Monday, 20 May 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – मसाई माराची जंगल सफर



अनुभवाच्या शिदोरीतून – मसाई माराची जंगल सफर
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

२०१२ साली मे महिन्याच्या शेवटी आम्ही आयुष्यातील पहिली वहिली जंगल सफारी केली होती ती सुद्धा अफ्रिकेतील मसाई माराची, ते सुद्धा नैरोबीला नोकरीसाठी गेलेल्या माझ्या अतिशय जिवाभावाच्या मित्राच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आग्रहामुळेच !
नैरोबीपासून साधारण ६ तासाच्या अंतरावर असेलेल्या मसाई माराला जंगल सफारीला आम्ही निघालो.  साधारण ४ तासानंतर जंगलाचा रस्ता सुरु झाला आणि काय सांगू, जिकडे पाहावे तिकडे फक्त जिराफ, झेब्रे, ग्याझेल, विल्डर बीस्ट ह्यांचा नुसता सुळसुळाट दिसत होता.  आंम्ही सारखे सारखे आमच्या चालकाला विनंती करून गाडी थांबवत होतो आणि अधाश्यासारखे फोटो काढत होतो. 
शेवटी न राहवून त्याने आम्हांला सांगितले की अहो, ही तर नुसती झलक आहे.  जंगल अजून सुरु व्हायचे आहे. तेंव्हा थोडा वेळ कळ काढा आणि गाडीत बसा, म्हणजे आपल्याला जंगलातील रेसोर्टला वेळेत पोहचता येईल.  गपगुमान गाडीच्या खिडकीतून रस्त्य्याच्या दुतर्फा दिसणारे झेब्रे आणि ग्याझेल  डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत होतो. 
दोन तासांनी मसाई मारा जंगलाचे मुख्य प्रवेश द्वार लागले.  तेथील सर्व तपासण्या व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करून जंगलात प्रवेश करते झालो आणि काय आश्चर्य, आमच्या डोळ्याचे पारणेच फिटले हो.  जणूकाही आमच्या स्वागतालाच हत्तीच पाठवलेत की काय असे झाले होते.  आमच्या समोरून १०-१५ हत्तींचा एक मोठा कळप चालला होता.  आफ्रिकन हत्ती आजवर फक्त चित्रातच पहिला होता. प्रत्यक्ष पाहिल्यावर तर तो एक हत्ती सुद्धा डोळ्यात मावेना !  अतिशय रुबाबदार, लांबच लांब असलेले दोन सुळे, सुपा एवढे कान आणि करड्या रंगाचा तो अजस्त्र देह पाहून आम्हीं सगळे वेडेच झालो होतो.  आजवर पेशवे बागेतील सुमित्रा हत्तीण पहिली होती ! जिकडे पाहावे तिकडे फक्त हत्तीच दिसत होते. मन मोहवून टाकणारे असे हे विलोभनीय दृश्य होते. 
आमचा चालक तसेच आमचा ह्या ट्रिपचा गाईड (दोन्ही एकच) आम्हांला लगेचच म्हणाला की, थोडा धीर धरा, ह्या तीन दिवसांत मी तुम्हांला मी हत्ती, जिराफ, झेब्रे, सिंह, चित्ता, एक शिंगी गेंडे, हिप्पो, ग्याझेल, तरस (हाईना), मगर, गरुड, इत्यादी; खूप प्राणी दाखवणार आहे.  आयुष्यभर लक्षात राहील तुमच्या ही जंगल सफर !
गाडीचा टप उघडणारी आणि खिडक्या सुद्धा उघडता येणारी आमची टोयोटा गाडी होती व तितकाच अभ्यासू, वक्तशीर आणि जाणकार गाईड व चालक ह्या तीन दिवसांच्या जंगल सफारीसाठी मित्राने खास आमच्यासाठी आयोजित करून आमची ही आयुष्यातील पहिली वहिलीच आफ्रिकन जंगल सफारी सार्थ केली होती हे मात्र नमूद करायलाच हवे !
सुमारे पंधराशे चौरस किलोमीटर परिसर असलेले विस्तीर्ण असे मसाई माराचे हे जंगल, म्हणजे आयुष्यात एकदा तरी पहावे असेच आहे.  मधेच पावसाची एक जोरदार सर येऊन गेली.  त्यामुळे वातावरण एकदम थंड झाले व रस्ते चिखलमय झाले.  पट्टीचा चालक असूनही त्याला मातीच्या ह्या रस्त्यावरून गाडी चालवताना कसरत करावी लागत होती.  त्यात एकदा आमची गाडी एका खड्ड्यात रुतली आणि निघता निघेना.  आम्ही गाडीतून उतरतो म्हणालो तर, त्याने चक्क नाही उतरायचे सांगितले.  आपण जंगलात आहोत आणि इथे कधी कुठला प्राणी ह्या कमरे एवढ्या गवतात दबा धरून बसलेला असेल ते सांगता येणार नाही.  मी वॉकीटाकीवरून निरोप दिला आहे.  दुसरी एखादी गाडी आली की आपल्याला मदत करेल.  पंधरा मिनिटांनी बलून सफारी करणारा एक समूह चालला होता.  त्यांनी आमची फसलेली गाडी पहिली व ते मदतीला धावून आले.  चांगले आडदांड, साडेसहा फुट उंच, धिप्पाड असे ६ जण गाडीतून उतरले.  एक मिनिटासाठी आम्हांला गाडीतून उतरवले व चक्क आमची गाडी उचलून दुसरीकडे ठेवून लगेचच निघूनही गेले.  आम्ही वेड्यासारखे त्यांच्याकडे अवाक होऊन पाहतच होतो.  ते खरे मसाई होते व जवळच्या गावातले होते.  ह्या जंगली लोकांची ताकद पाहिल्यावर आमची बोलतीच बंद झाली होती.
मारा रिसोर्ट नावाच्या पंचतारांकित रेसोर्ट मधील तंबूत आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती.  एक तर हे ठिकाण मसाई मारा जंगलात अगदीच मध्यभागी एका पठारावर होते.  त्याच्या मागून खाली मारा नदी वाहत होती व त्यात मगरी मस्त पहुडल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला असंख्य पाणघोडे (हिप्पो) डुंबत होते, जवळच एका पठारावर काही झेब्रे, जिराफ आणि ग्याझेल चरतांना दिसत होते.  लांबून हे दृश्य मन प्रसन्न करणारे होते, पण जस जशी रात्र होऊ लागली व अंधार पडायला लागला तसं तसे अंधारात चमकणारे ते शेकडो डोळे पहिले की पोटात गोळा येत होता.
रिसोर्टमधील तंबूचा (तंबू कसला, हा तर एक भला मोठा सोयी सुविधांनी सज्ज असा महालच होता) ताबा घेतला.  दुपारचे जेवण केले, आवरले आणि लगेचच त्यादिवशीच्या पहिल्या गेम (जंगल सफारी) राईडला गेलो व संध्याकाळी ५.३०च्या आत परत रिसोर्टला त्यांच्या नियमानुसार पोचलो होतो.
आंम्हाला तरसाची (हाईना) खूप गोंडस पिल्ले दिसली होती.  हा अतिशय किळसवाणा प्राणी ह्या जंगलात इतक्या संखेने दिसतो की नंतर त्याचा वीट येतो.  रात्रीच्या शांततेत त्याचे हसणे ऐकायला आले की मला तर रामसे बंधूचा चित्रपटच आठवतो !
येता येता आम्हांला शेकड्याने/ हजारोंच्या संखेने जिराफ, झेब्रे, विल्डर बीस्ट, रानटी गाई म्हशी आणि गाझ्येल, दिसत होते हे इथल्या जंगलाचे हे एक वैशिष्ठ्य आहे.  आपल्या सारख्या पुण्याच्या लोकांना त्या त्या जमातीतील एखादाच प्राणी, तो ही पेशवे बागेत बघायची सवय असल्यामुळे; इथे हजारोंच्या संखेने हे प्राणी पाहिल्यावर; नंतर नंतर, आंम्ही गाईडला जरा और दुसरा कुछ दिखावो ना (म्हणजे सवयी प्रमाणे त्याला हिंदी येत असणार असे गृहीत धरून) म्हणायला सुरवातही केली होती !
आश्चर्य म्हणजे येतांना रस्त्यात आम्हांला ८-१० सिव्हीणींचा कळप झुडपात मस्तपैकी पहुडलेला दिसला.  त्यांच्या अंगावर तीन चार गोंडस चिल्लीपिल्ली आपल्याच धुंदीत खेळत होती.  आमचा गाईड म्हणाला की उद्या इथेच एखाद्या किलोमीटरवर कुठेतरी सिहांचा कळप असेल तो दाखवतो. काल रात्रीच ह्या सिंहांनी एक म्हैस मारून फस्त केली होती.  त्यामुळे दुपारी जरा सुस्तावले होते.  इतक्या जवळून म्हणजे अगदी दोन फुटांवरून, टप आणि खिडक्या उघड्या असलेल्या गाडीतून हे सिंह बघतांना आमची भीतीने तर पूर्ण गाळणच उडाली होती. सिंहाची ती आयाळ, तो रुबाब आणि डरकाळीने एवढ्या थंडीतही आम्हांला घाम फोडून गेली.
दोन दिवस सतत दिवसभर जंगलात फिरत होतो आणि मनसोक्त प्राणी बघत होतो, पण ह्या दोन दिवसांत आम्हांला चित्त्याने आणि बिबट्याने काही दर्शन दिले नव्हते.  शेवटच्या सफारीला आमच्या गाईडला एक निरोप मिळाला आणि त्याने ज्या काही वेगाने गाडी जंगलातील त्या कच्च्या सडकेवरून पिटाळली होती की विचारू नका.  त्या दहा मिनिटांत त्याने आम्हांला आमची बुडे सुद्धा सीटला टेकून दिली नव्हती.  पण एक सांगतो त्याच्या ह्या प्रयत्नाला यश आले आणि शिकारीच्या तयारीत असलेल्या चित्त्याचे आम्हांला दर्शन घडले.  एवढे लांबून आम्ही त्याच्या साठी आलो होतो तर पठ्ठ्याने आमच्या कडे ढुंकूनही पहिले नाही हो. त्याचे लक्ष दूरवर चरत असलेल्या हरणांच्या (ग्याझेलच्या) कळपावर होते हो ! बिबट्याला मात्र आमच्या दर्शनाचा लाभ काही मिळाला नाही !
एक मात्र नक्की की माझ्या मित्राच्या आग्रहामुळे आमची मसाई माराची ही जंगल सफर सफल झाल्याचे समाधान आम्हांला लाभले होते, पण आज हा अनुभव लिहितांना हा माझा जिवलग मित्र ह्या जगात नाही ह्याचेही दु:ख मनाला बोचत होते !
आमच्या ह्या सफरीनंतर अगदी सहाच महिन्यांनी; नागपूरला एका लग्नात माझ्या मित्राला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने ह्या जगाचा निरोप घेतला होता.  म्हणूनच हा अविस्मरणीय अनुभव मला आजही लिहितांनाही अतिशय सद्गतीत व्हायला होत होते.

रविंद्र कामठे
११ मे २०१९ 

Tuesday, 14 May 2019

पक्षी कट्टा

पक्षी कट्टा

चपराक मासिकात प्रकाशित झालेला माझा हा लेख 




नेहमी प्रमाणे यंदाही आपण दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे, आज (१ मे २०१९) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून (आग ओकणाऱ्या) सुर्यदेवाचे कृपेने आम्ही आमच्या धनकवडी स्थित गुरु-सदन ह्या निवासस्थानी एक आगळा वेगळा पक्षी-कट्टा सुरु करीत आहोत.  माणसे माणसांसाठीच कॉफी कट्टा, गप्पांचा कट्टा, हास्य कट्टा, हा कट्टा तो कट्टा किंवा पुस्तक कट्टा करताहेत.  मी विचार केला की आपणही जरा काहीतरी वेगळं करू ! 
सहज विचार करता करता माझ्या रिकामटेकड्या सुपीक डोक्यात तुम्हां पक्षी मित्रांसाठी ह्या तप्त वातवरणात तुम्हांला एक छान सुखद असा गारवा मिळेल असा कट्टा बनवावा अशी कल्पना आली आणि लगेचच ती अंमलात आणून मोकळाही झालो.  इतकं छान आणि मस्त वाटतयं म्हणून सांगू ! तुमच्यासाठी काहीतरी करता आले ह्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही इतका मी आज खुश आणि समाधानी झालो आहे.
ह्या कट्ट्याचे थोड्याच वेळापूर्वी साळुंकी ताई आणि काकांच्या उपस्थितीतबुलबुलरावांनी सहकुटुंब उद्घाटन केले आहे.  सदर कट्ट्यावर समस्त पक्षी प्रजातीला मोफत दाणा पाण्याची सोय करण्यात आलेली आहे (हे कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्याप्रमाणे नव्हे) ह्याची कृपया नोंद घ्यावी व सहकुटुंब सहपरिवार ह्या योजनेचा लाभ घेवून ह्या कडक उन्हापासून आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करावा.
सदरचा कट्टा हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसून तो अतिशय निस्वार्थी भावनेने आपले पक्ष्यांचे (गैरसमज नको) प्राण ह्या तळपणारऱ्या उन्हापासून वाचविण्याच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेला आहे.
आपण जिवंत राहीलात तर हे पर्यावरण शाबूत राहीलहाच काय तो ह्या योजने मागील स्वार्थ आहे. 
सर्व पक्षीय निरिक्षणातून आपली सध्या पाण्यासाठीची वणवण आंम्हांस पाहवत नाही.  त्यामुळे तुमच्यासाठी सालाबादाप्रमाणे यंदाही ही खास व्यवस्था आमच्या घराच्या मागील अंगणात चिक्कूच्या आणि नारळाच्या झाडाखाली केली आहे.  दुपारच्या कडक उन्हातही आपणांस छान सावली मिळेल अशी ही सोय आहे.  भुक लागली असेल तर स्वतंत्रपणे दाण्याची सोय शेजारील एका कट्ट्यावर करण्यात आली आहे.  दाण्यांचा कंटाळा आला तर आपण आंम्हाला न विचारता पिकलेला एखाद दुसरा चिक्कू खाण्यास आमची हरकत नाही.  फक्त एकच विनंती आहे की चिक्कू पूर्ण खावा आणि आपल्या पिल्लांनाही भरवावा.  त्याचं काय आहे की, “अन्न हे पुर्णब्रम्ह आहे” असे आंम्हास शाळेत शिकवल्याचे आठवतेम्हणून तुम्हांलाही तीच शिकवण द्यावीशी वाटली.  अर्थात शहाण्यास सांगणे न लागे !  फार गोड आहेत आमच्या झाडाचे चिक्कूअगदी आमच्या घरच्यांसारखे हो !
मागील कट्ट्यावर शक्यतो बुलबुलसाळुंकीवटवटेटीटसनबर्डपोपट इत्यादीह्या लहान व मध्यम वर्गीय कुटुंबांनी आस्वाद घ्यावा. बाकीच्यांसाठी म्हणजे थोरामोठ्यांची जागे अभावी व वादविवाद टाळण्यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी. 
बुलबुल कुटुबियांना एक अतिशय नम्र विनंती ह्या निमित्ताने करू इच्छितो कीतुमची पाण्यामध्ये येथेच्छ डुंबण्यासाठीह्याच कट्ट्यावर एका वेगळ्या मातीच्या भांड्याची सोय करण्यात आली आहे.  त्याचं काय आहे कीतुम्हीं ज्या भांड्यात डुंबणारत्याच भांड्यातील पाणी इतर पक्षीय मित्रांना प्यायला आवडत नाहीम्हणून तुमच्यावरील इतक्यावर्षातील प्रेमापोटी ही खास सोय केली आहे.  त्याचं काय आहे नाकी तुम्हांला असं मनसोक्त डुंबताना पाहून आमच्याही मनात असचं काहीसं करावसं वाटतंपण जनलज्जेमुळे तसे करता येत नाही हो ! समजून घ्या आम्हांला !
मी हात जोडून आपणां सर्व पक्षी (पक्षीय नव्हे) मित्रांना परत एकदा आवाहन करतो की ह्या मागे माझा कुठलाही राजकीय अथवा सामाजिक हेतू नाही !  मी कुठ्ल्याही पक्षाचा (समजून घ्या) लाभार्थी नाही हे परत एकदा नमूद करतो !
अजून एक विनंतीकावळे काकाभारद्वाज भाऊघारताईकोकीळाबाईकोकीळअण्णा ह्या जरा मोठ्या पक्षांची (चुकीचा अर्थ घेवू नका) पहील्या मजल्याच्या गच्चीवरील लोखंडी जीन्याच्या खाली केलेली आहे ह्याची नोंद घ्यावी आणि थंड पाण्याचा आस्वाद घ्यावा.  तसेच तुमच्यासाठीही दाण्याची स्वतंत्र व्यवस्था गुलाबाच्या कुंडीच्या बाजूच्या खांबा जवळ करण्यात आलेली आहे. गच्चीच्या पूर्व दिशेलाही पाण्याची व्यवस्था गर्दी मुळे आपली गैरसोय होवू नये म्हणून केली आहे. हे कळावे.  कृपया कबुतरे कुटुबीयांनी ह्या कुठल्याही परिसरात फिरकू नये.  अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील हे आत्ताच सांगून ठेवतो आहे.  तुमच्या दाण्याची सोय दानशूर दुकानदारांनी केली आहेतिथेच आपली झक मारावी (अगदीच राहवलं नाही म्हणून थोडसं व्यक्त झालो एवढचं) !
मागील कट्ट्यावर फारच गर्दी झाली तर गुरु-सदनच्या पुढील अंगणातही पाण्याची सोय करण्यात आलेली आहे ह्याची नोंद घ्यावी.  तसेच मुगुसरावखारूताई आपणासाठी ह्या मागील कट्ट्याच्या खालच्या बाजूलाच एका स्टीलच्या भांड्यात पाणी ठेवलेले आहे ते नक्की प्यावं आणि आपली तहान भागवावी ही विनंती.
परत एकदा सांगतोमांजरे-बोके काका-काकूतसेच कबुतरे कुटुबियांना ह्या परिसरात फिरण्यास पूर्णपणे मज्जाव आहे ह्याची दखल घ्यावी.  जर का आपण घुसखोरी करतांना आढळलात तर आपल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.  नंतर सांगितले नाही म्हणून तक्रार करू नये.  आपले ऐकण्यासाठी इथे कोणाकडेही वेळ नाही.  आपण आपली सोय करावी;  कारण आपल्या स्वभावानुसार आणि वर्तनुकीनुसार आपणांस काही चांगल्या सवयी लागतील ह्याची आम्हांला खात्री नाही आणि तुमच्यात सुधारणा करण्याची जोखीम घेण्याची तर अजिबात इच्छा नाही.  विषय संपला. ह्यावर पुन्हा चर्चा होणार नाही हे कळावे !
सर्व पक्षी (पक्षीय नव्हे) मित्रांना सांगण्यास आनंद होत आहे की नुकतेच आपले रवीभाऊ निवृत्त झाले आहेत आणि त्यांच्या अखंड उत्साहाने व संकल्पनेतून आपण ही सर्व सोय कुठलाही राजकीय आणि पक्षीय लोभ अथवा लाभ (भविष्यात अथवा वर्तमानात) न ठेवता करतो आहोत.  ही सर्व व्यवस्था आपले आंजर्ल्याच्या माधवमामांच्या मदतीने झाली आहे त्यासाठी आपण त्यांचे आभार मानायलाच हवेत.
ह्या ठिकाणी अजून एक शेवटचेच सांगून माझे दोन शब्द संपवणार आहेते म्हणजे आपल्यासाठी ठेवलेले पाणी सतत थंड राहील व ते दिवसांतून दोन ते तीन वेळा बदलले जाईल ह्याची काळजी स्वतः रवीभाऊ घेत आहेत.  ते तसे करून तुमच्यावर उपकार वगैरे काही करत नाहीत. ते त्यांचे आद्य कर्तव्यच आहे ह्याची दखल घ्यावी.
आता हे शेवटचेकावळेकाकांना विनंती आहे कीसारखे सारखे पोळीभातकाड्या ईत्यादी आणून भांड्यात बुडवून तसेच टाकून जावू नये.  बुडवायला हरकत नाहीपण जातांना तो खाऊ परत नेण्याची विनंती आहे.  माझ्या असे लक्षात आले आहे की बऱ्याचदा आपण आणलेले हे खाद्यपदार्थ आपण तसेच पाण्याच्या भांड्यात ठेवता किंवा विसरून जाता.   त्याचं काय आहे कीबाकीच्या पक्षांना (पुन्हा चुकीचा अर्थ लावू नका). पाणी उगाचचं उष्टे झाल्यासारखं वाटतयं.  असं मला उगाचच वाटत असेल बहुधा.  पण तुम्हीं काळजी घ्या !
आता मात्र थांबतोच आणि पुन्हा एकदा सर्व पक्षी मित्रांनाआमच्या ह्या कट्ट्यावर येवून आपला अनमोल जीव वाचवून आंम्हा पामर माणसांना (स्वार्थी असलो तरी) कृतकृत्य करावे व मरत मरत का होईना हे जीवन जगण्यास मदत करावीही प्रांजळपणे कळकळीची विनंती !
आपण सर्व पक्षी मित्रासाठी ह्या निवेदनासोबत काही छायाचित्रे जोडत आहोतजेणेकरून आपला आमच्या ह्या कृत्यावर असलेला विश्वास वृद्धिंगत होवून आमची इतर काही मित्र मंडळीही असेच किंवा ह्या पेक्षा भारी कट्टे त्यांच्या त्यांच्या घरीबागेत अथवा जिथे शक्य असेल तिथे करून तुम्हां समस्त पक्षी बांधवाना ह्या रणरणत्या उन्हामुळे अंगाच्या होणाऱ्या काहिली पासून वाचुवूनपर्यावरण वाचवण्यास हातभार लावतील ही एक भोळी भाबडी आशा बाळगून थांबतो !


आपला पक्षी मित्र,
रविंद्र कामठे

Tuesday, 7 May 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – प्रकाशन माझ्या पहिल्या काव्यसंग्रह “प्रतिबिंब”चे


अनुभवाच्या शिदोरीतून प्रकाशन माझ्या पहिल्या काव्यसंग्रह प्रतिबिंबचे
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०१३ हा दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा दिवस ! त्या दिवशी माझ्या प्रांजळ भावनांचे प्रतिबिंब मनाच्या ओंजळीतून ओसंडून वाहत होते.  वयाची पन्नाशी गाठलेला मी; आयुष्याच्या एका वेगळ्याच वळणावर येवून पोचलो होतो.  मला वाटायला लागले की; वर्षे पन्नास आयुष्याची माझ्या सरली, चाहूल मजला हलकेच सरणाची लागली मन अगदी भारावलेल्या अवस्थेत होते.  माझे कुटुंब तर माझी ही पन्नाशी एकदम जोमात साजरी करण्याच्या तयारीत होते.  सकाळीच घरच्यांनी माझी पन्नास दिव्यांनी ओवाळणी करता करता माझ्यावर फुलांचा वर्षाव करून मला अजून भावूक करून टाकले होते.  आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मला मात्र कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होते.  माझ्या साहित्यक्षेत्राच्या वाटचालीचा हा शुभारंभच होता हे आज ५ वर्षानंतर नमूद करतांना मला खूप अभिमान वाटतो आहे.

त्या क्षणाला मला माझ्या कैलासवासी वडिलांची आठवण मनाला सारखी डिवचत होती.  आज ते जर असते तर, त्यांना किती कौतुक वाटले असते माझे !  माझ्या कर्तृत्वाचा त्यांना खूप अभिमान होता, हे मी त्यांच्या नकळत कित्येक वेळेस त्यांच्याच तोंडून, त्यांच्याच मित्रमंडळीकडे माझे कौतुक करतांना ऐकलेले होते.  आजही मला ते आठवले तरी माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात.  त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी प्रतिबिंबहा माझा पहिला काव्यसंग्रह त्यांना अर्पण करण्याचे योजले होते. 

मला जसे सुचले तसे मी हे अनुभव शब्दबद्ध करत गेलो.  ह्या आठवणींचा पगडा माझ्यावर इतका भारी होता की, हे अनुभव कागदावर टिपता टिपता माझ्याही नकळत ह्या भावनांना काव्यात्मक रूप कधी येवू लागले हेच मला उमजले नाही.  हाच तो माझा पहिला वहिला ८७ कविता असलेला शब्दसंग्रहज्याची पहिली आवृत्ती मी २३ मे २०१३ रोजी माझ्या बायकोला आमच्या लग्नाच्या २६व्या वाढदिवसानिम्मित, माझ्या आईच्या हस्ते भेट दिली होती.   अगदी घरातल्या घरात एक लहानसा प्रकाशन सोहळा करून आम्हीं तो क्षण आमच्या स्मृतीत जतन करून ठेवला आहे.   त्यावेळेस माझ्या आमचे गुरु सदनह्या कवितेच्या पोस्टरचे मातोश्रींच्या हस्ते अनावरण करून आम्हीं आमचा आनंद द्विगुणीत केला होता.  ह्या धांदलीत, कळत नकळत मी मात्र स्वत:ला कवी समजू लागलो होतो हे आत्ता ह्या क्षणी लिहितांना अतिशय प्रामाणिकपणे कबूल करतो.

माझ्या ह्या प्रतीभाशक्तीवर माझ्या घरातल्या कोणाचा खरोखर विश्वासच बसत नव्हता.  पण एक आहे की माझ्या ह्या प्रांजळ प्रयत्नास सर्वांनी मनापासून दाद देवून मला उत्तेजनच दिले व त्याचे रुपांतर शेवटी १३३ कवितांचा प्रतिबिंबमाझा शब्दसंग्रह ह्या दुसऱ्या आवृत्तीत झाले.  मीच काय पण घरातले सगळे आणि जवळचे काही मित्र माझ्या ह्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनच्या कामाला लागले होते व त्यात आंम्हाला निश्चितच अपेक्षित यशही आले होते.

ऑगस्ट मध्येच, म्हणजे माझ्या पन्नाशीला हे प्रकाशन करायचे पक्के करून एका दगडात दोन पक्षी मारले होते.  अर्थात हा प्रकाशन सोहळा नसून एक कौटुंबिक सोहळाच होता हे ही तितकेच खरं होते.  २५ ऑगस्ट २०१३, तारीख निश्चित असल्यामुळे सर्वात आधी कोथरूड मधील ईशदान सोसायटीचे सभागृह ठरवण्यात आले.  पन्नाशी व प्रकाशन कार्यक्रम संध्याकाळी करण्याचे योजल्यामुळे चक्क १७५-२०० लोकांसाठी जेवणाचा बेतही ठरवला गेला.  संपूर्ण कार्यक्रमाची अतिशय काटेकोरपणे रूपरेषा आखण्यात आली होती.  एकाच आठवड्यात एका मित्राने शब्दांजली प्रकाशन बरोबर प्रकाशनाचा करार करून दिला व मंडळी जोमाने कामाला लागली होती.

त्या दिवशी ठीक ७ वाजता माझ्या पन्नाशीनिम्मित, मुलीने खास बनवून घेतेलेला, भलाथोरला तीनमजली केक कापण्यात आला व त्यानंतर लगेचच तासाभराचा प्रकाशन सोहळा सुरु करण्यात आला.  सभागृहात उपस्थित असलेल्या माझ्या नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन आहे, हा मात्र एक अतिशय सुखद असा धक्का होता.  कारण माझ्या घरच्यांनी त्यांना फक्त माझ्या पन्नाशीनिम्मितच बोलावणे केले होते व काव्यसंग्रहाचे प्रकाशन गुलदस्त्यातच ठेवले होते हे विशेष.   प्रास्ताविक झाल्यानंतर, माझ्या दोन मित्रांनी, ज्यांची माझ्या ह्या पुस्तकास प्रस्तावना लाभली होती, त्यांनी समारंभाला साजेशी भाषणे करून ह्या कौटुंबिक सोहळ्यास एकदम साहित्यिक रंगत आणली होती.   माझ्या आईच्या हस्तेच ह्या ही आवृतीचे प्रकाशन करण्यात आले.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या आईने वयाच्या ७५व्या वर्षी स्वत:च्या हस्ताक्षरात भाषण लिहून आणलेले होते.  प्रकाशन झाल्यावर ह्या माउलीने इतक्यावेळ आपल्या पदराआड दडवलेले ते भाषण काढले व ती ते वाचण्याची इच्छा व्यक्त केली.  तिला वयोमानाने ते जमले नाही म्हणून माझ्या धाकट्या बहिणीने ते वाचून दाखवल्यावर उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रियेने माझ्यातर भावनांनी कधीच बांध ओलांडले होते.
 
इतके सगळे झाल्यानंतर मला बोलावयास सांगितल्यावर मी जेंव्हा समोर बसलेल्या माझ्या गोतावळ्याकडे एक नजर टाकली, तेंव्हा कौतुकाने भरून आलेले त्यांचे डोळे पाहून; मला लिहून आणलेले भाषण सुद्धा दिसेनासे झाले होते.  आजही आत्ता हे लिहितांनाही तो प्रसंग डोळ्यासमोर आला तरी अजूनही डोळे पाणावतात हो !  एक नजर मी छताकडे पहिले आणि माझ्या वडिलांच्या स्मृतीस अभिवादन करून कसे बसे माझे ते औपचारिक भाषण संपवले व खिशातल्या रुमालाला न लाजता न डगमगता हात घालून हलकेच अनावर झालेल्या भावनांनी पाझरलेले डोळे पुसले. आजही ह्या सोहळ्याची चित्रफित पाहतांना मला गहिवरून येते, हेच काय ते ह्या सोहळ्याचे फलित म्हणावयास हवे !

ह्या प्रकाशन सोहळ्यासाठी माझ्या कुटुंबाने आणि काही जवळच्या मित्रांनी खूप खस्ता खाल्ल्या होत्या.  त्यासाठी अक्षरश: महिनाभर आधी दिवस रात्र खपून त्याचे व्यवस्थित नियोजन केले होते.  नारायण पेठेतील मुद्रकांनी प्रकाशकाच्या हातात २३ तारखेला सर्व १००० प्रती ठेवून त्यांचा शब्द पाळला होता.  सगळ्यात मोठ्ठी गमंत म्हणजे सातारा आकाशवाणीवर निवेदक म्हणून कार्यरत असलेल्या मित्राने, त्याच्या धीरगंभीर आवाजात ह्या काव्यसंग्रहातील दहा कविता रेकॉर्ड करून आणल्या होत्या व त्यावर पुण्यातल्या मित्राने एक उत्कृष्ट कलाकुसर करून अप्रतिम ध्वनीचित्रफित तयार केली होती.  ती २० मिनिटांची ध्वनीचित्रफित ह्या प्रकाशन सोहळ्यात दाखवल्यावर तर उपस्थित अवाकच झालेले होते.  समारंभाचे सूत्रसंचलन निवेदक मित्राने त्याच्या प्रतिभेला साजेसे करून ह्या घरगुती कार्यक्रमाला साहित्यिक दर्जाची उंची गाठून दिली होती.  त्यावर कळस म्हणजे बायकोने तिच्या वक्तृत्वशैलीने आभार प्रदर्शन करून सगळ्यांची मने जिंकली होती.
  
दीडतास रंगलेल्या ह्या प्रकाशन सोहळ्यानंतर; आलेल्या प्रत्येकाने मला भेटून दिलेल्या स्नेहपूर्वक अभिप्रायाने मला माझ्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे भासत होते.  त्यात माझ्या पन्नाशी निम्मित आयोजित केलेल्या भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत घेत, माझे हे सर्व आप्तेष्ट माझ्याच कवितेतच इतके रंगून गेले होते की शेवटी सभागृहाच्या व्यस्थापनाला आम्हांला आवरते घेण्याची विनंती करावी लागली होती.

आलेल्या प्रत्येकाच्या हातात माझ्या प्रतिबिंबची स्नेहपूर्वक भेट म्हणून दिलेली ती प्रत पाहून, ‘मी पण”  एक साहित्यिकझाल्याचा तो अनुभव मला मात्र मनोमन सुखावून जात होता व पुढेही लिहिते राहण्याच्या जबाबदारीची जाणीवही करून देत होता.

ह्या सोहळ्याचे श्रेय कोणा कोणाला देवू.......
नियतीला देवू की, माझ्या नशिबाला देवू !
माझ्या जन्मदात्यांना देवू की, त्यांनी केलेल्या संस्कारांना देवू !
माझ्या काव्यप्रतिभेला देवू की, माझ्याकडून हे करवून घेणाऱ्या सरस्वतीला देवू !
माझ्या कुटुंबाला देवू की, त्यांच्या माझ्यावरील विश्वासला देवू !
माझ्या प्रकाशकाला देवू की, माझ्यातल्या कवीला देवू !
ही श्रेयनामावली मारुतीच्या शेपटी सारखी आहे जी कधीही न संपणारी आहे.  ज्या कुठल्या शक्तीने हे सगळे घडवून आणले तिला ह्याचे श्रेय देऊन; ज्यांनी कोणी माझ्या ह्या काव्यप्रतिभेस साकार होण्यास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष साथ दिली असेल; त्यांच्या ऋणात राहणेच मला जास्त योग्य वाटते..
  
रविंद्र कामठे


Thursday, 25 April 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – सकारात्मक दृष्टीने साकारलेला एक भव्य प्रकल्प


अनुभवाच्या शिदोरीतून सकारात्मक दृष्टीने साकारलेला एक भव्य प्रकल्प

चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

२००३हे वर्ष बहुतेक माझी कसोटीच घेणारे होते की काय कोणास ठाऊक !  आधीची नोकरी तर गेलीच होती, त्यामुळे मागील वर्षी घेतलेला भूखंडही आर्थिक नियोजन ढासळ्यामुळे विकावा लागला होता व माझ्या भविष्यातील योजनेवर बोळा फिरवला गेला होता.  मी कितीही नाही म्हणालो तरी थोडासा व्यथित होऊन हिरमुसलो होतो. 

अथक प्रयत्नांती, शिवाजीनगर येथील फायबरग्लासचे डोम बनविण्याच्या कारखान्यात ८-१० हजाराची एक नोकरी, एका मित्राच्या ओळखीने मिळाली होती.  आधी मालक असलेला माझ्या मित्राचा मित्र, नंतर माझाही खूप चांगला मित्र झाला, ही खूप मोठी उपलब्धी होती !  अहो ह्या व्यक्तीने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डोम केला आहे व त्यासाठी त्याला पारखे पारितोषिक मिळाले आहे. खुद्ध लता मंगेशकर आणि त्यावेळेसचे पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेली ही आसामी, मला मित्र म्हणून ह्या नोकरी निमित्त लाभली होती.

मी कारखान्यातले सर्व व्यवस्थापन सांभाळत होतो व त्याच बरोबर माझ्यातील मार्केटिंग कौशल्याचा वापर करून वेगवेळ्या आर्किटेक संस्थेशी संधान बांधून फायबरग्लास डोमची कामेही मिळवत होतो.  असेच एक दिवस फातिमानगर नगर भागात फिरता फिरता, एका मोठ्ठ्या व्यावसाईक इमारतीचे बांधकाम माझ्या नजरेत पडले.  सवयीने, मी त्या इमारतीतील कार्यालयात गेलो व चौकशी करू लागलो.  बांधकामावरील अधिकाऱ्यास भेटून आमच्या कंपनीची माहिती देवून आमच्या लायक काही काम असेल तर सांगा असे बोलत होतो.  इतक्यात तिथे त्या इमारतीचे मालक आले व त्यांनी आमचे संभाषण ऐकले व माझ्या हातात असलेले, आम्हीं केलेल्या वेगवेगळ्या डोमचे फोटो पहायला घेतले.  त्या फोटो मध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डोमचाही फोटो होता.  त्यांनी मला विचारले की आपण आत्ता बसलो आहे त्या इमारतीमधील एक ४० फुट रुंद आणि १४० फुट लांब गाळ्यावर फायबरग्लासचा डोम करायचा आहे व तो तुमची कंपनी करू शकेल का ह्या गाळ्यात मध्ये कुठेही एकही आधार न घेता तो बनवायचा होता हे त्यातले विशेष होते !  अगदी सहज काही काम आहे का बघायला आत शिरलो तर, इथे तर कामाचे मोठ्ठे घबाडच माझ्या हाती लागले होते !  मी माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य अतिशय बेमालूमपणे झाकले व त्यांना त्याच आत्मविश्वासाने उत्तर दिले की तुमचे हे काम फक्त आम्हीच करू शकतो, जसे दिनानाथ हॉस्पिटलचे केले आहे तसे !  झाले त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यास मला घेवून ताबडतोब त्यांच्या पुलगेट येथील आर्किटेकच्या कार्यालयात यायला सांगितले.

आर्किटेकच्या कार्यालयात जावून मी त्यांना काय हवे आहे त्याची माहिती घेतली.  त्यांनी आरेखन केलेले काही कागद मला दिले आणि एक चार दिवसांत संपूर्ण कामाचे स्वरूप, त्याच्या खर्चाचा अंदाज आणि लागणारा वेळ, ह्या सहित त्यांच्या कॅम्प स्थित महात्मागांधी रोड वरील मुख्य कार्यालयात आमच्या मालकांना घेवून भेटायला या सांगितले.

५ वाजता मालक आले.  त्यांना कधी एकदा ही ह्या नवीन कामाची माहिती देतो आहे असे मला झाले होते.  न राहवून त्यांना मी आज केलेला हा प्रताप ऐकवला आणि दोन मिनिटे त्यांच्या चेहऱ्यावरील त्यांनाही बसलेला आश्चर्याचा धक्का अजमावत होतो.  ह्या कामाचा अवाका आणि त्याची आम्हांला मिळू शकणारी संधी पाहून त्यांनी माझे मनापासून कौतुक तर केलेच पण, लगेच एक चहा व एक सिगरेट पाजून मला खूशच करून टाकले. 

तीन दिवसांत आम्हीं ह्या कामाची सर्व माहिती आणि आरेखन ह्यांचा सविस्तर विचार करून अभ्यास केला.  एक डोम म्हणजे व्हाल्ट ४० फुट रुंद व १४० फुट लांब होता. हा संपूर्ण डोम फायबरग्लासमधे तयार करायचा होता व कुठल्याही आधाराशिवाय त्या गाळ्याच्या ७व्या मजल्यावर बसवायचा होता, ज्यातून साधारण ६०% उजेड येईल, पण पाण्याचा एक थेंबही आत येणार नाही, तसेच खालच्या मजल्यावर हवाही खेळती राहील अशी व्यवस्था करायची होती. 

एकंदरीतच ह्या कामाचे स्वरूप तसे अवाढव्यच होते व आमच्या कंपनीला झेपेल की नाही ह्याची शक्यता पडताळणे गरजेचे होते.  त्यामुळे ह्या कामाची आम्हीं तपशीलवार उजळणी केली, कामगारांशी चर्चा केली, शिवाजीनगरच्या कारखान्यात हा डोम कसा बनवायचा व तो फातिमानगरला कसा न्यायचा तसेच डोम ७ व्या मजल्यावर कसा लावायचा ह्याचा संपूर्ण आराखडा अक्षरश: तीन दिवस व रात्र खपून तयार केला.  लागणाऱ्या कच्च्या मालाची माहिती घेतली व त्याची उपलब्धता व किंमत जाणून घेतली.  तसेच येणाऱ्या इतर सर्व खर्चाचा अंदाज काढला, नफा किती ठेवायचा हे ठरवले व एक ठोकताळा बनवून त्याचे रीतसर कागदपत्रे तयार करून ठेवली आणि ठरल्याप्रमाणे मी आणि मालक त्या इमारतीच्या मालकांना भेटायला त्यांच्या कार्यालयात पोचलो.  पहिल्या भेटीत त्यांनी आमच्या ह्या सर्व तयारीचे खूप कौतुक केले व आमची काम करण्याच्या प्रबळ इच्चाश्क्तीची प्रशंसा केली.  त्यांच्या अनुभवी वडिलांनी तर आमची तोंडवरच स्तुती केली.  नंतर आम्हांला कळले की त्यांनी पुण्या मुंबईच्या काही कंपन्यांना विचारणा केली होती, पण आमच्या एवढे चांगले काम कोण करू शकेल की नाही अशी त्यांना शंका होती.

आमची औपचारिक बोलणी सुरु होती.  तीन चार वेळा गाठी भेटीही झाल्या.  कामाचा तपशील व आम्ही दिलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रकावर भरपूर चर्चाही झाली.  सरते शेवटी हे कंत्राट आम्हांला देण्याचे त्यांनी घोषित केले आणि तशी वर्कऑडर, आगाऊ रकमेसहित देवून लेगेचच कामाला सुरवात करायला सांगितले व कुठल्याही परिस्थितीत हे काम ४ महिन्यातच पूर्ण करण्याचे आश्वासन आमच्याकडून घेतले होते. 

हा एक डोम म्हणजे जवळ जवळ कात्रजच्या बोगाद्या एवढा होता.  आणि आंम्हाला एक नव्हे तर दोन डोमची ऑर्डेर मिळाली होती, ज्याची किमंत काही लाखांत होती.  आजवरच्या माझ्या मार्केटिंगच्या क्षेत्रामधील ही सर्वात मोठी सफलता होती.  

हा प्रकल्प फारच खडतर तर होताच पण अतिशय जोखीमिचाही होता.  मानसिक, आर्थिक आणि शारीरक कष्टाची कसोटी पाहणारा होता.  माझ्या आजवरच्या कार्यकाळातील अतिशय बहारदार अनुभव देणारा होता.  काय नव्हते ह्या प्रकल्पात हो;
ह्या प्रकल्पाची मोठ्या विश्वासाने संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकणारा मालक मित्र होता.  अहोरात्र न थकता वेळेत काम पूर्ण करणारे कामगार होते.  रात्री अपरात्री ह्या तयार झालेल्या पाकळ्या ट्रेलरवर चढवायला मदत करणारे सहकारी होते.  फायबरग्लासच्या ३० फुटी अर्धगोलाकार ८ पाकळ्या एका वेळेस मोठ्ठ्या ट्रेलरमध्ये टाकून त्या शिवाजीनगरवरून फातिमानगर पर्यंत जीकरीने पोचवणारे (२०-२५ ट्रीप करणारे) चालक होते (ज्याची फक्त रात्री १ ते ३ दरम्यानच वाहतुकीची परवानगी होती) व त्या पाकळ्या रात्रीत ट्रेलर मधून उतरवून घेवून ७व्या मजल्यावर चढवणारे धमाल हमाल होते.  तसेच ह्या ३० फुटी एक अशा अंदाजे एका बाजूला ४५ व दुसऱ्या बाजूला ४५ अशा एकूण ९० पाकळ्या एकमेकांना अधांतरी जोडून त्याचे एका डोम (व्हाल्ट) मध्ये रुपांतर करणारे विशिष्ट कौशल्य असलेले जिगरबाज कामगार होते.  कोणा कोणाचे कौतुक करायचे !  सगळेच जण ह्या प्रकल्पात स्वत:ला झोकून देवून काम करत होते व माझ्या कारकीदीत एका अनोख्या व सफल प्रकलपाची भर घालत होते.

एक सांगतो ह्या प्रकल्पामुळे मला उलगडलेले एक गुपित सांगतो
;
सकारात्मक दृष्टीने पाहून आलेल्या परिस्थितीशी दोन हात करता आले पाहिजेत. आयुष्यात कुठलेच काम कधीच कठीण नसते किंवा अशक्य नसते.  फक्त आपण जोखीम घेऊन आपल्या इच्छाशक्तीवर भरवसा ठेवून, निष्ठेने ते पूर्णत्वास न्यायचे असते.  यश तर नक्कीच असते आणि त्याचे फळ तर आपल्या मानसिक आणि आंतरिक समाधानातच दडलेले असते.  हा माझा तरी अनुभव आहे, जो मला तुमच्याबरोबर ह्या लेखाद्वारे पोचवावासा वाटला !

रविंद्र कामठे


Sunday, 14 April 2019

पक्षी आणि पाणी



नमस्कार मित्रांनो,
ह्या वर्षी तापमानाने तर मार्च महिन्याच्या अखेरीपासूनच ४०शी गाठली आहे आणि माणसांच्या अंगाची लाही लाही होते आहे.  घरातून बाहेर पडावेसे वाटत नाही हो ! पुण्याचे अगदी नागपूर चंद्रपूर झाल्यासारखे वाटत आहे.  हे असेच चालू राहिले तर जगणेच मुश्कील होऊन बसेल असेच मला वाटते आहे. माणसांचे हे हाल आहेत तर पक्षांचे किती हाल होत असतील ह्याचा नुसता विचार जरी केला तरी भोवळ आल्यासारखे होते हो ! आपल्या ह्या सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात पक्षांना पाण्यासाठी खूप वणवण करावी लागत आहे व त्यात त्यांचा जीवही जातो हो.  हे वाचले की मन अगदी विषण्ण होते. 
म्हणूनच मी नेहमीप्रमाणे ह्या वर्षीही पक्षांच्या पाण्यासाठीची थोडीशी सोपी पद्धत अवलंबली आहे.  टाकाऊ पाण्याच्या बाटलीतून ह्या पक्षांच्या पाण्यासाठीची एकदम सोपी पद्धत सोबतच्या फोटोत दाखवली आहे तशी तुम्हीं सुद्धा घरच्या घरी करू शकता अशी आहे.  थोडक्यात मी तुम्हांला ही पद्धत सांगतो..
दोन लिटर किंवा पाच लिटर पाण्याची बाटली घ्या.  एक स्क्रूड्रायव्हर अथवा टेस्टर घ्या.  तो मेणबत्तीवर गरम करून बाटलीच्या तळाशी एक भोक पाडा.  घरातील शोभेच्या माश्यांच्या साठीची ऑक्सिजनची एक नळी घ्या.  ती साधारण ६ इन्च लांबीवर कापा.  माश्याच्या साठी ऑक्सिजनचा एक नॉब मिळतो तो ह्या नळीच्या एका टोकाला लावा आणि नळीचे दुसरे टोक बाटलीच्या तळाला जे भोक पाडले आहे त्याच खूपसवा आणि त्यावर फेविक्विकचे तीनचार थेंब सोडा.  झाले आपले ठिबक सिंचन योजना तयार झाली.  आता जवळच्या नर्सरीतून मातीचे एक पसरट पण थोडे खोल भांडे आणा.  ह्या भांड्यावर ही बाटली साधारण फुटभर उंचीवर बांधून ठेवा.  म्हणजे अगदी थेंब थेंब पाणी सतत ह्या मातीच्या भांड्यात पडत राहील.  हे असेच सतत पाणी पडल्यामुळे एवढ्या उन्हातही ते थंड राहते.  त्यासाठी सुरवातीला निम्मे भांडे भरून पाणी ठेवा म्हणजे अगदी भर उन्हात सुद्धा पक्षांना थंडगार पाणी मिळेल.  दिवसातून एकदा तुमच्या सोयीने ह्या बाटलीतील पाणी बदलत रहा तसेच मातीचे भांडे स्वच्छ करून ठेवा.  ह्यामुळे पक्षांना थंड पाणी मिळेल आणि आपल्याला एक सात्विक आनंद मिळेल जो लाखो रुपये खर्च करूनही मिळणार नाही.  हा माझा स्वत:चा अनुभव आहे.  माझ्या घरच्या सर्व दिशांना ही अशी पाण्याची सोय मी १२ ही महिने करतो. उन्हाळ्यात फक्त जरा जास्त लक्ष द्यावे लागते.
तुम्हीं जर रोज कुठे फिरायला, जात असाल तर एक बाटली आणि एक मातीचे भांडे तुमच्या ह्या नेहमीच्या ठिकाणी नेऊन ठेवा.  रोज सकाळी फिरायला जातांना बरोबर पाणी घेवून जा आणि ही रिकामी झालेली बाटली भरून या.  त्यामुळे ह्या पक्षांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही आणि तुम्हांलाही त्यांना पाणी दिल्याचे आत्मिक समाधान मिळून जाईल. ह्याचा अजून एक उपयोग म्हणजे तुम्हीं तुमच्या बागेतील झाडांनाही ठिबक सिंचन योजने द्वारे पाणी देवून ती ह्या कडक उन्हात जिवंत ठेवू शकता.
मी काही फार मोठे वैज्ञानिक संशोधन वगैरे केल्याचा आव आणत नाही.  तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी हा प्रयोग केलाही असेल.  तरीही ज्यांनी हा केला नसेल त्यांच्या साठी अजूनही वेळ गेलेली नाही.. आजकाल मी तर माझ्याबरोबर ह्या प्रकारच्या बाटल्या बनवण्याचे साहित्य बरोबरच ठेवलेले असते.  तुमच्याकडची पाण्याची बाटली द्या, मी तुम्हांला अगदी पाच मिनिटांत फोटोत दाखवल्याप्रमाणे ही ठिबक सिंचन योजना करून देवू शकतो. तेवढेच मनाला समाधान बाकी काही नाही.
कराल ना एवढचं आपल्या ह्या पक्षी मित्रांसाठी...
पर्यावरण रक्षणासाठी आपला हा खारीचा वाटा खूप अनमोल आहे हे लक्षात असू द्या.  हे पक्षी जर वाचले तरच हे पर्यावरण वाचेल हे नक्की.

रविंद्र कामठे
१४ एप्रिल २०१९

Wednesday, 3 April 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – सहाच महिन्यांची नोकरी


अनुभवाच्या शिदोरीतून सहाच महिन्यांची नोकरी
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

मला आपल्या ह्या स्मरणशक्तीबद्दल एक कुतूहल वाटत आले आहे. निसर्गाने माणसाला जर स्मरणशक्तीचे वरदान दिले नसते तर ???? असा एक वेगळाच प्रश्न माझ्या डोक्यात घोळत बसतो, ज्याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात; नकळत मी अजून एका अनुभवाच्या भोवऱ्यात जावून अडकतो !  हा भोवरा इतका विलक्षण असतो की, त्यातून सुटका करता करता पार दमछाक होते हो ! तसं पहायला गेलं तर ह्या चांगल्या / वाईट स्मृतींवरच आपण आपले जीवन कंठत असतो हे ही तितकंच खर आहे.

१९८६च्या सुरवातीलाच मी नुकताच माझ्या पहिल्या नोकरीचा राजीनामा दिला होता; कारण शनिवार पेठेतील एका संगणक क्षेत्रातील कंपनीच्या मुलाखती मध्ये मला आधीच्या नोकरी पेक्षा चांगल्या पगाराची आणि फिरतीची नोकरी मिळाली होती.  वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरायला मिळणार व प्रवास भत्ता आणि त्यात पगारही चांगला म्हणजे महिना १२०० रुपये मिळणार होता.  तसेच माझ्या कायद्याच्या पदवीधर परीक्षेच्या अभ्यासासाठी व परीक्षेसाठी सुट्टीही मिळणार होती.  एका हातात नोकरी मिळाल्याचे पत्र होते आणि दुसऱ्या हातात विशाखापट्टणमचे रल्वेचे तिकीट होते.  म्हणजे १ तारखेला नोकरीवर रुजू झालो आणि लगेचच दुसऱ्याच दिवशी मी आणि माझ्या बरोबरचा एक सहकारी असे आम्हीं दोघेही आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमला रवानाही झालो होतो. 

ह्या सल्लागार कंपनीला महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमधील स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेच्या निवृत्तीवेतेन धारकांच्या खात्यांचे संगणकीकरण करण्यासाठीचे कंत्राट मिळाले होते.  आमच्या कामाचे स्वरूप म्हणजे ह्या बँकेच्या खात्यातील निवृत्तवेतन धारकांची सर्व माहिती एका विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या फॉर्म मध्ये बँकेच्या रजिस्टरमधून टिपून घ्यायची व नंतर ती एका विशिष्ट संगणक प्रणालीत मध्ये नोंद करून त्या त्या बँकेच्या मुख्य कार्यालयालातल्या संगणकावर सुरक्षितरीत्या जमा करायची.  ही म्हणजे आजच्या काळातील बँकांच्या संगणकीय विस्ताराची नांदी होती असे म्हणावयास हवे ! आम्हांला विशाखापट्टणम येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेचे व जवळच्या एका गावातील शाखेचेही काम देण्यात आले होते व हे सगळे काम महिनाभरात उरकायचे होते.

एकंदरीत कामाचे स्वरूप फारच गमतीशीर होते, प्रवास करायला मिळेल ह्या उद्देशाने खरं तर मी ही नोकरी स्वीकारली होती आणि पगारही चांगला होता, पण जेंव्हा हे असले बिनडोक्याचे (असे मला वाटले) काम करायला लागल्यावर एक दोन दिवसांतच त्या कामाचा मला कंटाळा आला होता आणि ही नोकरी स्वीकारल्याचा पश्चाताप वाटायला लागला होता. 

एक तर ह्या नवख्या शहरात आणि त्यात रोज तास दोन तासाचा प्रवास करून अजून एका कुठल्यातरी खेडेगावात जायला लागायचे.  तिथल्या लोकांना ना धड हिंदी कळायचे ना धड इंग्रजी !  प्रवासात तर अनंत अडचणींचा सामना करायला लागायचा.  त्यांच्याशी संवाद साधतांना आमची पुरी दमछाक व्हायची.  परंतु काम पूर्ण करण्याशिवाय आमच्या कडे दुसरा काही पर्यायही नव्हता.  दक्षिण भारतात भाषेची इतकी अडचण असेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते ! म्हणजे मला तर वाटले होते की हिंदी नाही तर कमीत कमी तोडकं मोडकं इंग्रजी तरी बोलत असतील हे लोकं. पण छे; काहीही झाले तरी ते त्यांच्या भाषेतच आपल्याशी संभाषण साधण्याचा प्रयास करायचे.

ह्या महिनाभरात आम्हांला ना धड जेवायला वेळेवर मिळत होते ना धड मनासारखे काही खायला मिळत होते.  सगळीकडे फक्त भात आणि भात रस्सम पाहून आमची तर जेवणावरची वासनाच उडाली होती.  आईच्या हातच्या आणि महाराष्ट्रीयन जेवणाची प्रकर्षाने आठवण होत होती.

आपल्याला ह्या शहरामध्ये मस्तपैकी फिरायला मिळेल, तिथल्या ऐतिहासिक ठिकाणांची ओळख होईल, मनसोक्त खादडायला मिळेल, काही ओळखी होतील, संस्कृतीची ओळख होईल.. वगैरे वगैरे...पण ह्या सगळ्या भ्रामक कल्पनाच होत्या.  त्यांचे कारण कामा ज्या कामानिमित्त आम्हीं गेलो होतो त्यातच आमचा दिवस कधी उगवत होता आणि कधी मावळत होता हेच कळत नव्हते आणि भरीला भर रोज तिथल्या बसने तास दोन तासांचा करावा लागणारा तो प्रवास तर अगदी जीवावरच यायचा. एखाद दिवस सुट्टीचा मिळायचा तो, कडपे धुणे, ते वाळले की इस्त्री करणे, खोली साफ करणे, आठवड्याची झोप पूर्ण करणे वगैरेतच जायचा. 

महिन्याभरात सुट्टीच्या एक दोन संध्याकाळी आम्हीं मनाचा हिय्या करून जवळील रामकृष्ण बीच वर थोडावेळ फिरून आलो होतो आणि विशाखापट्टणमला आल्याचे सार्थक केले होते.  त्यानंतर माझे परत तिकडे कधी जाणेच झाले नाही त्यामुळे आता फारसे काही आठवतही नाही.  म्हणजे स्मरणशक्तीला ताण दिला तरी फारसे काही स्मरत नाही.
 
विशाखापट्टणमवरून रात्री अपरात्री पुण्यात परत आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामावर हजर झालो.  नोकरी नवीन असल्यामुळे काही पर्यायही नव्हता.  रेल्वेचा प्रवास असल्यामुळे फारसा शीण नव्हता झाला, पण एकंदरीत हे काम मला मुळातच फारसे आवडले नसल्यामुळे कामावर जायचा खूप कंटाळा आला होता.  जावे तर लागणारच होते, कारण पैशांचा आणि कामाचा अहवाल साहेबाला देणे गरजेचे होते आणि ती माझी नैतिक जबाबदारीही होती.  ती टाळणे माझ्या तत्वात बसत नव्हते.  स्वत:चीच समजूत काढून मी त्यादिवशी ऑफिसला गेलो.

विशाखापट्टणमचा माझ्याकडे असेलेला सर्व अहवाल जमा केला; त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही काळ चर्चाही झाली.  ह्या चर्चेमुळे माझा ह्या कामाबद्दलचा गैरसमज थोड्या प्रमाणात कमी झाला.  मला त्यात काही तरी नाविन्य आहे हे जाणवले.  मी समजत होतो इतके काही ते काम टुकार नव्हते !  मी नवीन असल्यामुळे माझ्याबरोबरच्या सहकाऱ्याने मला माझे काम नीट समजून सांगितलेच नव्हते (जे सांगण्याची कंपनीने त्याला जबाबदारी दिली होती) आणि त्याने स्वत:चे काम टाळण्यासाठी माझ्याकडून काही बारीकसारीक कामेही करून घेतली होती, त्यामुळेच माझा कामाप्रती पूर्वगृह दुषित झाला होता, एवढेच ! 

एक शिकवण मला मिळाली की, कुठल्याही प्रकारचा कामाचा अनुभव हा आपली जिज्ञासा जागृत ठेवूनच घ्यायचा असतो.  नवीन काम असले म्हणून काय झाले, थोडेसे अवलोकन, कान आणि डोळे उघडे ठेवून केलेले निरीक्षण व कामाप्रतीचा आदर हे अतिशय महत्वाचे तत्व मला उलगडले, जे मला पुढे आयुष्यभर उपयोगी पडले हे मात्र शभर टक्के खरं आहे.

नंतर मला माझ्या कामासंदर्भातले संगणकीय प्रशिक्षण देण्यात आले.  संगणकावर काम करायला मिळते आहे पाहून माझा गैरसमज दूर झाला आणि हळू हळू माझा उत्साह वाढू लागला.  दोन तीन महिने मी अगदी मन लावून हे काम तडीस नेले.  मध्येच आठ आठ दिवसांच्या महाराष्ट्रातीलच दोन तिन शाखांची कामे करून आलो होतो.  त्यामुळे माझ्या कामावर वरिष्ठ एकदम खुश झाले आणि त्यांनी मला दादरच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेची जबाबदारी दिली.  आठवड्यातून चार दिवस मी रोज सिंहगडने पुणे-दादर-पुणे करत असे व महिन्याभरात हे ही काम जबाबदारीने पूर्ण करून वरिष्ठांची शाबासकी मिळवली होती.  पुन्हा एकदा अजून एका वेगळ्या शहराची जबाबदारी माझ्यावर सोपवण्याचा त्यांचा मानस होता व त्यांनी तो मला बोलवूनही दाखवला होता.  त्याचवेळेस मी त्यांना माझ्या कायद्याच्या परीक्षेची आठवण करून दिली होती.

सारख्या फिरतीमुळे मला माझ्या कायद्याच्या पदवी शिक्षणात मोठा अडसर होऊ लागला होता.  मुळात मला अभ्यासाला आणि परीक्षेसाठी महिनाभराची रजा देण्याचे माझ्या मुलाखतीतच मालकांनी मान्य केले होते.  परंतु कामाचा ताण वाढल्यामुळे त्यांनी मला रजा देण्यास नकार दिला आणि माझ्या समोर नोकरी सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नाही.  माझा राजीनामा नामंजूर करण्यात आला, पण माझा नाईलाज होता व जेमतेम सहमहीनेच मला ही नोकरी करण्याचा योग आला.  कारण मला कायद्याची पदवी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होते.  अशातच आमच्याच कर्तुत्वाने म्हणा अथवा नशिबाने म्हणा, चारीमुंड्या चीतपट होण्याचे गृह्मानही अगदी जोरावर होते... 

रविंद्र कामठे

अनुभवाच्या शिदोरीतून – निवृत्तीचा सोहळा


अनुभवाच्या शिदोरीतून निवृत्तीचा सोहळा

दुपारचे ४.३० वाजले होते.  मला एक फोन येतो.  सर, तुम्हीं तुमच्या चेंबरमधेच थांबा.  तुम्हांला बोलवले की वर टेरेसवर या !  पाच मिनिटांनी आमचे एक माजी आणि एक आजी संचालक, मला माझ्या पहिल्या मजल्यावरील चेंबरमधे, माझ्या निवृत्तीनिमित्त, तिथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभाच्या ठिकाणी, अतिशय सन्मानाने न्यायला आले होते.  त्या क्षणाला मला काय बोलावे हेच सुचत नव्हते.  क्षणभर मी स्तब्धच झालो होतो.  कसा बसा भावनांना आवर घालून एक आवंढा गिळला आणि त्यांच्या बरोबर चालू लागलो.  माझ्या त्या वेळेसच्या भावना मला व्यक्त करताच येणार नाहीत इतक्या संस्मरणीय आहेत !
त्यापुढे जाऊन अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे; आमच्या कार्यालयाच्या टेरेसकडे जाणाऱ्या पायऱ्यांपासून ते समारंभाच्या ठिकाणी पोहचेपर्यंत, दुतर्फा उभे राहून सगळ्यांनी टाळ्या वाजवून मला माझ्या निवृत्ती निमित्त दिलेली सलामी म्हणजे; खऱ्या अर्थाने माझ्या आजवरच्या कार्याचा केलेला अनमोल असा गौरवच होता, असेच म्हणावयास हवे.  पाच मिनिटे चाललेला टाळ्यांचा हा कडकडाट, मला एका वेगळ्याच विश्वात घेवून गेला होता.  गेली ४० वर्षे केलेल्या कामाचे इतके अविस्मरणीय फळ लाभल्यामुळे मला कृतकृत्य झाल्या सारखे वाटत होते.  हात जोडून सगळ्यांच्या माझ्याप्रतीच्या आदराचा स्वीकार करतांना, मी अजूनच भावूक होवून, अतिशय जड अंत:करणाने व्यासपीठाकडे चालत होतो. 
माझ्या निवृत्ती निमित्त एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला असेल ह्याची मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती.  कंपनीच्या संचालकांचे माझ्याबद्दलच्या प्रेम, स्नेह आणि आदराने माझा ऊर अभिमानाने भरून आला होता.  माझ्या ह्या सहकाऱ्यांच्या नजरेतून, त्यांच्या हालचालीतून माझ्याबद्दलची आस्था मला अगदी स्पष्टपणे जाणवत होती आणि मी मनोमन स्वत:ला खूप नशीबवान समजत होतो.  किती मोठी दौलत मी आजवर कमावली होती तिचा हा लेखाजोखा माझे डोळे दिपवूनच गेला होता आणि मला सर्वांदेखत रुमाल काढून माझ्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू टिपायला भाग पाडून गेला.
एक एक करून माझे काही सहकारी त्यांच्या भाषणातून, कवितेतून, विनसीस मधील माझ्या आजवरच्या कारकीर्दीचा, मागोवा घेवून मला अजूनच भावूक करून टाकत होते.  माझ्यातील काही कला गुणांची त्यांनी केलेली पारख ऐकतांना मन प्रसन्न झाले होते.  आपल्या कार्याचा नुसता आढावा जरी घेतला तरी अभिमान वाटतो; इथे तर माझ्यावर कौतुकाचा नुसता वर्षाव होत होता.  अतिशय नेमक्या शब्दांमध्ये माझ्या आजवरच्या कार्याचा असा मागोवा घेतांना काही अतिशय अनमोल अशा आठवणी व्यक्त केल्या गेल्या की त्या स्मृतींवर मी उर्वरित आयुष्य नक्कीच आनंदाने घालवू शकेन !  आपल्या हयातीतच नव्हे तर योग्य वयात जर आपले कौतुक केले गेले तर माझ्या मते जगायची एक नवी उमेद नक्कीच येते व आयुष्य सार्थकी लागल्याचे सुख मिळते, हे ह्या कार्यक्रमामुळे मला उमजले.  जीवन गौरव व्हावा पण तो योग्य वयात व्हावा असे मला वाटले आणि तो आज ह्या समारंभाच्या निमित्ताने जाणवला. 
ह्या समारंभात मला बहुमुल्य भेटी तर मिळाल्याच; त्या स्वीकारतांना हात तर जड होतच होते पण अंत:करणही तितकेच जड होत होते.  काळीज हलके होवून कधी नव्हे इतके डोळे पाणावले होते.  माझा एवढा आदर सन्मान करणाऱ्या कोणाचे, कसे आणि किती आभार मानायचे ह्या विचारत मी काही क्षण गढून गेलो होतो.
शेवटी तो अतिशय अवघड असा क्षण आलाच व मला माझे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली.  आधीच मी ह्या सगळ्यांच्या प्रेमाने, स्नेहाने आणि आदराने इतका भारावून गेलो होतो की; दोन मिनिटे शांत उभे राहून भरल्या डोळ्यांनी सर्वांना अभिवादन करून बोलायला सुरवात केली.  सुरवात अर्थातच अडखळतच झाली.  अशा वेळी काय बोलायचे !  ही वेळ काय आपल्या आयुष्यात नेहमी येत असते का ! तरीही कसाबसा धीर एकवटून मी माझे मनोगत व्यक्त केले.  नियोजित वेळे आधीच म्हणजे वयाच्या ५६व्या वर्षीच मी निवृत्त होण्याचा निर्णय का घेतला होता हे ऐकण्याची सगळ्यांची इच्छा होती जी मला जाणवत होती. 
माझे निवृत्तीचे प्रयोजनही तसे खासच होते !  एक तर सध्या मला तब्बेत साथ देत नव्हती व रोजची कामाची दगदग सहनही होत नव्हती.  त्यामुळे तब्बेतीकडे लक्ष देण्यास वेळ मिळावा व त्यातून सुधारणा झाल्यानंतर एखाद्या सामाजिक कार्यास हातभार लावून समाजाचे ऋण फेडावे. तसेच थोडेसे उशिराच सुचलेले शहाणपण म्हणजे साहित्य क्षेत्रात काही योगदान देता आले तर ते ही करावे; इतकीच प्रांजळ अपेक्षा समोर ठेवून मी हा निर्णय घेतला होता.  तब्बेतीने थोडी साथ ढिली केली होती पण परिस्थितीची आणि कुटुंबाची मजबूत साथ लाभली होती त्यामुळे आयुष्याची ही दुसरी खेळी जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने जगण्याचा माझा मानस मी व्यक्त केला होता.
हो विनसीस ही माझ्या ४० वर्षाच्या कारकिर्दीतील १३वी पण शेवटची नोकरी होती.  ह्या ४० वर्षामधील शेवटची ही ११वर्षे विनसीस मध्ये फारच सन्मानाने गेली होती त्याची प्रचीती मला ह्या कार्यक्रमात पदोपदी येत होती.  गेली ४० वर्षे मी भरपूर खूप खस्ता खाल्ल्यात.  नको इतके कष्ट केलेत. यंत्रा सारखे स्वत:चे शरीर वापरले होते.  त्यामुळे आता त्याला थोडी विश्रांती द्यावी थोडेसे स्वत:कडे लक्ष द्यावे, आपले छंद जोपासावे असे वाटले म्हणून हा योग्य वेळी घेतलेला निवृत्तीचा निर्णय सर्वच सहकाऱ्यांना अगदी मनापासून आवडला.  काहींनी तर मला प्रत्यक्ष भेटून माझे ह्या निर्णयाबद्दल खास अभिनंदन केले आणि माझा आदर्श समोर ठेवून त्यांची उर्वरित कारकीर्द पार पाडण्याची हमीच देवून गेले.  अजून काय हवे असते हो माणसाला.  कितीही पैसा कमावला तरी हे असे क्षण पदरात पडायला फक्त नशीबच असावे लागते हे ही तितकेच खरे.

ह्या कार्यक्रमासाठी खास तयार करून आणलेला केक त्यावर (All the best RK) हा संदेश. ह्या केकवर सुरी फिरवतांना खूप संमिश्र अशा भावना माझ्या मनात त्यावेळेस दाटून येवून माझ्या काळजाचे पाणी पाणी करून न राहवून मला रडवूनच गेल्या.
समारंभानिमित्त आयोजित अल्पोपहाराचा आस्वाद घेतांना उपस्थित प्रत्यकेजण, अगदी आपुलकीने, “सर तब्बेतीची काळजी घ्या”  जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा आम्हांला भेटायला या, आम्हांला मार्गदर्शन करा”, असे आवर्जून भेटून सागंत होता आणि मी स्वत:ला एक नशीबवान उत्सवमूर्ती समजत होतो.
ह्या सोहळ्याच्या आयोजन करणाऱ्या आमच्या कमिटीचे किती आभार मानायचे हेच मला काही समजत नाही.  ह्या कमिटीत माझी भाची सुद्धा होती, पण तिने मला ह्या संपूर्ण कार्यक्रमाची थोडीशी सुद्धा चाहूल लागून दिली नव्हती.  ह्या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था आमचे मनुष्यबळ अधिकारी, कार्यकारी संचालक आणि संचालिका (भारतात नसतांनाही) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती हे विशेष.  
ह्या सोहळ्यानिमित्त, बायको, मुलगी आणि जावई, ह्यांनी मला घरी न्यायला येवून दिलेला धक्का सुखद असा आयुष्याचा ठेवा होता. 

हाच तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा दिवस; शनिवार ३० मार्च २०१९.  ह्या दिवशी मी विनसीस आयटी सर्विसेस ह्या खाजगी कंपनीतून १० वर्षे ८ महिन्यांच्या अखंड कालखंडानंतर व आयुष्यातल्या ४० वर्षांच्या अथक सेवेतून वयाच्या ५६व्या वर्षी मी निवृत्त झालो होतो व माझ्याच एका कवितेशी समरस होवून गेलो होतो...
क्षण निवृत्तीचा, असतो दुभाषी,
एक मन म्हणते, निष्क्रिय झालासी, दुजे मन सांगते, सक्रीय व्हावेसी ||
क्षण निवृत्तीचा, असतो विलक्षण,
एक मन करते, भूतकाळाचे परीक्षण, दुजे मन सांगते, भविष्याची उजळण ||
क्षण निवृत्तीचा, असतो दुर्मिळ,
एक मन म्हणते, स्मृती तू उजळ, दुजे मन सांगते, क्षण हे उधळ ||
क्षण निवृत्तीचा, असतो अभिलाषी,
एक मन म्हणते, उरलास सकळासी, दुजे मन सांगते, जुळवून घे समाजासी ||

आभार म्हणून नाही पण माझ्या सहकाऱ्यांच्या प्रेमा पोटी मला म्हणावेसे वाटते की;
सुवर्णाक्षरांनी गेला लिहीला,
माझ्या निवृतीचा हा सोहाळा ।
डोळ्यांत दाटूनी आले होते पाणी
कौतुकाच्या वर्षावाने नि:शब्ध जाहली वाणी ।
कसे, किती आणि कोणा कोणाचे आभार मानू
तुमच्या ह्या स्नेहाने मन गेले भरुन ।

रविंद्र कामठे