Monday, 5 June 2017

पुणे - आंबोली – वेंगुर्ला - आंबोली – पुणे – कुटुंब रंगले सहलीत...



पुणे - आंबोली – वेंगुर्ला - आंबोली – पुणे – कुटुंब रंगले सहलीत...
 
कधी नव्हे ते मी बसने घरच्यांबरोबर सहलीला जाण्याचे मान्य केले होते.  कारण, आजवर मी कधीच माझ्या गाडीशिवाय सहलीला गेल्याचे मला आठवतच नाही !  मला की नाही स्वत: वहान चालवत प्रवास करायला फार आवडते.  म्हणजे गाडी चालवणे हा माझा सगळ्यात आवडता छंद आहे.  त्यात जर का किशोर-मुकेश गाणी लावली ना तर मग काय बघायलाच नको.  गाडी आपोआप एका वेगळ्या लयीतच चालत राहते.  मी सगळ्यांमध्ये असूनही कोणात नसतो.  हीच तरी खरी मज्जा असते सहलीची.  
 
२७ मे २०१७, भल्या पहाटे ६ वाजता (माझ्या साठी ही भली पहाटच आहे) माझी स्वारी सगळे आवरून तीन दिवसांचे लागणारे सामान पिशवीत भरून तयार होऊन बसलो होती.  बरोबर ६ वाजता मिनी बस दारात येऊन थांबली होती.  पण आमचे बंधुराज व त्यांचे कुटुंब पाषाणहून रवाना व्हायचे होते.  झाले माझे पित्त खवळले होते.  कारण कोणी जर वेळ नाही पाळली ना की माझी चिडचिड होते !  असो तरी मी खूप प्रयत्नांती स्वत:ला शांत केले.  त्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता व मी चिडचिड कडून तो लवकर येऊही शकत नव्हता.  जवळ जवळ तास भर वाट पाहिल्यानंतर ही स्वारी उगवली.  शेवटी आम्ही सगळे एकदाचे ७ वाजता बस मध्ये बसून आंबोलीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
 
गाडी सतरा माणसांची आणि माणसे आठ होती.  एकंदरीत सगळीच धमाल होती.  ‘बबलू’ नामक उत्तरप्रदेशी चालक त्याच्याच धुंदीत गाडी चालवत होता.  थोडा वेळ मी त्याच्या बाजूच्या जागेवर बसलो, पण नंतर मला त्याच्या चालवण्याच्या पद्धतीच्या इतका कंटाळा आला की मी आपला सरळ त्याच्या मागच्या सीटवर जाऊन बसलो.  ह्यात त्याची काहीच चूक नव्हती.  कारण त्याने कितीही ताणले तरी ती बस ताशी ७० च्या पुढे जाऊच शकत नव्हती.  मग काय रमत गमत, मजल दरमजल करत सकाळी ७ वाजता घरातून निघालेले आम्ही साधारण दुपारी ४ वाजता आंबोलीला पोचलो.  ३५० किलोमीटर प्रवासाला साधारण ९ तास लागणे म्हणजे माझ्या साठी शिक्षाच होती म्हणा !  पण माझा नाईलाज होता.  साधारण ८-१० वर्षांपूर्वी आम्हीं स्वत:च्या गाडीने जेंव्हा आंबोलीला आलो होतो तेंव्हा जेमतेम ५ तासातच पोचलो होतो.  हाच तर फरक आहे ना कार आणि बस मधे, हे समजायला मला जरा वेळच लागला.  नाहीतर सगळ्यांनी एकत्र जाण्यात जी मजा आहे ती कशी अनुभवता आली असती म्हणा.  ते काहीही असो, गाडीत नुसते बसून राहणे आणि ती मला चालवायला न मिळणे ही एकप्रकारची शिक्षाच वाटते हो.
 
सगळे कसे भुकेने कडकडले होते.  तसाही साताऱ्यात ९ वाजता भरपेट नाश्ता झाला होता सगळ्यांचा.  तरीही ४ म्हणजे अंमळ उशीरच झाला होतो. त्यामुळे गाडीतून उतरल्याबरोबर आम्हीं सगळे जेवायला गेलो.  रुममध्ये जाऊन सामान वगैरे टाकण्याच्या भानगडीत न पडता ‘पूर्वा आणि ‘चैत्याच्या’ पडत्या फळाची आज्ञा समजून आधी पोटपूजा केली आणि नंतर आपापल्या रूम मध्ये जाऊन आवराआवरी केली.  ‘पूर्वा’ म्हणजे माझी मुलगी जी आमच्या सहलीची लीडर होती आणि तिच्या मदतीला तिचा एक मित्र ‘चैतन्य’ आला होता, ज्याला आंबोलीच्या जंगलाची खडान्खडा माहिती होती.  अर्थात ही जबाबदारी आमचे जावई ‘मयुरेश’ ह्यांची होती परंतु त्यांना  ताडोबाच्या जंगल सफारीला जावे लागल्यामुळे, त्यांची चैत्यावर ही जबाबदारी टाकून पूर्वाच्या मदतीला धाडले होते. तसेही हे दोघेही एकतर जंगलप्रेमी आणि प्राण्यांची, पक्षांची, झाडांची, फुलांची, सापांची, बेडूक, फुलपाखरू, बांडगुळ, तसेच अगदी तिथल्या निसर्ग चक्राची इतम्भूत माहिती असलेले असल्यामुळे आमच्या सहलीबरोबर ज्ञानातही भर पडत होती हे मात्र निश्चित.
 
आम्ही सहा वाजता आंबोलीतील सनसेट पोइंटला पोचलो. सूर्यास्त होण्यास थोडा वेळ होता.  जवळ जवळ ६.४५ला सूर्यास्त होणार असा अंदाज आला.  ह्या ठिकाणावरून आंबोलीचा संपूर्ण घाट रस्ता एखाद्या अजस्त्र अजगरासारखा पसरलेला दिसत होता.  त्यात सूर्याची सोनेरी किरणे डोंगरावर पडल्यामुळे हा रस्ता एखाद्या हिऱ्या सारखा चमकत होता. आंबोलीचे वैशिष्ट्य म्हणजे हा परिसर बाराही महिने हिरवागार असतो व एवढ्या उन्हाळ्यातही वातावरण आल्हाददायक करतो.  आमचा एक तास निसर्गाच्या ह्या विहंगम दृशाने कधी गेला ते कळलेच नाही.  सूर्यास्त होतांना आकाशाच्या सोनेरी छटा आणि त्यात ढगांची होणारे निरनिराळे आकृतिबंध पहिले की मन कसे प्रसन्न होऊन गेले होते.  ह्या ठिकाणावरून जावूच नये असे वाटते.  जस जसा अंधार पडू लागला तसे आमचे पाय आपसूकच बस कडे वळायला लागले.  कारण सूर्यास्तानंतर मनात एक प्रकारची धाकधूक वाढायला लागते.  कारण गर्द झाडी, एकदम झालेला अंधार, रातकिड्यांची सुरु असलेली किरकिर, घनदाट जंगल.  त्यात इथेतर माणसांची वर्दळच नव्हती.  आम्हीं परत बस कडे जायला निघालो तर, चैत्याला रस्त्यावर “हरणटोळ” नावाचा एक साप दिसला, पठ्याने त्याला धरला व उचलून एका झाडावर ठेवला.  नाहीतर तो गाडीखाली आला असता.  त्यादरम्यान आमची सगळ्यांची जी काही फाटली होती ना की विचारू नका.  अहो, साप म्हटले ना की माझी तर बोबडीच वळते हो.  एकतर हा प्राणी बिनडोक आणि थंड रक्ताचा त्यात विषारी आहे का विनविषारी आहे हे कळतच नाही.  अर्थात ह्या पोरांना चांगली माहिती आहे हो, तरी आमचा जीव वरखाली होत होता.  त्याचा जीव वाचवला ह्या आनंदात आणि एकदाचा ह्या जंगलात एकतरी साप दिसला ह्या खुशीत आम्हीं त्या ठिकाणाहून परत जायला निघालो.  जाता जाता वाटेत बराच अंधार झाला होता.  चैत्या म्हणाला की वाटेत एक भूतबंगला आहे तो पाहून मगच पुढे जाऊ.  झाले भूतबंगला म्हणाल्याबरोबर आमची फाटली होती.  पण अंधाराचा फायदा घेऊन सगळे कसे आपल्याला अजिबात भितीवागैरे वाटत नाही असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.  एकदाची बस त्या भूतबंगल्याच्या जवळ पोचली.  हा भूतबंगला म्हणजे पूर्वीच्या सावंताची गढी आहे.  तिचा शेकडो वर्षात वापर नसल्यामुळे आणि ती घनदाट जंगलात असल्यामुळे तिथे प्रांण्याच्याच अधिवासच जास्त असतो.  तसेही ह्या अंधारात साधारण ५० ते ६० मीटर चालत जाऊन तो भूतबंगला पाहणे म्हणजे आम्हीं एखाद्या लढाईला चालल्यासारखे सगळ्यांना भासत होते.  अर्थात पूर्वा आणि चैत्या आमच्या पुढे होते.  ते जय्यत तयारीने आलेले होते.  त्यांनी लगेच त्यांच्या पिशवीतील चार पाच विजेऱ्या (टोर्च) काढून आम्हांला दिल्या आणि चालू लागले.  कोण कोणाशी बोलत नव्हते.  गपचूप त्यांच्या पाठीमागे चालत होते.  एकदाचा तो भूतबंगला आला.  भले मोठे आवर होते.  अगदी फुटबॉल खेळता येईल एवढे मोठे.  बंगल्यात आत शिरलो , एका मोठ्या दरवाज्यातून थोडेसे आत डोकावले, तर थोडीशी फडफड झाली.  झालं आमची भीतीने गाळण उडाली.  परतू विजेरीच्या उजेडात एक मलबार...नावाचा दुर्मिळ अशा पक्षी दिसला.  अंधार आता आणखी गडद झाला होता.  आकाश ही भरून आले असल्यामुळे चंद्र चांदणेही दिसत नव्हते.  जवळपास कुठेही उजेडाचा मागमूसही नव्हता.  आणि एकदम अचानक आमचे लक्ष एका झाडा कडे गेले.  ते झाड काजव्यांनी लगडलेले होते आणि चमचम चमकत होते.  अतिशय विलोभनीय असे हे दृश्य त्या भयाण भूतबंगल्याच्या परिसरात पाहून त्यातल्या त्यात मनाला हलके करून गेले.  आम्हीं तसेच पुढे चालत चालत आमच्या बसच्या दिशेने निघालो होतो.  आता आम्ही रस्त्याच्या खूप जवळ येऊन पोचलो होतो आणि मनातली भीतीही थोडी कमी झाली होती.  आणि काय आश्चर्य ज्या रस्त्यावर आमची बस उभी होती ना तिथपासून ते दूर दूर साधारण ५०० ते १००० मीटर अंतरावरील सर्वच्या सर्व झाडे काजव्यांनी लगडलेली होती आणि चमकत होती.  डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृश्य होते की, जे आमच्या स्मृतीपटलावर कायमचे कोरले गेले होते.  हे पाहून न राहवून आम्हीं ‘बबलू’ चालकाला सांगितले की तू बस घेऊन पुढे जा, आम्ही चालतच येतो. अर्थात मी मात्र बसमध्ये बसून पुढे गेलो कारण माझे पाय आता चांगलेच दुखायला लागले होते. त्याच आनंदात सायली रिसोर्ट वर परत आलो.  थोडेसे आवरून जेवायला बाहेर पडलो आणि पाहतो तर संपूर्ण आंबोलीचा परिसर धुक्याच्या दुलईत गायब झालेला.  नार्वेकरच्या खाणावळीत मस्तपैकी सामिष्ट भोजनावर ताव मारण्याशिवाय गत्यंतरच नव्हते हो.  प्रवासाचा शीण तर कुठल्याकुठे गायब झाला होता.  जेवण झाल्यावर पूर्वा आणि चैत्याने चला जंगलात थोडेसे फिरून येऊ असा आवाज टाकला.  सगळे लगेच तयार झाले.  फक्त एकच अट होती की चालत जायचे आहे.  त्यामुळे मी आपोपाप कटाप झालो.  कारण आता माझे पाय चालणे अशक्य होते.  जरी माझी मानसिक इच्छा होती तरी शारीरिक तयारी नसल्यामुळे मी थोडासा खट्टू होतो.  अर्धा पाऊन तास सगळे भटकून परत आले आणि अशा रीतीने सहलीचा पहिलाच दिवस छान गेल्याच्या आनंदात खोलीवर आल्याबरोबर अंथरुणाला पाठ लागताच गुडुप्प झालेले होते.
 
२८ मे, दुसरा दिवस, जो उजाडला तो एक नवचैतन्य घेऊनच.  जसे काही त्याला महिती होते की अरे ही शहरातली माणसे दमतात, थकतात कष्ट करून, भौतिक सुखाच्या मागे लागून लागून त्याचा जीव अगदी मेटाकुटीला आलेला असतो.  त्यांना तुझ्या ह्या निसर्ग सौंदर्याने थोडसा दिलासा दे, मन हलक कर त्याचं. काय सांगू, रात्रीच्या धुक्याच्या दुलईतून आंबोली अजूनही बाहेर आलेली नव्हती हो.  कोकणातली ती लाल माती, पानाफुलांवर पडलेली दवबिंदुंची ती मखमली चादर.. नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत निसर्गाचा हा अनमोल नजरा मनात साठवता साठवता दमायला झालं होतं.  जस जसा सूर्य वर येऊ लागला तस तशी, आंबोली जागी होऊ लागली होती.  पक्षांच्या किलबिलाटाने सगळे वातावरण कसे मंत्रमुग्ध करून टाकले होते.  त्याच उत्स्च्हात आम्ही नाश्ता केला आणि बस मधून आंबोली घाटमार्गे वेंगुर्ल्याला जायला निघालो.  आंबोली घाट म्हणजे निसर्गाचे वरदान लाभलेला अतिशय विलोभनीय असा परिसर आहे.  साधारण ११ वाजता आम्हीं वेंगुर्ल्यातल्या समुद्र किनारी पोचलो.  तेथील ‘मर्मेड’ नावाच्या एका हॉटेल मध्ये नाश्ता केला.  समुद्रात त्याच वेळेस भरती चालू असल्याचे कळले व आम्हांला सांगण्यात आले हीच ती उत्तम वेळ आहे समुद्राच्या पाण्यात खेळण्याची.  अहो खेळ कसला, एक तर पावसाळी वातावरण त्यात भरती चालू होती आणि समुद्र खवळलेला होता.  मी बापडा मस्तपैकी वाळूत बसून राहिलो आणि सगळ्यांचे कपडे आणि मोबाईल सांभाळण्याचे तसेच फोटो काढण्याचे आवडते काम करत बसलो.  एकेकाची गमत पाहत होतो.  माणूस निसर्गापुढे किती शुद्र आहे ह्याचे प्रत्यंतर पहात होतो.  एक एक लाट किनारी येत होती आणि एखाद्या पुस्तकाची पाने उलटावी तशी माणसाना उचलून इकडून तिकडे फेकत होती.  आमची तर हसून हसून पुरेवाट लागली होती.  समुद्रात भिजायला काही वाटत नाही.  परंतु त्या नंतर अंघोळीची जर सोय नसेल ना तर खरी वाट लागते राव.  तसे आमची सोय ‘मर्मेड’ मध्ये झालेली होती त्यामुळे काळजी नव्हती.  दुपारच्या जेवणात मस्तपैकी मासे आणि माश्याचे कालवण भात असा बेत आखल्यामुळे सगळ्यांची तब्बेत खुश होती.  आज मी जवळ जवळ ७ वर्षांनी मासे खाणार होतो.  सगळे पथ्यपाणी बाजूला ठेवून मी आज मनसोक्त जेवलो.  सौद्ल आणि प्रोम्प्लेट हाणला.  मनोमन आचाऱ्याला आशीर्वाद दिले आणि आंबोलीच्या परतीच्या प्रवासाला सुरवात केली.  वाटेत सावंतवाडीस थांबलो.  काही लाकडी खेळणी घ्यायची होती.  तेथील तळ्याच्या काठी बस लावली आणि तळ्यातील मासे पहात बसलो होतो. बाकी सगळे खरेदीला गेले होते त्यामुळे मी जरा निवांत होतो.  समोर एक वडापावची गाडी होती, त्यांच्याकडून वडापाव आणि एक चहा असा बेत उरकून तळ्याकाठी बसलो होतो.  तेवढ्यात कोणीतरी जोरात ओरडले साप, साप.  झाले माझी फाटली.  बघतो तर काय तळ्यात ६ फुटी एक पाणसाप माश्याच्या शिकारीचा प्रयत्न करत होता.  अर्थातास त्याचा हा प्रयत्न आपलेच काही भाऊबंद वरून पावाचे तुकडे पाण्यात टाकून फसवत होते.  सगळे आले.  चहा घेतला आणि आम्हीं आंबोलीकडे जायला निघालो.  साधारण ५ वाजेले होते.  संध्याकाळ झाली होती.  सूर्य अस्ताला चालला होता आणि आम्हीं आंबोली घाट चढत होतो.  घाटमाथ्यावर पोहचेपर्यंत सूर्यास्त होत होता आणि पुन्हा एकदा निसर्गाचा तो अद्भुत नजरा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न सगळे करत होतो.  समुद्रसपाटीपासून साधारण १२०० मीटर वर आल्यानंतर हवेतील तो आल्हाददायी बदल अंगावर रोमांच उभे करीत होता.  असे वाटत होते की इथून जाऊच नये परत.  पण काय करणार ! खोलीत परत आल्याबरोबर सगळ्यांनी परत एकदा अंघोळ करण्याचा बेत ठरवला.  मी मात्र कोरडा होतो त्यामुळे आंघोळीचा प्रश्नच नव्हता.  संध्याकाळचे समधुर वातावरण न्याहाळता, न्याहाळता, आनंद ह्या चित्रपटातील, मुकेशे गायलेले अप्रतिम असे गाणे माझ्या ओठावर आले आणि माझी संध्याकाळ अजून भावूक करून गेले.   
कही दूर जब दिन ढल जाये, सांज की दुल्हन बदन चुराये, चुपकेसे आये
मेरे खयालोन्के आंगण मै, कोई सापनोके दीप जलाये...
 
जेवण झाल्यावर रात्री जंगलात फिरायला जायचे असा बेत पूर्वा आणि चैत्याने आखला होता.  जेवण उरकायला रात्रीचे दहा वाजले.  हॉटेल बाहेर आलो आणि अक्षरश: एका फुटावरचे सुद्धा दिसेनासे झाले.  इतके गडद धुके पसरले होते.  मन एकदम प्रसन्न झाले.  बबलू नामक चालकाला बस काढायला सांगितली तर पठ्ठ्या चक्क नाही म्हणाला.  म्हणतो कसा, साहब, ‘इस वातावरण मै गाडी चलाना मुश्कील है’.  त्याचेही बरोबर होते.  आम्हीं पण फार गळ नाही घातली त्याला.  चक्क चालत जंगलात निघालो.  चेकपोस्ट पर्यंत गेलो आणि आमच्या लक्षात आले की ह्या वातावरणात चालतही जाणे मुश्कील आहे.  गपुचूप परत हॉटेल वर आलो आणि बदाम सात खेळत बसलो.  मला २ -३ डाव झाल्यानंतर कंटाळा आला.  मी सगळ्यांना तीन पत्ते खेळा असे सुचविले आणि ज्ञानदा, शुश्रुतला डाव शिकवून खोटे पैसे लावून शेवटी खेळलो.  वंदना, संध्या, किशोर, पूर्वा आणि चैत्या खोटे का होईना खेळले मजा आली.  धमाल केली.  पोरं खुश झाली.
 
२९ मे, तिसरा आणि शेवटचा दिवस.  सकाळी ७ वाजताच नाश्ता करून आम्हीं आंबोलीतून प्रस्थान ठेवले कारण परतीच्या वाटेत कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते.  ठरल्याप्रमाणे दुपारी महालक्ष्मीचे दर्शन घेतले.  सोमवार असल्यामुळे तुरळक गर्दी होती.  तरीही १ तास दर्शनास रांगेत उभे राहायला लागले.  पण एक आत्मिक समाधान लाभले देवीचे दर्शन झाल्यावर.  पुढचा बेत तर आधीच ठरलेला होता.  कोल्हापुरात आल्यावर हॉटेल पदमा मध्ये तांबडा पांढरा रस्सा चिकन / मटन थाळी नाही खाल्ली तर मला तरी पाप लागते आणि मी ते पाप लागून घेत नाही.  मनसोक्त जेवलो अगदी चालक बबलू सुद्धा ताव मारून जेवला.  त्याला मी फक्त एकदा विचारले की गाडी चालवतांना झोपणार नाहीस ना !  म्हणजे मनाची खात्री करून घेतली.  पण पठ्ठ्याने एकदम सुरक्षित आणि नियोजित वेळेत आम्हांला अगदी सुखरूप आमच्या घरी पोहोचवले.
 
एक मात्र नक्की सांगतो की आपल्या सह्याद्रीच्या कुशीत अमुल्य असे जैववैविध्य आहे आणि ते जर तुम्हांला अनुभवायचे असेल ना तर, मयुरेश, पूर्वा, चैतन्य, मकरंद, शौरी असे त्याचे गाढे अभ्यासक व त्याचा ध्यास असलेल्या मंडळींबरोबर सहलीला जाणे जास्त संयुक्तिक वाटले.  एक तर आपल्याला निसर्गाचा आनंदही लुटता येतो आणि त्याची अगाध महिमाही ह्या पोरांमुळे अनुभवायला मिळते. माझा तरी असा अनुभव आहे.  तुम्हीं सुद्धा एकदा ह्याची अनुभूती घेऊन पहाच.   
 
एकंदरीत दोन रात्रींची का होईना पण एक छोटीशी कौटुंबिक सहल पार पडल्याचे आत्मिक समाधान मनाला मिळाले व पुन्हा एकदा रोजच्या रामरगाड्यासाठी वाहून घेण्याची उर्जा देवून गेले.  लय भारी वाटलं रावं !
  
रविंद्र कामठे, 

Friday, 26 May 2017

19 मे २०१७ रोजी VINSYS Grand EVENT २०१७ मध्ये सादर केलेले महाराष्ट्राचे मनोगत...





19 मे २०१७ रोजी VINSYS Grand EVENT २०१७ मध्ये सादर केलेले महाराष्ट्राचे मनोगत...


“मी महाराष्ट्र बोलतोय”

 
रामराम मंडळी, नमस्कार मंडळी.  कसे आहात.  मजेत ना !


मी महाराष्ट्र बोलतोय” !. 

होय होय, “मी महाराष्ट्र बोलतोय”.

तोच तो, जो माझ्या शिवरायांनी ४०० वर्षांपूर्वी, आपल्या अथक परिश्रमाने व पराक्रमाने, मोघलांशी अगणित लढाया करून, असंख्य मावळ्यांच्या आणि जीवा भावाच्या सरदारांच्या प्राणांची आहुती देऊन, दुर्गम अशा गड कोटांच्या सहाय्याने सतत ५० वर्षे झुंजून लढवलेला, घडवलेला आणि अभिमानाने हिंदवी स्वराज्याचा भगवा माझ्या माथ्यावर फडकवलाय तो,

मी महाराष्ट्र बोलतोय !

छत्रपती शिवाजी महाराजांनी लढवलेला, घडवेलेला, जडवलेला, हा सह्याद्रीचा एक एक पर्वत तुम्हांला साद घालतो आहे.  येथील नद्या, नाले, वृक्ष, पक्षी, प्राणी, दगड धोंडे तुम्हांला बोलावताहेत.   मला तुम्हांला माझ्या इतिहासाची आठवण ताजी करून द्यायची आहे रे बाकी काही नाही.....

माझा शिवाजीराजा असा काही लढला होता माझ्यासाठी हे आठवले की, अजूनही काळजाचे पाणी पाणी होते हो. आपले अवघे आयुष्य राजांनी वेचेले, ते हे हिंदवी स्वराज्य मिळविण्यासाठीच.  लढता लढता माझा हा राजा मरेपर्यंत कधी थकलाच नाही की, त्याने परिस्थितीपुढे कधी हारही नाही मानली.  सरते शेवटी हे हिंदवी स्वराज्य आपल्या हाती सोपवूनच तो अजरामर झाला.  जरी त्याला काळाने माझ्यापासून अकालीच हिरावून घेतले, तरी त्याच्या नंतर त्याच्याच सुपुत्राने म्हणजे संभाजीराजांनीही तोच पायंडा पुढे चालू ठेवला होता. हा इतिहास विसरून कसे चालेल हो.

वारसाहक्काने मिळालेल्या, घरभेदी आणि फितुरीच्या शापानेच संभाजीराज्यांचीही अमानुष हत्या झाली आणि मी परत एकदा पोरका झालो होतो, हे आजही आठवले तरी माझ्या अंगावर काटा येतो बरं.  

गुलामगिरीचा हा काळाकुट्ट इतिहास, थोडे थीडके नाही तर तब्बल १५० वर्षे मला भोगावा लागला,  त्याचे शल्य मी अजूनही विसरू शकत नाही हो. 

नंतरच्या काळातील फुले, शाहू, आंबडेकर, टिळक, आगरकर, रानडे, गोखले, चाफेकर, टोपे, सावरकर असे आणि अजून किती तरी क्रांतीकारी स्वातंत्र्यवीर इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढले आणि शेवटी मला त्यांनी परत एकदा स्वतंत्रही केले हे आठवले की मन कसे गहिवरून येते हो.   

अहो माझ्या शिवरायाच्या काळात शेतकरी कधीही आत्महत्या करत नव्हता.  राजाने त्याला आपल्या पोटच्या पोरांसारखे जोपासले होते.  कारण हा बळीराजाच आपल्या राज्याचा पोशिंदा आहे हे शिवरायांना चांगलेच ज्ञात होते.  पण आज ह्या बळीराजाची तुम्हीं काय अवस्था करून ठेवलीत रे !  अगदी भिकारी करून टाकलंय त्याला.  त्यात भरीला भर, निसर्गानेही त्याच्यावरच अत्याचार करायचे ठरवलेले दिसते आहे.  आणि हो ह्या सगळ्याला तुम्हीच कारणीभूत आहात हे मात्र शंभर टक्के खरे आहे.  कारण तुमच्या आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या नावावर, शहरीकरणाच्या झपाट्याने तुम्हीं पर्यावरणाचा जो काही ह्रास चालवेलेला आहे ना; तोच, होय होय, तोच ह्या सगळ्या हवामान बदलाला कारणीभूत आहे हे तुम्हांलाच काय पण सरकारला पण कसे कळत नाही ह्याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटते आहे.

तुम्हीं म्हणाल की मला शिवरायांचे जरा अतीच प्रेम आहे की काय ! कारण सारखा त्यांच्याच नावाचा उदोउदो चालू आहे. 

पण काय करणार गेल्या ४०० वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकही जाणता राजा मला पुन्हा एकदा लाभू नये ह्या सारखे दुसरे दुर्भाग्य ते काय असू शकते हो.  हे तुम्हीं जर माझ्या मनात, काळजात डोकावले तर तुम्हांलाही जाणवेल हो !

माझ्याकडील शेकडो वर्षांची संत परंपरा, ज्ञान संपत्ती आणि मराठी संस्कृतीचा ओढा तर अताशा नष्टच पावत चालला आहे आणि मी एका गर्द खाईत लोटला जातो आहे असेच आजकाल मला अगदी प्रकर्षाने जाणवायला लागले आहे.  कोण माझा हा ह्रास थांबवू शकेल ?  मला तर सध्या असे काही डोळ्या समोर दिसत नाही, की ज्यामुळे माझी ही चाललेली अधोगती कोणीतरी रोखू शकेल !  राजकीय इच्छाशक्तीचा तर मी आजकाल विचारच सोडून दिलाय.  कारण त्यांना फक्त जात, पात, धर्म, सामाजिक द्वेष आणि दुफळी निर्माण करून आपले इप्सितच साध्य करायचे आहे.  त्यांनी फक्त माझ्या शिवरायांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या जोमात साजऱ्या करायच्या आणि अरबी समुद्रात राजांचे अतिभव्य स्मारक, उभे करायचे असे ठरवले आहे.  म्हणजे त्यात मलिदा तर खाता येईल आणि त्यांची स्वत:ची राजकीय शानही मिरवता येईल. 

 शिवराय एवढाच एक विचार माझ्या भोळ्या भाबड्या जनतेसमोर मांडला की, हे झाले मोकळे आपले राजकारण करायला.  बरं ते जाऊद्यात, स्मारक बांधून काय मिळवणार ?  राजांची तत्वे, निष्ठा, धोरणे, राज्य करण्याची पध्दत, त्यांची लढवय्यी वृत्ती वगैरे हे घेणार आहेत का, तर नाही.  शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्याच घरात, आपल्या नाही, अशी ही ह्यांची वृत्ती आणि त्यातूनच त्यांच्याच पठडीत तयार झालेली, जोपासली गेलेली मग्रूर आणि अकार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा.  मग काय, माझे तीन तेरा वाजणार नाही तर काय होणार ! 

असेही मला दिल्ली कधी पासून दूरच होती आणि आता तर अजूनच दूरच काय पण आजकाल दिसेनाशीच झाली आहे ! 

नाही म्हणायला मला आजकालच्या तरुण पिढीवर थोडासा विश्वास वाटू लागला आहे.  त्यांना माझी काळजी वाटते आहे. ते ह्या सगळ्या गोष्टींपासून जरा वेगळे आहेत. त्यांचे बुद्धी कौशल्यही खूपच चांगले आहे.  त्यांना जर योग्य मार्गदर्शक लाभले तर ही तरुणाई मला पुन्हा एकदा अभिमानाने जगायला लावेल अशी मला आशा वाटू लागली आहे.  ही तरुणाई बिचारी माझ्या राजांच्या गडकोटांवर स्वत:च्या खर्चाने आणि अपार कष्टाने, पुरातत्व खात्याचा ढिसाळ कारभार सांभाळून, दुर्गसंवर्धन करून राजांचा इतिहास जपण्याचा एक अभिनव प्रयत्न करीत आहेत.  त्याचे कारण त्यांना माहिती आहे की “शिवराय” हा इतिहास जरी असला तरी ते नुसते एक नाव नसून ती एक संस्कृती आहे, प्रेरणा आहे आणि तेच तर खरे माझे आणि हिंदुस्तानचे खरे वैभव आहे.  तरुणाईच्या ह्या विचारांचे आणि त्यांच्या कृतीचेच मला तर फारच कौतुक वाटते आणि त्याचे अप्रूप ही आहे.   

नाण्याच्या ह्या चांगल्या बाजू बरोबरच नाण्याची दुसरीही बाजूचा जर विचार केला तर मला थोडीशी काळजीही वाटते. सध्या, माणुसकी नावाची गोष्टच लुप्त होत चालली आहे ही काय असे सारखे वाटायला लागते.  त्याचे कारण ही तसेच आहे हो, म्हणजे बघा ना, कोपर्डी सारख्या घटना घडतात, त्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटवलेले राजकारण, त्यातून स्त्रीभूर्ण हत्येसारखे घोर पाप.  एकंदरीतच सर्वच क्षेत्रांमध्ये बोकाळत चाललेला भ्रष्टाचार आणि भ्रष्ट्राचाराचाच होऊ घातलेला शिष्टाचार.  निवडणुकांसाठीचेच चाललेले सर्वपक्षीय राजकारण आणि विकासाच्या नावावर होत असलेली माझी हेटाळणी असे आणि अजून किती तरी विषय माझे मन विषण्ण करतात.  तरीही मी माझ्या जन्मापासून आशावादी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे काणाडोळा करून पूर्वग्रहदूषित न करता पुन्हा एकदा सकारात्मक दुर्ष्टीने ह्या भावी पिढ्यांकडे आशाळभूतपणे पाहतो आहे.    

 माझ्या मध्ये सध्या होत असलेला भौगोलिक, सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक असा स्वागतार्ह बदल मला सतत जाणवतो आहे.  शिक्षणाचा प्रचार आणि विस्तार खूप वाखाणण्याजोगा चालू आहे. तसेच ह्या अशा सुशिक्षितांचा स्तर जर उंचावला तर मी नक्कीच प्रगतीपथावर जाईन व पुन्हा एकदा भारतात पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र म्हणून मिरवेल अशी मला खात्री वाटते.  माझ्यात औद्योगिकरण तर नक्कीच वाढले आहे, त्यामुळे रोजंदारीही वाढली आहे आणि हाताला कामे मिळत आहेत.  माझा महाराष्ट्रीयन माणूस आळशी आहे, त्याला कष्टाची सवयच नाही, धंदेवाईकपणाचा त्याच्या मध्ये अभाव आहे, आणि तो आपली चाकरी व भाकरी ह्यातच समाधानी आहे अशी बिरुदावली त्याच्याशी कायमची चिकटलेली होती ती त्याने स्वत:च्या कर्तृत्वाने पुसून टाकून “मराठी पाउल पडते पुढे” हे तो कालानुरूप सिद्ध करू लागल्यामुळे मला थोडेसे समाधानही मिळते आहे. शेवटी मलाच काय पण तुम्हांलाही प्रगती हवी आहे हे नक्की.

दुर्ग हेच सार राज्याचे, शिवरायांस ते उमजले,
रक्त इथे स्वराज्यासाठी, होते कितीक हो सांडले ||
स्वप्न बालपणीच शिवबाने, स्वराज्याचे उरात बाळगले,
असे प्राण देहात जोवरी, तडीस त्यांनी ते नेले ||
शिवबा हा जिजाऊंचा, सखा होता मावळ्यांचा,
कर्दनकाळ तो यवनांचा, होता राजा स्वराज्याचा ||
किती वर्णावी त्याची नीती, किती सांगावी त्याची कीर्ती,
होते गुंग ऐकुनी मती, लवतात भल्याभल्यांची पाती ||
एकच राजा होऊनी गेला, शिवबाचा छत्रपती हो जाहला,
इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला, शिल्पकार हा महाराष्ट्रास लाभला ||


जय शिवाजी | जय भवानी |

माझ्या मराठी मुलखातील प्रत्यके माणसाला सुख, समाधान, समृद्धी आणि शांती लाभो हीच सदिछ्या मी माझ्या भारत मातेकडून करू इच्छितो.
सदैव तुमचाच,

महाराष्ट्र
  
रविंद्र कामठे,

Monday, 15 May 2017

मनतरंग


आपण आपल्या मनाला कितीही समजावले तरी ते कधी कधी शांतच होत नाही.  हे असे सारखे सारखे काय होत असते हेच तर आपल्याला कधी समजतच नसते.  मनाची खूप चलबिचल चाललेली असते.  एकदा ते गत स्मृतींमध्ये जाते, वर्तमानात परतून येते व भविष्याचा विचार करायला लागते.  जस जसे आपले आयुष्य उतरणीला लागलेले असते ना तसं तसे मनाच्या चंचलपणाचा हा अविष्कार वाढीला लागतो आणि हे असे किती दिवस चालू राहणार आहे हेच तर आपल्याला समजत नाही.  मनाचे कुठल्या पद्धतीने समाधान करावे हेच काही केल्या समजत नसते.  त्यावरील उपायही आपल्याला सुचेनासे होतात आणि काही वेळा तर आपण ह्या मना पुढे अगदी हतबल होऊन बसतो.

आयुष्यातल्या भूतकाळातील, काही क्षण तर असते असतात की, कालांतराने ते आपल्याला ह्या वर्तमानात हवे हवेसे वाटू लागतात आणि आपल्याला काही सुचतच नाही.  चूक काय बरोबर काय ह्याचा फारसा विचार हे मन करत बसतच नाही.  झाले गेले विसरून जावू, चला विसावू नव्या वळणावर असे काहीसे वाटायला लागते.  माणूस हा एक असा प्राणी आहे की जो आयुष्यात काहीना काही चुका करतोच करतो.  आणि हो जो चुकणार नाही तो माणूसच नाही असे म्हणावयास काहीच हरकत नाही.  तरीही आयुष्याच्या संधेला, आपण केलेल्या चुकांचा परामर्श घ्यायचा असतो.  चूक आणि बरोबर म्हणजे काय हे ज्याला त्यालाच ठरवायला लागते.  कारण प्रत्येक गोष्टीकडे ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असू शकतो आणि परिस्थितीनुसार व माणसांच्या मुळातल्या स्वभावानुसार हे गणित आपोआप बदलत जाते.  जे एखाद्याला चूक वाटते ते दुसऱ्यास बरोबरही वाटू शकते, ह्यालाच मनुष्य स्वभाव असेही आपण म्हणू शकतो आणि तो ज्याच्या त्याच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि भावनिक जडण घडणीतूनच निर्माण झालेला असतो व त्यावर जस जसे आपण मोठे होत जातो तसं तसा आपल्यावरील संस्कारांचा लेप अतिशय नैसर्गिकपणे आपल्याही नकळत बसलेला असतो.  चुकांमधून स्वत:ला सुधारायचे असते असे आपण नेहमीच म्हणत राहतो.  पूर्ण विचारांती, आधी चूक काय आणि बरोबर काय हे ठरवून, त्याचे परिमार्जन करून होणाऱ्या परिणामांचा आढावा घेऊन ठरवले तर आपल्या बरोबर बाकीचे कोणी भरडले जाणार नाहीत ह्याची शाश्वती होते.  काही काही चुका ह्या अशा असू शकतात की ज्या आयुष्यात पुन्हा कधीही करायच्या नसतात तसेच त्यात जर दुखावलेल्या व्यक्तींकडून क्षमेची याचना करणे ही तर काळाची एक गरजच भासते.  बऱ्याचदा मोठ्यामानाने माफीही मिळते.  अर्थात ह्याला अपवाद तुम्हीं कोणती आणि काय चूक केलेली आहे ह्यावर अवलंबून असते हे मात्र नक्की.  जे कोणी हे करत नाहीत त्यांची तिथेच सगळी गडबड होऊन बसते.  आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडून गेलेल्या असतात की, ज्यांचा आपण जर फार विचार करत बसलो तर त्याचा वर्तमानावर परिणाम तर निश्चितच होतो आणि ज्यांची ह्यात चूक नसते त्यांना उगाचच त्याचा भुर्दंड सोसावा लागतो आणि आपण एखादवेळेस पुन्हा एकदा त्या भूतकाळात गुरफटले जावू शकतो ह्याची जाणीव ठेवणे गरजेचे भासते.  आपल्या ह्या मनाला तर, ना वर्तमानाची चिंता असते ना त्याला भविष्याची काळजी असते.  आपल्या ह्या इवल्याशा मनात ठासून भरलेल्या भावनांच्या ह्या अथांग सागरात आपली होडी हिंद्कोळे खातच, ह्या स्मृतींवरच जगण्याची उत्स्फूर्त अभिलाषा निर्माण करत राहते.
 
कधी आठवणींचा हा पगडा आपल्या मेंदूतील स्मृतीपटलावर भार होवून बसतो.  आपण जर का आपल्या ह्या भूतकाळाशी थोडासा संवाद साधला तर, काळजाचे एक एक करून सगळे कप्पे आपसूकच उघडायला लागतात आणि आपले मन हळवे होऊन जाते.  कधी कधी ते आपल्यावर रुसतेही, रागावते, चिडते, भांडतेही आणि कधी कधी तर आपल्यावर खट्टू होऊन बसते.  आपल्या मनाचे हे भांडण म्हणजे आपल्यातील संवेदनशील माणसाचे एक जिवंत प्रतिकच असावे असे भासते.  अशा प्रकारे आपल्या मनाशी संवाद सांधण्याची ही प्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते, ज्यामुळे आपण नकारार्थी विचार करायचे सोडून सकारात्मक विचार करायला उद्युक्त होतो.  अर्थात पूर्वग्रहदूषित विचार ह्या प्रक्रियेमध्ये वर्ज असतात हे मात्र लक्षात घ्यायला हवे, त्यांना ह्यात कुठेच स्थान नसते.  ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊन, ते जर विस्कळीत होणार असेल तर, ह्या अशा अशांत मनाला मायेने समजावणे खूप गरजेचे भासते.  हे कुठले शास्त्र आहे हेच तर आपल्याला कळत नाही आणि नेमके पुढे काय काय होणार आहे ह्याचाही फारसा विचारही करण्याची गरज भासत नाही. 

ओथंबून वाहणारे काही नाजूक क्षण सारीपाटलावरून आपल्या ओंजळीत, प्राजक्ताच्या सड्या सारखे भासू लागले की समजायचे की आपले मन जरा जास्तच हळवे झालेले आहे आणि त्याला ताबडतोब भावनिक मशागतीची नितांत गरज आहे !  काही क्षण असे असतात की ते आपल्याला सुखावून जातात, तर काही क्षण दु:खी कष्टीही करून जातात.  सुखावून गेलेल्या क्षणांमुळे हरखून जायचे नसते आणि दु:खी क्षणांमुळे हिरमसून जायचे नसते.  सुख हे मानण्यावर असते आणि दु:ख हे निभावण्यावर असते, हे ज्यांना समजेत ते आपले आणि आपल्या संबंधित सगळ्यांचेच आयुष्य सुखकर आणि समाधानी करू शकतात, हे मात्र निर्विवाद सत्य आहे.

आपल्या ह्या जीवनाची घडी बसवता बसवता आपले आयुष्य कधी उतरणीला लागलेले असते तेच आपल्याला उमजत नाही आणि उमजले तरी समजत नाही. त्यामुळेच की काय ह्या मनाला थोडेसे आवरावे लागते, त्याला आंजरावे गोंजारावे लागेत त्यासाठी आपल्यावर निस्सिम प्रेम आणि माया करणाऱ्या माणसांची निकड असते आणि त्यांचा विश्वास संपादन करून पुन्हा नव्याने हे जीवन जगायचे असते ते आपल्या अंता पर्यंत.
 
आपुलकीने काठोकाठ भरलेलं आपलं मन हे आपल्यालाही आणि दुसऱ्या कोणालाही कधीच धोका देत नाही.  हाच तर स्वच्छ आणि निर्मळ मनाचा ठेवा आहे. मनातील भावनांचे हे तरंग आपले आयुष्यात उमंग आणून आपले अंतरंग ढवळून काढतात, हे मात्र एक अफलातून सत्य ह्या विचार मंथनातून बाहेर पडते हे कदाचित तुम्हांलाही पटले असेल असे मला वाटते. 

मी काही मानसशास्त्रज्ञ नाही अथवा फार मोठा विचारवंत किंवा संशोधकही नाही.  जे विचार मनात आले त्यांचा सर्वांगीण दृष्टीने विचार करून, सर्वसामन्य माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या काही सुखद, अथवा दु:खद अशा काल्पनिक क्षणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करता करता जस जसे लिहायला बसलो तसं तसा ह्या विषयात आणखीनच गुंतत गेलो.  तसेही मनातले गुंते सोडवणे हे अतिशय क्लिष्ट वाटू लागले आणि शेवटी माझे मन मलाच दटावू लागले की, तुला कोणी हे उपद्व्याप करायला सांगितलेत.  गप गुमान रहा की.  तू फक्त तुझ्याच मनाचा विचार कर.  बाकीच्यांच्या मनात काय चालले आहे ह्याचे तुला काय करायचे आहे.  घेण्या न देण्याचा उगाचच कशाला वाचकांच्या डोक्याला असा ताप देतोस ते.   तुला वाटतात म्हणून का हे विचार प्रगल्भ होतात की काय !  नाही ते उद्योग करून वाचकांना, तुलाच वाटणाऱ्या ह्या अशा प्रगल्भ विचारांचा त्रास देतो आहेस ते.   उगाचच समाजप्रबोधनाचा आव वगैरे आणून, असे काहीसे विचार जे साधारणपणे, फक्त भाषणांतून किंवा गप्पांतून व्यक्त करून सोडून द्यायचे असतात हे लक्षात ठेव.  शेवटी ज्याचे त्याचे मन ज्याने त्यानेच सांभाळायचे असते त्यावर तुझ्या ह्या विचारांचा काही परिणाम वगैरे होईल अशी खोटी आशा मनात बाळगून स्वत:ला फार मोठा लेखक शाबित करण्याचा प्रयत्न करू नकोस.  असाही आजकाल ह्या आंतरजालामुळे सुविचारांचा सुळसुळाटच झाला आहे, अगदी रोज उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा नुसता वर्षाव होतो आहे त्यात तुझ्या मन तरंगाची कशाला भर घालतोस !

रविंद्र कामठे,

Monday, 1 May 2017

उन्हाळ्यात पक्षांसाठी दाणा पाण्याची सोय कशी करावी ह्याची माहिती

 

 
नमस्कार,
उन्हाळ्यात पक्षांसाठी दाणा पाण्याची सोय कशी करावी ह्याची माहिती खाली देत आहे.

१) पक्षांसाठी पाण्याची सोय करण्याची कृती;
एक, दोन, पाच, दहा लिटरची पाण्याची प्लँस्टिकची बाटली गरजे प्रमाणे घ्यावी. बाटलीला तळात बाँलपेनची रिफिल जाईल एवढे भोक पाडावे. रिफिल बाटलीत खुपसून चार इंच बाहेर येईल येवढी ठेवावी. नंतर रिफिल जेथे खुपसली आहे तेथे फेव्हीक्विकचे तीन तार थेंब सभोवताली टाकावेत म्हणजे रिफिल जेथे खुपसली आहे तेथून पाणी गळणार नाही. वाळल्यावर बाटलीत पाणी भरुन घ्यावे व बुच गच्च लावावे.  तसेच बाटलीच्या वरच्या भागात सुईने एक भोक मारावे. बाटलीत पाणी भरावे.  रिफिल मधून पाण्याची धार लागेल, ती थांबविण्यासाठी खराट्याची (दिड काडी) छोटी काडी रिफिलच्या पुढच्या टोकात रिफिल मधे खुपसावी.  आपोआप ठिबक सिंचना सारखे पाणि भांड्यात पडायला सुरवात होते. एक लिटर पाण्याला बाउल मध्ये साठायला साधारण चार ते पाच तास लागतातील असा अंदाज आहे, त्यानुसार तुमच्या गरजेनुसार पाण्याच्या बाटलीची निवड करावी.
बाटली खाली एक मोठ्या बाऊल मधे छोटा रिकामा बाऊल ठेवावा.  म्हणजे पक्षांना सतत पाणी मिळत राहिल आणि जास्तीचे पाणी वायाही जाणार नाही.
ही योजना ज्या भागामधे पाण्याचे दुर्भिक्ष आहे व जे दिवसभर घरा बाहेर असतात आणि ज्यांना पक्षांप्रती अतीव प्रेम आहे अशांसाठी तर फारच उपयुक्त आहे असे मला वाटते.
२) पक्षांसाठी धान्याच्या सोयीची कृती;
एक प्लस्टिकची बाटली घ्या. तीला तळात अर्धा इंचाचे भोक पाडा. त्यात अर्धा इंच प्ल्स्टिक पाईपचा एक इंच लांबीचा तुकडा सरकवा.
एक छोटी प्लेट घ्या, वरील बाटली प्लेटच्या मधोमध चिटकवा किंवा स्क्रूने जोडा.
हवे असल्यास बाटलीला मधोमध आरपार भोक पाडून प्लास्टिकचा  ह्यांगर कापून ह्या भोकातून समांतर रेषेत सरकवा. म्हणजे पक्षांची बसण्याची सोय होईल.

३) वरील दोनही वस्तू एका पीव्हीसी पाईपला एका खाली एक बांधा आणि तुमच्या बागेत थोडे उंच जागी नेवून एका खांबास बांधून टाका.
बाटलीतले पाणी संपले की भरा. धान्य संपत आले की भरा.

काही अडचण असल्यास सोबतचा फोटो पहावा किंवा मला विचारले तरी हरकत नाही. मी हा प्रयोग घरी करुन सफल झाल्यावरच तुंम्हांला सांगतो आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पक्षांचा फार मोठा हातभार आहे त्यामुळे ह्या रणरणत्या उन्हापासून आपण त्यांची तृष्णा भागवू शकतो ह्या सदभावनेतून हा प्रयोग प्रत्येकाने घरोघरी राबवावा ही कळकळीची विंनती करतो.
रविंद्र कामठे, पुणे.
भ्रमणध्वनी क्रमांक- ९८२२४०४३३०

“मी महाराष्ट्र बोलतोय”


 
“मी महाराष्ट्र बोलतोय”

आरे कोणी आहे का तिकडे, “मी महाराष्ट्र बोलतोय” !.  होय होय, “मी महाराष्ट्र बोलतोय”.  तोच तो, जो माझ्या शिवरायांनी ४०० वर्षांपूर्वी, आपल्या अथक परिश्रमाने व पराक्रमाने, मोघलांशी अगणित लढाया करून, असंख्य मावळ्यांच्या आणि जीवा भावाच्या सरदारांच्या प्राणांची आहुती देऊन, दुर्गम अशा गड कोटांच्या सहाय्याने सतत ५० वर्षे झुंजून लढवलेला, घडवलेला आणि अभिमानाने हिंदवी स्वराज्याचा भगवा माझ्या माथ्यावर फडकवलाय तो, मी महाराष्ट्र बोलतोय ! कोणी ऐकतंय का, मला काय म्हणायचे आहे ते !

जरा माझ्याकडे बघा ना रे, माझ्या बाळांनो.  माझ्या संवेदना, तुमच्या ह्या धकाधकीच्या व आधुनिकतेच्या जीवनात, क्षणिक वेळ काढून, मला काय म्हणायचे आहे ते तरी ऐका ना रे माझ्या राजांनो.  किती विंनती करायची रे अशी तुम्हांला !  मला ना आता माझीच लाज वाटायला लागली आहे ह्या मिन्नतवाऱ्या करून करून.  आरे पोरांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी लढवलेला, घडवेलेला, जडवलेला, हा सह्याद्रीचा एक एक पर्वत तुम्हांला साद घालतो आहे.  येथील नद्या, नाले, वृक्ष, पक्षी, प्राणी, दगड धोंडे तुम्हांला बोलावताहेत.  तुमचे तर कोणाचे लक्षच कसे आपल्या ह्या महाराष्ट्राकडे जात नाही, हेच मला आता समजेनासे झाले आहे.  काय करावे तेच मला कळत नाही.  वय तर झालेच आहे माझे आणि आता माझी स्मरणशक्तीही हळूहळू लोप पावत चालली आहे, असेच वाटते आहे रे.  मी परत एकदा जोराने हाक मारतो.  अरे मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय. ऐकताय ना !  ह्या डॉल्बीच्या आणि मद्यधुंद वातावरणात, अतिरेकी ढोल ताशांच्या गजरात, तुम्हांला माझी ही हाक कशी रे ऐकू येणार म्हणा ! मलाच खरे तर काही कळतच नाही.  मी सुद्धा वेड्यासारखा तुम्हांला हाका मारत का सुटलो आहे ते ! मला तुम्हांला माझ्या इतिहासाची आठवण ताजी करून द्यायची आहे रे बाकी काही नाही.....

 माझा शिवाजी राजा असा काही लढला होता ह्याच महाराष्ट्रासाठी हे आठवले की काळजाचे पाणी पाणी होते अजूनही.  आपले अवघे आयुष्य राजांनी वेचेले, ते हे हिंदवी स्वराज्य मिळविण्यासाठीच.  लढता लढता माझा हा राजा मरेपर्यंत कधी थकलाच नाही की त्याने परिस्थितीपुढे कधी हारही नाही मानली.  सरते शेवटी हे हिंदवी स्वराज्य आपल्या हाती सोपवूनच तो अजरामर झाला.  जरी त्याला काळाने आपल्यातून अकालीच हिरावून घेतले, तरी त्याच्या नंतर त्याच्याच सुपुत्राने म्हणजे संभाजीराजांनीही तोच पायंडा पुढे चालू ठेवला होता. हा इतिहास विसरून कसे चालेल हो. वारसाहक्काने मिळालेल्या घरभेदी आणि फितुरीच्या शापानेच संभाजीराज्यांचीही अमानुष हत्या झाली आणि मी परत एकदा पोरका झालो होतो, हे आजही आठवले तरी माझ्या अंगावर काटा येतो बरं. इंग्रजांचा तर डोळा होताच माझ्या ह्या समृद्ध राज्यावर तरीही महाराजांच्या पेशव्यांनीही त्यांच्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे कष्ट घेऊन आणि मुत्सदेगीरीने हे राज्य नंतर नेटाने चालवले, टिकवले. शेवटी पेशव्यांना ह्या बलाढ्य इग्रजांच्या पुढे आपली मान तुकवावी लागली व गुलामगिरीचा तो काळाकुट्ट इतिहास, थोडे थीडके नाही तर तब्बल १५० वर्षे मला भोगावा लागला,  त्याचे शल्य मी अजूनही विसरू शकत नाही हो.  अगदी अस्वस्थाम्या सारखी माझी ही जखम अजूनही भळभळते आहे व त्यावर लावायला मला अजूनही कुठलेच जालीम असे तेल उपलब्ध होऊ शकले नाही, हीच तर माझी शोकांतिका आहे रे माझ्या पोरांनो.  नंतरच्या काळातील फुले, शाहू, आंबडेकर, टिळक, आगरकर, रानडे, गोखले, चाफेकर, टोपे, सावरकर असे आणि अजून किती तरी क्रांतीकारी स्वातंत्र्यवीर ह्या इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढले आणि शेवटी मला त्यांनी परत एकदा स्वतंत्रही केले अगदी माझ्या शिवबा आणि संभाजी सारखे बलिदान देवूनच.   

जरी माझा जन्म खूप आधी झालेला असला तरीही भाषावर प्रांतरचेनेच्या संकल्पनेतून, १०६ हुतात्म्यांच्या बलीदानानंतर,  माझा मराठी भाषकांचे राज्य म्हणून “संयुक्त महाराष्ट्र”च्या चळवळीच्या यशातून दिनांक १ मे १९६० रोजी पुनर्जन्म झाला आणि मला कोण आनंद झाला म्हणून सांगू ! ज्या भारत भूमीत माझा जन्म झाला आहे तिला इग्रजांकडून स्वातंत्र्य मिळून आज ६९ वर्षे झालीत आणि माझा पुनर्जन्म होऊन ५७ वर्षे झालीत, तरीही मला अजूनही एक गोष्ट कळली नाही की, माझी मराठी अस्मिता आजवर जपली गेली आहे का !  कारण अजूनही माझ्या मायमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्यकर्त्यांपुढे नतमस्तक व्हावे लागते आहे ह्या सारखे दुसरे कुठले दु:ख असू शकते सांगा !

मी महाराष्ट्र बोलतोय, असे मी गेले कितीतरी वेळ तुमच्या कानी कपाळी ओरडतोय, पण त्याचे तुम्हांला काहीच पडलेले दिसत नाही.  अहो माझ्या शिवरायाच्या काळात शेतकरी कधीही आत्महत्या करत नव्हता.  राजाने त्याला आपल्या पोटच्या पोरांसारखे जोपासले होते.  कारण हा बळीराजाच आपल्या राज्याचा पोशिंदा आहे हे शिवरायांना चांगलेच ज्ञात होते.  पण आज ह्या बळीराजाची तुम्हीं काय अवस्था करून ठेवलीत रे !  अगदी भिकारी करून टाकलंय त्याला.  त्यात भरीला भर, निसर्गानेही त्याच्यावरच अत्याचार करायचे ठरवलेले दिसते आहे आणि हो ह्या सगळ्याला तुम्हीच कारणीभूत आहात हे मात्र शंभर टक्के खरे आहे.  कारण तुमच्या आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या नावावर, शहरीकरणाच्या झपाट्याने तुम्हीं पर्यावरणाचा जो काही ह्रास चालवेलेला आहे ना; तोच, होय होय, तोच ह्या सगळ्या हवामान बदलाला कारणीभूत आहे हे तुम्हांलाच काय पण सरकारला पण कसे कळत नाही ह्याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटते आहे, चिडचिड होती आहे आणि कोणाला सांगावयाचे असा प्रश्न की पडला आहे.  तुम्हीं म्हणाल की मला शिवरायांचे जरा अतीच प्रेम आहे की काय ! कारण सारखा त्यांच्याच नावाचा उदोउदो चालू आहे.  पण काय करणार गेल्या ४०० वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकही जाणता राजा मला पुन्हा एकदा लाभू नये ह्या सारखे दुसरे अभाग्य ते काय असू शकते, हे तुम्हीं जर माझ्या मनात, काळजात डोकावले तर तुम्हांलाही जाणवेल हो !

माझ्या स्मरणशक्तीस अताशा ह्या सगळ्या गोष्टी झेपेणाश्या झाल्या आहेत.  ह्या आधीची माझ्याकडील शेकडो वर्षांची संत परंपरा, ज्ञान संपत्ती आणि मराठी संस्कृतीचा ओढा तर अताशा नष्टच पावत चालला आहे आणि मी एका गर्द खाईत लोटला जातो आहे असेच आजकाल मला अगदी प्रकर्षाने जाणवायला लागले आहे.  कोण माझा हा ह्रास थांबवू शकेल ?  मला तर सध्या असे काही डोळ्या समोर दिसत नाही, की ज्यामुळे माझी ही चाललेली अधोगती कोणीतरी रोखू शकेल !  राजकीय इच्छाशक्तीचा तर मी आजकाल विचारच सोडून दिलाय.  कारण त्यांना फक्त जात, पात, धर्म, सामाजिक द्वेष आणि दुफळी निर्माण करून आपले इप्सितच साध्य करायचे आहे.  त्यांनी फक्त माझ्या शिवरायांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या जोमात साजऱ्या करायच्या आणि अरबी समुद्रात राजांचे अतिभव्य स्मारक, उभे करायचे असे ठरवले आहे.  म्हणजे त्यात मलिदा तर खाता येईल आणि त्यांची स्वत:ची राजकीय शानही मिरवता येईल.  शिवराय एवढाच एक विचार माझ्या भोळ्या भाबड्या जनतेसमोर मांडला की, हे झाले मोकळे आपले राजकारण करायला.  बरं ते जाऊद्यात, स्मारक बांधून काय मिळवणार ?  राजांची तत्वे, निष्ठा, धोरणे, राज्य करण्याची पध्दत, त्यांची लढवय्यी वृत्ती वगैरे हे घेणार आहेत का, तर नाही.  शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्याच घरात, आपल्या नाही, अशी ही ह्यांची वृत्ती आणि त्यातूनच त्यांच्याच पठडीत तयार झालेली, जोपासली गेलेली मग्रूर आणि अकार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा.  मग काय, माझे तीन तेरा वाजणार नाही तर काय होणार !  असेही मला दिल्ली कधी पासून दूरच होती आणि आता तर अजूनच दूरच काय पण आजकाल दिसेनाशीच झाली आहे ! 

नाही म्हणायला मला आजकालच्या तरुण पिढीवर थोडासा विश्वास वाटू लागला आहे.  त्यांना माझी काळजी वाटते आहे. ते ह्या सगळ्या गोष्टींपासून जरा वेगळे आहेत. त्यांचे बुद्धी कौशल्यही खूपच चांगले आहे.  त्यांना जर योग्य मार्गदर्शक लाभले तर ही तरुणाई मला पुन्हा एकदा अभिमानाने जगायला लावेल अशी मला आशा वाटू लागली आहे.  ही तरुणाई बिचारी माझ्या राजांच्या गडकोटांवर स्वत:च्या खर्चाने आणि अपार कष्टाने, पुरातत्व खात्याचा ढिसाळ कारभार सांभाळून, दुर्गसंवर्धन करून राजांचा इतिहास जपण्याचा एक अभिनव प्रयत्न करीत आहेत.  त्याचे कारण त्यांना माहिती आहे की “शिवराय” हा इतिहास जरी असला तरी ते नुसते एक नाव नसून ती एक संस्कृती आहे, प्रेरणा आहे आणि तेच तर खरे माझे आणि हिंदुस्तानचे खरे वैभव आहे.  तरुणाईच्या ह्या विचारांचे आणि त्यांच्या कृतीचेच मला तर फारच कौतुक वाटते आणि त्याचे अप्रूप ही आहे.   

नाण्याच्या ह्या चांगल्या बाजू बरोबरच नाण्याची दुसरीही बाजूचा जर विचार केला तर मला थोडीशी काळजीही वाटते. सध्या, माणुसकी नावाची गोष्टच लुप्त होत चालली आहे ही काय असे सारखे वाटायला लागते.  त्याचे कारण ही तसेच आहे हो, म्हणजे बघा ना, कोपर्डी सारख्या घटना घडतात, त्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटवलेले राजकारण, त्यातून स्त्रीभूर्ण हत्येसारखे घोर पाप, एकंदरीतच सर्वच क्षेत्रांमध्ये बोकाळत चाललेला भ्रष्टाचार आणि भ्रष्ट्राचाराचाच होऊ घातलेला शिष्टाचार, निवडणुकांसाठीचेच चाललेले सर्वपक्षीय राजकारण आणि विकासाच्या नावावर होत असलेली माझी हेटाळणी असे आणि अजून किती तरी विषय माझे मन विषण्ण करतात.  तरीही मी माझ्या जन्मापासून आशावादी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे काणाडोळा करून पूर्वग्रहदूषित न करता पुन्हा एकदा सकारात्मक दुर्ष्टीने ह्या भावी पिढ्यांकडे आशाळभूतपणे पाहतो आहे.    

माझ्या मध्ये सध्या होत असलेला भौगोलिक, सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक असा स्वागतार्ह बदल मला सतत जाणवतो आहे.  शिक्षणाचा प्रचार आणि विस्तार खूप वाखाणण्याजोगा चालू आहे. तसेच ह्या अशा सुशिक्षितांचा स्तर जर उंचावला तर मी नक्कीच प्रगतीपथावर जाईन व पुन्हा एकदा भारतात पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र म्हणून मिरवेल अशी मला खात्री वाटते.  माझ्यात औद्योगिकरण तर नक्कीच वाढले आहे, त्यामुळे रोजंदारीही वाढली आहे आणि हाताला कामे मिळत आहेत.  माझा महाराष्ट्रीयन माणूस आळशी आहे, त्याला कष्टाची सवयच नाही, धंदेवाईकपणाचा त्याच्या मध्ये अभाव आहे, आणि तो आपली चाकरी व भाकरी ह्यातच समाधानी आहे अशी बिरुदावली त्याच्याशी कायमची चिकटलेली होती ती त्याने स्वत:च्या कर्तृत्वाने पुसून टाकून “मराठी पाउल पडते पुढे” हे तो कालानुरूप सिद्ध करू लागल्यामुळे मला थोडेसे समाधानही मिळते आहे. शेवटी मलाच काय पण तुम्हांलाही प्रगती हवी आहे हे नक्की.  हे मी अगदी पोटतिडकीने सांगतो आहे. हे सगळे प्रेरणादायी तर आहेच आणि हेच तर आज मला तुम्हांला माझ्या पुनर्जन्माच्या म्हणजेच, १ मे ह्या वाढदिवसाच्या निमित्त सांगावयाचे होते आणि तुमच्याशी बोलायचे होते बाकी काही विशेष नाही.

माझ्या मराठी मुलखातील प्रत्यके माणसाला सुख, समाधान, समृद्धी आणि शांती लाभो हीच सदिछ्या मी माझ्या भारत मातेकडून करू इच्छितो.

सदैव तुमचाच,

महाराष्ट्र
रविंद्र कामठे,