Wednesday, 7 December 2022

“गोष्ट एका रिटायरमेंटची” एक भावस्पर्शी गोष्ट

गोष्ट एका रिटायरमेंटची” एक भावस्पर्शी गोष्ट 


पुणे जिल्ह्यातील नीरा ह्या गावचे रहिवासी असणारे सुप्रसिद्ध लेखक श्री. सुनील पांडे यांनी त्यांचीगोष्ट एका रिटायरमेंटची हीस्नेहवर्धन प्रकाशनने प्रकशित केलेलीएक दिवसीय कादंबरीमाझ्या वाचनात आली तिने मला माझा हा अभिप्राय लिहिण्यास भाग पाडले.  त्यात ही कादंबरी पुण्यातले जेष्ठ साहित्यिक श्री. नागेश शेवाळकर सरांना अर्पण केली आहे हे वाचल्यावर तर मला सुनील पांडे सरांबद्दल प्रंचड आदर वाटला.  माणूस इतका विनयशील असू शकतो ह्यावर माझा विश्वास दृढ झाला.

वाचकहो, “गोष्ट एका रिटायरमेंटचीही काही फक्त सुनील पांडे यांच्याच आयुष्यात घडणारी गोष्ट नव्हे तर ती तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात घडणारी, तसेच आपल्या आसपास घडणारी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग वाटणारी अशीच वाटते.  मी ही गोष्ट वाचायला घेतली आणि तिच्यात इतका हरवून गेलो की काही विचारू नका.  तीन वर्षांपूर्वी मी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती त्यावेळेस माझाही असाच निरोप समारंभ आयोजित केला होता त्याची आठवण ताजी झाली आणि माझ्याही कळतनकळत ही गोष्ट वाचताना पदोपदी माझे डोळे पाणावले हीच ह्या कादंबरीची फार मोठी जमेची बाजू आहे.

सुनील पांडे सरांनी ह्या गोष्टीतून ज्या काही व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभ्या केल्या आहेत त्या वाचताना आपण त्या व्यक्तिरेखांशी समरस होऊन जातो काळीज हेलावून जाते.  एका सरकारी कार्यालयातील शिपाई आणि त्याचे वरिष्ठ साहेब एकाच दिवशी निवृत्त होतात आणि त्यांच्या निरोप समारंभाच्या दिवशी ह्या कादंबरीचे नायक गजानन साठे आपल्या नोकरीतील आयुष्यातील ४० वर्षांचा जो काही भावस्पर्शी धांडोळा घेतात त्या संकल्पनेलाच मला नमन करावेसे वाटते. 

सुनील पांडे सरांनी ही, अतिशय छोटी म्हणजे, एक दिवसाच्या गोष्टीतून आपल्या वैयक्तिक आयुष्याचा तसेच नोकरीतील, प्रवासातील नात्यांचा ज्या सुबकतेने उलगडा केला आहे त्याला तोड नाही.  ह्या कादंबरीचा नायक एक शिपाई जरी असला तरी तो भावनेने, त्याच्या वागण्याने त्याच्या चांगुलपणाने वाचकांच्या मनात घर करतो हुद्दा अथवा पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर तो त्याच्या वर्तनाने चांगुलपणाने श्रीमंत ठरतो हेच सिद्ध करतो हे ह्या कादंबरीचे बलस्थान आहे.  

नात्यांमधील ताणतणाव, चढउतार, भावभावना, हेवेदावे, गरजा, द्वेष, एककल्लीपणा ह्या सर्व गोष्टींची गुंफण ज्या पद्धतीने लेखकाने केली आहे त्यात वाहवत जाण्यासाठी भरपूर वाव असूनही लेखकाने अतिशय मर्यादेत राहून ही वरवर अगदी छोटीशी वाटणारी गोष्ट कुठेही भरकटू दिलेली नाही हे वैशिष्ट्य आहे. काही काही प्रसंग त्यात घातलेली नात्यांची सांगड इतकी विलक्षण जमली आहे की, वाचताना कंटाळा तर येतच नाही परंतु उगाचच फार समाज प्रबोधन केल्याचा आवही वाटत नाही.  

सर्वात शेवटी त्यांच्याच बरोबर निवृत्त होणाऱ्या वाघमारे साहेबांनी त्यांचाशी विश्वासाने साधलेला संवाद तर ह्या गोष्टीचा कळस आहे.  कादंबरी वाचताना डोक्यात जाणारे खलनायक वाटणारे हेच ते वाघमारे साहेब कादंबरीच्या शेवटाला आपल्याला नायक वाटायला लागतात हे तर ह्या गोष्टीचे फार मोठे फलित आहे असे मला वाटते.  अगदी सहज सोपी वाटणारी परंतु तितकीच मोठी अवघड गोष्ट इतक्या सोप्या पद्धतीने मांडण्याची कला सुनील पांडे सरांना खूप आधीपासून अवगत असावी हे त्यांच्या ह्या २२ व्या साहित्य संपदेवरून सिद्ध होते.

ह्या कादंबरीत पांडे सरांनी सर्वसामान्य नोकरदार माणसाच्या आयुष्यात एकदा येणार निवृत्तीचा दिवस त्याच्या मनाची होणारी घालमेल त्यात गतकाळातील चांगल्या वाईट स्मृतींना दिलेला उजाळा ज्या सहजतेने मांडला आहे की, ज्याने तो क्षण अनुभवला आहे तोही भावविवश होतोच होतो,  पण ज्यांच्या भविष्यात तो क्षण येणार आहे त्यांनाही ही हुरहूर लावून जातो.  माझ्या सवयीप्रमाणे मी ह्या गोष्टीचा फारसा उलगडा करत नाही, उलट रसिक वाचकांना नम्र विनंती करतो की तुम्ही ही कादंबरी विकत घेऊन नक्की वाचा.  तुमच्या मनातील खूप साऱ्या भाव भावनांना मोकळी वाट करून द्या.  हीच तर खरी सुनील पांडे सरांसारख्या लेखकांच्या साहित्य संपदेची ताकद आहे.

संतोष घोंगडे सरांनी साकारलेले मुखपृष्ठ तर नेहमीप्रमाणे गोष्टीतील विषयाला अनुरूप असेच आहे त्यात काही वादच नाही. स्नेहवर्धन प्रकाशनच्या डॉ. स्नेहल तावरे यांनी अतिशय दर्जात्मक निर्मिती केली आहे असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.

लेखक श्री. सनिल पांडे सरांचेगोष्ट एका रिटायरमेंटचीत्यांच्या ह्या अप्रतिम हृदयस्पर्शी साहित्य संपदेसाठी मन:पूर्वक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा.

 पुस्तक - “गोष्ट एका रिटायरमेंटची

लेखकश्री. सुनील पांडे (नीरा)

प्रकाशकडॉ स्नेहल तावरे, स्नेहवर्धन प्रकाशन

पृष्ठे१००

मूल्य १५०/-

रवींद्र कामठे

ravindrakamthe@gmail.com


Wednesday, 2 November 2022

शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार येसाजी कामठे

 शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार येसाजी कामठे यांची "लाडोबा" ह्या  २०२२ च्या  दिवाळी अंकातील शौर्यगाथा 



 

माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला आपले सर्वाचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीच्या काळात योगदान दिलेल्या एका मावळ्याची स्वराज्य उभारणीच्या काळातील योगदानाची माहिती सांगणार आहे.

मित्रांनो शिवरायांच्या काळात त्यांना असंख्य मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फार मोलाची साथ देऊन आपापला  खारीचा वाटा उचलला आहे.  ज्याची फार थोड्या प्रमाणात इतिहासात नोंद घेतली आहे. 

असाच शिवरायांचा एक मावळा होता, पुण्याच्या दक्षिणेला असेलेल्या कोंढव्याचा येसाजी कामठे, ज्याने शिवरायांना स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या तलवारीने नव्हे तर चक्क घण आणि पहारीने साथ दिली होती. अशा ह्या वीर येसाजी कामठे यांची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा एक छोटासा प्रसंग सांगतो आहे.

आदिलशाहीतील पुण्याच्या जहागिरीचे काम शहाजीराजांनी त्यांची पत्नी जिजाऊवर सोडून ते दक्षिणेला राज्यकारभारासाठी निघून गेले. त्यावेळेस शिवबा जेमतेम १५ वर्षांचे होते.  शहाजीराजांचा स्वराज्य उभारणीचा मनसुबा जिजाऊ आऊसाहेबांना चांगलाच ज्ञात होता व आपल्या लाडक्या पुत्राकडून त्या हे जोखमीचे कार्य अतिशय शिताफीने करून घेत होत्या. 

त्यांच्या तालमीत शिवबाही हळू हळू तयार होत होता.  रायरेश्वरावर आपल्या काही निवडक मावळ्यांच्या साथीने शिवबाने स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ तर आपल्याला माहितीच आहे. त्याचवेळेस आपला शिवबा, शिवाजी राजा झाला होता.

मित्रांनो, शिवाजी राजे आपल्या प्रजेला केवळ लढाईचे हुकुम देत नव्हते तर, रयतेसाठी समृद्ध शेती असावी म्हणून सतत प्रयत्न करीत असतं.  पुण्याच्या जवळ कात्रज घाटाच्या पलीकडे शिवगंगा नदीच्या तीरावर जिजाऊसाहेबांनी वसविलेल्या शिवापूर गावात त्यांनी आमराईही तयार केली होती.

शिवगंगेच्या खोऱ्यात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी हे सर्व पाणी नदीवाटे वाहून जात असे व उन्हाळ्यात शिवगंगा पाण्याअभावी कोरडी पडत असे.  त्यावर उपाय म्हणून उन्हाळ्यातही रयतेला प्यायला व शेतीला पाणी मिळावे ह्यासाठी नदीवर दगडी बांध घालण्याचा शिवरायांनी निश्चय केला.

यासाठी शिवरायांनी बारा मावळातील पाटलांना बोलावून आपल्या मनातील धरणाची संकल्पना सांगितली. ह्या धरणाच्या पाण्याचा खालील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी उपयोग करून तो प्रांत सुजलाम सुफलाम करण्याची त्यांची अतिशय महत्वाकांशी योजना होती.  शिवरायांच्या ह्या दूरदृष्टीला सर्वांनी मुजरा केला आणि लगोलग सगळे आपापल्या परीने कामाला लागले.

परंतु त्यांच्या वाटेतील एक भली मोठी धोंड काही केल्या फुटेना.  त्यामुळे सर्व पाटील चिंतेत पडले व महाराजांना त्यांनी त्यांची अडचण सांगितली. ती प्रंचड धोंड पहारीने व घणांनी फोडून काढल्याशिवाय पुढचे कामच चालणे अशक्य होते.  शिवाजी महाराजांनी हे अतिशय त्रासाचे व जोखमिचे काम येसाजी पाटील कामठे नावाच्या कोंढववेकर मराठ्यावर सोपविले. 

“मी परत येईपर्यंत ही प्रंचड धोंड फोडून अडथळा दूर करा” ! असे सांगून महाराज निघून गेले.  महाराज परत यायच्या आतच येसाजी कामठे पाटलाने जीवाची पर्वा न करता ती अगडबंब धोंड फोडून काढून, अडथळा पार होता की नव्हता करून टाकला होता व त्याचे छोटे धोंडे धरणाच्या भिंतीला रचले होते. 

एवढी अवाढव्य धोंड फोडून अडथळा दूर केलेला पाहून शिवाजी महाराज येसाजीवर फारच खुश झाले.  येसाजीची पाठ थोपटून ते त्याला बक्षीस म्हणून मोहरा देऊ लागले. तेंव्हा येसाजी महाराजांना म्हणाला की, “मला पैकं नकोत, जर मला काही द्यायचं असेल तर धान्य देणारी जमीन द्या ! पैकं खर्च होऊन जातील ! गावची पाटीलकी जरी आमच्या कडे असली तर इनामाची जमिन मुसलमानाच्या ताब्यात आहे. आमची इनामातील जमिन परत मिळावी ही विनंती”.

महाराजांना समजले की मुसलमान अंमलदाराने येसाजीचा भाऊ बावाजी यास कोंढाण्यावर बोलावून ठार मारले आहे व त्याची जमिन बळकावली आहे.   महाराजांनी तत्काळ येसाजीच्या विनंतीवरून त्यांची जमीन त्यांना इनाम म्हणून परत त्याच्या पदरात घातली व भाऊबंधाना त्यांचा हिस्सा देवून ती कसायला सुरवात करण्यास सांगितले.

मित्रांनो, स्वराज्याचे सुराज्य झालेल्या शिवगंगेच्या खोऱ्यात आजही हे छोटेसे धरण दिमाखात उभे आहे व त्यामुळे मी वीर येसाजी कामठे यांचे वंशज आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी योगदान देणाऱ्या आमच्या वीर येसाजी कामठे ह्यांना आमचा हा मानाचा मुजरा.

जय जिजाऊ | जय शिवाजी | जय भवानी | जय येसाजी |