Wednesday, 14 September 2022

अनोख्या रेशीमगाठी कादंबरीवरील कोकणवासी शुभेच्छुकांचा अभिप्राय.

 "अनोख्या रेशीमगाठी" ही लेखक रवींद्र कामठे उर्फ रवी काकांची कादंबरी म्हणजे त्यांच्यातल्या लेखकाला पडलेले अतिशय, सुंदर, प्रेमळ, सात्विक आणि निरागस असे स्वप्न आहे. 

काकांनी ज्या उत्कटतेने ही कादंबरी लिहिली आहे त्याला तोड नाही. नात्यांची रेशमी धाग्यांनी घातलेली वीण, त्यांच्यातील संवाद, परंपरेला फारशी तडजोड न करता घातलेली मुरड, लग्नसंस्थेतील व कुटुंब व्यवस्थेतील विविध विषयांना हात घालून सोडवलेला तीढा, कोकणातील आंजर्ले गावातील निसर्गसौंदयाचे व तेथील माणसांचे त्यांच्यातील चांगुलपणाचे व त्यागवृत्तीचे दर्शन घडवून समाजाला सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारी आहे. दोन पीढ्यांचा तीढा सोडवतांना वापरलेली संवाद शैली तर इतकी वाखाणण्याजोगी आहे की वाचतांना पदोपदी भावूक व्हायला होते व डोळे पाणवतात. हे ह्या कादंबरीचे फार मोठे बलस्थान आहे व यशही आहे.

विधवा आणि विधूर यांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न लिव्ह ईन रिलेशनशीप सारख्या सध्याच्या काळातील कळीच्या उपायाने सोडवून काकांनी हा गंभीर मुद्दाही अगदी सहजपणे चर्चेत आणला आहे.

कादंबरी हातात घेतल्यापासून ती पूर्णपणे वाचून होईपर्यंत खाली ठेवावीशीच वाटत नाही. त्याचे कारण काकांनी वापरलेली अतिशय साधी व सोपी भाषाशैली आणि वाचकाशी साधलेला संवाद, कादंबरीची नेटकी मांडणी हे होय. 

चुका शोधण्यापेक्षा, गुणांकडे लक्ष दिल्यास वाचनाचा आनंद तर मिळतोच मिळतो, परंतू आपल्यातला एक संवेदनशील माणूसही जागृत होतो.

आम्ही तर ह्या कादंबरीच्या प्रेमात पडलो आहे. तीच्या विषयाशी समरस झालो आहोत. आम्ही मुळचे कोकणातलीच व संसारही कोकणातच केलेली माणसे. पण काकांनी एकंदरीतच आपल्या कुटुंबव्यवस्थेतील, परिवारातील वाद विवाद, भांडणे, द्वेष, मत्सर, इर्शा, राग, लोभ, राजकारण, समाजकारण व चुलीतली वादळे अक्षरक्षः चुलीत घालून, माणुसकीची नवी दिक्षाच दिली आहे असे आम्हाला तरी प्रामाणिकपणे वाटते.

काकांनी आपल्या रोजच्या आयुष्यातले इतके छोटे छोटे प्रसंग भावनेने ओथंबून वाचकांसमोर  अतिशय सहजतेणे मांडले आहेत की, काही वेळेस आपण निःशब्द होतो. भावूक तर होतोच होतो पण त्याचवेळेस संवेदनशीलही होतो.

कदाचित तुम्हाला आम्ही काकांच्या कादंबरीचे फार कौतुक करते आहे असे वाटेल, परंतू आमचा नाईलाज आहे. जे उत्तम आहे ते सांगायला का संकोच का करायचा. 

आम्हाला तर प्रत्येक प्रसंग भावला आहे. पात्रांची निवड, त्यांच्यातला संवाद, त्यांची आत्मियता, कळकळ, तळमळ, जिव्हाळा, माया, काय काय म्हणून सांगू. जे काही चांगलं आहे ते ओतप्रोत भरलेलं असल्यामुळे, आपण कधी कधी माणूस म्हणून किती वाईट वागतो हे जाणवले.  

इथे एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो, तो म्हणजे, आंजर्ल्याहून परतीच्या वाटेवर जीथे दीपाचा अपघाती मृत्यू झालेला असतो त्याठिकाणी पूजाने दीपकला गाडी थांबवायला लावून आजीने तीच्या भरलेल्या ओटीतल्या अर्ध्या ओटीने दीपाची ओटी भरुन तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठीची केलेली प्रार्थना होय व त्याला प्रभारकरनेही आश्चयचकीत होऊन तीला दिलेली साथ, लेखकाला वाचकाच्या मनात सर्वोत्तम स्थान मिळवून देण्यास भाग पाडतो. 

तसेच स्त्रीयांच्या आयुष्यातील रजोनिवृत्तीचा जो काळ असतो त्यावरही काकांनी अगदी थोडक्यात पण मार्मिक भाष्य करुन स्त्रीच्या नाजुक मनस्थितीचे दर्शन घडवून तीला लागणाऱ्या मानसिक आधाराची गरज सुस्पष्ट करुन एक प्रकारे समाज प्रबोधनच केल्याचे उमजते. 

दीपकच्या भाषणाने कादंबरीचे प्रयोजन व उद्दिष्ट सफल झाल्याचे समाधान लाभते.

आयुष्य इतकंही सोपं नाही

जितकं आपण समजत असतो..

आयुष्य इतकंही अवघड नाही

जितकं आपण ते करुन ठेवतो.... 

काकांनी आमच्या कोकणातल्या अनुभवी आजीच्या मनात घातलेल्या ह्या ओळी किती चपखल बसतात हे जाणवले.

आम्हाला आजवर रवी काकांचा लेखक हा गुण फारसा माहित नव्हता. अर्थात तो तेवढ्या गांभीर्याने घेतला नव्हता. त्यांचा प्रांजळ काव्यसंग्रह चाळला होता. तारेवरची कसरत अनुभवकथन येताजाता वाचले होते. त्यातले बरेचसे प्रसंग माहित असल्यामुळे त्यांच्यातल्या लेखकाकडे दुर्लक्ष झाले होते असे आता वाटते. त्यासाठी काका तुमची क्षमा मागतो.

काका तुमची ही कादंबरी आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. असो. 

अजून फार काही लिहित नाही कारण "अनोख्या रेशीमगाठी" कादांबरीचे कौतुक एक वाचक ह्या नात्याने करावे तेवढे थोडेच आहे. 

पुण्याच्या चपराक प्रकाशनचे एका पेक्षा एक उत्कृष्ट दिवाळी अंक काकांमुळेच वाचायला मिळाले आहेत. चपराक प्रकाशनने ह्या कादंबरीचे सर्वार्थाने सोने केले आहे असे म्हणावयास हवे. त्यासाठी घनश्याम पाटील यांचे आभार व्यक्त करायला हवेत.

आपले शुभेच्छुक.


Thursday, 8 September 2022

भैरवनाथ दादांचा "अनोख्या रेशीमगाठी कादंबरीवरील अभिप्राय


२५ ऑगस्ट पासून मी रोज एक नव्या आनंददायी अनुभवातून जातो आहे, तो म्हणजे माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादांबरीचे वाचकांकडून होणारे कौतुक होय!

आपल्या देशाच्या सीमेवर निधड्या छातीने रक्षण करणाऱ्या भैरवनाथ दादांचे माझी कादंबरी वाचून झाल्यावर आलेले सोबत जोडलेले हे अतिशय भावस्पर्शी पत्र म्हणजे माझ्यासाठी एक फार मोठा पुरस्कारच नव्हे तर अविस्मरणीय असा सन्मान आहे. लेखक ह्या नात्याने माझ्या साहित्य संपदेचा अजून काय सन्मान व सत्कार व्हायला हवा!
भैरवनाथ दादांनी माझी कादंबरी दिल्लीला मागवून घेतली. ती वाचली आणि लगोलग मला फोन करुन त्यांनी लिहिलेला हा स्वर्गानुभव ऐकवला आणि मला भावविवश केले. 
२५ आॕगस्टच्या प्रकाशना आधीच त्यांनी पूर्वनोंदणी केली होती आणि मला फोनकरुन कादांबरी शक्यतो ३१च्या आत पाठवा अशी विनंती केली होती. कारण त्यानंतर त्यांचे बटालीयन दिल्लीहून सीमेवर रवाना होणार होते.
भैरवनाथ दादांची ही तळमळ माझ्यातल्या साहित्यिकाला घायाळ तर करुन गेलीच पण माझ्यातला माणसाला निःशब्द करुन गेली.
घरदार, संसार सर्वकाही सोडून दादांसारखे जवान आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतात म्हणून आपण सुखाने जगतो आहोत ही भावना उजागर झाली आणि मनोमन दादांना दंडवत देऊन गेली.
भैरवनाथ दादांची कादंबरी वाचून झाल्यावर लगोलग ती त्यांच्या साथीदाराने वाचण्यासाठी पळवली. बटालीयनमध्ये आता ती एका जवानाच्या हातून दुसऱ्याच्या हातात जाईल, वाचली जाईल. त्यामधील भावनांशी ते एकरूप होतील. काही क्षण का होईना त्यांना विरंगुळा लाभेल, त्यांना सीमेवर शत्रूशी लढण्याचे बळ देऊन जाईल हे उमजून माझे डोळे डबडबले होते.
वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे, ही एक भाकड कथा आहे असेच मला वाटले.  जर का चांगले साहित्य वाचायला मिळाले तर वाचकही त्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे असे मला वाटते.
भैरवनाथ दादांना माझी कादंबरी त्यांच्या गावाला घरी कुटुंबाला वाचण्यासाठी पाठवायची होती, पण आता ती परत कधी हाती लागेल याची काही खातरी नव्हती. तशी खंत ते बोलता बोलता व्यक्त करून गेले.  त्यांच्याकडून गावचा पत्ता मिळाल्याबरोबर चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांनी, आत्मियतेनी आजच ही कादंबरी त्यांच्या गावाला पोस्टाने पाठवून देऊन मला उपकृत केले हे नक्की.
अजून काय लिहू.  
भैरवनाथदादांचे सोडत जोडलेला अभिप्राय नक्की वाचा.
रवींद्र कामठे.

भैरवनाथ यांचा माझ्या कादंबरीवरील हा उत्स्फुतपणे लिहिलेला अभिप्राय नक्की वाचा. 
(दादांचेच शब्द मी फक्त वाचकांसाठी वाचता यावेत म्हणून टंकलेखन करून काह्ली दिले आहेत)

प्रसिद्ध लेखक आणि कवी श्री. रवींद्र कामठे सर यांची अनोख्या रेशीमगाठी ही कादंबरी, कथा आणि त्यातील वर्णन खूप सुंदर पद्धतीने लिहिण्यात आले आहे.   या कादंबरीमध्ये "लिव्ह इन रिलेशनशिप" हा विषय अतिशय सुबकपणे हाताळला आहे.  प्रभाकर आणि पूजा यांच्यासह दीपक आणि सई अशा दोन पिढ्यांच्या भावभावनांचे प्रगटीकरण या कादंबरीतून झाले आहे.  या  कादंबरीमध्ये एकाच इमारतीतील एक बाप आणि मुलगा आणि एक आणि तिची मुलगी सहवासातून एकत्र येतात आणि त्यांचे ऋणानुबंध निर्माण होतात. यामध्ये कोकणातील आंजर्ल्याचे आणि त्या परिसराचे आलेले मनोहरी वर्णन हे तर या कादंबरीचा आत्मा आहे.   यामध्ये  आंजर्ल्याहून परत येत असताना जिथे दीपाचा मृत्यू झाला होता तिथे पूजाने ओटी भरणे, यामध्ये स्वत:च्या साखरपुड्यातील दीपकचे भाषण प्रसंगात या कादंबरीने कमालीची उंची गाठली आहे.
सर, तुमच्या लेखनीची जादू आहे.  दोन पिढ्यांची ही प्रेमकथा असली तरी त्या प्रेमात कुठेही उथळपणा दिसून येत नाही.  आणि ही कादंबरी कधी वाचून झाले हे समजलेच नाही.  खूप छान विचार मांडले आहेत कामठे सरांनी.  कादंबरी वाचून झाली असे वाटले मी कोकणातच आहे. 
माझी ही पहिली कादंबरी आहे की ही कादंबरी वाचताना डोळ्यातून पाणी आलेले समजलेही नाही.  खरंच खूप छान कादंबरी आहे कामठे सर.
"लिव्ह इन रिलेशनशिप" सारख्या विषयावर मार्मिक भाष्य केल्याबद्दल रवींद्र कामठे सरांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
"जय हिंद सर"
भैरवनाथ  

Wednesday, 7 September 2022

माझी पंढरीची वारी.

 माझी पंढरीची वारी.



ह्या जगात माझ्या एवढा भाग्यवान मीच. त्याचे कारणही तसेच आहे मंडळी. काय सांगू ! कसे सांगू ! मला तर काही सुचतच नाहीयं. माझे मन प्रचंड भावविवश झाले आहे व डोळेही पाणावले आहेत. कंठ दाटून आला आहे. परंतु माझा आजचा अनुभव तुम्हाला सांगायलाच हवा असाच आहे. ज्या क्षणाची प्रत्येक वारकरी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतो, तो म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन होय, पांडुरंगाच्या चरणी लीन होणे होय ! ‘भेटी लागी जीवा ! लागलीसी आस !’ हो मंडळी, मीच तो भाग्यवान ज्याच्या मनीध्यानी नसताना ५९ वर्षातल्या आयुष्यात चक्क पहिल्यांदा पंढरपूरला जाणे झाले व पांडुरंगाच्या पायाशी लीन होता आले. तेही अजिबात घाई गडबड न करता. गेले कित्येक वर्षे आपल्या सगळ्यांच्या व माझ्याही लाडक्या विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची आस मी धरून होतो पण योगच येत नव्हता. हा योग जुळून आला तो आमच्या कामठे परिवाराचे ज्येष्ठ सदस्य व वयाच्या ८०तही पंढरीची वारी करणारे श्री. नेताजी कामठे काका यांच्यामुळे. काकांचे हे ऋण मी ह्या जन्मातच काय पण कितीही मनुष्य जन्म मिळाले तरी फेडू शकणार नाही हे नक्की.

काल रात्री नेताजी काकांचा मला फोन आला आणि त्यांनी मला विचारले की उद्या पंढरपूरला येतोस का? त्यांचीच गाडी घेऊन जायचे होते. अर्थात त्यांचा चालक संतोष होताच गाडी चालवायला. मला फक्त मागे बसून जायचे होते. त्यांचे एक नातेवाईक शिंदे वकीलही बरोबर होते. मी एका क्षणाचाही विचार न करता काकांना होकार दिला. ही सुद्धा पांडुरंगाचीच मर्जी होती असे मला वाटले. एकतर माझी तब्बेत गेले आठवडाभर ठीक नव्हती. त्यात माझा उजव्या पायाचा तळवा जळवाताने फुटलेला होता. मला चालतानाही खूप वेदना होत होत्या. पाय टेकवत नव्हता. पण काय झाले कोणास ठाऊक मी त्यांना येतो म्हणालो. घरात आलो आणि वंदनाला (बायकोला) सांगितले की मी उद्या काकांबरोबर पंढरपूरला चाललो आहे. तीलाही मी हो म्हणाल्याचे आश्चर्य वाटले. ती पण जा म्हणाली. ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ असेच काहीसे होते हे.
सकाळी ८.३०ला निघून आम्ही पंढरपूरला १.१० मिनिटांनी पोहचलो. मंदिरा जवळच्या एका दुकानात चपला ठेवल्या. उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता. अनवाणी पायाने चालत निघालो. पाय भाजत होते. नेताजी काका मला म्हणाले, रवींद्र चल लवकर, काही होणार नाही तुझ्या पायाला. उलट जरा चटके बसले की तुझे दुखणे कुठच्या कुठे पळून जाईल. आणि खरंच तसेच झाले. मंदिराच्या आवारात थोडी गर्दी होती. मुख दर्शनबारी चालू होती असे कळले. आम्ही धावतच तिकडे गेलो. आत दर्शनबारीत घुसलो. आतील पोलीस काकांनी आवाज दिला. दहा मिनिटांत दर्शन बंद होणार आहे. पटपट चला. माझी तर धाकधूक वाढली. समजा आपला नंबर नाही लागला तर, कमीतकमी तासदोनतास तरी बारीत उभे राहावे लागणार होते ! विचार करत करत तसाच गर्दीतून वाट काढत पुढे पुढे चालत होतो आणि माझ्या एकदम लक्षात आले की आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे. मंडळी त्या, क्षणाला एवढ्या गर्दीतून मी पांडुरंगाच्या मुखाचे दर्शन घेतले आणि काय सांगू ! माझ्या सर्वांगात नवचैतन्य संचारले. अवघे विश्व आपल्या डोळ्यासमोर विटेवर उभे असल्याचे जाणवले. विठूरायाच्या भाळीवरील चंदनाच्या टिळ्याने डोळे दीपून गेले. का, ज्ञानेश्वर माऊली, आणि करोडो वारकरी पाडुरंगाच्या भेटीसाठी एवढे आतूर आसतात ते, कळले.
त्या गर्दीतून आपोआप पुढे पुढे ढकलला जात होतो, आणि कधी पांडुरंगाच्या, विठूरायाच्या चरणी लीन झालो तेच उमगले नाही. जवळ उभ्या असलेल्या महिला पोलीस चला लवकर म्हणून हाकलत होत्या. मी मात्र माझ्या धुंदीत होतो. पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श करून त्याच्या चरणी डोके ठेवण्याचा माझ्या आयुष्यातील भाग्याचा तो क्षण आला आणि मी एक आवंढा गिळला. डोळे पाणावले. सर्वांगाला कंप जाणवला. हातात “अनोख्या रेशीमगाठी” ह्या माझ्या नुकत्यात प्रकाशित झालेल्या कादंबरीची प्रत होती. ती पांडुरंगाच्या चरणी ठेवली आणि तशीच ती जवळ उभ्या असलेल्या गुरुजींच्या हातात देऊन विठूरायाला समर्पित करून पुन्हा एकदा त्याच्या चरणी नतमस्तक झालो. आश्चर्याचा दुसरा धक्का म्हणजे, नेताजी काकांनीही माझ्या कादंबरीची एक प्रत पांडुरंगाच्या चरणी ठेवण्यासाठी आणलेली होती. अजून काय हवं माझ्यासारख्या साहित्य सेवेच्या वाटेतील एका वारकऱ्याला / लेखकाला !
भावविवश होऊन तसाच गर्दीतून मार्ग काढीत म्हणजे ढकलला जात होतो. काका माझा हात धरून मला अगदी एखाद्या लहान मुलासारखे ओढत होते. गर्दीत चुकलो तर काय ? आम्ही असेच पुढे सरकत रुक्मिणी मंदिरात कधी पोहचलो तेच कळले नाही. इथेही तोच अनुभव आला. रुक्मिणी मातेची विलोभनीय व प्रसन्न मूर्ती पाहून तिच्या चरणी कधी लीन झालो तेच कळले नाही. कादंबरी मातेच्या चरणी ठेवली आणि तिथे उपस्थित गुरुजींच्या हातात दिली. त्यांनी मुखपृष्ठ पाहून व नाव वाचून लगेचच प्रतिक्रिया दिली, छान दिसतेय कादंबरी”. त्या क्षणाला मी एकदम भावूक झालो. महिला पोलीस आम्हाला पुढे चला म्हणून ढकलत होत्या. त्या गर्दीत मी गुरुजींना विनंती केली की जमले तर रुक्मिणीमातेच्या चरणी ही कादंबरी ठेवून एखादा फोटो काढून मला पाठवता आला तर पहा. माझा नंबर आहे कादंबरीत. ते ही मोठ्याने हो, हो पाठवतो म्हणाले. अर्थात माझ्या ह्या विनंतीला काहीच अर्थ नव्हता. कारण मंदिरात मोबाईल व कॅमेरा न्यायला परवानगी नव्हती. तसेच फोटो काढायला ही परवानगी नव्हती. पण माझी एक भोळी आशा होती. कोण जाणे, विठूराया माझा हा हट्टही पुरवू शकतो. अहो, ज्याने एवढ्या मायेने,आपुलकीने, मला स्वत:कडे भेटीला बोलवून घेतले, त्याच्या चरणी नतमस्तक होऊ दिले, तो पांडुरंग काहीही करू शकतो. मी मात्र ह्या सुखद अनुभवाने खूपच भावूक झालेला होतो.
२५ ऑगस्ट २०२२ ला आणि तिथीने ऋषीपंचमीला, गुरुवार १ सप्टेंबर ला वयाच्या साठीत प्रवेश केलेला मी इतका भाग्यवान असू शकतो ह्यावर माझाच विश्वास बसत नव्हता.
चक्क २० मिनिटात विठ्ठल रुक्मिणी दर्शन होऊन आम्ही मंदिराला एक प्रदक्षिणा घालत होतो. जत्रेत हरवलेल्या लहान मुलाला जेव्हा त्याची आई सापडते आणि ती त्याला मायाने जवळ घेऊन कुरवाळते त्यावेळेस जसे वाटत असेल ना, अगदी तसेच मला वाटत होते. विठ्ठल रुक्मिणीच्या रूपाने आज मला माझे दिवंगत आई-वडील भेटल्याची भावना मनात दाटून आली होती.
काकांच्या आदेशाने आम्ही लगेचच म्हणजे दुपारच्या दोन वाजता पुण्याकडे प्रस्थान ठेवले. वाटेत अकलूज येथे स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. पुढे मोरगावच्या बाप्पाच्या मंदिराच्या कळसाचे गाडीतूनच दर्शन घेतले. समोर मळभ दाटून आले होते. तिन्हीसांजेला सुरवात झालेली होती. बघता बघता गाडी जेजुरीला पोहोचली होती. मावळतीला रवीने जेजुरीचा गड सुवर्ण किरणांची उधळण करून संपूर्ण गाडला सोन्याची मखर केली होती. आभाळ हळू हळू फाटायला लागले होते. पुण्यात ढगफुटी सदृश पाऊस चालू असे असा फोनही काकांना येऊन गेला होता. ह्या गडबडीत सोपानदेवांचे सासवड कधी मागे राहिले तेच कळले नाही. बोपदेवषघाट रस्त्याला दूरवर उत्तरेकडील पर्वतावर रंगीबिरंगी दिव्यांनी रोषणाई केलेल्या कानिफनाथ गडाकडे आपसूकच लक्ष वेधले केले.
आजच्या एका दिवसात जीवनभराची पुण्याईने ओसंडून भरुन वाहणारी झोळी घेऊन, प्रचंड वाहतुकीतून मार्गक्रमण करीत घरी पोहचलो तेच कळले नाही.
रवींद्र कामठे
शनिवार, ३ सप्टेंबर २०२२
पांडुरंग हरी. जय हरी विठ्ठल.
विठ्ठल रखुमाई






प्रतिभा खैरनार, नांदगाव यांचा माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील समर्पक अभिप्राय

प्रतिभा खैरनार, नांदगाव यांचा माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील समर्पक अभिप्राय नक्की वाचा.

नमस्कार सर...
तुमची अनोख्या रेशीम गाठी ही कादंबरी कालच मिळाली आणि एकाच दिवसात ती वाचूनही झाली. "लिव्ह इन रिलेशनशिप हा विषय खरंतर इतका वेगळा आहे आणि यावर कादंबरी होवू शकते हा विचार सहसा कोणाच्या डोक्यात ही येणार नाही. माणसं कितीही सुशिक्षित असली तरी ह्या अश्या नात्याला प्रत्येकाचा विरोध च असतो. बुरसटलेल्या विचारातून आत्ता कुठे समाज प्रेम विवाहाला मान्यता द्यायला लागलाय तरी अजूनही खेडोपाडी आंतरजातीय विवाहाला बंदीच आहे. आणि जर कोणी केलाच तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला असह्य वेदनेतून तिरस्कारातून जावे लागते.
समाजाचा विचार करून समाजातच रहाणारे, एकाकी जीवन जगणारे किती तरी विधूर आणि विधवा आहेत. ज्या सगळ्या संकटानां सामोरे जात एकटेपणा ने आयुष्य रेटताय, अशा वेळी तुमची लिव्ह इन रिलेशन ही कादंबरी त्यांच्या साठी एक आशेचा किरण घेऊन आलीय.
कादंबरीची मांडणी मुद्देसूद अन् अगदी सोप्या साध्या भाषेत केलीय. वाचतांना कुठेही थांबावसं वाटत नाही किंवा कंटाळवाणे प्रसंग नाही. पूजा आणि प्रभाकर यांच्या एकाकीपणा मुळे मैत्रीतून प्रेमात रूपांतर हे सहजगत्या मांडलयं. प्रभाकर च्या मनात वासनेचा लवलेश दाखवला नाही हे खूप महत्त्वाचे. नितळ आणि निरागस नातं...त्याच प्रमाणे इतक्या कमी वयात ही दीपक आणि सईच्या समजूतदारपणा मुळे आज त्यांचे आईबाबा एक होवू शकले, प्रभाकर आणि पूजाला त्यांनी समजून घेतले ही खूप मोठी गोष्ट आहे.
पूर्ण कादंबरीतून तुम्ही कोकण दर्शन घडवलयं, गणपती दर्शन, खाद्यपदार्थ, लालमाती, समुद्राच्या लाटा किनारपट्टी, तिथली पायाला चिटकणारी रेती हे सगळं स्वतः अनुभवतोय असं वाटत. त्यातल्या त्यात काही गोष्टी ना घरच्यांचा तीव्र विरोध असतो पण इथे खेड्यात राहूनही आजी आणि दिवाकर अपर्णा हे तुम्ही किती उच्च विचारसरणी चे दाखवलेत. त्यांनी सहजपणे स्वीकारलेले नाते त्याबद्दल त्यांचा आदर छानच... आणि त्यापलिकडे ही समाजाचा विचार न करता एका विधवेला पुजेला बसवणे म्हणजे चांगल्या चांगल्या सुशिक्षितांच्या विचारांना तुम्ही चपराक दिलीय. दीपक आणि सईच्या साखरपुड्याच्या वेळी दीपकचे भाष्य आणि त्याने अनपेक्षित केलेला प्रभाकर आणि पूजाचा एकमेकांना माळा टाकून केलेला नात्यांचा स्वीकार हा समारोप सुंदरच...
त्यात कादंबरी ला घनश्याम सरांची प्रस्तावना मिळालीय म्हणजे "सोने पे सुहागा"....कादंबरी अतिशय वाचनीय झालीय . तुमच्या या कादंबरी साठी आणि पुढील प्रकाशित होणाऱ्या अनेक साहित्यासाठी , यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा...
प्रतिभा खैरनार....

Pratibha Pawar Khairnar प्रतिभाताई तुमचे मनःपूर्वक आभार आहेत. तुम्ही फार समर्पक शब्दांत माझ्या कादंबरीचे विलेक्षण केलेत त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहणे पसंत करेन. घनश्याम सरांनी तर माझ्या कादंबरीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रस्तावना आणि पाठराखण सदृश्य आहे, परंतू कादंबरीवरील त्यांचे संस्कार मी ह्या जन्मीतरी विसरू शकत नाही.
आपला इतका उत्स्फुर्तपणे दिलेला अभिप्राय इतरांनाही कादंबरी वाचण्यास नक्कीच प्रवृत्त करेल.
पुन्हा एकदा आपले आभार.🙏🙏

Tuesday, 6 September 2022

लेखक सुनील पांडे यांचा "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील अभिप्राय

*अनोख्या* *रेशीम* *गाठी* :

*लिव्ह* *इन* *रिलेशनशिप* *काळाची* *गरज* *असलेली* *सामाजिक* *कादंबरी* .
आवडीच्या पाहुण्यांची निघायची वेळ आली की वाटणारी हुरहुर पुस्तक संपायला आलं की वाटू लागली की लेखक जिंकला असं समजावं . अशीच काहीशी अनुभूती सुप्रसिद्ध लेखक श्री रवींद्र कामठे यांचे *अनोख्या* *रेशीम* *गाठी* ही कादंबरी वाचताना आली .
साधी , सोपी , तरी ओघवती शैली आणि जसं घडलं तसं सांगण्याची हातोटी ही लेखक रवींद्र कामठे यांच्या लेखनाची विशेष खासियत .
एसटी , लोकल ट्रेन ही माझ्या वाचनप्रवासाची साधनं . गुरूवारी रात्री आॕफिसातून घरी आल्यानंतर अनोख्या रेशीम गाठी हे साहित्य चपराक प्रकाशनाने पाठविलेले पुस्तक हातात पडले . तब्बल १९१ पानांची ही कादंबरी वाचून होणार कधी ? याचे सुरूवातीला काहीसे दडपण आले परंतु कादंबरी वाचायला हातात घेतल्यानंतर ती वाचून कधी संपली हे कळलेही नाही .
लिव्ह इन रिलेशनशिप हा कादंबरीचा विषय . आपल्या भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला अतिशय महत्त्व दिले आहे . पाहून आणि ठरवून लग्न करणे ही लग्न करण्याची पारंपरिक पद्धत . दुसरीकडे प्रेमविवाहाला अजूनही अनेक ठिकाणी कुटुंबातून , नातेवाईकातून , समाजातून विरोध होताना दिसतो . प्रेमात दोन मनाचा विचार असतो तर लग्न करताना समाजाचा विचार ( का ? ) करायलाच लागतो हे तितकेच खरे आहे . त्यातही विवाह झाल्यानंतर पुढे जाऊन तो विवाह यशस्वी होईल कि नाही असे छातीठोकपणे सांगणे अशक्य . या सगळ्या पार्श्वभूमीवर लिव्ह इन रिलेशनशिप हा लग्नाशिवाय एकत्र राहण्याचा नवीन ट्रेंड पाश्चात्तय देशांप्रमाणे आपल्या भारतातही आला आहे .
मुंबई सारख्या महानगरात ही कथा घडते . प्रभाकर पूजा आणि सई आणि दीपक यांच्या प्रेमाची ही अनोखी कथा . रक्ताच्या नात्यांपेक्षाही मानलेली नाती किती महत्त्वाची असतात हे कादंबरी वाचून अधोरेखित होते .
कादंबरीत लेखक रवींद्र कामठे यांनी कोकणातील आंजर्ले गावाचे केलेले चित्रण वाचताना आपणही कोकणातच असल्याचा अनुभव आपणास येतो . ही लेखकाच्या लेखनीची जादू म्हटली पाहिजे .
कड्यावरचा गणपती , निसर्गरम्य अशा वाडीचे वर्णन , अथांग असा पसरलेला निळाशार समुद्र , तेथिल सुर्योदय , सुर्योदयाचे नयनमनोहर दर्शन , उकडीचे मोदक तसेच कोकणातील जेवणातील सुग्रास रूचकर अशा रसभरीत जेवणांचे वर्णन वाचून वाचक तृप्ततेने ढेकर देतो .
आंजर्ले सारख्या छोट्या गावात राहूनही प्रभाकरच्या आईची समज , तिचा दृष्टिकोन , तिचे प्रगत विचार , कालानुरूप नवीन गोष्टींचा स्विकार करणे आणि सुन म्हणून पूजाचा स्वीकार करणे हे पाहून आजीबद्दलचा आदर अधिकच वाढू लागतो तर दुसरीकडे मुंबई सारख्या शहरात राहूनही प्रभाकर आणि पूजाच्या नात्यांकडे कलुषित नजरेने पाहून त्यावर खोचकपणे टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांची किवही येऊ लागते .
लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याने मान्यता दिली असली तरी अजूनही समाज असे सबंध स्वीकारायला तयार नाही . ही सुद्धा कटू वस्तुस्थिती आहे . प्रभाकर आणि पुजा हे जेव्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतात . त्यासाठी वकिलांचा ते योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन आणि सामंजस्य करार करून . हा करार कशासाठी ? तर लेखक म्हणतात ,
*आपल्याकडे* *समाज* *नावाच्या* *टोपीखाली* *काही* *विकृत* *विचारसरणीचे* *लोक* *वावरत* *असतात* . *त्यांना* *एक* *सणसणीत* *चपराक* *द्यायला* *म्हणून* *हे* *अस्त्र* *असावे* .
प्रस्तुत कादंबरीतून रवींद्र कामठे यांनी दोन पिढ्यांची कथा सांगितली आहे . एकूण २० प्रकरणातून ही कादंबरी फुलत जाते . कादंबरी वाचताना वाचकांची उत्कंटा शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात लेखक रवींद्र कामठे यशस्वी झाले आहेत .
मुळचे पुण्यातील असलेले लेखक रवींद्र कामठे यांनी कादंबरीत कोकणातील आंजर्ले गावाचे केलेले चित्रण अतिशय उत्तम आणि फार बारकाईने केले आहे . कादंबरी वाचून लेखक रवींद्र कामठे मुळचे कोकणातील रहिवासी असावे असे वाटते .
फार वर्षापूर्वी लेखक गो.नी.दांडेकर यांनी *शितू* या कादंबरीत कोकणातील गावाचे चित्रण केले होते . कादंबरीतील विधवा असलेल्या शितूचे विसू या नायकावर प्रेम असूनही ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही . आपल्या सारख्या विधवा स्त्रीशी विसूने लग्न करून स्वतःचे वाटोळे करू नये असे ती त्याला सांगते आणि खाडीत जीव देऊन स्वतःचे आयुष्य संपवते . विसूच्या आयुष्यातून कायमची निघून जाते . अनोख्या रेशीम गाठी कादंबरी वाचताना त्या शितू कादंबरीची मला आठवण झाली . अर्थात शितू कादंबरीच्या त्याकाळची सामाजिक परिस्थिती आत्ता कितीतरी बदलली आहे . अर्थात आज शितू यदा कदाचित असती तर विसू बरोबर लग्न न करता लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये नक्कीच राहिली असती .
दोन पिढ्यांची ही प्रेमकथा असली तरी त्या प्रेमात कुठेही उथळपणा दिसून येत नाही . हे लेखकाच्या लेखनीचे मोठे कसब आहे . कादंबरीत आपल्याला प्रभाकर पूजा आणि सई दीपक अशी सयंमशिल , आदर्श आणि सुसंस्कृत पात्रे भेटतात . उतारवयात पुरूषालाच नव्हे तर स्त्रीलासुद्धा आधाराची किती गरज असते हे पटवून देण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे .
प्रभाकर मुंबईत नोकरी करत असला तरी गावाला आणि घराला तो विसरला नाही . अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा गावाला येऊन गावातील लोकांना भेटतो . त्यांच्या सुख दुःखात तो सहभागी होतो . एक मुलगा म्हणून आई विषयी आणि घराविषयी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतो . शेवटी एका कवीने म्हटल्याप्रमाणे
*माता* *आणि* *माती* *यात* *फक्त* *वेलांटीचाच* *फरक* *आहे*
*जो* *दोन्हीला* *विसरेल*
*त्याचे* *जीवन* *नरक* *आहे*
आदर्श भाऊ कसा असावा ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाकर आणि दिवाकर हे दोघे भाऊ होत . त्यांच्या बंधू प्रेमाने आपले मस्तक नतमस्तक होते .
दिवाकरची पत्नी अर्पणा ही प्रभाकरची फक्त वहिनी नाही तर लहान लाडकी अशी बहिणही आहे . प्रभाकर आणि अर्पणामध्ये जसे भाऊ बहिणीचे प्रेम पहायला मिळते तसेच प्रभाकरची भावी बायको म्हणून अर्पणा ही पूजाचा मोठ्या मनाने आणि आनंदाने स्वीकार करते . पूजा आणि अर्पणा यातील खेळीमेळीचे सबंध लेखकाने उत्तम पद्धतीने दाखवले आहे . आदर्श आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन कादंबरीत घडवले आहे .
ज्या ठिकाणी प्रभाकरच्या गाडीला अपघात होऊन त्याच्या पत्नीचा दीपाचा मृत्यू होतो त्याच जागेवर आंजर्लेहून मुंबईला गाडीने परत येताना पूजा प्रभाकरला त्या ठिकाणी गाडी थांबायला सांगून त्याजागी हळद कुंकू वाहून हात जोडून मृत दीपाला श्रद्धांजली वाहते ते पाहून कुणाही वाचकांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही . इतका तो प्रसंग लेखकाने हदयकारी लिहिला आहे .
कादंबरीत विजयकाका , अनंता , कुसुमवहिनी , मंदामावशी , इन्स्पेक्टर शेवाळेसाहेब , रानडेसाहेब , डाँक्टरकाका काकू , वकीलकाका अशी अनेक जीवाला जीव देणारी आणि माणूसकी असलेली पात्रे आपल्याला भेटतात .
कादंबरीच्या शेवटी दीपकने केलेले भाषण मुळातूनच वाचण्यासारखे असे झालेले आहे .
एक चांगला आणि महत्त्वाचा सामाजिक विषय कादंबरीच्या माध्यमातून मांडल्याबद्दल मी लेखक रवींद्र कामठे यांचे
अभिनंदन
करतो आणि त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा व्यक्त करतो .
*अनोख्या* *रेशीम* *गाठी*
( *कादंबरी* )
*लेखक* *श्री* *रवींद्र* *कामठे*
पाने : १९१
किंमत : ३००/ -
चपराक प्रकाशन पुणे .
आस्वादक : सुनील पांडे
मो . ९८१७८२९८९८ .

Wednesday, 31 August 2022

बाप्पा मोरया २०२२






गणपती बाप्पाचे कालच आगमन झाले. आज सकाळी त्याची विधीवत प्राणप्रतिष्ठाही झाली. यंदा बाप्पांना मस्तपैकी दिवाणखान्यातच आरास केली आहे. थोडेसे सुटसुटीत वाटतेयं. आमच्याकडील दिडदिवसांचे त्यांचे वास्तव्य सुखकर व्हावे हा त्यामगील उद्देश. आम्हालाही छान वाटले. त्यामुळे संध्याकाळची आरतीही एकदम जोरात होईल. वाचन संस्कृती वृंधिंगत व्हावी हा यंदाच्या आरासीचा उद्देश आहे.

यंदा मात्र मला मूर्ती घडवता नाही आली. त्यात आधीची माती फारच चिवट झाली होती आणि सतंतधार पावसाने मूर्ती वाळलीही नसती. असो.
आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
रवींद्र कामठे
बुधवार, ३१ आॕगस्ट २०२२
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02Sy1j43s6YewkXKnBohrf6nWGFW6xGBrcembLJVh5KdgD7XvJWEYqb8FA4qKfeacNl&id=1835772995&sfnsn=wiwspwa


Sunday, 21 August 2022

अनोख्या रेशीमगाठी कादंबरीच्या प्रकाशना निमित्त.


माझ्या अनोख्या रेशीमगाठी ह्या कादंबरीचे २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०-१ दरम्यान पुण्यातील नवीपेठ येथील पत्रकार भवनात होत आहे. त्यानिमित्ताने आपल्या माहिती साठी ही पोस्ट. कृपया आपली प्रत Gpay +91 7057292092 वर आजच नोंदवा व मला तुमचे नाव, पत्ता आणि मो. नंबर माझ्या +91 94212 18528 वर WHATSAPP करा ही विनंती. ##चपराक प्रकाशन #साहित्य चपराक