Monday, 15 January 2018

“रहदारीचा विळखा”


रहदारीचा विळखा

 

आजकाल घरातून बाहेर पडायचे असेल तर कमीत कमी दहा वेळा तरी विचार करायला लागतो.  कुठे जायचे आहे ? कुठल्या ठिकाणी जायचे आहे ? किती जणांनी जायचे आहे ? कसे जायचे आहे ? केंव्हा जायचे आहे व कशाला जायचे आहे ?  जाणे तेवढे जरुरीचेच आहे का ? किती वेळासाठी जायचे आहे ?  कार्यक्रमास जायचे आहे की अजून कशाला जायचे आहे ?  कामाला जायचे आहे की खरेदीला जायचे आहे ?  असे आणि मारुतीच्या शेपटी सारखे कधीही न संपणारे अनंत प्रश्न पुणे शहरातच काय पण भारतातल्या एकंदरीत सर्वच शहरांमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना पडत असतात.  त्याचे मूळ कारण म्हणजे सध्याच्या परिस्थितीत रस्त्यांवर वाढत चाललेली वाहनांची रहदारी हे होय !  पुणे, मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई अशा महानगरांमध्ये कुठेही कुठल्याही वेळी गेलात तरी रहदारीची ही समस्या कायमच भेडसावत असते.  दिवसेंदिवस ही समस्या अतिशय उग्र रूप धारण करू लागली आहे.  रहदारीची ही समस्या आपल्या वेळेच्या नियोजनाचा एक मोठा भाग होऊन बसली आहे.  पुण्यात ५ ते ६ कि.मी. प्रवासास आजकाल एक तास, तर कधी कधी दीडतास वेळ लागतो आहे.  वेळेचे हे गणित आणि तिचा अपव्यय फारच गंभीर आहे.   मी स्वत: हा अनुभव गेले कित्येक वर्षे घेतो आहे आणि आता हतबल झालो आहे. रहदारीच्या ह्या विळख्यात माणसाचे आयुष्य इतक्या मोठ्या प्रमाणात गुरफटत आणि फरफटत चालले आहे की त्याची अवस्था चक्रव्युव्हात फसलेल्या अभिमन्यू सारखी झाली आहे.  रहदारीच्या ह्या विळख्यामुळे आज रोजी घरटी एका तरी व्यक्ती काही ना काही शारीरिक व्याधींनी त्रस्त आहे.  त्यामुळेच मनात साचलेला हा विचार कुठेतरी व्यक्त करून ह्या समस्येवर काही उपाय मिळतो का ते पाहण्याचा एक निष्फळ प्रयत्न्न करतो आहे.  म्हणून हा लेख प्रपंच.

 

पुण्यात रोज सकाळ पासून ते रात्री पर्यंत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी ठरलेलीच असते.  लहान मोठे रस्ते, हमरस्ते, महामार्ग, बाह्यवळण मार्ग असे सर्वच रस्ते वाहनांनी २४ तास ओसंडून वहात असतात.  त्यात भरीला भर कार्यालयीन वेळा आणि शाळेच्या वेळेत तर इतकी तुडुंब गर्दी असते की, स्वयंचलित सिग्नलची व्यवस्थाही तोटकी पडते.  त्यात रस्त्यावरच गाड्या उभ्या करण्याची आपली पद्धत म्हणजे सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेचा अभावच दर्शवते.  समांतर पार्किग असले तरी कोणीही कशीही वेडी वाकडी गाडी लावून गेलेला असतो आणि त्यामुळे इतरांची गैरसोय होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो ह्याचा आपले सुशिक्षितनागरिक विचार करतील तर शप्पथ.  वाहतूक कोंडीमुळे आणि रहदारीच्या ह्या समस्येमुळे वायू प्रदूषणाने तर धोक्याची पातळी केंव्हाच ओलांडली आहे हे एक जळजळीत सत्य सर्व माध्यमातून आपल्या समोर येत आहे.  त्यामुळेच रहदारीच्या ह्या समस्येवर सर्वसामन्य माणसांनीही आपापल्यापरीने विचार करायला हवा हे निश्चित आहे.   

वाहतुकीची शिस्त ही कायमच दुसऱ्याने पाळण्याची गोष्ट आहे’, असा एक गोड गैरसमज आपल्या ह्या सुजाण नागरिकांनी, स्वत:च्या सोयीसाठी करूनच घेतलेला आहे असे मला तरी भारतामध्ये कुठही गेलात तरी दिसतो.  वाहतुकीचे नियम हे वासनातच गुडाळून ठेवल्यासारखे ही मंडळी वागत असतात. हीच काय ती खंत आहे.  वाहतूक पोलीस दंड आकारून शिस्त लावण्याचा असफल प्रयत्न करत असतात पण ह्या महाभागांना त्याचेही काही सोयरसुतक वाटेनासे झाले आहे.  उलट काहींनी तर आपल्या उत्पन्नाचा ठरविक हिस्साच ह्या अशा दंडा साठी राखून ठेवलेला असावा असे मात्र मला खात्रीशीर वाटायला लागले आहे.  का तर त्यांच्या साठी सर्वात जास्त महत्वाची ही वेळ असते, जी त्यांच्या कडे खूपच कमी असते आणि असे वाहतुकीचे फालतू नियम वगैरे पाळणे म्हणजे धांदात मूर्खपणाचे लक्षण वाटते.  अर्थात ही शिकली-सवरलेली आणि स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी मंडळी भारताच्या सीमारेषा ओलांडल्या की त्या त्या देशांमधील नागरिकांनाही लाजवतील इतकी शिस्तबद्धपणे वागतात.  ह्याचे मुळी मला तरी फार आश्चर्य वाटते हो.  अशी ही शिस्तप्रिय व्यक्तिमत्वे मी माझ्या परदेश प्रवासात खुपदा अनुभवली आहते.  माझा असा अजिबात दावा नाही की माझे काहीच चुकत नाही किंवा मी एकटाच वाहतुकीचे सगळे नियम अगदी काटेकोर कधीही न चुकता पाळतो आहे वगैरे.  तरीही एक नमूद करावेसे वाटते की गेल्या कित्येक वर्षामध्ये मला वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे पोलिसांनी पकडले आहे आणि दंड केला आहे.  अर्थात वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचा माझा संकल्प मी गेले कित्येक वर्षे अगदी कटाक्षाने पाळतो आहे.  प्रत्येकाने एवढे जरी केली तरी रहदारीच्या ह्या विळख्यातून आपली सुटका होऊ शकेल असा एक आशावाद मला तरी आहे.

 

सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा आपापल्या परीने नागरिकांना वाहुतुक नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप काही सुविधा देत असतात. उदा. रस्ता ओलांडण्यासाठी पाढरे पट्टे, पादचारी मार्ग, भुयारी मार्ग, वगैरे वगैरे.  परंतु ह्या सुविधा नागरिक वापरतच नाहीत आणि त्यामुळे समाज कंटक ह्या सुविधांचा बेकायदेशीर धंदे करण्यासाठी उपयोग करतात.  सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर अथवा दुरुपयोग तर आपल्याकडे राजरोसपणे चाललेलाच असतो.  त्यामुळेच आपल्याच करातून आपल्याच खर्चातून आपल्यालाच पुरवलेली आपलीच सुविधा एक नागरिक म्हणून आपण अक्षरशः पाण्यात घालत असतो ह्याचे भान आपण ठेवायला हवे असे मला वाटते.  ह्याचा अर्थ सरकार सगळ्याच सुविधा अतिशय काटेकोरपणे, नियोजनबद्ध पद्धतीने, कुठलाही गैरव्यवहार न होऊ देता, भ्रष्टाचार न करता व तसेच संबंधित कोणाचेही लागेबांधे न जपता करत असतील असा माझा अजिबात दावा नाही. असो.  हा विषय फारच मोठा आणि वादातीत आहे.

 

एकेकाळी पुण्यामध्ये बसने प्रवास करणे खूप सुखकर होते.  वेळेची आणि पैशांची बचतही होत होती.  पण सध्या एकंदरीच रस्त्यांची झालेली बोळकांडे, रस्यांवर झालेली अतिक्रमणे, शहराच्या लोकसंखेच्या दुप्पट प्रमाणात वाढलेली वाहनांची संख्या आणि त्यामुळे रहदारीचा वाजलेला बोजवारा पहिला तर, भ्रष्टाचाराने जर्जर झालेली आपली बिच्चारी पीएमटी जीव मुठीत घेऊन ही बस सेवा अपार कष्टाने पुरवीत आहे त्याचे कौतुक वाटते.  खरं म्हणजे पीएमटीचा जास्तीत जास्त वापर करून तीला सक्षम बनवले तर पुण्याच्या रहदारीचा निम्मा प्रश्न मार्गी लागले हे त्रिवार सत्य आहे.  पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तर आहे तसेच भ्रष्टाचाराचे हे कुरण असे कसे सहजासहजी सोडून द्यायचे, हा एक मोठ्ठा राजकीय-आर्थिकदृष्ट्या व्यापक प्रश्नच आहे !

 

गेल्या काही दशकांमध्ये पुणे शहराचा सर्वांगीण व दाहीदिशांनी झालेला विकास आणि त्यामुळे मेट्रो शहर नसूनही पुण्यास मिळालेले मेट्रोचा लाभ, हे तर राजकीय इच्छाशक्तीचे उत्तम उदाहरण आहे.  त्याच आधारे मेट्रोचे नियोजन होऊन कामास सुरवातही झाली आहे.  ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे.  हे ही नसे थोडके.  तरीही संपूर्ण शहरात मेट्रो सुरळीतपणे चालू व्हायला अजून चार ते पाच वर्षांचा कालावधी तर नक्कीच लागणार आहे.  त्यात शहरात रोज हजारोंच्या संखेने नवीन वाहनाची भर पडते आहे आणि वाहतुकीच्या कोंडीतही वाढच होते आहे.  ह्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय अवलंबला पाहिजे.  अगदी गरज असेल तरच स्वत:चे दुचाकी अथवा चारचाकी वाहन रस्त्यावर चालवण्यास आणावे.  ज्यांना शक्य असेल त्यांनी सायकलचा वापर करावा.  पूर्वी पुणे शहर हे सायकलचे शहर म्हणून ओळखले जात होते.  त्याची पुनरावृत्ती करण्याची काळाची गरज आहे असे भासते.  अर्थात हे स्वप्नच आहे असेही वाटते.  असो.

 

मी आठवड्यातून दोन ते तीन दिवस सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करण्याचे ठरवून ह्या उपक्रमास स्वत:पासून सुरवात केली आहे.  अर्थात हे म्हणजे स्वार्थातून परमार्थ साधल्या सारखे आहे.  स्वत:चे स्वास्थ्य राखण्याचा हा माझा स्वार्थी विचार ह्या मागे आहे व त्यातूनच रहदारीची समस्या सोडविण्यासाठीचा परमार्थ साधण्याचा माझा हा प्रयत्न आहे. 

 

समस्या खूप आहे.  त्यावर तोडगा असा लेगेचच निघुही शकत नाही.  बोलणे अथवा उपाय सुचवणे खूप सोपे आहे.  परंतु तो अमलांत आणणे अवघड आहे पण अशक्य नाही.  वाहतुकीचा बोजवारा ही आपल्या पुण्याचीच काय पण सर्वच महानगरांपुढील गंभीर समस्या आहे.  त्यामुळे प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पुढाकाराने ही समस्या सोडवण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे आणि स्वत:ची ह्या रहदारीच्या विळख्यातून सुटका करून घ्यायला हवी हे मात्र नक्की.

 

 

रविंद्र कामठे

९८२२४ ०४३३०

१३ जानेवारी २०१८

 

"माफी"


माफी

 

माफीमागणे अथवा एखाद्याला माफकरणे म्हणजे एक महानच कार्य आहे आणि हे काम खूप जिकरीचे असले तरी माणसाच्या आयुष्यात तितकेच जरुरीचेही आहे असे मला वाटते.  अर्थातच मी हे विधान कायद्याच्या चौकटी बाहेरील जगाबद्दल करतो आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.  कायद्यातही गुन्हेगाराला माफी साठी रीतसर अर्ज करून माफी मिळविता येऊ शकते हे ही तितकेच खरे आहे.  माफीच्या ह्या सुविधेसाठी तशी ठोस कारणे असावीत हे मात्र नक्की.  इथेच एक फरक नक्की जाणवतो तो म्हणजे कायद्याच्या चौकटीत केलेल्या चुकीला गुन्हाम्हणून संबोधले जाते. तेच सर्वसामन्य आयुष्यात चूकम्हणून संबोधले जाते.  गुन्ह्यात आणि चुकीत एक अतिशय सूक्ष्म असे अंतर आहे आणि हीच तर खरी मेख आहे.  ज्याला ही मेख समजते तोच स्वत:चे आयुष्य सुखकर करतो आणि दुसऱ्यांचेही, हे ही तितकेच संयुक्तिक आहे.  नाहीतर चुकीचे गुन्ह्यात रुपांतर होऊन प्रकरण न्यायप्रविष्ट होण्यास वेळ लागत नाही आणि कायद्याने सिध्द झालेल्या गुन्ह्यासशिक्षा ही भोगावीच लागते हे ही प्रमाण आहे अगदी फाशीची शिक्षा ही भोगावी लागते.

 

सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याच्या कळत नकळत झालेल्या छोट्या छोट्या चुकांना माफी मिळणे तितकेच अनिवार्य वाटते.  छोटी चूक म्हणजे काय, कोणती, कशी, केव्हा, कोणी केली वगैरे हे ज्याचे त्यांचे ठरवायचे असते.  त्यामुळे मला तरी माफीलाआपल्या आयुष्यात एक अनन्यसाधारण महत्व आहे असे वाटते, जे की आपल्या थोर संत परंपरेनेही अधोरेखित केलेले आहे.  त्याचे अगदी साधे आणि सरळ कारण म्हणजे, चुकतो तोच माणूसअसतो आणि चुकांना पदरात घालणारा तो आपलं माणूसअसतो. 

 

माफ करणारा हा थोरच असतो असे म्हणतात.  ज्याच्या कोणाच्या हातून एखादी लहान मोठी चूक घडून गेलेली असते व कालांतराने त्याला/तिला, त्याने/तिने केलेल्या ह्या चुकीची जाणीव होते, अथवा चुकीची जाणीव करून दिल्यावर तो/ती, जेंव्हा ज्याच्याबद्दल आपल्याकडून ही जी चूक घडलेली/झालेली आहे त्याबद्दल, त्याच्याकडे क्षमायाचना करतो/करते आणि तो/ती दिलदार व्यक्ती ह्या सर्व चुका पदरात घालून अगदी मोठ्या मनाने त्याला/तिला माफ करतो/करते, तेंव्हाच ती/तो आपल्या मनाचे मोठेपण सिद्ध करते आणि आपलं माणूसहोते .  वर वर पाहायला गेले तर हे कार्य खूप साधे, सोपे आणि सरळ वाटते.  परंतु माफीची सगळी गणिते ही झालेल्या चुकीवर तसेच त्या चुकीचा इतर बाबींवर झालेल्या परिणामांवर अवलंबून असतात.  भावनांना किती प्रमाणात ठेच लागलेली आहे त्यावरही बरेच काही आधारित असते.  आणि का नसावे !  जन्म झाल्यापासून ते मृत्युपर्यंतचे माणसाचे आयुष्य म्हणजे भावनांचातर खेळ आहे !

 

एक मात्र अगदी प्रकर्षाने सांगतो की चूक, अनादर, अगोचरपणा, माज, मस्ती, निंदा, अपमान, घृणा, तिरस्कार, तक्रार, इत्यादी करणे एकवेळेस सोपे आहे.  परंतु ह्या सर्वाला माफ करणे म्हणजे अपार कष्टदायक व एक दिव्यच आहे.  हे दिव्य जे कोणी पार पाडते ते खरोखरच थोर असावेत असे मला तरी वाटते.  मनाचा मोठेपणा हा तर ह्या दिव्य प्राप्तीसाठी अतिशय जरुरी असावा लागतो आणि तसा तो वैचारिक दृष्टीकोनातून पहिला तर ह्या व्यक्तीमत्वांकडे अगदी नैसर्गिकरीत्या असलेला जाणवतो.  त्याहूनही परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते आणि नियती अशा माणसांकडून योग्य ती गोष्ट आपसूकच करून घेत असते.  सर्वात महत्वाचे म्हणजे माफ करणाऱ्यास अहंकार, गर्व, मीपणा, स्वार्थ, लोभ, लाभ, राग बाजूला ठेवून आपल्या भावनांवर मात करून दुसऱ्यास माफ करण्याचे एक प्रकरचे परोपकारी कृत्यच करावे लागते.  अर्थात ह्या कृत्यातून ज्यांना परमार्थ साधता येतो ती माणसे धन्य होतात आणि अशाच काही मोजक्या माणसामुळे हे विश्व चालले आहे हे मात्र अगदी प्रामाणिकपणे जाणवते.

 

काही काही चुका अथवा घटना ह्या आपल्या नकळत अनावधनाने घडलेल्या असतात. त्या कुठल्याही उद्दशाने किंवा वाईट हेतूने प्रभवित नसतात.  ह्या थोड्याशा भावनेशी निगडीत असतात.  त्यामुळे ह्यात समाविष्ट असलेली माणसेही फारच हळवी असतात.  हा सगळा खेळ अतिशय तलम अशा रेशमी धाग्यांनी बांधलेल्या बंधनांच्या एकनिष्ठतेचा असतो.  त्यामुळेच तो कुठल्याही प्रकारचा गुंता अधिक न वाढवता हलक्या हातांनी सोडवावा लागतो.  गैरसमज दूर सारून अतिशय प्रांजळपणे पुन्हा नव्याने विचार करायला लावून आपलं नातं पुन्हा कसं सुरळीत करता येईल हेच पाहणं इष्ट असतं आणि तेच तर माफीचे मूळ तत्व आहे.  म्हणूनच चुकांना जेवढी लवकर माफी मिळते तेवढे लवकर ह्यात सामावलेल्या सगळ्यांचे उर्वरित आयुष्य सुखकर होते.  जसे, ताणले तर रबरही तुटते”, अथवा अति तिथे माती होते तसेच जरुरीपेक्षा जास्त ओढले तरी हे नातं तुटूही शकते.  ज्याचा वास्तविक फायदा तर कोणालाच होत नाही, उलट झालाच तर तोटाच जास्त होतो. इतका हा विषय गंभीर आहे.

 

माफ करणे ही खरोखरच खूप जिकरीची परंतु तितकीच महत्वाची कला आहे.  हो कलाआहे, कारण माफ करणाऱ्याला, ज्याला आपण माफ करतो आहोत त्याच्या बद्दलचा सारासार विचार करावा लागतो.  त्याच्या कडून घडलेल्या चुकांचा प्रामाणिकपणे उहापोह करून चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो.  भावनांची आणि विश्वासाची उत्तम सांगड घालून आपल्या नात्यांमध्ये कुठलीही तेढ निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते.  माफ करणाऱ्याला थोडेसे मानसिक दडपण हे येतेच आणि ते स्वाभाविकही आहे कारण त्याच्यावर आधीच अन्याय झालेला असतो तरीही त्याला अतिशय प्रांजळपणे निस्वार्थी बुद्धीने विचार करून आलेली ही परिस्थिती हाताळावी लागते.  चुकणार चूक करून बसलेला असतो आणि त्याचे प्रारब्ध तो ह्या आपलं म्हणणाऱ्या माणसाच्या हातात देऊन मोकळा होतो.  त्यामुळेच की काय चुकणाऱ्या माणसा पेक्षा माफ करणाऱ्यावरच आपसूकच जबाबदारीचा जू पडतो त्याचे कारण त्याच्या माफ करण्याने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते आणि तसेच त्याच्यावर अवलंबून असलेले म्हणा अथवा त्याच्या सानिध्यातल्या माणसांची (ज्यांची काही चूक नसतांना) फरफट होऊ शकते.  त्यामुळे माफ करणार्यावर फार मोठा भार पडतो.

 

दोष देणे हे खूप सोपं असतं.  आपण अगदी सहज एखाद्या गोष्टीला अथवा व्यक्तीला दोष देवून मोकळे होते. त्यामागच्या भावना, त्या घडण्याचे कारण, एकंदरीत परिस्थितीचा आढावा, घेतलेला नसतो.  फक्त अंदाजाने, ऐकीव बातमीवरून किंवा संभाषणावरून अथवा पूर्वग्रहदुषित विचारांनी घेतलेले निर्णय कधी कधी अंगलट येतात आणि त्यातूनच हे दोषप्रभवित विचार निर्माण होऊन एखाद्याचा व्यक्तीचा तीव्र भावनेने द्वेष करून बसतात.  वास्तविक पाहता चूक काय आणि बरोबर काय हेच एकमेकांना कळलेले नसते.  संभ्रमात वावरलेली ही व्यक्ती माफीचा साक्षीदार म्हणून उभी असते, ती ही हात जोडून मनापासून अतिशय प्रामाणिकपणे माफीची याचना करत असते हे समजून घ्यायला हवे.  अर्थात सगळेच काही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नसतात, हे ही ज्याने त्याने ज्या त्या पर्तीस्थिती नुसार आणि व्यक्तीसापेक्षतेणे लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेणे जरुरीचे वाटते.  अशा वेळेस त्याला मोठ्या मानाने माफ करून त्याच्या चुका/गुन्हा पदरात घालून पुन्हा एकदा एक संधी देणारा हा सर्वश्रेष्ठ असतो.

मला माझ्या तरंग मनाचे ह्या काव्य संग्रहामधील ह्या चार ओळी आठवल्या...

जगण्याची कला हीच संचित असे, माणुसकीला आयुष्यात पर्याय नसे,

आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे ||

 

image

   

 

रविंद्र कामठे

पुणे
२९ डिसेंबर २०१७                                   

Saturday, 30 December 2017

शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या समस्येवर कर्जमाफीचे कोंदण


शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या समस्येवर कर्जमाफीचे कोंदण

सध्या महाराष्ट्राच्या विधान सभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीचे जोरदार राजकारण चालू आहे.  सर्वच पक्ष ह्या दोन्ही प्रश्नांकडे अतिशय कळकळीने आणि तळमळीने हा विषय जेवढा शक्य होईल तेवढा तापवून त्यावर आपल्या पोळ्या भाजून घेण्याचा त्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय प्रांजळ प्रयत्न करतांना दिसत आहेत.  ह्या राजकीय पक्षांची धोरणे आणि त्यांचे त्यात असलेले छुपे कारस्थानाचे त्यांना लखलाभ असे म्हणायची वेळ आता सर्व सामान्य माणसावर आली आहे.  ह्या विषयांवर चर्चा चर्विचरण एकद्या नटसम्राटालाही लाजवले अशा पद्धतीने बेलामुपणे चालू आहे.  सगळ्याच पक्षांनी आपली सगळी शक्तीच ह्या विषयांवर केंद्रित करून त्यांना शक्य होईल तेवढे तेच कसे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत आणि त्याचा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून होणारा फायदा आपल्या पदरात पाडून घेण्याची एक प्रकारची रस्सीखेच चालली असून त्यात ते काही अंशी यशस्वीही होतील ह्यात शंकेला कुठेच जागाच उरली नाही. त्याचे कारण तुम्हीं मारल्या सारखे करा आम्ही रडल्यासारखे करतो आणि सामान्य जनतेची व शेतकऱ्यांची जेवढी करता येईल तेवढी दिशाभूल करू. ह्या सगळ्यामधून शेतकऱ्याच्या हातावर तुरी देण्याची ह्या राजकीय धुराणींची चाल मात्र नेहमीप्रमाणे यशस्वी होईल हे सांगावयाला कोण्या ज्योतिषाची मात्र नक्कीच गरज नाही.  असंघटीत शेतकरी वर्ग आणि कै. शरद जोशींसारख्या नेतृत्वाच्या अभावाचा फायदा ही सगळी राजकारणी मंडळी त्यांच्या स्वार्थापोटी उठवत असून मतांचे राजकारण साधू पहात आहेत ह्याचे फारच दु:ख होते. 

 

दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये जर आपला देश गेल्या दोन दशकांमध्ये उल्लेखनीय प्रगती करून सगळ्या जगाचे लक्ष वेधू शकतो तर शेतकऱ्यांच्या ह्या समस्यांवर तोडगा का काढू शकत नाही !  हे म्हणणे असे वाटणे किती स्वाभाविक आहे नाही. आपल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचा स्वार्थ आणि आपमतलबीपणाच ह्या सगळ्यास कारणीभूत आहे अथवा तेच ह्या सगळ्या समस्येचे मूळ आहे असे मला तरी वाटते. एखादी समस्या अथवा प्रश्न भिजत ठेवून त्यावर येनकेन प्रकाराने राजकारण करत करतच गेली ६० वर्षे आपण फक्त आणि फक्त ह्या आपल्या अन्न्दात्याचे आर्थिक, शारीरक आणि कौटुंबिक शोषण करून एकप्रकारे सरकारच्या हातातले खेळणेच करून टाकले आहे असे म्हणाल्यास अतिशयोक्ती होणार नाही.   

 

मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचची कर्जमाफी हे दोन वेगळे विषय आहेत त्यांची एकेमेकांशी सांगड घालून एकप्रकारची दिशाभूल करण्याचे एक राजकीय षड्यंत्र गेले कित्येक दशके रचले आहे त्याचेच परिणाम आजचा शेतकरी भोगतो आहे.  त्यात शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तींशी द्यावी लागत असलेली झुंज त्याचे कंबरडेच मोडत आहे हे तर हे सगळेच राजकीय पक्ष सोयीस्करपणे विसरून जात आहोत हे नक्की. मी काही शेतीमधील तज्ञ अथवा अभ्यासक नाही, एक सर्व सामान्य माणूस आहे ज्याला रोज खायला अन्न लागते आणि ते पिकविणारा आमचा बळीराजा गेले काही दशके त्याच्या हक्कासाठी लढतो आहे, पण त्याला योग्य तो न्याय ना सरकार दरबारी ना दैवाच्या दरबारी मिळतो आहे ह्याचे शल्य माझ्या संवेदनशील मनाला बोचते आहे.  त्यामुळेच एक सुज्ञ नागरिक म्हणून मला जे काही वाटते ते मी व्यक्तिस्वातंत्र्यामुळे ह्या लेखाच्या माध्यमातून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. 

 

मूळ मुद्दा शेतकरी आत्महत्या का करतो हा आहे. त्यावर ह्या विषयामधील तज्ञांनी, अभ्यासकांनी भरपूर संशोधन करून काही प्रमुख कारणे नक्कीच शोधली गेली आहेत. कुठलाही शेतकरी त्याला हौस म्हणून आत्महत्या नक्कीच करत नाही हे निश्चित.  जरी मी ह्या विषयामधील तज्ञ अथवा अभ्यासक नसलो तरी गेले काही वर्षे शेतकरी चळवळीशी जोडला असल्यामुळे व संमेलनाच्या वेळी शेतकऱ्यांशी आणि काही जाणकारांशी केलेल्या चर्चेमधून मला ह्या समस्येच्या मुळाशी काही प्रमाणात जाण्याचा व  त्यातूनच मला जेवढे समजले तेवढे मी माझ्या कुवतीने मांडण्याचा एक लहानसा प्रयत्न येथे केला आहे.

 

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेली काही ठोस कारणे जी बऱ्याचदा वेगवेगळ्या स्तरांमधील चर्चेतूनही समोर आलेली आहेत ती म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असलेला अल्पभूधारक शेतकरी, मोठ्या प्रमाणात असलेली कोरडवाहू शेती, पारंपारिक शेती पध्दत, आधुनिक शेतीविषयक ज्ञानाचा अभाव, बियाणांच्या आणि खतांची कमतरता आणि वाढलेल्या किमतीवाढलेली शेतमजुरी, सिंचनाच्या अभावी शेतीला न मिळणारे पाणी, दरसाली नियमित येणारी नसर्गिक आपत्ती, शेतमालाला न मिळणारा हमीभाव, कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, शेतमाल साठवण्यासाठी तालुका पातळीवर असलेला गोदामांचा अभाव, शेतमालासाठी विपणन व्यवस्थेचा अभाव, धनदांडग्या आडत्यांचा राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर असलेला प्रभाव, ह्या सगळ्या तणावामुळे निर्माण झालेली शेतकऱ्यांची वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या, तसेच शेती तंत्रज्ञानाचा आणि साधन सामुग्रीचा अल्पभूधारकांना न मिळणारा लाभ, सहकार क्षेत्राचा कमी झालेला प्रभाव, शेती विमा विषयक अज्ञानाचा अभाव, विविध सरकारी योजनांचे खरोखर गरजू शेतकऱ्यांपर्यंत न पोचलेले फायदे, इत्यादी आणि अशी अजून खूप कारणे आपल्याला शोधून काढता येतील.  परंतु ह्या सगळ्यांची कारणमीमांसा करून त्यावर ठोस अशी काही उपाय योजना अमलात आणण्यासाठीचे निस्वार्थी असे कुठलेच धोरण हे कुठल्याच राजकीय पक्षाला आणि त्यांच्या अंमलाखाली असलेल्या प्रशासनाला का राबवता आले नाही हा मला एक पडलेला साधा प्रश्न आहे आणि ज्याचे उत्तर शोधण्याचा मी एक निष्फळ प्रयत्न करतो आहे व ते मला तरी सापडले नाही.

 

कागदोपत्री शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे म्हणजे वरील सर्व समस्यांपासून राजकीय लाभापोटी काढलेली एक पळवाट आहे की काय असे वाटावे असेच वर्तन आजवरच्या सर्वच राजकारण्यांच्या कृतीतूनच पाहायला मिळते.  जसे काही हेच जणू आपल्या शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा अविर्भाव आणू पाहत आहते. पण त्यांना एक समजत नाही की समस्येच्या मुळाशी घाव घातल्याशिवाय त्या समस्येचा नायनाट होणार नाही.  हे समजते आहे पण ते प्रत्यक्षात आणून स्वत:च्या पायावर कोणी धोंडा पाडून घायचा असा प्रश्न तर ह्या राजकीय पक्षांना पडला नसेल ना !  सोन्याचे अंडे देणारी ही कोंबडी एकदम कशी कापून खायची बरे !  इतक्या वर्षांच्या प्रलंबित सरकारी धोरणांमुळेच हा विषय एक महाकाय रूप धारण करून आज महाराष्ट्रासामोरच नाही तर संपूर्ण देशा समोर आज राक्षसासारखा आ वासून उभा आहे आणि त्यावर आपण फक्त चर्चाच करतो आहोत.  युद्ध पातळीवर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे त्यामुळे कर्ज माफी हा म्हणजे तात्पुरता इलाज जरी असला तरी आता तो करण्यावाचून सरकार समोर दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध राहिला नाही हे नक्की.  आत्ता जरी कर्ज माफी केली तरी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही ह्याची सुध्दा खबरदारी घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर काही ठोस अशा उपाय योजना ठरवून त्यांची आत्यंतिक प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे हीच काळाची खरी गरज आहे.

 

कदाचित लेखणीची ताकदच आपल्या ह्या बळीराजाला त्याच्या ह्या धर्मसंकटातून बाहेर काढू शकेल असा मला विश्वास वाटतो आणि म्हणूनच आम्हीं लटिके ना बोलूह्या ब्रीद वाक्याने शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून गेले तीन वर्षे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि प्रश्न व त्यावरील उपाय योजना, कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय साधण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला जातोय व त्याची दखल सर्वच क्षेत्रामधील मान्यवरांनी, तज्ञांनी, समाजसुधारकांनी, अभ्यासकांनी, अर्थशास्त्रज्ञांनी, पत्रकारांनी, साहित्यिकांनी व सर्वसामन्य माणसांनी घेतल्यामुळे ह्या चळवळीला दिवसेंदिवस यशही येत आहे हाच एक आशेचा किरण म्हणावा लागेल. तरीही ह्या चळवळीला अजूनही खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे हे मात्र ह्या निमित्ताने नमूद करावेसे वाटते.

 

ह्या माझा वैयक्तिक दृष्टीकोन आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.  

  

रविंद्र कामठे, पुणे

Monday, 18 December 2017

कायापालट





दवाखान्यातून घरी आल्यावर
पंधरा दिवसांनी
तीन आठवड्यानंतर

 
एक महिन्यानंतर कार्यालयात जातांना

कायापालट
आपल्या आयुष्यामध्ये एखादी अशी घटना घडून जाते, अन आपल्या विचारसरणीमध्ये एकदम कायापालट होतो.  माणसाचे मन हे खरोखरीच कधीही न उलगडणार एक कोडंच आहे.  हे एक विलक्षण असे रसायन आहे की जे भल्या भल्या शास्त्रज्ञांना अजूनही उमजले असेल असे मला तरी वाटत नाही. आयुष्यामधील प्रत्येक घटना अथवा प्रसंग हे म्हणजे नियतीचे एक प्रयोजनच असते हो !  काही काही प्रसंग असे असतात की जे अंगावर काटा आणतात.  तर काही प्रसंग अंगावर रोमांच उभे करतात.  ह्या सगळ्याला कारणीभूत आपले नियतीच असते असे मला कायमच वाटत आले आहे.  जे आपण कधीही चिंतलेले नसते तेच अचानक घडून जाते आणि आयुष्याला एकदम कलाटणी देवून जाते.  ह्या घटनांमधून खूप काही शिकण्यासारखे असते तसेच बरेच काही स्मुर्तीपटलावर साठवून ही ठेवायचे असते.  कळते परंतु वळत नाही अशी आपल्या मनाची अवस्था होऊन बसते हे मात्र नक्की.  सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण ह्या अचानक उदभवलेल्या प्रसंगाकडे पहायला शिकले पाहिजे तसेच कुठलाही पूर्वग्रहदूषित न करता आपले मतपरिवर्तन करायचा प्रयत्नही केला पाहिजे हे मी अनुभवातून सांगतो आहे.


तुम्हीं म्हणाल की काय प्रवचन लावले आहे हे.  पण एक सांगतो !  गेल्या एक महिन्यात मी जे काही अनुभवतो आहे ना ते खूपच विलक्षण आहे हो.  त्यातून वयाच्या पंचावन्नाव्यावर्षी हृदयविकार होऊन, जर आपण त्यामधून सहीसलामत बाहेर पडलो आहोत, म्हणजे एक प्रकारे पुनर्जीवितच झालो आहोत असे मला भासले असेल तर त्यात वावगे काय आहे !  मला खरोखरच पुनर्जन्म मिळाल्यासारखे भासते आहे (माझा हा अनुभव मी स्पंदने काळजाचीह्या लेखात शब्दांकित केला आहे) आणि त्यामुळेच माझ्या विचारांमध्ये एक प्रकारचा जो सकारात्मक दुर्ष्टीकोन जागा झाला आहे तो माझ्यावर येवून गेलेल्या ह्या प्रसंगामुळेच आला आहे अशी माझ्या मनाची खात्री झाली आहे.  म्हणूनच हा लेख प्रपंच.

अनुभवातून एक मात्र नक्कीच शिकलो ते म्हणजे आपल्यापेक्षा वाईट अवस्था असलेल्या माणसांकडे पाहिलं की आपण किती नशीबवान आहोत हे जाणवते.  वास्तविक पाहता हाच तर माणसाचा नैसर्गिक स्वभाव असावा.  असो.  मी काही तत्वज्ञानी नाही.  तरीही एक सांगतो की काही अनुभव आपल्या विचारसरणीवर प्रभाव टाकून आपल्या विचारांचा कायापालट करत असतात.  हा कायापालट फक्त सकारात्मक दृष्टीकोनातून घ्यावा हे मात्र प्रत्येकाने ठरवायला हवे.
एक सांगतो तरुणाईत मस्ती केलेली एकवेळ खपून जाते.  पण जस जसे आपले वय वाढत जाते तसं तसे आपल्या शरीराची क्षमता हे सगळं वाहून नेण्यास असमर्थ असते.  हे मात्र माझ्यासारखा एखादा झटका बसला तरच समजते हे दुर्दैव आहे हीच तर खरी गोम आहे.  अहो, आपल्या ह्या अविचारीपणामुळे आपण आपल्या कुटुंबाची, आप्तेष्टांची, मित्रमडळींची, सहकार्यांची किती फरफट करतो हे आपल्या लक्षातच येत नाही.  अर्थात त्यांची अशी ओढाताण करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही.  म्हणूनच माझे तुम्हांला कळकळीचे आवाहन आहे की वेळेतच जागे व्हा.  माझ्या अनुभवावरून बोध घ्या आणि सधृढ आयुष्य जगण्यासाठी आपल्या विचारांचा सकारात्मक कायापालट करून चांगले विचार आचरणात आणा.
आयुष्य खरं तर खूप छान आहे.  जे हसत खेळत मजेत जगण्यात जो काही आनंद आहे तो द्विगुणीत कसा करता येईल ह्याचाच विचार करावा.  माझ्या विचारसरणीत एक कायापालट झाला आहे तो म्हणजे माझी वाचनाची आणि लिखाणाची आवड एकदम दुप्पट झाली आहे हे नक्की.  असाच सकारात्मक कायापालट माझ्या सधृढ आयुष्यास उपयोगी पडेल अशी आशा वाटते.

 

रविंद्र कामठे