Wednesday, 7 September 2022

प्रतिभा खैरनार, नांदगाव यांचा माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील समर्पक अभिप्राय

प्रतिभा खैरनार, नांदगाव यांचा माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील समर्पक अभिप्राय नक्की वाचा.

नमस्कार सर...
तुमची अनोख्या रेशीम गाठी ही कादंबरी कालच मिळाली आणि एकाच दिवसात ती वाचूनही झाली. "लिव्ह इन रिलेशनशिप हा विषय खरंतर इतका वेगळा आहे आणि यावर कादंबरी होवू शकते हा विचार सहसा कोणाच्या डोक्यात ही येणार नाही. माणसं कितीही सुशिक्षित असली तरी ह्या अश्या नात्याला प्रत्येकाचा विरोध च असतो. बुरसटलेल्या विचारातून आत्ता कुठे समाज प्रेम विवाहाला मान्यता द्यायला लागलाय तरी अजूनही खेडोपाडी आंतरजातीय विवाहाला बंदीच आहे. आणि जर कोणी केलाच तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला असह्य वेदनेतून तिरस्कारातून जावे लागते.
समाजाचा विचार करून समाजातच रहाणारे, एकाकी जीवन जगणारे किती तरी विधूर आणि विधवा आहेत. ज्या सगळ्या संकटानां सामोरे जात एकटेपणा ने आयुष्य रेटताय, अशा वेळी तुमची लिव्ह इन रिलेशन ही कादंबरी त्यांच्या साठी एक आशेचा किरण घेऊन आलीय.
कादंबरीची मांडणी मुद्देसूद अन् अगदी सोप्या साध्या भाषेत केलीय. वाचतांना कुठेही थांबावसं वाटत नाही किंवा कंटाळवाणे प्रसंग नाही. पूजा आणि प्रभाकर यांच्या एकाकीपणा मुळे मैत्रीतून प्रेमात रूपांतर हे सहजगत्या मांडलयं. प्रभाकर च्या मनात वासनेचा लवलेश दाखवला नाही हे खूप महत्त्वाचे. नितळ आणि निरागस नातं...त्याच प्रमाणे इतक्या कमी वयात ही दीपक आणि सईच्या समजूतदारपणा मुळे आज त्यांचे आईबाबा एक होवू शकले, प्रभाकर आणि पूजाला त्यांनी समजून घेतले ही खूप मोठी गोष्ट आहे.
पूर्ण कादंबरीतून तुम्ही कोकण दर्शन घडवलयं, गणपती दर्शन, खाद्यपदार्थ, लालमाती, समुद्राच्या लाटा किनारपट्टी, तिथली पायाला चिटकणारी रेती हे सगळं स्वतः अनुभवतोय असं वाटत. त्यातल्या त्यात काही गोष्टी ना घरच्यांचा तीव्र विरोध असतो पण इथे खेड्यात राहूनही आजी आणि दिवाकर अपर्णा हे तुम्ही किती उच्च विचारसरणी चे दाखवलेत. त्यांनी सहजपणे स्वीकारलेले नाते त्याबद्दल त्यांचा आदर छानच... आणि त्यापलिकडे ही समाजाचा विचार न करता एका विधवेला पुजेला बसवणे म्हणजे चांगल्या चांगल्या सुशिक्षितांच्या विचारांना तुम्ही चपराक दिलीय. दीपक आणि सईच्या साखरपुड्याच्या वेळी दीपकचे भाष्य आणि त्याने अनपेक्षित केलेला प्रभाकर आणि पूजाचा एकमेकांना माळा टाकून केलेला नात्यांचा स्वीकार हा समारोप सुंदरच...
त्यात कादंबरी ला घनश्याम सरांची प्रस्तावना मिळालीय म्हणजे "सोने पे सुहागा"....कादंबरी अतिशय वाचनीय झालीय . तुमच्या या कादंबरी साठी आणि पुढील प्रकाशित होणाऱ्या अनेक साहित्यासाठी , यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा...
प्रतिभा खैरनार....

Pratibha Pawar Khairnar प्रतिभाताई तुमचे मनःपूर्वक आभार आहेत. तुम्ही फार समर्पक शब्दांत माझ्या कादंबरीचे विलेक्षण केलेत त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहणे पसंत करेन. घनश्याम सरांनी तर माझ्या कादंबरीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रस्तावना आणि पाठराखण सदृश्य आहे, परंतू कादंबरीवरील त्यांचे संस्कार मी ह्या जन्मीतरी विसरू शकत नाही.
आपला इतका उत्स्फुर्तपणे दिलेला अभिप्राय इतरांनाही कादंबरी वाचण्यास नक्कीच प्रवृत्त करेल.
पुन्हा एकदा आपले आभार.🙏🙏

Tuesday, 6 September 2022

लेखक सुनील पांडे यांचा "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील अभिप्राय

*अनोख्या* *रेशीम* *गाठी* :

*लिव्ह* *इन* *रिलेशनशिप* *काळाची* *गरज* *असलेली* *सामाजिक* *कादंबरी* .
आवडीच्या पाहुण्यांची निघायची वेळ आली की वाटणारी हुरहुर पुस्तक संपायला आलं की वाटू लागली की लेखक जिंकला असं समजावं . अशीच काहीशी अनुभूती सुप्रसिद्ध लेखक श्री रवींद्र कामठे यांचे *अनोख्या* *रेशीम* *गाठी* ही कादंबरी वाचताना आली .
साधी , सोपी , तरी ओघवती शैली आणि जसं घडलं तसं सांगण्याची हातोटी ही लेखक रवींद्र कामठे यांच्या लेखनाची विशेष खासियत .
एसटी , लोकल ट्रेन ही माझ्या वाचनप्रवासाची साधनं . गुरूवारी रात्री आॕफिसातून घरी आल्यानंतर अनोख्या रेशीम गाठी हे साहित्य चपराक प्रकाशनाने पाठविलेले पुस्तक हातात पडले . तब्बल १९१ पानांची ही कादंबरी वाचून होणार कधी ? याचे सुरूवातीला काहीसे दडपण आले परंतु कादंबरी वाचायला हातात घेतल्यानंतर ती वाचून कधी संपली हे कळलेही नाही .
लिव्ह इन रिलेशनशिप हा कादंबरीचा विषय . आपल्या भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला अतिशय महत्त्व दिले आहे . पाहून आणि ठरवून लग्न करणे ही लग्न करण्याची पारंपरिक पद्धत . दुसरीकडे प्रेमविवाहाला अजूनही अनेक ठिकाणी कुटुंबातून , नातेवाईकातून , समाजातून विरोध होताना दिसतो . प्रेमात दोन मनाचा विचार असतो तर लग्न करताना समाजाचा विचार ( का ? ) करायलाच लागतो हे तितकेच खरे आहे . त्यातही विवाह झाल्यानंतर पुढे जाऊन तो विवाह यशस्वी होईल कि नाही असे छातीठोकपणे सांगणे अशक्य . या सगळ्या पार्श्वभूमीवर लिव्ह इन रिलेशनशिप हा लग्नाशिवाय एकत्र राहण्याचा नवीन ट्रेंड पाश्चात्तय देशांप्रमाणे आपल्या भारतातही आला आहे .
मुंबई सारख्या महानगरात ही कथा घडते . प्रभाकर पूजा आणि सई आणि दीपक यांच्या प्रेमाची ही अनोखी कथा . रक्ताच्या नात्यांपेक्षाही मानलेली नाती किती महत्त्वाची असतात हे कादंबरी वाचून अधोरेखित होते .
कादंबरीत लेखक रवींद्र कामठे यांनी कोकणातील आंजर्ले गावाचे केलेले चित्रण वाचताना आपणही कोकणातच असल्याचा अनुभव आपणास येतो . ही लेखकाच्या लेखनीची जादू म्हटली पाहिजे .
कड्यावरचा गणपती , निसर्गरम्य अशा वाडीचे वर्णन , अथांग असा पसरलेला निळाशार समुद्र , तेथिल सुर्योदय , सुर्योदयाचे नयनमनोहर दर्शन , उकडीचे मोदक तसेच कोकणातील जेवणातील सुग्रास रूचकर अशा रसभरीत जेवणांचे वर्णन वाचून वाचक तृप्ततेने ढेकर देतो .
आंजर्ले सारख्या छोट्या गावात राहूनही प्रभाकरच्या आईची समज , तिचा दृष्टिकोन , तिचे प्रगत विचार , कालानुरूप नवीन गोष्टींचा स्विकार करणे आणि सुन म्हणून पूजाचा स्वीकार करणे हे पाहून आजीबद्दलचा आदर अधिकच वाढू लागतो तर दुसरीकडे मुंबई सारख्या शहरात राहूनही प्रभाकर आणि पूजाच्या नात्यांकडे कलुषित नजरेने पाहून त्यावर खोचकपणे टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांची किवही येऊ लागते .
लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याने मान्यता दिली असली तरी अजूनही समाज असे सबंध स्वीकारायला तयार नाही . ही सुद्धा कटू वस्तुस्थिती आहे . प्रभाकर आणि पुजा हे जेव्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतात . त्यासाठी वकिलांचा ते योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन आणि सामंजस्य करार करून . हा करार कशासाठी ? तर लेखक म्हणतात ,
*आपल्याकडे* *समाज* *नावाच्या* *टोपीखाली* *काही* *विकृत* *विचारसरणीचे* *लोक* *वावरत* *असतात* . *त्यांना* *एक* *सणसणीत* *चपराक* *द्यायला* *म्हणून* *हे* *अस्त्र* *असावे* .
प्रस्तुत कादंबरीतून रवींद्र कामठे यांनी दोन पिढ्यांची कथा सांगितली आहे . एकूण २० प्रकरणातून ही कादंबरी फुलत जाते . कादंबरी वाचताना वाचकांची उत्कंटा शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात लेखक रवींद्र कामठे यशस्वी झाले आहेत .
मुळचे पुण्यातील असलेले लेखक रवींद्र कामठे यांनी कादंबरीत कोकणातील आंजर्ले गावाचे केलेले चित्रण अतिशय उत्तम आणि फार बारकाईने केले आहे . कादंबरी वाचून लेखक रवींद्र कामठे मुळचे कोकणातील रहिवासी असावे असे वाटते .
फार वर्षापूर्वी लेखक गो.नी.दांडेकर यांनी *शितू* या कादंबरीत कोकणातील गावाचे चित्रण केले होते . कादंबरीतील विधवा असलेल्या शितूचे विसू या नायकावर प्रेम असूनही ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही . आपल्या सारख्या विधवा स्त्रीशी विसूने लग्न करून स्वतःचे वाटोळे करू नये असे ती त्याला सांगते आणि खाडीत जीव देऊन स्वतःचे आयुष्य संपवते . विसूच्या आयुष्यातून कायमची निघून जाते . अनोख्या रेशीम गाठी कादंबरी वाचताना त्या शितू कादंबरीची मला आठवण झाली . अर्थात शितू कादंबरीच्या त्याकाळची सामाजिक परिस्थिती आत्ता कितीतरी बदलली आहे . अर्थात आज शितू यदा कदाचित असती तर विसू बरोबर लग्न न करता लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये नक्कीच राहिली असती .
दोन पिढ्यांची ही प्रेमकथा असली तरी त्या प्रेमात कुठेही उथळपणा दिसून येत नाही . हे लेखकाच्या लेखनीचे मोठे कसब आहे . कादंबरीत आपल्याला प्रभाकर पूजा आणि सई दीपक अशी सयंमशिल , आदर्श आणि सुसंस्कृत पात्रे भेटतात . उतारवयात पुरूषालाच नव्हे तर स्त्रीलासुद्धा आधाराची किती गरज असते हे पटवून देण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे .
प्रभाकर मुंबईत नोकरी करत असला तरी गावाला आणि घराला तो विसरला नाही . अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा गावाला येऊन गावातील लोकांना भेटतो . त्यांच्या सुख दुःखात तो सहभागी होतो . एक मुलगा म्हणून आई विषयी आणि घराविषयी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतो . शेवटी एका कवीने म्हटल्याप्रमाणे
*माता* *आणि* *माती* *यात* *फक्त* *वेलांटीचाच* *फरक* *आहे*
*जो* *दोन्हीला* *विसरेल*
*त्याचे* *जीवन* *नरक* *आहे*
आदर्श भाऊ कसा असावा ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाकर आणि दिवाकर हे दोघे भाऊ होत . त्यांच्या बंधू प्रेमाने आपले मस्तक नतमस्तक होते .
दिवाकरची पत्नी अर्पणा ही प्रभाकरची फक्त वहिनी नाही तर लहान लाडकी अशी बहिणही आहे . प्रभाकर आणि अर्पणामध्ये जसे भाऊ बहिणीचे प्रेम पहायला मिळते तसेच प्रभाकरची भावी बायको म्हणून अर्पणा ही पूजाचा मोठ्या मनाने आणि आनंदाने स्वीकार करते . पूजा आणि अर्पणा यातील खेळीमेळीचे सबंध लेखकाने उत्तम पद्धतीने दाखवले आहे . आदर्श आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन कादंबरीत घडवले आहे .
ज्या ठिकाणी प्रभाकरच्या गाडीला अपघात होऊन त्याच्या पत्नीचा दीपाचा मृत्यू होतो त्याच जागेवर आंजर्लेहून मुंबईला गाडीने परत येताना पूजा प्रभाकरला त्या ठिकाणी गाडी थांबायला सांगून त्याजागी हळद कुंकू वाहून हात जोडून मृत दीपाला श्रद्धांजली वाहते ते पाहून कुणाही वाचकांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही . इतका तो प्रसंग लेखकाने हदयकारी लिहिला आहे .
कादंबरीत विजयकाका , अनंता , कुसुमवहिनी , मंदामावशी , इन्स्पेक्टर शेवाळेसाहेब , रानडेसाहेब , डाँक्टरकाका काकू , वकीलकाका अशी अनेक जीवाला जीव देणारी आणि माणूसकी असलेली पात्रे आपल्याला भेटतात .
कादंबरीच्या शेवटी दीपकने केलेले भाषण मुळातूनच वाचण्यासारखे असे झालेले आहे .
एक चांगला आणि महत्त्वाचा सामाजिक विषय कादंबरीच्या माध्यमातून मांडल्याबद्दल मी लेखक रवींद्र कामठे यांचे
अभिनंदन
करतो आणि त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा व्यक्त करतो .
*अनोख्या* *रेशीम* *गाठी*
( *कादंबरी* )
*लेखक* *श्री* *रवींद्र* *कामठे*
पाने : १९१
किंमत : ३००/ -
चपराक प्रकाशन पुणे .
आस्वादक : सुनील पांडे
मो . ९८१७८२९८९८ .

Wednesday, 31 August 2022

बाप्पा मोरया २०२२






गणपती बाप्पाचे कालच आगमन झाले. आज सकाळी त्याची विधीवत प्राणप्रतिष्ठाही झाली. यंदा बाप्पांना मस्तपैकी दिवाणखान्यातच आरास केली आहे. थोडेसे सुटसुटीत वाटतेयं. आमच्याकडील दिडदिवसांचे त्यांचे वास्तव्य सुखकर व्हावे हा त्यामगील उद्देश. आम्हालाही छान वाटले. त्यामुळे संध्याकाळची आरतीही एकदम जोरात होईल. वाचन संस्कृती वृंधिंगत व्हावी हा यंदाच्या आरासीचा उद्देश आहे.

यंदा मात्र मला मूर्ती घडवता नाही आली. त्यात आधीची माती फारच चिवट झाली होती आणि सतंतधार पावसाने मूर्ती वाळलीही नसती. असो.
आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
रवींद्र कामठे
बुधवार, ३१ आॕगस्ट २०२२
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02Sy1j43s6YewkXKnBohrf6nWGFW6xGBrcembLJVh5KdgD7XvJWEYqb8FA4qKfeacNl&id=1835772995&sfnsn=wiwspwa


Sunday, 21 August 2022

अनोख्या रेशीमगाठी कादंबरीच्या प्रकाशना निमित्त.


माझ्या अनोख्या रेशीमगाठी ह्या कादंबरीचे २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०-१ दरम्यान पुण्यातील नवीपेठ येथील पत्रकार भवनात होत आहे. त्यानिमित्ताने आपल्या माहिती साठी ही पोस्ट. कृपया आपली प्रत Gpay +91 7057292092 वर आजच नोंदवा व मला तुमचे नाव, पत्ता आणि मो. नंबर माझ्या +91 94212 18528 वर WHATSAPP करा ही विनंती. ##चपराक प्रकाशन #साहित्य चपराक

Monday, 18 April 2022

वरदची मुंज एक अविस्मरणीय सोहळा

वरदची मुंज, एक अविस्मरणीय सोहळा

१३ एप्रिल २०२२ला वंदनाच्या भाच्याच्या अमेयच्या मुलाच्या म्हणजे वरदच्या मुंजीसाठी दापोलीत जालगावला ब्राम्हणवाडीत जाणे झाले. दोन दिवसांच्या मुक्कामाच्या तयारीत १२ तारखेलाच दुपारी इकडे पोहचलो होतो व चक्क पाच दिवस मुक्काम ठोकला. निवृत्तीमुळे मी आणि वंदना जरा जास्तच निवांत होतो. खूप वर्षांनी बायकोच्या माहेरचा सगळा गोतावळा भेटला आणि ह्या भेटीचे सार्थक झाले.

त्याच दिवशी संध्याकाळी, वाजत गाजत जाऊन गावातल्या गणपती बाप्पाला, विघ्नहर्त्याला मुंजीचे रितसर आमंत्रण करण्यात आले. सगळे कसे रितीरिवाजानेच होणार ह्याची ही नांदी होती.

१२ तारखेलाच अमेयचा मेव्हणा म्हणजे पल्लवीचा नवरा मंदार याने "मन रिचार्ज रिचार्ज" हा अतिशय प्रेरणादाई कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

अमेयने पुढच्या अंगणातच भव्य मंडप टाकलेला होता. शेजारच्यांच्या अंगणातही मंडप टाकून तिकडे सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. आजूबाजूच्यांची लगबग, धावपळ, तळमळ, कळकळ, आस्था, प्रेम, स्नेह, उत्साह, आपुलकी, जिव्हाळा पाहून ह्या सगळ्यांचा खूपच हेवा वाटला आणि खूप कौतुकही वाटले. जो तो न सांगता आपापली कामे अगदी मनलावून करत होता. हो अगदी वय वर्ष ८ ते ८० असा कार्यकर्त्यांचा ताफा ह्या एका सोहळ्यासाठी अहोरात्र राबत होता. मुंजीआधी विधीवत् ग्रहमखाने छान सुरवात झाली.  गुरुजींच्या मंत्रांनी वातावरणात प्रसन्नता व मंगलमयता दरवळत होती. मला तर जाम धमाल येत होती. अगदी शाळेतले दिवस आठवत होते. गेले कित्येक वर्षे मी दापोलीला येतोय, परंतु असा सोहळा पहिल्यांदाच अनुभवत होतो. लहानपणी अनुभवलेले माझ्या मामीच्या आजोळचे राहुरीचे काही सोहळे आपसूकच एकएक करुन डोळ्यासमोरून धावत होते.

उषाताई-काका, अमेय-सानिका, महेश-प्रज्ञा, सलील-प्राची, मंदार-पल्लवी, निषाद-अनुश्री, ओंकार, प्रसाद, अनुराग, अनुजा, अनुष्का, स्वरा, अंतरा, चिन्मयी, संयुक्ता, तसेच मानस, सौमिल, प्रियल आणि वरद ह्या चिल्लीपिल्यांशी छान गट्टी जमली होती. मंदारचे बाबा भुस्कुटेकाकांशी तर छान गप्पा रंगल्या होत्या. महाडला येण्याचे अगत्याच्या निमंत्रणाने मला फार आपुलकी वाटली. अभयमामाची फोटोची लगबग न थकता अखंडपणे चालू होती. माधव-ममता खास गाडीकरुन रत्नागिरीहून आहे होते. अमृतावहिनीही आंजर्ल्याहून दोन दिवस आधीच मुक्कामाला होती. महेशच्या मोठ्याभावाची योगेश अत्रे दादा वाहिनींची खूप वर्षांनी भेट झाली.

ग्रहमखापासून गेले तीन चार दिवस रोज ५० एक माणसांचा नाष्टा, जेवण, संध्याकाळचे खाणे, चहापान, रात्रीचे जेवण, कुठेही कटकट, गडबड न करता आपुलकीने चाललेले पाहून, आपण शहरी माणसे उगाचच ह्या सगळ्याचा किती बाऊ करतो असे वाटले.

मुंजीच्या दिवशी पंचक्रोशीतून, पुण्या मुंबईतून व इतर शहरांतून साधारण ३५० पाहुण्यांनी पलिकडच्या मांडवात, जिलेबी, मठ्ठा, मसालेभात, अशा सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला. कुठेही गोंधळ नाही. कांगावा नाही. घाई नाही. एकाबाजूला जेवणाचा कार्यक्रम चालू असतांना नातेवाईकांच्या उपस्थितीत घरासमोरच्या अंगणात गुरुजी मुंजीचे सर्व विधी अगदी मनापासून करुन बटूवर छान संस्कार करत होते.

मुंजीनंतरच्या भिक्षावळ सोहळ्याने तर समारंभास वेगळीच रंगतच आणली होती. सजवलेल्या बैलगाडीतून देवदर्शनाला निघालेली मिरवणूक व त्यामागे पांढऱ्या साड्या नेसलेल्या महिला वर्गाने वरातीची शोभा अजूनच वाढवली होती. बालगोपाळ, लहान थोर सगळे पारंपारिक वेशात नटून थटून ह्या वरातीच्या पुढे मागे नाचत वाजत गाजत चालतांना पाहून मलाही नाचावेसे वाटत होते.

जमलेल्या पै पाहुण्यांनी ह्या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला होता.  बाहेर सूर्यनारायण आग ओकत होता, पण मांडवात कोणाला त्याचे काहीच पडले नव्हते. जो तो सोहळ्याच्या प्रत्येक क्षणाला आपल्या स्मृतीपटलात साठवून जमेल तेवढ्या आनंदाचा साठा करुन ठेवत होता. आजकाल शहरात हे असे एवढे साग्रसंगीत संस्कार पहायलाही मिळत नाहीत. त्यात आपण भौतिक सुखाच्या मागे धावण्याच्या नादात अशा प्रसंगाना किती मुकलेलो आहोत ते जाणवते. एकत्रितपणे गोतावळ्यात घालवण्याचे फार थोडे प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. ते ही आपण अहंकारापोटी व्यर्थ घालवतो असे प्रकर्षाने जाणवले. अर्थात हे आपल्या परिवारावर, परस्पर संबंधांवर व संस्कारांवर अवलंबून असते हे मात्र नक्की.

ग्रहमखाच्या रात्री आलेल्या सगळ्या पाहुण्या मंडळींनी अंगणातल्या मांडवात मस्तपैकी गप्पांचा फड मांडला होता. विनोद, चेष्टा, एकमेकांची खेचणे, हसणे, खिदळणे, मध्येच कुल्फीवर ताव मारणे चालू होते. इकडच्या मोकळ्या हवेमुळे कितीही खाल्ले तरी सहज पचते व भूकही खूप लागते आणि महत्वाचे म्हणजे वजन वाढत नाही. खाल्लेले अन्न अंगी का लागते त्याचे उत्तर मिळाले.

आजूबाजूच्या  घरातलीही आप्तेष्ट, नातेवाईक व शेजारी मंडळीही हक्काने मांडवात जमून धमाल करत होती. माझ्यासारख्या शहरी मानवाला, माणसांच्या उत्साहाने व आनंदाने खळखळणारा हा समुद्र पाहून खूपच प्रफुल्लित व्हायला झाले होते. मध्यरात्री कडक काफीचाही बेत तर ठरलेलाच होता.  मनात आणले तर सुखी, समाधानी कसे जगायचे ह्याचा हा परिपाठच होता.

एवढ्या पाहुण्यांच्या रामरगाड्यात अमेयची रोजच्या कामांचीही धावपळ, गडबड चालू होती. त्यात आंब्यांचा हंगाम असल्यामुळे बागेतल्या कामावरही लक्ष ठेवणे चालूच होते. अमेयचे बाबा स्वतः गडीमाणसांवर देखरेख ठेवत होते व स्वतः त्यांच्याबरोबरीने राबतही होते. ह्या धावपळीत अमेयला तर दुपारी गायींच्या धारा काढाव्या लागत होत्या. त्याच्याशिवाय हे काम दुसरे कोणास करणे शक्य दिसत नव्हते.

मुंज उरकल्यावर त्या रात्रीतर आपापले वय विसरून सगळ्यांनी मिळून जी काही धमाल केली होती ते पाहून मला तर अचंबितच व्हायला झाले होते. कोकणातली अशी प्रशस्त घरे व त्यात ठासून भरलेली आपुलकी आणि ओसंडून वाहणारी माणुसकी पाहिली की वाटते आपलेही असेच एक घर असावे, त्यात आपणही असे माणसांचे मेळावे भरवावेत. संमेलने करावीत. मनात साठवून ठेवलेल्या भावना उचंबळून आल्यावर ह्या आपल्या आप्तेष्टांच्यावर उधळून आयुष्याचे सोने करावे, असे राहून राहून वाटत होते.

दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणं उरकल्यावर आम्ही २५-३० जणं २२ किलोमीटरवर असलेल्या "पन्हाळेकाजी" ह्या प्राचीन काळातील बौध्द लेण्यास भेट द्यायला गेलो होतो. नदीच्या बाजूला डोगरात कोरलेली ही लेणी पाहून प्राचीन काळातील मानवांच्या इच्छाशक्तीने व अफाट कल्पनाशक्तीने डोळे दिपून गेले.

माझ्या एर्टीगात ५ जणं आणि उरलेले सगळे अमेयच्या टेम्पोत असा हा रोमांचित करणारा जो प्रवास आम्ही केला, तो तर कदापी विसरता येणार नाही असाच होता. लाल मातीचा तो घाट रस्ता गाडीची आणि आतल्या माणसांची सत्वपरिक्षाच पहात होता. टेम्पोतल्या माणसांची अवस्था तर मिक्सरमधल्या दाण्यांसारखी झाली होती. आम्ही सोडून प्रवासात सगळेजण लालमातीने अक्षरशः माखलेले होते.

एवढे दमल्यानंतरही रात्रीची धमाल मात्र कोणीही चुकवली नव्हती. रात्री दीडदोन पर्यंत गप्पा, नाच गाणी रंगलेलीच होती. फुगडी, झिम्मा, मंगळागौरीच्या खेळांनी तर पोरींचा व पोक्त महिलावर्गाच्या शारीरिक क्षमतेचा कस अधोरेखित करत होती.  ह्या सगळ्यात आजूबाजूच्या घरांतील सर्व पोरीबाळींचा व महिलावर्गाचा दांडगा उत्साह पाहून मन ताजेतवाने झाले होते.  अतिउत्साहाच्या भरात अगदी प्लन्चेट करुन पणजोबा, आजोबांच्या आत्म्यास बोलवून त्यांना प्रश्न विचारुन अपेक्षित उत्तरेही ह्या पोरांनी मिळवली होती.

इकडच्या काकवा, मावश्या, आत्या, माम्या, आजी, पणजी, काका, काकू, आजोबा, लहानसहान पोरांचा दांडगा उत्साह पाहून शरीरात नवचैतन्याचे धबधबेच फुटून वाहत होते.

आम्हांला येऊन चार दिवस झाले होते. तरी आम्ही निघायचे नाव घेत नव्हतो आणि यजमानही आम्हाला जा म्हणत नव्हते.

आज संध्याकाळचा बेत तर लईच भारी होता. आमचा सगळा लवाजमा, दोन किलोमिटरवरील लागात म्हणजे काजू आणि आंब्याच्या बागेत निघाला होता. तिकडे तर्रीबाज मिसळ पाव असा बेत आखला होता. अमेयच्या टेम्पोत २०-२२ जण आणि पणजीआजी, उषाताई, मंदार, महेश, सलील, मी आणि वंदना माझ्या गाडीतून गेलो होतो. बागेचा तो लालमातीचा मुरमाड रस्ता, त्यात गाडीत आम्ही सात माणसे एर्टीगाची अग्नीपरिक्षाच होती. त्यात ती पास झाली हे विशेष.

मिसळ पावाची पूर्व तयारी घरुनच करुन घेतली होती. बागेत चूल मांडून तिच्यावर सगळ्यांनी मिळून मिसळ बनवली. ती शिजेपर्यंत पोरे-पोरी मस्तपैकी  लगोरी, विषामृत खेळले. आमच्यासारखे थोडे वयस्करांनी काजूच्या बिया वेचण्याचाही कार्यक्रम उरकून घेतला. पोतंभर काजूच्या बिया गोळा करुन टेम्पोत भरुनही ठेवले होते.

अमेयने हापूस आंब्याची व काजूची शे-दीडशे कलमे लावलीत. सगळी झाडे हिरव्या जर्द कैर्यांनी व पिवळ्या धम्मक काजूंनी लगडलेली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आंब्याचा मोसम सुरु होणार होता व घरचा हापूस आंबा खायला आजून एक महिना प्रतिक्षा करावी लागणार हे कळले. मन थोडे खट्टू झाले. काजूच्या बीया वाळवून नंतर त्यावर काही प्रक्रीया करुन त्यातून आपण जो खातो तो काजू तयार होतो. हे सगळे खूपच कष्टाचे काम आहे हे जाणवले.

सकाळी सकाळी एवढ्या गडबडीत अमेयचे मांडव उतरवून ते सामान परत करण्याचे काम चालू होते. त्यात तो टेम्पोत हजार लिटरच्या दोन टाक्या भरून पाणी २ किलोमिटर दूर असलेल्या बागेत जाऊन आंब्यांच्या झाडांना घालत होता. चार पाच तासात त्याने चार खेपा मारल्या होत्या.   अतिउष्णतेने झाडांना पाणी देणे गरजेचे होते व वरती डोंगरावर बोअरला पाणी नसल्यामुळे त्याला हा उद्योग करावा लागत होता. किती काबाडकष्ट करावे लागत होते ते उमजले.  ह्या कष्टांचे फळ म्हणूनच आपल्याला आंबे गोड लागतात हे कोडे आज उलगडले होते.

उद्या सकाळी म्हणजे रविवारी पुण्याला प्रस्थान ठेवायचे ठरले होते. त्यामुळे आंजर्ल्याला वहिनीकडे धावती भेट देऊन आलो. आंजर्ल्याचा उत्सव उद्यापासून सुरु होतो आहे.  उभागरात देवीचे दर्शन घेऊन नंतर पाखाडीत आलो. आंजर्ल्यात आलो की दापोलीत एकतरी चक्कर मारणे तसेच दापोलीत आलो की आंजर्ल्यात चक्कर मारणे क्रमप्राप्त आहे नव्हे हा माझा शिरस्ताच आहे.

खूप वर्षांनी वरदच्या मुंजीमुळे आम्हाला ही सगळी मज्जा करता आली. मला मंदार, सलील , महेश, ओंकार, प्रसाद, निषाद सारखे नवे मित्र मिळाले. सौमिल आणि प्रियल सारखी आस्ट्रेलियात जन्मूनही भारतीय संस्कृतीशी घट्ट नाळ असलेली पिल्ले सापडली. अर्थात प्राची आणि सलीलचे त्यासाठी फार कौतुक वाटले. मानससारखा मंदार-पल्लावीचा महाराष्टाच्या मातीतला भरूच गुजरातमध्ये वाढणारा गुणी मुलगा सापडला. अमेय-सानिकाच्या व उषाताई-काकांच्या, स्वरा-अंतरासारख्या बहिणींच्या मायेच्या संस्कारात वाढणारा बटू वरदही खूपच भावला व आपली संस्कृती पुढील काही पिढ्यातरी अबाधित राहील ह्याची खातरी पटली.

आमचा तर पाय दापोलीतून निघत नव्हता. पण परत येण्याशिवाय पर्यायच नव्हता.

अतिशय सकारात्मक उर्जा घेऊन आम्ही गाडीत  शरीराने बसलो होतो. मन मात्र अजूनही दापोलीतल्या अंगणातल्या झोपाळ्यावरच झुलत बसलेले होते. ते बहुधा तिथेच राहणार असावे.

हे अविस्मरणीय क्षण शब्दबध्द करुन जतन करावेसे वाटले म्हणून हा लेख प्रपंच.

रवींद्र कामठे

९४२१२१८५२८

ravindrakamthe.blogspot.com