Wednesday, 22 January 2025

खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी.. एक मनोगत

 


खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी.. एक मनोगत

 

            पाथर्डी (अहिल्यानगर)चे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड सरांचे “खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी” हा बालकथासंग्रह नुकताच ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केला, तो माझ्या वाचनात आला आणि मला त्यावर माझा अभिप्राय लिहिण्यास उद्युक्त करून गेला.

            बालसाहित्य हा प्रकार तसा म्हणायला गेले तर खूपच कौशल्याचा वापर करून लिहिण्याची बाब आहे हे मला खारूताईचे जंगल ह्या कथा संग्रहामुळे अगदी प्रकर्षाने जाणवले. लहान मुलांचे विश्व जवळून न्याहाळणारे, ते जाणणारे आणि तितक्याच समृध्तेने हे शिवधनुष्य पेलण्याचे काम डॉ. दौंड यांनी केले आहे असे मला वाटते.  बालसाहित्य हा प्रकार फारच आव्हानात्मक तर आहेच, तसेच त्यात लिखाणाच्या कल्पकतेला भरपूर वाव आहे.  अर्थात त्यासाठी लिहिणाऱ्याकडे वैचारिक सामर्थ्य, संकृतीचा अभ्यास आणि आचारांची प्रगल्भता असायला हवी.  ह्या सर्व बाबींवर खरा उतरणारा डॉ. दौंड सरांचा हा बालकथासंग्रह आहे असे मला वाटते.

            एकूण १२ कथा ह्या पुस्तकात असून त्या प्रत्यके कथेमध्ये दौंड सरांनी मांडलेले विचारांची आपल्या आचारांशी इतकी सुंदर सांगड घातली आहे की हा कथासंग्रह बालकांना तर मार्गदर्शक ठरतोच, परंतु तो मोठ्यांनाही विचार करायला भाग पाडतो. ह्या कथासंग्रहामधील प्रत्येक कथा आपल्याला एक आगळा वेगळा विचार भेट देऊन जाते. ज्या निसर्गाच्या कुशीत आपण राहतो, पण त्याला आपण अजिबात ओळखत नाही, ह्याची जाणीव करून देतो.  आयुष्याच्या प्रत्यके पाऊलावर सुविचार सांगणारे आणि ऐकवणारे खूप असतात, परंतु त्यावर जाणीवपूर्वक चालणारे खूप थोडे असतात.  अर्थात ह्या थोडक्या लोकांमुळेच हे जग चालते आहे, हा संदेश देणारा हा कथासंग्रह आहे असे मला वाटते.  त्या थोड्क्यांमध्ये आपला समावेश व्हावा ही प्रेरणा देणारा हा दौंड सरांचा बालकथासंग्रह आहे म्हणावयास हवे.

            रामायणातल्या कथेमध्ये जसा खारुताईचा वाटा आहे अगदी तसाच आणि त्याच प्रगल्भतेचा वाटा ह्या बालसंग्रहाचा साहित्य विश्वात आहे असे मला अगदी प्रकर्षाने जाणवले.  खारुताईचा वाटा, ही एक नुसतीच म्हण अथवा गोष्ट नसून, पुढाकाराने, सकारात्मक दृष्टीने, धेय्याने, निश्चयाने, दृढतेने, श्रद्धेने, सचोटीने आणि प्रामाणिकपणे उचलेले पाऊल आहे आणि हाच मोलाचा संदेश देण्यात हा बालकथासंग्रह नक्कीच यशस्वी होतो असे मला वाटते.  माझी वाचकांना एक नम्र विनंती आहे की तुमच्याकडे लहान मुले असतील तर त्यांना हा कथासंग्रह नक्कीच वाचून दाखवा व त्या कथेमधील मतीतार्ध त्यांना समजावून सांगा.  समजा तुमच्याकडे लहान मुले नसतील तरीही, हा कथासंग्रह तुमच्या परिचयातील लहानमुलांना वाढदिवसानिमित भेट द्या.  आपली भावी पिढीवर चांगले संस्कार करण्याची संधी दवडू नका.  बाकी ह्या सर्व कथा तुम्ही वाचल्यात तरच त्याची गम्मत येईल म्हणून मी इथे त्या विषयी जाणीवपूर्वक भाष्य केलेले नाही.

            अतिशय साधी, सरळ आणि सोपी भाषा शैली हा तर ह्या कथासंग्रहाचा गाभा आहे. लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या सर्व गोष्टी ह्या कथासंग्रहात अगदी ठासून भरल्या आहेत. मयुरी मालुसरे यांनी केलेली अतिशय सुंदर अशी अंतर्गत मांडणी, तसेच गोष्टीला साजेशी अशी संजय ससाणे यांनी चितारलेली आतील चित्रे, व श्रीराम मोहिते यांनी केले सुलेखन यामुळे हा कथासंग्रह फारच विलोभनीय झाला आहे.  ज्योती घनश्याम यांनी साकारलेले अप्रतिम मुखपृष्ठ तर बालगोपाळांचे लक्ष वेधण्यास यशस्वी झाला आहे.  शिवानी प्रिंटर्स यांचे सर्वोत्कृष्ट दर्जाचे मुद्रण हे ही ह्या कथा संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.   

ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ञ श्री. न. म. जोशी सरांची प्रस्तावना आणि पाठराखण लाभलेला हा बालकथासंग्रह म्हणजे साहित्य विश्वासाठी अलभ्य लाभच म्हणावयास हवा. त्यानंतर काही लिहिणे म्हणजे फारच धारिष्ट्याचे होईल.

लाडोबा प्रकाशन’ने बालसाहित्यात फारच मोलाचे योगदान देण्याचा संकल्प केला आहे ह्याचा मी एक साक्षीदार आहे.  त्यांचे ‘लाडोबा’ हे मासिक आणि दिवाळी अंक तर बालगोपाळांसाठी एक वैचारिक मेजवानीच आहे. 

‘लाडोबा प्रकाशन’चे घनश्याम पाटील सरांचे हा बालकथासंग्रह प्रकाशित केल्याबद्दल खूप खूप आभार आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन.

 

 

रवींद्र कामठे

९४२१२ १८५२८

ravindrakamthe@gmail.com

२१ जानेवारी २०२५

Tuesday, 21 January 2025

“रॅगिंगचे दिवस एक वास्तववादी अनुभव कथन”

 


“रॅगिंगचे दिवस एक वास्तववादी अनुभव कथन”

 

बऱ्याच दिवसांनी ‘चपराक’च्या कार्यालयात गेलो होतो. ‘चपराक’चे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांनी माझे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आणि नेहमीप्रमाणे गेल्याबरोबर माझ्या हातात नुकतेच मुद्रणालयातून आणलेले सातारा जिल्ह्यातील पाटणच्या श्री. सुहास कोळेकर यांचे “रॅगिंगचे दिवस” हे अनुभव कथन पुस्तक दिले आणि मी त्याचे मुखपृष्ठ पाहूनच एकदम खुश झालो.  सर्वप्रथम घनश्याम सरानीच केलेली पुस्तकाची पाठराखण वाचली आणि मला कधी एकदा हे अनुभव कथन वाचतो आहे असे झाले होते.

मुळात कॉलेज मधील दिवस आणि त्या दिवसांतील अनुभव म्हणजे गत स्मृतींना उजाळा देणारे हे पुस्तक त्यात ‘रॅगिंग’ ह्या अतिशय गहन व संवेदनशील विषयातील प्रत्यक्ष अनुभव माझ्या फारसे कधी वाचण्यात आले नव्हते.  त्यामुळे मला कधी एकदा घरी जातोय आणि हे सुहास कोळेकर यांनी शब्दबद्ध केलेले अनुभव वाचतो आहे ह्याची उत्कंठा लागली होती.

सुहास कोळेकर ह्यांचाशी माझा परिचय चपराक प्रकाशनच्या एका कार्यक्रमा निमित्त झाला होता.  स्टेट बँकेतील एक नावाजलेले अधिकारी, अतिशय साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे आणि त्यात लेखनाची तळमळ असणारे हे व्यक्तिमत्व मला पहिल्या भेटीतच भावले होते.  शेतकरी कुटुंबातील अतिशय खडतर असे जीवन त्यांनी त्यांच्या “शेतकऱ्यांची पोरं” ह्या फेसबुक वर लिहिलेल्या लेखन मालिकेत मी आवर्जून वाचली आहे व त्यांच्या रांगड्या ग्रामीण जीवनाच्या लिखाणाच्या शैलीचा चाहता आहे.

कृषी महाविद्यालय नागपूर येथील कॉलेज मधील हॉस्टेलच्या जीवनातील चार वर्षांचा काळ व त्यामधील रॅगिंगचे अनुभव वाचतांना बऱ्याच वेळा छातीत धडधड होत होती. पूर्वीच्या काळी कॉलेज जीवनात असे रॅगिंगचे प्रकार खूप होत असत. हे फक्त ऐकून होतो. प्रत्यक्ष अनुभव असा फारसा कधी वाचण्यात अथवा ऐकण्यात आलाच नव्हता, जो सुहास कोळेकरांच्या पुस्तकाने आला हे मी अगदी प्रामाणिकपणे कबुल करतो.  माझे वडील पुण्याच्या कृषी महाविद्यायात नोकरी करत होते त्यामुळे मला साधारण कृषी महाविद्यालय आणि त्यातील हॉस्टेल मधील वातावरणाची साधारण कल्पना होती. त्यात मी ही माझ्या उमेदीच्या काळात एक वर्षासाठी कृषी महाविद्यालयात नोकरी केल्यामुळे मला ह्या विषयातील थोडीशी माहिती होती, परंतु फक्त ऐकीव गोष्टीमुळे ह्या विषयाची एवढी गंभीरता मला नव्हती. 

सुहास कोळेकर यांनी ज्या नीडर पद्धतीने आणि त्यांच्या रांगड्या भाषेत कृषी महाविद्यालयातील हॉस्टेल मधील दिवसांचे आणि त्यात रॅगिंगचे जे काही अनुभव कथन केले आहेत ते वाचतांना मन थोडे घट्टच करावे लागते.  त्यात ह्या सर्व प्रकारात कुठेही न हार मानता हे सर्व रॅगिंग सहन करत करत त्यांनी आपले कृषी क्षेत्रातील M.SC Agri चे शिक्षण जिद्दीने पूर्ण करून स्वत:ला सिद्ध केले आहे असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.

कॉलेज जीवनात हॉस्टेल मधील एकंदरीत जे काही वातावरण असते, जे तुमच्या माझ्यासारख्याला एखादवेळेस माहितीही नसेल त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप मार्गदर्शक आहे.  भले आताच्या काळात रॅगिंग कमी झाले असेल तरी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुठलीही तडजोड करावी लागली तरी चालेल परंतु आपल्या उद्दिष्टापासून जराही विचलित न होता, कितीही कठीण परिस्थती आली तरी त्यावर मात करून ते कसे साध्य करायचे ह्याचा वस्तुपाठ ह्या अनुभव कथनातून मिळतो असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

सुहास कोळेकरांनी, त्यांच्या हॉस्टेल मधील चार वर्ष्यांच्या काळातील प्रसंगात घडलेल्या घटना अतिरंजित न करता त्या जशा घडल्या आहेत त्याचे वास्तववादी लेखन केल्यामुळे त्या घटनांचे गांभीर्य वाचकाला नक्कीच जाणवते आणि आपल्या नकळत आपण आपल्या कॉलेज मधील जीवनात खेचले जातो हे लेखकाचे म्हणजेच सुहास कोळेकर यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.  आपल्यापैकी फार थोड्या लोकांना हॉस्टेल मध्ये राहण्याचा आणि त्यात अशा रॅगिंगचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनुभव आला असेल. ज्यांना हा अनुभव असेल त्यांना तर हे पुस्तक म्हणजे त्यांचे अनुभव शब्दबद्ध करण्यासाठीची प्रेरणाच म्हणावे लागेल.  ह्या पुस्तकातील अनुभव त्यामधील प्रसंग अथवा घटना ह्या इथे नमूद करण्यापेक्षा त्या वाचकांनी हे पुस्तक वाचवे असे मला वाटते.

पदवीधर होण्यासाठीचे शेवटच्या वर्षातील ग्रामीण कृषी कार्यानुभव काळातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आलेले अनुभव तर निर्विवादपणे, स्वत: एक शेतकरी असेलेल्या लेखकाचे संवेदनशील मन प्रतिध्वनित करतात. त्यानिमित्ताने लेखकाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या मांडलेल्या व्यथा व जीवनाची ससेहोलपट जाणवते आणि नकळत शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या विषयाला स्पर्श करून वाचकांचे मन हेलावून टाकते.

सुहास कोळेकर यांनी त्यांच्या अनुभव कथनात त्यांच्या मित्रपरिवाराचा नावासहित केलेला उल्लेख तर मला प्रंचंड भावाला.  काही काही प्रसंग तर अंगावर काटा आणतात.  अर्थात ते प्रसंग लिहिण्याचे लेखकाने दाखवलेले धारिष्ट्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी घडलेले प्रसंग व घटना ज्याकाही प्रामाणिकपणे मांडल्या आहेत त्यासाठी त्यांचे करावे कौतुक थोडेच आहे.

हॉस्टेल मधील असुविधांचा आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार कसा चालतो ह्याचे लेखकाने वर्णन केलेल्या घटनेने, त्यांच्या एका मित्राचा शेवटच्या वर्षी ऐन परीक्षेच्या काळात अल्पशा आजाराने झालेला मृत्यू तर आपल्या मनाला चटका लावून जातो.  अशा आणि अजून कितीतरी संवेदनशील प्रसंगांनी आणि घटनांनी भारावलेला हा अनुभव कथनाचा पट वाचकांना त्यांच्या गतस्मृतींना उजाळा द्यायला नक्कीच भाग पाडेल असे मला वाटते.

अरविंद शेलार यांनी विषयाला साजेसे चितारलेल मुखपृष्ठ ह्या पुस्तकाच्या वैभवात भर घालते. चपराक प्रकाशन च्या घनश्याम पाटील सरांचे ह्या अतिशय संवेदनशील विषयातील अनुभव कथन पुस्तक प्रकाशनासाठी मानावेत तेवढे आभार थोडेच आहेत. सुहास कोळेकर यांचे तर मनापासून कौतुक आहे. इतक्या गंभीर विषयाला त्यांनी ज्या प्रगल्भतेने न्याय दिला आहे तो फारच कौतुकास्पद आहे. संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे हे मात्र नक्की.

 

 

पुस्तकाचे नाव     : “रॅगिंगचे दिवस

लेखक                : सुहास कोळेकर

प्रकाशक             : चपराक प्रकाशन

पृष्ठे                    : १२८

मूल्य                  : रु. २५०/-

 

रवींद्र कामठे

९४२१२ १८५२८

ravindrakamthe@gmail.com