Tuesday, 5 March 2019

अनुभवाच्या शिदोरीतून - “एक मुलाखत”

अनुभवाच्या शिदोरीतून सफल आयुष्याची गुरुकिल्ली – “एक मुलाखत

चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 
 
१९८९ चा तो काळ होता म्हणजे त्याला आज जवळ जवळ ३० वर्षे झालीत, तरीही असं वाटतंय की हे सगळ अगदी काल पर्वाच घडलंय की काय !  हो अगदी खरं आहे हे.  हे माझ्याच नाही तर तुमच्या सुद्धा बाबतीत असचं काहीस घडलेलं असणार, घडत असणार.  मी फक्त मन मोकळं करून हे अनुभव शब्दबद्ध करून माझ्या ह्या अविस्मरणीय स्मृतींचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. तसेच त्यानिमित्ताने तुम्हां रसिक वाचकांशी संवाद साधण्याचे हे एक उत्तम असे साधन समजतोय.  चूक भूल माफ असावी !

आकुर्डीतील एका खाजगी कंपनी मध्ये १९८९-१९९४ ह्या काळात मी कामाला होतो.  त्याच कंपनीमधील नोकरी साठीच्या माझ्या मुलाखतीचा हा एक अविस्मरणीय असा अनुभव माझ्या आयुष्यात मला खूप काही शिकवून गेला आणि खूप काही देवून गेला.  ह्या मुलाखतीच्या सफलतेमुळे १९८९-१९९४ हा पाच वर्षांचा सुवर्णकाळ माझ्यासाठी आणि आमच्या संसारासाठी अनमोल ठरला आहे हे काही वेगळे सांगायला नको.  ह्याच काळाने आमच्या उर्वरित सुखी आणि समाधानी आयुष्याची भक्कम पायाभरणी केली होती हे विसरून कसे चालेल !  “इमारतीचा काय अथवा तुमच्या उद्दिष्टांचा काय, पाया जर आत्मविश्वासाने भरून भक्कम केलेला असेल तर कितीही संकटे आली तरी इमारत कधीही कोसळत नाही अथवा उद्दिष्टांपासून तुम्हांला कोणीही दूर लोटू शकत नाही”, हाच काय तो अनुभवाचा ठेवा मला आजवर लाभला आहे हे इथे नमूद करावेसे वाटते.

ह्या आधी मी १९८३ सालापासून १९८५ पर्यंत दोन अगदी छोट्याशा कारखान्यांमध्ये एक एक वर्षे नोकरी केलेली होती.  ते करत असतांनाच कायद्याचे पदवीधर होण्याचे ठरवलेले होते.  कारण आयुष्यात पुढे जावून काही उद्दिष्ट गाठायचे असेल तर नुसते पदवीधर होऊन चालणार नव्हते.  थोडे उच्च शिक्षण तर हवेच होते, परंतु आपल्या खिश्याला परवडेल व बुद्धिमत्तेला झेपेल असेच काहीतरी शिकायला हवे होते, जेणेकरून चांगली नोकरी मिळवता येईल.   अर्थात हे तीन चार वर्षांचे शिक्षण व त्याचा खर्च मला एखादी अर्धवेळ नोकरी करूनच करावे लागणार होते.  त्यामुळेच वडिलांच्या ओळखीने मला त्यांच्याच नोकरीच्या ठिकाणी म्हणजे कृषी महाविद्यालयात बदली कारकून म्हणून कंत्राटी पद्धतीवर नोकरी मिळाली होती.  सकाळी कॉलेज करून १० वाजता कृषी महाविद्यालयात मी जवळ जवळ दीडएक वर्ष कारकुनी केली आहे हे सांगताना मन कसं त्याही स्मृतींमध्ये अलगद गुरफटून जातं. 

असा एकंदरीत पाच वर्षांचा अनुभव माझ्या गाठीशी होता.  त्यात मी वाणिज्य आणि कायदा ह्या शाखेंचा पदवीधर होतो.  १९८७ सालीच माझे लग्न होवून १९८८ ला आमच्या संसारवेलीवर एक गोंडस फुल उमलून आम्हांला एक धनाची पेटी लाभलेली होती.  संसाराच्या जबाबदारीच्या जाणीवेने मी आता आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी शोधायला हवी अशा विचारत होतो.  त्याच विचारांती १९८९ साली वृत्तपत्रातील जाहिरात पाहून मी ह्या आकुर्डीच्या एका कंपनी मध्ये अर्ज केला होता.  ह्या कंपनी मध्ये माझी मुलाखती साठी निवड करण्यात आली होती.  ऑफिस असिस्टटअशी एकच जागा ती ही त्यांच्या आकुर्डी मधील कारखान्यात होती. 

जवळ जवळ ५०-१०० जणांनी ह्या नोकरी साठी अर्ज केले होते व त्यातून त्यांनी १५-१६ उमेदवारांना मुलाखतीला बोलावले होते.  त्यांच्या बंडगार्डन येथील मुख्य कार्यालयात सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे दाखले व दोन ओळखीची पत्रे घेऊन ह्या मुलाखतीला बोलावण्यात आले होते.  वेळेच्या पंधरा मिनिटे आधीच मी लागणारी सर्व कागदपत्रे (सरकारी अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानिशी) व तयार केलेल्या प्रती घेऊन त्यांच्या कार्यालयात पोचलो होतो.  सुरक्षारक्षकाने रीतसर चौकशी करून, कुठल्याश्या यंत्राने माझी अंगभर तपासणी करून नंतरच मला आत सोडले होते.  माझ्या आधी काही जण आत गेलेले होते आणि माझ्या मागेही एक दोन जण उभे होते.  बापरे इतके जण एका जागे साठी !  मला तर धडकीच भरली होती.  आपले कसं निभवायचं ह्या सगळ्यांच्यात असे वाटलं होतं.  मनात धाकधूक होत होती. 

स्वागत कक्षा मधील महिलेस मला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं पत्र दाखवले.  त्यांनी ते पाहून त्यावरील माझ्या वेळेची त्यांच्या एका वहीत नोंद करून घेतली आणि मला इतर उम्देवारांच्याबरोबर बसण्यास सांगितले.  त्यांच्या बोलण्यातील नम्रपणा, आदरातिथ्याची भावना व कार्यालयाचा नीटनेटकेपणा, प्रशस्तपणा माझ्या मनाला तर खूप भावून गेला.  हीच ती चांगली नोकरी जी मी गेले वर्ष दोन वर्ष शोधत होतो असे मला वाटले होते.  मनावर थोडेसे दडपणही आलेलं होते, घशाला कोरड पडली होती, त्यामुळे मी कोचावर बसायच्या आधी एक पेला पाणी पिऊन घेतलं.  तहान भागली व अस्थिर मन स्थिरावण्यासाठी त्याची थोडी मदतही झाली.  तुम्हीं कितीही काहीही म्हणा, पण प्रत्येकाला ह्या अशा मुलाखतींचे दडपण नक्कीच येत असणार, मी काही त्यातून निराळा नव्हतो.  माझ्या आजूबाजूला बसलेले इतर उमेदवार एकदम आत्मविश्वासाने बसलेले होते व त्यांच्या मनावर कुठलेही दडपण, तणाव मला जाणवत नव्हता. काहीजण तर अगदी सुटा-बुटात आलेले होते तर काहींनी छान टाय घातलेला होता.  मी मात्र जरा साधाच पण व्यवस्थित इस्त्री केलेला पंधरा सदरा, काळी विजार व छान चकाकी केलेले काळे बूट घालून आलो होतो.   असेल बाबा त्यांना अशा मुलाखतींची सवय, असे मनातल्या मनात म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करून बरोबर आणलेली सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून मनाचे समाधान करून घेतले.  मला बोलवेपर्यंत मी मनातल्या मनात आपल्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माझ्या आकलनशक्तीनुसार उजळणी करत बसलो होतो.   ही नोकरी काहीही करून मिळवायचीच असा मनाचा हिय्या करून मी मनातल्या मनात मुलाखतीची तयारी करून ठेवली होती त्यामुळे थोडासा निर्धास्त झालो होतो.

स्वागत कक्षामधील महिलेने कंपनीचे चार संचालक व दोन अधिकारी मिळून ही मुलाखत घेणार आहेत हे त्यांच्या कंपनीच्या रिती-रिवाजानुसार आलेल्या प्रत्येक उमेदवारास सांगितले होते, तसे मलाही सांगितले.  हे कळल्यावर माझी तर पाचावरच धारण बसली.  मनावर अजून थोडासा ताणही आलेला होता.  असाही मला इतक्या मोठ्या कंपनीत मुलाखत देण्याचा फारसा अनुभवही नव्हता आणि तसा मी कधी प्रयत्नच केलेला नव्हता.  कारण पदवीधर झाल्याबरोबर एक दोन छोट्याशा कारखान्यात लगेचच नोकरी मिळाली होती आणि ती मुलाखत म्हणजे एक सोपस्कार होता असे मला इथली सगळी व्यवस्था व गर्दी पाहून वाटायला लागले होते.  माझ्या बरोबरची सगळीच पोरं चांगलीच हुशार वाटत होती, म्हणजे त्यांच्या एकंदरीत पेहरावावरून तरी ते उच्च शिक्षित आणि हुशार वाटत होते. असो.  एक एक करून आम्हांला आत बोलावले जात होते.  काहींची मुलाखत १० मिनिटे तर काहींची १५-२० मिनिटे चालत होती.  असे करता करता माझा नंबर आला व मला आत बोलावले गेले.
 
मला बोलावल्यावर मी दारावर टकटक करून ते हलकेसे उघडून मी आत येऊ काअशी त्यांची परवानगी घेतली.  त्यांनी ती दिल्यावरच त्यांच्या त्या प्रशस्त चेंबर मध्ये प्रवेश केला व ते मला बसण्याचा आदेश कधी देतात ह्याची वाट पहात तसाच उभा राहिलो.  ते सर्वजण माझ्या आधी गेलेल्या उमेदवाराबद्दल चर्चा करत असावेत बहुधा !  साधारण एक १५-२० सेकंदच मी उभा होतो.  त्यांच्यातील मुख्य व्यवस्थापकांनी मला समोरच्या खुर्चीत हाताने खुणावून बसण्यास सांगितले.  त्यांचे आभार मानून मी त्यांनी सांगितलेल्या खुर्चीत विसावलो.  अर्थात हे सगळे संभाषण इंग्रजीत झाले होते हे वेगळे सांगायला नको.  (मी ह्या लेखामध्ये शक्यतो इग्रजी शब्द टाळण्याच्या प्रयत्न करतो आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच).  कंपनीचे तीन मालक-संचालक, एक कार्यकारी अधिकारी, आकुर्डीच्या विभागाचे मुख्य व्यवस्थापक आणि मुख्य कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक असे सगळे मिळून पाच जण आत एका मोठ्या टेबलाच्या समोरच्या बाजूला अगदी थाटात बसलेले होते.  

सर्व प्रथम मला माझ्याबद्दलची माहिती सांगण्यास सांगितले.  माझ्या अर्जात मी जसे लिहिले होते अगदी तसेच थोड्याफार फरकाने सांगून मी मोकळा झालो.  त्यामुळे माझ्यातला आत्मविश्वास थोडासा बळावला होता आणि मनावरचा ताणही थोडासा हलका झाला होता.  आपल्याला समाधानकारक पद्धतीने इंग्रजी बोलता येते आहे हे उमजल्यामुळे माझ्याही नकळत मी खुर्चीत जरा सावरून आरामात बसलो होतो.  त्यानंतर मला माझ्या कामाच्या अनुभवाबद्दल काही प्रश्न विचारले गेले.  त्यांच्या प्रत्यके प्रश्नाचे अगदी मोजक्या शब्दांमध्ये मी उत्तर देत होतो.  तसेच माझे उत्तर त्यांना योग्य वाटले आहे की नाही वा पटले आहे की नाही हे ही आजमावून पाहत होतो.  जवळ जवळ २० मिनिटे माझ्या मुलाखतीला झालेली होती आणि कंपनीच्या संचालक आणि अधिकारी वर्गाच्या चेहऱ्यावरील हावभावावरून मी त्यांना समाधानकारक उत्तरे देत आहे हे मला जाणवत होते.  

आता मुख्य व्यवस्थापकांनी मला माझ्या कामाचे स्वरूप काय असणार आहे ते सांगितले व त्या संदर्भातील काही प्रश्न विचारून माझी ह्या जागेसाठीची पात्रता पडताळून पाहू लागले.  मला त्यांनी विचारलेल्या प्रत्यके प्रश्नाचा रोख काय आहे ते समजत होते.  जर का एखादा प्रश्न मला समजला नाही तर मी त्यांना तो परत विचारून खात्री करून घेत होतो व त्यानुसार नीट विचार करूनच उत्तरे देत होतो.  सर्वात महत्वाचे म्हणजे मी मला जे समजत होते आणि कळत होते त्याच प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देत होतो.  उगाचच आघाऊपणा करून आपल्याला सर्व काही येत आहे असा अट्टाहास न करता आणि अजिबात खोटे न बोलता त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत होतो.  एक एक करून उपस्थित असलेल्या सर्वच जणांनी माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती केलेली होती.  मी पण त्यांच्या प्रत्यके प्रश्नास अतिशय आत्मविश्वासाने उत्तरे देत होतो.  माझ्या कडे कामाचा जेमतेम पाच वर्षांचा अनुभव होता तो ही अगदीच लहान कारखान्यातला होता, परंतु मी जी काही कामे केलेली होती, ती अतिशय मन लावून प्रामाणिकपणे केलेली होती, त्या अनुभवातून जे काही शिकलेलो होतो, जे मला माझ्या ह्या मुलाखती दरम्यान खूप उपयोगी पडत होते, हे मला पदोपदी जाणवत होते.  मुलाखतीला जवळ जवळ ३० मिनिटे होवून गेली होती आणि अजूनही काही प्रश्न त्यांना विचारवेसे वाटत होते, त्यामुळे मी अगदी योग्य मार्गावर आहे असे मला वाटू लागले होते, त्याचेच प्रत्यंतर आकुर्डीच्या मुख्य व्यवस्थापकांनी विचारलेल्या प्रश्नात आले.  ते म्हणजे तुम्हीं राहायला धनकवडीला आणि कंपनी आकुर्डीला, त्यात आमच्या कंपनीची येण्याजाण्यासाठीची कुठलीही व्यवस्था नाही.  त्यामुळे तुम्हांला जर आम्हीं ही नोकरी देऊ केलीत तर तुम्हीं कसे काय येणार जाणार.  त्यांचा हा प्रश्न अतिशय कळीचा होता आणि माझी खरी परीक्षा पाहणारा होता.  माझ्या एकंदरीत एक गोष्ट लक्षात आली होती की आपली निवड जवळ जवळ ठरलेली आहे.  परंतु आपल्या ह्या प्रश्नाच्या सकारात्मक उत्तरावरच ती शिक्कामोर्तब होऊ शकते.  मी मुलाखतीला येण्या अगोदरच ह्यावर विषयावर माझ्या बायकोशीही सविस्तर चर्चा केलेली होती व त्यावर मार्गही शोधून ठेवलेला होता.  नेमकी तीच गोष्ट मला त्यांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना खूप उपयोगी पडली.  ते म्हणजे, मी त्यांना आमच्या दोघांमध्ये झालेला संवाद अगदी थोडक्यात सांगून टाकला व त्यावरील उपाय म्हणजे मी एक मोटरसायकल विकत घेऊन माझी येण्याजाण्याची व्यवस्था करणार आहे, कारण मला तुमच्या ह्या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करून माझे उर्वरित भविष्य घडवायचे आहे !  माझे हे उत्तर उपस्थित सर्वच जणांना अगदी मनापासून पटले आणि त्यांनी मला थोडावेळ स्वागतकक्षा मध्ये बसण्यास सांगितले. 

मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ह्या ४० मिनिटांमध्ये व विचारलेल्या प्रश्नांमधून आणि मी दिलेल्या समर्पक उत्तरांमधून समोर बसलेली अनुभवी आणि जाणकार मंडळी माझ्यातल्या प्रामाणिकपणा, हजरजबाबीपणा, संयमितवृत्ती, सकारात्मक दृष्टीकोन, कामाप्रती असलेली आत्मीयता, तत्त्वनिष्ठता, कष्ट करण्याची तयारी, सचोटी आणि ध्येयवादीवृती अशा व इतर काही गुणांची तसेच माझ्यातल्या काही उणिवांची पारख करत होत्या, हे मला आज २५-३० वर्षानंतर जाणवले.  जवळ ४० मिनिटे माझी मुलाखत चालली होती त्यामुळे माझ्या नंतरच्या चार पाच उमेदवारांचे चिंताग्रस्त झालेले चेहरे मला बाहेर आल्यावर जाणवले.  एक दोघांनी हळूच विचारायचा प्रयत्नही करून पाहिला, पण तिथे फारसे बोलता येत नसल्यामुळे माझी आपसूकच सुटका झाली होती.  कारण त्यांना माझी मुलाखत सकारात्मक झालेली आहे व मला बाहेर बसण्यास सांगितले आहे हे सांगावयास लागले असते हो.  असो.  तसेही त्यांना त्यांचा अंदाज आलेलाच होता हे ही तितकेच खरे होते. 

मला मात्र हुश्श झाले होते.  मी स्वागत कक्षात येवून पुन्हा एकदा पेलाभर पाणी प्यायले व कोचावर डोळे बंद करून शांत बसून राहिलो.  साधारण ४०-४५ मिनिटांनी मला पुन्हा एकदा आत बोलवण्यास आले.  तोवर बाकीच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या होत्या व अजून एक उमेदवार सोडून बाकीचे सर्व बहुतेक त्यांनी सांगितल्याप्रमाणे निघून गेलेले होते.

मला आत बोलवून माझी मुलखात चांगली झाली आहे व माझी ह्या जागे साठी निवड करण्यात आली आहे हे सांगण्यात आले.  मला महिना ३५०० रुपये पगार ठरवण्यात आला होता.  कंपनीच्या नियमाप्रमाणे बाकीचे भत्ते इत्यादी देण्यात येणार होते.  हे सगळे मला मान्य आहे का आणि असले तर मी कधीपासून कामावर रुजू होवू शकतो हे त्यांनी मला विचारले.  एका क्षणाचीही उसंत न घेता मी सर्व गोष्टी मान्य करून १ तारखेपासून कामावर रुजू होऊ शकतो सांगितले.  (मुलाखतीची तारीख २० होती, त्यामुळे मला १० दिवसांचा अवधी तयारी साठी मिळणार होता).  व्यवस्थापकांनाही सर्वानुमते माझी संमती मान्य केली आणि माझी ह्या जागे साठी निवड झाली आहे हे शिकामोर्तब केले व मला पुन्हा एकदा बाहेर थांबण्याची विनंती केली. 

माझ्या बरोबर अजून एका उमेदवाराला त्यांनी थांबवले होते, त्याला आत बोलवण्यात आले आणि साधारण १० मिनिटांनी तो बाहेर आला व मला शुभेछ्या देवून निघून गेला.  त्याचे काम झाले नाही हे माझ्या लक्षात आले.  मनोमन मी त्याचे आभार मानले व त्यालाही पुढील मुलाखतीसाठी शुभेछ्या देवून मला कधी आत बोलावताहेत ह्याची वाट पाहू लागलो.  ५ मिनिटांत मला पुन्हा एकदा आत बोलावण्यात आले आणि ह्या वेळेस मात्र सर्वांनी माझ्याशी हस्तालोन्दन करून माझी ह्या जागे साठी निवड करून मला ही नोकरी बहाल करण्यात आली आहे असे जाहीर केले.  एक क्षण माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या परंतु मी माझ्या भावनांना आवर घातला आणि उपस्थित सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.  मला दोन दिवसांमध्ये कार्यलयात येवून पुढील सर्व सोपस्कार पुरे करण्यास सांगण्यात आले व आता आपली भेट आकुर्डीच्या कारखान्यातच होईल असे सांगतिले.

मनातल्या मनात नाचतच मी ह्या कंपनीच्या कार्यालयातून बाहेर पडलो.  एसटीडी बुथवर जावून बायकोला घरी दूरध्वनी करून ही आनंदाची बातमी दिली व जवळच्या एका टपरीवर मस्तपैकी गरमागरम वडापाव हाणला, एक चहा घेऊन इतक्या वेळ मारलेली पोटाची भूक शमवली आणि आज आपण जगच जिंकल्याच्या आविर्भावात घराकडे जायला निघालो.

ही यशस्वी मुलाखत म्हणजे माझ्या आयुष्यातला फार मोठा मैलाचा दगड होती ह्याचे प्रत्यंतर मला माझ्या आयुष्यातल्या पुढील प्रवासात कायमच जाणवत राहिले व तीच तर खरी माझ्या सफल आयुष्याची गुरुकिल्ली ठरली”.  आज ३० वर्षांनी मागे वळून पाहतांना माझ्या आयुष्यातल्या ह्या सुखद अनुभवाची आठवण येणे स्वाभाविकच आहे की नाही हो !

रविंद्र कामठे                            

Wednesday, 27 February 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – पहिली नोकरी


अनुभवाच्या शिदोरीतून पहिली नोकरी

चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

गरवारे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा मी विद्यार्थी.  त्यातल्या त्यात सोपे जावे म्हणून वाणिज्य शाखा निवडलेली आणि चक्क पहिल्याच प्रयत्नांत पासही झालेलो !  म्हणजे तसे काही फार चांगले मार्क नव्हते मिळाले, पण होते साधारण ५५% वगैरे असतील.  माझ्या मानाने आणि मी केलेल्या अभ्यासावरून हे सुद्धा मला अमंळ जास्तच वाटले होते हो !  फार खोलात जावून मी अभ्यास कसा केला आणि किती केला असले प्रश्न विचारू नका, कारण आता ह्या गोष्टीला जवळ जवळ ३५ वर्षे होवून गेलीत.  आमच्या काळात शिक्षणाला महत्व की काय ते नुकतेच कुठे यायला लागले होते एवढेच.   आमच्या आख्या खानदानात मी म्हणे पहिलावाहिला पदवीधर होतो, जो की पहिल्या इय्यतेपासून ते पदवीधर होई पर्यंत एकदाही नापास झालेला नव्हता.
 
नमनाला घडाभर तेल वाया घातले कारण ह्या निकालाच्या आधारावर मला १ जून १९८३ ला माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी मिळाली होती.  त्याचं असं झालं की, महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर सुट्टीच्या काळात, सकाळ मधील जाहिरात पाहून नोकरीसाठी सहज अर्ज केला होता. नेमका निकाल लागायला आणि त्यांनी मुलाखतीला बोलावण्याचा योगायोग जुळून आला होता.  मुलाखत झाल्यावर तासभर बसवून ठेवले आणि नंतर सांगितले की आम्हीं तुम्हांला ही नोकरी देत आहोत.  कारकूनम्हणून माझी निवड झाली होती आणि मला महिना रुपये ३५०/- पगार ठरवण्यात आला होता.  आयुष्यातल्या पहिल्याच लढाईत आम्ही चक्क घोडंमैदान मारलेलं होत राव, अजून काय पाहिजे होतं !  पुढच्या यशस्वी आयुष्याची ही तर नांदीच होती असे आत्ता म्हणावयास हरकत नाही.

३५ वर्षांपूर्वी ३५० रुपये महिना पगार, म्हणजे मी तर आनंदने नाचतच घरी पोचलो होतो.  कारण महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे १९८० पासून मी जमेल तसे छोटे मोठे काम करून महिन्याला ५०-७५ रुपये स्वखर्चासाठी कमावत असे (महाविद्यालयात जायला लागल्यापासून मी आमच्या एका मेव्हण्यांच्या फोटो स्टुडीओ मधे सकाळी ११ ते २ आणि संध्याकाळी ६ ते ९ असे पडेल ते काम करायचो व फोटोग्राफी पण शिकायचो हो ).  म्हणूनच महिन्याला ३५० रुपये म्हणजे माझ्यासाठी फारच मोठी व स्वकष्टाची कमाई होती, ह्याचे कोण एक अप्रूप मला वाटत होते म्हणून सांगू.  

ही नोकरी पुण्यातल्या हिंगणे खुर्दमधील विठ्ठलवाडी स्थित एका लहानश्या कारखान्यातील होती.  ह्या कारखान्यात मोठ मोठ्या कंपन्यांना लागणारे इलेक्ट्रिकल कंट्रोल प्यानेल बनवत असत.  माझ्या कामाचे स्वरूप म्हणजे सकाळी ७ वाजता कारखान्यातील कामगारांची हजेरी घेणे, रोजचा पत्रव्यवहार तपासणे, त्याची नोंद करणे, मालक, हिशेबनीस आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे.  थोडक्यात काय ते सांगतील ते काम करणे.  हो पण मी काही सांगकाम्या सारखं काम केलं नाही बर का !  थोडेफार स्वत:चे डोकेही चालवत असे, अर्थात अजिबात आघाऊपणा न करता बर का.  एक सांगतो पहिलीच नोकरी असल्यामुळे, मी मनातल्या मनात ठरवले होते की कुठल्याच कामाला नाही म्हणायचे नाही.  जेवढे काय शिकून घेता येईल तेवढे शिकून घ्यायचे, कामाचा अनुभव गाठीशी बांधायचा.
 
जुलै महिन्याच्या ७ तारखेला माझा पहिला पगार झाला त्या दिवशी कधी एकदा घरी जातोय आणि आईला वडिलांच्या हातात पगाराचे पाकीट ठेवतोय असे झाले होते मला.  ह्यात जो काही आनंद झाला होता तो शब्दांमध्ये सांगणे जरा कठीणच आहे हो.  स्वाभाविकच आहे हो हे सगळे, म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी कळायला लागल्यापासून ते २३व्या वर्षापर्यंत दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी माझे वडील न चुकता माझ्या आईच्या हातात त्यांच्या पगाराचे पाकीट ठेवत असत (सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांचा पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी होत असे).  आई ते पाकीट देवा पुढे ठेवत असे आणि नंतर पुन्हा वडिलांच्याकडे देत असे.  वडील त्यातले त्यांच्या खर्चासाठी ठराविक रक्कम काढून घेत असत आणि उरलेली रक्कम आईला परत त्याच पाकिटात टाकून देत असत.  त्यादिवशी संध्याकाळी वडील आमच्या सगळ्यांसाठी म्हैसूरपाक आणि फरसाणही आणत असतं.  तोच पायंडा मी पुढे चालू ठेवायचे ठरवले होते बाकी काही नाही.  माझ्या ह्या पगारातले १५० रुपये मला आई काढून देत व उरलेले २०० रुपये ती घर खर्चाला ठेवत असे.

मी लहानपणापासून माझ्या वडिलांना काबाड कष्ट करतांना पाहिलेलं असल्यामुळे, कुठल्याही कामाची लाज बाळगायची नाही हे ठरवले होते.  काम हेच आपले दैवत आहे असे समजायचे, माझ्यावर झालेले हे संस्कार ह्या पहिल्यावहिल्या नोकरीत खूप कामी आले.  तसेच आपल्या सहकाऱ्यांबद्दल कुठलेही मत बनवायचे नाही हे सुद्धा मला समजले.  माझ्या अनुभवावरून वरून सांगतो की आपले सहकारी चांगले अथवा वाईट असं काही नसतं, ते आपण त्यांचाशी कसे वागतो त्यावर अवलंबून असतं !

आम्हीं त्याकाळी डेक्कनला पुलाच्या वाडीमध्ये रहायला होतो आणि आमच्या घरापासून विठ्ठलवाडी साधारण ४-५ किलोमीटर लांब होती.  तेंव्हा पहिले काही महिने मी रोज सायकलवरून कामाला जात असे.  सकाळी ६.३० वाजता मी घरून निघत असे आणि बरोबर ६.५५ला कारखान्यात पोहचत असे.  बरोबर ७ वाजता सगळे कामगार, बाकीची मंडळी आणि आमचे मालक सुद्धा, कामावर हजर रहात असत.  जर का एखाद्याला थोडासा जरी उशीर आठवड्यातून तीन वेळा झाला तर त्याचा अर्धा दिवसाचा पगार कापला जात असे.  त्यामुळेच मला त्यांची हजेरी घेण्यासाठी ७ च्या आत हजर राहावे लागत असे.  अर्थात ह्या वक्तशीरपणाचा मला माझ्या उर्वरित आयुष्यात खूप म्हणजे खूपच फायदा झाला हे ही तितकंच खरं आहे.  ते म्हणतात ना, कुठल्याही चांगल्या सवयी आणि संस्कार हे कधीही वाया जात नाहीत, उशिरा का होईना त्याचे फळ आपल्याला मिळतेच मिळते ! 

साधारण तीन ते चार महिन्यात माझ्या डोक्यात एक दुचाकी घ्यावी असा विचार डोकावला होता.  तो मी माझ्या चुलत्यांना बोलून दाखवला.  त्यांचा माझ्यावर खूप जीव असल्यामुळे त्यांनी त्याला लगेच होकार भरला व दुसऱ्या दिवशी टिळक रोडवरील दुकानात जावून चौकशीही करून आले होते.  ४००० रुपये किमतीची टीव्हीएस५० कर्ज काढून घ्यायचे ठरले.  पण मला ते दुकानवाले कर्ज देईनात कारण खाजगी नोकरी होती ना माझी.  मग काय काकांनी त्यांच्या नावावर कर्ज काढले आणि पुढे मी महिन्याला १०० रपये हप्त्याने ते फेडले.  माझ्या आयुष्यातील कर्ज आणि हप्ते ह्यांची हीच काय ती मुहूर्तमेढ म्हणावयास हरकत नाही.  ह्या हप्त्यांनी आयुष्य मात्र सुखी केले, अर्थात ते वेळेवर भरले म्हणून हे मात्र तितकेच खरं आहे !
 
ह्या कारखान्याचे मालक अतिशय हुशार आणि कष्टाळू होते व त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे व घेण्यासारखे होते.  त्यांचा सचोटी, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, कामाप्रती असलेली निष्ठा, सहकाऱ्याबद्दल असलेला आदर, ग्राहकांच्याप्रती असलेली आत्मीयता आणि बांधिलकी,  सकारात्मक दृष्टीकोन, उत्कृष्ठ नियोजन आणि तितकेच काटेकोरपणे नियोजनाचं केलेलं पालन, समयसुचकता, आलेल्या अडचणींवर मात करण्याची क्षमता व जोखीम घेण्याची ताकद.  असे आणि अजून बरेचसे गुण मला त्यांच्या बरोबर काम करतांना जवळून न्याहाळता आले आणि माझ्यात त्यातले काही गुण नक्कीच रुजवता आले अस मला आजतरी वाटते आहे. 

एक सांगतो कुठलेही संस्कार हे आपल्याला हाताला धरून कोणीही कधीही शिकवत नाही, ते आपल्याला आपणहून पुढाकार घेऊन आत्मसाद करायचे असतात आणि आचरणात आणायचे असतात हे जेमतेम वर्ष दीडवर्षाच्या ह्या पहिल्या वहिल्या नोकरी मुळेच मला उमजले. 

ह्या नोकरी नंतर गेल्या ३५ वर्षात मी जवळ जवळ १४ नोकऱ्या केल्यात परंतु माझ्या ह्या पहिल्या नोकरीचा तो अविस्मरणीय असा काळ आजही माझ्या स्मृतीपटलावर शाबूत आहे.

रविंद्र कामठे
१२ फेब्रुवारी २०१९  

अनुभवाच्या शिदोरीतून – प्रवास चंद्रपूरचा


अनुभवाच्या शिदोरीतून प्रवास चंद्रपूरचा
ज्याचे जळते | त्यालाच कळते

१८-२४ फेब्रुवारी २०१९ च्या  साप्तहिक चपराक मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख...

साधारण १९८९-१९९४ ह्या पाच वर्षांचा तो काळ, काल अगदी सहज माझ्या स्मृतीपटलावर तरळून गेला.  एखादी जुनी चित्रफितच मी पाहतो आहे की काय इतका तो काळ माझ्या नजरेसमोर अगदी काल पर्वा घडल्याप्रमाणे एक एका प्रसंगाची आठवण करून देत होता.  खूप कष्टाचे पण आयुष्यातील मोलाचे असे ते सर्व अविस्मरणीय क्षण आजही आठवले तरी अंगावर रोमांच उभे रहातात आणि ह्या आठवणींमध्ये रमून जायला होते.

१९८९ साली मी आकुर्डी येथील एका खाजगी कंपनी मध्ये सहाय्यक विपन्नन अधिकारी पदावर रुजू झालो होतो.  मी राहायला धनकवडीला आणि कंपनी आकुर्डीला, त्यात कंपनीची बस नव्हती आणि येण्याजाण्याची सोय आपली आपण करायची होती. हे एक फार मोठे आव्हानच होते माझ्यासाठी.  अर्थातच माझ्या समोर ही नोकरी स्वीकारण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता.  एकतर मोठी व नावाजलेली कंपनी होती आणि नोकरी चांगल्या पगाराची होती.  मला आमच्या संसाराच्या उन्नतीसाठी ती करणे भागही होते.  रोज येवून-जावून ७० किलोमीटरचा प्रवास होता, तो मी बस अथवा इतर कुठल्याही सार्वजनिक वाहनाने करणे त्याकाळी शक्य नव्हते, कारण ते खूप वेळ खाऊ होते.  माझी मुलगी त्यावेळेस दीड वर्षांची होती.  वयस्कर सासू सासरे घरी असायचे.  बायकोच्या नोकरीच्या वेळा दर आठवड्याला बदलत असायच्या, कधी सकाळची, तर कधी दुपारची नाही तर रात्र पाळी असायची. त्यामुळे मला संध्याकाळी ७ पर्यंत घरी पोचणे खूप गरजेचे असायचे.  शेवटी मी आणि बायकोने खूप विचार करून एक निर्णय घेतला आणि मोठ्या धाडसाने कावासाकी ही मोटरसायकल विकत घेतली.  अर्थातच रु. २०,००००/-चे कर्ज काढून हो !  त्याकाळी मला मिळणारा पगार होता रु. ४०००/- महिना.  त्यात गाडीचा हप्ता रु. १२००/- महिना.  पेट्रोलचा खर्च रु. ८००/- महिना म्हणजे माझा निम्मा पगार गाडीच्याच नादात संपणार होता.  परंतु खूप विचारांती आम्हीं ही जोखीम घ्यायची ठरवली होती.  मग काय माझा रोजचा तो ७० किलोमीटरचा जुन्या पुणे-मुंबई हमरस्त्यावरील जीवघेणा प्रवास सुरु झाला, तो पाच वर्षे न थकता, न रडता आणि कुढता अखंड चालूच होता.  अतिशय अभिमानाने एक सांगावायसे वाटते की दर वर्षी मला माझ्या चागल्या कामाची आणि कष्टाची फळे ह्या कंपनीने दिली आणि खरोखरच आमच्या संसाराच्या उन्नतीसाठी खूप मोठा हातभार लावला हे ही तितकेच खरे आहे.  त्यामुळेच की काय ह्या कंपनीमधील ती कष्टाची पण अतिशय सुखद अशी पाच वर्षे आमच्या आयुष्यातील फार मोलाची आहेत.  काय नाही दिले ह्या पाच वर्षांनी मला !  माझ्यावर अगदी प्रेमाने विश्वास टाकणारे मालक लाभले, उत्कृष्ट सहकारी मिळाले, जीवाला जीव देणारे मित्र मिळाले, आर्थिक प्रगती झाली आणि एक सुखी व समाधानी आयुष्य लाभून कष्टाचे चीज झाले.

कंपनी मधील पाच वर्ष्यांच्या ह्या प्रवासात माझ्या आठवणीत अगदी खोलवर रुजलेला आणि मला आयुष्यात खूप काही शिकवून गेलेला हा अनुभव म्हणजे माझी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती (भांदक) तालुक्यातील चांदा दारुगोळा निमिती कारखान्यास दिलेल्या ३०-४० प्रवास भेटी !  होय ह्या ६० महिन्याच्या काळात मी जवळ जवळ ३०-४० वेळा चंद्रपूरला ह्या कारखान्यात कामा निम्मित जात होतो आणि प्रत्यके वेळेस गाठीला नवीन अनुभव घेऊन येत होतो हे मला चांगले आठवते आहे.  १९९० च्या फेब्रुवारी च्या सुरवातीला मला आमच्या व्यवस्थापकांनी आमच्या बंडगार्डन रोड येथील मुख्य कार्यालयात बोलावून घेतले आणि सागितले की उद्यापासून तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी टाकण्यात येणार व त्यासाठी तुम्हांला उद्या चंद्रपूर येथील चांदा दारुगोळा कारखान्यात जावे लागेल.  हे काम जर तुम्हीं जबाबदारीने व यशस्वीरीत्या पार पाडलेत तर तुमची पदोन्नती तर होईलच, पण तुमच्या पगारातही भरघोस वाढ करण्यात येईल.  अर्थातच व्यवस्थापनाने हा निर्णय तुमच्या आजवरच्या कामाचा विचार करून व गेल्या वर्षभरातील तुमच्यातील सचोटी आणि प्रामाणिकपणा पाहून घेतलेला आहे !  माझ्यासाठी हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असेच झाले होते हो.  त्यादिवशी मोठ्या हिरीरीने घरी आलो, घरच्यांना सर्वात आधी ही आनंदाची बातमी सांगितली.  सगळ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता.  त्याच उत्साहात मी माझी दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला जाण्याची तयारीही करून टाकली होती.  खूप दिवसांनी मी साधारण एका आठवड्यासाठी घरापासून दूर जाणार होतो.  त्यामुळे थोडेसे भावविवश व्हायला झाले होते, परंतु लगेचच स्वत:ला सावरून उर्वरित तयारीस लागलो होतो.

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सकाळी कंपनीत गेलो आणि तेथूनच चंद्रपूरच्या कामाची सर्व कागदपत्रे, जाण्यासाठीचे खर्चाचे पैसे, व इतर माहिती घेऊन संध्याकाळी जरा लवकरच म्हणजे ५ वाजता घरी यायला निघालो.  पुण्याहून चंद्रपूरला जायला थेट गाडी नव्हती.  रात्री १०.४० ला पुण्याहून कोल्हापूर-नागपूर- महाराष्ट्र एक्सप्रेस ह्या रेल्वेने वर्धा किंवा नागपूर पर्यंत जायचे.  वर्ध्याला दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता ही रेल्वे पोचेते व नागपूरला साधारण ५.३० वाजता पोचते.  एकतर वर्ध्याहून आर्वी चंद्रपूर ही ५ वाजताची एसटी पकडायची किंवा नागपूरला जावून ६.३० ची नागपूर चंद्रपूर ही एसटी घ्यायची.  म्हणजे पुण्यातून आदल्यादिवशी रात्री १० वाजता निघालेली आमची स्वारी हा सगळा द्रविडीप्राणायम करून दुसऱ्यादिवशी साधारण रात्री १०-११च्या दरम्यान म्हणजेच २४-२५ तासांनी चंद्रपूरला पोहोचायची.  अर्थातच ह्या सगळ्या प्रवासात कधीही येण्याजाण्याच्या प्रवासात आरक्षण वगैरे केल्याचे मला स्मरत नाही.  चंद्रपूर स्टेशनच्या जवळच पोलीस ग्राउंडच्या समोर सिद्धार्थ नावाचे जरा उत्तम दर्जा असलेले एक लॉज मला सापडले होते.  मी नेहमी ह्याच लॉजमध्ये उतरायचो.  कारण रात्री ११ वाजता जरी पोचलो तरी ह्या लॉजमध्ये बार असल्यामुळे जेवणाची सोय व्हायची.  अर्थातच एक बिअर आणि बोनलेस बटर चिकन हा माझा ठरलेला बेत मी जेंव्हा जेंव्हा गेलोय तेंव्हा तेंव्हा न चुकता पाळलेला आहे हे सांगावयास नको !  दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून मला चंद्रपूरहून भांद्क चांदा कारखान्याला जाणारी एसटी पकडावी लागायची.  जी मला चांदा दारुगोळा कारखान्याच्या कर्मचारी वसाहतीमधील बस थांब्यावर सोडायची.  तिथून माझ्या एका सहकारी मित्राने दिलेल्या सुचनेनुसार काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट द्यावी लागायची. त्यांच्या मुलाबाळांसाठी काही भेटवस्तू आणलेल्या असायच्या त्या त्यांच्या सुपूर्त करायच्या व नंतरच दारुगोळा कारखान्याच्या मुख्य दरवाज्याकडे वाटचाल करायची, जो साधारण एक किलोमीटर दूर होता व तेथे जायला नशीब असेल तरच रिक्षा मिळायची. नाही तर गपगुमान डोक्यावर समान घेऊन चालत जाण्याशिवाय पर्यायही नसायचा.  अगदीच कोणाला दया आलीच तर तो सायकलवर डबलसीट न्यायचा.  पण हा योग तसा दुर्मिळच म्हणायला हरकत नाही.   ह्या भेटवस्तू देण्याची जी काही प्रथा अथवा परंपरा आमच्याच आधीच्या काही भाऊबंधांनी घालून ठेवलेली होती आणि ती आता कोणालाही मोडताही येत नव्हती.  ज्याने कोणी ती मोडण्याचा प्रयत्न केला होता तो त्यांची कामं न झाल्यामुळे वैतागून शेवटी ह्याच मार्गाला आला होता हे ही एक जळजळीत सत्य होते.  (प्रवाहाच्या विरुध्द पोहायला गेल्यावर जे होते ते !).  कधी कधी आपल्याला आपली तत्वे, संस्कार गुंडाळून ठेवावी लागतात ना त्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे असे मला वाटते. 

मी नवीन असतांना मला ही प्रथा माहित नव्हती, त्यामुळे तर मी चक्क दोन दिवस दारुगोळा कारखान्याच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर असलेल्या सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांच्या कृपेने तिथे असेलेल्या प्रतीक्षा कक्षामधे माश्या मारत बसून काढलेले आहेत.  कारण मला माझ्या कामासाठी त्यांच्या कार्यालयात जायची परवानगीच मिळत नव्हती आणि ती कशी मिळवायची ह्याची तेथील सुरक्षा कर्मचारी दादच लागू दिली नव्हती.  प्रत्यके सरकारी खात्यात अशीच काहीशी त्यांच्या त्यांच्या सोयीची व्यवस्था आपल्याच माणसांनी करून ठेवलेली असते फक्त ती माहित व्हायला तुमच्या कडे एक वेगळीच प्रतिभाशक्ती आणि धैर्यशीलता असावी लागते हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.  अर्थातच इच्छा तिथे मार्गही नक्कीच असतात हे मला पदोपदी जाणवत होते.  शेवटी पुण्यातीलच एक भले गृहस्थ मला भेटले व त्यांनी सहज बोलता बोलता माझी चौकशी केली.  जेंव्हा त्यांना मी इथे दोन दिवस नुसता बसून आहे कळल्यावर त्यांनी मला इथल्या सर्व कारभाराची, हाताचे काहीही राखून न ठेवता अगदी इतंभूत माहिती देवून, माझ्यापुढील खूप मोठ्या समस्येचे निराकारण केले.  तेंव्हा पासून मी जेंव्हा जेंव्हा भांद्क येथील दारुगोळा कारखान्यात गेलोय तेंव्हा तेंव्हा अगदी एका दिवसांत म्हणजे सकाळी जावून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळी कामे आटोपून ट्रेझरीचा धनादेश घेऊन पुन्हा पुण्याकडे यायला निघालेलो आहे.  फार विलक्षण अनुभव आहे हा !   माझ्या आयुष्यात मी सदिच्छा भेटवस्तूंचा एवढा जालीम उपाय आणि त्याचा इतका तात्काळ परिणाम अजून कुठेही अनुभवला नसेन.  असो.

चंद्रपूरहून परतीचा प्रवास फारच चित्तथरारक  असायचा.  चांदा दारुगोळा कारखाना ते भांद्क रेल्वे स्टेशन हे अतंर साधारणपणे ८-१० किलोमीटर असेल.  कारखान्याच्या मुख्य गेट जवळ कधी कधी काही रिक्षा असायच्या ज्या की कोणते तरी भाडे घेऊन आलेल्या आणि परतीच्या भाड्याची वाट पाहत थांबलेल्या असायच्या.  परंतु त्या नेहमी असतीलच ह्याची मात्र खात्री नसायची.  संध्याकाळी परतीच्या प्रवासात रिक्षा मिळणे म्हणजे नशिबाचच खेळ असायचा.  आजवरच्या प्रवासात माझे दैव मात्र बलवत्तरच राहिले आहे त्यामुळे मला नेहमीच रिक्षा मिळायची.  त्यात मी त्याने मागितलेल्या भाड्याच्या रकमेत कधीही घासाघीस करायचो नाही.  कारण माझे एकमेव उद्दिष्ट बल्लारशाहुंन नागपूरला निघालेली प्रवासी गाडी पकडण्याचे असायचं.  ही प्रवासी गाडी बरोबर ५.४५ ला भांद्क रेल्वे स्टेशनमध्ये यायची व जेमतेम ५-१० सेकंद थाबायची.  अर्थात ही गाडी चुकली तर मात्र भांद्कमधेच एका रात्रीचा मुक्काम करावा लागायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मिळेल त्या एसटी ने नागपूरला किंवा वर्ध्याला जावे लागायचे आणि तिथून मुंबई अथवा पुण्याला जाणारी रेल्वे पकडावी लागायची.  एक दिवसांनी प्रवासही वाढायचा जो अतिशय कंटाळवाणा वाटायचा.  एक दोनदा माझ्यावर तशी वेळही आली होती आणि मला चक्क जैन धर्मशाळेत मुक्काम करावा लागला होता.  व्यवस्था खूपच चांगली होती पण त्यांचे अतिशय कडक नियम पाळणे व बिना कांदा लसणाचे जेवण मात्र जात नसे.  तसेच एकदा तर मी चंद्रपूरहून लाल डब्याने शिर्डी पर्यंत आणि शिर्डीहून पुण्यापर्यंत प्रवास केलेला आहे.  फक्त पुण्यात उतरल्यावर माझीच हाडे मला मोजता येत नव्हती अशी अवस्था झाली होती.  असो. 

त्यामुळेच की काय माझा प्रयत्न पाच वाजायच्या आत सर्व कामे उरकण्याचा असायचा (जो आपल्या हातात अजिबात नसतो) जो बऱ्याचदा सफलही व्हायचा.  भेट वस्तूंची किमयाच असायची ही, त्यात माझे काहीच कर्तुत्व नसायचे.  मी त्याचे श्रेय घेणे अनाठाई होईल.  पाचवाजता कामं उरकून रिक्षा मिळून निघेपर्यंत ५.१० झालेले असायचे.  रिक्षावाल्यास फक्त विनंतीवजा आर्जव करायची की आपल्याला बल्लारशा प्रवासी रेल्वे पकडायची आहे.  बास एवढे त्याला पुरेसे असयाचे.  त्याप्रमाणे भाड्यात वाढही व्हायची, पण मला काळजी नसायची.  एका रात्रीच्या मुक्कामापेक्षा त्याला १०-२० रुपये जास्त देणे केव्हाही माझ्याच फायद्याचे असायचे.  अहो मला ह्या कलाकार रिक्षावाल्यांचे फारच कौतुक वाटायचे, ह्या जास्तीच्या पैशांमुळे ते ज्या अंतरासाठी ४० मिनिटे लागतात तेच अंतर ही मंडळी अगदी २५-३० मिनिटांत कापायचे.  अर्थात ह्या सगळ्या प्रवासात मी माझे बुड सीटवर टेकल्याचे स्मरतच नाही कारण त्याने रिक्षाचे विमानच केलेलं असायचं हो.  असो.  बऱ्याचदा मी ५.३०-५-४० पर्यंत भांद्क रेल्वे स्थानकात पोहचत असे.  अडचण एकच असायची की बल्लारशाहुंन येणारी प्रवासी गाडी २ नंबरवर प्ल्याटफॉर्मवर यायची.  त्यात भांद्क हे अगदीच छोटे स्थानक असल्यामुळे रेल्वेक्रॉसिंग साठी पादचारी जिनाही नव्हता.  जीव मुठीत घेऊन रेल्वे रुळ ओलांडून पलीकडे जावे लागायचे.  एकदा तर ७० डबे असलेली दगडी कोळसा घेऊन जाणारी मालगाडी स्थानकात लाल सिग्नल मिळाला म्हणून उभी होती आणि पलीकडे जाण्याचा मार्गच तिने अडवलेला होता.  काही नेहमी ह्या गाडीने प्रवास करणारे प्रवासी जोखीम घेऊन ह्या थांबलेल्या मालगाडीच्या डब्याच्या खालून वाकून निघून जात होते.  मी पण तसा विचार केला होता पण दोन डाग सामान असल्यामुळे माझी हिम्मत होत नव्हती.  प्रवासी गाडी यायची वेळही होत आलेली होती.  शेवटी एका सद्गृहस्थाने मला मदत केली आणि मला त्या डब्यांच्या खालून वाट काढून दिली व सुखरूप पलीकडे पोचवले होते.  तेवढ्यात त्या मालगाडीला हिरवा कंदील मिळाला आणि धडाम्म आवाज करून ती मार्गस्थ झाली.  दोन तीन सेकंदाचाच काय तो फरक होता, त्यामुळे माझ्यातर काजळात धस्सच झाले होते.  चला वाचलो असे म्हणून पलीकडे पोचलो, तेवढ्यात प्रवासी गाडीही आली.  त्या सद्गृस्थाचे मनोमन आभार मानले आणि गाडी पडकली.  तिकीट तपासनीसास गाठले आणि आरक्षण मिळवले.  एक सांगतो, आमच्या सारखे नेहमी प्रवास करणाऱ्यांचे तिकीट आरक्षणा वाचून काही आडत नाही.  हे जे आमचे तिकीट तपासनीस मित्र असतात ना त्यांना आमच्या व्यथा माहित असतात आणि त्यांनी आमच्या सारख्यांसाठी काही तिकिटे नक्कीच राखून ठेवलेली असतात.  अर्थात ह्यात स्वार्थातून परमात्म साधण्याचा त्यांचा छोटासा प्रयास असतो हे ही तितकेच खरं आहे.  ह्या गाडीला नागपूर दादर ह्या एक्स्प्रेसचे दोन डबे असायचे व ते वर्ध्याला अलग होवून नागपूरहून येणाऱ्या गाडीस रात्री ११ वाजता जोडले जायचे.  त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे तिकीट तपासनीसाला थोडासा मस्का आणि योथोचीत दाम देवून व्यवस्थित शयन कक्षाचे आरक्षण मिळायचे.  वर्ध्याला रात्री ८ पर्यंत ही गाडी पोचायची आणि नागपूरहून दादरला जाणारी गाडी साधारण ११ वाजता यायची.  ३ तास ह्या डब्यांमध्ये काढावे लागायचे.  सामानाला साखळी लावून कुलूप लावायचे आणि स्टेशन समोरील साठेंच्या  (हो वर्ध्याचे माझी खासदार कै. वसंतराव साठे ह्यांचा) हॉटेलात जावून जेवायचं हा तर माझा नेहमीचाच शिरस्ताच झाला होता.  हे सगळं इतकं अंगवळणी पडलं होतं की काही विचारू नका !  जेवण झालं की दिवसभराचा थकवा जाणवायला लागायचा आणि शेवटी कंटाळून मी डब्यात जावून पथारी (म्हणजे सीटवर इंग्रजी वृतपत्र अंथरून, अंगावर एक धोतर पांघरून) टाकून मोकळे व्हायचो.   मला तर माझ्या ह्या प्रवासात वर्ध्याला नागपूर दादर गाडीला हे दोन डबे कधी जोडले जातात आणि गाडी वर्ध्याहून कधी निघायची हेच कळायचे नाही,  कारण आमची स्वारी दमून भागून झोपलेली असायची.  त्यात आमचे आरक्षण एकदम वरचे असल्यामुळे लोकांचा त्रासही फारसा व्हायचा नाही.  नेहमी प्रवास करणारे असल्यामुळे हे सगळे तसेही खूप अंगवळणी पडलेले होते.  पहाटे ६ / ७ वाजता ए चाय गरम” “चाय गरमह्या हाकेने जाग यायची.  तेंव्हा उठायचे, नाशिकरोड च्या अलीकडील कुठले स्टेशन आले आहे ते पहायचे.  तोंड धुवून मस्तपैकी एक गरम चहा घ्यायचा. निशिकरोड स्टेशन ८ वाजता यायचे.  मी शक्यतो नाशिकरोडलाच उतरत असे (तिकीट दादर पर्यंतचे असायचे, कारण चुकून झोप लागली तर वांदे नको व्हायला) आणि तिथून पुण्याला जाणारी एसटी पकडत असे.  म्हणजे त्याचं गणित असं होतं की, ह्या रेल्वेने दादरला पोचायला २ वाजायचे आणि दादरहून पुन्हा पुण्याला ५ पाच तास प्रवास, म्हणजे पुण्यात पोचायला संध्याकाळ व्हायची.  त्यामुळे मी नाशिकरोडला उतरून चक्क पुण्याला जाणारी कुठलीही एसटी पकडायचो आणि ५ तासात म्हणजे १ ते दोन च्या दरम्यान घरी पोचायचो.  अर्थात हा शोध जेंव्हा तुम्हीं नेहमी प्रवास करता तेंव्हाच अनुभवातून लागतो हे मात्र नक्की.

मी जेंव्हा जेंव्हा चंद्रपूरला जायचो तेंव्हा तेंव्हा माझ्या कंपनीचे मालक मी परत कधी येतोय ह्याची चातकासारखी वाट पहायचे, त्याचे कारण मी येतांना त्या काळचे ५-८-१० लाख रुपयांचा ट्रेझरीचा चेक आणायचो.  ह्या पैशांवर कंपनीची बरीचशी मदार असायची आणि म्हणूनच चंद्रपूरच्या साधारणपणे एक दीड महिन्यातून ठरलेल्या प्रत्येक दौऱ्यासाठी मलाच जाण्यासाठी हमखास गळ घातली जायची.  त्याचे कारणही मी जेंव्हा जेंव्हा गेलेलो तेंव्हा तेंव्हा नक्कीच पैसे घेऊनच परत येत असे.  माझ्यावर त्यामुळे आमच्या मालकांचा खूप विश्वास बसलेला होता व ते मला खूप आदराने वागावयाचे.  एक मात्र आहे की माझ्या बरोबरच्या इतर काही सहकाऱ्यांना माझा फार हेवा वाटायचा.  त्यांना वाटायचे साला, मालकांच्या अगदी मर्जीतला झाला आहे त्यात त्याच्या मनाला येईल तेवढे पैसे त्याला खर्च करायची मुभा आहे ज्याचा हिशोब तर सोडाच पण पावती, बिलं वगैरे काहीच नाही.  सदिच्छा भेटींवरच खूप खर्च करतोय पठ्ठ्या, मग का नाही काम होणार ! आम्हांला संधी मिळाली तर आम्ही सुद्धा यशस्वी होवून दाखवू !  माझ्या पाठीमागे अशी खूप चर्चा होत असे आणि माझा एक सहकारी मित्र मला आल्यावर त्याचा वृतांत सांगत असे.  मी त्याला नेहमी सांगायचो की, तू लक्ष देवू नकोस.  मालक काय ते बघून घेतील.  कारण त्यांना आणि मलाच मी चांदा कारखान्यात जावून जे काही दिवे लावले आहे ते माहिती आहेत आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण भरवसा आहे.  मी १९९४ साली नोकरी सोडल्यानंतर नंतर मला कळले की चांदा कारखान्याने ते कंत्राटच संपले होते व ते कंपनीला परत मिळाले नव्हते.

अशा रीतीने साधारण ४-५ दिवसांचा जीवाची दमणूक करणारा, पण कार्य सफलतेचा आगळा वेगळा आनंद देणारा हा प्रवास मनाला नेहमीच उभारी देवून जायचा.  ह्या चारपाच दिवसांत माझा दुचाकी वरचा रोजचा ७० किलोमीटरचा प्रवास मात्र नक्कीच वाचायचा व ह्या प्रवासचा थकवा एकदम नाहीसा व्हायचा, हे ही नसे थोडके !

ज्याचे जळते, त्यालाच कळते

रविंद्र कामठे
१६ फेब्रुवारी २०१९

Thursday, 6 December 2018

स्वार्थ-परमार्थ


स्वार्थ-परमार्थ

माणूस हा किती स्वार्थी असतो ह्याचा प्रत्यय साधारणपणे प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात नक्कीच येतच असणार नाही का ?  म्हणजेच एका माणसाला दुसऱ्या माणसाचा स्वार्थ नक्कीच कशात आहे हे तर कळतच असणार की !  तरीही माणूस अशाही परिस्थितीत जीवन जगतच असतो अगदी ह्याच स्वार्थी माणसांच्या सहवासात ह्याचे फारसे काही आश्चर्य वाटण्याचे कारणच नाही.  कारण शेवटी जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला हे जीवन, त्या विधात्याने जसे लिहून दिले आहे तसेच जगावे लागते हे मात्र निश्चित आहे.  माणसांनी उगीच टीव टीव करू नये !  म्हणजे मी हे केले, ते केले, असे केले, तसे केले, माझ्याच मुळे हे सगळे झाले, मी नसतो तर हे शक्यच नव्हते वगैरे वगैरे.  ह्या सगळ्या फुकटच्या वल्गना वाटतात. माणसाने फक्त न बोलता कर्म करीत राहावे.

स्वार्थ आणि परमार्थ म्हणजे काय?  हेच काय ते माहित नाही.  स्वार्थ कशाला म्हणायचे, तर जे जे माणसाला स्वत:च्या सोयीनुसार हवे आहे अथवा ते ते तो येनकेन प्रकारे मिळवतोच ह्यालाच स्वार्थ म्हणायचा, नाही तर काय !  आणि परमार्थ म्हणजे स्वार्थाने मिळविता मिळवता जर का जमलेच तर थोडेफार दान दुसऱ्याच्या पदरात टाकता आले अथवा तशी तजवीज करता आली म्हणजे परमार्थ होय असे मला तरी वाटते.  हे सुद्धा सगळ्यांनाच जमते असेही नाही ! चूक की बरोबर हे ज्याने त्याने ठरवावे.

स्वार्थ कधीही वाईट नसतो.  एखादे कर्म करतांना साधलेला स्वार्थ, तो कोण कोणासाठी,  कोणावरही अन्याय न करता अगदी सात्विक आणि समंजसपणे साधला असेल तर तो योग्य ठरतो.  नाहीतर त्याला अन्यायच म्हणावे लागेल.  जोरजबरदस्ती,  बळजबरी, मनाविरुद्ध एखादी गोष्ट करायला लावून स्वार्थ साधता येत नाही आणि तो लाभतही नाही.  परमार्थ दैवी कृपेनेच होतो असे मला तरी वाटते.  त्याचे कारण, परमार्थ करण्यासाठी माणसामध्ये माणुसकीचा एक दुर्मिळ असा गुण असावा लागतो आणि त्याच्यात स्वत:कडे जे आहे ते देण्याची दानत असावी लागते.  येथे दुसऱ्यांना लुबाडून केलेला दानधर्म अजिबात अपेक्षित नाही.  ज्या माणसाच्या नशिबात असेल तोच परमार्थ साधून पुण्य कमवू शकतो, हा माझातरी अनुभव आहे.  अहो अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला परमार्थ साधता येऊ शकतो.  वंचित आणि गरजवंत माणसाना सढळ हाताने, कुठेही कसलाही आडपडदा न ठेवता केलेली मदत (भिक नव्हे)  म्हणजेच परमार्थ होय.  परमार्थाने माणसाच्या मनाला खूप आनंद होतो आणि त्यामुळे माणसाचा जीव प्रसन्न होवून जातो.  आयुष्य समाधानी होते.

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपापले कर्म करीतच असतो.  काही कर्मे आपण फळांची अपेक्षा न करता करत असतो तर काही कर्मे ही मुळातच फळांचीच अपेक्षा ठेवून केलेली असतात आणि हीच कर्मे म्हणजे माणसाचा स्वार्थीपणा असतो.  ह्यात तसे पहायला गेले तर वाईट काहीच नाही.  जोपर्यंत ही कर्मे दुसऱ्या कोणाचे वाईट करत नाही तोपर्यंत ती स्वार्थी जरी असली तरी आयुष्यात जगण्यासाठी तितकीच गरजेची असतात.  अशाच आपल्या कर्मांमधून काही कर्मे अशी असतात की ज्यांची फळे आपल्या संचितात जमा होत असतात आणि जेंव्हा ही फळे परिपक्व होतात तेंव्हा ती माणसाचे प्रारब्ध म्हणून समजली जातात.  अर्थात वाईट किंवा दुष्कर्मे ही दु:खदच असतात तसेच त्यांची फळेही तेवढीच वाईट असतात.  म्हणूनच माणसांनी कर्म करतांना आपल्या संचितात जेवढा म्हणून चांगल्या कर्मांचा ठेवा करता येईल तेवढा करावा. म्हणजे हीच फळे जेंव्हा परिपक्व होऊन आपल्या प्रारब्धात येतील तेंव्हा ती आयुष्यात एक प्रकारचा गोडवा,  आनंद, सुख आणि समाधान देऊ शकतील.  जसे आपण आपल्या बँके मध्ये पैशाचा संचय करून आपल्या प्रारब्धाची सोय करत असतो ना, अगदी तसेच सत्कर्म करून परमार्थाचा संचय आपल्या आयुष्यात करावा आणि चांगल्या प्रारब्धाची सोय करून ठेवावी.

हे सगळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की स्वार्थातून परमार्थ जर साधता आला तर तो अगदी सहजपणे आणि साधेपणाने साधावा व संचितात त्याचा ठेवा करावा,  जेणेकरून प्रारब्धात उत्तरोत्तर चांगले फळ मिळून आपले आयुष्य सत्कारणी लागेल.  विधात्याने आपल्याला दिलेले माणसाचे हे जीवन सफल झाल्याचा एक आगळा वेगळा आनंद मिळेल.  शेवटी प्रत्येकाचे नशीब हे ज्याच्या त्याच्या कर्मावरच अवलंबून असते असे मला तरी वाटते आणि मला म्हणावेसे वाटते.....

आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे,
आशा निराशांचे वलय जसे, सांगावयास उरे काही नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

गेलेला क्षण परतुनी येत नसे, तडजोडीतच आयुष्य जात असे,
संघर्ष हेच आयुष्याचे गमक असे, कष्टा शिवाय आयुष्यास अर्थ नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

स्नेह हेच आयुष्याचे गमक भासे, तंट्यात आयुष्याचा पेचच दिसे,
त्यागातच सुख कमविण्याचे असे, सुख दु:ख हे तर प्रारब्ध जसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

जगण्याची कला हीच संचित असे, माणुसकीला आयुष्यात पर्याय नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे ||

रविंद्र कामठे


“जगावं की मरावं”, “जगावं की मरावं”...”To be or not to be”


जगावं की मरावं”, “जगावं की मरावं”...”To be or not to be”

सारखे सारखे हेच विचार डोक्यात घोळत होते अगदी शेक्स्क्पिअरच्या नाटकातील त्या वाक्यासारखे.. “To be or Not to be”.
ही अशी वाक्ये नाटकांमधल्या पात्रांच्या तोंडून ऐकायला छान वाटतात.  परंतु तीच वाक्ये जेंव्हा आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात डोकावू लागतात ना तेंव्हा काळजाचं पाणी पाणी होतं हो ! ह्या वाक्यांचे अर्थच डोक्यात घुसत नाहीत,  अर्थ तर त्याहून लागत नाहीत ! होय मी हा अनुभव नुकताच घेतला आहे.  अगदी मनापासून सांगतो की असं मला वाटणं हेच मुळी माझ्या स्वत:च्या पचनी पडलं नव्हतं.  माझा सुद्धा ह्यावर विश्वासच बसत नव्हता हे मात्र खरं !  असं काय झालं की ज्यामुळे मला जगावं की मरावंअसे वाटले असेल ! तसं फारस काही गंभीर प्रकरण नाही.  म्हणजे माझ्याच मनाचा वेडेपणा म्हणा हव तरं.  पण असं होतं कधी कधी आपल्या आयुष्यात.  हे मात्र मी अगदी निष्ठून सांगू शकतो.  म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण कधी तरी आलेला असतो की ज्यामुळे आपण थोडेसे व्यथित होतो आणि काही काळासाठी तो एक क्षण तुम्हांला मानसिकरीत्या ढासळूनही टाकतो अथवा आयुष्याला नवी उभारी देऊन जातो.  मनाच्या कोपऱ्यात कित्येक वर्ष जतन केलेला तो एक क्षण असा असतो जो आपल्या काळजात अगदी शांतपणे विसावलेला असतो.  आयुष्याच्या उतरणीला तो क्षण आपसूकच पुन्हा एकदा आपल्या जवळ येतो, आपल्याला स्पर्श करतो आणि अलगदपणे आला तसाच लगेचच दूर निघूनही जातो.  आपण त्या क्षणाकडे,  अगदी तो पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत पहात राहतो. त्यावेळेस आपल्याला काहीच म्हणजे काहीच सुचत नाही.  नंतर जेंव्हा तो क्षण आपल्यापासून दूर गेल्याची जाणीव होते ना,  तेंव्हा त्या क्षणाला वाटतं.. जगावं की मरावं... ”To be or not to be”.  प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादाच क्षण असतोच की ज्यामुळे आपल्या मनात तात्पुरती हा होईना ही भावना उत्पन्न होते आणि तीच खुण असते आपण माणूस संवेदनशील माणूस असल्याची.  स्वत:शी प्रामाणिक असल्याची. एक नक्की सांगतो की हा क्षण जपण्यात आपण कधीही कमी पडता कामा नये.  मनाच्या एका कोपऱ्यात अगदी अलगदपणे जतन करून ठेवलेला हा एकच क्षण असा असतो की जो आपल्याला हे आयुष्य जगण्यास मदत करत असतो.  बऱ्याचदा हाच तो एक क्षण आपले सारे आयुष्य व्यापून टाकतो . आयुष्याच्या ह्या बहुरंगी आणि बहुढंगी नाटकाचा हा एकच क्षण सूत्रधार असतो, जो आपल्याला एखाद्या कठपुतलीच्या बाहुली सारखे नाचवत असतो आणि आपणही त्याच्या तालावर बेलाशकपणे नाचत असतो.  त्यालाच तर आयुष्य म्हणतात !  म्हणजे आपण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जे काही जगतो त्याला आयुष्य न म्हणता ह्या एका क्षणाला आयुष्य म्हणायचे की काय ! तो एक क्षण कुठलाही असू शकतो.  अर्थात तो प्रत्येकाला थोडेसे आत्मपरीक्षण करून मनाच्या कप्यात खोल खोल जाऊन,  अगदी काळजाच्या तळाशी जावून शोधायचा असतो.  तो क्षण कसा असतो,  काय असतो,  आयुष्यात केव्हा आलेला असतो,  कुठे आलेला असतो,  कोणाबरोबरचा असतो,  कशामुळे अवतरलेला असतो,  त्याचे त्यावेळेस चांगले वाईट काय परिणाम झालेले असतात,  त्यात कोणी सुखी तर कोणी दु:खी झालेले असते का ?  असे आणि अंजून किती तरी प्रश्न आपल्याला पडतात.  अर्थात ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सापडतातच असेही नाही.  आणि हो जरी उत्तरे अथवा उत्तर सापडले तरी,  शेवटी एकच प्रश्न उरतो तो म्हणजे जगावं की मरावं”.. To be or not to be..

तरीही असं वाटतं की..

आयुष्य इतकंही सोपं नाही, जितकं आपण समजत असतो |
आयुष्य इतकंही अवघड नाही, जितकं आपण ते करून ठेवतो ||


रविंद्र कामठे

“सुखी माणसाचा सदरा”


सुखी माणसाचा सदरा

गेले कित्येक दिवस मी सुखी माणसाचा सदरा आणि त्या सदरयातील सुखी माणूस शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.  का कोण जाणे पण मला अजून तरी माझ्या ह्या प्रयत्नांस म्हणावे असे यश काही लाभलेले नाही ! त्यामुळे मला सर्वात आधी सुखाची व्याख्याच शोधावी की काय असे सारखे वाटू लागले तर नवल नको !  सुख म्हणजे काय असते ?  काय केलं की ते मिळतं ? सुख कसं असतं ? सुख कसं दिसतं ? सुख कसं लाभतं ? काय पुण्य केलं की ते मिळतं ? सुख कशाला म्हणायचं ? दु:ख नसणं म्हणजेच सुख का ? दु:खात सुख शोधायचं असतं का ? वगैरे वगैरे.  दु:ख म्हणजे तरी नक्की काय असतं ? सुख आणि दु:ख ह्याची विभाजनी कशी करायची ?  त्यांच्यातला फरक कसा ओळखायचा ? मन अगदी भंडावून गेलं आहे हो माझं ह्या आणि अशाच मारुतीच्या शेपटा सारख्या कधीही न संपणाऱ्या प्रश्नांनी !  जीव अगदी मेटाकुटीला आलायं.

त्यांच कारण की, मध्यंतरी मी आमच्या सोसायटीच्या मिटींगला गेलो होतो.  बऱ्याच दिवसांनी सर्व सभासदांची निवांत भेट होईल आणि त्यांची ख्याली खुशाली कळेल आणि त्यात एखादातरी सुखी माणूस भेटल अशी एक भाबडी आशा मनात घेऊनच मी ह्या मिटींगला गेलो होतो.  परंतु काय सांगू ह्या मिटिंग नंतर तर मी थोडासा अंतर्मुख झालो होतो.  माझ्या सुखी माणसाच्या सदऱ्याच्या शोधाला यश काही येत नव्हते.  मला खात्रीच वाटायला लागली की ह्या जगात सुख नावाचे असे काही नसतेच !  सुखाच्या आपल्या सगळ्या कल्पना ह्या भ्रामक वाटायला लागल्या होत्या.  जे काही आहे ते म्हणजे दु:ख, समस्या, अडचणी, अडथळे, दुरवस्था, नैराश्य, कटकट, शारीरिक व्याधी, मानसिक ताणतणाव, कष्ट, ओढाताण, असमाधान, दुर्दैव, अंधार  आणि अंध:कार इत्यादी इत्यादी.

मिटिंगला सोसायटीच्या अध्यक्षांनी सुरवात केली. त्यांचाकडे पहात असतांना माझी नजर सहज त्यांच्या पायवर टाकलेल्या पंच्याकडे गेली आणि काही क्षण मी सुन्न झालो होतो.  होय, त्यांचा उजवा पाय खोटा होता त्या पंच्यामधून पायाची गुलाबी बोटे दिसत होती पण त्यांची बराच वेळ हालचाल होत नव्हती म्हणून मी जाणीव पूर्वक पहिले आणि मला गुढघ्याच्या खालील तो पाय खोटा असल्याचे जाणवले.  मला अगदीच कसतरी झालं.  मी हलकेच नजर थोडीशी बाजूला केली तर मला बाजूला त्यांच्या खुर्ची जवळ एक पांगुळगाडा दिसला. काय बोलावे काही सुचतच नव्हते.  मी मनाचा धीर करून शेवटी त्यांना अगदी हळूच विचारले की, अण्णा (सगळे त्यांना अण्णा म्हणतात) हे कधी झाले.  त्यावर ते अगदी सहजपणे म्हणाले अरे ही तर माझ्या सखासोबती मधुमेहाची कृपा दुसरे काय !  झाले ५-६ महिने.  आता हा खोटा पाय आलाय ना त्यामुळे लागलोय परत जोमाने कामाला.  मला काय बोलावे हेच सुचेना.  ह्या माणसाचे वय आहे साधारण ७०-७२ त्यात मधुमेहाची आणि हृदयविकाराची व्याधी गेली १५-२० वर्षे सोबतीला.  तरीही त्यांच्या कामाची ही तडफ व त्यांच्या जिद्दीला मला सलाम करावासा वाटला आणि ह्या एवढ्या दु:खातही खचून न जाता पूर्वी इतक्याच सचोटीने काम करण्याच्या त्यांच्या ईर्षेला मी साष्टांग दंडवत केला आणि मनोमन विचार केला की त्यांच्या अंगावर जो आत्ता असेल तोच असले का, मी सोधत असलेला सुखी माणसाचा सदरा आणि त्यातला सुखी माणूस !

ह्या प्रकारामुळे माझे काही केल्या ह्या मिटिंग मध्ये लक्ष लागेना.  माझी नजर त्यात काहीतरी वेगळेच शोधत बसली होती.  एक एका सदस्याकडे मी एक नजर टाकली.  जवळ जवळ १५ सदस्य जमलेले असावेत.  सगळेच साधारण ५०-७५ वयोगटातील असतील, एखाद दुसरा ४०-४५ असावा. मी माझ्या बाजूला बसलेल्या अजून एका वयस्कर सदस्याकडे पहिले आणि त्यांच्या मनगटावर चिकटवलेल्या रक्त तपासणीच्या चिकटपट्टीकडे माझी नजर गेली.  काका नुकतेच मधुमेहाची तपासणी करून तसेच मिटींगला आले होते.  आता मला जरा जास्तच अस्वस्थ व्हायला झाले.  मी विचार करायला लागलो की इथे बसलेल्या एका तरी माणसाच्या अंगावर सुखी माणसाचा सदरा असायलाच हवा.  मलाच तो का दिसत नाही ?  माझी नजर पुन्हा एकदा तो सुखी माणसाचा सदरा शोधू लागली.  माझ्याही कळत नकळत मी मिटींगला जमलेल्या प्रत्येक सदस्यास न्याहाळू लागलो.  उपस्थित प्रत्येक सदस्याला काही ना काही तरी समस्या अथवा अडचण होतीच.  तरीही कोणाची तक्रार नव्हती. कोणाला नुकताच स्वादुपिंडाचा आजार जडला होता तर कोणाला हृदयविकाराचा, अगदी माझ्या सारखा.  मधुमेह तर जवळ ८० प्रतिशत लोकांचा साथीदार झाला होता.  माझ्याच वयाच्या एका सदस्याला तर कर्क रोग झाला होता आणि त्यातून तो सुधारून आज अतिशय उत्साहाने चक्क मिटींगला आला होता.  काही सदस्य उतार वयामुळे थोडेसे थकल्या सारखे वाटत होते एवढेच.  त्यात एका दोघांची मुले परदेशात असल्यामुळे एकटेपणामुळे थोडेसे उदास वाटत होते परंतु त्यांचाशी बोलतांना त्यांचा तसा काही फारसा तक्रारीचा सूर दिसून येत नव्हता.  उगाचच मलाच तसे वाटत असावे बहुधा !  नुकेतच एका काकांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते तरी त्यांचा मुलगा आणि त्याची आई ते दु:ख विसरून अगदी सर्वसामान्यपणे वागत होते. असो.  एका काकांना वयाच्या ७५ला आहे हे घर पाडून पुन्हा नव्याने बांधून त्यांच्या दोनही नातवांची सोय, ह्याची देही ह्याची डोळा करून पाहण्याची जिद्द होती.  कर्मधर्म संयोगाने अजूनतरी त्यांना फारशी शाररिक समस्या भेडसावत नव्हती.  नाही म्हणायला नुकतेच त्यांचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती तरीही काका अजूनही त्यांचा व्यवसाय करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यात यशस्वी झाले होते.  त्यांच्या ह्या महत्वाकांग्शेमुळेच की काय त्यांच्या अगावरील सदरा मला सुखी माणसाचा भासला होता.  तरी अजून मनाची खात्री होते नव्हती !

माझ्या डोक्यातले हे विचार चक्र असेच चालू होते.  त्याच नादात मिटिंग कधी संपली तेच मला कळले नाही.  मी नियमाप्रमाणे तिथे ठेवलेल्या वहीतील नोंद केलेल्या जागी माझी स्वाक्षरी करून बाहेर पडलो आणि माझ्याच नादात घरा कडे चालू लागलो.  सुखी माणसाचा सदरा शोधण्यासाठी.....

एकदम माझ्या मनात विचार आला की, जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती जी कोणी असेल तिच्या अंगावर तर नक्कीच सुखी माणसाचा सदरा असणार आणि त्यात तो सुखी माणूस दडलेला असणार !  अगदी माझ्या डोळ्यासमोर अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, गरवारे, ह्यांची नावे तरळून गेली.  तसेच एकदा वाटले की भारताच्या पंतप्रधानांच्या अंगावर तर नक्कीच असणार सुखी माणसाचा सदरा !  एकदा असेही वाटले की सध्याच्या काळातील साधू (बुवा-बाबा), संत-महात्मे (म्हणजे तशी बिरुदावली लावणारे), थोर राजकारणी, सत्ताधीश, शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, इत्यादी ह्याच्यापैकी कोण्याच्या तरी अंगावर सुखी माणसाचा सदरा तर नक्कीच असायला हवाच.  शेवटी मला वाटायला लागले की माझेच काही तरी चुकते आहे.  मला माझा ह्या सुखी माणसाच्या सदरयाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलायला हवा.  ज्यासाठी मी जीवाचा आटापिटा चालविला होता त्यासाठी शेवटी मला माझा दृष्टीकोन बदलण्याचा एक शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे, असा कौल माझ्या मनाने दिला.  मी आता वेगळ्याच चष्म्याने ह्या जगाकडे पाहायला लागलो आणि काय आश्चर्य मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता दिसू लागली.

इतका वेळ मी वेड्यासारखा सुखी माणसाचा सदरा आणि त्या सदरयातील सुखी माणूस शोधत बसलो होतो आणि तिथेच गफलत झाली होती माझी दुसरे काही नाही !  आता हळू हळू माझ्या एक गोष्ट लक्षात यायला लागली होती ती म्हणजे जन्माला आल्यापासून ते मरे पर्यंत माणसाला फक्त आणि फक्त समस्यांचाच गराडा पडलेला असतो, अर्थात समस्या कशाला म्हणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.  जन्म आणि मरण ह्यामधील जे काही अंतर असते तेच म्हणजे आयुष्य आहे हेच मी विसरलो होतो.  ह्या आयुष्यात अडी-अडचणी तर येणारच ना ! चांगले-वाईट प्रसंग तर खच्चून भरलेल असणारच ना ! कडू-गोड घटनांचा रांजण तर भरलेलाच असणार ना  !  दु:खाचा डोंगर समोर उभारलेला असतोच ना ! त्यावर मात करत हे जीवन हर्षौउल्हासाने जगणे म्हणजेच सुख असावे असे मला तरी वाटले.  उगाच रडतकढत हे आयुष्य काढणे म्हणजे दैवाने दिलेला सुखी माणसाचा सदरा स्व:ताच्या हाताने टराटरा फाडून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊन, मिळालेले हे आयुष्य कुढत काढणे होय, असे मला वाटायला लागले होते आणि हाच काय तो सकारात्मक बदल मला अगदी प्रकर्षाने जाणवत होता हो.

आपण आयुष्यभर जगण्यासाठी वणवण करतो, का तर मेल्यावर जळण्यासाठीचे सरपण साठवायचे असते म्हणून.  आपण जगतोच कशासाठी हेच उमगतच नाही, कारण ह्या सरपणाचे जगतांनाही आपल्या मनावर एकप्रकारचे दडपण असते.  अहो, जर जन्मताच मृत्यूही नशिबी लिहिलेला असेल, तर मरण्याच्या दडपणातही जगण्याचेही एक वेगळेपण आहे हे नको का कळायला.  शेवटी काय मातीतून जन्मून मिसळावे मातीतच लागते ना !  म्हणुनच वेगळेपणाने जगण्यात मृत्यूचेही एक अजाणतेपण आहे हे लक्षातच येत नाही आपल्या.  शेवटी काय हो, प्रतिभेने मिळवलेली आपली ही प्रतिष्ठा आणि ह्या अजाणतेपणातच आपल्या प्रतिष्ठेचे देवपण असते हेच मुळी आपल्याला उमगत नाही.  शेवटी काय सरपणासाठीचीच आपली ही एक धडपड मला वाटते आणि त्यातूनच ह्या धडपडीच्या देवपणातून शेवटी मृत्यू हे एक समर्पण आहे असे भासावे, हेच तर सुखी माणसाचे लक्षण नाही का ?

मानले तर आयुष्यात खूप सुख असते हे म्हणतात नाही तर दु:खच दु:ख असते हे अगदी खरं आहे हो.  ह्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनाला कंटाळून मी शेवटी उगाचच सुखी माणसाचा सदराविकत घ्यायला अनेक दुकानांतून फिरत होतो.  अगदी खूप नावाजलेल्या संस्थांच्याही दुकानात जावून आलो.  सगळी कडे एकच उत्तर मिळाले मला,  ‘आमच्याकडे अतिशय मौल्यवान अशा कापडाचा, उत्तम कारीगिरी आणि रेशमी धागा वापरून तुमच्याच मापाचा शिवलेला सदरा आहे.  त्याला एक खिसा ठेवला आहे त्यात ते जे काय सुखकी काय म्हणताय ना तुम्हीं तेवढे मात्र तुमचे तुम्हांलाच शोधून भरून ठेवावे लागेल.  त्यांची कुठलीही किमंत आम्ही तुम्हांला लावणार नाही.  फक्त सदऱ्याच्या पैसे द्यावे म्हणजे झाले’.  आता हे सुखम्हणजेच भावनिक, मानसिक, शारीरिक, आत्मिक, सात्विक, आर्थिक, बौद्धिक, शाब्दिक, तात्विक, तांत्रिक, अलौकिक, तारांकित, मानांकित, पारंपारिक, संसारिक, व्यावहारिक, प्रासंगिक, शृंगारिक, वैयक्तिक, सामाजिक, अध्यात्मिक, कौटुंबिक, प्रापंचिक, आधुनिक, वैज्ञानिक, असे समाधान वगैरे वगैरे जे काही आहे ते ज्याचे त्यानेच ज्याच्या त्याच्या प्रारब्धातील संचीतानुसार जमा करून ह्या खिशात भरायचे आणि हा सुखी माणसाचा सदराअंगावर घालून मिरवायचे.  हे उमजल्यावर, आपण इतके कसे काय वेडे होतो आणि इतके साधे गणित आपल्याला कसे कळले नाही ! असे म्हणत मी मनातल्या मनात स्वत:लाच कोसत होतो.

त्याच वेळेस मला एका नुकत्याच पाहिलेल्या चित्रफितीची आठवण झाली.. त्यामधील नवऱ्याला दोन्ही पाय नसतात आणि त्याच्या बायकोला एक हात नसतो आणि दुसरा हात अर्धा असतो.  घरातील कामे अथवा बाहेरील कामे करण्यासाठी त्यांनी ह्या समस्येवर उपाय शोधून काढलेला असतो.  तो म्हणजे, बायको आपल्या पाठीवर एक बकेट लावते व त्यात नवऱ्यास बसवते व ती नवऱ्याचे पाय होते तसेच नवरा तिच्या पाठीवरील बकेट मध्ये बसून तिचे हात होतो.  त्यांच्या शारीरिक व्याधीवर अथवा समस्येवर ह्या दोघांनी मिळून काढलेला हा भावनिक आणि मानसिक तोडगा मला खूप काही शिकवून गेला.  डोळ्यात नुसतेच पाणी नाही आले तर माझा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा एक दृष्टीकोनच मिळाला आणि इतका वेळ वेड्यासारखा सुखी माणसाचा सदराजो मी इकडे तिकडे सर्वदूर शोधत होतो तो मला माझ्याच अंगावर आपसूकच मिळाला.  म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा”, तशीच काहीशी माझी गत झाली होतो, नाहीतर काय !

माझ्याच अंगावरचा सुखी माणसाचा सदराआणि त्याच सदरयातील सुखी माणूस मलाच दिसत नव्हता हो आणि शब्द सुचले की...
जेंव्हा आयुष्य माझे ढळायला लागले,
तेंव्हा आयुष्य मला कळायला लागले ||

रविंद्र कामठे