Friday, 29 March 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – वेश्या-मंदिरातील एक तास


अनुभवाच्या शिदोरीतून वेश्या-मंदिरातील एक तास
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख  
१९८० चा तो काळ.  तेव्हा मी अवघा १७वर्षांचा होतो.  त्यावेळेस मी आमच्या ओळखीच्यांच्या, डेक्कन बस स्थानकाच्या पाठीमागील, एका फोटो स्टुडीओत अर्धवेळ काम करायचो.  तिथेच माझी आणि हर्षदची ओळख झाली.  एक दिवस संध्याकाळी आमचे काम संपल्यावर हर्षद मला म्हणाला; रव्या चल तुला एक गंमत दाखवतो’, असे म्हणून तो मला समाधान हॉटेलच्या मागच्या एका गल्लीत घेवून गेला.  आजवर मी ह्या बाजूला कधी फिरकलोच नव्हतो त्यामुळे आपण कुठे चाललो आहोत हे मला कळतच नव्हते.  पूर्ण अनभिज्ञ होतो मी ह्या सगळ्यापासून आणि ते समजून घेण्याचे माझे वयही नव्हते हो !

रस्त्याच्या दुतर्फा दोन मजली घरे होती आणि जिकडे पहावे तिकडे खिडक्यांतून परकर पोलकं घातलेल्या, भडक मेकअप केलेल्या पोरीच पोरी उभ्या होत्या.  काही घरांच्या खाली पुरुषांशी म्हणजे त्यांच्या ग्राहकांशी बोलत उभ्या होत्या.  देहविक्री करण्याऱ्या त्या पोरी आलेल्या गिऱ्हाईकाला पटवण्याचा अगदी कौशल्याने प्रयत्न करत होत्या.  माझ्या तरी हे सगळे आकलनशक्ती पलीकडले होते.  मनातल्या मनात हर्षदला एक सारख्या शिव्या हासडत होतो; की आरे कुठल्या नरकात घेवून चालला आहेस रे मित्रा, मला !

एक दोन गल्ल्या पार करून शेवटी हर्षद एका घराचा जिना चढू लागला.  दुसऱ्या मजल्यावरच्या एका मोठ्ठ्या खोलीत मला हर्षदने बसवले आणि तो मी आलोच १५-२० मिनिटांत असे सांगून आत कुठे तरी निघून गेला.  मी बसलो होतो त्या खोलीत १०-१२ पोरी विचित्र (हिडीस) हावभाव करत इकडून तिकडे फिरत होत्या.  अजून दोघे जण त्या खोलीत बसलेले होते.  ह्या पोरी त्यांच्याकडे पाहून; ऐ चल ना ! आज मेरे साथ बैठ ना ! एक बार बैठ मेरे साथ, जिंदगी भर याद रखेगा !  पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:च्या देहविक्रीसाठीचे ह्या पोरींची चाललेली ही जीवघेणी तडफड पाहून मला मनातल्या मनात खूप गलबलून येत होते व माझ्या अंगावर काटा उभा रहात होता.

१५-२० मिनिटांत आलो म्हणून सांगून गेलेला हर्षद आत जावून ४० मिनिटे होऊन गेली होती तरी परत आला नव्हता; त्यामुळे माझा जीव नुसता वर खाली होत होता.  त्यात तो आत कुठे गेला आहे हे समजायलाही मार्ग नव्हता.  का कोण जाणे, इतक्यावेळात ह्या मुलींबद्दल माझ्या मनात एक प्रकराची सहानुभूतीची भावना निर्माण झाली होती.  देहविक्री हा त्यांचा धंदा होता व तो त्या अतिशय प्रामाणिकपणे आणि निघुतीने करत होत्या, त्यात त्यांचे काहीच चुकत नव्हते.  मीच चुकीच्या ठिकाणी गेलो होतो. असतील त्यांच्या काही कथा, व्यथा, असे मनातल्या मनात म्हणत मी आहे तिथेच बसून हर्षदची वाट बघत होतो.

एकदाचा हर्षद आला आणि माझ्या हाताला धरून मला आत घेवून जायला लागला.  मला त्याची शंका आली.  मी त्याला म्हणालो; हर्षद, माझा हात सोड ! मला हे असले घाणेरडे उद्योग अजिबात करायचे नाहीत ! तुझे तुलाच लखलाभ !  मला इथे आणून तू आज फार मोठी चूक केली आहेस.  मी तुझे हे सगळे उपद्व्याप तुझ्या घरी सांगणार आहे !  मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही.  आज पासून आपली मैत्री संपली....

हर्षद्वर माझ्या बोलण्याचा काही एक परिणाम होत नव्हता.  तो माझे काही एक न ऐकता मला आत कुठेतरी घेवून चालला होता.  माझ्या समोर ह्या दिव्व्यातून बाहेर पडण्यासाठी, त्याच्या बरोबर जाण्याशिवाय काही पर्यायही शिल्लक राहिला नव्हता.  अरुंद अशा, एका मोठ्या चिंचोळ्या खोलीत हर्षद मला घेवून चालला होता.  त्यातच एका बाजूला साधारण ५ फुट रुंद व ८ फुट लांब अशा निमुळत्या खोल्या होत्या आणि त्यांना सरकती दारे होती.  एक एक खोली ओलांडताना आतून नको नको ते आवाज आणि संवाद कानावर पडत होते.  एक प्रकारचा कोंदट आणि कुबट वास सगळीकडून येत होता.  मी तर जीव मुठीत धरूनच हर्षदच्या बरोबर चाललो होतो, नव्हे फरफटत जात होतो.  मला कुठल्याही क्षणी उलटी होईल असे वाटे होते.

सरते शेवटी हर्षदच्या त्या पोरीची ती खोली आली.  जेमतेम एक खाट मावेल एवढी ती खोली होती, त्यावर गलिच्छ गादी होती व त्यावर कळकटलेली, मळकटलेली, कसले तरी प्रंचड डाग पडलेली एक चादर घातलेली होती. भिंतीला गडद निळा रंग होता, काही भागाचे पोपडे उडालेले होते आणि वर एक पंखा जीवावर आल्यासारखा फिरत होता.  अशा खोलीत हर्षद इतका वेळ काय करत होता हेच मला समजत नव्हते मी सुन्न होऊन त्याच्या बाजूला उभा होतो.  हर्षदने मला आत घेतले आणि खोलीचा सरकता दरवाजा बंद केला.  त्या क्षणाला मी मात्र पुरता घाबरून गेलो होतो.  मला तर दरदरून घामच फुटला होता.  माझी तत पपच झाली होती.  माझी ही अवस्था बघून हर्षदने फार वेळ न दवडता माझी त्या मुली बरोबर म्हणजे, त्या रूपा बरोबर; त्याची बहिण म्हणून ओळख करून दिली आणि क्षणार्धात माझी बोलतीच बंद झाली. 

नाकीडोळी नीटस, सर्वसामन्य घरातली वाटणारी २५वर्षांचीच असावी ती; अवघ्या २० व्या वर्षीच तिच्या आयुष्याची नियतीने ह्या धंद्याला लावून राखरांगोळी करून ५ वर्षे लोटली होती.  चांगले चारचौघीसारखे कपडे घालून जर का ही रूपाताई बाहेर पडली असती तर ती एक वेश्या आहे हे सांगूनही कोणाचा विश्वास बसला नसता.  परिस्थिती माणसाला काय काय करायला लावेल ह्याचे रूपाताई हे एक ज्वलंत उदाहरणच होती.  त्या रुपाकडे पाहून माझे तर काळीजच हळहळले आणि डोळेच भरून आले. 

एकतर मी इतक्यावेळ हर्षदला त्याने मला ह्या नरकात आणल्याबद्दल घाल घाल शिव्या घातल्या होत्या.  पण त्याच नरकात एक रूपा नामक मायेने ओथंबून वाहणारी त्याची ही ताई होती, जीने हर्षदला ह्या नरकात पहिल्यांदा आल्यावर पुढे जाण्यास नकार देवून; त्याच्या आयुष्याची होणारी विल्हेवाट वाचवली होती !  आज म्हणूनच तर तीच ती रूपाबाई हर्षद्ची सर्वात लाडकी ताई झाली होती आणि तिलाच भेटायला हा पठ्ठ्या ह्या सगळ्या नरकात नियमितपणे येत होता, हे कोडं उलगडल्यावर माझे दोन्ही हात आपसूकच जोडले गेले होते आणि त्या दोघांपुढे मी नतमस्तक झालो होतो.

हर्षदचे हे रूप पाहून मला त्याचे पाय धरून त्याची माफी मागावीशी वाटत होते.  गेले एक वर्ष हर्षद महिन्यातून एकदातरी आपल्या ह्या रूपाताईला भेटायला ह्या नरकात येत होता.  ते ही आज नाही तर उद्या रूपाताई ह्या व्यवसायाला रामराम म्हणेल व एखाद्या चांगल्या मार्गला लागेल ह्या आशेने...

हर्षद तिला ह्या नरकातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होता, पण रूपा मात्र त्याची समजूत काढत होती कारण तिची ह्या नरकातून बाहेर पडून आगीतून फुफाट्यात जायची मनाची तयारी होत नव्हती !

गेले तास भर माझ्या मनावर आलेला तो प्रंचड मोठ्ठा ताण, एकदम हलका झाला होता.  ज्या वातावरणाची इतका वेळ मला किळस आली होती, ज्या पोरींची भीती वाटत होती, त्यांची घृणा वाटत होती, ती सगळी एकदम नाहीशी होऊन मला त्यांची सहानुभूती वाटायला लागून त्यांच्या बद्दल एक आस्था आणि आदराचीच भावना निर्माण झाली होती. 

मी विचारत पडलो होतो की, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये जर का ह्या देहविक्री करणाऱ्या (वेश्या) नसत्या तर आपल्या आया-बहिणी, सुरक्षित राहिल्या असत्या का ???

ह्या विचारांत गढून जात मी, माझ्याही नकळत ह्या वेश्या मंदिराच्या पायऱ्या उतरत होतो आणि ह्या मंदिरात घालवलेल्या त्या एक तासाचे व हर्षदचे अंतर्मुख होऊन मनोमन उपकारच मानत होतो...

रविंद्र कामठे
१० मार्च २०१९

Thursday, 14 March 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – “भरारी मिग२१ची ”


अनुभवाच्या शिदोरीतून – “भरारी मिग२१ची


चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 
१९९०ला मी जसा महिन्यातून एकदा चंद्रपूरला जायचो तसाच महिना दीडमहिन्यातून एकदा नाशिक जवळील ओझर येथील हिंदुस्थान एरोनौटिक्स ह्या मिग विमानांच्या कारखान्यात जात असे.  आमच्या कंपनीला हिंदुस्थान एरोनौटिक्स (एचएएल) ह्या कंपनीचे त्यांच्या विमानांच्या सुट्या भागांच्या रासायनिक प्रक्रिया करायच्या टाक्या बनवण्याचे व बसवण्याचे कंत्राट मिळालेले होते.  त्यामुळे मला ओझरयेथील एचएएलच्या कारखान्यात जावे लागायचे.  मला माझ्या कंपनीने ह्या कामासाठी मोठ्या विश्वासाने मुखत्यारपत्र देवून माझी ह्या प्रकल्पाचा मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक केलेली होती व माझ्यावर ह्या प्रकलपाची संपूर्ण जबाबदारी टाकलेली होती.  माझ्या आयुष्यातला हा खूप अभिमानाचा क्षण होता, जो मी आयुष्यात कधीच विसरूच शकत नाही. 

ह्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, आमच्या आकुर्डीच्या कारखान्यात वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया करण्याच्या विविध आकाराच्या, लोखंडी व त्यावर शिश्याचा लेप असेलेल्या, तसेच काही फायबर ग्लासच्या टाक्या तयार केल्या जायच्या व त्या ह्या ओझरच्या कारखान्यात नेवून बसवल्या जायच्या.  त्यासाठी आधी एचएएल कडून आलेल्या रेखाचीत्रावर आमच्याकडील आरेखन तज्ञांच्या चर्चा घडवून आणायच्या, त्याचे सगळे सोपस्कार एचएएल च्या नियमाने करून घ्यायचे व त्यांच्या आरेखन विभागाची रीतसर कागदोपत्री संमती मिळवायची.  ही संमती मिळवली की आमच्या कारखान्यात ह्या टाक्या बनवण्यास प्रत्यक्ष कामाला सुरवात व्हायची.   ह्या टाक्या बनवत असतांना वेगवेगळ्या वेळी (कंत्राटात ठरल्याप्रमाणे) एचएएलच्या अधिकाऱ्यांना ओझरहून आमच्या आकुर्डीच्या कारखान्यात आणणे, त्यांची राहण्या, खाण्याची व्यवस्था करणे.  टाक्यांची गुणवत्ता तपासणी करून झाल्यावर त्यांना परत ओझरला पोचवणे हे सगळे मलाच करावे लागायचे.  अर्थात ती माझी जबाबदारीच होती म्हणा ! 

पुन्हा एकदा अंतिम गुणवत्ता तपासणीसाठी काही अधिकाऱ्यांना आकुर्डीला आणावे लागायचे.  गुणवत्ता तपासणीतून पास झाल्यावर आमचे ६०% काम पूर्ण व्हायचे.  हे काम पूर्ण झाल्याचा अहवाल भरून त्यावर ह्या अधिकाऱ्यांची सही शिक्का घेवून त्याला आमच्या कामाचे ६०% चे बिल तयार करून घेवून ते ओझरच्या कारखान्यात लेखा विभागात जमा करायला जायचे.  लेखा विभागात हे बिल जमा करायच्या आधी तीन ते चार वेगवेगळ्या विभांगामध्ये जावून त्यांच्या संमतीच्या सह्या व शिक्के घेणेही जरुरी असायचे.  हे करतांना कधी कधी दोन दिवस तर कधी कधी तीन चार दिवसही लागत असतं.  शेवटी ते त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असयाचे.   त्यांच्या समंती नंतरच हे बिल लेखा विभागात घेतले जायचे.  एकदा का ते जमा केले की ते पुढे लेखा-परीक्षा विभागाकडे सुपूर्द व्हायचे.  अर्थात हे सगळे त्यांचे अंतर्गत काम असायचे.  पण मी निर्माण केलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे मला आमच्या बिलाचा लेखा विभाग ते धनादेश पर्यंतचा सर्व प्रवास सुरळीत पार पडायचा.  जर का कुठे अडथळा आला असेल तर तो मला तत्काळ समजण्याची सोय होती व आलेला अडथळा पार करण्याची सोयही होती.  अर्थात त्यासाठी मी कारखान्याच्या समोरच्याच बाजूला असलेल्या अधिकारी वर्गाच्या वसाहतीत आपुलकीची आणि जिव्हाळ्याची एक चक्कर नक्की मारलेली असायचीच.  साधारणपणे हे ६०% पैसे, बिल जमा केल्यापासून १५ दिवसांमध्ये आम्हांला मिळून जायचे.
 
हे झाले ६०% कामाचे.  त्यानंतर खरी मजा असायची.  ह्या तयार टाक्या ट्रकने ओझरला न्यायच्या.  त्याच्यासाठी ओझर कारखान्यातून त्या आत घेण्यासाठीची परवानगी घ्यावी लागायची, कारण ह्या टाक्या आकाराने मोठ्या म्हणजे ९-१० फूट व्यासाच्या व वजनाने खूप जड म्हणजे ३-४ टन असायच्या.  त्यांच्या सुट्टीच्या दिवशीच रविवारीच ही परवानगी मिळायची व ती सुद्धा काही तासांचीच असायची.  त्या दिलेल्या नियोजित वेळेतच आम्हांला ह्या टाक्या ट्रक मधून उतरवून त्यांनी ठरवून दिलेल्या रासायनिक प्रक्रियेच्या गाळ्यात त्या नेऊन ठेवाव्या लागायच्या.  ह्या कामासाठी क्रेन आणि जवळच्या गावातील काही माथाडी कामगार लागायचे व ह्या सगळ्याची पूर्व परवानगी त्यांची सुरक्षारक्षक चाचणी वगैरे सर्व सोपस्कार मला योग्य वेळात पूर्ण करून ठेवावे लागायचे.  परत एकदा सगळे सोपस्कार म्हणजे टाक्या मिळायची पोच, त्या बसवल्याचे पत्र व गुणवत्ता चाचणीत पास झाल्याचे पत्र हे सगळे मिळावयाचे.  हे सगळे बाड घेऊन परत आकुर्डीला यायचे.  उरलेल्या ४०% रकमेचे बिल बनवायचे व ६०% बिलाच्या वेळेस केलेले सगळे सोपस्कार पुन्हा एकदा करायचे व ओझरला जावून बिल जमा करायचे आणि पैसे मिळावयाचे.  उगाच नव्हते काही मला मुखत्यारपत्र दिले होते ते ! 

ह्या सगळ्यात माझी फार शारीरिक आणि मानसिक दमणूक व्हायची.  त्याचे कारण ह्या ओझरच्या कारखान्यात एका विभागातून दुसऱ्या विभागात फिरायचे म्हणजे पायाचे तुकडे पडायचे.  अहो विचार करा मिग विमानांच्या सुट्ट्या भागांची जुळवाजुळाव करून ते बनवण्याचा तसेच तयार झालेल्या व वापरात असलेल्या ह्या मिग२१ विमानांची देखभाल करण्याचा हा कारखाना म्हणजे अजस्त्र प्रकरण होते, त्यात त्यांचा स्वत:चा एअर पोर्टही आहे हो.  एक ते दोन किलोमीटर अंतरावर एक एक विभाग होता व त्याच्या त्या अवाढव्य शेडस.  असे किती तरी न मोजता येणारे विभाग होते ते मला आता आठवतही नाहीत.  येथील निम्नअधिकारी वर्ग मात्र आतमधील प्रवासासाठी लम्ब्रेटा नावाची स्कूटर तर उच्चवर्गीय अधिकारी जीप वापरत असतं.  नशीब फळफळले तर माझी ही पायपीट वाचायची, तर कधी कधी त्यांच्या कॅन्टीन मध्ये जेवणाचा आस्वादही घेता यायचा.

एक सांगतो ह्या काळात मी ओझरच्या ह्या कारखान्यात शेकड्याने रशियन बनावटीची मिग २१ विमाने पहिली आहेत.  कधी कधी तर ती जीपला आकडी लावून एका विभागातून दुसऱ्या विभागात नेतांना सुद्धा पहिली आहेत. आकाशात आवाजाच्या दुप्पट तिप्पट वेगाने धावणारे हे विमान असे ह्या कारखान्यात अगदी आपल्या खेळातल्या विमानासारखे भासायचे.  मला कामानिमित्ताने मिग२१चे कॉकपिट अगदी जवळून पहायची संधी मिळायची.  दरवेळेस मी धन्य होऊन मनातल्या मनात मिग२१ मधून एक भरारी मारून यायचो.  मला खरं तर माझ्या शाळेतील आठवी नववीचे ते दिवस आठवायचे जेंव्हा मी शाळेतल्या एनसीसीत होतो आणि एअरफोर्सचा कॅडेट होतो ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.  माझ्या उंचीने मार खाल्ला हो, नाही तर आज मी नक्की एअरफोर्स मध्ये वैमानिक होऊन खरेखुरे मिग२१ उडवले असते, कागदी नव्हे !  काही गोष्टी घडायला नशीब तर असायला लागतेच, पण कर्तुत्वही तेवढेच महत्वाचे असते !

ह्या ओझरच्या कारखान्यात जाण्याचा मला कधी कंटाळा आलाच नाही.  तसाही मला माझ्या कामाचा कधीच कंटाळा येत नाही.  नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे व नेटाने करणे हा तर माझा मूळ स्वभावच आहे.

मी पुण्यातून सर्वात शेवटच्या म्हणजे रात्री २३.३०च्या एशियाडने नाशिकला जात असे.  जी भल्या पहाटे कधी ४ तर कधी ५ वाजता नाशिकला पोहचवत असे.  नाशिक एसटी स्थानकात उतरले की समोरच चालत अंतरावर बसेरानावाचे जरा चांगले लॉज आहे.  तिथे कधीही गेले तरी मला एक खोली नेहमी मिळायची.  सामान टाकायचे, एक तासभर झोप काढायची.  प्रवासाचा व जागरणाचा शीण घालवायचा, सकाळी ७ वाजता उठून आवरून नाष्टा, चहा उरकून पुन्हा नाशिक बसस्थानकात यायचे.  येथून सकाळी दर अर्ध्यातासाने ओझरला जाणारी बस असायची.  मिळेल ती बस (लालडबा) पकडायची आणि तासाभरात ओझरला पोहोचायचे.  एक मात्र आहे की ह्या गाड्यांना कायमच खूप गर्दी असायची व त्यात प्रवेश मिळवणे महाकठीण असायचे.  पण मला तर आत इतक्या वर्षांनी ह्या सगळ्याची सवयच झालेली होती व हे सगळे इतके अंगवळणी पडले होते की, गर्दी नसेल तरच चुकल्या सारखे वाटायचे.  कधी कधी एका दिवसांत काम व्हायचे तर कधी तीन ते चार दिवसही लागयचे.  तेंव्हा बऱ्याच वेळेचा माझा सवेरा ह्या बसेरातच व्हायचा आणि आमची स्वारी कायमच स्वप्नवत मिग२१च्या भरारीतून जमिनीवर यायची !


रविंद्र कामठे

Tuesday, 5 March 2019

अनुभवाच्या शिदोरीतून - “एक मुलाखत”

अनुभवाच्या शिदोरीतून सफल आयुष्याची गुरुकिल्ली – “एक मुलाखत

चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 
 
१९८९ चा तो काळ होता म्हणजे त्याला आज जवळ जवळ ३० वर्षे झालीत, तरीही असं वाटतंय की हे सगळ अगदी काल पर्वाच घडलंय की काय !  हो अगदी खरं आहे हे.  हे माझ्याच नाही तर तुमच्या सुद्धा बाबतीत असचं काहीस घडलेलं असणार, घडत असणार.  मी फक्त मन मोकळं करून हे अनुभव शब्दबद्ध करून माझ्या ह्या अविस्मरणीय स्मृतींचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. तसेच त्यानिमित्ताने तुम्हां रसिक वाचकांशी संवाद साधण्याचे हे एक उत्तम असे साधन समजतोय.  चूक भूल माफ असावी !

आकुर्डीतील एका खाजगी कंपनी मध्ये १९८९-१९९४ ह्या काळात मी कामाला होतो.  त्याच कंपनीमधील नोकरी साठीच्या माझ्या मुलाखतीचा हा एक अविस्मरणीय असा अनुभव माझ्या आयुष्यात मला खूप काही शिकवून गेला आणि खूप काही देवून गेला.  ह्या मुलाखतीच्या सफलतेमुळे १९८९-१९९४ हा पाच वर्षांचा सुवर्णकाळ माझ्यासाठी आणि आमच्या संसारासाठी अनमोल ठरला आहे हे काही वेगळे सांगायला नको.  ह्याच काळाने आमच्या उर्वरित सुखी आणि समाधानी आयुष्याची भक्कम पायाभरणी केली होती हे विसरून कसे चालेल !  “इमारतीचा काय अथवा तुमच्या उद्दिष्टांचा काय, पाया जर आत्मविश्वासाने भरून भक्कम केलेला असेल तर कितीही संकटे आली तरी इमारत कधीही कोसळत नाही अथवा उद्दिष्टांपासून तुम्हांला कोणीही दूर लोटू शकत नाही”, हाच काय तो अनुभवाचा ठेवा मला आजवर लाभला आहे हे इथे नमूद करावेसे वाटते.

ह्या आधी मी १९८३ सालापासून १९८५ पर्यंत दोन अगदी छोट्याशा कारखान्यांमध्ये एक एक वर्षे नोकरी केलेली होती.  ते करत असतांनाच कायद्याचे पदवीधर होण्याचे ठरवलेले होते.  कारण आयुष्यात पुढे जावून काही उद्दिष्ट गाठायचे असेल तर नुसते पदवीधर होऊन चालणार नव्हते.  थोडे उच्च शिक्षण तर हवेच होते, परंतु आपल्या खिश्याला परवडेल व बुद्धिमत्तेला झेपेल असेच काहीतरी शिकायला हवे होते, जेणेकरून चांगली नोकरी मिळवता येईल.   अर्थात हे तीन चार वर्षांचे शिक्षण व त्याचा खर्च मला एखादी अर्धवेळ नोकरी करूनच करावे लागणार होते.  त्यामुळेच वडिलांच्या ओळखीने मला त्यांच्याच नोकरीच्या ठिकाणी म्हणजे कृषी महाविद्यालयात बदली कारकून म्हणून कंत्राटी पद्धतीवर नोकरी मिळाली होती.  सकाळी कॉलेज करून १० वाजता कृषी महाविद्यालयात मी जवळ जवळ दीडएक वर्ष कारकुनी केली आहे हे सांगताना मन कसं त्याही स्मृतींमध्ये अलगद गुरफटून जातं. 

असा एकंदरीत पाच वर्षांचा अनुभव माझ्या गाठीशी होता.  त्यात मी वाणिज्य आणि कायदा ह्या शाखेंचा पदवीधर होतो.  १९८७ सालीच माझे लग्न होवून १९८८ ला आमच्या संसारवेलीवर एक गोंडस फुल उमलून आम्हांला एक धनाची पेटी लाभलेली होती.  संसाराच्या जबाबदारीच्या जाणीवेने मी आता आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी शोधायला हवी अशा विचारत होतो.  त्याच विचारांती १९८९ साली वृत्तपत्रातील जाहिरात पाहून मी ह्या आकुर्डीच्या एका कंपनी मध्ये अर्ज केला होता.  ह्या कंपनी मध्ये माझी मुलाखती साठी निवड करण्यात आली होती.  ऑफिस असिस्टटअशी एकच जागा ती ही त्यांच्या आकुर्डी मधील कारखान्यात होती. 

जवळ जवळ ५०-१०० जणांनी ह्या नोकरी साठी अर्ज केले होते व त्यातून त्यांनी १५-१६ उमेदवारांना मुलाखतीला बोलावले होते.  त्यांच्या बंडगार्डन येथील मुख्य कार्यालयात सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे दाखले व दोन ओळखीची पत्रे घेऊन ह्या मुलाखतीला बोलावण्यात आले होते.  वेळेच्या पंधरा मिनिटे आधीच मी लागणारी सर्व कागदपत्रे (सरकारी अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानिशी) व तयार केलेल्या प्रती घेऊन त्यांच्या कार्यालयात पोचलो होतो.  सुरक्षारक्षकाने रीतसर चौकशी करून, कुठल्याश्या यंत्राने माझी अंगभर तपासणी करून नंतरच मला आत सोडले होते.  माझ्या आधी काही जण आत गेलेले होते आणि माझ्या मागेही एक दोन जण उभे होते.  बापरे इतके जण एका जागे साठी !  मला तर धडकीच भरली होती.  आपले कसं निभवायचं ह्या सगळ्यांच्यात असे वाटलं होतं.  मनात धाकधूक होत होती. 

स्वागत कक्षा मधील महिलेस मला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं पत्र दाखवले.  त्यांनी ते पाहून त्यावरील माझ्या वेळेची त्यांच्या एका वहीत नोंद करून घेतली आणि मला इतर उम्देवारांच्याबरोबर बसण्यास सांगितले.  त्यांच्या बोलण्यातील नम्रपणा, आदरातिथ्याची भावना व कार्यालयाचा नीटनेटकेपणा, प्रशस्तपणा माझ्या मनाला तर खूप भावून गेला.  हीच ती चांगली नोकरी जी मी गेले वर्ष दोन वर्ष शोधत होतो असे मला वाटले होते.  मनावर थोडेसे दडपणही आलेलं होते, घशाला कोरड पडली होती, त्यामुळे मी कोचावर बसायच्या आधी एक पेला पाणी पिऊन घेतलं.  तहान भागली व अस्थिर मन स्थिरावण्यासाठी त्याची थोडी मदतही झाली.  तुम्हीं कितीही काहीही म्हणा, पण प्रत्येकाला ह्या अशा मुलाखतींचे दडपण नक्कीच येत असणार, मी काही त्यातून निराळा नव्हतो.  माझ्या आजूबाजूला बसलेले इतर उमेदवार एकदम आत्मविश्वासाने बसलेले होते व त्यांच्या मनावर कुठलेही दडपण, तणाव मला जाणवत नव्हता. काहीजण तर अगदी सुटा-बुटात आलेले होते तर काहींनी छान टाय घातलेला होता.  मी मात्र जरा साधाच पण व्यवस्थित इस्त्री केलेला पंधरा सदरा, काळी विजार व छान चकाकी केलेले काळे बूट घालून आलो होतो.   असेल बाबा त्यांना अशा मुलाखतींची सवय, असे मनातल्या मनात म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करून बरोबर आणलेली सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून मनाचे समाधान करून घेतले.  मला बोलवेपर्यंत मी मनातल्या मनात आपल्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माझ्या आकलनशक्तीनुसार उजळणी करत बसलो होतो.   ही नोकरी काहीही करून मिळवायचीच असा मनाचा हिय्या करून मी मनातल्या मनात मुलाखतीची तयारी करून ठेवली होती त्यामुळे थोडासा निर्धास्त झालो होतो.

स्वागत कक्षामधील महिलेने कंपनीचे चार संचालक व दोन अधिकारी मिळून ही मुलाखत घेणार आहेत हे त्यांच्या कंपनीच्या रिती-रिवाजानुसार आलेल्या प्रत्येक उमेदवारास सांगितले होते, तसे मलाही सांगितले.  हे कळल्यावर माझी तर पाचावरच धारण बसली.  मनावर अजून थोडासा ताणही आलेला होता.  असाही मला इतक्या मोठ्या कंपनीत मुलाखत देण्याचा फारसा अनुभवही नव्हता आणि तसा मी कधी प्रयत्नच केलेला नव्हता.  कारण पदवीधर झाल्याबरोबर एक दोन छोट्याशा कारखान्यात लगेचच नोकरी मिळाली होती आणि ती मुलाखत म्हणजे एक सोपस्कार होता असे मला इथली सगळी व्यवस्था व गर्दी पाहून वाटायला लागले होते.  माझ्या बरोबरची सगळीच पोरं चांगलीच हुशार वाटत होती, म्हणजे त्यांच्या एकंदरीत पेहरावावरून तरी ते उच्च शिक्षित आणि हुशार वाटत होते. असो.  एक एक करून आम्हांला आत बोलावले जात होते.  काहींची मुलाखत १० मिनिटे तर काहींची १५-२० मिनिटे चालत होती.  असे करता करता माझा नंबर आला व मला आत बोलावले गेले.
 
मला बोलावल्यावर मी दारावर टकटक करून ते हलकेसे उघडून मी आत येऊ काअशी त्यांची परवानगी घेतली.  त्यांनी ती दिल्यावरच त्यांच्या त्या प्रशस्त चेंबर मध्ये प्रवेश केला व ते मला बसण्याचा आदेश कधी देतात ह्याची वाट पहात तसाच उभा राहिलो.  ते सर्वजण माझ्या आधी गेलेल्या उमेदवाराबद्दल चर्चा करत असावेत बहुधा !  साधारण एक १५-२० सेकंदच मी उभा होतो.  त्यांच्यातील मुख्य व्यवस्थापकांनी मला समोरच्या खुर्चीत हाताने खुणावून बसण्यास सांगितले.  त्यांचे आभार मानून मी त्यांनी सांगितलेल्या खुर्चीत विसावलो.  अर्थात हे सगळे संभाषण इंग्रजीत झाले होते हे वेगळे सांगायला नको.  (मी ह्या लेखामध्ये शक्यतो इग्रजी शब्द टाळण्याच्या प्रयत्न करतो आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच).  कंपनीचे तीन मालक-संचालक, एक कार्यकारी अधिकारी, आकुर्डीच्या विभागाचे मुख्य व्यवस्थापक आणि मुख्य कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक असे सगळे मिळून पाच जण आत एका मोठ्या टेबलाच्या समोरच्या बाजूला अगदी थाटात बसलेले होते.  

सर्व प्रथम मला माझ्याबद्दलची माहिती सांगण्यास सांगितले.  माझ्या अर्जात मी जसे लिहिले होते अगदी तसेच थोड्याफार फरकाने सांगून मी मोकळा झालो.  त्यामुळे माझ्यातला आत्मविश्वास थोडासा बळावला होता आणि मनावरचा ताणही थोडासा हलका झाला होता.  आपल्याला समाधानकारक पद्धतीने इंग्रजी बोलता येते आहे हे उमजल्यामुळे माझ्याही नकळत मी खुर्चीत जरा सावरून आरामात बसलो होतो.  त्यानंतर मला माझ्या कामाच्या अनुभवाबद्दल काही प्रश्न विचारले गेले.  त्यांच्या प्रत्यके प्रश्नाचे अगदी मोजक्या शब्दांमध्ये मी उत्तर देत होतो.  तसेच माझे उत्तर त्यांना योग्य वाटले आहे की नाही वा पटले आहे की नाही हे ही आजमावून पाहत होतो.  जवळ जवळ २० मिनिटे माझ्या मुलाखतीला झालेली होती आणि कंपनीच्या संचालक आणि अधिकारी वर्गाच्या चेहऱ्यावरील हावभावावरून मी त्यांना समाधानकारक उत्तरे देत आहे हे मला जाणवत होते.  

आता मुख्य व्यवस्थापकांनी मला माझ्या कामाचे स्वरूप काय असणार आहे ते सांगितले व त्या संदर्भातील काही प्रश्न विचारून माझी ह्या जागेसाठीची पात्रता पडताळून पाहू लागले.  मला त्यांनी विचारलेल्या प्रत्यके प्रश्नाचा रोख काय आहे ते समजत होते.  जर का एखादा प्रश्न मला समजला नाही तर मी त्यांना तो परत विचारून खात्री करून घेत होतो व त्यानुसार नीट विचार करूनच उत्तरे देत होतो.  सर्वात महत्वाचे म्हणजे मी मला जे समजत होते आणि कळत होते त्याच प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देत होतो.  उगाचच आघाऊपणा करून आपल्याला सर्व काही येत आहे असा अट्टाहास न करता आणि अजिबात खोटे न बोलता त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत होतो.  एक एक करून उपस्थित असलेल्या सर्वच जणांनी माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती केलेली होती.  मी पण त्यांच्या प्रत्यके प्रश्नास अतिशय आत्मविश्वासाने उत्तरे देत होतो.  माझ्या कडे कामाचा जेमतेम पाच वर्षांचा अनुभव होता तो ही अगदीच लहान कारखान्यातला होता, परंतु मी जी काही कामे केलेली होती, ती अतिशय मन लावून प्रामाणिकपणे केलेली होती, त्या अनुभवातून जे काही शिकलेलो होतो, जे मला माझ्या ह्या मुलाखती दरम्यान खूप उपयोगी पडत होते, हे मला पदोपदी जाणवत होते.  मुलाखतीला जवळ जवळ ३० मिनिटे होवून गेली होती आणि अजूनही काही प्रश्न त्यांना विचारवेसे वाटत होते, त्यामुळे मी अगदी योग्य मार्गावर आहे असे मला वाटू लागले होते, त्याचेच प्रत्यंतर आकुर्डीच्या मुख्य व्यवस्थापकांनी विचारलेल्या प्रश्नात आले.  ते म्हणजे तुम्हीं राहायला धनकवडीला आणि कंपनी आकुर्डीला, त्यात आमच्या कंपनीची येण्याजाण्यासाठीची कुठलीही व्यवस्था नाही.  त्यामुळे तुम्हांला जर आम्हीं ही नोकरी देऊ केलीत तर तुम्हीं कसे काय येणार जाणार.  त्यांचा हा प्रश्न अतिशय कळीचा होता आणि माझी खरी परीक्षा पाहणारा होता.  माझ्या एकंदरीत एक गोष्ट लक्षात आली होती की आपली निवड जवळ जवळ ठरलेली आहे.  परंतु आपल्या ह्या प्रश्नाच्या सकारात्मक उत्तरावरच ती शिक्कामोर्तब होऊ शकते.  मी मुलाखतीला येण्या अगोदरच ह्यावर विषयावर माझ्या बायकोशीही सविस्तर चर्चा केलेली होती व त्यावर मार्गही शोधून ठेवलेला होता.  नेमकी तीच गोष्ट मला त्यांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना खूप उपयोगी पडली.  ते म्हणजे, मी त्यांना आमच्या दोघांमध्ये झालेला संवाद अगदी थोडक्यात सांगून टाकला व त्यावरील उपाय म्हणजे मी एक मोटरसायकल विकत घेऊन माझी येण्याजाण्याची व्यवस्था करणार आहे, कारण मला तुमच्या ह्या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करून माझे उर्वरित भविष्य घडवायचे आहे !  माझे हे उत्तर उपस्थित सर्वच जणांना अगदी मनापासून पटले आणि त्यांनी मला थोडावेळ स्वागतकक्षा मध्ये बसण्यास सांगितले. 

मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ह्या ४० मिनिटांमध्ये व विचारलेल्या प्रश्नांमधून आणि मी दिलेल्या समर्पक उत्तरांमधून समोर बसलेली अनुभवी आणि जाणकार मंडळी माझ्यातल्या प्रामाणिकपणा, हजरजबाबीपणा, संयमितवृत्ती, सकारात्मक दृष्टीकोन, कामाप्रती असलेली आत्मीयता, तत्त्वनिष्ठता, कष्ट करण्याची तयारी, सचोटी आणि ध्येयवादीवृती अशा व इतर काही गुणांची तसेच माझ्यातल्या काही उणिवांची पारख करत होत्या, हे मला आज २५-३० वर्षानंतर जाणवले.  जवळ ४० मिनिटे माझी मुलाखत चालली होती त्यामुळे माझ्या नंतरच्या चार पाच उमेदवारांचे चिंताग्रस्त झालेले चेहरे मला बाहेर आल्यावर जाणवले.  एक दोघांनी हळूच विचारायचा प्रयत्नही करून पाहिला, पण तिथे फारसे बोलता येत नसल्यामुळे माझी आपसूकच सुटका झाली होती.  कारण त्यांना माझी मुलाखत सकारात्मक झालेली आहे व मला बाहेर बसण्यास सांगितले आहे हे सांगावयास लागले असते हो.  असो.  तसेही त्यांना त्यांचा अंदाज आलेलाच होता हे ही तितकेच खरे होते. 

मला मात्र हुश्श झाले होते.  मी स्वागत कक्षात येवून पुन्हा एकदा पेलाभर पाणी प्यायले व कोचावर डोळे बंद करून शांत बसून राहिलो.  साधारण ४०-४५ मिनिटांनी मला पुन्हा एकदा आत बोलवण्यास आले.  तोवर बाकीच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या होत्या व अजून एक उमेदवार सोडून बाकीचे सर्व बहुतेक त्यांनी सांगितल्याप्रमाणे निघून गेलेले होते.

मला आत बोलवून माझी मुलखात चांगली झाली आहे व माझी ह्या जागे साठी निवड करण्यात आली आहे हे सांगण्यात आले.  मला महिना ३५०० रुपये पगार ठरवण्यात आला होता.  कंपनीच्या नियमाप्रमाणे बाकीचे भत्ते इत्यादी देण्यात येणार होते.  हे सगळे मला मान्य आहे का आणि असले तर मी कधीपासून कामावर रुजू होवू शकतो हे त्यांनी मला विचारले.  एका क्षणाचीही उसंत न घेता मी सर्व गोष्टी मान्य करून १ तारखेपासून कामावर रुजू होऊ शकतो सांगितले.  (मुलाखतीची तारीख २० होती, त्यामुळे मला १० दिवसांचा अवधी तयारी साठी मिळणार होता).  व्यवस्थापकांनाही सर्वानुमते माझी संमती मान्य केली आणि माझी ह्या जागे साठी निवड झाली आहे हे शिकामोर्तब केले व मला पुन्हा एकदा बाहेर थांबण्याची विनंती केली. 

माझ्या बरोबर अजून एका उमेदवाराला त्यांनी थांबवले होते, त्याला आत बोलवण्यात आले आणि साधारण १० मिनिटांनी तो बाहेर आला व मला शुभेछ्या देवून निघून गेला.  त्याचे काम झाले नाही हे माझ्या लक्षात आले.  मनोमन मी त्याचे आभार मानले व त्यालाही पुढील मुलाखतीसाठी शुभेछ्या देवून मला कधी आत बोलावताहेत ह्याची वाट पाहू लागलो.  ५ मिनिटांत मला पुन्हा एकदा आत बोलावण्यात आले आणि ह्या वेळेस मात्र सर्वांनी माझ्याशी हस्तालोन्दन करून माझी ह्या जागे साठी निवड करून मला ही नोकरी बहाल करण्यात आली आहे असे जाहीर केले.  एक क्षण माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या परंतु मी माझ्या भावनांना आवर घातला आणि उपस्थित सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.  मला दोन दिवसांमध्ये कार्यलयात येवून पुढील सर्व सोपस्कार पुरे करण्यास सांगण्यात आले व आता आपली भेट आकुर्डीच्या कारखान्यातच होईल असे सांगतिले.

मनातल्या मनात नाचतच मी ह्या कंपनीच्या कार्यालयातून बाहेर पडलो.  एसटीडी बुथवर जावून बायकोला घरी दूरध्वनी करून ही आनंदाची बातमी दिली व जवळच्या एका टपरीवर मस्तपैकी गरमागरम वडापाव हाणला, एक चहा घेऊन इतक्या वेळ मारलेली पोटाची भूक शमवली आणि आज आपण जगच जिंकल्याच्या आविर्भावात घराकडे जायला निघालो.

ही यशस्वी मुलाखत म्हणजे माझ्या आयुष्यातला फार मोठा मैलाचा दगड होती ह्याचे प्रत्यंतर मला माझ्या आयुष्यातल्या पुढील प्रवासात कायमच जाणवत राहिले व तीच तर खरी माझ्या सफल आयुष्याची गुरुकिल्ली ठरली”.  आज ३० वर्षांनी मागे वळून पाहतांना माझ्या आयुष्यातल्या ह्या सुखद अनुभवाची आठवण येणे स्वाभाविकच आहे की नाही हो !

रविंद्र कामठे                            

Wednesday, 27 February 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – पहिली नोकरी


अनुभवाच्या शिदोरीतून पहिली नोकरी

चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

गरवारे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा मी विद्यार्थी.  त्यातल्या त्यात सोपे जावे म्हणून वाणिज्य शाखा निवडलेली आणि चक्क पहिल्याच प्रयत्नांत पासही झालेलो !  म्हणजे तसे काही फार चांगले मार्क नव्हते मिळाले, पण होते साधारण ५५% वगैरे असतील.  माझ्या मानाने आणि मी केलेल्या अभ्यासावरून हे सुद्धा मला अमंळ जास्तच वाटले होते हो !  फार खोलात जावून मी अभ्यास कसा केला आणि किती केला असले प्रश्न विचारू नका, कारण आता ह्या गोष्टीला जवळ जवळ ३५ वर्षे होवून गेलीत.  आमच्या काळात शिक्षणाला महत्व की काय ते नुकतेच कुठे यायला लागले होते एवढेच.   आमच्या आख्या खानदानात मी म्हणे पहिलावाहिला पदवीधर होतो, जो की पहिल्या इय्यतेपासून ते पदवीधर होई पर्यंत एकदाही नापास झालेला नव्हता.
 
नमनाला घडाभर तेल वाया घातले कारण ह्या निकालाच्या आधारावर मला १ जून १९८३ ला माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी मिळाली होती.  त्याचं असं झालं की, महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर सुट्टीच्या काळात, सकाळ मधील जाहिरात पाहून नोकरीसाठी सहज अर्ज केला होता. नेमका निकाल लागायला आणि त्यांनी मुलाखतीला बोलावण्याचा योगायोग जुळून आला होता.  मुलाखत झाल्यावर तासभर बसवून ठेवले आणि नंतर सांगितले की आम्हीं तुम्हांला ही नोकरी देत आहोत.  कारकूनम्हणून माझी निवड झाली होती आणि मला महिना रुपये ३५०/- पगार ठरवण्यात आला होता.  आयुष्यातल्या पहिल्याच लढाईत आम्ही चक्क घोडंमैदान मारलेलं होत राव, अजून काय पाहिजे होतं !  पुढच्या यशस्वी आयुष्याची ही तर नांदीच होती असे आत्ता म्हणावयास हरकत नाही.

३५ वर्षांपूर्वी ३५० रुपये महिना पगार, म्हणजे मी तर आनंदने नाचतच घरी पोचलो होतो.  कारण महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे १९८० पासून मी जमेल तसे छोटे मोठे काम करून महिन्याला ५०-७५ रुपये स्वखर्चासाठी कमावत असे (महाविद्यालयात जायला लागल्यापासून मी आमच्या एका मेव्हण्यांच्या फोटो स्टुडीओ मधे सकाळी ११ ते २ आणि संध्याकाळी ६ ते ९ असे पडेल ते काम करायचो व फोटोग्राफी पण शिकायचो हो ).  म्हणूनच महिन्याला ३५० रुपये म्हणजे माझ्यासाठी फारच मोठी व स्वकष्टाची कमाई होती, ह्याचे कोण एक अप्रूप मला वाटत होते म्हणून सांगू.  

ही नोकरी पुण्यातल्या हिंगणे खुर्दमधील विठ्ठलवाडी स्थित एका लहानश्या कारखान्यातील होती.  ह्या कारखान्यात मोठ मोठ्या कंपन्यांना लागणारे इलेक्ट्रिकल कंट्रोल प्यानेल बनवत असत.  माझ्या कामाचे स्वरूप म्हणजे सकाळी ७ वाजता कारखान्यातील कामगारांची हजेरी घेणे, रोजचा पत्रव्यवहार तपासणे, त्याची नोंद करणे, मालक, हिशेबनीस आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे.  थोडक्यात काय ते सांगतील ते काम करणे.  हो पण मी काही सांगकाम्या सारखं काम केलं नाही बर का !  थोडेफार स्वत:चे डोकेही चालवत असे, अर्थात अजिबात आघाऊपणा न करता बर का.  एक सांगतो पहिलीच नोकरी असल्यामुळे, मी मनातल्या मनात ठरवले होते की कुठल्याच कामाला नाही म्हणायचे नाही.  जेवढे काय शिकून घेता येईल तेवढे शिकून घ्यायचे, कामाचा अनुभव गाठीशी बांधायचा.
 
जुलै महिन्याच्या ७ तारखेला माझा पहिला पगार झाला त्या दिवशी कधी एकदा घरी जातोय आणि आईला वडिलांच्या हातात पगाराचे पाकीट ठेवतोय असे झाले होते मला.  ह्यात जो काही आनंद झाला होता तो शब्दांमध्ये सांगणे जरा कठीणच आहे हो.  स्वाभाविकच आहे हो हे सगळे, म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी कळायला लागल्यापासून ते २३व्या वर्षापर्यंत दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी माझे वडील न चुकता माझ्या आईच्या हातात त्यांच्या पगाराचे पाकीट ठेवत असत (सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांचा पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी होत असे).  आई ते पाकीट देवा पुढे ठेवत असे आणि नंतर पुन्हा वडिलांच्याकडे देत असे.  वडील त्यातले त्यांच्या खर्चासाठी ठराविक रक्कम काढून घेत असत आणि उरलेली रक्कम आईला परत त्याच पाकिटात टाकून देत असत.  त्यादिवशी संध्याकाळी वडील आमच्या सगळ्यांसाठी म्हैसूरपाक आणि फरसाणही आणत असतं.  तोच पायंडा मी पुढे चालू ठेवायचे ठरवले होते बाकी काही नाही.  माझ्या ह्या पगारातले १५० रुपये मला आई काढून देत व उरलेले २०० रुपये ती घर खर्चाला ठेवत असे.

मी लहानपणापासून माझ्या वडिलांना काबाड कष्ट करतांना पाहिलेलं असल्यामुळे, कुठल्याही कामाची लाज बाळगायची नाही हे ठरवले होते.  काम हेच आपले दैवत आहे असे समजायचे, माझ्यावर झालेले हे संस्कार ह्या पहिल्यावहिल्या नोकरीत खूप कामी आले.  तसेच आपल्या सहकाऱ्यांबद्दल कुठलेही मत बनवायचे नाही हे सुद्धा मला समजले.  माझ्या अनुभवावरून वरून सांगतो की आपले सहकारी चांगले अथवा वाईट असं काही नसतं, ते आपण त्यांचाशी कसे वागतो त्यावर अवलंबून असतं !

आम्हीं त्याकाळी डेक्कनला पुलाच्या वाडीमध्ये रहायला होतो आणि आमच्या घरापासून विठ्ठलवाडी साधारण ४-५ किलोमीटर लांब होती.  तेंव्हा पहिले काही महिने मी रोज सायकलवरून कामाला जात असे.  सकाळी ६.३० वाजता मी घरून निघत असे आणि बरोबर ६.५५ला कारखान्यात पोहचत असे.  बरोबर ७ वाजता सगळे कामगार, बाकीची मंडळी आणि आमचे मालक सुद्धा, कामावर हजर रहात असत.  जर का एखाद्याला थोडासा जरी उशीर आठवड्यातून तीन वेळा झाला तर त्याचा अर्धा दिवसाचा पगार कापला जात असे.  त्यामुळेच मला त्यांची हजेरी घेण्यासाठी ७ च्या आत हजर राहावे लागत असे.  अर्थात ह्या वक्तशीरपणाचा मला माझ्या उर्वरित आयुष्यात खूप म्हणजे खूपच फायदा झाला हे ही तितकंच खरं आहे.  ते म्हणतात ना, कुठल्याही चांगल्या सवयी आणि संस्कार हे कधीही वाया जात नाहीत, उशिरा का होईना त्याचे फळ आपल्याला मिळतेच मिळते ! 

साधारण तीन ते चार महिन्यात माझ्या डोक्यात एक दुचाकी घ्यावी असा विचार डोकावला होता.  तो मी माझ्या चुलत्यांना बोलून दाखवला.  त्यांचा माझ्यावर खूप जीव असल्यामुळे त्यांनी त्याला लगेच होकार भरला व दुसऱ्या दिवशी टिळक रोडवरील दुकानात जावून चौकशीही करून आले होते.  ४००० रुपये किमतीची टीव्हीएस५० कर्ज काढून घ्यायचे ठरले.  पण मला ते दुकानवाले कर्ज देईनात कारण खाजगी नोकरी होती ना माझी.  मग काय काकांनी त्यांच्या नावावर कर्ज काढले आणि पुढे मी महिन्याला १०० रपये हप्त्याने ते फेडले.  माझ्या आयुष्यातील कर्ज आणि हप्ते ह्यांची हीच काय ती मुहूर्तमेढ म्हणावयास हरकत नाही.  ह्या हप्त्यांनी आयुष्य मात्र सुखी केले, अर्थात ते वेळेवर भरले म्हणून हे मात्र तितकेच खरं आहे !
 
ह्या कारखान्याचे मालक अतिशय हुशार आणि कष्टाळू होते व त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे व घेण्यासारखे होते.  त्यांचा सचोटी, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, कामाप्रती असलेली निष्ठा, सहकाऱ्याबद्दल असलेला आदर, ग्राहकांच्याप्रती असलेली आत्मीयता आणि बांधिलकी,  सकारात्मक दृष्टीकोन, उत्कृष्ठ नियोजन आणि तितकेच काटेकोरपणे नियोजनाचं केलेलं पालन, समयसुचकता, आलेल्या अडचणींवर मात करण्याची क्षमता व जोखीम घेण्याची ताकद.  असे आणि अजून बरेचसे गुण मला त्यांच्या बरोबर काम करतांना जवळून न्याहाळता आले आणि माझ्यात त्यातले काही गुण नक्कीच रुजवता आले अस मला आजतरी वाटते आहे. 

एक सांगतो कुठलेही संस्कार हे आपल्याला हाताला धरून कोणीही कधीही शिकवत नाही, ते आपल्याला आपणहून पुढाकार घेऊन आत्मसाद करायचे असतात आणि आचरणात आणायचे असतात हे जेमतेम वर्ष दीडवर्षाच्या ह्या पहिल्या वहिल्या नोकरी मुळेच मला उमजले. 

ह्या नोकरी नंतर गेल्या ३५ वर्षात मी जवळ जवळ १४ नोकऱ्या केल्यात परंतु माझ्या ह्या पहिल्या नोकरीचा तो अविस्मरणीय असा काळ आजही माझ्या स्मृतीपटलावर शाबूत आहे.

रविंद्र कामठे
१२ फेब्रुवारी २०१९  

अनुभवाच्या शिदोरीतून – प्रवास चंद्रपूरचा


अनुभवाच्या शिदोरीतून प्रवास चंद्रपूरचा
ज्याचे जळते | त्यालाच कळते

१८-२४ फेब्रुवारी २०१९ च्या  साप्तहिक चपराक मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख...

साधारण १९८९-१९९४ ह्या पाच वर्षांचा तो काळ, काल अगदी सहज माझ्या स्मृतीपटलावर तरळून गेला.  एखादी जुनी चित्रफितच मी पाहतो आहे की काय इतका तो काळ माझ्या नजरेसमोर अगदी काल पर्वा घडल्याप्रमाणे एक एका प्रसंगाची आठवण करून देत होता.  खूप कष्टाचे पण आयुष्यातील मोलाचे असे ते सर्व अविस्मरणीय क्षण आजही आठवले तरी अंगावर रोमांच उभे रहातात आणि ह्या आठवणींमध्ये रमून जायला होते.

१९८९ साली मी आकुर्डी येथील एका खाजगी कंपनी मध्ये सहाय्यक विपन्नन अधिकारी पदावर रुजू झालो होतो.  मी राहायला धनकवडीला आणि कंपनी आकुर्डीला, त्यात कंपनीची बस नव्हती आणि येण्याजाण्याची सोय आपली आपण करायची होती. हे एक फार मोठे आव्हानच होते माझ्यासाठी.  अर्थातच माझ्या समोर ही नोकरी स्वीकारण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता.  एकतर मोठी व नावाजलेली कंपनी होती आणि नोकरी चांगल्या पगाराची होती.  मला आमच्या संसाराच्या उन्नतीसाठी ती करणे भागही होते.  रोज येवून-जावून ७० किलोमीटरचा प्रवास होता, तो मी बस अथवा इतर कुठल्याही सार्वजनिक वाहनाने करणे त्याकाळी शक्य नव्हते, कारण ते खूप वेळ खाऊ होते.  माझी मुलगी त्यावेळेस दीड वर्षांची होती.  वयस्कर सासू सासरे घरी असायचे.  बायकोच्या नोकरीच्या वेळा दर आठवड्याला बदलत असायच्या, कधी सकाळची, तर कधी दुपारची नाही तर रात्र पाळी असायची. त्यामुळे मला संध्याकाळी ७ पर्यंत घरी पोचणे खूप गरजेचे असायचे.  शेवटी मी आणि बायकोने खूप विचार करून एक निर्णय घेतला आणि मोठ्या धाडसाने कावासाकी ही मोटरसायकल विकत घेतली.  अर्थातच रु. २०,००००/-चे कर्ज काढून हो !  त्याकाळी मला मिळणारा पगार होता रु. ४०००/- महिना.  त्यात गाडीचा हप्ता रु. १२००/- महिना.  पेट्रोलचा खर्च रु. ८००/- महिना म्हणजे माझा निम्मा पगार गाडीच्याच नादात संपणार होता.  परंतु खूप विचारांती आम्हीं ही जोखीम घ्यायची ठरवली होती.  मग काय माझा रोजचा तो ७० किलोमीटरचा जुन्या पुणे-मुंबई हमरस्त्यावरील जीवघेणा प्रवास सुरु झाला, तो पाच वर्षे न थकता, न रडता आणि कुढता अखंड चालूच होता.  अतिशय अभिमानाने एक सांगावायसे वाटते की दर वर्षी मला माझ्या चागल्या कामाची आणि कष्टाची फळे ह्या कंपनीने दिली आणि खरोखरच आमच्या संसाराच्या उन्नतीसाठी खूप मोठा हातभार लावला हे ही तितकेच खरे आहे.  त्यामुळेच की काय ह्या कंपनीमधील ती कष्टाची पण अतिशय सुखद अशी पाच वर्षे आमच्या आयुष्यातील फार मोलाची आहेत.  काय नाही दिले ह्या पाच वर्षांनी मला !  माझ्यावर अगदी प्रेमाने विश्वास टाकणारे मालक लाभले, उत्कृष्ट सहकारी मिळाले, जीवाला जीव देणारे मित्र मिळाले, आर्थिक प्रगती झाली आणि एक सुखी व समाधानी आयुष्य लाभून कष्टाचे चीज झाले.

कंपनी मधील पाच वर्ष्यांच्या ह्या प्रवासात माझ्या आठवणीत अगदी खोलवर रुजलेला आणि मला आयुष्यात खूप काही शिकवून गेलेला हा अनुभव म्हणजे माझी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती (भांदक) तालुक्यातील चांदा दारुगोळा निमिती कारखान्यास दिलेल्या ३०-४० प्रवास भेटी !  होय ह्या ६० महिन्याच्या काळात मी जवळ जवळ ३०-४० वेळा चंद्रपूरला ह्या कारखान्यात कामा निम्मित जात होतो आणि प्रत्यके वेळेस गाठीला नवीन अनुभव घेऊन येत होतो हे मला चांगले आठवते आहे.  १९९० च्या फेब्रुवारी च्या सुरवातीला मला आमच्या व्यवस्थापकांनी आमच्या बंडगार्डन रोड येथील मुख्य कार्यालयात बोलावून घेतले आणि सागितले की उद्यापासून तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी टाकण्यात येणार व त्यासाठी तुम्हांला उद्या चंद्रपूर येथील चांदा दारुगोळा कारखान्यात जावे लागेल.  हे काम जर तुम्हीं जबाबदारीने व यशस्वीरीत्या पार पाडलेत तर तुमची पदोन्नती तर होईलच, पण तुमच्या पगारातही भरघोस वाढ करण्यात येईल.  अर्थातच व्यवस्थापनाने हा निर्णय तुमच्या आजवरच्या कामाचा विचार करून व गेल्या वर्षभरातील तुमच्यातील सचोटी आणि प्रामाणिकपणा पाहून घेतलेला आहे !  माझ्यासाठी हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असेच झाले होते हो.  त्यादिवशी मोठ्या हिरीरीने घरी आलो, घरच्यांना सर्वात आधी ही आनंदाची बातमी सांगितली.  सगळ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता.  त्याच उत्साहात मी माझी दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला जाण्याची तयारीही करून टाकली होती.  खूप दिवसांनी मी साधारण एका आठवड्यासाठी घरापासून दूर जाणार होतो.  त्यामुळे थोडेसे भावविवश व्हायला झाले होते, परंतु लगेचच स्वत:ला सावरून उर्वरित तयारीस लागलो होतो.

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सकाळी कंपनीत गेलो आणि तेथूनच चंद्रपूरच्या कामाची सर्व कागदपत्रे, जाण्यासाठीचे खर्चाचे पैसे, व इतर माहिती घेऊन संध्याकाळी जरा लवकरच म्हणजे ५ वाजता घरी यायला निघालो.  पुण्याहून चंद्रपूरला जायला थेट गाडी नव्हती.  रात्री १०.४० ला पुण्याहून कोल्हापूर-नागपूर- महाराष्ट्र एक्सप्रेस ह्या रेल्वेने वर्धा किंवा नागपूर पर्यंत जायचे.  वर्ध्याला दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता ही रेल्वे पोचेते व नागपूरला साधारण ५.३० वाजता पोचते.  एकतर वर्ध्याहून आर्वी चंद्रपूर ही ५ वाजताची एसटी पकडायची किंवा नागपूरला जावून ६.३० ची नागपूर चंद्रपूर ही एसटी घ्यायची.  म्हणजे पुण्यातून आदल्यादिवशी रात्री १० वाजता निघालेली आमची स्वारी हा सगळा द्रविडीप्राणायम करून दुसऱ्यादिवशी साधारण रात्री १०-११च्या दरम्यान म्हणजेच २४-२५ तासांनी चंद्रपूरला पोहोचायची.  अर्थातच ह्या सगळ्या प्रवासात कधीही येण्याजाण्याच्या प्रवासात आरक्षण वगैरे केल्याचे मला स्मरत नाही.  चंद्रपूर स्टेशनच्या जवळच पोलीस ग्राउंडच्या समोर सिद्धार्थ नावाचे जरा उत्तम दर्जा असलेले एक लॉज मला सापडले होते.  मी नेहमी ह्याच लॉजमध्ये उतरायचो.  कारण रात्री ११ वाजता जरी पोचलो तरी ह्या लॉजमध्ये बार असल्यामुळे जेवणाची सोय व्हायची.  अर्थातच एक बिअर आणि बोनलेस बटर चिकन हा माझा ठरलेला बेत मी जेंव्हा जेंव्हा गेलोय तेंव्हा तेंव्हा न चुकता पाळलेला आहे हे सांगावयास नको !  दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून मला चंद्रपूरहून भांद्क चांदा कारखान्याला जाणारी एसटी पकडावी लागायची.  जी मला चांदा दारुगोळा कारखान्याच्या कर्मचारी वसाहतीमधील बस थांब्यावर सोडायची.  तिथून माझ्या एका सहकारी मित्राने दिलेल्या सुचनेनुसार काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट द्यावी लागायची. त्यांच्या मुलाबाळांसाठी काही भेटवस्तू आणलेल्या असायच्या त्या त्यांच्या सुपूर्त करायच्या व नंतरच दारुगोळा कारखान्याच्या मुख्य दरवाज्याकडे वाटचाल करायची, जो साधारण एक किलोमीटर दूर होता व तेथे जायला नशीब असेल तरच रिक्षा मिळायची. नाही तर गपगुमान डोक्यावर समान घेऊन चालत जाण्याशिवाय पर्यायही नसायचा.  अगदीच कोणाला दया आलीच तर तो सायकलवर डबलसीट न्यायचा.  पण हा योग तसा दुर्मिळच म्हणायला हरकत नाही.   ह्या भेटवस्तू देण्याची जी काही प्रथा अथवा परंपरा आमच्याच आधीच्या काही भाऊबंधांनी घालून ठेवलेली होती आणि ती आता कोणालाही मोडताही येत नव्हती.  ज्याने कोणी ती मोडण्याचा प्रयत्न केला होता तो त्यांची कामं न झाल्यामुळे वैतागून शेवटी ह्याच मार्गाला आला होता हे ही एक जळजळीत सत्य होते.  (प्रवाहाच्या विरुध्द पोहायला गेल्यावर जे होते ते !).  कधी कधी आपल्याला आपली तत्वे, संस्कार गुंडाळून ठेवावी लागतात ना त्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे असे मला वाटते. 

मी नवीन असतांना मला ही प्रथा माहित नव्हती, त्यामुळे तर मी चक्क दोन दिवस दारुगोळा कारखान्याच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर असलेल्या सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांच्या कृपेने तिथे असेलेल्या प्रतीक्षा कक्षामधे माश्या मारत बसून काढलेले आहेत.  कारण मला माझ्या कामासाठी त्यांच्या कार्यालयात जायची परवानगीच मिळत नव्हती आणि ती कशी मिळवायची ह्याची तेथील सुरक्षा कर्मचारी दादच लागू दिली नव्हती.  प्रत्यके सरकारी खात्यात अशीच काहीशी त्यांच्या त्यांच्या सोयीची व्यवस्था आपल्याच माणसांनी करून ठेवलेली असते फक्त ती माहित व्हायला तुमच्या कडे एक वेगळीच प्रतिभाशक्ती आणि धैर्यशीलता असावी लागते हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.  अर्थातच इच्छा तिथे मार्गही नक्कीच असतात हे मला पदोपदी जाणवत होते.  शेवटी पुण्यातीलच एक भले गृहस्थ मला भेटले व त्यांनी सहज बोलता बोलता माझी चौकशी केली.  जेंव्हा त्यांना मी इथे दोन दिवस नुसता बसून आहे कळल्यावर त्यांनी मला इथल्या सर्व कारभाराची, हाताचे काहीही राखून न ठेवता अगदी इतंभूत माहिती देवून, माझ्यापुढील खूप मोठ्या समस्येचे निराकारण केले.  तेंव्हा पासून मी जेंव्हा जेंव्हा भांद्क येथील दारुगोळा कारखान्यात गेलोय तेंव्हा तेंव्हा अगदी एका दिवसांत म्हणजे सकाळी जावून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळी कामे आटोपून ट्रेझरीचा धनादेश घेऊन पुन्हा पुण्याकडे यायला निघालेलो आहे.  फार विलक्षण अनुभव आहे हा !   माझ्या आयुष्यात मी सदिच्छा भेटवस्तूंचा एवढा जालीम उपाय आणि त्याचा इतका तात्काळ परिणाम अजून कुठेही अनुभवला नसेन.  असो.

चंद्रपूरहून परतीचा प्रवास फारच चित्तथरारक  असायचा.  चांदा दारुगोळा कारखाना ते भांद्क रेल्वे स्टेशन हे अतंर साधारणपणे ८-१० किलोमीटर असेल.  कारखान्याच्या मुख्य गेट जवळ कधी कधी काही रिक्षा असायच्या ज्या की कोणते तरी भाडे घेऊन आलेल्या आणि परतीच्या भाड्याची वाट पाहत थांबलेल्या असायच्या.  परंतु त्या नेहमी असतीलच ह्याची मात्र खात्री नसायची.  संध्याकाळी परतीच्या प्रवासात रिक्षा मिळणे म्हणजे नशिबाचच खेळ असायचा.  आजवरच्या प्रवासात माझे दैव मात्र बलवत्तरच राहिले आहे त्यामुळे मला नेहमीच रिक्षा मिळायची.  त्यात मी त्याने मागितलेल्या भाड्याच्या रकमेत कधीही घासाघीस करायचो नाही.  कारण माझे एकमेव उद्दिष्ट बल्लारशाहुंन नागपूरला निघालेली प्रवासी गाडी पकडण्याचे असायचं.  ही प्रवासी गाडी बरोबर ५.४५ ला भांद्क रेल्वे स्टेशनमध्ये यायची व जेमतेम ५-१० सेकंद थाबायची.  अर्थात ही गाडी चुकली तर मात्र भांद्कमधेच एका रात्रीचा मुक्काम करावा लागायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मिळेल त्या एसटी ने नागपूरला किंवा वर्ध्याला जावे लागायचे आणि तिथून मुंबई अथवा पुण्याला जाणारी रेल्वे पकडावी लागायची.  एक दिवसांनी प्रवासही वाढायचा जो अतिशय कंटाळवाणा वाटायचा.  एक दोनदा माझ्यावर तशी वेळही आली होती आणि मला चक्क जैन धर्मशाळेत मुक्काम करावा लागला होता.  व्यवस्था खूपच चांगली होती पण त्यांचे अतिशय कडक नियम पाळणे व बिना कांदा लसणाचे जेवण मात्र जात नसे.  तसेच एकदा तर मी चंद्रपूरहून लाल डब्याने शिर्डी पर्यंत आणि शिर्डीहून पुण्यापर्यंत प्रवास केलेला आहे.  फक्त पुण्यात उतरल्यावर माझीच हाडे मला मोजता येत नव्हती अशी अवस्था झाली होती.  असो. 

त्यामुळेच की काय माझा प्रयत्न पाच वाजायच्या आत सर्व कामे उरकण्याचा असायचा (जो आपल्या हातात अजिबात नसतो) जो बऱ्याचदा सफलही व्हायचा.  भेट वस्तूंची किमयाच असायची ही, त्यात माझे काहीच कर्तुत्व नसायचे.  मी त्याचे श्रेय घेणे अनाठाई होईल.  पाचवाजता कामं उरकून रिक्षा मिळून निघेपर्यंत ५.१० झालेले असायचे.  रिक्षावाल्यास फक्त विनंतीवजा आर्जव करायची की आपल्याला बल्लारशा प्रवासी रेल्वे पकडायची आहे.  बास एवढे त्याला पुरेसे असयाचे.  त्याप्रमाणे भाड्यात वाढही व्हायची, पण मला काळजी नसायची.  एका रात्रीच्या मुक्कामापेक्षा त्याला १०-२० रुपये जास्त देणे केव्हाही माझ्याच फायद्याचे असायचे.  अहो मला ह्या कलाकार रिक्षावाल्यांचे फारच कौतुक वाटायचे, ह्या जास्तीच्या पैशांमुळे ते ज्या अंतरासाठी ४० मिनिटे लागतात तेच अंतर ही मंडळी अगदी २५-३० मिनिटांत कापायचे.  अर्थात ह्या सगळ्या प्रवासात मी माझे बुड सीटवर टेकल्याचे स्मरतच नाही कारण त्याने रिक्षाचे विमानच केलेलं असायचं हो.  असो.  बऱ्याचदा मी ५.३०-५-४० पर्यंत भांद्क रेल्वे स्थानकात पोहचत असे.  अडचण एकच असायची की बल्लारशाहुंन येणारी प्रवासी गाडी २ नंबरवर प्ल्याटफॉर्मवर यायची.  त्यात भांद्क हे अगदीच छोटे स्थानक असल्यामुळे रेल्वेक्रॉसिंग साठी पादचारी जिनाही नव्हता.  जीव मुठीत घेऊन रेल्वे रुळ ओलांडून पलीकडे जावे लागायचे.  एकदा तर ७० डबे असलेली दगडी कोळसा घेऊन जाणारी मालगाडी स्थानकात लाल सिग्नल मिळाला म्हणून उभी होती आणि पलीकडे जाण्याचा मार्गच तिने अडवलेला होता.  काही नेहमी ह्या गाडीने प्रवास करणारे प्रवासी जोखीम घेऊन ह्या थांबलेल्या मालगाडीच्या डब्याच्या खालून वाकून निघून जात होते.  मी पण तसा विचार केला होता पण दोन डाग सामान असल्यामुळे माझी हिम्मत होत नव्हती.  प्रवासी गाडी यायची वेळही होत आलेली होती.  शेवटी एका सद्गृहस्थाने मला मदत केली आणि मला त्या डब्यांच्या खालून वाट काढून दिली व सुखरूप पलीकडे पोचवले होते.  तेवढ्यात त्या मालगाडीला हिरवा कंदील मिळाला आणि धडाम्म आवाज करून ती मार्गस्थ झाली.  दोन तीन सेकंदाचाच काय तो फरक होता, त्यामुळे माझ्यातर काजळात धस्सच झाले होते.  चला वाचलो असे म्हणून पलीकडे पोचलो, तेवढ्यात प्रवासी गाडीही आली.  त्या सद्गृस्थाचे मनोमन आभार मानले आणि गाडी पडकली.  तिकीट तपासनीसास गाठले आणि आरक्षण मिळवले.  एक सांगतो, आमच्या सारखे नेहमी प्रवास करणाऱ्यांचे तिकीट आरक्षणा वाचून काही आडत नाही.  हे जे आमचे तिकीट तपासनीस मित्र असतात ना त्यांना आमच्या व्यथा माहित असतात आणि त्यांनी आमच्या सारख्यांसाठी काही तिकिटे नक्कीच राखून ठेवलेली असतात.  अर्थात ह्यात स्वार्थातून परमात्म साधण्याचा त्यांचा छोटासा प्रयास असतो हे ही तितकेच खरं आहे.  ह्या गाडीला नागपूर दादर ह्या एक्स्प्रेसचे दोन डबे असायचे व ते वर्ध्याला अलग होवून नागपूरहून येणाऱ्या गाडीस रात्री ११ वाजता जोडले जायचे.  त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे तिकीट तपासनीसाला थोडासा मस्का आणि योथोचीत दाम देवून व्यवस्थित शयन कक्षाचे आरक्षण मिळायचे.  वर्ध्याला रात्री ८ पर्यंत ही गाडी पोचायची आणि नागपूरहून दादरला जाणारी गाडी साधारण ११ वाजता यायची.  ३ तास ह्या डब्यांमध्ये काढावे लागायचे.  सामानाला साखळी लावून कुलूप लावायचे आणि स्टेशन समोरील साठेंच्या  (हो वर्ध्याचे माझी खासदार कै. वसंतराव साठे ह्यांचा) हॉटेलात जावून जेवायचं हा तर माझा नेहमीचाच शिरस्ताच झाला होता.  हे सगळं इतकं अंगवळणी पडलं होतं की काही विचारू नका !  जेवण झालं की दिवसभराचा थकवा जाणवायला लागायचा आणि शेवटी कंटाळून मी डब्यात जावून पथारी (म्हणजे सीटवर इंग्रजी वृतपत्र अंथरून, अंगावर एक धोतर पांघरून) टाकून मोकळे व्हायचो.   मला तर माझ्या ह्या प्रवासात वर्ध्याला नागपूर दादर गाडीला हे दोन डबे कधी जोडले जातात आणि गाडी वर्ध्याहून कधी निघायची हेच कळायचे नाही,  कारण आमची स्वारी दमून भागून झोपलेली असायची.  त्यात आमचे आरक्षण एकदम वरचे असल्यामुळे लोकांचा त्रासही फारसा व्हायचा नाही.  नेहमी प्रवास करणारे असल्यामुळे हे सगळे तसेही खूप अंगवळणी पडलेले होते.  पहाटे ६ / ७ वाजता ए चाय गरम” “चाय गरमह्या हाकेने जाग यायची.  तेंव्हा उठायचे, नाशिकरोड च्या अलीकडील कुठले स्टेशन आले आहे ते पहायचे.  तोंड धुवून मस्तपैकी एक गरम चहा घ्यायचा. निशिकरोड स्टेशन ८ वाजता यायचे.  मी शक्यतो नाशिकरोडलाच उतरत असे (तिकीट दादर पर्यंतचे असायचे, कारण चुकून झोप लागली तर वांदे नको व्हायला) आणि तिथून पुण्याला जाणारी एसटी पकडत असे.  म्हणजे त्याचं गणित असं होतं की, ह्या रेल्वेने दादरला पोचायला २ वाजायचे आणि दादरहून पुन्हा पुण्याला ५ पाच तास प्रवास, म्हणजे पुण्यात पोचायला संध्याकाळ व्हायची.  त्यामुळे मी नाशिकरोडला उतरून चक्क पुण्याला जाणारी कुठलीही एसटी पकडायचो आणि ५ तासात म्हणजे १ ते दोन च्या दरम्यान घरी पोचायचो.  अर्थात हा शोध जेंव्हा तुम्हीं नेहमी प्रवास करता तेंव्हाच अनुभवातून लागतो हे मात्र नक्की.

मी जेंव्हा जेंव्हा चंद्रपूरला जायचो तेंव्हा तेंव्हा माझ्या कंपनीचे मालक मी परत कधी येतोय ह्याची चातकासारखी वाट पहायचे, त्याचे कारण मी येतांना त्या काळचे ५-८-१० लाख रुपयांचा ट्रेझरीचा चेक आणायचो.  ह्या पैशांवर कंपनीची बरीचशी मदार असायची आणि म्हणूनच चंद्रपूरच्या साधारणपणे एक दीड महिन्यातून ठरलेल्या प्रत्येक दौऱ्यासाठी मलाच जाण्यासाठी हमखास गळ घातली जायची.  त्याचे कारणही मी जेंव्हा जेंव्हा गेलेलो तेंव्हा तेंव्हा नक्कीच पैसे घेऊनच परत येत असे.  माझ्यावर त्यामुळे आमच्या मालकांचा खूप विश्वास बसलेला होता व ते मला खूप आदराने वागावयाचे.  एक मात्र आहे की माझ्या बरोबरच्या इतर काही सहकाऱ्यांना माझा फार हेवा वाटायचा.  त्यांना वाटायचे साला, मालकांच्या अगदी मर्जीतला झाला आहे त्यात त्याच्या मनाला येईल तेवढे पैसे त्याला खर्च करायची मुभा आहे ज्याचा हिशोब तर सोडाच पण पावती, बिलं वगैरे काहीच नाही.  सदिच्छा भेटींवरच खूप खर्च करतोय पठ्ठ्या, मग का नाही काम होणार ! आम्हांला संधी मिळाली तर आम्ही सुद्धा यशस्वी होवून दाखवू !  माझ्या पाठीमागे अशी खूप चर्चा होत असे आणि माझा एक सहकारी मित्र मला आल्यावर त्याचा वृतांत सांगत असे.  मी त्याला नेहमी सांगायचो की, तू लक्ष देवू नकोस.  मालक काय ते बघून घेतील.  कारण त्यांना आणि मलाच मी चांदा कारखान्यात जावून जे काही दिवे लावले आहे ते माहिती आहेत आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण भरवसा आहे.  मी १९९४ साली नोकरी सोडल्यानंतर नंतर मला कळले की चांदा कारखान्याने ते कंत्राटच संपले होते व ते कंपनीला परत मिळाले नव्हते.

अशा रीतीने साधारण ४-५ दिवसांचा जीवाची दमणूक करणारा, पण कार्य सफलतेचा आगळा वेगळा आनंद देणारा हा प्रवास मनाला नेहमीच उभारी देवून जायचा.  ह्या चारपाच दिवसांत माझा दुचाकी वरचा रोजचा ७० किलोमीटरचा प्रवास मात्र नक्कीच वाचायचा व ह्या प्रवासचा थकवा एकदम नाहीसा व्हायचा, हे ही नसे थोडके !

ज्याचे जळते, त्यालाच कळते

रविंद्र कामठे
१६ फेब्रुवारी २०१९

Thursday, 6 December 2018

स्वार्थ-परमार्थ


स्वार्थ-परमार्थ

माणूस हा किती स्वार्थी असतो ह्याचा प्रत्यय साधारणपणे प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात नक्कीच येतच असणार नाही का ?  म्हणजेच एका माणसाला दुसऱ्या माणसाचा स्वार्थ नक्कीच कशात आहे हे तर कळतच असणार की !  तरीही माणूस अशाही परिस्थितीत जीवन जगतच असतो अगदी ह्याच स्वार्थी माणसांच्या सहवासात ह्याचे फारसे काही आश्चर्य वाटण्याचे कारणच नाही.  कारण शेवटी जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला हे जीवन, त्या विधात्याने जसे लिहून दिले आहे तसेच जगावे लागते हे मात्र निश्चित आहे.  माणसांनी उगीच टीव टीव करू नये !  म्हणजे मी हे केले, ते केले, असे केले, तसे केले, माझ्याच मुळे हे सगळे झाले, मी नसतो तर हे शक्यच नव्हते वगैरे वगैरे.  ह्या सगळ्या फुकटच्या वल्गना वाटतात. माणसाने फक्त न बोलता कर्म करीत राहावे.

स्वार्थ आणि परमार्थ म्हणजे काय?  हेच काय ते माहित नाही.  स्वार्थ कशाला म्हणायचे, तर जे जे माणसाला स्वत:च्या सोयीनुसार हवे आहे अथवा ते ते तो येनकेन प्रकारे मिळवतोच ह्यालाच स्वार्थ म्हणायचा, नाही तर काय !  आणि परमार्थ म्हणजे स्वार्थाने मिळविता मिळवता जर का जमलेच तर थोडेफार दान दुसऱ्याच्या पदरात टाकता आले अथवा तशी तजवीज करता आली म्हणजे परमार्थ होय असे मला तरी वाटते.  हे सुद्धा सगळ्यांनाच जमते असेही नाही ! चूक की बरोबर हे ज्याने त्याने ठरवावे.

स्वार्थ कधीही वाईट नसतो.  एखादे कर्म करतांना साधलेला स्वार्थ, तो कोण कोणासाठी,  कोणावरही अन्याय न करता अगदी सात्विक आणि समंजसपणे साधला असेल तर तो योग्य ठरतो.  नाहीतर त्याला अन्यायच म्हणावे लागेल.  जोरजबरदस्ती,  बळजबरी, मनाविरुद्ध एखादी गोष्ट करायला लावून स्वार्थ साधता येत नाही आणि तो लाभतही नाही.  परमार्थ दैवी कृपेनेच होतो असे मला तरी वाटते.  त्याचे कारण, परमार्थ करण्यासाठी माणसामध्ये माणुसकीचा एक दुर्मिळ असा गुण असावा लागतो आणि त्याच्यात स्वत:कडे जे आहे ते देण्याची दानत असावी लागते.  येथे दुसऱ्यांना लुबाडून केलेला दानधर्म अजिबात अपेक्षित नाही.  ज्या माणसाच्या नशिबात असेल तोच परमार्थ साधून पुण्य कमवू शकतो, हा माझातरी अनुभव आहे.  अहो अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला परमार्थ साधता येऊ शकतो.  वंचित आणि गरजवंत माणसाना सढळ हाताने, कुठेही कसलाही आडपडदा न ठेवता केलेली मदत (भिक नव्हे)  म्हणजेच परमार्थ होय.  परमार्थाने माणसाच्या मनाला खूप आनंद होतो आणि त्यामुळे माणसाचा जीव प्रसन्न होवून जातो.  आयुष्य समाधानी होते.

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपापले कर्म करीतच असतो.  काही कर्मे आपण फळांची अपेक्षा न करता करत असतो तर काही कर्मे ही मुळातच फळांचीच अपेक्षा ठेवून केलेली असतात आणि हीच कर्मे म्हणजे माणसाचा स्वार्थीपणा असतो.  ह्यात तसे पहायला गेले तर वाईट काहीच नाही.  जोपर्यंत ही कर्मे दुसऱ्या कोणाचे वाईट करत नाही तोपर्यंत ती स्वार्थी जरी असली तरी आयुष्यात जगण्यासाठी तितकीच गरजेची असतात.  अशाच आपल्या कर्मांमधून काही कर्मे अशी असतात की ज्यांची फळे आपल्या संचितात जमा होत असतात आणि जेंव्हा ही फळे परिपक्व होतात तेंव्हा ती माणसाचे प्रारब्ध म्हणून समजली जातात.  अर्थात वाईट किंवा दुष्कर्मे ही दु:खदच असतात तसेच त्यांची फळेही तेवढीच वाईट असतात.  म्हणूनच माणसांनी कर्म करतांना आपल्या संचितात जेवढा म्हणून चांगल्या कर्मांचा ठेवा करता येईल तेवढा करावा. म्हणजे हीच फळे जेंव्हा परिपक्व होऊन आपल्या प्रारब्धात येतील तेंव्हा ती आयुष्यात एक प्रकारचा गोडवा,  आनंद, सुख आणि समाधान देऊ शकतील.  जसे आपण आपल्या बँके मध्ये पैशाचा संचय करून आपल्या प्रारब्धाची सोय करत असतो ना, अगदी तसेच सत्कर्म करून परमार्थाचा संचय आपल्या आयुष्यात करावा आणि चांगल्या प्रारब्धाची सोय करून ठेवावी.

हे सगळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की स्वार्थातून परमार्थ जर साधता आला तर तो अगदी सहजपणे आणि साधेपणाने साधावा व संचितात त्याचा ठेवा करावा,  जेणेकरून प्रारब्धात उत्तरोत्तर चांगले फळ मिळून आपले आयुष्य सत्कारणी लागेल.  विधात्याने आपल्याला दिलेले माणसाचे हे जीवन सफल झाल्याचा एक आगळा वेगळा आनंद मिळेल.  शेवटी प्रत्येकाचे नशीब हे ज्याच्या त्याच्या कर्मावरच अवलंबून असते असे मला तरी वाटते आणि मला म्हणावेसे वाटते.....

आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे,
आशा निराशांचे वलय जसे, सांगावयास उरे काही नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

गेलेला क्षण परतुनी येत नसे, तडजोडीतच आयुष्य जात असे,
संघर्ष हेच आयुष्याचे गमक असे, कष्टा शिवाय आयुष्यास अर्थ नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

स्नेह हेच आयुष्याचे गमक भासे, तंट्यात आयुष्याचा पेचच दिसे,
त्यागातच सुख कमविण्याचे असे, सुख दु:ख हे तर प्रारब्ध जसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

जगण्याची कला हीच संचित असे, माणुसकीला आयुष्यात पर्याय नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे ||

रविंद्र कामठे