Thursday, 3 August 2017

महाराष्ट्राचे दार्जीलिंग “महाबळेश्वर”




 
 
महाराष्ट्राचे दार्जीलिंग “महाबळेश्वर”

आपल्या महाराष्ट्राचे दार्जीलिंग म्हणजे “महाबळेश्वर असे म्हंटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. त्यात तुम्हीं जर का ऐन पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलात ना, तर ह्याची अनुभूती तुम्हांला नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही.  स्वर्ग काय असतो, हे जर का अनुभवायचे असेल ना तर ह्या अशा रिमझिम पावसात महाबळेश्वरला एकदातरी जायलाच हवे हो !  मी आजवर वेगवेगळ्या ऋतुंमध्ये महाबळेश्वरला गेलेलो आहे,  पण महाबळेश्वरचे स्वर्गीय सुख व निसर्गाचा अदभूत आणि नयनरम्य अविष्कार जर का अनुभवायचा असेल ना तर, जुलै महिन्याच्या पावसाळ्यात एकदा तरी महाबळेश्वरला भेट द्यायलाच हवी.  इतर वेळेस माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहणारं हे गावं, ह्या सर्द हवेत एखाद्या दुलईत गुरफटून शांत पहुडलेले आहे असे वाटते.  अगदी तुरळक माणसांची गर्दी असते पाहायला मिळते.  त्यात माझ्यासारखे काही निसर्गप्रेमी फिरायला आलेले असतात.  श्रावणातला उनपावसाचा अद्द्वितीय असा खेळ चालू असतो.  वेण्णा लेक कसा ओथंबून वाहत असतो.  त्यावर ढगांची एक मखमली चादर ओढलेली असते,  जशी काही सखा / सखी एकमेकांच्या प्रेमात अगदी नखशीकांत बुडून गेले आहेत असे भासते.  त्यात जर का तुम्हीं ह्या रिमझिम पावसांच्या सरीत, जेथून आपण नेहमी नयनरम्य सूर्यास्त पाहतो, त्या ठिकाणी जर गेलात व तेथे तुम्हीं सोडून दुसरे कोणीही नाही आहे आणि ह्या अशा कुंद आणि धुंद वातावरणात जर का तुम्हांला थर्मास मधून आणलेला गरम गरम चहा पिण्याचा योग लाभला ना तर, तुमच्यासारखा नशीबवान माणूस ह्या पृथ्वीतलावर शोधून सापडणार नाही ह्याची मी तुम्हांला खात्री देतो.  कारण हा अनुभव मी नुकताच घेऊन आलो आहे म्हणून सांगतो.  वेड, वेडं लागतं हो.  आपण आपल्यालाच हरवून बसतो.  काही म्हणजे काहीच, अगदी कविता काय लेख काय, काही काही सुचत नाही.  फक्त डोळे मिटून शांतपणे अनुभवायचा असतो तो, तिथल्या पायरीवर बसून प्रतापगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून येणारा तो हवेतला अल्हाददायक गारवा.  शेवाळलेली झाडे, भिजून भिजून चिंब झालेली ती लाल माती, आणि एक अदभूत अशी निरव शांतंता.  हे सगळे इतके हवेहवेसे वाटते की आपण वातावरणातल्या ह्या सुमधुर नैसर्गिक संगीताचा आस्वाद घेत एक एक क्षण खोल खोल काळजात साठवून ठेवत जोतो.   येथून आपले पाय निघतच नाहीत आणि मला माझ्या “ओंजळ” ह्या काव्यसंग्रहामधील बरसती सरीवर सरी, ही कविता आठवते...


बरसती सरी वर सरी...
छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

उसळले चैतन्य भुवनी
थुई थुई नाचे मोर-मयुरी |
कुहू कुहू कोकिळा गाती
पाखरे गगनी विहारी |
सावळ्या नभी वाजती  
हरीची मंजुळ बासुरी ||

छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

उघडूनी कवाडे मनाची
मेघ वर्षाव करी |
उधळूनी सप्तरंग धनुचे
भास्करही रास करी |
टप टप बरसुनी धारांनी
फुलविले नंदनवन भूवरी |

छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

शमली तप्त ही धरिणी
अंकुरली बीजे ही उरी |
नटली जशी हिरवाईने
लेउनिया शालू भरजरी |
झुळू झुळू वाहती
झरे डोंगर दरी |

छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

मोहरली कळी अन कळी
बाग फुलांनी बहरी |
रुणुझुणु रुणुझुणु गाती
भ्रमर ही फुलांपरी |
सळ सळे आज
आनंदी आनंद चराचरी |
छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||
 
ह्या आठवणी साठवत मी Mapro कडे मोर्चा वळवतो.  तेथे ग्रील संद्वीचवर येथेच्छ ताव मारतो आणि स्त्राबेरी आईस्क्रीम खाऊन मन तृप्त करून वर्षभराची उर्जा साठवून घेतो.

जाता जाता माझा मोर्चा आता पुस्तकाचं गावं कडे माझ्याही नकळत वळतो आणि मी मग पाचगणी जवळील भिलारवाडी ह्या “पुस्तकाचं गावं” ला भेट देतो.  “चपराक” प्रकाशनने नुकताच प्रकाशित केलेला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहाच्या पाच प्रती श्री. बालाजी हळदे ह्याच्याकडे सुपूर्द करतांना मला कोण आनंद होतो म्हणून सांगू.  माझा आनंद गगनात मावत नाही. शेवटी वाईच्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतो आणि त्याला विनंती करतो की मला ह्या रोजच्या धकधकीच्या जीवनात झुंजण्याचे बळ दे रे ‘महाराजा’.

 
माझा आवडत्या किशोर कुमारचे,
रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन
भिगे आज इस मौसम मै
लगी कैसी ये अगन....हे गाणे गुणगुणतच मी तल्लीन होऊन गाडी चालवत रहातो आणि त्याच तंद्रीत कधी घरी पोचतो तेच कळत नाही.     

 

रविंद्र कामठे,
९८२२४०४३३०  

Friday, 21 July 2017

आत्महत्या, एक पाप, की अपराध !

आत्महत्या, एक पाप, की अपराध !

 आंतरजालामुळे सामाजिक माध्यमातून विशेष संदेश पाठवून काही माणसे आपले अमुल्य असे जीवन संपुष्टात आणत आहेत.  आजकाल “आत्महत्या” करण्याचा हा एक नवीनच पायंडा पडत चालला आहे की काय असे वाटायला लागले आहे.  ही बातमी वाचून मन खूपच विचलित होऊन गेले होते.  गेले काही वर्षे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबरोबरच सर्वसामन्य माणसाच्या आत्महत्या हा ही विषय अतिशय गहन होत चालला आहे.  नैराश्याची परिभाषाच बदलेली आहे काय असे वाटायला लागले आहे.  किती कारणांनी सध्या आत्महत्या होत आहेत ! हे जर पाहिलं तर लक्षात येते की माणसांना आपले हे मौलिक जीवन जगण्यापेक्षा संपवणेच जास्त इस्ट आणि सोपे वाटू लागले आहे की काय !  असा एक साधा सरळ प्रश्न मलाच काय पण तुम्हांलाही पडला असेल !  त्यामुळेच माझ्या मनात एक शंका उपस्थित झाली आहे की, आत्महत्या हे एक पाप आहे, की अपराध ?  ह्याच प्रश्नाचे उत्तर मिळविण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करू पाहतोय.

एखादी व्यक्ती आत्महत्येस अनेक कारणांनी प्रवृत्त होते; जसे की, नोकरीच मिळत नाही किंवा चांगली नोकरी मिळत नाही अथवा मिळालेली नोकरी काही कारणांनी जाते.  लग्नच होत नाही, आणि झाले तर मनासारखी बायको अथवा नवरा मिळत नाही.  एकतर्फी प्रेमात मित्र/मैत्रीणीचे प्रेम लाभत नाही. तर विवाहानंतर काही कारणांनी म्हणावे असे शारीरिक आणि मानसिक सुख लाभत नाही.  शाळेत अभ्यास करूनही चांगले गुण मिळत नाहीत.  काही ना काही कारणांमुळे सतत अपमान होत असतो.  प्रयत्नपूर्वक कष्ट करूनही समाजात स्थान अथवा प्रतिष्ठा लाभत नाही.  जन्मजात अपंगत्व आलेले असते तर कधी कधी अपघाताने अपंगत्व येते.  काही माणसे शारीरिक व्याधींनी त्रस्त असतात, तर वाईट संगतीतून व्यसनाच्या आहारी जातात, नंतर ही व्यसने सुटता सुटत नाहीत.  प्रयत्न करूनही बऱ्याचदा मनासारखे काहीच घडत नाही, तसेच आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती दुसऱ्यावर प्रेम करत असते, तर कधी कधी एकतर्फी प्रेमातून मन निराश होते.  आयुष्यात कधी कधी अतिप्रसंग घडतात, बलात्कारासारख्या घटनांना सामोरे जावे लागते.  कामाच्या ताणामुळे अथवा व्यवसायिक व्यस्ततेतून मानसिक दडपण येते.  दीर्घ आजारातून सुटका होत नसते, शाळेत अथवा कामाच्या ठिकाणी सतत अपमानीत वागणूक मिळते.  आयुष्यात कधी कधी खूप खडतर प्रसंग येतात, त्यामधून एक प्रकारचे नैराश्य आणि वैफल्यग्रस्त झाल्याची भावना मनात निर्माण होते. सतत येणारे अपयश व साप्तनिक भावना बळावल्यामुळे, अथवा दुर्लक्षित राहिल्यामुळे असो किंवा कधी कधी आर्थिक अडचणींवर मात करता न आल्यामुळे म्हणा, अशी आणि अजून कितीतरी वेगवेगळी कारणे माणसाला आत्महत्येस प्रवृत्त करत असतात.  समाजातील सर्वच थरांमधील विश्लेषणातून हे निष्कर्ष समोर आलेले आहेतच, मी फक्त ते माझ्या परीने परत एकदा तुमच्या सामोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे बाकी काही नाही.   आत्महत्या ही जरी एक वैयक्तिक समस्या असली तरी तिचे गंभीर परिणाम समाजावर होत आहते आणि त्यामुळेच ह्या समस्येवर प्रत्येकाने थोडासा विचार करून योग्य ते उपाय करायला हवे असे मला अगदी प्रकर्षाने वाटते आहे. 

मी हे सगळे तुमच्या समोर मांडून माझे मन थोडेसे हलके करण्याचा प्रयत्न करतो आहे.  कारण, मी,  माझ्या अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या बाबतीत हा प्रकार अगदी जवळून अनुभवला आहे. त्यावेळेस वेळे अभावी म्हणा अथवा मला वेळेत न समजल्यामुळे म्हणा, मी त्यांच्या उपयोगी पडू शकलो नाही ह्याची मला कायमच खंत वाटत आली आहे.  म्हणजे, एक व्यक्ती त्याच्या कामाच्या ताणातून आणि संसारातील कटकटीतून सुटका होण्यासाठी वैफल्यग्रस्त होऊन, आपला भरला संसार सोडून घरातून कायमचा निघून जातो काय आणि त्याचा गेली ८ वर्षे कुठेही तपास लागत नाही, हे सत्य पचवायला किती जड आहे हे तुम्हीं समजू शकता !  तर दुसरी अशीच कमकुवत मनाची एक व्यक्ती केवळ आणि केवळ आर्थिक अडचणींमुळे, निराशेपोटी वयाच्या २८ वर्षी, मागे बायको आणि दोन लहान मुले ठेवून, स्वत:चे आयुष्य गळफास लावून संपवते, तेंव्हा तर मला त्या व्यक्तीचा मनापासून रागच आला होता. आणि मध्यंतरी माझ्या एका मित्राने स्वत:चे आयुष्य संपवले होते, तेंव्हा तर माझी पायाखालची जमीनच सरकली होती.  कारण माझ्या ह्या मित्राचा प्रेमविवाह झालेला होता, तरीही त्याला सोडून त्याची ही प्रेमाची बायको त्यांच्या लहान ७ वर्षाच्या मुलासकट दुसऱ्याच एका माणसाबरोबर अमेरिकेस पळून जाते आणि तिकडून ह्याला घटस्पोटाची नोटीस पाठवते.  त्यामुळे तो खच्ची तर होतोच पण न्यायालयाच्या खेटा मारता मारता, कर्ज बाजरीही होतो, समाजात अपमानित होतो आणि त्याच मानसिक अवस्थेत स्वत:चे आयुष्य संपवून ह्या समस्येतून स्वत:ची सुटका करून घेतो.  परंतु त्याच्या मागे त्याचे संपूर्ण खानदान उध्वस्त तर होतेच होते, पण देशोधडीलाही लागते.  हो ही सत्य घटना आहे ह्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, कारण ह्यात मी सुद्धा त्याला आर्थिक मदत करून पोळलो गेलेलो आहे.  अगदी त्याच्या मृत्युनंतर जवळ जवळ दोन वर्षे मी माझ्या पगारातून हप्ते लावून त्याचे हे कर्ज फेडलेले आहे.  अर्थात ती माझी नैतिक जवाबदारी होती म्हणूनच.  तरीही ह्या पैकी कोणालाही मी आत्म्हत्येपासून परावृत्त करू शकलो नाही, कारण मला ते इतकी टोकाची भूमिका घेतील आणि असे वेड्यासारखे वागतील ह्याची थोडीशीही शंका कधी आलीच नाही व मला त्यांच्या बदलत्या मानसिकतेची पुसटशी कल्पनाही आली नाही, ह्याचेच शल्य बोचते आहे.

तसे पहायला गेले तर माणसाचे जीवन किती सुंदर आहे नाही !  ते जगण्यासाठी आहे, मरण्यासाठी नाही, कारण जन्मताच प्रत्येकाचा मृत्यू लिहिलेला असतो हो. जीवन मरणातील जे अंतर आहे तेच हे आपले आयुष्य आहे आणि ते आपण आपल्या कर्तुत्वाने घडवून सुंदर तर नक्कीच करू शकतो !  ह्या निमित्ताने मला माझ्याच एका कवितेतील काही ओळी आठवल्या...

जगण्यासाठी मरतो कशाला,  मरण्यासाठीच जगणे हे. 
कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे. 
नको करूस क्रोध त्रागा, जो तुलाच तुझ्यापासून दुरावेल. 
तू तुझाच आहेस, परंतु सर्वांना हवा आहेस | 
दु:ख हे सर्वांनाच असते,  नाही त्यातून तुला सुटका. 
दु:खातही सुख शोधावे,  हेच जीवनाचे सार्थक आहे. |

मराठी-हिंदी तसेच एकंदरीत सर्व भाषिक चित्रपट सृष्टीने तर, जीवन ह्या विषयावर आपल्याला खूप भरभरून भावविश्व दिलेले आहे.  ह्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी, कवी, गीतकार, संगीतकारांनी, चित्रपट, नाटक, संगीत इत्यादी माध्यामतून खूप मोलाचे समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे हे आपण कधी विसरू शकणार नाही.  ह्याच सगळ्याचा विचार करतांनाच, मला शोर ह्या चित्रपटातील, स्वर्गीय मुकेश ह्यांच्या दर्दभऱ्या आवाजातील गाण्याच्या ह्या हृदयाला भिडणाऱ्या ओळी अगदी सहज आठवल्या, इतके प्रभावी असे हे माध्यम आहे.  आज ३५ वर्षानंतरही ह्या चित्रपटामधील कधी दृश्ये डोळ्यासमोर उभी राहिली आणि डोळे भरून आले व त्या चित्रपटामधील पात्रांशी, कथेशी, गाण्याशी एकरूप होऊन, जगण्याची नवी उमेद देऊन गेली..

कुछ पाकर खोना है,  कुछ खोकर पाना है,
जीवन का मतलब तो, आना और जाना है |
दो पल के जीवन से, एक उम्र चुरानी है,
जिंदगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहाणी है |
एक प्यार का नगमा है....

आपल्याकडे जीवनावर खूप समृद्ध असे साहित्य उपलब्ध आहे आणि नवनवीन कवी, गीतकार, संगीतकार त्यावर जीव तोडून काम करत असतात व एकप्रकारे समजाचे ऋणच फेडत असतात, असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.  मनोरंजनाचा भाग जरी त्यात असला तरी, ह्या मनोरंजनातूनच चिंतन करून आयुष्याकडे सकारात्मक दुर्ष्टीने पाहण्याचा आपला दृष्टीकोन तयार करण्यात ते बऱ्याच अंशी नक्कीच यशस्वी होतात, असे मला तरी वाटते.  अगदी तसेच, जमीर ह्या चित्रपटामधील किशोर कुमारच्या अतिशय मुलायम आवाजातील हे गाणे व त्यामधील प्रतिभावंत गीतकाराच्या शब्दांची ताकद, नैराशेने ग्रासलेले मनात एक नवचैतन्य निर्माण करून जाते..


जिंदगी...............

हसने गाणे के लिये है पल, दो पल,
इसे खोना नही, खोके रोना नही.....जिंदगी....
तेरे गिरने मै भी, तेरी हार नही,
के तू आदमी है, अवतार नही.....

ह्या प्रमाणे असेच काहीसे प्रगल्भ तत्वज्ञान मोठ मोठ्या गीतकारांनी आपल्या समोर मांडले आहे.. जसे..

समझोता गमों से करलो,
के जिंदगीमे गम ही मिलते है,
पतझड आते ही रहते है,
के मधुबन फिरभी खिलते है......

हेच विचार वैफल्यग्रस्त आणि निराशावादी माणसांना योग्य पद्धतीने सांगण्याची, समजून देण्याची काळाची गरज त्यावेळीही होती आणि आजही आहे.  आपल्यासारख्या आशावादी विचारसरणीच्या लोकांची ही एक सामाजिक जबाबदारी आहे असे मला वाटते.  आत्महत्येचे हे भूत त्याशिवाय अशा मानसिकरीत्या पिडीत लोकांच्या मानगुटीवरून खाली उतरणार नाही आणि हे पाप किंवा अपराध त्यांच्याकडून घडू न देण्याचे आपले कर्तव्यच आहे असे मला ह्या निमित्ताने म्हणावयाचे आहे. 
 
असेही कायद्याने आत्महत्या करणे हा एक गुन्हा आहे.  पण हा गुन्हा सिद्ध करून तरी काय साध्य होणार आहे हो.  गेलेला जीव तर काही त्यामुळे परत तर येत नाही ना !  तसेच वैदकीय दृष्ट्या जर्जर आजारांनी पिडीत असलेले आणि अगदी जगण्यात अथवा त्यांना जगवण्यात कुठलेच हाशील नसलेल्या जीवांनाही आपला कायदा इच्छामरण देण्याची परवानगी देत नाही हो.  हे सद्धा लक्षात घ्यायला हवे.  नुसते कायदे करून काय साध्य होणार आहे.  माणसांची आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची वृत्ती बदलणेच जास्त संयुक्तिक वाटते. 

बरं, आत्महत्या काही सध्याच होत आहेत असेही नाही !  पूर्वीही होतच होत्या, पण त्यांचे प्रमाण सध्या जरा जास्तच वाढलेले दिसते आहे.  तसेच अतिशय फुटकळ कारणांसाठी माणूस आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवत आहे.  ह्याला अपवाद असले तरीही आत्महत्येस कुठलेही कायदेशीर अथवा वैचारिक असे कुठलेच अधिष्ठान नाही हे सुद्धा विसरून चालणार नाही.  आत्महत्या हा एक पर्याय तर नक्कीच नाही.  परंतु आपण जर ह्या विषयावर थोडासा उहापोह केला तर तुम्हीही माझ्या ह्या मताशी सहमत व्हाल.  कारण माझ्या दृष्टीने आत्महत्या करणे म्हणजे, आपल्या आयुष्यात उदभवलेल्या समस्यारूपी परिस्थितीपासून पळून जाणे होय.  तो निश्चितच एक फार मोठा अपराध आहे व तसेच ते पापही आहे असेच माझे मत आहे.  आयुष्यात संघर्ष हा हवाच.  सर्व काही जर आपल्याला सुखासुखी मिळाले तर त्याची मजा फार काळ रहात नाही.  परंतु तीच गोष्ट जर आपल्याल्या अथक परिश्रमाने मिळाली तर त्याच्यासारखे सुख आणि समाधानही नसते !  नेमके हीच भावना, परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द ज्यांच्या ठाई नसते ते आपले मनोबल हरवून बसतात आणि नियतीच्या दृष्ट चक्रात अडकतात आणि आपले जीवन संपवतात.  त्यामुळे ते स्वत:ची आणि आपल्या आप्तेष्टांच्या भावनांची प्रतारणा करतात.  म्हणूनच आत्महत्या हे नुसते पाप नसून तो एक फार मोठा अपराधच आहे व एक गंभीर सामाजिक समस्याही आहे असे मला वाटते.

जीवनामध्ये लवकरात लवकर सफल होण्याचे अनेक मार्ग आज आपल्या समोर आहेत, परंतु हे मार्ग सगळ्यांनाच सापडतात असेही नाही.  त्यामुळेच मनाने दुर्बल असणारी माणसे अगदी टोकाचा विचार करून स्वत:चे आयुष्य संपवतात ना, तेंव्हा मनाला फार वेदना होतात हो.  जो जातो ना तो सुखी होतो. परंतु त्याच्या मागे राहणारी रक्ताची माणसे आयुष्यभर ह्या व्यथेत फरफटत जातात, अगदी त्यात त्यांचा दोष असला तरी आणि नसला तरीही. 

गेले काही वर्षे सर्वात जास्त आत्महत्या आपला बळीराजा करतांना दिसतो आहे. रोज कुठे ना कुठे कित्येक शेतकरी आपले नैराश्यपूर्ण जीवन संपुष्टात आणत आहेत आणि त्याची कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्यास आपला समाज, सरकार, प्रशासन आणि व्यवस्थापन कमी पडते आहे. त्यात भरीला भर अताश्या, शहरी भागातही, भौतिक गरजांच्या मागे लागून होणाऱ्या आत्म्हत्येंचे प्रमाणही मन विचलित करण्या इतपत वाढलेले दिसते आहे.  माणसांमधील माणुसकी लयाला जात चालली आहे असेच भासते आहे.  ह्या सगळ्यामुळे मन अगदी दु:खीकष्टी होते आहे.  कोणाशी बोलावे, कसे व्यक्त व्हावे आणि आपल्या मनातील विचार समाजापर्यंत कसे पोचवावे ह्या दृष्टीकोनातून मी हा लेख प्रपंच मांडला आहे.  माझ्या ह्या प्रयत्नांतून मी एक जरी आत्महत्या रोखू शकलो अथवा एका व्यक्तीला जरी आत्म्हत्येपासून परावृत्त करू शकलो, तर माझे हे जीवन सार्थकी लागेल अशी भावना माझ्या मनात डोकावते आहे.

नैराशेने ग्रासलेली अशी वैफल्यग्रस्त माणसे आपल्या आसपास वावरत असतील तर त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा.  त्यांना बोलते करावे.  त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घ्यायला हव्यात.  त्यांच्याशी शक्यतो सकारात्मक दृष्टीने संवाद साधायला हवा.  कुठलाही पूर्वग्रहदूषित न ठेवता त्यांच्याशी सतत बोलत राहावे.  त्यांच्या एकंदरीत वागणुकीवर आणि हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे.  आपल्याबरोबर अजून काही लोकांना, तसेच त्यांच्या जवळच्या माणसांना त्यांच्या ह्या मनस्थितीची व्यवस्थित जाणीव करून द्यावी आणि शक्य असल्यास अशा लोकांना कधीही एकटे अथवा मोकळे सोडू नये.  तुमच्याने जर हा विषय हाताळता येत नसेल तर योग्य वेळी जवळच्या एखाद्या समुपदेशन केंद्रास अथवा चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे अशा व्यक्तीस दाखवावे आणि त्यावर लगेचच उपचार सुरु करावेत.  तुमच्या ह्या प्रयत्नांना कुठेही आणि कुठल्याही परिस्थितीत खंड पडू देऊ नये, तसेच संवाद, समुपदेशन आणि उपचार अर्धवट सोडू नयेत.

आपल्या समाजामध्ये जिद्दीने लढणारी आणि प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारी अनेक उद्हारणे आहेत.  अशा लोकांचा आदर्श डोळ्यासमोर जरूर ठेवला पाहिजे.  विकलांग आणि अपंग माणसे तर ह्याचे अगदी ज्वलंत उदाहरण आहेत.  ही माणसे त्यांच्याकडे निसर्गाने काही कमी दिले आहे म्हणून रडत बसत नाहीत किंवा नियतीला कोसत आयुष्य कंठत नाहीत.  उलट ते तितक्याच जिद्दीने व ताकदीने अथक परिश्रमाने स्वत:ला त्यात झोकून देऊन आलेल्या परिस्थितीशी सामना करतात व आयुष्याची ध्येय पार करतात, हे मी नुकतेच एका अंध अनाथ कल्याण केंद्राच्या कार्यक्रमास गेलो होतो तेंव्हा अनुभवले आहे.  संदीप नावाच्या हा अंध विद्यार्थी उत्तम तबलावादक आहे.  मी त्याला सहज विचारले की तुझे आयुष्यातले सर्वात मोठे ध्येय काय आहे !  तर त्याने मला जे उत्तर दिले ते ऐकून मी तर अचंबितच झाले.  तो म्हणाला मला उस्ताद झाकीर हुसेन ह्यांच्या सारखे जगप्रसिद्ध तबलावादक व्हायचे आहे.  अशी अजून किती तरी उदाहरणे प्रत्येकाच्या आयुष्यात पदोपदी दिसत असतील.  त्यांच्या कडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे आणि त्यातूनच शिकण्यासारखे खूप काही आहे.  हाच एक आशावाद माझ्या मनात सारखा डोकावतो आहे.

माणसाचे मन हे फार चंचल आणि अस्थिर असते.  आजकाल छोट्या छोट्या घटनांनीही ते कधी विचलित होईल ह्याची शास्वती देताच येत नाही.  समस्येच्या मुळापर्यंत जावून तिचा समूळ नायनाट करणे हाच एकमेव पर्याय अशा आत्म्हत्येंचे प्रमाण रोखण्यास उपायकारक ठरू शकतो आणि अशा मनोदुर्बल घटकांना एक आधार आपण नक्कीच देवू शकतो, अशी माझी तरी अतिशय तीव्र भावना आहे.  त्याच भावनेपोटी मी तुम्हांला वरील उपाय योजना सुचविण्याचा एक छोटासा प्रयास ह्या लेखाद्वारे करतो आहे व आत्म्हत्येसारख्या पाप वा अपराधातून ह्या पीडितांना मुक्त करण्याचा माझा ध्यास आहे.
 
रविंद्र कामठे,
९८२२४०४३३०

Monday, 3 July 2017

|| विठ्ठला ||


|| विठ्ठला ||

सावळ रूप तुझे विठ्ठला, भावते रे ते मनाला,
ओढ तुझ्या भेटीची लागते जीवाला, चैनही पडत नाही पायाला ||
 
आस पंढरीच्या वारीची, मन धावे चंद्रभागेच्या तीरी,
तुझ्या दर्शनाच्या बारी, विठ्ठल विठ्ठल करतेय वारी ||
 
टाळ मृदुंगाचा नाद जगी, रिंगण रंगेतेय जागो जागी,
बाया बापुडे फेर धरी, तुझ्या नामाचा गजर करी ||

भागवत धर्माची पताका घेउनी हाती, ग्यानबा तुकाराम पालखी नाचती,
आभाळातून आशिष बरसती, भजनात वारकरी तल्लीन होती ||

युगानु युगे उभा तू विटेवरी, विठ्ठल रखुमाईची पंढरी,
टेकता माथा तुझिया चरणी, जन्म हा लागतो सार्थकी ||

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, गजर तुझा नामाचा आसमंत दुमदूमी ||

 
रविंद्र कामठे.
प्रतिबिंब काव्यसंग्रह.

“क्षण”


क्षण

 काही क्षण हे असे असतात की जे काळजात खोलवर रुतून बसलेले असतात.  आपण जेंव्हा एकांतात असतो तेंव्हा हे क्षण असे काही छळतात ना की विचारू नका !  ह्या क्षणांचे गणित जरा वेगळेच असते.  ते काय व कसे आपल्या स्मृतीपटलावर अवचित उमटून जाते ना तेच तर कधी कधी कळतच नाही.  त्यात जर का हे क्षण प्रेमाचे असतील ना तर काही विचारूच नका.  मनाची जी काही हळवी आणि केविलवाणी अवस्था होऊन जाते ना की पाहायलाच नको !  हेच ते क्षण जेव्हा आपल्या आयुष्यात आधी कधी तरी येवून गेलेले असतात.  पण त्यावेळेस त्या क्षणांचे महत्व म्हणा अथवा त्यांची प्रगल्भता आपल्याला जाणवलेली नसते.  असे हे क्षण आपल्या उतरणीला लागेलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून जातात तेंव्हा मात्र मन कसे गलबलून येते.  ह्या क्षणांमध्ये पुन्हा पुन्हा हरवून जावेसे वाटू लागते.  परत एकदा आपण तरुण झालो आहोत असेच काहीसे वाटायला लागते.

 आपले हे हळवे मन विचलित होऊन जाते.  मग त्या क्षणांच्या गुंत्यात अजूनच गुरफटून गेल्या सारखे होते.  त्या हरवलेल्या क्षणांची महती कळायला लागते आणि काय आश्चर्य, काही काळासाठी का होईना आपण ह्या क्षणांच्या आठवणींमध्ये इतके रमून जातो की त्यातून बाहेर येवूच नये असे वाटते.  ह्या क्षणांच्या ऋणात राहणे आपल्यला सुखद वाटायला लागते.  माझ्या मनात जे काही चालले आहे ना अगदी तेच माझ्या सारख्या समवयस्क असलेल्यांच्या मनातही नक्की चालू असणार ह्याची मला खात्री वाटते.  अहो, मी फक्त कागदावर उतरवण्याचे धारिष्ट्य केले आहे एवढेच.  त्याचे काय आहे, की त्यामुळे आपले मन जरा हलकं होतं व अजून असेच काही सुखद क्षण राहिलेत की काय असे वाटायला लागते आणि आपले मन त्या क्षणांच्या शोधात भरकटायला लागते हो. 

माझा एक अनुभव आहे, जो मी तुम्हांला सांगतो.  ह्या क्षणांच्या ऋणात म्हणा किंवा त्यांच्या आठवणीत मन जे काही रमते ना, ते दुसऱ्या कशातही रमत नाही, बर का !  त्यामुळे माझे तुम्हांला एक सांगणे आहे, की तुम्हीं जरा तुमच्या स्मरणशक्तीला थोडासा ताण द्या आणि आठवा ते सुखद, हळवे, कोमल, मोकळे, रसिक, सुहासिक, प्रांजळ, अगतिक, वास्तविक, प्रामाणिक, प्रेमळ, मायाळू, असे काही क्षण आणि बघा ना, आपल्या मनाचे सोंदर्य कसे झळाळून निघते ते !  मला तर ना, ह्या क्षणांचा मोह आवरतच नाही.  जरा वेळ मिळाला की मी त्यांच्यात रममाण होऊन जातो.  अगदी भान हरवून बसतो.

तसे पाहायला गेले तर काही काही क्षण हे थोडेसे दुखरे ही असतात हो.  पण त्याच्याही आठवणी जर का ताज्या झाल्या ना की आपल्याला आपण आयुष्यात केलेल्या चुकांची आपसूकच आठवण येते.  आपल्या नकळत आपण त्यात भरडल्या गेलेल्यांची क्षमा मागून जातो.  आपल्याला माहिती असते की आता फार उशीर झालेला आहे.  तरी आपले मानसिक समाधान मिळविण्याचा आपला हा एक प्रामाणिक प्रयत्न मनाला थोडासा दिलासाही देवून जातो.  शेवटी काय आहे, ह्या जन्मी केलेल्या पाप-पुण्याचे मोजमाप आणि त्याचा हिशेब येथेच द्यावा लागतो.  सगळा ठोकताळा येथेच बांधावा लागतो.  हा नियतीचा नियम आहे.  स्वर्ग-नर्क काही नसते हो.  हे सुखद क्षणच आपले स्वर्ग असते तर दुखरे क्षण हे नर्क असावे असे वाटते.  क्षणाच्या ऋणात राहूनच कर्म करत राहायचे असते.  जीवन हे असेच असते, ते हसत हसत जगायचे असते.

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०  

Friday, 23 June 2017

“व्यसनमुक्ती”


व्यसनमुक्ती

व्यसन कसले असावे, कशाचे असावे, ते का होते ?  केंव्हा जडते ? कसे जडते ? कोणामुळे होते ? कधी होते ? कशासाठी होते ? असे आणि अजून काही प्रश्न आपल्याला पडतात तेंव्हा समजावे की लवकरच आपण ह्या व्यसनातून मुक्त होणार आहोत.

अर्थात व्यसन हे काही फक्त दारू, सिगरेटचेच असते असेही नाही.  ते एखाद्या छंदाचे, खेळाचे, पुस्तकाचे, नाटकाचे, चित्रपटाचे, अभिनेत्याचे, अभिनेत्रीचे, आपल्या आवडत्या व्यक्तीचे, एखाद्या ठिकाणाचे, आवडत्या गायकाचे, त्याच्या गाण्यांचे असू शकते ! 

अर्थात दारू आणि सिगरेट हे व्यसन आपल्या तब्बेतीला घातक आहेत हे सांगूनही समजत नाही.  बाकीची व्यसने शरीराला तशी फारशी अपायकारक नाहीत. उलट ती आपल्यामध्ये जगण्याची एक नवी उमेद आणि उर्जाच देत असतात हे समजते पण उमजत नाही हे निर्विवाद सत्य आहे.

हेच व्यसन जर का आपल्या आवडत्या व्यक्तीचे असेल ना तर काय विचारू नका.  त्या व्यक्तीला न्याहाळत बसण्याचे, तिच्याशी गप्पा मारण्याचे, तिचे रूप पाहून मनात साठवण्याचे, तिचे गुण गाण्याचे आपल्याला व्यसनच लागते.   ह्या व्यसनात धुंद होऊन मग आपण त्या व्यक्तीवर स्तुती सुमने उधळायला लागतो.  ती व्यक्ती आपल्यापासून थोडीशीही लांब गेलेली चालत नाही.  ह्या व्यसनाने मनात आलेला उल्हास त्या व्यक्तीवर स्तुती सुमनांची अशी उधळण करतो.. व्यसन मला तुझ्या......धुंद स्वासांचे | आंतरिक गंधाचे | व्यसन मला तुझ्या......कोमल हृदयाचे | निर्मल मनाचे | व्यसन मला तुझ्या......लाघवी बोलण्याचे | खळखळून हसण्याचे | व्यसन मला तुझ्या......मादक डोळ्यांचे | रसरशीत ओठांचे | व्यसन मला तुझ्या......लांबसडक केसांचे | गुबगुबीत गालांचे | व्यसन मला तुझ्या......नकट्या नाकाचे | सुबक कानांचे | व्यसन मला तुझ्या......डौलदार चालण्याचे | सुडौल बांध्याचे | व्यसन मला तुझ्या......मिश्किल स्वभावाचे | प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे | व्यसन मला तुझ्या......टापटीप राहण्याचे | वक्तशीर पणाचे | व्यसन मला तुझ्या......तुझ्यातील माणुसकीचे | सामजिक बांधिलकीचे | व्यसन मला तुझ्या......अधिकार वाणीचे | समय सूचकतेचे | व्यसन मला तुझ्या......मैत्रीच्या धाग्याचे | प्रगतशील कर्तृत्वाचे | व्यसन मला तुझ्या......माझ्यावरील निस्सीम प्रेमाचे | तुझ्यातील माझ्या अस्तित्वाचे |

आज हे सगळे आठवण्याचे कारण की १९७८ साली ( मी दहावीत असतांना ) मला सिगरेटचे व्यसन लागले होते त्यानंतर ओघाओघाने दारूचेही व्यसन लागले.  ही दोनही व्यसने माझ्या आयुष्याला जवळ जवळ ४० वर्षे चिकटून राहिली.  माझ्या शरीराची कधीही न भरून येणारी हानी करून गेली, हे मला फार उशिरा उमजले.  २२ मे २०१७ ला मी स्वत:ला ह्या व्यसानांतून मुक्त केले त्याला आज बरोबर एक महिना झाला.  आता मी माझ्या आवडत्या छंदात, आवडत्या व्यक्तींमध्ये रमू शकतो.  आयुष्याच्या ह्या संधेवर त्यांच्या सोबतीचा आनंद घेऊन उरलेले हे आयुष्य सत्कारणी लावू शकतो असे वाटते.  ४० वर्षे ह्या व्यसनांनी माझी दुरावस्था केली.  आयुष्यातले खूप चांगले क्षण ह्या व्यसनांमुळे वाया गेले असे वाटते.  गेलेले क्षण तर मी परत आणू शकत नाही.  त्यामुळे झाले गेले विसरून जातो.  आता पश्चाताप करून काही उपयोग नाही. 

माझ्या ह्या व्यसनमुक्तीचे श्रेय कोणा कोणाला देवू असे झाले आहे. एकाला दिले तर दुसऱ्याला राग येईल.  त्यापेक्षा हे श्रेय कोणालाच द्यायला नको.  हे श्रेय मी नियतीला देतो.  नियती म्हणजे जी की जिने मला हे व्यसन सोडायला भाग पाडले.  तीने माझ्याशी अक्षरशः एक प्रकारचे मानसिक द्वंदच  केले असे म्हणायला हरकत नाही.  माझ्या समोर दारू आणि सिगारेट सोडण्याशिवाय पर्यायच ठेवला नाही.  त्या नियतीला मी मनापासून दंडवत घालतो आणि तिच्या उपकाराच्या ओझ्यातच राहणे पसंत करतो.  

वाल्याचा वाल्मिकी झाल्यासारखे वाटते आहे रावं” ! 

Wednesday, 21 June 2017

आयुष्यावर बोलतो काही

आयुष्यावर बोलतो काही! http://www.chaprak.com/2017/06/raivndra-kamthe-abt-life/ via @echaprak

जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे
कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे
नको करूस क्रोध त्रागा, जो तुलाच तुझ्यापासून दुरावेल
तू तुझाच आहेस, परंतु सर्वांना हवा आहेस
दु:ख हे सर्वांनाच असते, नाही त्यातून तुझी सुटका
दु:खातही सुख शोधावे, हेच जीवनाचे सार्थक आहे


आपले आयुष्य हे आपणच घडवायचे असते, हे सांगावयास का लागते हे मात्र मलाच काय पण बर्‍याचजणांना कळत नाही. म्हणूनच मला माझ्या ‘जगावे परी कीर्तिरूपे उरावे’ ह्या कवितेच्या ओळी आठवल्या. आयुष्याचे खूप मोठे तत्त्वज्ञान ह्यात आहे असेच मला भासायला लागले. जन्मापासून मरणापर्यंत आपली जी काही धडपड, वणवण, तडमड चाललेली असते ती पाहिली की हे सारे आपण कशासाठी करतो आहोत असा एक प्रश्‍न मला तरी नेहमीच पडतो! त्याचे उत्तर त्या प्रश्‍नातच असते आणि ते आपल्याला सापडत नसते. म्हणूनच संपूर्ण आयुष्य आपण ह्या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यात खर्ची घालतो. शेवटी त्याचे उत्तर मिळते का? तर हो पण आणि नाही पण, असे उत्तर आहे. कारण जिवंतपणी उत्तर सापडले तर आपले हे आयुष्य सार्थकी लागले असे वाटते आणि नाही असे उत्तर असेल तर, हे आयुष्य अपूर्ण राहिले असे म्हणावे लागते.  परंतु हे जो जातो ना त्याला कधीच कळत नाही. त्याच्या मागे राहिलेल्यांना ह्या प्रश्‍नांची उत्तरे शोधावी लागतात आणि तसे करताना तेही त्यांचे आयुष्य त्यात खर्ची घालतात. काही सफल होतात आणि काही असफल!  हा सगळाच खेळ असतो नियतीचा, आपल्या संचिताचा आणि प्रारब्धाचा! आपल्याला आयुष्यात बर्‍याच गोष्टी कळतातच असे नाही.
विणले तर कळतात – कष्ट घरट्याचे ।
पाहिले तर कळते – कारण घडल्याचे ।
लिहिले तर कळतात – अर्थ शब्दांचे ।
वाचलेच तर कळते – मन लिहिणार्‍याचे ।
स्पर्शानेच तर कळते – विश्‍व भावनांचे ।
डोळ्यांनाच तर कळतात – भाव मनाचे ।
कळते परंतु वळत नाही, हेच तर गमक आहे हृदयाचे ।

आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न आपल्याला सगळ्या प्रश्‍नांची सोपी अशी उत्तरे देवू शकतो, असा माझा तरी अनुभव आहे. म्हणूनच, मला आयुष्यावर काहीतरी लिहावे असे वाटले आणि आजवरील माझ्या आयुष्याचा हा प्रवास मला कसा वाटला हे शब्दांकीत करावेसे वाटले. प्रत्येकाचे आयुष्य हे निराळेच असते, ज्याची त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते आणि ते जगण्याची पद्धतही निराळीच असते. तरीही बर्‍याचशा गोष्टींमध्ये काही साम्य तर नक्कीच असते. नेमके तेच टिपून त्यावरून काही उद्बोधक असे विचार जर मांडता आले तर हे एकप्रकारचे समाजप्रबोधन होऊ शकते अशी मला पुसटशी आशा वाटली व मी माझ्या लेखणीला साद घातली की चल मी आज आयुष्यावर बोलतो काही आणि तू ती त्याच उत्कटतेने व्यक्त कर!
माझे बालपण बेताच्या परिस्थितीत परंतु अतिशय सुसंस्कृत वातावरणात गेलेले. माझे वडील तर माणुसकीचे प्रतिष्ठानच नव्हे, तर माणुसकीचे एक अधिष्ठानच होते. आई माझी खूपच सुशील! आमच्या आयुष्याचा ती तर एक कंदील. मला माझ्या आईवडिलांकडून वारसाहक्काने मिळालेली कष्ट, स्वाभिमान, नीतिमत्ता, सचोटी, इमानदारी, प्रामाणिकपणा आणि माणुसकी, हीच काय ती अमुल्य अशी दौलत, जी आज माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन गेली आहे. त्यामुळे आनंदाने आणि स्वाभिमानाने कसे जगता येते ह्याचे उत्तम उदाहरण, जो काही आज मी तुमच्या समोर उभा आहे तो रवी, कवी, लेखक होय. मन लावून प्रामाणिकपणे कष्ट करणे हा तर माझा छंदच आहे म्हणा!  त्यात मला आनंदही खूप मिळतो आणि समाधानही मिळते.
नियतीच्या खेळाचे एक रूप मला माझ्या पन्नाशीलाच जाणवले. आमच्या लहानपणी आम्ही भावंडे नारायण पेठेतील प्रेसमधून छापून झालेले कागद मुडपायला घरी आणायचो व त्याचे आम्हाला 10000 कागदांना एक रुपया असे पैसे मिळायचे. बेताच्या परिस्थितीमुळे आई वडिलांच्या संसाराला, आम्हा भावंडांचाही थोडाफार हातभार लागावा, हेच काय ते आमचे संस्कार आम्हाला सांगत होते. तोच मी जेव्हा नारायण पेठेतल्या एका प्रेसमध्ये माझा ‘प्रतिबिंब’ हा काव्यसंग्रह, वयाच्या पन्नाशीनिमित्त छापण्यासाठी घेऊन गेलो होतो तेव्हा माझे ऊर कसे अभिमानाने भरून आले होते. स्मृती पटलावरून तो सगळा काळ अक्षरशः एका क्षणात आपसूकच तरळून गेला आणि डोळे पाणावले.  त्या अश्रुंमध्ये मला माझ्या आईवडिलांच्या अथक कष्टाचे, त्यांच्या प्रामाणिकतेचे, स्वाभिमानाचे आणि सचोटीचे प्रतिबिंब पडताना पाहून, मन गलबलून गेले होते.  क्षणभर वाटले की, हे स्वप्न तर नाही ना! जेव्हा प्रतिबिंबची पहिली प्रत मी हातात घेतली तेव्हा नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आई जशी आपल्या छातीला लावते, कुरवाळते, माया करते, अगदी तीच भावना माझ्या मनात दाटून आली होती. होय आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तुमच्यावर झालेल्या संस्काराचे प्रतिक जेव्हा तुमच्या हातात पडते तेव्हा आपल्या ह्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याची एक भावना मनात त्याक्षणी येऊन जाते तिला ह्या जगात तोड नाही असेच मला वाटते. म्हणूनच मला ह्या आयुष्यावर बोलावेसे वाटले. मला तुम्हांला सांगावेसे वाटते की, आयुष्यात कुठलीच गोष्ट कठीण नाही हो! आपल्याकडे फक्त महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि इच्छाशक्ती असायला हवी, बाकी काही नाही.
आयुष्य आपल्याला पदोपदी काही ना काहीतरी शिकवत असते. प्रत्येक घटना अथवा प्रसंग हा वाईटातून काहीतरी चांगले आपल्यासमोर ठेवतच असतो. फक्त आपल्याला संयम राखून, परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याचा दृष्टिकोन असण्याची गरज मात्र नक्कीच असावी लागते. मी जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता त्यावेळेस माझ्याकडे एक सायकल होती. अंगावर घालायला जरा बरे परंतु आमच्यापेक्षा बर्‍या परिस्थितीत असलेल्या एका भावाचे वापरून झालेले जुने कपडे होते. ते रफू करून, मापाचे करून, धुऊन, इस्त्री करून वापरायचो. ही परिस्थितीची अथवा काळाची गरज होती आणि मला ह्या गोष्टीची कधीही लाज वाटली नाही. उलट अशा परिस्थितीतही आम्ही सर्वांशी मिळून मिसळून व स्वाभिमानाने रहायचो. त्याचं काय आहे!  गरजा आपल्या संपतच नाहीत, आशा माणसांच्या थकतच नाहीत, परिस्थितीचेही भान रहात नाही. महत्त्वाकांक्षांचा हा सागर गरजेतूनच आकार घेतो आणि ह्या गरजा भागविण्यासाठी मग तो एल्गार करतो.
प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे गणित एकदा तरी मांडून पहावे असे मला कायम वाटते. तेव्हाच त्याला कळेल की काहीतरी राहून गेले आहे ते! आयुष्याचे गणित मांडायला आपल्याला जमतच नाही असे वाटू लागते आणि तो किती अवघड प्रकार आहे हे उमजायला लागते. हे गणित मांडायला आपल्याला आपल्या आयुष्याचा, घडलेल्या घटनांचा, प्रसंगांचा, तसेच आपल्यावर झालेल्या संस्कारांचा खूप अभ्यास असावा लागतो, जो कुठल्याही पुस्तकात शिकवला जात नाही.  ज्याने त्याने हे गणित आपल्या अनुभवातूनच मांडायचे असते. जर का हे गणित मांडायला आपण चुकलो तर आपले आयुष्य मात्र भरकटत जाते. तसेच ते जर जमले तर मात्र आयुष्यच सफल झाल्याचे भाग्य लाभते. आयुष्याच्या गणितात फक्त भावनांनाच फार मोठे आणि मानाचे स्थान असते हे विसरू नका. ह्या भावनांचा संख्याशास्त्राच्या नियमानुसार गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी करायची असते आणि त्यातूनच आयुष्याला एक आकार द्यायचा असतो. गणितात शून्याला अनन्यसाधारण किंमत असते बरं का!  कारण जो हे गणित व्यवस्थित मांडू शकतो, तो मात्र नक्कीच शून्यातूनच विश्‍व निर्माण करू शकतो. जरी हा संख्याशास्त्राचा खेळ असला तरी त्यात आपल्या जीवनातील बहुमूल्य अशा भावनांचा सुरेख मेळ घालावा लागतो. म्हणूनच, मला म्हणावेसे वाटते की,

जगण्यासाठी जगायचे नसते,
कारण जगण्याचे गणित निराळेच असते ।
गंमत खरी जीवनात असते,
हसत हसत हे जीवन जगायचे असते ।
हार जीत ही नेहमीच असते,
हारता हारता जिंकायचे असते ।
जिंकण्याचे ध्येय अभेद्य असते,
फिरुनी परत पहायचे असते ।
प्रेम करावे जगण्यावर,
जगण्याच्या प्रत्येक घडीवर,
रचता जीवन पायात येई हो गोळे,
हे तर नियतीचे एक प्रारूप असते ।
तत्त्व हे जीवनाचे मूळ असते,
स्वाभिमानच जीवनाचे तत्त्व असते ।
अभिमान हा जगण्याचे साधन असते,
ज्ञान तर जीवनाचे सत्त्व असते ।
अपमान गिळून जगायचे असते,
स्वार्थातूनच परमार्थ साधायचे असते ।
नीतिमत्ता तर जीवनाचे अंगच असते,
भक्ती हीच जीवनाची शक्ती असते ।
जीवन हे असेच असते,
जगण्यासाठी जगायचे नसते ॥

आयुष्याच्या एका संध्याकाळी मला सहज वाटले की आपण अगदी सहजच आपल्या पन्नास वर्षांच्या ह्या आयुष्यात जरा डोकावून पाहुयात! आणि काय सांगू तुम्हाला, मला माझ्या ह्या फाटक्या आयुष्याला ठिगळे लावावीत की काय असे वाटू लागले. मग काय,
मी घेतली ठिगळे लावायला,
किती लावू,  कशी लावू,
असे मी विचारले ठिगळांनाच।
एक ठिगळ घेतले बालपणाचे,
दुजे ठिगळ लावले तारुण्याचे,
मला जाणवले की संपतच चाललेत,
दिवस आता आयुष्याचे ।
तिजे ठिगळ घेतले कष्टाचे,
चौथे ठिगळ शिवले कर्तृत्वाचे,
मला समजले की
थकत चालले आहे शरीर हे हाडा मासाचे ।
पाचवे ठिगळ विणले स्नेहाचे,
सहावे ठिगळ काही प्रेमाचे,
तेव्हा मला भासले,
जणू रिक्तच होत चाललेत,
मांडवच माणसांचे ।
शेवटी, कंटाळून ठिगळच मला म्हणाले,
कशासाठी हा अट्टाहास चाललाय तुमचा.
अहो विरलय तुमच आयुष्य,
प्रयाण करावे आता वैकुंठास ।

एक नक्की वाटते की आयुष्याच्या प्रत्यके टप्प्यावर माणसाने आत्मपरीक्षण करावे.  आपले कुठे चुकले व कसे चुकले हे समजेल आणि त्यात जर का कोणी दुखावले अथवा दुरावले गेले असेल तर त्यांची माफी मागण्याची एक संधीतरी ह्या जन्मी मिळून जाईल. चुकतो तोच माणूस असतो आणि त्या चुकांमधून शिकून स्वत:ला सुधारतो तोच माणूस आपले आणि आपल्या आप्तेष्टांचे आयुष्य सुखी व समाधानी करू शकतो ह्याचा मला आत्मविश्वास आहे.
आयुष्यात आपण खूप चढ उतार अनुभवतो.  कधी कधी काही घटना आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करून जातात.  अशा घटनांमुळे आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन एकदम नकारात्मक होऊन जातो आणि भावनांच्या हिंदोळ्यावर असे हे झोके खात असतांना, शेवटी वाटायला लागते की कोणासाठी कशासाठी, आजवर उभारले हे इमले ! पडणारच होते सारे, मग उभारलेच कसले ! हे असेच का असते सारे, तंत्र हे मज ना उमगले ! कशासाठी, कोणासाठी, आयुष्यभर हे झमेले. तडफडत, तडमडत केले सारे, का न मज हे आजवर समजले ! अंतरा अंतरावरती, होते किती अडथळे, उभारताना ही मज, नाही कोणी अडवले ! पडतांना पाहत होते सारे, जे कधी उभारतांनाही नाही दिसले.
माणूस ही एक अशी चीज आहे की त्यात हेवे दावे, भांडण तंटे, रुसवे फुगवे, क्रोध, त्रागा, एकमेकांचा दुस्वास, हे मला तर एका माणसाला निसर्गाने दिलेल्या एखाद्या शापा सारखेच वाटतात.  त्यातच मानवाच्या आयुष्यातील बराचसा वेळ हा हे रुसवे फुगवे काढण्यातच जातो असे मला राहून राहून वाटते. रुसवे फुगवे काढण्यातच, आयुष्य जायचं, कोणी किती रुसायचं,  किती फुगायचं, ज्याचं त्यानेच ठरवायचं ! कधी आमचं चुकायचं,  तर कधी तुमचं. चुकण्यातूनच नाही का आपण सुधारायचं, भांडता भांडता ही असत,  थोडंस हसायचं !  मुद्दा कळीचा, अथवा नळीचा, प्रत्येकाने आपलाच घोडं किती दामाटायचं, कधी तरी ऐकून दुसर्‍याच, असत समजून घ्यायचं !
हे सगळे तत्वज्ञान मी का पाजळत आहे हे मलाच अजून तरी समजले नाही बर का !. त्याचे कारण आपल्या आयुष्यात आपल्या कळत नकळत खूप काही घडत असते आणि तर्क वितर्कातच आपले जीवन झुंजत राहते. जगण्याच्या आशेवरच जीवन फुलत जाते.  आशेच्या पंखावर अपेक्षांचे वादळ उठते तर कधी कधी आयुष्याच्या संधेवरतीही मळभ दाटते.  तेंव्हा, पंख असूनही आपले आकाशच हरवते आणि हे जीवनच दिशाहीन भासू लागते.  उगवताच सूर्यास,  मावळून टाकते, आठवणींच्या हिंदोळ्यांवर मन मात्र तरंगत राहते.  आठवणींचे हे ओझे,  मानगुटीवर बसते, वाट फुटेल, तिकडे चालतच राहते. असूनही दृष्टी, अंध ते होते, जन्म-मरण विधी लिखितच असते, मरण्यासाठी जगायचे नसते,  मरण्यासाठी जगायचे नसते. जरी मरण्यासाठी जगायचे नसते हे माहिती असले तरी मनुष्य स्वभावानुसार प्रत्येकजण ह्या चुका आयुष्यभर करतच राहतो आणि जेंव्हा त्याला हे उमजते तेंव्हा खूप उशीर झालेला असतो.
आयुष्यात थोडेसे मागे वळून पहिले की वाटते की,  आपल्याला ना ह्या जीवनाचा अर्थच समजत नाही ! कसे जगावे तेच उमजत नाही !  परिस्थितीवर मात होतच नाही ! कळते सारे, पण वळतच नाही !  निष्कलंक जीवन लाभतच नाही आणि हातून एखादे उदात्त कर्म घडतच नाही !  कस्पटा समान हे जगणे वाटू लागते ! स्मशानातही शांतात लाभेल का हो असा एक प्रश्न निर्माण करून कोणाच्या खांद्यावरून आपण जाणार आहोत हे काही कळत नाही ! पण आईची कुस मात्र आठवत राहते ! ते हे आयुष्य तसे पाहायला गेले तर निष्फळ वाटू लागते अर्थात हा ज्याच्या त्याच्या कर्माचा एक भाग असतो.  त्याने आपले आयुष्य कसे व्यथित केले आहे त्यावरच ह्या भावना अवलंबून असव्यात असे वाटते आणि हो प्रत्येकाला त्या लागू असतील असेही नाही !.
सर्वसाधारण माणसाने तसेही फारसे कोणाशी वैर केलेले नसते हो आणि त्यात निसर्गाचा एक नियमच तो आयुष्यभर पाळत आलेलो असतोच की, पाण्यात राहून त्याने माशाशी कधीही वैर केलेले नसते आणि त्याला त्यात फारसे काहीही  गैर केले आहे असे वाटतच नाही !  तो कित्येकदा केलेले करार मोडत असतो आणि त्याचेच मन त्याला सांगत असते की बघ जिंदगी आता तुझी,  काही खैर नाही !  तो नियतीच्या तालावर, आयुष्यभर नाचत असतो कारण आयुष्याच्या तमाशात असाही तो कधीही स्वैर नसतो ! नियती त्याला एका हाताने देत असते आणि दुज्या हाताने काढून नेत असते तरीही त्याचे मन सैरभैर होत नाही तो खरा प्रगल्भ माणूस ! हा माणूस मरतो आहे जगतांना खुपदा तरीही त्याला मरत मरत जगण्यातही,  काही गैर नाही असेच वाटत राहते !  त्याला एकच तत्वज्ञान माहिती असते की मोठा मासा खाई, लहान माशास, आणि व्यवहारात असे होणे, तसेही फारसे काही गैर नाही. आहे की नाही गमतीशीर असे हे आपले आयुष्य.  काय बोलावे त्यावर हेच कधी कधी सुचत नाही.
म्हणूनच, मी बर्‍या वाईटाचा फारसा विचारच कधी केला नाही हो.  चूक काय बरोबर काय हे ही मला कधी समजलेच नाही, जे जे नियतीने घडवले तसे ते ते घडले, मी निमित्त मात्र होतो बाकी काहीच नाही. सूर्याने रोज उगवायचे आणि मावळायचे, चंद्र चांदणे दिवसा कधी दिसायचे नाही.  विचार करुन करुन मन कधी कधी थकते, नियतीवर अजूनही नियंत्रण कोणाचे नाही असे वाटते.  पंखात बळ असे तोवर असते की उडायचे, थांबला तो संपला नाही, असे कधी घडायचे नाही.  नशिबाला दोष देण्यात जाते हयात आपली, कर्मावर बोट ठेवण्याची आपली हिंमत नाही.  पाषाणाला असते की हृदय हे, दगडास फुटतो पाझर पण नियतीस नाही.  धर्म जात कुळ गाव राज्य आणि राष्ट्र काय, हे सारे आपल्या उपयोगाचे असतच नाही.  करावी भक्ती आणि असावी श्रध्दा कर्मावरी, दैव देते आणि कर्म नेते हे काही शास्त्र नाही.  जगावे परी किर्ती रुपे उरावे म्हणातात सारे, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केलेच नाही.  जगणे हे अजिबात मुष्किल झाले वाटते. जिवंत असे पर्यंत जगण्यास पर्याय नाही.
कधी ना कधी, कुठे ना कुठे, अशी एक भावना माणसाच्या आयुष्यात येत असते की, ह्या जगण्याने मला झिडकारले होते, त्याच मरणाने मला, स्वीकारले होते. केलेत मी परिस्थितीशी, दोन हातही येता जाता कित्येकांनी, नाकारले होते. टिपरी गत पाण्यावर, मज फेकलेही, तरंगही पाण्यावर मी,  साकारले होते. बांधुनी पायी चाळ  मज नाचविलेही.  बोर्डास अदाकारीने मी  झंकारले होते.  नथ माझी ही सैलावली कुठे जराशी,  बारीने तेंव्हाच मज धिक्कारले होते. अनंत वेदनांनी भरलेली,  ही झोळी रिती करण्या, यमास मी पुकारले होते. अर्थात माणसाने कुठेतरी थांबायचे असते हे त्याला कळले तर त्याचे आयुष्य सुखकर होऊ शकते.
तरीही माणूस ह्या आयुष्यासाठी वणवण करतच राहतो.  आपण केलेली वणवण म्हणजे काय सांगू आणि कसे सांगू हेच कळत नाही.  आयुष्यभर जगण्यासाठी केली, वणवण आहे, मेल्यावर जळण्यासाठी साठवितो,  सरपण आहे ! जगतोच आपण कशासाठी, उमगतच नाही, सरपणाचे जगतांनाही मनावर,  दडपण आहे !  जन्मताच मृत्यूही असतो नशिबी लिहिलेला, दडपणातच जगण्याचेही,  एक वेगळेपण आहे !  मातीतून जन्मून मिसळावे मातीतच लागते, वेगळेपणातच मृत्यूचेही एक अजाणतेपण आहे ! प्रतिभेने मिळवावी लागते,  आपली प्रतिष्ठा, अजाणतेपणातच,  प्रतिष्ठेचे देवपण आहे !  सरपणासाठीचीच ही, एक धडपड वाटते, देवपणातून शेवटी, मृत्यू हे समर्पण आहे !.
हे सगळे असेच होत राहते आणि आपल्याला कळतच नाही की, माझे मलाच ना कळले, आयुष्य हे कसे ढळले !  होते दु:ख मी खूप सोसले, सुख हे मज नाही झेपले !  सुखास मी एकदा पाहिले, दु:खच मज आपुले वाटले !  वळून मी मागे पाहिले. दु:खच मज सांगाती राहिले ! दु:खाकडे हसून मी पाहिले, दु:खातही सुख मज दिसले.  ह्या आयुष्याच्या वादळात एक अतिशय उत्कट अशी भावना आपल्या मनात कायमच येत असते की, आसवेच आज माझी फितूर होती, वाहण्यास ती ही आज आतुर होती !  मोकळ्या कुठे होत्या पापण्या तेंव्हा, आसवेही आज माझी लाचार होती !  तुफान एक भावनांचे घोंगावत आले, आसवांनाही भावनांची लकेर होती !  वेगात येऊन एक वादळ गेले होते, लोचनी उदासीची झालर होती !  क्षणात सारे विस्कटूनी गेले होते, आसवेच माझी माझा आधार होती !  मुकाट सोसले घाव मी उरावरी, आसवांचीच माझ्याकडे तक्रार होती !
ह्याचे एकमेव कारण की आपल्याला माणसांचा अंदाज कधी बांधता येतच नाही.  त्यामुळे माणूसही असा कधी कळलाच नाही.  ह्या जगात आता साधा भोळा असा कोणही राहिलाच नाही.  भावनांचे अनंत सागर जरी आपण पार करून आलो, तरीही माणुसकीचा किनारा काही लाभत नाही. त्यामुळेच की काय नियतीला सांगतो आहे की, तू दूर कुठेही अगदी सागरीही घेऊन जा, कारण माणूस अजूनही गवसलाच नाही. त्यामुळेच की काय मला आता निवृत्तीचे वेध लागू लागलते.  हे क्षण निवृत्तीचा कसे असतील असे मी जरा माझ्या मनाशी मांडून पाहत होतो आणि हे क्षण माझ्याशी बोलायलाच लागले हो. क्षण निवृत्तीचा,  असतो दुभाषी, एक मन म्हणते,  निष्क्रिय झालासी, दुजे मन सांगते,  सक्रीय व्हावेसी !  क्षण निवृत्तीचा,  असतो विलक्षण, एक मन करते,  भूतकाळाचे परीक्षण, दुजे मन सांगते, भविष्याची उजळण !  क्षण निवृत्तीचा, असतो दुर्मिळ, एक मन म्हणते, स्मृती तू उजळ, दुजे मन सांगते, क्षण हे उधळ !  क्षण निवृत्तीचा, असतो अभिलाषी, एक मन म्हणते,  उरलास सकळासी, दुजे मन सांगते,  जुळवून घे समाजासी ! त्यातूनच मला जगण्याचा एक मंत्र सापडला. मोह ना कशाचा मजला आहे
रवींद्र कामठे
9822404330