Friday, 12 July 2019

पानशेतचा प्रलय - १२ जुलै १९६१





पानशेतचा प्रलय - १२ जुलै १९६१

१२ जुलै १९६१, पानशेत धरण फुटून पुण्यात पुराने हाहा:कार उडाला होता. आज मला ह्या घटनेची आठवण येण्याचे कारण म्हणजे माझ्या नर्मदा आजीने (म्हणजे वडिलांची आईेने) ३६ वर्षांपूर्वी ह्या घटनेची इतंभूत माहिती सांगितली होती (तेंव्हा मी २० वर्षांचा होतो), त्याची आठवण ताजी झाली. माझ्या आजीच्या डोळ्यासमोर आमचे डेक्कन जिमखान्या जवळील पुलाच्या वाडीतील राहते घर ह्या प्रलयात पहिल्याच फटक्यात म्हणता म्हणता तिच्या डोळ्या समोर वाहून गेले होते व एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. माझा तर तेंव्हा जन्मही झालेला नव्हता. माझ्या वडिलांचे नुकतेच लग्न झाले होते व ते नगरला नोकरीला होते. त्यांना पुराची बातमी मिळाल्याबरोबर ते त्या दिवशी संध्याकाळी पुण्यात हजर झाले तेंव्हा आमच्या घराचा फक्त मातीचा ढिगारा राहिला होता. काडी काडी करून काबाड कष्ट करून जमवलेला संसार क्षणार्धात डोळ्या समोरून वाहून गेला होता आणि ते काहीही करू शकले नाहीत. पुराच्या दुसऱ्या दिवशी सर्वजण हे मातीचे ढिगारे उपसून काही सामान मिळत आहे का ते पाहत होते, तेंव्हा पुन्हा एकदा पाणी आले म्हणून अफवा पसरली आणि सगळे जण हातातले सामान तिथेच टाकून जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळत सुटले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या चोरांनी हेच गोळा केलेले सामान पळवून नेले व त्याच बरोबर ह्या लोकाची उरली सुरली आशाही चोरून नेली. आजी सांगत होती की; इतका भीषण प्रलय होता हा की विचारू नकोस. त्या प्रसंगाची आठवण जरी आली तरी मन विषण्ण होते. त्यांना सगळ्यांना मधुमालती गुणे (आताचे cross word) हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर ठेवले होते. सगळ्या बाळंतीणी आणि वाडीतील काही मंडळी ह्या मजल्यावर सुरक्षित होती. वरून हा प्रलय इतका भयानक दिसत होता की छातीत धडकीच भरत होती. डोळ्या समोरून कित्येक माणसाची, प्राण्याची मढी वाहून जात होती. काही जिवंत लोकं जीवाच्या आकांताने आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. लष्कराचे जवान त्यांचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. लकडीपूल उध्वस्त झालेला होता. शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, टिळक रोड, फर्गुसन रोड, भांबुर्डे सगळे सगळे पाण्याखाली होते. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसलेले होते. उध्वस्त घरांचे सांगाडे पाहून लोकं गलीतगात्र झालेले होते. जीवाच्या आकांताने आक्रोश करत होते. कोणी आपल्या घराच्या ढिगाऱ्यावर बसून टाहो फोडत होते. काही म्हणजे काही शिल्लक राहिले नव्हते. दु:खात सुख म्हणजे आमच्या वाडीत फारशी मनुष्यहानी झालेली नव्हती. अगदी मन हेलावून टाकणारा हा प्रसंग, गोधडी शिवतांना आजी मला त्यावेळेस सांगत होती. हा प्रसंग ऐकतांना माझ्या अंगावर तर काटाच आल होता, पण आजीच्याही अंगावर काटा उभा राहिला होता. तिचे डोळे पाणावले होते. आमच्या पुलाच्या वाडीतील जमीनदोस्त झालेलं हे घर नंतर माझ्या आजीने व वडिलांनी, काकांनी पुन्हा बांधले, तोवर ते सगळे रास्तापेठत एका अंधाऱ्या खोलीत रहात होते. विशेष म्हणजे एवढे सगळे रामायण-महाभारत घडूनही ही मंडळी पुन्हा एकदा आयुष्य उभारणीसाठी तयार होती. समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून त्यांनी पुन्हा एकदा जिद्दीने नव्याने आपले आयुष्य जगण्यास सुरवात केली होती. आज ह्या गोष्टीला ५८ वर्षे पूर्ण झालीत, परंतु ह्या प्रलयाचा फटका बसलेल्या आपाद्ग्रस्तांसाठी कधीही न भरून येणारा असा हा घाव आहे हे मात्र नक्की.
माझी आजी, वडील, काका, काकू ह्या जगात नाहीत, पण त्यांच्या सुखद आणि दु:खद आठवणी मात्र नक्कीच जागरूक आहेत. माझ्या आईच्या स्मृतीत (आज रोजी तिचे वय ७९ आहे) ह्या सगळ्या कठीण प्रसंगांची आठवण काल परवा इतकी ताजी आहे हे विशेष.
आज शुक्रवार, १२ जुलै २०१९-आषाढी एकादशी आहे आणि पांडुरंगाच्या कृपेने सर्व काही आलबेल आहे. आज ह्या जागेवर माझ्या काकांनी चार मजली इमारत उभी केली आहे व त्यात माझी बहिण व चुलत भावंडे रहात आहेत.

Sunday, 7 July 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – तांडव मृत्यूचे


अनुभवाच्या शिदोरीतून तांडव मृत्यूचे
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
अंगावर काटा आणणारा तो काळा कुट्ट दिवस असेल माझ्या आयुष्यातला ! १९९०च्या मे मधील मन विषण्ण करणारा तो दिवस !  माणूस नियतीपुढे किती शुद्र आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव होते आणि हतबल व्हायला होते.

तो गुरवार होता.  दुपारची १ ची वेळ होती.  कामाला सुट्टी असल्यामुळे मी नुकताच माझी आयुर्विम्याची कामे उरकून घरी पोचलो होतो.  थोडे लिंबू सरबत घेवून पंख्याखाली जरा शांतपणे बसलो होतो आणि बघता बघता माझा डोळा लागला होता.  इतक्यात दिवाणखान्यातला दूरध्वनी खणखणू लागला.  समोरून अतिशय घाबरलेल्या आणि रडकुंडीला आलेल्या अवस्थेत माझा आत्येभाऊ बोलत होता.  त्याने तो जो काही निरोप मला फोनवरून दिला तो ऐकून त्या क्षणी मी स्तब्धच झालो होतो.  इतक्यात बायको आतल्या खोलीतून आली आणि कोणाचा फोन आहे हे विचारल्यावर मी खाडकन भानावर आलो.  माझ्या दोन नंबरच्या आत्येबहिणीचा वडकी गावाजवळ एसटीच्या अपघातात मृत्यू झालाय, तिच्या नवऱ्याला आणि दोन लहान मुलांनाही बहुतेक खूप लागले आहे असे त्याने मला सांगून, तू जसा असशील तसा ताबडतोब निघून वडकीला ये म्हणाला.  एकतर तो निरोप ऐकून माझाच धीर खचलेला होता हो. ह्या बातमीने माझी छाती धडधडत होती.  काय करावं ह्या अशा वेळेला तेच सुचत नव्हतं.  कसं बसं स्वत:ला सावरले आणि बायकोला अगदी थोडक्यात ही वाईट बातमी सांगितली. 

दुसऱ्या क्षणाला डेक्कनला घरी फोन केला.  काकूने फोन घेतला.  तिला विचारले तर अण्णा कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेलेत आणि त्यांना यायला उशीर होणार आहे.  माझे वडील तर भल्या पहाटेच त्यांच्या मित्राबरोबर नाशिकला लग्नाला गेले होते व त्यांनाही यायला संध्याकाळ होणार होती.  काकूला ही वाईट बातमी देवू का नको असे झाले होते. तिला हा धक्का सहन होईल का नाही ! असे एक क्षण मला वाटून गेले, पण निरोप देण्याव्यतिरिक्त माझ्यासमोर दुसरा काही पर्यायही नव्हता.  घरात मोठे माणूस कोणीच नव्हते.  त्यामुळे ह्या अकल्पित प्रसंगामुळे आलेल्या जबाबदारीची जाणीव होऊन निरोप देवून पुढील कामास लागलो.  सारासार विचार करून बायकोला डायरीत लिहून ठेवलेल्या काही नातेवाईकांना फोन करून ही बातमी देण्याची जबाबदारी टाकली.  मोटरसायकल काढून तडक दिवेघाटाच्या खाली असलेल्या वडकी गावा कडे धाव घेतली.

अपघातस्थळी पोचल्यावर जे काही दृश्य पहिले ते मात्र फारच भीषण भयानक होते हो.  अक्षरश: मृत्यूने तांडव घातलेले होते, असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही. दिवे घाट संपल्यावर वडकी नाक्याच्या उतारावर एसटीच्या चालकाचा ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे गाडीवरील ताबा सुटला व त्याने ती एसटी सरळ तिथल्या बसथांब्यावर घालून मोठा अपघात टाळायचा प्रयत्न केला होता.  पण त्याच्या ह्या प्रयत्नात ह्या बस थांब्यात माझ्या आत्येबहिणीचा आणि अजून तीन जणांचा जागीच बळी घेतला होता.  बिचारी ती, तिचा नवरा आणि दोन पोरं नुकत्यात मांढरदेवीचे दर्शन घेवून आले होते व मांजरीला घरी जायला बसची वाट पाहत ह्या बस थांब्यावर उभे होते.  तिला कुठे माहिती होते की तिचा आज तिचा काळ ह्या थांब्यावर तिची वाट पाहतो आहे ते ! 

प्रत्यक्ष अपघात पाहिलेल्या एक दोन जणांनी अक्षरश: थरथर कापत मला सांगितले की, ही बाई फारच जिगरबाज होती हो.  बसथांब्यावर उभ्या असलेल्या कोणाला काही समजायच्या आतच एसटी ह्या थांब्यात घुसली होती.  बहूतेक तिने भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेत येणारी ही एसटी पाहिली असावी व तिला आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी.  थांब्याचा पहिलाच खांब ह्या एसटीने तोडला. त्याचवेळेस एका क्षणात ह्या बाईने जीवाच्या आकांताने तिच्या डाव्याबाजूला उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याला आणि दोन्ही पोरांना हाताने बाजूला ढकलले होते. म्हणूनच ते वाचले. पण तो खांब मात्र तिच्या पोटात घुसला आणि बिचारी जागेवरच गतप्राण झाली.  हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले हो.  तिच्या बरोबर अजून तीन लोकांचा जीव घेवून ती एसटी ह्या बस थांब्यातच अडकून पडली होती व रस्त्यावर पडलेल्या रक्तामांसाच्या सड्यामुळे मृत्यूने घातलेल्या तांडवाची मला स्पष्ट जाणीव झाली.  मृत आणि जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  पोलीस घटनास्थळी येवून पंचनामा करत होते
  
मी मागचा पुढचा फारसा विचार न करता तडक तसाच सुसून रुग्णालय गाठले.  आयुष्यात पहिल्यांदाच मी ससूनची पायरी चढत होतो. तिथल्या धीरगंभीर वातावरणाने माझ्या पोटात भीतीने गोळा आला होता.   बाहेरच धायमोकलून रडत बसलेला माझा आत्येभाऊ दिसला.  बिचारा एकटाच होता.  मला पाहिल्याबरोबर माझ्या गळ्यात पडून खदखदून रडत होता बिचारा आणि मी मात्र स्थितप्रज्ञासारखा खांद्यावर पडणाऱ्या त्याच्या आसवांनी भिजून जात मनोमन थिजून उभा होतो.  कुठून एवढं मानिसक बळ मला आलं होतं हेच काही समजत नव्हतं !

आत्येभाऊ थोड्यावेळाने शांत झाल्यावर त्याच्याकडे मी बहिणीची चौकशी केली तेंव्हा त्याने तिचे आणि अजून तीन जणांचे पार्थिव तिकडे डेडहाउसमधे पोस्टमार्टेम साठी नेले आहे सांगितले.  आमच्या मेव्हण्याची आणि तिच्या दोन पोरांची चौकशी केल्यावर तो म्हणाला की ते काय तिकडे आत वार्डात आहेत.  एवढ्या मोठ्या अपघातात त्या तिघांना फक्त खरचटले होते.  आमच्या बहिणीने स्वत:चा जीव देवून ह्या तिघांचे प्राण वाचवलेत होते ह्याची प्रचीती मला आली आणि त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलेली अपघाताची घटना एकदम माझ्या नजरेसमोर तरळून गेली.  केवढी समय सूचकता दाखवली होती तिने त्या समयी, हे प्रत्यक्षात ह्या तिघांना जिवंत पाहिल्यावर मला जाणवले !
 
संध्याकाळचे ७ वाजून गेले होते.  दुपारी ४ वाजल्यापासून डेडहाउस मध्ये पोस्टमार्टेम नेलेले आमच्या बहिणीचे शव अजूनही आमच्या ताब्यात देण्यात आले नव्हते. त्यामुळे मी जरा चौकशी करून येतो म्हणून चक्क ह्या डेडहाउस मध्ये गेलो होतो.  सगळी कडे स्पिरीटचा वास येत होता.  नाकाला रुमाल लावून मी तसाच पुढे जात होतो.  एका वार्डच्या आवारातून दुसऱ्या एका मोठ्या खोलीत प्रवेश करत असतांना माझ्या हातून चुकून बाजूच्या एका खोलीचा दरवाजा ढकलला गेला आणि काय सांगू मला आतले दृश्य पाहून भोवळच आली. 

अहो एका मोठ्या टेबलावर माझ्या ह्या आत्येबहिणीचे शव तिच्या पोटात घुसलेल्या बांबूसहित तसेच पडून होते आणि आजूबाजूला त्याच अपघातात मृत झालेले अजून तीनही शव तसेच पोस्टमार्टेमच्या प्रतीक्षेत होते.  त्याचे कारण दुपार पासून ह्या विभागातल्या डॉक्टरांना वेळेच मिळाला नव्हता इतक्या अपघाताच्या केसेस आज आल्या होत्या.  धीर करून मी तसाच पुढे त्या खोलीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कार्यालात गेलो.  नशिबाने मला तिथे दोन डॉक्टर आणि वार्ड कर्मचारी भेटले त्यांना विनंती करून माझ्या बहिणेचे शव जेवढे शक्य होईल तेवढे लवकर आमच्या ताब्यात देण्याची तजवीज केली, जी त्यांनी मान्य करून तासाभरात ते पार्थिव आमच्या ताब्यात दिले.  तोवर माझे वडील, काका आणि बाकी सगळे नातेवाईक ससूनमध्ये जमलेले होते व मला आता थोडा धीर आला होता.  त्याच रात्री आम्हीं मांजरीला जावून तिच्या पार्थिवाला अग्नी देवून काळाचा हा घाला कसा बसा सहन करून जड अत:कारणाने परतलो होतो.

इतक्या वर्षांनी हा सगळा अनुभव लिहितांना माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला होता व काळजावर झालेले ते घाव ताजे करून गेला. 

वास्तविक पाहता हे असले अनुभव कधी कोणाच्या आयुष्यात येऊच नये असे वाटते.  परंतु एक मात्र नक्की की; जी नियती आपल्यावर हे असे घाव घालत असते, तीच नियती आपल्याला ह्या अशा प्रसंगातून मार्ग काढायला आणि सावरायलाही शिकवत असते. हेच काय ते निसर्गाचे चक्र असावे ! 

अमावस्ये शिवाय पौर्णिमेचे महत्व कसे कळणार !
   
रविंद्र कामठे

Monday, 1 July 2019

दैनिक पुण्य नगरी-साहित्य सेवेच्या वाटेवरील वारकरी- साहित्यकट्टा- ओळख सारस्वतांची-मधील माझा साहित्य प्रवास

दैनिक पुण्य नगरी वुत्तपत्रात साहित्यकट्टा ह्या सदरामधे माझ्या आजवरच्या साहित्य प्रवासाबद्दल माहीती आली आहे हे वाचून आणि पाहून डोळे भरुन आले. माझ्या आजवरच्या ह्या प्रवासात मला मोलाची साथ देणारे चपराक प्रकाशनचे श्री घनश्याम पाटील सरांचा मी ऋणी आहे व पुण्य नगरीच्या स्वप्नील कुलकर्णी ह्यांचा आभारी आहे. माझ्यासाठी हा एक फार मोठा पुरस्कारच आहे व मला आज त्याचा खूप अभिमान वाटतो आहे. जबाबदारीची जाणिवही आहे. रसिक वाचाकांचे शुभ आशीर्वाद लाभोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Wednesday, 26 June 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – जामीन मैत्रीचा


अनुभवाच्या शिदोरीतून जामीन मैत्रीचा
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

माझ्या मित्राच्या मदतीने सुरु करून बारगळलेला धंदा एकदाचा बंद करून मी मोकळा झालो. दुष्काळात तेरावा नकोअशी अवस्था झाली होती माझी. माझा हा मित्र आजकाल अधून मधून कंपनीत दांड्या मारत होता, म्हणून एक दिवस मी अगदी सहज त्याच्या सिंहगड रोडवरील आनंद नगर मधील त्याच्या राहत्या बंगल्यावर त्याला भेटायला गेलो आणि त्याची अवस्था पाहून मला गलबलूनच आले हो !
नियतीचा खेळ किती वाईट असतो ह्याची प्रचीती मी ह्याची देही ह्याची डोळा घेत होतो.  त्याची काही चुकी नसतांना त्याच्यावर झालेल्या आघाताने तो तर पूर्णपणे कोसळून गेला होता. काहीतरी मोठी अडचण असणार त्याशिवाय हा पठ्ठ्या असं वेड्यासारखं वागणार नाही आणि आमचा चांगला चालेलला धंदा बंद पडू देणार नाही ह्याची मला खात्री होती; म्हणूनच मी एवढे सगळे रामायण घडूनही त्याला भेटून त्याच्याकडून खरी परिस्थिती जाणून घ्यायचे ठरवले होते. 
एकंदरीत परिस्थिती फारच गंभीर होती. त्यावेळेस काहीही न बोलता मित्राला दुसऱ्यादिवशी माझ्या घरी संध्याकाळी जेवायला बोलवून त्याच्या घरातून निमुटपणे निघून आलो.
दुसऱ्यादिवशी संध्याकाळी ह्या मित्राला जेवायला बोलावले होते, पण त्याला बोलतेही करायचे होते म्हणून रमची व्यवस्था करून ठेवली होती.  तो ठरल्याप्रमाणे आला काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, एक दोन पेग झाल्यावर मी मूळ मुद्याला हात घातला आणि काय सांगू, विस्तवात हात घातल्यासारखा माझा हात आणि मनही पोळून निघाले हो !  त्याने जे काही सांगितले ते ऐकतांना माझ्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास होत होता.
त्याच्या बंगल्या समोरील बंगल्यातल्या मुलीवर त्याचे प्रेम होते.  त्यांनी ९ वर्षापूर्वीच प्रेमविवाह केला होता व त्यांना ८ वर्षाचा मुलगाही होता.  ह्याने आपले घरदार गहाण ठेवून आणि स्वत:ची टूरिष्ट कंपनी विकून बायकोला नोकरीसाठी अमेरिकेला पाठवले होते. तिकडेच स्थाईक व्हायचे ठरले होते म्हणे त्यांचे ! ती आणि मुलगा दोन महिन्यांपूर्वीच अमेरिकाला गेले होते.  अजून एक दोन महिन्यांनी तिने व्हिसासाठीचे लागणारे पत्र दिल्यावर हा पण अमेरीकला जाण्याचे स्वप्न पहात होता. 
पण, त्याच्या बायकोने तिकडून ह्याच्या व्हिसासाठी पत्र पाठवायच्या ऐवजी ह्याला चक्क घाटस्पोटाची नोटीस पाठवली होती.  का तर म्हणे ज्या मित्राने तिला अमेरिकेत नोकरी मिळवून दिली आहे त्याच्यावर तिचे प्रेम बसले होते व तो तिला त्यांच्या मुलासहित स्वीकारायला तयार होता, हे अजून वरती तोंड करून तिने ह्याला अगदी निर्लज्जपणे सांगितले होते. जगात अशीही माणसे असतात ह्यावर माझा तरी विश्वासच बसत नव्हता. 
एखाद्याच्या प्रारब्धात इतकेही वाईट लिहिलेले असेल ह्यावर माझा तरी विश्वासच बसत नव्हता.
तिने पाठ्वेलेल्या घाटस्पोटाच्या नोटीसीने हा स्वत:तर गर्भगळीत होऊन गेला होता आणि त्याचे आईवडील तर आजारीच पडले होते.  तिने त्यांच्या एकत्रित असलेली सर्व बँकेच्या खात्यांवर स्थगिती आणली होती. थोडक्यात काय तर माझ्या ह्या मित्राला आणि त्याच्या कुटुबियांना तिने चक्क भिकेला लावले होते.  किती आपमतलबी आणि निष्ठुर असतात ना लोकं.  आपलेच दात आणि आपलेच ओठ’, सांगयचे तरी कोणाला !
त्याच्या ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची त्याने एक चांगला वकील शोधला होता.  परंतु त्यांची फी ह्याला परवडणारी नव्हती त्यामुळे त्याने सारस्वत बँकेतून कर्ज घेण्याचे ठरवले होते व मला जामीन राहण्याची विनंती केली होती.  मी आणि माझ्या अजून एका मित्राने त्याला जामीन दिला आणि त्याला कर्ज मिळवून दिले.
पुढे त्याची कोर्टात केस सुरु झाली.  जिच्यासाठी घरदार गहाण ठेवले होते ह्या वेड्याने, तिने त्याला चक्क भावनिकदृष्ट्याच फसवले नव्हते तर आर्थिकदृष्ट्याही नागवले होते. असो.
त्याला जेवढी शक्य असेल तेवढी मदत करून त्याला त्याच्या नशिबाच्या हवाली करून आम्हीं आमच्या मैत्रीला जागलो होतो.  एकतर आमचेही कंबरडे ह्या जागतिक आर्थिकमंदी मुळे आधीच मोडलेले होते.
असेच काही महिने गेले.  आमच्या कंपनीची आर्थिक परिस्थितीसुद्धा डबघाईला आलेली होती त्यामुळे मी वैतागून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.  मी आणि माझा दुसरा एक मित्र (ज्याने ह्या मित्राला जामीन दिला होता) दोघांनी एकाच वेळेस नोकरीला रामराम केला.  मी सोलरच्या एका कंपनीत नोकरीला लागलो आणि मित्र दुसऱ्या आयटी कंपनीत गेला.
वर्षभर आमचा फारसा संपर्क नव्हता.  एक दिवस अचानक मला सारस्वत बँकेची नोटीस आली. माझ्या मित्राने कर्जाचे हप्ते थकवले आहेत ते तुम्हीं ताबडतोब येवून भरावे अशी ती नोटीस होती.  आता आली का पंचाईत.  मी आणि माझा दुसरा मित्र भेटलो आणि आमच्या ह्या मित्राचा शोध घ्यायला लागलो.  आधीची कंपनी त्याने सोडून बरेच दिवस झाले होते व त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहिती नव्हता.  त्याला फोन करून संपर्क करायचा प्रयत्न केला तर तो आमचा फोन घेत नव्हता.  शेवटी त्याने एकदा आम्हांला एकदा सार्वजनिक टेलिफोन बूथवरून केल्याचे मला आठवले.  त्या नंबरवरून आम्ही त्याचा पत्ता शोधून काढला.  त्याच्या घरी गेलो. हा आजारीच होता आणि आई वडीलही आजारीच होते. फार काही न बोलता त्याला बँकेने पाठवलेली नोटीस दाखवली आणि त्याला बँकेत जावून पैसे भरायची विनंती केली. हो म्हणाला बिचारा ! आम्हांला शंका होती ! पण आमची तरी कुठे हे हप्ते भरण्याची ताकद होती, म्हणून त्याच्या कडून तसे पत्र घेऊन ते बँकेला देवून अशीच वेळ मारून नेली होती, जी आम्हांला नंतर महागात पडली.
असेच दोन वर्ष गेली.  मी सोलरची नोकरी सोडून डोमच्या नोकरीत लागलो होतो. वर्षभरात ती पण सोडून हिंजेवाडीच्या आयटी कंपनीत नुकताच रुजू झालो होतो.  तिथे माझा हा दुसरा मित्र पण योगायोगाने रुजू झालेला होता.  सगळे कसे व्यवस्थित चालले होते.  रोज स्वत:च्या गाडीने धनकवडी ते हिंजेवाडी आणि परत आलिया भोगासी असावे सादरअसे माझे रटाळवाणे गुऱ्हाळ चालूच होते.
एक दिवस परत आम्हांला ह्या मित्राच्या कर्जाचे मुद्दल आणि व्याज धरून एक लाख रुपये भरण्याची सारस्वतची नोटीस आली आणि आमचे धाबेच दणाणले. गेली दोन वर्षे आमचा ह्या मित्राशी फारसा संपर्क नव्हता त्यामुळे काही कळायलाच मार्ग नव्हता. थोडीफार चौकशी केल्यावर कळले की आमच्या ह्या मित्राने दोन महिन्यांपूर्वीच आत्महत्या करून स्वत:ची ह्या समस्येतून सुटका करून घेतली होती.  पण आम्हीं मात्र पुरते अडकलो होतो.  त्याच्या घटस्पोटाच्या केसचे पुढे काय झाले हे शेवटपर्यंत कळलेच नाही.  पण आमची तर आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखीअवस्था झाली होती.
नोटीस घेवून मी आणि माझा मित्र सारस्वत बँकेच्या लवादासमोर हजर झालो.  त्यांना सर्व परिस्थिती सांगितली.  ज्या मित्राने हे कर्ज घेतले आहे त्याने आत्महत्या केली आहे ह्याची नोंद घ्यायला लावली.  त्याच्या घरच्या परिस्थितीचे आकलन करून दिले.  मित्राच्या अडचणीमध्ये त्याला मदत करण्यासाठी म्हणून आम्हीं ह्या कर्जाला जामीन राहिलो होतो व जामीनदाराच्या जबादारीने हे कर्ज फेडण्याची तयारी दाखवली होती.  फक्त आमची एकच विनंती होती की बँकने व्याज माफ करावे व फक्त मुद्दल वसूल करावे.  आमच्या मैत्रीच्या भावनेची कदर करून लवादाने आमची ही विनंती मान्य केली व मुद्दलाचे ५०हजार रुपये १५ दिवसांत भरण्याचा आदेश आमच्या हाती ठेवला.  दु:खात सुखअसे म्हणून मी माझ्या कौशल्याने आयसीआयसी बँकेचे ५० हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आणि ते सारस्वत बँकेत भरून हा विषय कायमचा संपवून टाकला. नतंर १२ महिने कर्जाचे निम्मे निम्मे हप्ते आम्हीं दोघे मित्र भरत होतो.
ह्या अनुभवातून एक नक्की शिकलो की वेळ कोणावरही सांगून येत नाही.  माणूस वाईट कधीच नसतो; परिस्थिती त्याला वाईट बनवत असते.


रविंद्र कामठे

Monday, 24 June 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – चुकलेला काळजाचा ठोका

अनुभवाच्या शिदोरीतून – चुकलेला काळजाचा ठोका
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
जन्म ते मृत्यू हे जे काही अंतर असते ते म्हणजे आपले आयुष्यआपल्या आयुष्याची दोरी ही परमेश्वराच्या हातात असते.  ह्या दोरीचे म्हणजेच आपल्या आयुष्याच्या लांबी रुंदीचे गणित हे आपल्या संचितावर अवलंबून असावे हे मला इतक्या वर्षांच्या अनुभवांती उमजले.
समजायला लागल्यापासून ते आजवर म्हणजे गेली ५६ वर्षांचे आयुष्य पार करून आमची गाडी त्याच्या उत्तरार्धाकडे कधी लागली हेच समजले नाही.  वयाच्या १५व्या वर्षापासूनच अर्धवेळ काम करून शिक्षण करू लागल्यामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनात मला स्वत:कडे लक्ष द्यायला असा फारसा वेळच शिल्लक रहायचा नाही. त्यात त्या वयात, माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांशी ओळखी होत गेल्या आणि त्यांच्या बरोबर उठबस करता करता माझ्याही नकळत काही अतिशय वाईट सवयी कधी लागल्या हे कळलेच नाही. शिक्षणाबरोबर माझे हे अर्थार्जनाचे उद्योग चालूच होते व माझ्या व्यक्तिमत्वास दिवसेंदिवस प्रगल्भ बनवत होते हे ही तितकेच खरं आहे. माणसाचा स्वभाव हा फार अनुकरणीय आहे.  त्यात तुम्हांला जर चांगल्या लोकांच्या संगती असतील तर ठीक.  नाहीतर वाईट संगतीस लागून आपली गाडी कधी वाममार्गाला लागते हेच कळत नाही. आपल्या सद्विवेक बुद्धीस थोडसा ताण दिला की आपोआप आपल्याला चांगल्या किंवा वाईटाची प्रचीती यायला लागते.
ह्या सगळ्याचा दोष आपण उगाचच आपल्या मित्रांना त्यांच्या संगतीला देवून स्वत:ची जबाबदारी झटकून मोकळे होण्याचा निष्फळ प्रयत्न करतो असे मला वाटते.  हा सगळा दोष फक्त आणि फक्त तुमच्या एकट्याचा असतो.  तुमची अक्कल तुम्हीं त्यावेळेस जर का गहाण ठेवली नाही तर तुमच्यावर ही वेळच येणारच नाही !  स्वत:च्या मनावर जेंव्हा आपला ताबा नसतो ना तेंव्हा हे असे एकमेकांवर दोषारोपण करून स्वत:च्या मनाची समजूत काढावी लागते. पण एक आहे की तुम्हीं काहीही करा, जे काही शरीर भोग असतील, ते मात्र तुमचे तुम्हांलाच सहन करावे लागतात !  उशिरा का होईना, आलेले शहाणपण काही कामाचे नसते.  तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाचेही काही कारण नसतांना हाल होतात हे मात्र नक्की.
हे एवढे रामायण सांगायचे कारण काय तर; वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे ४१ वर्षांपूर्वी १९७८ साली मी पहिल्यांदा सिगरेट प्यायला शिकलो.  हो, संभाजी बागेत मित्रांच्या संगतीत मला सिगरेट पिण्याची दीक्षा देण्यात आली. ही दीक्षा इतकी जबरदस्त होती की ह्या व्यसनातून मला माझी सुटका करून घायला चक्क ४० वर्षे म्हणजे २०१७ साल उजाडावे लागले.
मला सिगरेटचे व्यसन लागले होते त्यानंतर ओघाओघाने दारूचेही व्यसन लागले.  ही दोन्हीही व्यसने माझ्या आयुष्याला जवळ जवळ ४० वर्षे एखाद्या जळू सारखी चिकटून राहिली व ती माझ्या शरीराची कधीही न भरून येणारी हानी करूनच गळून पडली.  अक्षरश: घूस कशी जमीन पोखरते तशी ही व्यसने तुम्हांला आतून पोखरून टाकतात, पण हे आपल्याला खूप उशिरा उमजते.  तरुणाईत अंगात एक प्रकारचा जोश असतो आणि त्यात आपली प्रतिकारशक्ती कितीही नाही म्हटले तरी प्रज्वलित असते.  परंतु जसे जसे आपण, वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करू लागतो, तस तसे ह्या व्यसनांचे दुष्परिणाम दिसायला लागतात.  तेंव्हा मात्र बऱ्यापैकी उशीर झालेला असतो हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. तोच तर उद्देश आहे माझा हा अनुभव लिहिण्याचा, की “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”.  पण तसे होत नाही.
इतक्या वर्षांच्या व्यसनांचा, कामाच्या ताणाचा, अस्थिर मनाचा, विचलित भावनांचा, तारेवरील कसरतीचा, संघर्षाचा, एकत्रित परिणाम होऊन २०१७च्या २७ ऑक्टोंबरला मात्र माझ्या काळजाचा ठोका काही क्षणांसाठी चुकला होता.  काळजाचा ठोका चुकण्याचाच तेवढा अनुभव माझ्या गाठीशी नव्हता, म्हणून की काय नियतीने त्याचेही प्रयोजन करून अगदी व्यवस्थित नियोजनबध्दतेने जसे मला ह्या वेदनेच्या खाईत लोटले, तसेच अगदी अलगद वरही काढले होते.
हृदयविकार म्हणजे एक महाभयंकर संकट आहे.  भल्याभल्यांची एका क्षणात वाट लागून आयुष्य उध्वस्त होते. माझे मात्र नशीब बलवत्तर म्हणून दोन पुंगळ्यावर निभावले. २०१७ च्या मे महिन्यापासूनच मी धूम्रपान आणि मद्यपान सोडले होते. तसेही जरा उशिराच सुचलेले हे शहाणपण मला आयुष्याच्या एका वेगळ्याच टप्प्यावर घेऊन चालले होते. तब्ब्येतीची आजवर केलेली हेळसांड तसेच कामाच्या ताणामुळे व अविरत कष्टाने केलेली शरीराची झीज भरून काढायचे प्रयोजन करून ते अमलात आणणे एवढेच राहिले होते. परंतु ही तर वादळापूर्वीची शांतता होती असे आत्ता जाणवते.
गेली ३५-४० वर्षे नित्यनियमाने केलेल्या धूम्रपान आणि मद्यपान सारख्या व्यसनांनी माझ्या शरीरावर फार खोलवर दुष्परिणाम केले होते हे मलाच काय पण, डॉक्टरांना सुद्धा माझ्या काळजाचा ठोका एकदा चुकल्यावरच जाणवले.  मी अगदी अभिमानाने सांगायचो की “मी रोज नियमितपणे व्यायाम वगैरे करतो, त्यामुळे माझ्यावर ह्या व्यसनांचा काही एक परिणाम होणार नाही” !  पण एक सांगतो की, ही म्हणजे मी स्वत:चीच बेमालूमपणे फसवणूक करून घेत होतो हे नक्की. 
माझे सुदैव असे की ह्या अनपेक्षितपणे आलेल्या प्रसंगातून केवळ माझ्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून मी वाचलो.  अन्यथा दिवाणखान्यातील फोटोत जावून त्याला घातलेल्या चंदनाच्या हाराचा (न येणारा) सुवास घेत गपचूप बसावे लागले असते !
मी जेंव्हा रुग्णालयात दाखल झालो होतो व ऑपरेशन टेबलवर होतो, तेंव्हा मी उपभोगलेल्या ५४ वर्षांचा तो सर्व काळ अलगदपणे डोळ्यासमोरून तरळून गेला. मन थोडेसे विषण्ण झाले होते. केलेल्या चुकांचा इतक्या उशिरा का होईना मागोवा घ्यायचा प्रयत्न करत होतो व पुन्हा एकदा ग्लानीत जात होतो.  डॉक्टर माझे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि मी मात्र मला नव्याने आयुष्य जगण्याची अजून एक संधी दे म्हणून गणपतीबाप्पाची आराधना करत होतो.
मला अजूनही आठवते आहे की, माझ्या हृदयातील १०० प्रतिशत असलेला अडथळा काही केल्या निघत नव्हता.  जवळ जवळ ४०-४५ मिनिटे डॉक्टर जिकीरीने प्रयत्न करत होते, पण काही केल्या त्यांना यश येत नव्हते.  मी त्यांचे हे सगळे प्रयत्न उघड्या डोळ्यांनी पहात होतो. बाप्पाला त्यांना यश दे म्हणून विनवत होतो.  कारण डॉक्टरांना जर यश आले तरच माझे प्राण वाचणार होते !  शेवटी बाप्पाने माझी विनंती ऐकली. पहिला अडथळा पार करून त्यात एक पुंगळी सरकवण्यात डॉक्टरांना यश आले.  दुसरा अडथळा सुद्धा ९५ प्रतिशत होता.  पण तो त्या मानाने जरा लवकरच सुटला.  दोन्ही पुंगळ्या आपापल्या जागी व्यवस्थित बसवून डॉक्टरांनी माझे अभिनंदन केले.  तुम्हांला पुन्हा एकदा हे जीवन जगण्याची संधी मिळाली आहे, तिचे सार्थक करा असे सांगितले.
उंबरठ्यावर मृत्यूच्या, जीवनाचे महत्व कळतं... असे मी मनातल्या मनात म्हणलो व डॉक्टरांचे आणि बाप्पाचे मनोमन आभार मानून पडून राहिलो.  काही क्षणांसाठी चुकलेला काळजाचा ठोका मात्र माझ्या डोळ्यात अंजनच घालून गेला. नशिबाने मिळालेली ही संधी आता मात्र वाया घालवायची नाही ह्या उद्देशाने मी पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरु करायचे ठरवले आणि त्यानुसार उपचार घेऊ लागलो.
आजवर आयुष्यात खूप केली मस्ती,
आतामात्र मला घ्यावी लागली बस्ती... अशीच काहीशी अवस्था झाली होती माझी.
घरातच मोठ्या हौसेने मी बार केला होता. रम, व्हिस्की, होडका, रेडवाईन, कॉफी लिकर, टकीला जीनच्या खंब्यांनी कायम भरलेला असायचा.  आता मात्र त्याच बार मधे दशमूलारिष्ट काढा, महासुदर्शन काढा, अभयारिष्ट, महारास्नादी काढा, भूनिंबादि काढा, अशा आयुर्वेदिक औषधांनी तो व्यापून टाकला आहे. हेच काय ते माझे संचित असावे का ! माझ्या ह्या अनुभवातून तुम्हांला जो काही बोध घ्यायचा असेल तो घ्यावा ही नम्र विनंती, म्हणून हा लेख प्रपंच !

रविंद्र कामठे

Wednesday, 29 May 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – आणि...चतुर्भुज झालो...

अनुभवाच्या शिदोरीतून – आणि...चतुर्भुज झालो...
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

१९८५ ला मी आयएलएसच्या लॉं कॉलेजमधे दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला.  आमचा ८ जणांचा एक समूह होता जो नेहमी लॉं कॉलेजच्या सायकलस्टॅण्डवरच न चुकता गप्पा ठोकत बसलेला असायचा. आमच्यात एक अतिशय हुशार, हजरजबाबी, गोरीगोमटी, खुशालचेंडू, बॉबकटमधे शोभून दिसणारी, बिनधास्त प्रवृतीची, एक मैत्रीणही अधून मधून येत असायची. ती पण नोकरी करून शिकत होती. कॉलेजला आली की आमच्यात येवून गप्पा मारायची. 
एका वर्षात तिचे आणि माझे सुत जमायला लागले होते.  एकमेकांच्या घरीही येणे जाणे झाले होते.  ती मला आवडायला लागली होती.  हळू हळू माझ्या मनात तिच्या बद्दल तिला आपली सहचारिणी करण्याचे विचार यायला लागले होते. परंतु तिला हे कसे सांगायचे ! ह्या विचाराने ओठांवर आलेले शब्द परत घशात जायचे.  ती जर रागावली आणि नाही म्हणाली तर उगाचच एक चांगली मैत्रीण गमावल्याचे दु:ख नशिबी यायचे, असे वाटायचे. त्यातून आमच्या जातीही वेगळ्या. कसे जमायचे ! असा विचार कित्येकवेळेला मनात यायचा आणि पुन्हा मूग गिळून गप्प बसायचो.  असचं एक वर्ष कसं गेलं तेच कळलं नाही.  
१९८६ साल उजाडलं.  आमची मैत्री मात्र दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती.  मी आता लॉं च्या तिसऱ्या वर्षात गेलो होतो आणि ती दुसऱ्या वर्षात. मध्यंतरी मी शेतकी कॉलेजची नोकरी सोडून दुसऱ्या एका खाजगी कंपनीमधे चांगल्या पगारावर रुजू झालो होतो.  एकदिवस मनाचा हिय्या करून, खूप सारी हिंमत गोळा करून तिला आपल्या मनातले सांगयचे ठरवून टाकले.  फार फार तर काय होईल; ती नाही म्हणेल, एवढेच ना !  
खूप विचार करून फेब्रुवारी महिन्यात एक दिवशी दुपारी कॉलेजच्या कट्ट्यावर बसलो असतांना, नमनाला घडाभर तेलही न घालवता, “मला तुझ्याशी लग्न करायचे आहे” असे एका दमात तिला सांगून मोकळा झालो !
पुढची पंधरा मिनिटे एकदम निरव शांततेत गेली.  मी आपला हातावर हात चोळत इकडे तिकडे पहात तिच्याकडून काय उत्तर येते आहे ह्याची वाट बघत चुळबुळ करत बसलो होतो. पंधरा मिनिटांनी तिने तिचे मौनव्रत सोडले आणि अतिशय शांतपणे मला सांगितले की;
“मला नाही जमणार तुझ्याशी लग्न करायला”.
“मी लग्नच करायचे नाही असे ठरवले आहे”.
“माझ्या काही वैयक्तिक अडचणी आहेत”
असे सांगून कॉलेजमधून निघूनही गेली.
मी एकदम हिरमुसलो होतो.  त्या दिवशी मी मात्र खूप उदास झालो होतो. तिच्या काय वैयक्तिक अडचणी आणि जबाबदाऱ्या असतील; ज्यामुळे तिने लग्नाला नकार दिला ह्यावर विचार करत बसलो.  विचारांती ठरवले की ह्या विषयावर तिच्याशी पुन्हा एकदा सविस्तरपणे बोलायचे.  पण आमच्या परीक्षा जवळ आल्यामुळे आता अभ्यासावर लक्ष देणेही गरजेचे होते.  माझे लॉचे शेवटचे वर्ष होते.  ही पदवी मिळाली की चांगली नोकरी मिळवायची होती, त्या उद्देशाने मी सगळे विसरून अगदी जोमाने अभ्यासाला लागलो. 
शेवटचा पेपर दिला व ती आणि मी कॉलेजच्या कट्ट्यावर परत एकदा भेटलो.  ह्या वेळेस तिच्या नकाराचा होकारात बदल करण्याचे मनोमन पक्केही केले होते.  अतिशय भावनिक तणाव होता आमच्या दोघांवर !  तसे आमचे काही लग्नाचे वयही नव्हते. माझे वय २४ आणि ती २३. 
मी तिला सरळच विचारले की;
“तुझी वैयक्तिक अडचण काय आहे” ! 
“तू माझ्याबरोबर लग्नाला का तयार नाहीस” !
काय कारण आहे, “तू मला नाही म्हणायचे” ! 
मी तिला अगदी निकराने विचारले की, जे काही असेल ते अगदी स्पष्टपणे बोल.  त्यावर तिने उत्तर दिले की; “मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे माझ्यावर माझ्या आई बाबांची जबाबदारी आहे”. त्यामुळे मी लग्नच न करण्याचे ठरवले आहे.
मला तुझ्याशीच काय पण कोणाशीच लग्न करायचे नाही.  तुझ्या भावनांचा मला आदर आहे, पण पण.......
तिचे वाक्य अर्धवट तोडत मी तिला सांगितले की, एवढेच जर कारण असेल तर;
“तुझ्या आई-बाबांची संपूर्ण जबाबदारी तुझ्याबरोबर मी सुद्धा घ्यायला तयार आहे”. “आपण दोघे मिळून त्यांचा सांभाळ करू”.
माझ्या ह्या एका वाक्याने तिला काय वाटले कोणास ठावूक.  तिने माझ्याशी लग्न करायला होकार दिला. पण अजून एक मेख होती ती म्हणजे की, दोघांच्याही घरच्यांचा आमच्या आंतरजातीय विवाहास असणारा तीव्र विरोध !
माझ्या घरच्यांचा विरोध तर इतका कठीण होता की जेंव्हा जेंव्हा माझ्या लग्नाचा विषय निघायचा तेंव्हा तेंव्हा भांडणे होऊन अगदी हमरातुमरी व्हायची. त्या सगळ्यांना मी जर असा आंतरजातीय विवाहाचा पायंडा पाडला तर आमच्या घरातील मुलींची लग्नेच होणार नाहीत, त्यांचे नाक कापले जाईल, समाजातली त्यांची इभ्रत कमी होईल, वगैरे वगैरे. सामंजस्याने ह्यातून काही मार्ग निघेल असे मला तरी वाटत नव्हते.  पण काळ हेच काय ते त्यावर औषध होते हे मी जाणून होतो.  
दोघांच्या घरच्यांच्या संमतीने जेंव्हा केव्हां लग्न होईल तेंव्हाच लग्न करून आपला संसार सुरु करायचा असे आम्ही एकमताने ठरवले होते. पुला खालून खूप पाणी वाहून गेले होते. आमचा संघर्ष तर चालूच होता. शेवटपर्यंत तो करावाच लागणार होता ह्याची मनोमन जाणीवच नाही तर खात्रीच होती.
परंतु नियतीच्या मनात जे होते तेच झाले शेवटी. तिच्या घरची तणावाची परिस्तिथी जरा निवळली होती.  तिच्या काही नातेवाईकांशी मी स्वत: चर्चा करून त्यावर तोडगा काढला होता व आमच्या लग्नाला त्यांची संमती मिळवली होती. पण माझ्या घरचे मात्र अडून बसले होते. समजून सांगून काहीच उपयोग होत नव्हता.  माझा तर संयम सुटतच चालला होता.
आम्ही दोघे मात्र आमच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे, ह्या अशा परिस्थितीतही, आम्ही आमच्या संसाराची जुळवाजुळव करण्याची योजना आखली होती.  तिच्या घराच्या जवळच माझ्या एका मित्राचे घर होते ते भाड्याने घेऊन तिथे, अगदी चमचा वाटी पासून लागणाऱ्या सगळ्या गोष्टी विकत आणून आम्ही संसार थाटायला सुरवात केली होती.  तिच्या घरच्यांशी बोलून लग्नाची तारीखही पक्की केली होती. तिच्या साठी लग्नाचा शालू (रु. २५०/- त्या काळचा) वगैरेची खरेदी झाली होती.  माझे पण नवीन कपडे घेवून झाले होते. जस जशी लग्नाची तारीख जवळ येत होती तस तसा माझ्यावरील ताण वाढत होता.  आता माझी खरी कसोटी लागणार होती.  माझ्या घरी हे सगळे कसे सांगायचे, हा एक मोठा प्रश्न माझ्या समोर आ वासून उभा होता. शेवटी कधीही न संपणाऱ्या ह्या वादावर मीच काय तो एकदाचा पडदा टाकायचे ठरवले. लग्नाच्या आदल्या दिवशी (२२ मे ला) अंगातले सगळे बळ एकवटून, होते नव्हते तेवढे धारिष्ट्य गोळा करून माझ्या घरच्यांना सांगून टाकले की, “माझे उद्या लग्न आहे”, “तुम्हांला यायचे असेल तर या नाही तर राहिले”. असे सांगून बरोबर आणलेले हार खुंटीला अडकवले आणि झोपून गेलो.  सकाळी लवकर उठून आवरून कोणाशी काहीही न बोलता घरातून गपचूप निघून आलो.  
नंतर काय झाले माहित नाही, पण नियतीने सगळे कसे व्यवस्थित जुळवून आणलेच ! माझ्या घरच्यांचे मतपरिवर्तन होऊन सगळेजण (धाकटा भाऊ सोडून) २३ मे १९८७ ला सकाळी लग्नाला हजर झाले. बायकोच्याच राहत्या घरी अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आमचे लग्न धार्मिक पद्धतीने लागले.  लग्न लागेपर्यंत माझ्या मनावर खूप दडपण होते. परंतु नशिबाची साथ होती म्हणून सगळे कसे विनासायास पार पडले.  अतिशय थरारक, पण अविस्मरणीय असा हा “चतुर्भुज”होण्याचा हा सुखद अनुभव आज लिहितांनाही अंगावर काटा येतो.  कुठून एवढे बळ त्यावेळेस आमच्या अंगात आले होते कोणास ठावूक ! आयुष्यातील महत्वाच्या निर्णयाबद्दल आम्हांला कधीच पश्चात्ताप झाला नाही.
काळानुरूप, आमच्या दोघांच्याही घरच्यांचा विरोध निवळत गेला.  आमचा स्वाभिमान, जिद्द, सकारात्मक दृष्टी, संयम, सचोटी, ठामपणा, संसाराप्रतीची निष्ठा, जबाबदारीची असलेली जाणीव, आमची नाती जोपासण्याची कला, ह्यामुळे आमचा संसार दिवसेंदिवस फुलतच गेला आणि दोघांच्या घरच्यांच्या मनात तसेच समाजातही आम्हांला आदराचे स्थान देऊन गेला, जे आजवरही टिकून आहे.
आज आमच्या संसाराला ३२ वर्षे पूर्ण झालीत आणि आमचा संसारही तितकाच सुखाचा चाललाय.  आमच्या संसाराच्या वेलीवर मुलीच्या रूपाने एक गोजिरवाणे फुलही उमलले, फुलले आणि आता तिच्या तिच्या संसारात ते बहरलेही आहे ह्याचेच खूप खूप सुख आणि समाधान आहे !
आयुष्यात मनापासून ठामपणे घेतेलेला कुठलाही निर्णय हा तुम्हांला नेहमी यशस्वीच करतो हा माझा तरी अनुभव आहे !

रविंद्र कामठे

Saturday, 25 May 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – बारगळलेला धंदा


अनुभवाच्या शिदोरीतून बारगळलेला धंदा 
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
२००० साली Y2K नावाचं एक खूप मोठ्ठ वादळ माहिती आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रावर एख्याद्या सुनामीसारखे आदळले होते.  भल्या भल्या स्थिरस्थावर झालेल्या कंपन्या ह्या वादळात नेस्तनाबूत झाल्या होत्या.  अमेरिकेतून आलेले हे वादळ भारतातील आयटी क्षेत्रावर आणि त्यावर अबलंबून असलेल्या सेवा आणि सुविधा क्षेत्रावर फार दूरगामी परिणाम करून गेले होते.  त्यात मी पुण्यातल्या ज्या कंपनीमधे होतो त्या कंपनीचीही अवस्था अतिशय गंभीर झालेली होती.  आमची ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला उपयुक्त असे कौशल्य शिकवणारी होती त्यामुळे ह्या जागतिक मंदीचे जे काही सावट संपूर्ण भारतावर होते त्यात आम्हीं ही चांगलेच होरपळून निघालो होतो.  कसं बसं काम मिळत होतं पण पैसे मात्र सहा सहा महिने मिळत नव्हते आणि मिळाले तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते.  ह्या सगळ्याचा परिणाम होवून आमच्या कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आलेली होती. 
संचालकांना कंपनी चालवणे मुश्कील झालेले होते.  सहा आठ महिने आमचा पगार होत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच जणांना कामावरून कमी करण्यात आले होते. रोज नवीन यादी तयार होत होती आणि त्यात आपला नंबर लागला नाही की थोडं हुश्श व्हायला होत होतं. 
सगळीकडेच मंदीचे वातावरण असल्यामुळे दुसरी नोकरी मिळणेही दुरापास्त होते आणि तसा प्रयत्न करणे म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे अशीच आम्हां सगळ्यांची मानसिक अवस्था झालेली होती.
जस जसे मंदीचे सावट गडद होत होते तस तसे आम्हां सगळ्यांचेच धाबे दणाणलेले होते.  एक तर सहा आठ महिन्यांत पगार झालेला नव्हता.  सगळे आर्थिक नियोजन विस्कटलेले होते. त्यामुळे माझ्या चिंता जरा वाढल्याच होत्या.  त्यात माझ्या उपद्व्यापी स्वभावामुळे इतरांपेक्षा जरा जास्तच होत्या म्हणा हवे तर !  त्यात आहे ती नोकरी टिकवणेही महत्वाचे होते.
११९९ला ही चांगल्या पगाराची नोकरी लागल्यामुळे आम्हीं राहत्या घराचे नूतनीकरण करून घेतले होते.  अर्थात कर्ज काढूनच हो !  त्यात आधीची फियाट विकून नवीन मारुती ८०० घेतली होती.  ती ही कर्जावरच हे काही वेगळे सांगायला नको !  तसेच टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, मुझिक सिस्टीम वगैरे असे किरकोळ कर्जांचे हप्ते चालूच होते हो.  माझ्या उथळ पाण्याला किती खळखळाटहोता ते ह्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल !  पण हा दोष काही आमचा नव्हता तर एकंदरीतच आपल्या सुधारलेल्या अर्थकारणाचा होता.  सहजासहजी ही सगळी कर्जे उपलब्ध होत होती आणि आमच्या घरच्या जमा खर्चाच्या ताळमेळात बसत होती (अर्थात हे सगळे बायकोच्या संमती शिवाय शक्य नव्हते ह्याची कबुली आत्ताच दिलेली बरी !).  त्यात मला कर्जाचा हप्ता नसेल तर झोप नाही लागायची हो ! माझी ही खुमखुमी मला चांगलीच नडलेली होती हे आत्ता सांगायला काहीच हरकत नाही.  एक सांगतो, केवळ माझी बायकोची सरकारी नोकरीत असल्यामुळे आमचे खायचे वांदे झाले नव्हते एवढाच काय तो फरक !  पण ह्या स्वत:च्या उन्नतीच्या नादात घेतलेली कर्जे मात्र ह्या काळात वटवाघाळा सारखी डोक्या भोवती घिरट्या घालत होती आणि माझी झोप उडवत होती हे ही तितकेच खरं आहे.  असो.
एक सांगतो, परिस्थिती काय रोजच बदलत असते. कधी कधी ह्या अशा म्हणजे जागतिक मंदी सारख्या गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात.  आपले कुठलेच नियंत्रण त्यावर असूच शकत नाही.  एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यावर आपण जसे परिस्थितीला सामोरे जातो तसेच अशा वेळेसही वागायचे असते हे लक्षात घ्या. 
कौटुंबिक एकीचे बळ अशा वेळेस नक्कीच खूप उपयोगी पडते हो ! अगदी सहजपणे तुम्हीं ह्या अशा वादळांतून बाहेर पडू शकता.  हे मी माझ्या अनुभवावरून सागंतो आहे आणि म्हणूनच अनुभवाच्या शिदोरीतून हा ही जरास हटके अनुभव तुमच्याबरोबर वाटतो आहे. 
आपले नियोजन जर का व्यवस्थित असेल तर वाईटातल्या वाईट परिस्थितीतून मार्ग काढता येतो.  हे ही आपल्याला हीच परिस्थिती शिकवत असते.  फक्त आपण हातपाय गाळून ह्या उदभवलेल्या परिस्थितीपुढे हात टेकायचे नसतात !  जिद्द, चिकाटी, सचोटी, धैर्य, सकारात्मक दृष्टीकोन, स्वाभिमान, कष्ट करण्याची तयारी, इमानदारी इत्यादी गुणवत्ता ह्या वेळेस खूप उपयोगी पडतात हे ही तितकेच खरं आहे. 
आपली काही चूक असो वा नसो, परिस्थितीपुढे हार ही कधीच मानायची नसते कारण आपण जर हार मानली तर आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचीही ससेहोलपट होण्याची शक्यताच जरा जास्त असते हे ही ध्यानात ठेवले पाहिजे.
हे एवढे तत्वज्ञान मी का पाजळले; तर त्याचे कारण म्हणजे, ह्या परिस्थितीवर मी धडपडत का होईना मात करू शकलो होतो व ह्या वादळातून सहीसलामत बाहेर पडलो होतो.  दोन तीन वर्षे लागली होती पण वेळ निभावली होती. 
सर्वात आधी मी कर्ज काढून घेतलेली मारुती ८०० विकली होती.  महत्वाचे म्हणजे माझी ही गाडी आमच्या कंपनीच्याच एका संचालकांनी मला मदत करण्याच्या हेतूनेच ती योग्य किमतीला विकत घेतली होती हे विशेष. जरी त्यांनी मला तसे प्रथमदर्शनी दर्शविले नव्हते तरी ती गोष्ट माझ्या लक्षात आल्यावाचून राहिली नव्हती.  हीच ती आपल्या माणसांची जाण ठेवणे की काय ते म्हणतात बरं !
मारुती ८०० विकून मी एक जुनी मारुती एस्टीम ही सेदान क्लास विकत घेतली.  ही गाडी घेण्याच्या मागचा माझा उद्देश अतिशय सरळ होता; तो म्हणजे ही गाडी मी माझ्या एका मित्राला भाडेतत्वावर पुणे-मुंबई प्रवासी वाहतूक करण्यासाठी दिली होती व त्यातून दर महिन्याला थोड्याफार प्रमाणात अर्थार्जन होईल अशी योजना होती.  कसे बसे वर्ष दोन वर्ष ह्या आर्थिक मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लागणार होते आणि त्यासाठी खूप विचारांती मी माझ्या ह्या मित्राच्या बरोबर हा धंदा करण्याचे ठरवले होते.  अर्थातच माझ्या ह्या मित्राला ह्या धंद्याचा दांडगा अनुभव होता; म्हणून मी त्याच्या मदतीने ही जोखीम घेण्याचा निर्णय घेतला होता.  (माझ्या ह्या मित्राच्या प्रारब्धाचा अतिशय वेगळा अनुभव आहे तो मी पुढच्या लेखात नक्की लिहिणार आहे). माणूस त्याच्या प्रारब्धापुढे किती शुद्र आहे हे स्वानुभवावरून मला तरी जाणवले होते.
काही महिने आमचा हा धंदा छान चालला होता.  त्यामुळे आम्ही एक चालक नोकरीला ठेवला होता. सगळे कसे अगदी व्यवस्थित चालले होते.  ढासळलेले आर्थिक नियोजन जरा रुळावर येऊ घातले होते. पण म्हणतात ना, ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न’.  माझ्या आयुष्यात सरळसोटपणे कुठलीही गोष्ट घडणे म्हणजे कपिलाशष्टीचाच योग म्हणावा.  माझ्या प्रारब्धात ह्या विधात्याने जे काही लिहून ठेवले असेल ते निमुटपणे सहन करण्याची शक्ती आणि त्यातून मार्गही तोच दाखवत होता म्हणून बरं ! 
आमचा चालक त्याच्या ह्या क्षेत्रातील कौशल्याचा वापर करून आम्हांला व्यवस्थितपणे आर्थिक गंडा घालू लागला होता; हे आमच्या वेळेतच लक्षात आल्यामुळे आम्हीं त्याला लगेचच निरोपाचा नारळ दिला होता.  पण त्यामुळे वर्दी आली की माझ्या मित्रावर गाडी चालवायची वेळ यायची. दोन तीन वेळेला तो आजारी होता म्हणून मी सुद्धा पुणे-मुंबई-पुणे प्रवासी वाहतूक करण्याचा अनुभव गाठीशी जोडला होता व त्यातूनही खूप काही शिकलो होतो.  परिस्थितीपुढे हार न मानण्याची माझी प्रवृत्ती माझ्या ह्या ही वेळेस खूप मदतीला आली होती.
वर्षभराने एक दिवस माझ्या ह्या मित्राला अचानकपणे काहीतरी वैयक्तिक अडचण आली म्हणून त्याने मला त्याची असहायता व्यक्त केली.  झालं आमचा धंदा त्याचवेळेस बारगळला होता. परत कधीही धंद्यात पडायचेच नाही; हा कानाला खडाच लावला होता.  ह्या अनुभवांतूनच मी खूप काही शिकत होतो. स्वत:ला घडवत होतो.  माझ्या आणि कुटुंबाच्या स्वाभिमानाला जपत होतो.

रविंद्र कामठे