी स्वप्ने पहिली होती.  त्यात आज व्ह्यालेनटाईन डे असल्यामुळे का कोण जाणे त्याला उगाचच आपल्या ह्या काल्पनिक परीची सारखी आठवण येत होती.  हे वयच असं असतं ना की तिथे आपलं काहीच चालत नसतं.  हेच खर असतं.  आपल्याच नादात राजू त्याचे अत्यंत आवडते किशोर कुमारचे गाणे गुणगुणत निघतो......

हुं हुं sss फुलों कें रंगसे.. दिल की कलमसे.. तुझको लिखी रोज बाती.. कैसे बताऊ..किसं किसं तरह से.. पल पल मुझे तू सताती....तेरे ही सपने लेकर के सोया... तेरी ही यादों मै जागा.. तेरे खायलो मै उलझा रहा युं...जैसे माला मै धागा...हा sss बादल बिजली चंदन पाणी जैसा अपना प्यार sss ... लेना होगा जनम हमें.. कई कई बार... हा sssहा sss इतना मधुर.. इतना sss मधीर.. तेरा मेरा प्यार sss लेना होगा जनम हमें कई sss कई बार sss कई sss कई बार...

आपल्या स्वप्नातल्या परीच्या धुंदीत तो इतका गुंग असतो की त्याने प्रदीपच्या घरात प्रवेश केला आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही.  तेवढ्यात पल्लवी आतल्या खोलीतून बाहेर येत असते आणि तिची हलकीशी धडक राजूला बसते.  ह्या धक्क्याने राजू एकदम भानावर येतो, अगदी गोंधळून जातो.  त्याला काहीच कळत नाही. तिला सॉरी सुद्धा म्हणायचे त्याच्या लक्षात येत नाही. तो अगदी ओशाळून जातो.  त्याचे गुणगुणने पल्लवीने हलकेसे ऐकलेले असते आणि का कोण जाने ती ही एकदम लाजून जाते. पट्कन आतल्या खोलीत जाते आणि प्रदीपला राजू आल्याची वर्दी देते.  राजुच्याही अंगात एक वेगळीच लहर उमटून जाते.  काय ते त्यालाच कळत नाही.  काही तरी वेगळच वाटतंय.  नक्की काय तेच लक्षात येत नाही त्याच्या.  पल्लवीचा तो ओझरता स्पर्श. तिची ती लाजून खाली गेलेली नजर. तिने जाता जाता टाकलेला तो तिरपा कटाक्ष. त्याला काही काही म्हणून समजत नाही.  तो पुरता गोंधळून जातो.  आजच आपल्याला हे असे का होते आहे हेच त्याला उमजत नाही.  गेली इतकी वर्षे तो पल्लवीला ओळखत असतो तरीही आजच असे विचित्र भाव मनात का आले हेच त्याला काही केल्या कळत नव्हते. त्यात त्यालाही पल्लवीच्या त्या हलक्याश्या स्पर्शाने मानत उमटलेली हवी हवीशी असलेली कंपने जाणवतात आणि तोही थोडासा लाजून ओशाळून जातो.  इतक्यात प्रदीप बाहेर येतो आणि राजूची तंद्री तुटते. दोघेही आपापल्या सायकल काढून कॉलेज कडे जायला निघतात. 

हो पण राजू आज राजू राहिलेला नसतो.  त्याला आज त्याची व्ह्यालेनटाईन सापडलेली असते.  कधी एकदा पल्लवीला एकांतात भेटतोय आणि तिला मनातले हे विचार सांगतोय असे राजूला झालेलं असते.  एकीकडे त्याला त्याच्या ह्या इतक्या उत्कटतेने प्रदर्शित झालेल्या भावनेचे आश्चर्यही वाटत असते आणि दुसरीकडे मनात थोडीशी भीतीही वाटत असते.  त्याच्या मनातली ही भावना जर पल्लवीच्या मनात नसेल तर ?  तसेच दोघांच्याही घरच्यांना हे मान्य होईल का ?  प्रदीपला काय वाटेल ?  त्याला फसवल्या सारखे तर नाही ना वाटणार ? सायकल चालवत असतांनाच, असे आणि अजून किती तरी प्रश्न राजूच्या मनात ह्या पाच दहा मिनिटांत येऊन जातात आणि तो त्याचाही कळत नकळत मनातल्या ह्या भावनांच्या गुंत्यात गुरफटत जातो. शेवटी कंटाळून तो काही अनुत्तरीत प्रश्न नियतीवर सोपवून देतो आणि प्रदीप बरोबर सायकल चालवत कॉलेजवर पोहचतो.  जे जे होईल ते ते पाहो.  जेंव्हा केंव्हा योग्य वेळ आणि संधी मिळेल तेंव्हा आधी पल्लीवीशी बोलायचे आणि मनातल्या भावनांना वाट करून द्यायची तसेच पल्लवीची जर हीच भावना असेल तर दोघांनी मिळून योग्य तेंव्हा पद्मा ताईला विश्वासात घेऊन प्रदीपशी बोलायचे.  सरते शेवटी पल्लवीच्या आणि स्वत:च्या आई बाबांशी बोलायचे असे सगळे एका दमात राजू स्वत:च्या मनाशी ठरवतो आणि प्रदीपसह इतर मित्रांशी गप्पा मारू लागतो.  राजूचा हा बदलेला मूड पाहून त्याचे सगळे मित्र आज थोडेसे आश्चर्य चकितच होतात.  फारसे कोणीच काही बोलत नाही आणि आजचा हा दिवस तसाही जरा आगळा वेगळाच असतो.  आपल्या मनातल्या भावना जेवढ्या आपल्यापाशीच कशा राहतील ह्याची प्रत्येकजण काळजी घेतो.

हो ह्यात प्रदीपचा समावेश होता हे ही तितकेच खरे.  तो ही त्याची व्ह्यालेनटाईन शोधत असतो.  त्यात सकाळी सकाळी राजूची बहिण प्रिया आज पल्लवी बरोबर बारावीचा अभ्यास करायला घरी आलेली असते.  प्रदीपला प्रिया अगदी कळायला लागल्यापासून आवडत असते.  परंतु राजूच्या भितीपाई तो कधी आपल्या मनातलं कोणास सांगूही शकत नव्हता आणि प्रियालाही त्याने ह्याची थोडीशी भनक लागलेली होती, परंतु प्रियाही घरच्यांच्या भीतीने व्यक्त होत नव्हती.  आज मात्र प्रियाला पाहिल्याबरोबर प्रदीपच्या मनात तिच्या बद्दल प्रेमाची एक उत्कट भावना मनात डोकावली आणि एक क्षण वाटले की तिला सांगून टाकावे की तू माझी व्ह्यालेनटाईन आहेस.  त्याला थोडीशी कल्पना आली होती की प्रीयालाही तो आवडतो ते.  तसे तिने एक दोन वेळा नजरेने व्यक्तही केले होते.  परंतु जो पर्यंत आपण तिला प्रत्यक्ष विचारत नाही आणि तिच्याकडून होकार घेत नाही तो पर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता.  त्याने सकाळीच ठरवले होते की आज संधी पाहून प्रियाला आपल्या मनातले सांगायचे आणि नतंर मग बाकीच्यांचा विचार करायचा.  ठरलं प्रदीपच्या मनाशी त्याने हे पक्के केले होते आणि त्याच विचारांच्या गर्तेते तो राजू बरोबर सायकलवरून कॉलेजला जातांना विचार करत होता.  कधी कॉलेज आले ते त्याला कळलेच नाही.  अर्थात आज सगळेच मित्र जरासे गोंधळल्या सारखे दिसत होते.  का कोण जाणे ! कोणाच्या मनात काय चालले आहे.  सगळे आपलेच मित्र त्यात समवयस्क.  आपल्या मनातलेच विचार त्यांच्याही मनात चालले असतील ! काय माहिती !   जाऊदेत उगाच जास्त खोलात नको जायला.  नाही तर आपलेही पितळ उघडे पडायचे असे म्हणून सगळेचजण आज जरा जास्तच चिडीचूप होते हे अगदी प्रत्येकाला जाणवत होते पण कोणीच पुढाकार घेवून बोलत नव्हते. तेरी भी चूप’, ‘मेरी भी चूप’. म्हणजे ही तर अत्यंत समंजस आणि सोयीस्करपणे ठरवलेली गंमतच होती.

पद्मा घरून निघते आणि वैशालीत वाट पहात असलेल्या हर्षदला भेटते.  गेले वर्षभर हर्षद आणि पद्मा भेटत असतात.  आज तर हर्षदला कधी एकदा पद्मा कडून लग्नासाठी होकार मिळवतो असे झालेले असते.  हर्षद आणि पद्मा आजच्या व्ह्यालेनटाईन डे च्या शुभ मुहूर्तावर लग्नाच्या बेडीत अडकण्याचे ठरवतात. फक्त एकच अडचण असते ती म्हणजे आपापल्या घरच्यांना कधी आणि कसे सांगयचे ते !  शेवटी विचार करून दोघेही ठरवून टाकतात की अजून दोन वर्ष तरी लग्न करायचे नाही. फक्त साखरपुडा करायचा.  म्हणजे पद्मा पदवीधर होऊन नोकरी करू लागेल आणि हर्षद त्याच्या सध्याच्या नोकरीत कायम होऊन स्वत:चे भाड्याचे का होईना जरा मोठे घर घेऊ शकेल.  असा सामंजस्याचा मार्ग आज दोघही ह्या भेटीत ठरवून आपापली वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारीच्या जाणीवेने थोडेसे सुखावतात आणि त्यांच्या लग्नाच्या विचारांची आपापल्या घरी सांगण्याची मानसिक तयारी करतात.  एकंदरीत दोघांच्याही घरची मंडळी थोडीसे पुढारलेल्या विचार सरणीचे असल्यामुळे त्यांच्या लग्नास फार अडचणी येतील असे त्यांना वाटले नाही.  त्यामुळेच आज पद्मा आणि हर्षद दोघेही खूप खुश होऊन मस्त पैकी वैशालीतल्या गरम गरम कॉफीची चव घेत आपल्या भावी संसाराची स्वप्ने रंगवत बसतात.  पद्माला कॉलेजला आज जाण्याची फारशी गरजच वाटत नव्हती त्यामुळे तीही हर्षद बरोबर निवांत गप्पा मारत वैशालीत बसलेली होती.
इकडे अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून प्रिया आणि पल्लवी थोडेसे पाय मोकळे करायला संभाजी बागेत फेर फटका मारायला जातात.  आज का कोण जाणे पण दोघीही काहीश्या वेगळ्याच मूड मध्ये असतात.  इतक्या गप्पा मारणाऱ्या ह्या मैत्रिणी एकदम शांत शांत असतात.  कोणीच कोणाशी काहीच बोलत नसते.  बागेत जाऊन पाणीपुरी खातात, एक एक भेळ खातात तरीही कोणीच काही बोलत नाही.  एकदम दोघींना पाहिलेल्या ती सध्या काय करतेह्या मराठी चित्रपटाची आठवण येते आणि इतक्यावेळची शांतता भंग होते.  दोघीही एकदम ह्या चित्रपटाविषयी आपले मत मांडायला सुरवात करतात.  जेंव्हा दोघी बोलता बोलता एकमेकींच्या डोळ्यात पाहतात तेंव्हाच त्यांना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवते आणि इतक्या वर्षींच्या मैत्रीची झलक जाणवते.  पल्लवी प्रियाला विचारते की जे मला वाटते आहे तेच तुलाही वाटते आहे का !  नेमका हाच प्रश्न प्रिया पल्लवीला विचारते आणि सर्वात शेवटी दोघीही एकदम विषयावर येतात आणि सकाळी सकाळी झालेल्या मनोमिलनाच्या गोष्टी एकमेकींना सांगून मन मोकळे करतात.  दोघीही आपला व्ह्यालेनटाईन कोण आहे ते सांगून मोकळ्या होतात आणि मनावरचं खूप मोठं ओझ कमी झाल्याचं मनोगत व्यक्त करतात.  काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी गत झाल्याचे त्यांना अगदी स्पष्ट जाणवत होते आणि त्यामुळे त्या दोघीही अगदी मन मोकेळे पणाने हसून मनावर आलेला ताण पाणावलेल्या डोळ्यांनी कमी करतात.
राजू आणि प्रदीपही तिकडे आपल्या मनातली तळमळ व्यक्त करण्यासाठी धडपडत असतात.  शेवटी त्यांची इतक्या वर्षांची मैत्री असते आणि आज जर आपण मन मोकळे केले नाही तर आयुष्यभर आपण एकमेकांना माफ नाही करू शकणार असेच दोघांनाही वाटत असते.  फार फार तर काय होईल.  नकार मिळेल एवढेच ना ! असा विचार करून दोघेही एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत.  कोणी आधी बोलायचे ह्यात त्यांच्यातही ती सध्या काय करतेह्या चित्रपटाविषयी चर्चा सुरु होते आणि त्यामुळेच का होईना दोघेही आपापल्या भावना एकमेकांशी व्यक्त करून मोकळे होतात.  मनावरच खूप मोठं ओझं उतरल्याची भावना घेऊन राजू आणि प्रदीपला आता कॉलेज मध्ये नको थाबायला असे वाटते आणि ते लगेचच सायकल काढून घरी जायला निघतात.  वाटेतच येता येता गुडलक चौकात त्यांना पद्मा आणि हर्षद येतांना दिसतात.  प्रदीप हर्षदला ओळखत असतो.  तो पद्मा ताईचा खूप चांगला मित्र आहे हे त्याला माहिती असते.  थोडेसे थांबून दोघेही त्यांच्याशी बोलतात.  खुशीच्या नादात पद्माताई प्रदीप आणि राजूला तिचा आणि हर्षदचा आजचा निर्णय अगदी भर चौकात रस्त्यातच सांगून टाकते.   म्हणजे पद्माला तर कधी एकदा प्रदीपला सांगते असे झालेले असते आणि शेवटी ती तिचे मन मोकळे करून सुटकेचा निश्वास सोडते.  राजू आणि प्रदीपला त्यांचा हा ठाम निर्णय मनोमन पटलेला असतो आणि त्या दोघांमध्ये आडकाठी नको म्हणून त्यांना मन:पूर्वक शुभेछ्या देवून हे दोघे तेथून लगेचच काढता पाय घेतात.  अर्थात प्रदीप पद्माताईला लवकर घरी ये, तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे हे सांगायला विसरत नाही.  पद्माही त्याला लवकर घरी येण्याचे कबूल करते आणि हर्षद बरोबर निघून जाते.
राजू आणि प्रदीपला त्यांच्या मनात चाललेली त्यांची ही घालमेल कधी एकदा पल्लवीला आणि प्रियाला सांगतो असे झालेले असते.  तरीही त्यांच्या मनाची तेवढी तयारी झालेली नसते म्हणून अजून थोडे धारिष्ट्य गोळा करण्यासाठी ते तडक संभाजी बागेकडे आपल्या सायकलींचा मोर्चा वळवतात.  मस्त पैकी पाणीपुरी आणि भेळ खायची, एकमेकांशी थोडेसे ह्या विषयावर बोलायचे तसेच आपल्या व्ह्यालेनटाईनशी काय आणि कसे बोलायचे ते ठरवायचे आणि मग योग्य संधी साधून आजच संध्याकाळी मन मोकळे करायचे असा मस्त नियोजन करून मंडळी संभाजी बागेत पोचतात.  सायकली लावून पाणीपुरीच्या गाडीवर पोचतात आणि समोरचे दृश्य पाहून दोघांनाही काही सेकंद काहीच सुधरत नाही.  कारण समोर पल्लवी आणि प्रिया एकमेकींशी मनमोकळ्या हसत खेळत गप्पा मारत बसलेल्या असतात.  राजू आणि प्रदीपने तोंडाचा वासलेला आ अजून मिटलेलाच नसतो.  पल्लवी आणि प्रियाला जेंव्हा हे दोघे दिसतात तेंव्हा त्यांचीही अवस्था काही वेगळी नसते.  त्या तर पूर्णपणे गांगरून जातात. आता काय बोलायचे आणि कसे बोलायचे.  कोणी आधी बोलायचे असे आणि अजून किती तरी विचार त्यांच्या मनात येतात.  शेवटी चौघेही एक एक पाणीपुरी मागवतात आणि काही तरी करून बोलण्याचा प्रयत्न करतात.  न राहवून ती सध्या काय करतेह्या चित्रपटाचा विषय निघतो आणि विषयाला कोंडी फुटते.  आपलं पाहिलं प्रेम हेच आपल्या आयुष्यात किती महत्वाचं असतं आणि ते कधीही विसरता येऊ शकत नाही.  मग आपण का नाही आपल्या ह्या पहिल्या प्रेमाची कबुली द्यायची.  जर का आपण हे योग्य वेळी केले तरच ह्या जीवनाला अर्थ आहे.  नाहीतर ह्या चित्रपटामधील अन्या आणि तन्वी सारखी जीवाची तडफड करून घेण्यात काय हशील आहे नाही ! एक एक करून चौघेही ह्या चित्रपटाच्या विषयावरून गप्पांच्या ओघात आपला कोण व्ह्यालेनटाईन आहे हे नकळत सांगून बसतात आणि चौघेही जण त्या एका क्षणा मुळे एकदम सुखावून जातात.  राजू-पल्लवी आणि प्रदीप-प्रिया ह्यांना आपले हे स्वप्न तर नाही ना असेच वाटते.  काही क्षणासाठी ते चौघेहीजण इतके सुखावून जातात की कधी एकदा हे सगळे पद्माताई आणि हर्षदला सांगतोय असे त्यांना झालेले असते.  ह्या आनंदाच्या भरात प्रदीप पद्माताई आणि हर्षदने ठरवलेल्या लग्नाची बातमी बाकीच्यांना देऊन हा क्षण अजून गोड करून टाकतो.  पल्लवी आणि प्रिया एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि आयुष्यभर एकमेकींना सदा सुखी आणि समाधानी ठेवण्याची लगेचच शपथ घेऊन मोकळ्याही होतात. 
एकंदरीत ह्या वर्षीचा व्ह्यालेनटाईन डे राजू-पल्लवी, प्रदीप-प्रिया आणि पद्मा-हर्षद साठी फारच सुखावह असा असतो.  त्यामुळेच सगळे जण हा दिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी डेक्कनच्या म्हणजे त्यांच्या घराच्या जवळील झेड ब्रिजवर जमण्याचे ठरवून टाकतात.  संध्याकाळी सात वाजता झेड ब्रिजवर ह्या तीन जोड्या त्यांच्या भावी आयुष्याच्या आणा भाका शपथा मोठ्या जल्लोषात आणि जमलेल्या तमाम प्रेमी युगलांच्या अर्थात त्यांना काहीही संबंध नसलेल्यांच्या उपस्थितीत घेणार असतात आणि मग घरी कसे, कधी, केंव्हा, कोणी, सांगायचे ह्याचे नियोजन करण्याचे ठरवतात.
संध्याकाळी सात वाजता नेहमीचा फुलवाला रवी झेड ब्रिजवर गुलाबाची फुले घेऊन फिरत असतो.  आज त्याच्या ह्या फुलांना भाव तर खूप असतो आणि घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपता टिपता तो ही त्याच्या गतस्मृतीत काही क्षणांसाठी स्वत:ला विसरून ह्या अविस्मरणीय क्षणांचा आनंद लुटणार असतो.  खरं म्हणजे तो ह्या एका कारणासाठीच आजच्या दिवशी ही गुलाबाची फुले घेऊन फिरत असतो.  त्याला ती विकून चार पैसे कमविण्याची अजिबात हौस नसते.  त्याला हवा असतो तो ती फुले घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील ते सात्विक समाधान आणि आनंद. जो त्याला आयुष्यात कितीही पैसे दिले तरी विकत घेता येऊ शकत नाही असेच वाटत असते आणि म्हणुनच तो जाणून बुजून व्ह्यालेनटाईन डे च्या दिवशी झेड ब्रिजवर गुलाबाची फुले घेऊन दाखल झालेला असतो. 
रविचे मन झेड ब्रिज वरील हा प्रेमाचा जल्लोष पाहून प्रसन्न होऊन जातं.  ह्या जगात कोणलाच कधीही कुठलेही दु:ख नसावे असेच वाटून जातं.  इतक्यात पद्मा, हर्षद, राजू, पल्लवी, प्रदीप, पल्लवी झेड ब्रिजवर ठरल्याप्रमाणे येतात.  रवी कडून ते एक एक गुलाबाचे फुल घेतात आणि नदी पलीकडील ओंकारेश्वराच्या आणि अष्टभूजेच्या साक्षीने आपल्या व्ह्यालेनटाईनला देऊन, आयुष्याच्या जोडीदारासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात.  रविही त्यांना सदा सुखी आणि समाधानी रहा असा आशीर्वाद देतो आणि गुलाबाचे पैसे न घेताच जायला निघतो तेवढ्यात राजू रविला थांबवून पैसे घेण्याचा आग्रह करतो. परंतु रवि पैसे घेत नाही उलट त्याला फुलों के रंगसे.... ह्या गाण्याचा मुखडा ऐकवून त्याच्या मनातले भाव व्यक्त करून शेवटचं राहिलेलं गुलाबाचं फुल हातात घेऊन निघून जातो. 
रविच्या हातातील शेवटच्या गुलाबाच्या फुलास कोणी व्ह्यालेनटाईन असेल का ? असा प्रश्न मात्र ह्या सगळ्यांना पडतो....


रविंद्र कामठे १४ फेब्रुवारी २०१८